Saturday 16 April 2022

वीर वानरलोकस्य सर्वशास्त्रविदां वरः| किष्किन्धा - ६६|२

 





आपल्या घरी सायंकाळी शुभंकरोति, श्रीरामरक्षा, भीमरुपी, अथर्वशीर्ष ही स्तोत्रं थोरा मोठ्यांकडून म्हटली जात नसतील, ती आपल्या कानांवर पडूनंच आपोआप मुखोद्गत झालीच‌ नसतील तर आपण करंटे आहोत. तरीही वाईट वाटुन न घेता आज‌ तरी संकल्प करावा...संध्याकाळी कार्यालयातून (ओफीसमधून) घरी आल्यावर टीव्ही नावाची घरबुडवी, समाजबुडवी, नातेबुडवी, बुद्धिबुडवी साडेसाती न लावता उपरोक्त स्तोत्रांचं पठण आपण करु शकत नसु तर आपल्या पुढच्या पिढ्यांना आपण काय संस्कार देणाराहोत ह्याचा‌ विचार आपले आपण केलेला बरा...


हे असे स्तोत्रपठण केल्याने काय होते ह्याचे उत्तर काही वर्षे‌ सातत्याने त्या गोष्टी करूनंच पहावं...! कारण आमचे अनुभव सांगितलं तर तो आमचा अहंकार ठरेल...! काही अनुभव शब्दांत‌ व्यक्त करता‌ येतंच‌ नाहीत...! नाहीतंच...! किंबहुना करुच नयेत...! ते नुसते अनुभवावेत. साखर गोडंय‌ गोडंय असे लाखवेळा घोकलं तरी काही गोडवा कळेल का? ती‌ चाखल्यावरंच‌ कळेल...! 


सत्राणें हुड्डाणे ऐकताना अंगावर शहारे येत नसतील, बाहु स्फुरण पावत नसतील, अंगामध्ये चैतन्याची‌ लहर येत‌ नसेल तर आपण माणुस नाही आहोत...! कुणाला अत्युक्ती वाटो न वाटो...!


हनुमान चालिसा पाठ केली व प्रत्यही म्हटली तर आयुष्यांत‌ कधीही डिप्रेशन नावाचा भिकार रोग मनाला स्पर्शही करणार नाही आणि झाला असेल तर पळून जाईल. अनुभूती घ्यावी स्वत:च स्वतः...! आत्मविश्वास वाढवायचा असेल, व्यक्तिमत्व प्रभावसंपन्न करायचं असेल तर श्रीहनुमंतासारखे रसायनंच नाही.


श्रीसमर्थ का प्रेरित होते हनुमंत जागोजागी‌ स्थापन करायला? विवेकानंद का उच्चारत होते हनुमंत हीच‌ तुमची आता उपास्य‌देवता ठेवा म्हणायला? 



इयत्ता तिसरी किंवा चौथीत एका रात्रीत मारुती‌स्तोत्र पाठ करायचं, प्रति शनिवारी हनुमान चालिसेचे एक सो पाठ कर कोई म्हणत शंभराच्या वर पाठ करायचे, जय हनुमान मालिका पाहत हनुमंतांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन स्वत:ला आपण जणु काही हनुमानंच आहोत अशा आविर्भावात जगायचं, घरीच का‌ होईना पण व्यायाम करायचाच, तालमीत आत्ता आत्ता जायला लागलोय, हनुमंतांसारखे चार वेद सांगोपांग अभ्यासायचा प्रयत्न करायचा, त्यांच्यासारखंच सर्व शास्त्रांचे अध्ययन किंवा निदान वाचन तरी करायसाठी कटिबद्ध व्हायचं, त्यांच्यासारखंच संस्कृत अस्खलित बोलण्यासाठी प्रयत्न करायचा, भले आजही ते न येवो पण प्रयत्न तरी करायचाच...! किष्किंधा कांडात भगवान श्रीरामचंद्रांच्या नि श्रीहनुमंतांच्या प्रथम भेटीवेळचे ते‌ सात‌ श्लोक नुसते वाचावेत एकदा...! खूप वेळा लिहिलंय ह्यावर...! 


श्रीहनुमंत हा व्यक्तिमत्व निर्माणाचा नि राष्ट्र पुनरुत्थानाचा न दुजा असा मंत्र आहे....!


अशा चिरंजीवी राष्ट्रीय‌ व्यक्तिमत्वाची उपासना नाही करायची तर अन्य कुणाची करायची???


हनुमंत आमुची कुळवल्ली|


भवदीय.....


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#श्रीहनुमानजयंती_जन्मोत्सव_शक्तिउपासना_बलोपासना_रामायण_व्यक्तिमत्व_विकास

No comments:

Post a Comment