Monday 13 November 2023

महाप्रस्थानाच्या पथावर

 


यतिवर ऋषिश्रेष्ठ श्रीमद्दयानंद सरस्वति पुण्यस्मरण 

(तिकडे कार्तिक वद्य अमावस्या, आपल्याकडे अश्विन वद्य अमावस्या)

जब मैं आर्यजातिकीं सार्वत्रिक अधोगति और अवनति देखता हूँ, तो मेरी वेदना का पार नहीं रहता।

इति महर्षि श्रीदयानंद


कृण्वन्तो विश्वमार्यम् ही वेदांची नि श्रावयेच्चतुरो वर्णान् ही प्रत्यक्ष श्रीमन्महाभारताची प्रत्यक्ष जगभर वेदप्रचार करण्याची आज्ञा धिक्कारून वेदांपेक्षा मध्यकालीन स्मृतींना प्रमाण मानत विदेशयात्रा गमन निषेध करून विश्वव्यापी विश्वगुरु वैदिक धर्मांस संकुचित करणाऱ्या समुद्रबंदी सारख्या रुढींचं प्राबल्यत्व, वैदिक यज्ञामध्ये निर्दोष पशुंची हिंसा, बळीप्रथेचे थोतांड, कलिवर्ज्याचं थोतांड, शास्त्रात् रुढीर्बलीयसी ही मानसिकता, स्वमतसिद्धांतासाठी षट्दर्शनांची वेदविरुद्ध विकृत मांडणी, अवतारवादाचा अतिरेक, आठव्या किंवा सहाव्या वर्षी मुलींचा विवाह लावण्याची विकृती (धर्मसिंधु), सतीसारख्या विकृतींना वेदसंमत ठरविण्याचा अट्टाहास, केवळ ब्राह्मण स्त्रियांचे केशवपन, एखादी विधवा स्त्री केशवपन न करता समोर आली तर तिला तुच्छ लेखत दर्शन नाकारणारे कथित संन्यासी, विधवांना पुनर्विवाहास निषेध करून त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी नि त्यातून आमच्या ब्राह्मण समाजाला त्या निष्पाप माता भगिनींचे लागलेलं अश्रांत शाप, वेदांपेक्षा आपल्या कथित परंपरा प्रमाण मानणारे आचार्य नि त्यांचे अंधानुयायी, स्त्री-शुद्रांनी वेद ऐकु नये सारखी वचने स्मृतिग्रंथात घालून त्यांना वेदाधिकारापासून वंचित ठेवणे, याने अकारण ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाला शत्रुंकडून घातले गेलेलं खतपाणी, श्रीसीतेसारख्या महासाध्वीचा विवाह सहाव्या वर्षी दाखवून मध्ययुगीन स्मृतींचे विकृत समर्थन, सोवळ्याच्या नावाखाली केवल चंडालांपुरती मर्यादित असलेल्या अस्पृश्यतेला सर्वच शुद्रांसाठी जन्मजात सिद्ध करण्याचा कथित 'सनातनी' अट्टाहास नि वर्णव्यवस्था जन्माधिष्ठित सिद्ध करण्याचा अवैदिक प्रयत्न...


वैदिक धर्माचे वाट्टोळं करणाऱ्या या धर्मविध्वंसक प्रथांना आपल्या सुतीक्ष्ण तर्काने नि अपार वेदनिष्ठेने छेद देणारा ऋषिश्रेष्ठ महात्मा आजच्याच तिथींस १८व्या विषप्रयोगाने देहदान करता झाला...


बर या सर्व गोष्टी नाकारणारे महर्षी श्रीदयानंद हे पहिले व्यक्ती होते अशातलाही भाग नाही, त्यांच्याही आधी नि नंतर अनेकांनी यातल्या काही तर काहींनी सर्वर गोष्टी धिक्कारलेल्याच आहेत, त्यामुळे श्रीदयानंदांनी हे सर्व नाकारून फार मोठ्ठा सनातन द्रोह केला असेही नव्हे, पण केवळ मूर्तीपुजा-अवतारवाद नाकारला इतकंच घोकत या दोन कारणांसाठी म्हणून ते कुणासाठी शत्रु असतील तर हे शत्रुत्व आह्मींही आजीवन मिरवु भलें आह्मीं मूर्तीपुजा अवतारवाद नाकारत नसलो तरीही...

भारतीय विद्वत्ता जेंव्हा पाश्चात्यांच्या अभ्यासाने दिपून जाऊन दिग्भ्रमित होऊन पुढे लोटांगणं घालत आर्याक्रमण मान्य करत आपल्या इतिहासाचे आपल्याच हाताने श्राद्ध घालत होती, तेंव्हा 'यस्मिन्देशे द्रुमो नास्ति तत्रैरण्डोऽपि द्रुमायते' अशी मैक्सम्युलरची निर्भ्रर्त्सना करत भारतीय इतिहासाची विशुद्ध भारतीय पंरपरेवर आधारित यथोचित ऐतिह्य मांडणीचे दिग्दर्शन नि सूत्रपात करणारा इतिहासवेत्ता आज लोपला

आपल्या आजीवन अखंड अविप्लुत नैष्ठिक ब्रह्मचर्याने नि योगसाधनेने तपःपूत देहांत त्या नीलकंठाप्रमाणे १७वेळाचा विषप्रयोग स्वीकारत आपलं मूलशंकर हे मूळ नाम सार्थ करणारा तो महायोगी आज अमावस्येच्या तिथींस स्वलोकधामी निर्गमन करता झाला...

मला चारही वेदांचे भाष्य करायला ४०० वर्षे लागतील - इति महर्षि दयानंद

जर ते जीवित असते तर आज न्यूनतम २०० वर्षांच्या आयुचे असते आणि त्यांच्या हातून वेदभाष्य तरी पूर्ण झालं असतं पण नियतीला काही गोष्टी मान्य नसतात. जर तरला इतिहासात काहीच स्थान नसतं. इतकंच काय पण त्यांनीच त्यांच्या मतप्रणालीत स्वतःहून बदलही निश्चित केला असता, कारण ते स्वतःला कधी सर्वज्ञ मानत नव्हते.

त्यांची प्रत्येक गोष्ट आंधळ्यासारखी मानावीच असा अट्टाहास त्यांच्याविषयीच्या अंधभक्तीचा सोहळा ठरण्यापेक्षा आपल्या उपासनेने, अध्ययनाने नि डोळस वृत्तीने त्यांचे जे योग्य ते स्वीकारून नि अयोग्य ते त्यागून राष्ट्रप्रथम ही वृत्ती अंगी दृढ करत वैदिक सिद्धांतानुसार जीवनाचा मार्ग धरणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल...

आज खूप काही लिहायची इच्छा होती पण वेळेअभावी इतकंच.

महर्षि दयानंद खरंच ऋषि होते का?

ज्या सत्पुरुषाचा समग्र प्रयत्न हा या भारत देशामध्ये पुन्हा एकदा वैदिक आणि आर्ष युगाच्या प्रोज्वल आणि पुनीत जीवन प्रणालीला पुनर्स्थापित करणे हा होता, ज्याचा संपूर्ण पुरुषार्थ हा प्राचीन ऋषीमुनींच्या चिंतनाला आणि कर्तुत्वाला पुनर्जीवित करणे हा होता, हेच कारण आहे की ब्रम्ह्यापासून ते महर्षी जैमिनीपर्यंतच्या ऋषि परंपरेची पुनः पुनः आठवण करून देणाऱ्या महर्षी श्रीदयानंद यांची गणना सुद्धा वशिष्ठ, विश्वामित्र आणि व्यासांसारख्या ऋषींच्या कोटीमध्ये होऊ लागली होती. दानापूर नावाच्या एका ग्रामी त्यांचं आर्ष चिंतन आणि कर्तुत्वाला, वक्तृत्वाला पाहून एकाने विचारलं की

'महाराज, आपण तर ऋषी आहात!' 

पण अत्यंत निर्लोभी, निर्मम, निरहंकारी असणाऱ्या या संन्याशाने स्वतःला त्या ऋषीपरंपरेचा अकिंचन अनुयायी आणि आर्षधारणांचा विनम्र पक्षपोषक मानत असताना अत्यंत विनम्रपणे जे उत्तर दिलं ते पाहण्यासारखे आहे, श्रीदयानंद म्हणतात

'बंध, पुराकालीन ऋषियों के अभाव में तुम मुझें कुछ भी कह लो, किन्तु यदि सांख्य एवं वैशेषिक दर्शनोंके प्रवक्ता महर्षि कपिल और कणादके युग में मैं होता, तो मेरी गणना साधारण विद्वान के रूप मे भी कथञ्चित ही हो होती।'


सरलता आणि विनम्रतेचा अनुपम साक्षात्कार करणाऱ्या या ऋषिश्रेष्ठाच्या चरणी आज पुण्यस्मरणानिमित्त कोटी कोटी दंडवत प्रणाम!


भवदीय,


पाखण्ड खण्डिणी 

Pakhandkhandinee.blogspot.com


#महर्षि_दयानंद_पुण्यस्मरण_दीपावली_अमावस्या_सनातन_वैदिकधर्म

Friday 3 November 2023

सांख्यदर्शन निरीश्वरवादी नाही, कुठलंच वैदिक दर्शन निरीश्वरवादी नाही

 


सांख्यदर्शन निरीश्वरवादी नाही, कुठलंही वैदिक दर्शन निरीश्वरवादी नाहीयेच...

मागेही लिहिलंय की हे सर्व भ्रम आचार्यांच्या भाष्यामुळे व ते नीट समजून न घेतल्याने निर्माण झालेले भ्रम आहेत, मग ते अद्वैती असोत, द्वैती असोत किंवा अन्य असोत. यातही सर्वस्वी त्यांचा दोष नाहीये. त्यामागेही हेतु आहे. तो कसा ते पाहुयांत..

मूळात निरीश्वरवादी म्हणजे लगेचंच ईश्वर नाकारणं असेही नव्हे, सांख्यदर्शनाच्या संबंधी निरीश्वरवादाचा अर्थ केवळ जगत्सृष्ट्यत्वामध्ये ब्रह्म किंवा ईश्वराचा नियंता या रुपानेच स्वीकार आहे, सांख्यकार श्रीकपिल महामुनी हे प्रकृतींस जगताचे मूल उपादान कारण मानतात आणि ईश्वर किंवा अन्य कोणत्याही तत्वाला जगत्सृष्ट्यत्वामध्ये असिद्ध मानतात किंवा फारतर नियंता मानतात इतकंच. ते लगेचंच ईश्वराचं अस्तित्व नाकारतात असा त्याचा अर्थ नव्हे...

पण सांख्यदर्शनात खालील सुत्रांवरून त्याच्या ईश्वरनिष्ठेची साक्ष पटते. ती खालीलप्रमाणे....

ईश्वरासिद्धेः या सूत्रामध्ये ईश्वर हा केवळ उपदानाकारणत्वाच्या दृष्टीने असिद्ध सांगितला आहे याचा इथे ईश्वराचा सर्वार्थाने किंवा सरसकट निषेध नसून त्याच्यावरचे अवलंबित्व सिद्ध आहे, तो केवळ नियंता आहे इतकंच. पण या सूत्राचा अर्थ सांख्यदर्शनकार महर्षि श्रीकपिलांनी ईश्वरालाच नाकारलंय असा भ्रमाने काढला गेल्याने गोंधळ झालेला आहे.

दुसरा संदर्भ - सांख्य - ३/५६-५७
"स हि सर्ववित् सर्वकर्ता"

ह्या सूत्रांत स्पष्टपणे तो (स:) ईश्वर हा सर्वांतर्यामी थोडक्यात सर्व जाणणारा व सर्वकर्ता म्हणजेच सर्व सृष्टीचा रचयिता आहे हे स्पष्ट सांगितले आहे, यद्यपि प्रकृती उपादानकारण असली तरी.

पुढे लगेचच म्हटलंय "इदृशेश्वरसिद्धि: सिद्धा:"
म्हणजे ह्यावरूनच ईश्वराची सिद्धी दृढतेने केली गेली आहे. पांचव्या अध्यायातही सुत्र २ ते १२ ह्यातही सांख्यदर्शनकार श्रीकपिलमहामुनींची ईश्वरनिष्ठा स्पष्ट दृग्गोचर होते.

पण मग हा नेमका घोळ कुठे झाला ते पाहुयांत...

ईश्वरकृष्णांच्या सांख्यकारिकेमुळे...

ब्रह्मसूत्रशाङ्करभाष्य जर आपण व्यवस्थित अभ्यासलं तर स्पष्ट लक्षात येतं की आमच्या भगवत्पाद श्रीमच्छंकराचार्यांनी सुद्धा बौद्धमत निराकरणासाठी आपल्या लक्ष्यसाध्य हेतु ईश्वरकृष्णांच्या सांख्यकारिकासारख्या ग्रंथांचा आधार घेऊन सांख्यदर्शनाच्या कथित निरीश्वरवादाचा क्षणभर आश्रय घेतला पण याचा अर्थ भगवत्पाद श्रीमच्छंकराचार्यांना मूळ सांख्यदर्शन हे निरीश्वरवादी होते असं म्हणायचं मुळीच नव्हतं हे भाष्य नीट अभ्यासलं तर कळेल. ब्रह्मसूत्रशाङ्करभाष्याच्या २।१।१ येथील सूत्रावर आचार्यांनी 'कापिलस्य तन्त्रस्य वेदविरुद्धत्वं वेदानुसारिमनुवचनविरुद्धत्वंं च।' असे जे म्हटलंय त्यातही हेतु आहे. कारण सांख्यदर्शनकार श्रीकपिल महामुनी हे स्पष्टपणे 'पुरुषबहुत्वं व्यवस्थातः।' (६।४५) या सूत्रामध्ये स्पष्टपणे पुरुषजीवांची अनेकता सिद्ध करतात. भगवत्पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांनी या 'ईश्वरासिद्धे:' सूत्राला नास्तिकताप्रदर्शक म्हटलेलं आहे आणि प्रकृतीच्या उपादान कारणत्वाला व जीवांच्या नानात्वाला वेदविरुद्ध यासाठी म्हटले आहे कारण त्यांच्या मायावादाच्या प्रतिपादनास त्याने विरोध येतो म्हणून. त्यांना अद्वैतमतप्रतिष्ठापनेसाठी त्या मांडणीची आवश्यकता होती. श्रीरामानुजाचार्यांनी सुद्धा त्यांच्या विशिष्टाद्वैत प्रतिपादनासाठी १।४।२३ या सूत्रांवर भाष्य करताना आचार्यांचंच अनुसरण केलेलं आहे.

मुळात ईश्वरकृष्णांची सांख्यकारिका हा आधुनिक ग्रंथ आहे, वात्सायनाच्या वेळी त्याचं अस्तित्वही नव्हतं हे स्पष्ट सिद्ध होतं कारण त्याने वार्षगण्याला उद्धृत केलं आहे, ईश्वरकृष्णांना नाही.

सांख्यदर्शनावर निरीश्वरवादाचा आरोप करणाऱ्यांनी आणखी "वार्षगण्य" नावाच्या एका विद्वानाचा संदर्भ दिला आहे की ज्यांनी मुळ कपिलांच्या सांख्यदर्शनाच्या विरोधात काही मतभेद प्रकट केला. आणि बौद्धांनी त्याचाच वापर ईश्वरखंडनासाठी म्हणजे नास्तिकतेसाठी केला. पुढे भाष्यकारांनी त्यालाच प्रमाण मानुन हे सांख्य हे निरीश्वरवादी आहेत हा सिद्धांत मांडला. दुर्दैवाने श्रीकरपात्री स्वामींसारखा प्रकांड विद्वानही 'वेदार्थपारिजातमध्ये' हेच मांडताना दिसतो अर्थात त्यामागे त्यांचा हेतुही केवळ आर्यसमाजाला विरोध करणं हाच होता. असो तो स्वतंत्र विषय...

षड्दर्शनांना निरीश्वरवादी ठरवणं हे चूक असलं तरी ती त्या आचार्यांची तत्कालीन बौद्धमत निराकरणासाठी केलेली तात्पुरती व्यवस्था होती...

आमच्या प्रज्ञाचक्षु श्रीगुलाबराव महाराजांनी यावर सुंदर विवेचन केलेलं आहे जे समन्वयाच्या दृष्टीने ते द्रष्टव्य आहे. महाराजांनी स्पष्टपणे सांख्यदर्शन हे निरीश्वरवादी नसून सेश्वर दर्शन आहे हे व्यवस्थित रीतीने पटवून दिलं आहे. आणि त्याचा वेदांताशी समन्वय करून दिला आहे. महाराज स्पष्ट म्हणतात की भगवत्पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांनी प्रकृतीची सत्यता आणि पुरुषबहुत्व या मतांचे खंडन केले परंतु सृष्टीच्या उत्पतीचा क्रम मात्र सांख्यानुसारच घेतला. आचार्यांनी गीताभाष्यामध्ये आणि विष्णुसहस्त्रनाम भाष्यामध्ये महर्षि श्रीकपिलांचे व सांख्यशास्त्राचे वैदिकत्व स्वीकारून ते प्रमाणही मानले आहे. म्हणजे ब्रह्मसूत्रशाङ्करभाष्यामध्ये एकीकडे हेच आचार्य सांख्यदर्शनाला अवैदिक किंवा वेदविरुद्ध ठरवतात आणि दुसरीकडे त्याचा मुक्तहस्ताने वापर करतात हा विवेक आपण लक्षात घ्यायला हवा...

षट्दर्शने म्हणजे प्रत्येक दर्शन मूळातून स्वत: संप्रदायपूर्वक म्हणजे गुरुमुखातून ब्रह्मचर्य्यपूर्वक तेही आर्षपद्धतीने अध्ययन न करता केवळ अंतिम असे वेदांत दर्शन किंवा त्यावरील आधुनिक भाष्ये अभ्यासून षट्दर्शनांविषयीची सैद्धांतिक भूमिका समजाऊन घेण्याचा प्रयत्न करणे हा आत्मघात नव्हे काय? दुर्दैवाने आर्ष भाष्यांची अनुपलब्धता हाही दोष आहे. आता उपरोक्त भाष्यकारांनी ती मूळातून अभ्यासलीच नव्हती असे समजणं चूक असलं तरी स्वत: मूळातून ती अभ्यासण्यांत हानीपेक्षा लाभंच आहे असे म्हटल्यांस अत्युक्ती ठरेल काय? ह्यात पुन्हा द्वैत-अद्वैत-त्रैत वाद वेगळाच पण तो स्वतंत्र. अंतिम मत अनुभूतीचा विषय पण आधी अभ्यासणं तरी महत्वाचं..

पूर्वमीमांसेवर श्रीव्यासांचे, वैशेषिकांवर श्रीगौतमांचे, न्यायावर श्रीवात्सायनांचे, योगसूत्रांवर श्रीव्यासांचेच की स्वोपज्ञ(?), सांख्यावर श्रीभागुरीमुनींचे, वेदांतावर श्रीवात्सायनाचे किंवा श्रीबौधायनाचं - इति महर्षि दयानंद

ही आर्ष म्हणजे ऋषिमुनीकृत भाष्ये! ही अभ्यासणं म्हणजे समुद्राच्या गर्भात जावं व मौल्यवान मोती वर आणावीत असे साहित्य. ह्यातली केवळ न्याय व योगाची आज उपलब्ध आहेत. अन्य चार काळाच्या ओघात नष्ट झाली. आज जर ही सर्व भाष्ये उपलब्ध असती तर? तर षट्दर्शनांविषयी जो गोंधळ झाला व मतमतांतरे निर्माण झाली ती झाली नसती. हा द्वैत-अद्वैत-त्रैत वादही निर्माण झाला नसता. आपलं दुर्दैव...! अस्तु!

समूळ ग्रंथ पाहिल्यावीण, उगाचंच ठेवीं जो दूषण।
गुण सांगता अवगुण, पाहें तो येक पढतमूर्ख।
दासबोध

अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु।

भवदीय,

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#सांख्यदर्शन_निरीश्वरवाद_सेश्वरवाद_श्रीशंकराचार्य_श्रीगुलाबराव_महाराज_षट्दर्शने_प्रकृती_सांख्यकारिका


Tuesday 31 October 2023

मी महर्षि श्रीमद्दयानंदांना का मानतो???

 


कालच्या ३० ऑक्टोंबरच्या आंग्ल दिनांकाने पुण्यस्मरणानिमित्त (तिथीने दीपावली अमावस्या)

भगवान श्रीरामकृष्णादि अवतार परंपरा, भगवत्पाद श्रीमच्छंकराचार्यादि आचार्यश्रेष्ठ, श्रीज्ञानोबा-तुकोबादि संतपरंपरा इतक्या उज्ज्वल परंपरा असताना श्रीदयानंद नामक कुणीतरी नवीन आर्यसमाजी मत प्रस्थापित करणाऱ्याच्या भजनी लागायचं काय कारण असावं? तारुण्यात मनुष्याला बऱ्याच वेळा काहीतरी नवीन किंवा वेगळं अशाचं आकर्षण असतं, अशा तारुण्यसुलभ भावनेने आह्मीं महर्षि श्रीदयानंदांचे अनुयायी आहोत काय ??

ज्या श्रीदयानंदांनी वेदांकडे चला म्हणत निम्नलिखित सर्व मते ही वेदविरुद्ध आहेत असे म्हणत हिंदुंची विग्रहपूजा अर्थात मूर्तीपुजा नाकारली, अवतारवाद नाकारला, वैदिक यज्ञांमध्ये पशुहिंसा किंवा बळीप्रथा नाकारली, कपाळावर गंध, माळा आदि कर्मकांड नाकारलं, अस्पृश्यता नाकारली, जन्मजात वर्णव्यवस्था नाकारत ती गुणकर्माधिष्ठित मांडली, फलज्योतिष नाकारलं, संतपरंपरा काहीअंशी नाकारल्या, श्रीमद्भागवतादि पुराणे नाकारली, गंगादि नद्यांचे तीर्थत्व नाकारलं, मध्ययुगीन स्मृत्या नाकारल्या, वेदविरुद्ध प्रक्षेपांच्या नावाने त्यांच्या सैद्धांतिक बैठकीनुसार ते नाकारलं, धर्मसिंधु-निर्णयसिंधु-तर्कसंग्रह-सिद्धांतकौमुदि आदि ग्रंथ अनार्ष म्हणून जितके वेदविरुद्ध तितके नाकारले, एवढा सर्व प्रचलित 'सनातन धर्म' नाकारत एक वेगळीच चूल मांडायचा घाट घातला ते श्रीदयानंद आह्मांला इतके प्रिय कसे???

सायण-महीधरादि आधीचे सर्व वेदभाष्यकार काहीअंशी चुकीचे व मीच तेवढा खरा वेदार्थ जाणणारा ही भावना बाळगणारे किंवा तसे मांडणारे श्रीदयानंद आह्मांस इतके प्रिय कसे???

जे काही प्रचलित आहे ते सर्व वेदविरुद्ध आहे व मी सांगतोय तेच खरं वेदसंमत ही श्रीदयानंदांची साहित्यातून दिसणारी वृत्ती कितपत स्वीकारार्ह्य आहे???

हे सर्व काम त्यांनी ब्रिटीशांच्या प्रभावाने केलं आहे काय?खरंच श्रीदयानंद काहीतरी वेगळीच चुल मांडणारे आहेत काय? आधीच्या बव्हतांश परंपरा व प्रचलित सनातन धर्म नाकारण्यांत श्रीदयानंदांचा खरंच काही दुष्ट हेतु होता का???

कालच्या श्रीदयानंदांच्या आंग्लदिनांकाने पुण्यतिथीनिमित्त या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न हा पूर्वीही खरंतर आमच्या दीडदोन तासाच्या फेबुलाईव्हमध्ये आह्मीं मागेच केला आहे, तरीही पुनः संक्षेपांत विवरण करणं आवश्यक असल्याने हा लेखनप्रपंच...!

मूळात श्रीदयानंद स्वीकारणे म्हणजे आधीच्या सर्व परंपरा नाकारणे असा अर्थ होतंच नाही, त्यामुळे हा भ्रम आधी दूर करणे आवश्यक आहे.

श्रीदयानंदांचा सत्यार्थ प्रकाश हा अजरामर ग्रंथ वाचताना आरंभी आरंभी हे जाणवतं की हा माणुस खरंच आपल्या सर्वच परंपरा नाकारतोय आणि तेही वेदांच्या नावाखाली??? म्हणजे आधीचे सर्व वेडे व हाच एकटा शहाणा? हे कितपत स्वीकारार्ह्य आहे याच प्रश्नांची उकल करण्याचा हा प्रयत्न...

श्रीदयानंदांचं म्हणणं इतकंच होते की धर्माधर्माचा निर्णय करताना वेदांच्या चार संहिता याच सर्वोच्च प्रमाण आहेत ही प्रत्यक्ष मनुमहाराजांची आज्ञा आहे, त्यामुळे त्याच्या जे अनुकूल तेच ग्राह्य व जे प्रतिकुल ते अग्राह्य ही त्यांची भूमिका होती. ही भूमिका वरवरपाहता अनाठायी वाटत असली तरी श्रीदयानंदांनी तिच्या पुष्ट्यर्थ प्रत्येक ठिकाणी तर्कशुद्ध प्रमाण सादर करूनच आपल्या भूमिकेचे समर्थन केलं आहे. आज उपलब्ध असलेला प्रचलित सनातन धर्म हा मूळ वैदिक सिद्धांतापासून बराच दूर गेला आहे हे त्यांचे निरीक्षण, जे आह्मांसही मान्य आहेच, ते त्यांनी अनेक प्रमाण प्रस्तुत करून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यांची मते मांडताना व आधीची नाकारताना त्यांनी स्वतः एक कटाक्ष ठेवलेला आहे तो असा की

युक्तियुक्तं वचो ग्राह्यं न तु पुरुषगौरवात्।

कुठल्याही महापुरुषाचे वचन हे युक्तीने ग्रहण करावं, केवळ त्याच्या मोठेपणाकडे पाहून नव्हे.

तापाच्छेदाच्च निकषात् सुवर्णमिव पण्डितैः।
परीक्ष्य मद्वचो ग्राह्यं न तु पुरुषगौरवात्।
भास्कराचार्य

सोनं ज्याप्रमाणे तावून सुलाखून तपासून स्वीकारलं जातं तद्वतंच माझी वचनेही चिकीत्सेने तपासूनंच स्वीकारावीत, केवळ माझ्या मोठेपणाकडे, पांडित्याकडे पाहून नव्हे..





हा विवेक हिंदुंना पूर्वी जो होता तो मधील काळात लुप्त झाला, जो महर्षि श्रीदयानंदांनी पुनः प्राप्त करून दिला. महर्षि स्वतः म्हणतात की

"बन्धु, हमारा कोई स्वतंत्र मत नही हैं| मैं तो वेद के अधीन हूं और हमारे भारत में पच्चीस कोटी आर्य हैं| कई कई बात में किसी किसी में कुछ कुछ भेद हैं, सो विचार करने से आप ही छूट जायेगा| मैं एक संन्यासी हूँ और मेरा कर्तव्य यही है कि जो आप लोगों का अन्न खाता हूँ इसके पर्यायमें जो सत्य समझता हूँ उसका निर्भयता से उपदेश करता हूँ| मैं कुछ कीर्तिका रागी नहीं हूँ| चाहे कोई मेरे स्तुति करें व निन्दा करें, मैं अपना कर्तव्य समझके धर्म बोध करता हूँ| कोई चाहे माने वा न माने, इसमे मेरी कोई हानि लाभ नहीं हैं|"

आज हिंदुस्थानात आपण अनेक मतमतांतरे, संप्रदाय, पंथ पाहतो. अशा परिस्थितीत वेदांनाच सर्वोच्च प्रमाण माना म्हणणारं आपलं हे मत पुढे जाऊन आपली ही आर्यसमाजाची विचारधाराच एक स्वतंत्र पंथ किंवा मत किंवा संप्रदाय बनेल ह्याची भीती‌ प्रकट करताना सर्वांना सावध करताना युगद्रष्टे महर्षि श्रीमद्दयानंद स्पष्टपणे म्हणतात...

"..और मै सर्वज्ञ भी नही हूँ| इससे यदि कोई मेरी गलती आगे पाई जाय, युक्तिपूर्वक परीक्षा करके इसी को भी सुधार लेना| यदि ऐसा न करोगे तो आगे यह भी(आर्य्य समाज विचारधारा) एक मत हो जायेगा और इसी प्रकार से 'बाबा वाक्यं प्रमाणं' करके इस भारत में नाना प्रकार के मत मतान्तर प्रचलित होके, भीतर भीतर दुराग्रह के रख के लढके नाना प्रकार की सद्विद्या का नाश करके यह भारत वर्ष दुर्दशा को प्राप्त हुआ हैं| इसमे यह भी एक मत (आर्य समाजका) का बढ़ेगा| मेरा अभिप्राय तो हैं कि इस भारत वर्ष मे नाना प्रकार के मतमतान्तर प्रचलित हैं वो भी, ये सब वेदों को मानते हैं इससे वेदशास्त्र रुपी समुद्र में यह सब नदी नाव पुन: मिला देने से धर्म ऐक्यता होगी| और धर्म ऐक्यता से सांसारिक और व्यावहारिक सुधारणा होगी और इससे कला कौशल आदि सब अभीष्ट सुधार होके मनुष्य मात्र का जीवन सफल होके अन्त में अपना धर्म बल से अर्थ, काम और मोक्ष मिल सकता है|"

महर्षी स्वत: म्हणताहेत की त्यांच्या प्रत्येक मताची चिकित्सा करावी व मगच ते स्वीकारावे. केवळ ते म्हणताहेत म्हणून नव्हे. जर त्यांचे मत कुठे चुकीचं आहे असे दिसत असेल, प्रमाणांनी, अनुभवाने चुकीचं सिद्ध होत असेल, तर ते सुधरावे...

याउलट आमचंच मत सर्वोच्च आहे, मी सर्वज्ञ आहे, याचा अमुक अवतार आहे, त्याचा तमुक अवतार आहे, इतर सर्व मते तुच्छ आहेत, केवळ आमच्याच मार्गाने या तरंच तुमचं कल्याण होईल ही भावना बाळगणारी व पेरणारी संप्रदायाभिनिवेशी, पंथाभिमानी, मिथ्या दुराग्रह बाळगणारी मतमतांतरे कुठे नि महर्षि श्रीमद्दयानंद कोठे???

इतकी स्वच्छ, तर्कशुद्ध, विवेकी नि समन्वयात्मक भुमिका ठेवणारे श्रीमद्दयानंद आह्मांस नकोसे वाटतात, ह्यापेक्षा आमची शोकांतिका कोणती आहे?? याचा अर्थ असा नव्हे की आपण आधीपासुन पाळत असलेल्या परंपरा सोडून द्याव्यांत. मूळीच नाही. पण विचार करून जे योग्य ते ठेवावं व वाईट ते‌ सोडावं इतकंच...

जाता जाता हे सांगणं आवश्यक आहे की श्रीदयानंदांच्या सत्यार्थ प्रकाश व ऋग्वेदादिभाष्यभूमिका या दोन ग्रंथांची म्हणजेच त्यांच्या मन्तव्याची जितकी खंडणं आजपावेतो उपलब्ध आहेत, तितकी खचितंच अन्य कुठल्या ग्रंथाची कुणी करायचा प्रयत्न केला असावा आणि त्या खंडनांना पुन्हा आर्यविद्वानांकडून दिली गेलेली मंडनात्मक उत्तरेही आहेत, तीही सर्व पठनीय आहेत. सांगायचं तात्पर्य इतकंच की आंधळेपणाने कुणाचंही मत स्वीकारु नयेच हाच आदर्श वस्तुपाठ आहे...



३० ऑक्टोबर, १८८३ या दिवशी विषप्रयोगाने देह त्यागाची वेळ आली त्याच्या काही दिवस आधीच आपली भूमिका या वीतरागी संन्याशाने मांडताना लिहिलं होते की

''मी मेल्यानंतर माझ्या अस्थी कुणालाही न सांगता नदीमध्ये किंवा अज्ञात स्थळी पुराव्यात, अन्यथा काही लोक माझ्याविषयीच्या भोळ्या भक्तीतून त्याची समाधी बनवतील व वेद व ईश्वर सोडून मलाच पूजत बसतील.''

वेदांनुसार संन्याशाचा देहही जाळायलाच हवा, त्याला पुरणं किंवा नदीत विसर्जित करणे हे वेदविरुद्ध आहे, म्हणून श्रीदयानंदांचा देह जाळण्यात आला होता. यावर सविस्तर येईन कधीतरी.

एकीकडे मी गेल्यानंतर माझी समाधी इथेच अमुकतमुक ठिकाणी मांडा असे म्हणणारे आहेत तर दुसरीकडे इतकी निर्गर्वी, निःस्पृह, निरलस, निःस्वार्थ, निर्मम, निर्लेप, शुद्ध भूमिका मांडणाऱ्या विद्वानाला आपण एकदा तरी अभ्यासणं योग्य नव्हे काय??? याला काही अपवाद मीही मानतो, तो वेगळा विषय. 

सर्वांना एक नम्रतेची विनंती की आयुष्यांत एकदा तरी महर्षींचे निम्नलिखित दोन ग्रंथ तरी अवश्य अभ्यासावेत...

१. सत्यार्थ प्रकाश - सत्यनिष्ठ वैदिक मत कोणते हे मांडणारी अमर ग्रंथसंपदा
२. ऋग्वेदादिभाष्यभूमिका -‌ वेदांकडे कसं पहावं, वेदांचे सत्यनिष्ठ स्वरुप नेमकं काय याविषयीची विस्तृत भूमिका

हे दोन्ही ग्रंथ‌ मराठीतून उपलब्ध आहेत...

पीडीएफ धागे

१.https://archive.org/download/in.ernet.dli.2015.484671/2015.484671.Satyarthprakash.pdf

२. https://archive.org/details/foqe_vaidik-dharm-swarup-of-dayanand-saraswati-translation-by-shridas-vidyarthi-1933-

वाचकांनी स्वत: निर्णय घ्यावा...

वेदांकडे वळावे हीच नम्रतेची विनंती...

भवदीय...

#महर्षिदयानंदसरस्वती_पुण्यतिथी_आर्य्यसमाज_वैदिकसिद्धांत_हिंदुधर्म_मतमतांतरे_संप्रदाय_पंथ



Sunday 29 October 2023

कविर्जयति श्रीमद्वाल्मीकिः।

 



पठ रामायणं व्यास काव्यबीजं सनातनम्।

यत्र रामचरितं स्यात् तदहं तत्र शक्तिमान्।

बृहद्धर्मपुराण १।३०।४७


पौलस्त्यवध नावाचं एक सनातन काव्यबीजरुपी वाङ्मय, एक आर्षमहाकाव्य ज्या आद्यकवीच्या वाणीतून स्फुरलं, त्या महर्षींची काल कोजागरीची जयंती ! मानवीजीवनाच्या सर्वोच्च आदर्शांचे प्रस्फुटीकरण ज्या आर्ष म्हणजे ऋषिप्रणीत वाङ्मयात आपणांस प्रथमंच दृष्टिगोचर होते, त्या अखंडप्रजाजनरंजनमूर्ती रघुकुलटिळक भगवान श्रीरामचंद्रांचं परमपावन चरित्र ज्या संस्कृतसाहित्याचा अरुणोदय ठरला, त्या श्रीमद्वाल्मीकिय रामायणाच्या रचनाकाराची कालची जयंती! आर्यावर्त्ताच्या, भारतवर्षाच्या, हिंदुराष्ट्राच्या समग्र इतिहासाचा प्रतिनिधीरुप, सर्वांचा अजस्र असा प्रेरणास्त्रोत ज्या श्रीसीतापतीच्या रुपाने आह्मांस प्राप्त झाला, त्या चरित्रकाराची कालची जयंती ! केवळ भारतवर्षातच नव्हे तर इंडोनेशिया, थाईलेंड, मलाया आदि देशांचं राष्ट्रीय काव्य ठरलेल्या या ऐतिह्य महाकाव्याचा निर्माता असलेल्या कविर्मनीषीची कालची कोजागरीची जयंती !



खरंतर काव्य हा शब्द अथर्ववेदामध्येही आला आहे व तिथे प्रत्यक्ष वेदांनाही काव्यंच म्हटलं आहे, इतकंच काय त्या परमात्म्यालाही कविर्मनीषी म्हटलंय वेदांमध्ये, त्यामुळे या अनुष्टुप छंदांमध्ये असलेल्या महर्षींच्या कृतींस आदिकाव्य का म्हणावं असा प्रश्न पडत असेल तर त्याचे साधं उत्तर हेच आहे की हे वेद हे प्रत्यक्ष ईश्वरनिर्मित असल्याने ते अनादि अपौरुषेय आहेत, वेदांमध्ये अनेक मंत्र अनुष्टुप छंदांमध्ये आहेत, इतकंच काय तर वेदांपश्चातचा प्रथम ग्रंथ म्हणजे प्रक्षेप नसलेली विशुद्ध मनुस्मृति ही सुद्धा अनुष्टुप छंदातच आहे, मग श्रीरामायणाला आदिकाव्य का म्हणायचं? तर त्याचे उत्तर हे आहे की याच्यापूर्वीचे उपरोक्त सर्वग्रंथ हे धर्मग्रंथ असल्याने ते अनुष्टुपादि अन्य छंदांमध्येही असले तरीही ते इतिहासग्रंथ नव्हते, पण श्रीरामायण हे ऋषिनिर्मित प्रथम ऐतिह्य काव्य म्हणून ते आदिकाव्य म्हटलं जाते इतकंच याचे तात्पर्य आहे, यावर आणखी विस्तार भविष्यात कधीतरी करेन.


काय आणि किती लिहावं???


ऐतिह्यदृष्ट्या जर या चतुर्युगातलं धरलं तर न्यूनतम ११,८३,००० वर्षांचा इतिहास असलेल्या व वायुपुराणातल्या ७०व्या अध्यायतल्या या ४८व्या श्लोकानुसार २४व्या चतुर्युगातलं धरलं तर न्यूनतम १,८१,४९,०७० अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या या सर्वादर्श चरित्राची गाथा ज्या आद्यकवींनी आपणांस दिली, त्या वाल्मीकि रामायणाचे जनक भगवान महर्षि वाल्मीकिंची काल जयंती झाली. ज्याने आयुष्यात एकदा तरी श्रीरामायण नि श्रीमहाभारत ही दोन आर्ष महाकाव्ये प्रत्यक्ष वाचली आहेत, त्याला या ग्रंथश्रेष्ठांचे महत्व वेगळं पटवून घेण्याची आवश्यकता नाही.


श्रीवाल्मीकिय रामायणावरच्या ३० संस्कृत टीका 

मागेच लिहिलंय की ज्या चरित्रचंद्राच्या उपरोक्त महाकाव्यांवर संस्कृत भाषेत ३० संस्कृत टीका झाल्यात, ज्यावर अन्य भारतीय व विदेशी भाषांमध्येही ३००च्या समीप साहित्यकृती निर्माण झाल्याहेत, इतकं ज्याला जगाने डोक्यावर घेतलं, तो मर्यादापुरुषोत्तम साक्षात् धर्माचा विग्रह असा श्रीराम ज्या महर्षींनी आपल्या दिव्य वाणी नि छंदोबद्ध सिद्धहस्त लेखणीने सिद्ध केला, त्या श्रीवाल्मीकिंविषयी लिहिताना वाणी हिंपुटी व लेखणी बोथट होणार नाही तर काय ???

अर्थात त्या लोकोत्तर महनीय ऋषिश्रेष्ठाला अभिवादन करताना एक खंत मात्र व्यक्त करावीशी वाटते ती अशी की ही मूळ आर्ष कलाकृती मधील काळात किती विकृत झाली हे त्यांचे त्यांनाच माहिती !

ज्या भगवान श्रीरघुनंदनांस आह्मीं आमच्या जीवनाचा सर्वोच्च आदर्श पुरुष व आप्तोत्तम मानतो, त्याचे चरित्र मधील काळात पुटंच पुटं चढत जितकं विस्फारलं नि विस्तारलं गेलं, तितकंच ते काहीअंशी विकृतीसही पोहोचलं. अगदी काहीअंशी का होईना!

एकीकडे आपल्याला जे पटत नाही ते सरसकट प्रक्षेप म्हणून धिक्कारणारे आधुनिक पाश्चात्यमतानुयायी मैकॉलेपुत्र आहेत तर दुसरीकडे वेदाभिमान बाळगून वैदिक साहित्याचे सत्शास्त्रांचे सांगोपांग अध्ययन करून आपली सैद्धांतिक बैठक पक्की करून प्रामाणिक हेतुने चरित्रचिकीत्सा करणारे आहेत, तर तिसरीकडे आह्मीं सर्वकाही म्हणजे वाट्टेल ते प्रमाणंच मानतो असा अट्टाहास असणारेही आहेत, वास्तविक पाहता उपरोक्त ३० संस्क‌ृत टीकाकारांनीही जागोजागी प्रक्षेपानुसंधान केलंच आहे, त्यामुळे ही काहीतरी नवीनंच प्रेरणा आहे अशातलाही भाग नाही, पण तरीही या परमश्रद्धेय चरित्रचंद्रांच्या चिंतनाचा मोह सुटत नाही.

आज उपलब्ध असलेलं वाल्मीकि रामायण प्रत्यक्ष महर्षींचे कितपत आहे हे मान्य करण्यांस आमचं भक्तह्रदय तरी तयार होत नाही. श्रीरामनामाचा प्रत्यही सहस्रावधी जप करूनही अंतरात्मा कुठेतरी सांगतो व अट्टाहासाने त्या परमात्म्याला विनंती करायला लावतो की

पुनः त्या महर्षींनी जन्म घ्यावा व खरं श्रीरामचरित्र पुनः जगासमोर मांडावं !

ते परमपुण्य श्रीरामनाम आह्मींही नित्य जपतोच, तो भगवान श्रीराम आमचाही उपास्यंच आहे, होता नि राहील म्हणूनंच ही भावना !

अर्थात तो श्रीरामंच आता त्याचे विशुद्ध चरित्र सांगेल इतकीच त्या ब्रह्मचैतन्याच्या चरणी प्रार्थना ! ते या जन्मातंच घडेल इतकीच त्याला प्रार्थना ! 

आह्मांस आमचा उपास्यदेव प्रदान करण्यासाठी त्या महर्षींच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत!

जाता जाता सांगतो की श्रीरामायण आधी घडलंय व महर्षींनी ते समकालीन असल्याने पश्चात् शब्दबद्ध केलंय बरंका ! काहीजण ते महर्षींनी आधीच रचलं व श्रीरामचंद्र त्यानुसार वागले असा मिथ्या प्रलाप करतात की जो अत्यंत अप्रमाण आहे. अर्थात तो अर्थवाद आहे इतकंच.

अलम्। 


भवदीय,


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#श्रीमद्वाल्मीकिय_रामायण_महर्षि_वाल्मीकि_भगवानश्रीरामचंद्र_आर्षमहाकाव्य_इतिहास_भारतवर्ष_कोजागरीपौर्णिमा_शरदपौर्णिमा

Tuesday 15 August 2023

अखंड हिंदुराष्ट्र लेखमाला - लेखांक प्रथम

 


ते - अखंड हिंदुराष्ट्र ही संकल्पना अव्यवहार्य आहे, आत्मघातुकी आहे, व्यवहारशून्यतेचा कळस आहे.


आह्मीं - काय नपुंसका पद्मिनीचें सोहळें। वांझेसी डोहाळें कैचें होतीं। श्रीनाथ


तुमच्यासारख्या गांधीवादी क्लीबांना, ती कल्पना, तो विजिगीषु राष्ट्रवाद हा अव्यवहार्य नि आत्मघातुकाच वाटणार रे! गांधींनी अखंड हिंदुस्थान नाकारून उपकार केलेत ह्मणें! अरे शेतजमिनीचा बांधावरचा एक कोपरा घेतला तर सख्ख्या भावालाही न्यायालयात खेचता आणि इथे तुमची एकतृतीयांश मातृभु त्या पैशाचपंथी इस्लामांधांनी हिसकावून घेतली, ती तुम्हाला परत घ्यावीशी वाटत नाही? किती तो नेभळट गांधीवाद?


ते - अहो हे सगळं भावनिक आहे, आह्मांलाही नकोय का अखंड हिंदुराष्ट्र पण इथले तीस कोटीच आधी झेपेनात, ते आणखी कुठे उरावर घ्यायचे? काय हाल होतील आपले कळतंय का तुम्हाला ? किती दिवस वेडगळ आशेवर जगणार? Be Practical!


आह्मीं - ह्या सर्वाची जाणीव आह्मांस नाहीये का ? आह्मीं बोळ्याने दुध पितो का???


ते - मग आधी इथल्या समस्येचे काय ते तरी सांगा. त्या तीस कोटींचे काय करणार आहात? तुम्ही त्यांना अकारण शत्रु का समजता ? तेही या राष्ट्राचा एक घटक आहेत, त्यांचाही डीएनए एकंच आहे, उपासना पद्धती भिन्न असली तरी त्यांचेही मूळ इथलंच आहे की, मग अकारण शत्रुत्वाची भावना का? 


आह्मीं - कोण त्यांना स्वतःहून शत्रु मानतंय पण? की ते आह्मांस मानतात? सत्य काय ते तुम्हालाही माहितीय की...


ते करतात का कधी विचार १००कोटी हिंदुंचं काय करणार? त्यांना असते का ही भीती??? पण षंढासारखं सारखं सारखं 'त्या तीस कोटींचं करायचं काय' हा विचार तुम्ही आह्मींच करतो ना? अरे त्यांना राष्ट्रीय प्रवाहात यायला कुणी रोखलंय का? दिवसातून पाच वेळा ढुंगण वर करून काफीर हिंदुंच्या 'गझवा ए हिंद'चे विनाशाचं स्वप्न पाहणारे ते कुठे आणि त्यांच्या भीतीने हात पाय गाळलेले तुमच्यासारखे हिंदुत्ववादी म्हणविणारेही कुठे?


ते - अहो पण त्यांच्यातले तरी सगळेच कुठे तसे आहेत ?  


आह्मीं - आह्मीं कुठे सर्वांना तसं म्हणतोय पण मग हे जे 'तसे' नाहीयेत ते का त्यांच्यातल्या 'तसे' असलेल्यांचा धिक्कार करत नाहीत? दाखवा बरं एक तरी उदाहरण ! उलट ते याबाबीतही अल तकिया करतात आणि जो तुमच्यासारख्या बालबुद्धीच्या समान डीएनए वाल्यांना तर समजतंच नाही नि समजून घ्यायची तुमची मानसिकताही नाही


ते - ठीकंय मग ह्यावर उपाय काय काही ठोस कार्यक्रम, काही योजना, काही नियोजन???


आह्मीं - ते सांगण्यासाठी तर हा लेखनप्रपंच आहे कारण आह्मीं कुणी भोळेभाबडे, भावनाविवश झालेले अभिनिवेशी हिंदु नाही आहोत, उलटपक्षी अत्यंत व्यवहारदक्ष नि वास्तवाचे भान असलेले युवक आहोत. आह्मीं संविधानाला प्रमाण मानणारे आहोत....


भारतवर्षासमोर अनेक समस्या आहेत ज्यावर नुकतीच दोन व्याख्याने दिली आहेत, ती सविस्तर मांडणार आहोतंच, त्यापैकी प्रामुख्याने तीन समस्या आहेत, ज्या अगदी वैश्विकही आहेत


१ इस्लाम 

२ ख्रिश्चनिटी 

३ साम्यवाद/समाजवाद/मार्क्सवाद अर्थात समस्त डावे


यातल्या पहिल्या दोन समस्या तर अत्यंत गंभीर आहेत व उघडउघड राष्ट्रघातकी, संविधानद्रोही, हिंदुद्रोही आहेत, तिसरी समस्याही तितकीच समान गंभीर असली तरी पहिल्या दोन्हींचा विचार सांप्रतसमयी अत्यंत निकडीचा आहे. कालच्या अखंड हिंदुस्थान संकल्प दिनानिमित्त नि आजच्या ७७व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ही लेखमाला आरंभ करतो आहे


Stay tuned 


सर्वेभ्यो नमो नमः। स्वतन्त्रता दिवसस्य सर्वेषां कृते हार्दिकं अभिनन्दनम्। 


भवदीय,


पाखण्ड खण्डिणी 

Pakhandkhandinee.blogspot.com


#अखंडहिंदुस्थान_हिंदुराष्ट्र_स्वातंत्र्यदिन_भारतमाता_संविधान_संकल्प

Sunday 6 August 2023

महाराष्ट्र पतंजलींची आज जयंती - महामहोपाध्याय श्रीवासुदेव शास्त्री अभ्यंकर




गेली कैक वर्षे जो लेख लिहायचा म्हणत होतो, ती वेळ आज आली, मागे फार अल्पसं लिहिलं होते. महाराष्ट्रात वैदिक व्याकरण हा शब्द ऐकला की जे पहिलं नाव डोळ्यासमोर येते, त्या वैय्याकरणी सत्पुरुषाची आज जयंती ! 


काय योगायोग आहे आज ! तिथी आहे अधिक श्रावण वद्य षष्ठी. नेमकं याच तिथीला आंग्लदिनी ४ ऑगस्ट, १८६३ या वर्षी म्हणजे आज पावेतो १६० वर्षांपूर्वी महामहोपाध्याय श्रीमद् वासुदेव शास्त्री अभ्यंकरांचा जन्म महादेवभट्ट व दुर्गाकाकु या दांपत्याच्या पोटी साताऱ्यात झाला. पुरुषोत्तम मासी हा पुरुषोत्तम जन्मांस आला. ज्येष्ठ चिरंजीव दामोदरपंत, द्वितीय रघुनाथशास्त्री नि तृतीय वासुदेवशास्त्री! बालपणापासून मेधाशक्ती अतितीव्र असल्याने वयाच्या पांचव्या वर्षी 'श्री' हे धुळाक्षर गिरविण्यापूर्वीच या मेधावी बालकाचा पाणिनीय धातुपाठ व समासविग्रह अक्षरशः मुखोद्गत होता. पुढे सातव्या वर्षापर्यंत संपूर्ण अमरकोष व भगवान श्रीपाणिनींची अष्टाध्यायी या मेधावी बालकाने कंठस्थ केली. काय बुद्धी असेल !


आणि हे सर्व कसं तर घरातंच पाठशाळा असल्याने आजोबांकडे जे विद्यार्थी शिकायला यायचे, त्यांचे नित्यपठण श्रवण करूनंच !


वडील अचानक निवर्तल्याने आजोबांनी सांभाळलं. आजोबांचे नाव भास्करशास्त्री. परिस्थिती अत्यंत बिकट असली तरी तिन्ही भावंडांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. शास्त्रीजींचे शिक्षण पूर्ण झालं ते महर्षि रामशास्त्री गोडबोलेंकडे साताऱ्यातंच. त्यांना महर्षि ही पदवी प्रत्यक्ष न्यायमूर्ती रानडे यांनी दिली होती.


*आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत कोणताही व्यत्यय न येता आपल्या हातून विद्येची उपासना घडावी, या प्रतिज्ञेने जीवनबद्ध झालेल्या शास्त्रीबोवांनी आपल्या गुरुकडे न्याय व व्याकरणशास्त्राचे सखोल अध्ययन केलं. एकुण वीस वर्षांच्या प्रदीर्घ अध्ययनकालात त्यांनी मुख्यतः व्याकरणावरचे कौमुदी-मनोरमा-परिभाषेंदुशेखर आदि अनार्ष ग्रंथ, वेदांताच्या दृष्टीने अद्वैतसिद्धी व ब्रह्मसूत्रशांकरभाष्य, न्यायदृष्टीने तर्कसंग्रहादि ग्रंथ व स्वशाखेचे म्हणजे तैत्तिरीय संहिता व त्याचा ब्राह्मणग्रंथ हे सर्व मुखोद्गत केले.*


वास्तविक पाहता व्याकरणशास्त्राची मूळ परंपरा ही सुत्रक्रमानुसारी होती पण अनार्ष ग्रंथांमुळे ती प्रक्रियानुसारी होऊन प्रचंड कठीण व वेळखाऊ झाली. ही परंपरा मूळ आर्षग्रंथांची म्हणजे पाणिनीय शिक्षा, धातुपाठ, अष्टाध्यायी, काशिका नि महाभाष्य अशी तीन किंवा फारतर पाच वर्षातंच पूर्ण होणारी असली तरी आह्मीं वर ज्या अनार्ष शब्दाने उल्लेख केला, त्या ग्रंथांनी ती बिघडून टाकली म्हणूनंच की काय प्रत्यक्ष शास्त्रीबोवांनाच 'द्वादश वर्षं व्याकरणं श्रुयते' या रुढीप्रिय वचनामुळे एकुण बारा वर्षांचा कालावधी लागला. हा अनार्ष आणि आर्ष प्रकार नेमका काय आहे ह्यावर कधीतरी सविस्तर लिहू.


*आमच्या पंढरीत एक मास वास्तव्य*


शास्त्रीबोवांच्या आजोबांचे एक शिष्य म्हणजे आमच्या भुवैकुंठीचे श्रीविठ्ठलशास्त्री धारुरकर ह्यांची एक संस्कृत पाठशाळा पंढरीत त्यावेळी होती, तींत एक मास शास्त्रीजी अध्यापनासाठी राहिले. परंतु इथे आपला निर्वाह होईल असे न दिसताच ते साताऱ्यांस परत गेले. ह्या धारूरकर कुटुंबाविषयी अनेकांना माहिती असेलच. या विठ्ठलशास्त्रींचा प्रायश्चित्त व्यवहार प्रकाश नावाचा एक उत्तम ग्रंथ उपलब्ध आहे, पीडीएफ आहे.


*पुढे पुण्यातंच कायमचं वास्तव्य*


'अधिष्ठान तथा कर्ता' या गीतोक्तीप्रमाणे शास्त्रीबोवांनी आपल्या आयुष्याचा पुढचा जवळजवळ पन्नास वर्षांचा काळ हा पुण्यात घालविला, तेच त्यांचे कार्यक्षेत्र झालं.  त्यांच्या गुरुने दिलेले पत्र घेऊन ते न्यायमूर्ति रानड्यांकडे येताच त्यांची व्यवस्था तिथे लागली ती कायमचीच. फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये १८९२ साली अध्यापनाचे कार्य आरंभ करून पुढे ३६ वर्षे त्यांनी ते सुुरु ठेवले. त्याचबरोबर आपल्या पाठशाळेत ५२ वर्षे संस्कृत अध्यापनाचे कार्य केले. पुण्यामध्ये अभ्यंकर पाठशाळा कुमठेकर रस्त्यावर प्रसिद्ध आहे, तिथे त्यांची ग्रंथसंपदा प्राप्त होते.


*ब्रह्मसूत्रशांकरभाष्याचा मराठी अनुवाद*


शास्त्रीबोवांच्या हातून जी काही ग्रंथसंपदा निर्माण झाली, तींत भगवत्पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांच्या ब्रह्मसूत्रभाष्याचा मराठी अनुवाद हे होय. खरंतर त्यांच्यापूर्वी आचार्यभक्त श्रीविष्णु वामन बापटशास्त्रींनी हे कार्य करून ठेवलंच होते. बापटशास्त्रींविषयी काय लिहावं? सविस्तर कधीतरी येईन. त्यानंतर वाईच्या श्रीलेलेशास्त्रींनीही ब्रह्मसूत्रशांकरभाष्याचा अनुवाद केलाच होता, हे दोन्ही अनुवाद पीडीएफ आहेतच. पण या सर्वांमध्ये शास्त्रीबोवांच्या हातून झालेला हा अनुवाद अत्यंत रसाळ व सर्वसामान्यांस समजेल इतका सोप्पा आहे. यद्यपि हा विषय कठीण असला तरी. कारण भगवान शास्त्री धारूरकरांनी म्हटल्याप्रमाणे दुर्बोध विषय सुबोध करून सांगणे, हीच त्यांची कुशलता होती.


*एकुण चार खंडात हे काम केवळ सव्वा दोन वर्षात पूर्ण केले*


बडोद्याच्या गायकवाड सरकारने श्री. चांदोरकर आणि शास्त्रीबोवा या दोघांना हे काम सोपवलं होतं. आरंभी चांदोरकरांबरोबर एक वर्षात निम्मं काम पूर्ण करून त्यांच्या अकाली देहावसानाने शास्त्रीबोवांनी पुढील एक वर्षात शेष सर्व भाष्य अनुवादित तर केलंच पण त्याचबरोबर बडौद्याच्या गायकवाड सरकारच्या सांगण्यावरून अन्य तीन आचार्यांचे म्हणजे श्रीरामानुजाचार्य, श्रीवल्लभाचार्य व श्रीमध्वाचार्य अशा तीनही आचार्यांच्या भाष्यासोबतचे तुलनात्मक कोष्टक तयार करून चोथा खंडही मुद्रणांस दिला. सुदैवाने हे चारही खंड आंतरजालांवर पीडीएफ स्कैन आहेत. गायकवाड सरकारने हा ग्रंथ इसवी सन १९११साली प्रकाशित केला. भगवान पूज्यपाद श्रीशंकराचार्यांचे केवलाद्वैत अथवा मायाद्वैत, श्रीरामानुजाचार्यांचे विशिष्टाद्वैत, श्रीवल्लभाचार्यांचे शुद्धाद्वैत व श्रीमध्वाचार्यांचे शुद्धद्वैत ही चार मते भारतवर्षामध्ये प्रकाशित आहेत, ज्या सर्वांवर तुलनात्मक भाष्य शास्त्रीबुवांनी चौथ्या खंडामध्ये केलं आहे. शास्त्रीबुवांचा आणखी मोठेपणा म्हणजे या कार्यासाठी मिळालेले पाच सहस्त्र रुपये त्यापैकी निम्मे म्हणजे अडीच सहस्त्र त्यांनी तात्काळ चांदोरकरांच्या पत्नीला देऊन टाकले. याला म्हणतात नि:स्पृहता!



सर्वदर्शनसंग्रहाच्या स्वोपज्ञ 'दर्शनाङ्कुर' नामक टीकेने त्यांचा गौरव संपूर्ण भारतामध्ये महापंडित म्हणून झाला. एकुण १६ दर्शनांचा विचार इथे केला गेला आहे. त्यांच्या अन्य विपुल ग्रंथसंपदेमध्ये श्रीमधुसूदन सरस्वतींच्या सिद्धांतबिंदुवरची त्यांची टीका, तत्कालीन धर्मसंघर्षावर 'धर्मतत्वनिर्णय' नावाचा त्यांचा ग्रंथ, मीमांसान्यायप्रकाश, श्रीगीतेवरील पहिल्या दोन अध्यायांवर 'अद्वैताङ्कुर' नावाची टीका ही त्यांच्या विपुल ग्रंथसंपदेपैकी काही उल्लेखनीय आहेत. आश्चर्य म्हणजे गीतेवर भाष्य करताना त्यांनी भावार्थदीपिकेचा म्हणजे श्रीज्ञानेश्वरीचाच आधार घेतला आहे, हे त्यांनी हेतुपुरस्सर नमुद केलं आहे. ज्ञानेश्वर दर्शन नावाच्या नगर इथून प्रकाशित झालेल्या दोन खंडांमध्ये आरंभी त्यांचा प्रस्तावनारुपी लेख आहेच. नुकताच त्याचे पुनर्प्रकाशन झाले आहे.


*व्याकरणमहाभाष्याचा मराठी अनुवाद - अलौकिक आणि दिव्य कार्य*


आम्हांस व्यक्तिशः वासुदेवशास्त्री हे नाव कऴलं, ते त्यांच्या याच दिव्य कार्यामुळे. होय दिव्यंच! कारण भगवान महर्षि श्रीपतंजलींच्या व्याकरणमहाभाष्याचे मराठीत अनुवाद हे अचाट कार्य आहे. संस्कृत व्याकरणशास्त्राची मूळ पुस्तके ही दोनंच


*अष्टाध्यायी-महाभाष्ये द्वे व्याकरणपुस्तके| अतोऽन्यत् पुस्तकं यत्तुं तत्सर्वं धूर्तचेष्टितम्|*


व्याकरणशास्त्राच्या‌ परंपरेमध्ये आह्मीं वर उल्लेखिल्याप्रमाणे ज्या प्रक्रिया ग्रंथांनी म्हणजे अनार्ष ग्रंथांनी धुमाकूळ घालून आधीचं सुलभ असलेलं आर्ष व्याकरण हे अत्यंत‌ बोजड‌, किचकट व वेळखाऊ करून ठेवलं, ते पुन्हा पूर्वस्वरुपांस प्राप्त करून देण्याचे श्रेय महर्षि श्रीदयानंदांचे गुरु वैय्याकरणसूर्य श्रीविरजानंद दंडी सरस्वती यांस जातं. आता आह्मीं प्रक्रिया ग्रंथांना नावे ठेवतो कारण आह्मीं आर्यसमाजी आहोत, म्हणून आमच्यावर शंका घेणाऱ्यांना आह्मीं सांगु इच्छितो की आर्यसमाजाचा किंवा श्रीदयानंद-विरजानंदांचा जन्मही नव्हता, त्याच्या कैक शतके आधीच पंडितराज जगन्नाथ व अन्यांनी ह्या अनार्ष व्याकरण ग्रंथांचा धिक्कार करणारी ग्रंथसंपदा रचलीय, जी सुदैवाने प्रकाशितही आहे. अप्पय्य दीक्षितांना तर त्यांनी गुरुद्रोही म्हटलंय, यावर कधीतरी सविस्तर येऊ.  त्यामुळे वैदिक व्याकरण मूळचं सुलभ करणाऱ्या दोन ग्रंथांपैकी भगवान महर्षि श्रीपतंजलींचा हा महाभाष्य नावाचा ग्रंथ जो भगवान श्रीपाणिनींच्या अष्टाध्यायीवरील भाष्य ग्रंथ आहे, त्याचा मराठीत सप्तखंडात्मक अनुवाद करणं हे कार्य शास्त्रीबोवांच्या जीवनदर्शनावर कळस चढविणारा अध्याय आहे. हे काम करून शास्त्रीजींनी आमच्यासारख्या वेदादिवाङ्मयाच्या व संस्कृतभाषेच्या विद्यार्थ्यांवर जे काही उपकार करून ठेवले आहेत, ते ऋण कधीही फिटणारे नाही. खरंतर या एकाच कार्यासाठी शास्त्रीबोवांचे आह्मीं सदैेव ऋणी आहोत.



हा अनुवाद शास्त्रीबोवांनी फर्ग्युसनमधील निवृत्तीपश्चात् म्हणजे वयाच्या ६५व्या वर्षी करायला घेतला होता व तो त्यांनी सहा खंडात पूर्ण केला, सातवा खंड हा प्रस्तावना खंड आहे, जो त्यांच्या चिरंजीवांनी म्हणजे महामहोपाध्याय श्रीकाशीनाथ शास्त्री अभ्यंकरांनी लिहिला आहे.


अशाप्रकारे एकुणंच व्याकरण, वेदांत, योग, न्याय, मीमांसा, धर्मशास्त्र या विषयांवर जवळजवळ ६००० हून अधिक पृष्ठांचं लिखाण शास्त्रीबोवांनी केलंय. हे कार्य फर्ग्युसनचे अध्यापन व संस्कृत पाठशाळेतलं अध्यापन ही दोन्ही कार्य सांभाळत करणं हे शास्त्रीबोवाच करु शकत. या दीर्घोद्योगी सत्पुरुषाच्या या यशस्वी जीवन कार्यकलापाचे रहस्य कशात आहे, असे विचारल्यावर एकंच उत्तर येईल


*'शुद्ध नैतिक आचरण, ऐहिक सुखाविषयी अगदी मर्यादित अपेक्षा व नित्य कार्यमग्नता ही त्रिसुत्री होय.'*


ज्या गुरू साखरे परंपरेचे आह्मीं शिष्य आहोत, त्या परंपरेतले आमचे आजेआजेगुरु श्रीविनायकबोवा साखरे महाराज हेदेखील शास्त्रीबोवांचेच शिष्य! साखरेवंशविख्यातं ज्ञानदानपरायणं। 


हे कार्य प्रत्यक्ष परमेश्वरानेच त्यांच्याकडून करून घेतले आहे, हे त्यांचे व्याकरण महाभाभाष्याच्या प्रस्तावनेतले उद्गार अक्षरशः सत्य आहेत. अश्विन शुक्ल चतुर्थी, शके १८६४, दिनांक १४ ऑक्टोबर, १९४२ला शास्त्रीजींचे देहावसान झालं. शास्त्रीबोवांचे विस्तृत चरित्र आंतरजालांवर पीडीएफ आहेच. 


https://www.rasik.com/books/MarathiiBooksFromOUDLbyTitle.html


महाराष्ट्राच्या या पतंजलींस जयंतीनिमित्त शिरसाष्टांग दंडवत व कोटी प्रणाम!


#महाराष्ट्रपतंजली_वासुदेवशास्त्री_अभ्यंकर_व्याकरणमहाभाष्य_पुणे_संस्कृतभाषा_ब्रह्मसूत्रशांकरभाष्य

Tuesday 25 April 2023

पवित्रयति....






वर्षभर ज्या एकाच तिथीची आतुरतेने वाट पहायची अशी आजची तिथी...


*वैशाख शुद्ध पंचमी अर्थात बौद्धादिबुद्धितमसां खलु चण्डभानु: अशा श्रीमच्छंकरभगवत्पादाचार्यांचा जन्मोत्सव...!*


अद्यापपावेतो युधिष्ठिर शक २६३१ अर्थात इसवी सन पूर्व ५०९ ही जन्मतिथी मानत होतो पण मित्रसूतीतले एक विद्वान Vedveer Arya(वेदवीर आर्य) जे स्वत: एक विद्वान इतिहाससंशोधक आहेत, त्यांच्या संशोधनानुसार ती इसवी सन पूर्व ६ एप्रिल ५७६ निघाली. कारण सूर्य मेष राशीत, शुक्र मीन राशीत, शनी तुळ राशीत, मंगळ सिंह राशीत, बुध मेष राशीत. आणि याला जोडून सूर्य-शुक्राची युती वृषभेत ! हे सर्व तपशील ना इसवी सन पूर्व ५०९ ला जुळतात, ना इसवी सन पूर्व ४४ ना मेकॉलेपुत्रांनी मांडलेल्या व मानलेल्या इसवी सन ७८८ ला...


*पण कालनिर्णय काहीही असला तरी इतकं निश्चित की आचार्यांचा काळही इसवी सन पूर्व ५वं शतकंच आहे, यात कधीच तडजोड नाही. मेकॉलेपुत्रांनी दूर रहावे. या सर्व गोंधळाचे कारण कांची, शृंगेरी, कुंभकोणम् मठांचे अंतर्गत वादविवाद तर आहेतंच. पण बोलायचं कोण?*


या आर्षज्ञानप्रचंड भानुचे जीवनातलं स्थान अचल नि अढळ आहे, होतं नि राहील. महर्षि दयानंदांइतकंच. दोघे मला धर्मजिज्ञासेत पूज्य होते नि राहतील.


यद्यपि माझ्यावर महर्षि दयानंद प्रणीत त्रैतवादाचा प्रभाव असल्याने अद्वैतवाद पूर्ण मान्य करण्यांस अद्यापही माझं मन तयार होत नाही तरीही ह्या दोन वादांमध्ये फारसा काही तात्विक भेद आहे असेही नाहीये. दोघांतली साम्यस्थळं कधीतरी विस्ताराने मांडेन. अनुयायांनी अकारण गोंधळ घातलेला असला तरी मला त्यात‌ रस नाही....


आचार्यांची गुणवैशिष्ट्ये...


ही व्यक्ती सद्गुणांची अशी खाण होती. तिची गुणशालिनता मोजु पाहिली तरी लेखमालेचा विषय होईल. अलोकसामान्य व्यक्तित्व, दिव्योदात्त चरित्र, नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा, अपार नि उत्कट भक्ती, ब्रह्मज्ञानाने तप:पूत देह नि जोडीला तर्कशुद्ध प्रत्युत्पन्न मतीचा धनी असलेला हा योद्धा संन्यासी! बालपणीच पितृछत्र हरपलं तरी संन्यास घेऊनही जन्मदात्री मातेवर निरतिशय प्रेम नि श्रद्धा ठेवणारा हा अद्वितीय मातृभक्त, संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तित्वाला आपलंसं करणारी गुणग्राहकता, आपल्या शिष्यांवर केलेलं अलौकिक प्रेम, भक्तांप्रती असीम दया नि शत्रुंप्रतीही अहैतुकी क्षमा!


आईला दिलेल्या शब्दासाठी संन्यासधर्मही प्रसंगी गुंडाळून ठेवणारा हा थोर मातृभक्त...! आणि त्यावेळी मातृपंचकम् सारखी नेत्रांच्या कडा ओलावणारी रचना करणारा हा कोमल ह्रदयाचा कवी..! माझी आई काहीकाळ आयसीयुत होती त्यावेळी मी ह्या रचनेची पारायणे केली होती. ती बाहेर आली त्यावेळी ह्याची एक पोस्टही केली होती.


*भारतीय दार्शनिकांचा, तत्वचिंतकांचा मुकटमणी...*


अद्वैतवेदांताशी कुणाची सहमती असेल नसेल, हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे, पण त्याकाळी उपलब्ध असलेल्या ६४ मतमतांतरांचा गलबला पाहून कुठेही विचलित न होता, हतोत्साहित न होता, मी एकटा काय करणार‌ असा आपल्यासारखा नकारात्मक विचार कदापिही मनात न आणता हा माणुस आपल्या खड्गाच्या धारेसारखा सुतीक्ष्ण बुद्धीने परमतखंडन नि शुद्ध वैदिक मत पुनर्संस्थापन हेतुने तितक्याच प्रगल्भतेने मीमांसा करत तत्कालीन अवघा आर्य्यावर्त पादाक्रांत करत त्याला सुत्रै मणिगणा: इव या गीतोक्तीप्रमाणे चार पीठाधीश्वरांच्या संन्यासपरंपरेत गुंफत राष्ट्रीय एकात्मता‌ साधत भामतीकार वाचस्पति मिश्रांनी म्हटल्याप्रमाणे


*आचार्यकृतिनिवेशनमप्यवधूतं वचोऽस्मदादीनाम्‌ ।*

*रथ्योदकमिव गङ्गाप्रवाहपातः पवित्रयति: ॥*

भामतीकार वाचस्पति मिश्र...


*म्हणजे ज्याप्रमाणे गंगेचे निर्म्मल जल हे गल्लीतल्या पाण्यालाही निर्म्मल करतं, तद्वतंच आचार्यांची वाणी व लेखणी आमच्यासारख्यांच्या वाणींस व लेखणींस पवित्र करते...*


राष्ट्रीय, सामाजिक, राजकीय, वैश्विक, तात्विक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, वांशिक, दार्शनिक एकात्मता साधणाऱ्या ह्या प्रज्ञासूर्याच्या चरणी २५३२/२५९९ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!


भवदीय...


#श्रीभगवत्पाद_शंकराचार्यजयंती_शांकरमठपरंपरा_वैदिकधर्म_राष्ट्रनिर्णाण_भामती

Saturday 22 April 2023

श्रीपरशुराम होणं तरी कुठं सोप्पंय ???

 


आरंभी घोर तपश्चर्या करत पिनाकपाणीपासून ४६ अस्त्रे प्राप्त करत, पुढे पितृआज्ञेसाठी मातृहत्येचं पातक(टीका) माथी घेताना त्याला काहीच‌ वाटलं नसेल का हो? उद्या इतिहास माझी अवज्ञा मातृहत्यारा म्हणून करेल हा विचार क्षणभरही त्याच्या मनी आलाच नसेल‌ काय? भले पित्याकडून मातेला त्याचे स्मरण न राहण्याचे वरदान घेतलं तरी इतिहासाचं जाऊदे पण जन्मदातीवरंच शस्त्र उचलण्याचे साहस कोण करेल हो? कल्पना तरी? पण पितृआज्ञेसाठी ते पातक त्याने माथी धरलंच ना?


प्रत्येक गोष्टीला अवतारवाद, दैवी लीला वगैरे वेडेपणा करायची मला तरी सवय नाही. कारण मी एक अल्बबुद्धीधारक आहे. श्रीजमदग्नींच्या क्रोधाचं‌ समर्थन होऊ शकतं? ब्राह्मणाला एवढा क्रोध शोभतो? अन्यथा स्कंदपुराणकारांनीच 


पुत्रेणापि पिता शास्या: शिष्येणापि गुरु: स्वयं क्षत्रियै: ब्राह्मणा: शास्या: श्रुतिराह सनातनी|

उन्मार्गगामिनं श्रेष्ठं अपि वेदान्तपारगं नीचै: अपि प्रशास्यिता श्रुतिराह सनातनी|


असे का म्हटलं असते? उपनिषदांनीही 'यान्यस्माकं सुचरितानि' का म्हटलं असतं? 


इतिहासाकडे वस्तुनिष्ठ डोळ्यांनी पहायचं की भगवंतांची लीला म्हणत आंधळ्यासारखं स्वत:ची गोड समजुत घालायची? तो ईश्वरी अवतार असेलही पण आपण मनुष्यंच आहोत की...


अर्थात ह्या प्रसंगानंतर त्यांचा‌ क्रोध कायमचाच शांत झाला असा इतिहास‌ सांगतो...


सहस्त्रार्जुनाने कामधेनु पळवल्यावर त्याच्या पत्नीने मनोरमेने त्याला ती परत करा, हे अपहरण योग्य नाही हे सांगूनही व पुढे चारही भावंडांबरोबर स्वत: श्रीभार्गवरामांनी त्यांस‌ वारंवार कामधेनु परत कर असे विनवूनही त्याने ती न केल्याने उलट युद्धाचे आवाहन दिल्याने अंती निरुपायाने त्याबरोबर युद्ध करत त्याला त्याच्या अधर्माचरणासाठी ठार करत पुन: त्याच्या पुत्रांनी पितृवधाचा सुड घेण्यासाठी आपल्या‌ वडिलांचा सारा आश्रम उध्वस्त करत पित्यावर २१ वार करत‌ त्यांची हत्या केल्यानें आईवरही वार झाल्याने अंती त्याच मातृआज्ञेसाठीच २१ युद्धं करत उन्मत्त क्षात्रसंहाराचे पाप (टीकाही) माथी घेत, शरण आलेल्या क्षत्रियांना अभय देत, जे सदाचरणी आहेत त्यांनाही कुठेच हात न लावता, संपूर्म पृथ्वी कुठेही नि:क्षत्रिय न करता, त्या युद्धांचेही पृथ्वीवर कधीही रात्री न विश्राम करण्याचं यथोचित प्रायश्चित्त घेत, पुनश्च भृगु ऋषींच्या‌ सहाय्याने अकृतव्रणाबरोबर शिल्पवेदाची निर्मिती करत, धनुर्वेदाची संहिताही प्रोक्त करत, सप्तकोंकणाची अर्थात अपरान्हाची निर्मिती करत ती भूमी सुजलाम सुफलाम करणारा हा सृजनकर्ता महर्षि श्रीजमदग्निनंदन...!


ज्याची आई म्हणजे श्रीरेणुकामाताच ही प्रत्यक्ष ईक्ष्वाकुवंशातली होती, त्याच ईक्ष्वाकुवंशातल्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्रासमोर पुढे आपलं तेज विसर्जित करत, त्याचा जयजयकार करत, पुढे द्वापरांती श्रीयोगेश्वरांस सुदर्शन प्रदान करत आणि आपल्याच शिष्यासमोर म्हणजे श्रीभीष्माचार्यांसमोर पराभव पत्करत शिष्याचाही गौरव वाढविणारा असा हा क्षत्रियप्रिय पुरुषश्रेष्ठ श्रीरेणुकानंदन..!


इतकंच काय पण कोळी समाजाला ब्राह्मण करत जातीअंताचा‌ पहिला लढा देणाराही हाच...!


म्हणूनंच म्हणतोय सोप्पं नाही परशुराम होणं...


२१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय हे मूळातंच अतिरेकी विधान आहे. मागेही ह्यावर विस्ताराने लिहिलंय पुनरुक्ती करत नाही. पण केवळ तेवढंच उचलत ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर वाद पेटवायचा आपला नेहमीचा मार्क्सप्रणीत क्लास स्ट्रगलचा अर्थात वर्ग-संघर्षाचा अजेंडा राबवत रहायचा फोडा आणि राज्य कराच्या भेदनीतीचा प्रयत्न कुणी डावे किंवा भारत विखंडन शक्ती किंवा काही राजकारणी खुशाल करोत...


जर हा ब्राह्मण-क्षत्रिय वाद असता तर मध्ययुगीन कालखंडातल्या अनेक राजांनी आपली तुलना श्रीभार्गवरामाशी का केली असती, तसे संदर्भही उपलब्ध आहेत. जो सहस बाह पर राम द्विजराज हैं हे पुण्यश्लोक छत्रपति श्रीशिवरायांनी तरी का मान्य केलं असतं? ते तरी चिपळुणला का गेले असते???


आमच्या दृष्टीने श्रीभार्गवराम होणं सोप्पं तर नाहीच...


कारण केवळ तपाने चिरंजीवी होणं तर दूरंच पण काहीवेळा अप्रिय गोष्टी करूनही तो कटुपणा माथी घेत जगणं हे सोप्पं नाही...!


अंती एकंच...


उपासना, उपासना, उपासना, उपासना|


कशाची? 


तर ब्राह्मतेजाची म्हणजे वेदाध्ययनाची, क्षात्रतेजाची म्हणजे बलसंपन्नतेची, समाजधारणेची म्हणजेच धर्मरक्षणाची, राष्ट्रीयत्वाची म्हणजेच हिंदुत्वाची...!


आजच्या व्याख्यानाचा संक्षेपात सारांश...!


भवदीय...


#अक्षय्यतृतीया_श्रीभगवानपरशुरामजयंती_अपरान्ह_कोंकणनिर्मिती_धनुर्वेद_शिल्पविद्या_सृजनकर्ता

Tuesday 11 April 2023

हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासाचा श्रीराम...


 

कन्दर्प अगणित अमित छवि नवनीलनीरद सुन्दरम्...|


तो कसा आहे, कसा दिसतो, कसा हसतो, कसा चालतो हे कुणाला माहितीय? ज्यांना त्याचं दर्शन झालं, त्या श्रीतुलसीदास, श्रीरामदास, श्रीज्ञानोबा-श्रीतुकोबारायांनाच, श्रीनामदेवरायांस, श्रीचोखोबारायांस, श्रीब्रह्मचैतन्यालाच तो कळला, ओळखता आला, पाहता आला, अनुभवता आला, चित्तात साठवता आला...


राम समजून घ्यायचाच असेल तर श्रीतुलसीदास नि श्रीरामदास वाचलेच पाहिजेच...आणि आत्ताच्या काळात तुलसीपीठाधीश्वर श्रीरामभद्राचार्यजी...! 


अनुभव चित्ता चित्त जाणें...!


तो कन्दर्प कोटी कमनीय आहे. अरे पण कन्दर्पाला कुणी पाहिलंय का? ज्याची उपमा द्यायची ते उपमानंच मूळात जिथे माहिती नाही, पाहिलं नाही, अनुभवलं नाही, तिथे त्यावरून उपमेयाची कल्पना कशी येईल? पण मग म्हणून तो नाहीयेच का? 


तो आहे इतकंच निश्चित! ज्याने श्रद्धेने त्याचं नाम घेतलं, त्याला सतत आळवलं, त्याला तो भले लगेचंच दिसणार नाही, पण त्याची जाणीव तरी खचितंच होईल. आपल्या अंतरात्म्यात एकदा शांतपणे डोकावून पाहिलं तर त्याच्या नामात तो प्रचित होईलंच. कारण नाम आणि नामी अभिन्न आहेत. नाम हे सार, ह्रदयी जपा निरंतर| म्हणूनंच तो अनिर्वचनीय आहे. कारण तो त्याच्या नामातंच आहे...


कुठल्याही संतांचं चरित्र पाहिलं तर झाडून सर्व संत एकंच सांगतात 


नाम घ्या...


श्रीमाऊलीं म्हणतें


तें नाम सोपें रें रामकृष्णगोविंद|

वाचेंसीं सद्गद जपें आधीं|

नामापरतें तत्व नाहीं रे अन्यथा|

वाया आणिका पंथा जाशीं झणें|


नामंच सर्वश्रेष्ठ आहे म्हणजे अन्य मार्ग तुच्छ आहेत असं थोडीचंय? मग असं असूनही संत नामंच का सांगत असतील? संतांना महर्षि पतंजलींचा मूळ वेदप्रणीत योगमार्ग माहिती नव्हता? माऊली तर स्वत: नाथपंथी. मग संतांनी नामंच घ्यायला का सांगावं???


अर्थात पुढे जाऊन योगसाधनेनेच अंतिम ईश्वरप्राप्ती होते हे संतसाहित्य बारकाईनं पाहिलं तर खरं कळेलही. पण तो फार पुढचा विषय. त्याच्या आधीचा पाया नाम आहे. कारण त्याने चित्तशुद्धी होते म्हणून. 


जन्माला आल्यावर पुढे कळायला लागलं की आई म्हणते हाच तुझा बाप. तिथे पितृनिर्णयात मातृवाक्य जसे शब्दप्रामाण्य म्हणून अटल प्रबल प्रमाण असतं तद्वतंच धर्मजिज्ञासेंत संतवाक्य, ऋषिवाक्य प्रबल असतंच असतं. तिथे जास्ती शहाणपणा चालत नाही. चालवला तर माती होते.


पण नाम किती घ्यावं?


जन्मभरीच्या श्वासाइतुकें मोजियेलें हरिनाम|


दिवसभराचे २१,६०० श्वास, वर्षभराचे गुणिले ३६५ किती होतील, संपूर्ण आयुष्याचे किती? प्रत्येकाने गणित करावं आणि आपआपला मेळ घालावा. म्हणूनंच जपमाळेची संख्याही १०८च का? दिवस किंवा रात्रभरात २०० माळा झाल्या की २१,६०० आपोआप होतात. म्हणून १०८. अन्यही प्रमाण आहेत पण इतकं सोप्पंय समजायला. आता संतांनी सगळं इतकं सोप्पं गणित मांडून ठेवूनही आपल्याला संदेह असेल तर आपल्यासारखं करंटे कोण असावं? 


बाकी श्रीरामनामाचा किंवा आपल्या कोणत्याही ईष्टदेवतेचा जप ३ कोटी काय अन् १३ कोटी काय ! कोण मोजत बसतंय? एवढा वेळ कोणालाय? मोजणारा तो आहे, तो मोजेल की. ह्रदयस्थ श्रीराम किंवा अंतरात्मा आहे. संख्येत कशाला अडकायचं?


माझा इतका जप झाला, तितका जप झाला, इतका राहिला, तितका राहिला? कशाला हा फुकटचा दंभ? 


त्याच्या नावात जे सुख आहे ते अनुभवणं महत्वाचं नाही का? 


प्रियकर प्रेयसीला किंवा प्रेयसी प्रियकराला किंवा नवरा-बायको एकमेकांना सांगतात का की मी तुला इतक्या वेळा आय लव्ह‌ यु म्हणलो किंवा म्हणाले?


नाम जपतें रहें, काम करतें रहें|


श्रीसमर्थ म्हणतात


अखंड नाम स्मरावें, परीं दुसरीयासी कळों नेदावें|

निदिध्यास लागलिया राघवें, पाविजें तात्काळ|

काही साक्षात्कार झाला, तो सांगु नयें दुसरियाला|

जरीं आळकेपणें सांगितला, तरीं पुन्हा होणार नाही|

पुन्हा साक्षात्कार कैंचा, जाला तरी वरपंगाचा|

हां मी आपुलें जीवाचा, अनुभव सांगतो|


ह्यातली पहिलीच ओळ महत्वाची आहे. अन्य फारशी नाही. कारण काही झालं की सांगायची फार हौस असते.‌ लगेचंच मी कसा साक्षात्कारी, मला किती अनुभव, ह्याचा दृष्टांत त्याचा दृष्टांत वगैरे वगैरे ...


लेखणींस विराम श्रीमाऊलींच्याच शब्दात करतो. म्हणूनंच ती म्हणते,


ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरीं|

धरोनि श्रीहरीं जपें सदा|


एक तत्व नाम दृढ धरी मना...


तो दिसावा कळावा हाच तर अट्टाहास आहे. कारण तो कसा आहे हे तोच आता सांगेल. 


आमचे आबा श्री. नितिन भानुशाली म्हणतात, तसंच


#भगवंत_ह्रदयस्थ_आहे..


हे सगळं आज‌ लिहायचं कारण कुणीतरी तो कृत्रिम बुद्धिमत्तेने प्रकाशित केलेला (एआयचा-Artificial Intelligence) फोटो श्रीरामाचा म्हणून फिरवलाय सर्वत्र. आह्मांस तो मान्य नाहीच इतकंच कारण तो कुठेही श्रीरामचंद्रांच्या वर्णनाशी जुळत नाही. पण ठीकंय, ज्याची त्याची श्रद्धा...!


भवदीय...


#श्रीराम_नामस्मरण_रामोपासना_साक्षात्कार_अध्यात्म_संतवचन


Wednesday 22 March 2023

कुत॒ आजा॑ता॒ कुत॑ इ॒यं विसृ॑ष्टिः । ऋग्वेद - १०|१२९|६

 










को अ॒द्धा वे॑द॒ क इ॒ह प्र वो॑च॒त्कुत॒ आजा॑ता॒ कुत॑ इ॒यं विसृ॑ष्टिः । अ॒र्वाग्दे॒वा अ॒स्य वि॒सर्ज॑ने॒नाथा॒ को वे॑द॒ यत॑ आब॒भूव॑ ॥

भावार्थ - ही विविध सृष्टी कोणत्या निमित्तकारणाने आणि कोणत्या उपादानकारणाने उत्पन्न झाली, या गोष्टींस कुणी विरळा असा विद्वानंच यथार्थरुपामध्ये जाणु शकतो, कारण सर्वच विद्वान् हे सृष्टी उत्पन्न झाल्यापश्चातचे आहेत. अर्थात् कोणी तत्त्ववेत्ता योगीच हिला समजु शकतो आणि हिचं प्रवचन करु शकतो...!

ऋग्वेदातल्या नासदीय सूक्ताचा हा सहावा मंत्र. आज चैत्रशुद्ध प्रतिपदा अर्थात गुढी पाडवा अर्थात सृष्टीच्या नवसंवत्सरारंभाचा दिवस ! सर्वप्रथम सर्वांना नवसंवत्सराच्या अर्थात गुढीपाडव्याच्या निमित्त हार्दिक अभीष्टचिंतन ! हे अखिल सृष्टीचं नवसंवत्सर आहे, केवळ मराठी किंवा हिंदु नवसंवत्सर किंवा नववर्षारंभ नव्हे...! अर्थात‌ हिंदुधर्म हा अनादि अनंत‌ सत्य सनातन अशा स्वरुपाचा असल्याने तसं म्हटलं तरी चालेल. या नासदीय सूक्ताचा अत्यंत विचित्र नि विकृत अर्थ काही लोक काढतात. काहींनी तर यात‌ नास्तिकता आहे असे मत मांडलंय. कीव येते खरी. वास्तविक वेदमंत्रांची शैली माहिती नसणाऱ्यांना या‌ सूक्तामधली प्रश्नार्थक शैली पाहून असा नास्तिकतेचा भ्रम होणं स्वाभाविक आहे पण नीट पाहिलं तर इथे नास्तिकतेचा गंधही नाहीये. असो कधीतरी या‌ सूक्तावर भाष्य करुच.

ही चराचर सृष्टी कुणी निर्माण केली, कशी केली, का केली, कधी केली, केंव्हा केली, कुठून केली हे सर्व प्रश्न आपल्याला कधी ना कधी तरी आयुष्यांत पडले असतीलंच की. भले त्यांचे समाधान शोधण्याची संधी आपणांस प्राप्त झालीही नसेल पण प्रश्न तरी निश्चित पडले असणारंच की...! मग त्याचे उत्तर देणार कोण? कुठे मिळायची?? कुठे शोधायची???

त्यामुळे याचा विचार करताना हे उत्तर सापडते की ही सृष्टी निर्माण झाली, तेंव्हा आपल्या प्राचीन ऋषिमुनींना जे सत्वगुणविशिष्ट योगज शक्तिसंपन्न परावरज्ञ होते, ज्यांना वेद हे साक्षात् होते, जे आपल्या उपासनेने सिद्ध झालेल्या दिव्य मानसिक शक्तीने या चराचर जगतातल्या परमाणु पासून ते परम महत्तत्वापर्यंतच्या समस्त पदार्थांना हस्तामलकवत् प्रत्यक्ष करु शकत होते, त्यांना ह्या चराचर ब्रह्मांडाचे रहस्य सहजबोध्य होते. याचे प्रमाण आपल्याला निम्नलिखित प्राप्त होते..

पुरा खलु अपरिमितशक्तिप्रभाववीर्यायुरारोग्यसुखैश्वर्यधर्म- सत्त्वशुद्धतेजसः पुरुषा बभूवुः। तेषां क्रमादपचीयमानसक्त्वानामुपचीयमानरजस्तमस्कानां लोभः प्रादुरभवत्‌.....!

(भट्ट उत्पल कृत वराहमिहीराची बृहत्संहिता टीका, पृष्ठ १२ वर उद्धत, सोबत पृष्ठ जोडलंय)




त्यावेळी वेद सोडून अन्य कोणतेही शास्त्र, पंथ, धर्म, उपासना, मार्ग अस्तित्वातंच नव्हता. परंतु पुढे पुढे जेंव्हा उत्तरकाळामध्ये मानव क्रमशः सत्त्वहीन, रजोगुण आणि तमोगुणाने युक्त होऊन अल्पमतीधारक झाले, उपदेशाद्वारासुद्धा वेदमंत्रांमध्ये विद्यमान विविध विद्यांना जाणण्यांस असमर्थ झाले, त्यावेळी या सर्व अल्पमेधावाल्या मनुष्यांसाठी विविध विद्यांचे ज्ञान देण्यासाठी विविध शास्त्रांचे प्रवचन महर्षींनी केलं.

हाच शास्त्रावताररूप इतिहास भगवान् महर्षि श्रीयास्कमुनींनी निरुक्तामध्ये 'साक्षात्कृतधर्माण ऋषयो...' या वचनात सांगितला आहे, तिथे पहावा.

भगवान् श्रीयाज्ञवल्क्यही म्हणतात

'दुर्बोधं तु भवेद्यस्मादध्येतुं नैव शक्यते।
तस्मादुद्धृत्य सर्व हि शास्त्रं तु ऋषिभिः कृतम्।।
बृहद्योगियाज्ञवल्क्यस्मृति १२।२॥

ज्यांच्यासाठी हे ज्ञान दुर्बोध झालं आणि जे वेदांचे अध्ययन करु शकले नाहीत, त्या सर्वांसाठी वेदामधले ज्ञान घेऊन ऋषि महर्षि लोकांनी सर्व शास्त्रे बनवली.

महाभारत शांतिपर्वामध्ये २८४।९२ येथे भगवान् श्रीवेदव्यास लिहितात- 'वेदात् षडङ्गान्युद्धृत्य', अर्थात् 'वेदांवरूनंच वेदाङ्गांची रचना केली गेली.

मागील वर्षी याच पाडव्याच्या तिथींस आह्मीं 'अघमर्षण सूक्त' नावाने ऋग्वेदातील सृष्टीनिर्मितीच्या सुक्तासंबंधीचं काहीसं विवेचन केलं होते. मागील वर्षीचा लेख 

https://pakhandkhandinee.blogspot.com/2022/04/blog-post.html?m=1

इथे प्राप्त होईलंच. 

सृष्टीनिर्मितीचं रहस्य हेच वेदांचं मुख्य प्रयोजन...

आह्मीं यापूर्वीही अनेकवेळा लिहिलंय की वेदांमध्ये चराचर सृष्टीच्या निर्मितीचं ज्ञान अत्यंत सूक्ष्मरुपाने बीजरुपाने विद्यमान आहे. वेदांना मनुस्मृतीमध्ये 'सर्वज्ञानमयो हि स:|' हे उगाचंच म्हटलं नाहीये. वेद हे अभ्युदय-नि:श्रेयसाबरोबरंच सृष्टीनिर्मितीचं‌ रहस्य सांगण्यासाठीही प्रकट झालेत हा सिद्धांत आमचा मनगढंत नसून प्रत्यक्ष वेदांचाच आहे. निरुक्तकार महर्षि यास्काचार्यांचे मतही तेच आहे. कारण सृष्टी निर्माण होतेवेळी किंवा त्याआधी आपल्यापैकी कुणीच मानव उपस्थित नव्हता व असणं संभवही नाही. मग ते सृष्टीनिर्मितीचं रहस्य कळणार कसं? पृथ्वीवर जेंव्हा मानव प्रथम प्रकट झाला असेल, आधुनिक डार्विनप्रणीत विकासवादी वैज्ञानिक काय मानतात हा विषय वेगळा, पण अगदी त्यांचाही विचार केला तरी या मानवांस हे सर्व विश्व का निर्माण झाले, कसे झाले वगैरे प्रश्न पडलेच असणार आहेत. त्याचे उत्तर त्याला वेदांनी प्रकट झाले. कारण वेद हे मानवसृष्ट्यारंभी म्हणजे मानवोत्पत्ती पृथ्वीवर झाली, त्यावेळी चार ऋषींच्या अंत:करणी प्रकाशित झाले. याविषयी सविस्तर अनेकवेळा लिहिलंय, पुनरुक्ती करत नाही. वेद का प्रकट झाले याचं उत्तरंच या प्रश्नामध्ये आहे. वेदांच्या मुख्य प्रयोजनामध्ये धर्मज्ञानाबरोबर सृष्टीरहस्यही मुख्य आहेच.‌ कारण वेदांशिवाय हे ज्ञान असंभव आहे.

वेदा: यज्ञार्थमभिप्रवृत्ता:|

मधील काळात वेद हे केवळ यज्ञीय कर्मकांडासाठीच आहेत, त्यांचे अन्य कोणतंही प्रयोजन नाही असा एक अत्यंत संकुचित सिद्धांत उपरोक्त वचनाचा अधिदैविक गुढार्थ न आकळल्याने, रुढ झाला. आजही काही परंपरावादी स्वमतांधग्रस्त लोक वेद हे केवळ यज्ञीय कर्मकांडासाठीच आहेत, वेदांमध्ये केवल कर्मकाडंच आहे, त्यांचे अन्य कोणतंही प्रयोजन नाही व खरं ज्ञान तर उपनिषदांमध्येच(ज्ञानकांड) आहे असंच मानतात.‌ हे मत का चुकीचं आहे यावर सविस्तर कधीतरी भाष्य करेन. वास्तविक उपरोक्त मंत्रामध्ये यज्ञ हा शब्द कोणत्या अर्थाने वापरलाय हे पहायला हवं. ही चराचर सृष्टी, हे सकल ब्रह्मांड हेच मूळात एक यज्ञ आहे. गीतेमध्ये ४|२८ इथे द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्याययज्ञ नि ज्ञानयज्ञ असे यज्ञाचे प्रकार सांगितले आहेतंच. यातल्या केवळ द्रव्य यज्ञाचा विचार करुयांत. कात्यायन श्रौतसूत्रामध्ये निर्दिष्ट २१ यज्ञप्रकार जिज्ञासूंनी पूर्वमीमांसा शाबर भाष्यात पहावेत.

देवतोद्देशेन द्रव्यस्य त्यागो यज्ञ:| 

विशिष्ट देवतेंस काही द्रव्य देण्याचं नाव यज्ञ आहे.

ही यज्ञ शब्दाची व्याख्या केवळ द्रव्य यज्ञाशी संबंधित आहे. यज्ञ शब्दाचे विविध धात्वर्थ महर्षि भगवान पाणिनींनी सांगितले आहेत, तिथे पहावेत.

मूळात यज्ञ नावाची ही संकल्पना का आली असेल??? मूळात यज्ञ संस्था का निर्माण झाली असेल??? 

ब्रह्मांड आणि अध्यात्माची रचना समजण्यासाठीच यज्ञसंस्थेचा उदय...

सर्वसामान्य मनुष्याला पिंड आणि ब्रह्मांडाचे यथार्थ ज्ञान होण्याची योग्यता प्राप्त नसल्याने त्याला ते ज्ञान व्हावं ह्या हेतुनेच या द्रव्ययज्ञांची निर्मिती किंवा मांडणी करण्यांत आली. यातून सृष्टीनिर्मितीचं रहस्य आकळावं हाही हेतु होताच, इतर अन्य हेतु होतेच पण मुख्य प्रयोजन हेच. अधिदैविक अर्थानेच ही सर्व प्रक्रिया जाणून घेण्यासारखी आहे. 

यज्ञवेदीचा संबंध हा पृथ्वीनिर्मितीशीच आहे...

यज्ञवेदीनिर्माण आणि पृथ्वी-सर्ग किंवा सृजन

आपण ज्या पृथ्वीवर राहतो, ती पृथ्वी कशी निर्माण झाली, तिचा दृष्टांत कळावा या हेतुनेच ही वेदी निर्माण केली गेला. वैदिक यज्ञांमध्ये जी‌ यज्ञवेदी निर्माण केली जाते, तिची प्रक्रिया आपण पूर्वमीमांसेतून किंवा वेदांवरची व्याख्याने असे ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे आरण्यके आणि श्रौतसूत्रादि कल्प साहित्यातून समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असे कळते की यज्ञवेदी निर्माणाचे साम्य हे पृथ्वीनिर्माणाच्या प्रक्रियेशी आहे. यज्ञामध्ये अग्न्याधानामध्ये जी प्रक्रिया आहे ती पाहिली तर पृथ्वीच्या निर्मितीचीच प्रक्रिया तिथून स्पष्ट होते. कशावरून? तर याचे प्रमाण यजुर्वेदामध्ये प्राप्त होते. यजुर्वेद २३|६२ येथे इ॒यं वेदिः॒ परो॒ऽअन्तः॑ पृथि॒व्याऽ| ही वेदी नि पृथ्वीची साम्यता दर्शवणारी श्रुती आहे. शतपथ ब्राह्मणामध्ये ६|१|१|१३ येथे 

'स श्रान्तस्तेपान: फेनमसृजत्| इथून ते तेनेमां पृथिवीं प्राच्छादयत्|' इथपर्यंत पृथ्वीच्या ९ प्रकारच्या सृष्टीचे म्हणजे स्थितींचे वर्णन करता करता हा विस्तार केला आहे जो अगदी यज्ञवेदीच्या निर्मितीप्रक्रियेशी साम्य दाखवणारा आहे. यावर सविस्तर कधीतरी येऊ. थोडक्यात इथे पृथ्वी कशी निर्माण झाली ते तिच्या प्राथमिक सलील अवस्थेपासून ते अंती तिच्यावर औषधी-वनस्पति, पशु निर्माण होईपर्यंतची प्रक्रिया लक्षात येते. पुरुषसूक्तामध्येही ही प्रक्रिया‌ सांगितली आहेच. हे सगळं कधी घडलं हे पाहताना आपण कुणी होतो का? नाहीच. 

म्हणून तर आपल्या ऋषिमुनींनी हा इतिहास शब्दबद्ध करून ठेवला. कारण वेदमंत्रांचे हे अर्थ व ही सर्व प्रक्रिया कळणं सर्वसामान्याचे काम नाही. किंबहुना या दृष्टीने वेदांकडे पहावं ही कल्पनाही आमच्यातल्या बव्हतांशाना सहन होत नाही. अगदी आधुनिक काळात ज्यांच्या पिढ्यान्पिढ्या वेदाध्ययनामध्ये गेल्यात‌ त्यांनाही. ह्याचा अर्थ आह्मीं जे मांडतोय ते काही नवीनंच किंवा क्रांतिकारी नसून

फोडिलें भांडार, धन्याचा हा माल| ह्याच‌ हेतुने आहे. प्राचीन शास्त्रकारांनी 

पशुयज्ञ हे मूळात सृष्टीयज्ञ आहेत...

वैदिक यज्ञामध्ये अनेक पशुयज्ञ आपल्याला आढळतात ज्यात पुरुषमेध(नृमेध), अश्वमेध, गोमेध, वगैरे सापडतात.‌ वास्तविक ह्यांचा अर्थ हा अधिदैविक भावनेने सृष्टीनिर्मितीशीच आहे हे इथे सांगणं क्रमप्राप्त आहे. कारण ब्राह्मणग्रंथ-कल्पादि साहित्य हेच उच्चरवाने उद्घोषून सांगतात. अधिदैविक पदार्थांसाठीच इथे पशु शब्दाचा‌ विचार केला गेला आहे.

अ॒ग्निः प॒शुरा॑सी॒त् तेना॑यजन्त॒...| वा॒युः प॒शुरा॑सी॒त् तेना॑यजन्त॒...| सूर्यः॑ प॒शुरा॑सी॒त् तेना॑यजन्त॒...|
शुक्ल यजुर्वेद - २३|१६

या मंत्रांमध्ये हाच भाव आहे.

संक्षेपांत काय तर वेदांमधलं सृष्टीनिर्मितीचं रहस्य कळण्यासाठी ऋषिमहर्षींनी पुढे षड्वेदांगे, षड्दर्शने, स्मृत्या, पुराणे वगैरेंचा विस्तार केला. कारण सर्वसामान्य मनुष्याला ते सर्व कळावं म्हणून. म्हणूनंच वेदांमध्ये सृष्टीनिर्मितीचं रहस्य असणं यात अप्रस्तुत काहीच नाही किंबहुना त्यांचे प्रयोजनंच त्यासाठीच आहे. अर्थात हे कळायसाठी वेदांकडे पहायची आर्ष दृष्टी हवी. ही आर्षदृष्टी म्हणजे ऋषिप्रणीत ग्रंथांच्या, सत्शास्त्रांच्या अध्ययनाने, संप्रदायपूर्वक वेदाध्ययन केल्याने नि योगसाधना केल्याने प्राप्त होईल. अन्यथा केवळ वेदमंत्रांचे कुणीतरी केलेले अनुवाद वाचून काहीही कळणार नाही. त्यातही गत दोनशे वर्षात जगभरात वेदांवर व्यक्त होणाऱ्या मेकॉलेपुत्रांची वाढंच वाढ‌ झाल्याने अशांची पुस्तके वाचून सत्यार्थ आकळायपेक्षा भ्रमंच भ्रम अधिक होण्याचा‌ संभव आहे. म्हणून सत्य जाणण्याची इच्छा असणाऱ्यांनी सावध रहावे...!

आपल्या नित्याच्या संकल्पामध्ये पृथ्वी कधी निर्माण झाली नि आपण कधीपासून पृथ्वीवर आहोत हे आमच्या मागील वर्षीच्या लेखामध्ये आह्मीं विस्ताराने मांडलंय त्यामुळे पुनरुक्ती न करता केवळ संकल्पाचा निर्देश करून लेखणींस‌ विराम देतो...

(सृष्ट्यादिसंवत्-संवत्सर-अयन-ऋतु-मास-तिथि -नक्षत्र-लग्न-मुहूर्त)       🔮🚨💧🚨 🔮

ओं तत्सत्-श्रीब्रह्मणो द्वितीये परार्द्धे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथमचरणे 【एकवृन्द- सप्तनवतिकोट्ये कोनत्रिंशल्लक्षैकोनपञ्चाशत्सहस्र-  पञ्चविंशशत्यधिकशततमे ( *१९७२९४९१२५* ) सृष्ट्यब्दे】【 अशीत्युत्तरद्विसहस्रतमे ( *२०८०* ) वैक्रमाब्दे】  *पिङ्गल*- संवत्सरे *उत्तरायणे- वसन्त ऋतौ* मासानां मासोत्तमे *मधु मासान्तर्गते* *चैत्र शुद्ध प्रतिपदायां, तिथौ* उत्तरा भाद्रपदा नक्षत्रे मीन- लग्नोदये *शिव*- मुहूर्ते भूर्लोके जम्बूद्वीपे भारतवर्षे भरतखण्डे आर्यावर्तान्तर्गते.......

सृष्टी संवत् - १,९७,२९,४९,१२५
त्यानंतर मानवसृष्टीसंवत् - १,९६, ०८,५३, १२४ वर्षे
कलियुग - ५१२५
विक्रमाब्द - २०८०
शालिवाहन शक - १९४५

अलमतिविस्तरेण बुद्धिवमद्वर्य्येषु|

भवदीय,

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#गुढीपाडवा_चैत्रशुद्धप्रतिपदा_संवत्सर_सृष्टीनिर्मिती_वेदभगवान_वैदिकधर्म_यज्ञसंस्था


Wednesday 8 March 2023

आंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्त...

 


स्त्रियांवर सहस्त्रो वर्षे अन्याय किंवा अत्याचार झाला, त्यांना शिकुच‌ दिलं गेलं नाही, लिहु-वाचुही दिलं नाही, चूल नि मुल यातंच अडकवून ठेवलं, स्त्रियांचे सहाव्या किंवा आठव्या वर्षी विवाह, केशवपन, विधवापुनर्विवाह निषेध, सतीची प्रथा(ही मूळात नव्हतीच), पडदा प्रथा हा सर्व अन्याय सहस्त्रो वर्षे किंवा अनादि काळापासून सुरुच होता यासारखा भ्रम एकीकडे...


तर दुसरीकडे स्त्रियांवर कधीच अजिबात अत्याचार किंवा अन्याय झालाच नाही, त्यांच्यावर कुठलीही बंधने लादलीच गेली नाहीत, मूळ आचारापासून भ्रष्ट झालोच नाहीत, उपरोक्त कुठल्याही अनिष्ट प्रथा मूळात नव्हत्याच किंवा ज्या होत्या त्या‌ अनिष्ट नव्हत्याच उलट शास्त्रसंमतंच होत्या, स्त्रियांचे‌ हित करणाऱ्याच होत्या हा नि ह्यासारखा भ्रम दुसरीकडे...


या दोन्ही अतिरेकी नि अवास्तव भ्रमांतून समस्त स्त्री-पुरुष हे दोघे ज्यादिवशी बाहेर येतील आणि सत्य ते स्वीकारून, चांगलं ते पुढे घेऊन नि वाईट ते त्यागून व्यष्टी नि समष्टीच्या हितासाठी पात्रापात्रविवेक धारण करत पुढे जातील, तोच खरा आंतरराष्ट्रीय महिला दिन किंवा पुरुष दिन ठरेल !


*स्त्रिया ह्या स्त्रियाच राहुन त्यांच्यातलं स्त्रीत्व नष्ट न करता त्यांना दिवसेंदिवस अधिकाधिक पुरुष‌ न बनवता आणि पुरुषही पुरुषंच राहून त्यांच्यातलेही पुरुषत्व नष्ट न करता त्यांना दिवसेंदिवस स्त्रैण न करता ज्यादिवशी दोघे एकत्र होऊन स्व-स्वरुपाचा बोध घेत एकमेकांच्या मर्यादा नि एकमेकांची बल-शबल स्थाने योग्य प्रकारे ज्ञात करून आत्मोद्धारासाठी जगतील, त्यादिवसापासून महिला किंवा पुरुष दिनाची मूळी आवश्यकताच भासणार नाही...*


थोडा इतिहास पाहुयांत...


आमच्या वैदिक हिंदु धर्माचा किंवा न्यूनतम या भारतवर्षाच्या, भरतभूमीच्या इतिहासाचा विचार केला तरी महाभारतकालापर्यंत तरी, ज्यांस वेदकाळ म्हणता येईल, इथे वेदकाळ म्हणजे जोपर्यंत एकंच वेदमत सर्वत्र प्रतिष्ठापित होते असा महाभारतकाळापर्यंतचा काळ, निदान या काळापर्यंत तरी स्त्रियांविषयी सर्वत्र आदराचीच भावना होती. ज्या काही कुप्रथा वर सांगितल्या‌हेत त्या‌ त्याकाळापर्यंत तरी अस्तित्वात असल्याचे काडीचंही प्रमाण उपलब्ध नाही. एखादा उल्लेख महाभारती आढळत असेल तर तो प्रक्षेप आहे नि:संदेह. कुणाला पटो न पटो...


पण त्यापश्चात् एक-दीड सहस्त्र वर्षांनी जैन नि बौद्ध मतांचा झालेला उदय‌ पाहिला तर भगवान बुद्धाच्या साहित्यात केलेली स्त्रियांची आत्यंतिक निंदा पाहिली तर हा स्त्रियांविषयी मूळचा उदार असा वैदिक दृष्टिकोन बौद्ध काळात कुठेतरी संकुचित होत गेल्याचा दिसतो. आह्मीं भगवान बुद्धाचं समग्र साहित्य जे त्रिपीटक नावाने विस्तारलेलं आहे, ते बव्हतांश अभ्यासल्यानेच हे विधान करतोय. स्वत: भगवान बुद्धांचंच त्याच्या बौद्धपंथामध्ये माजलेला अनाचार पाहून 'येत्या पाचशे वर्षात माझा बुद्ध धम्म नष्ट होईल' हे चुल्लवग्गातलं(विनयपिटक) आनंदाशी झालेलं संभाषण आहेच. हा काळ इसवी सन पूर्व १८वं शतक आहे, ब्रिटीशांनी ठरविलेला काळ आह्मीं मानत नाही. त्यानंतर सातशे वर्षांनी चंद्रगुप्त मौर्याचं अभूतपूर्व साम्राज्य(इसवी सन पूर्व ११व्या शतकाच्या समीप) ह्यात हा अनाचार दिसत नसला तरी त्यानंतर किंवा त्या काळात निर्माण झालेली अनेक अवैदिक मतं नि त्याने वैदिक धर्मांस आलेली ग्लानी ज्यावर पुढे सहाशे वर्षांनी भगवत्पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांनी(इसवी सन पूर्व ५वं शतक) वैदिक धर्माचे पुनरुत्थान करत वैदिक सिद्धांताची पुनर्प्रतिष्ठापना केलेली दिसत असली तरी त्यांच्या‌ साहित्यातही(चरित्रात नव्हे) काही स्थळी स्त्रियांविषयी वेदाधिकार नाकारणारी विधाने दिसतात. अर्थात ही प्रक्षिप्त असावीत असं आमचं आचार्यांच्या समग्र १९ चरित्रांचे व साहित्याचं अवगाहन केल्यानंतरचं मत आहे. भले अनेकांना ते मान्य होणार नाही विशेषत: स्वत:ला शांकरमतानुयायींना तरी. पण क्षणभर ते सोडलं तरी भारतीयांचा‌ स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन हा पुन्हा आचार्यांच्या काळात पूर्वीच्या वेदकाळासारखा उदात्त झालेलाच दिसतो. 


*मग नेमकं कुठं चुकलं???*


तर उत्तर आहे इस्लामी आक्रमणानंतर...होय कारण ही आक्रमणे अत्यंत पाशवी आणि न भूतो अशी होती. इथूनंच स्त्रियांवर नको ती बंधने लादण्यांत आली, अगदी केवळ ब्राह्मण समाजापुरती मर्यादित असणारी केशवपन किंवा विधवा पुनर्विवाह निषेधासारखी वचने आपल्याला धर्मशास्त्राचा अविभाज्य भाग असल्याची दिसतात. हाच वैदिक धर्माच्या पतनाचा खरा आरंभ आहे. पण याचा अर्थ असाही नाही की अगदीच स्त्रियांवर बंधने आली. म्हणजे त्यांना लिहायला वाचायला शिकु दिलंच नाही, सतीप्रथा सरसकट होतीच असा भ्रम जो आपण करून घेतो तो अत्यंत आत्मघातकी आहे. कारण भारतीय इतिहासांत कधीही असा काळ फारसा नव्हता की जिथे स्त्रियांना लिहायला वाचायला अगदीच प्रतिबंध होता. कारण आजपासून ६०० वर्षांपूर्वी म्हणजे १४व्या शतकांत काश्मीरमध्ये शेतामध्ये‌ काम करणाऱ्या माता-भगिनी संस्कृतमध्ये काव्यरचना करत होत्या असा लेखी संदर्भ आहे(विक्रमांकदेवचरितम्) आह्मीं यावर सविस्तर लेख मागे लिहिला आहेच. आह्माला स्वत:ला अद्याप संस्कृतमध्ये एक श्लोक रचता आला नाहीये. पण लौकिक शिक्षण नाकारलं नसलं तरी 


*'स्त्रीशुद्रौ नाधीयताम्'*


अशा काही विकृत स्मृतीवचनांमुळे स्त्रियांना वेदाधिकार मात्र या काळात मात्र नाकारला गेला असेल हे आह्मीं मान्य करतोच. त्यामुळे आह्मीं असे म्हणत नाही की सगळंच छान होते पण अगदीच वाईट होतं असेही दिसत नाही. पण इस्लामी आक्रमणानंतर आह्मां भारतीयांचा स्त्रियांविषयीचा मूळचा उदार दृष्टिकोन हा काही अंशी संकुचित व्हायला सुरुवात झाली हे त्रिवार सत्य. याचं दायित्व मुस्लिमांचे नसून आमचंच आहे हे मान्यंच करावं लागेल. वेदमहर्षि सातवळेकरांनी त्यांच्या 'वैदिक व्याख्यानमाले'मध्ये हा विषय काहीअंशी साधार मांडला आहे तिथे अभ्यासावा. यावर कधीतरी येऊच...


*अर्थात ज्या धर्मात स्त्रीला भद्रा, काली, दुर्गा, रमा, सरस्वती, अंबिका, चंडिका म्हणुन पूजिलं जातं, त्याच धर्मात नि त्याच राष्ट्रात स्त्रियांप्रती केवळ ब्राह्मणसमाजापुरता असलेला केशवपनाचा आग्रह, सतीचा काही ठिकाणीच आढळणारा अपवादात्मक अतिरेक किंवा निदान तो वेदसंमतंच आहे असे मानणारी वेदमंत्रांचा वाट्टेल तो अर्थ काढणारी सायणाचार्यांची काही ठिकाणी विकृत अशी वेदभाष्ये नि त्यालाच प्रमाण मानणारी धर्ममार्तंड मंडळी, आमच्या धर्मसिंधुसारख्या ग्रंथांमध्ये ६-८व्या वर्षीच कन्यांचा‌ विवाह लावण्याच्या अत्यंत शास्त्रविरुद्ध नि वेदविरुद्ध अशा आज्ञा,‌ इतक्या लहान वयात त्या विधवा झाल्यातर आयुष्यभर पुनर्विवाहाचा निषेध, म्हणजे आयुष्यभर केशवपन करीत त्यांनी तसंच रहायचं, यद्यपि हे केवळ ब्राह्मण समाजापुरतं असलं तरी जिथे हा धर्ममार्तंड म्हणविणारा समाजंच इतका भरकटला होता, तिथे धर्माची ग्लानी वेगळी काय सांगायची? हा सर्व विकृत प्रकर घडत असताना वेळोवेळी हिंदुस्थानात अनेक सत्पुरुष‌ निर्माण झाले नि त्यांनी स्त्रियांच्या उत्थानासाठी अलौकिक कार्य केलं. मग त्यामध्ये अगदी समर्थ रामदासांसारखे संत असतील किंवा आधुनिक काळात कर्व्यांसारखे, स्वामी विवेकानंदांसारखे, सावरकरांसारखे कर्ते सुधारक असतील. पण ह्या‌ सर्वात महर्षि दयानंदांचे नाव मात्र अग्रगण्याने घ्यावं‌ लागेल ज्यांनी या सर्व मध्यकालीन वेदविरुद्ध स्मृतींना धिक्कारून मूळ वेदांच्या आधारावरंच स्त्रियांना वेदसंमत वेदाधिकार, पुनर्विवाहाचा अधिकार, पूर्ण यौवनावस्था प्राप्त झाल्यावरंच विवाह वगैरे जे क्रांतिकारक असे वेदाधारित सिद्धांत मांडून वैदिक धर्माची पुनर्प्रतिष्ठापना केली, त्याने स्त्रियांकडे पाहण्याची दृष्टी पुन्हा ढवळून निघाली आणि ती अत्यंत स्वच्छ नि शुद्ध झाली. अर्थात महर्षींच्या या दृष्टिकोनाला तुच्छ‌ लेखणारे व त्यांचा विद्वेष करणारी मंडळीही त्याकाळी होती व आजही आहेतंच जी अद्यापही मध्ययुगीन मानसिकतेमध्ये जगणारी आहेत. कुणाचं नाव घेण्याची आवश्यकता नाही.*


पण हा झाला इतिहास - वर्तमानाचं काय?


काही जण म्हणतील अहो सारखं काय इतिहास उगाळता? आजच्या आमच्या तरुण पिढीला या तुमच्या इतिहासाशी काही घेणंदेणं नाहीये तुम्ही काय इतिहास उकरून काढता? तर आह्मीं सांगु इच्छितो की असा रस खरंच नसेल तर एका दृष्टीने ते चांगलंच आहे. पण दुसरीकडे ह्या इतिहासाचे भांडवल करून त्याचे विकृतीकरण करत संपूर्ण सत्य‌ न मांडता केवळ आपल्या‌ स्वार्थाला सोयीस्कर तेवढं मांडून हिंदु धर्म नि संस्कृतीचा अपलाप करण्याची जी कथित पू-रोगामी, अ-बुद्धिवादी, स'माज'वादी, साम्यवादी, नास्तिक, कथित विवेकवादी, कथित स्त्रीवादी अशी म्हणजेच संक्षेपात हिंदुद्वेष्टी अशी जी काही समाजविघातक वृत्ती मागील सात आठ दशकांत फोफावलीय, जीतून समाजमन कलुषित करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो, ती पाहता या सर्व इतिहासाचा विचार करणं आवश्यक वाटल्याने हा लेखनप्रपंच...!


*या‌ सर्व लेखनाचा हेतु काय?*


पूर्वजांच्या चुकांवर पांघरुण घालणं? असे वरील लेखात कुठेतरी दिसतंय का वाचकांनी पहावं. मग नेमका हेतु काय? 


आपल्या इतिहासाचा अयोग्य वापर करून कुणी आपला बुद्धिभेद करत असेल तर त्याला आपण योग्य प्रत्युत्तर देणं व त्यातून आपली एकात्मता कुठेही विघटित होऊ न देणं हेच आजंच नव्हे येत्या काळातही राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीने नि मानवतेच्या दृष्टीनेही श्रेयस्कर आहे. म्हणूनंच युवापिढीने यादृष्टीने विचारमंथन करणे आवश्यक असल्याने आज महिलादिनाच्या निमित्ताने हा प्रपंच...!


*स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे...*


*कारण इतिहासात आमच्यावर पिढ्यान्पिढ्या अन्याय झाला म्हणून आता आह्मीही त्याचा‌ सूड घेऊ, वाट्टेल तसे वागु, स्वैराचार करु ही भावना स्त्रीवादाच्या नावाने कुठेतरी फोफावत असेल तर समाजधारणेच्या दृष्टीने ते फार घातक आहे. ते होऊ नये म्हणून हा अट्टाहास. अर्थात हे सर्व पुरुषांनाही लागु होते. दोघांनीही मर्यांदाचे भान राखलं पाहिजे. एकमेकांचा आदर केला पाहिजे.*


लेखाचा अंत एकाच वाक्याने करतो


स्वामी विवेकानंदांनी तत्कालीन स्वत:ला स्त्रीसमाजसुधारक म्हणविणाऱ्यांना एका ठिकाणी छान कान उघाडणी केलीय. ते म्हणतात


"स्त्रियांचा उद्धार करणारे आपण कोण आहोत? त्यांच्या कल्याणाची तुम्हाला खरंच तळमळ असेल तर त्यांना शिक्षण द्या, सुशिक्षित करा, इतकंच करा. बाकीचा उद्धार त्या त्यांचा स्वत:चा स्वत:च करून घेतील. तुम्ही लुडबूड करु नका."


*स्वामीजींचे शब्द नेमके असे नसतील तरी भाव हाच आहे. आह्मीं स्त्रियांचा उद्धार करु शकतो ही भावना पुरुषांनी मनातून काढून टाकली पाहिजे. अरे जी साक्षात् भवानी आहे, सृष्टीकर्ती आहे, जगज्जननी आहे, जगत्स्रष्टी आहे, जिच्या उदरातून योगेश्वर भगवान श्रीकृष्ण नि भगवान श्रीरामचंद्र, पुण्यश्लोक शिवाजी, ज्ञानोबा-तुकोबांसारखे लोकोत्तर पुरुष जन्माला आले, मैत्रेयी, गार्गीसारख्या स्त्रिया निर्माण झाल्या, सीता-रुक्मिणी, सत्यवान-सावित्रीसारख्या पतिनिष्ठ स्त्रिया निर्माण झाल्या, ईश्वराने सृजनाचे अलौकिक कार्य जिच्या उदरी सोपावलं, तिचा उद्धार करणारा तु कोण? तु तिला केवळ योग्य शिक्षण संस्कार दे, ती केवळ तिचाच नव्हे तर जगाचाही उद्धार करेल...कारण ती साक्षात् नारायणी आहे...*


आंतरराष्ट्रीय‌ महिला दिनानिमित्त समस्त स्त्रीवर्गांस अभिवादन करत इतकंच...


भवदीय,


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#आंतरराष्ट्रीयमहिलादिन_स्त्रीवाद_वैदिकधर्म_फेमिनिझम_सतीप्रथा_पुनर्विवाह

Wednesday 15 February 2023

उपासनेचा मोठा आश्रयो| उपासनेवीण निराश्रयो|

 



उपासनेचा मोठा आश्रयो| उपासनेवीण निराश्रयो|

उदंड केले तरी तो जयो| प्राप्त नाही|

दासबोध - १६|१०|२९


श्रीदासनवमी अर्थात राष्ट्रगुरु समर्थ श्रीरामदास पुण्यस्मरण...


उपासनेने काय होऊ शकतं याचं प्रत्यंतर सर्वच संतांप्रमाणे ठोसरांच्याही कुटुंबात येतं. श्रीमहिपतींच्या संतविजयात म्हटल्याप्रमाणे समर्थांचे पिताश्री श्रीसूर्याजीपंत वयाच्या १२ व्या वर्षापासून पुढे २४ वर्षे सूर्योपासक होते. त्यांची नित्याची गायत्र्योपासना ही


बारा सहस्त्र जप नित्य, करित असे एकाग्र चित्त|

बारा वर्षे लोटता सत्य, साक्षात् आदित्य भेटला|

संतविजय - १|२७


नित्य गायत्रीचा १२,००० इतका जप ! या जोडीलाच १००० सूर्यनमस्कार. इतकी साधना ठोसरांची न्यूनतम १२ वर्षे (काही ठिकाणी २४ वर्षे) सुरु होती. 


त्या सूर्यप्रभावें, पुत्र झाला दैदिप्यमान|

म्हणोनिं नाम नारायण, ठेविलें तयाचें|

श्रीदासगणु महाराज


ठोसरांच्या वंशात पिढ्यान्पिढ्यांच्या सुर्योपासनेने जो सूर्यासारखा दैदिप्यमान तेजस्वी पुत्र नारायणाच्या रुपाने जन्मांस आला, त्या नारायणाने चिंता करितों विश्वाची म्हणत तत्कालीन पतित अशा भारतवर्षाचा उद्धार करण्याच्या हेतुने तत्कालीन देशकालवर्तमान चिंताग्रस्त होऊन व्यक्तिगत संसारसुखावर लाथ मारून द्वादश वर्षे गोदातटाकीं त्याच रविकुळटिळकाच्या प्राप्तिस्तव


आचरुनि तपश्चर्येला रघुनंदन आपुला केला ताटकीं| प्रगटला पुढें श्रीराम सुजनविश्राम विमलसुखधाम अहल्योद्धारी| हे भवभयसंकटवारी ताटकीं| - पू. श्रीदासगणु महाराजांची रचना.


तेरा कोटी श्रीरामनामाचा जप नि गायत्रीची कैक पुरश्चरणं केली..! श्रीसमर्थांच्या जीवनाचं‌ सार श्रीसमर्थांनी स्वत:च जे सांगितलंय, ते या एकाच शब्दांत


उपासना, उपासना, उपासना, उपासना|


मध्येच आहे. रामसोहळ्यामध्ये श्रीमेरुस्वामींनी म्हटल्याप्रमाणे


नित्य विध्युक्त प्रात:स्नान, काळत्रय संध्यावंदन|सहस्त्र गायत्री उच्चारोन, आराध्यमंत्र जपिजे| 

४८|३८


श्रीसमर्थांनी तपकाळात गायत्रीची कैक पुरश्चरणे केली होती, जींत नित्य १००० किंवा १२०० इतकी गायत्र्योपासना होतीच. आपल्या सर्व प्राचीन शास्त्रकारांनी नित्य संध्योपासनेमध्ये किंवा अगदी स्वतंत्र असा १२०० इतका गायत्रीचा जप सर्वश्रेष्ठ उपासना म्हणून सांगितला आहेच. यावर प्रमाणासहित स्वतंत्र विवेचन कधीतरी करेन. आता हा लगेचंच इतका कुणाला जमेल की नाही म्हणून अधिकारभेदाने अन्य मंत्रांची उपासनाही सांगितलीय. श्रीसमर्थांनी तर गायत्रीबरोबर उपास्यदैवत श्रीरामनामाची उपासनाही केलीय. दोन्ही एकत्र का केलं असावं असा प्रश्न साहजिकंय. वास्तविक गायत्री नित्य १२०० केला तर अन्य कुठल्या मंत्राची उपासना करावीच कशाला असा प्रश्न स्वाभाविकंय. पण ह्याचे उत्तर समर्थांनी स्वत: दिलंय दासबोधामध्ये. श्रीसमर्थ म्हणतात


नाना पुरश्चरणें करावी| नाना तीर्थाटणें फिरावी|

नाना सामर्थ्यें वाढवावी| वैराग्यबळें| 

दासबोध - १०|७|१३


सकाळी एकदाच गायत्री केली की काम भागलं असे नव्हे तर दिवसभर पुन्हा नामानुसंधान रहावं म्हणून उपासना सांगितलीय. चित्तशुद्धीसाठी हे सर्व आवश्यक आहे.


सर्व संतांनी नामंच घ्यायला का सांगितलंय???


कुठल्याही संतांचे चरित्र उघडून पाहिलं तरी हाच उपदेश दिसतो की नाम घ्या.


आता प्रश्न असा पडतो की नामस्मरण का करावं, जप का करावा? नामजपाने काय फल प्राप्त होतं? या‌सर्व प्रश्नांची उत्तरे षट्दर्शनांनीच प्राप्त होतात.  त्याशिवाय शंका समाधानंच होत नाही. म्हणून तर आपल्या प्राचीन ऋषिमुनींनी षट्दर्शने रचली. महर्षि भगवान पतंजली योगदर्शनामध्ये म्हणतात


तज्जपस्तदर्थभावनम्| योगदर्शन - १|१|२८


प्रणवाचा जप करणे म्हणजे प्रणवाने दाखविला जाणारा जो ईश्वर आहे त्याची भावना करणे. ज्याचा जप आपण करतो, त्याची भावना आपण करतो. कारण नाम नि नामी अभिन्न असल्याने नामाच्या निर्देशाने त्या नामीचाच बोध होते व आपल्याला त्याची भावना होते.


त्याचे आणखी फल काय? योगदर्शनकार पुढे म्हणतात


ततः प्रत्यक्चेतनाधिगमोऽप्यन्तरायाभावश्च।।१|२९


परमेश्वराच्या चिंतनाने व्याधि, संशय इत्यादि विघ्ने निर्माण होत नाहीत, स्वरुपाचे दर्शन होते, मनाला त्रास उत्पन्न करणारी एकुण ९ विघ्ने आहेत ती पुन्हा केंव्हातरी अभ्यासु. तूर्तास चित्तांस निर्माण होणारी प्रक्षुब्धता, अस्वस्थता, अस्थिरता, सर्व दोष हे सर्व नामस्मरणाने दूर होतात. म्हणून सर्व संतांनी पुन: पुन: नाम घ्यायला सांगितलंय.


खरंतर षट्दर्शने अभ्यासली तर हे सर्व कळेल.पण ती अभ्यासायला तितका वेळ आपल्याला नसतो नि तसा योग्य गुरुही शिकवायला नसतो. म्हणूनंच 'वेदमार्ग मुनी गेले, करु संती केलें तें|' या श्रीतुकोबारायांच्या वचनाप्रमाणे संतांनी सांगितले व केले, तेच आपण करावं कारण त्यांना त्याची प्रचिती असल्याने. आपली अक्कल जास्त चालवु नये. अतितर्काने माती होते. उपसानेच्या दृढाश्रयानेच समर्थ होता येतं. श्रीसमर्थाच्या जीवनाचे आणखी मर्म म्हणजे


समर्थे समर्थ करावें|


आपणांसही ते समर्थ व्हायचं असेल तर ही उपासना हीच एकमेव तारणहार आहे. आज श्रीसमर्थांच्या पुण्यस्मरणी इतकंच...


असो ऐसें सकळहि गेलें, परंतु येकचिं राहिलें| 

जे स्वरुपाकारी जाहलें, आत्मज्ञानी|

दासबोध


भवदीय...


#श्रीसमर्थ_दासनवमी_पुण्यतिथी_सज्जनगड_रामदासीसंप्रदाय_उपासना_षट्दर्शने_वैदिकहिंदुधर्म