Monday 6 July 2020

लोकमान्यांचे ओरायन आणि आर्क्टिक होम - एक समीक्षात्मक अध्ययन

आज आषाढ कृष्ण प्रतिपदा अर्थात राष्ट्रसूत्रधार परमादरणीय श्रीलोकमान्यांचे पुण्यस्मरण! त्यानिमित्त मागील वर्षी एका विशेषांकासाठी नाकारला गेलेला हा अप्रकाशित लेख ! 

*यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः।*
*स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥*

गीता - ३।२१

भारतीय असंतोषाचे जनक, राष्ट्रसूत्रधार परमादरणीय श्रीलोकमान्य टिळकांच्या प्रति कृतानेक साष्टांग दंडवत घालून, त्यांच्याविषयी अपार आदर नि कृतज्ञता व्यक्त करून, लहानतोंडी मोठा घास घेण्याचा एक प्रयत्न ह्या लेखातून आम्ही करताहोत. जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा, अपरिमित त्याग, असामान्य बुद्धिमत्ता, तितकीच प्रखर ज्ञानसाधना, विद्वत्ता नि व्यासंग आणि त्याला इंद्रियसंयमाची नि तर्कशुद्धतेची नि प्रगल्भतेची जोड ह्या गुणवैभवांनी संपन्न असलेले व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य. त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून नि व्युत्पन्न मतीतून ज्या ग्रंथसंभाराची नि साहित्याची निर्मिती झाली त्यामध्ये वेदकाळासंदर्भातले आणि प्राचीन आर्यांच्या स्थाननिश्चितीसंबंधातले त्यांचे दोन महत्वपूर्ण ग्रंथ म्हणजे "ओरायन ऑर दि रिसर्चेस इंटू दि अँटिक्विटी ऑफ दि वेदाज" आणि "आर्क्टिक होम इन दि वेदाज" अर्थात मराठीमधून "मृगशिरस् किंवा वेदांच्या प्राचीनत्वाचा शोध" आणि "वैदिक आर्यांचे उत्तरध्रुवांवरील वसतिस्थान किंवा मूलस्थान" (श्री वि रा सहस्त्रबुद्धे यांनी केलेल्या अनुवादानुसार- टिळक बंधु प्रकाशन) उपरोक दोन्ही ग्रंथ मूळ इंग्रजीतून असून आम्ही मूळ आंग्ल ग्रंथ आणि मराठी अनुवाद ह्या दोन्हींचा विनियोग प्रस्तुत लेखासाठी केला आहे.

लोकमान्यांनी ऑक्टोबर १८९३ मध्ये 'ओरायन' हा ग्रंथ सिद्ध केला आणि मार्च १९०३ मध्ये 'आर्क्टिक होम इन दि वेदाज' हा ग्रंथ सिद्ध केला. प्रथम ग्रंथामध्ये त्यांनी वेदांच्या प्राचीनत्वाचा शोध घेतला तर द्वितीय मध्ये आर्यांच्या मूळ वसतिस्थानाचा. प्रथम ग्रंथामध्ये त्यांनी वेदांचा काळ इसवी सन पूर्व ४५०० वर्षे मागे नेण्याचा प्रयत्न केला. ह्यासाठी वेदांतील अर्थात वैदिक साहित्यातील म्हणजे मूळ वेदांच्या संहिता, त्यांचे ब्राह्मण ग्रंथ आणि सूत्र ग्रंथ ह्यांच्या अंतर्गत येणाऱ्या ज्योतिषविषयक घटनांचा त्यांना वाटणारा उल्लेख पाहून वेदांगज्योतिष ह्या ग्रंथाधारे कालनिर्णय त्यांनी केला. त्यांच्याच शब्दांमध्ये सांगायचे तर त्यांनीच विषय प्रवेशांत म्हटल्याप्रमाणे 

*"आमच्या विवेचनाची सारी भिस्त संहिता आणि ब्राह्मणे यांसारख्या प्राचीन ग्रंथांवर आणि त्यातल्या त्यात सर्वांमध्ये प्राचीन ग्रंथ जो 'ऋग्वेद' त्यावर आहे."*

विषय प्रवेश - पृष्ठ ११ - टिळक बंधु प्रकाशन प्रथमावृत्ती - १ ऑगस्ट, १९९९

लोकमान्यांनी ज्योतिर्गणिताच्या आधारे अर्थात खगोलीय घटनांच्या आधारे आणि त्यांचा संबंध वैदिक साहित्यातल्या संदर्भांशी जोडून वेदकाळ ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. *मासानां मार्गशीर्षोsहम्।* ह्या गीतेतल्या वचनावरून त्यांचे लक्ष वेदांकडे ओढले गेले आणि त्यामध्ये त्यांनी वेदांग ज्योतिष ह्या ग्रंथाचा आधार घेऊन चार वर्षांच्या प्रदीर्घ अध्ययनापश्चात हा ग्रंथ सिद्ध केला असे म्हटले आहे.  त्यांनी प्राचीन आर्यांच्या कालमापन पद्धतीच्या दृष्टीने यज्ञ म्हणजेच संवत्सर, वर्षारंभ, वसंत संपात, मकर-संक्रमण, उत्तरायण, दक्षिणायन, कृत्तिका नक्षत्र आणि इतर नक्षत्रांचे स्थान, त्यांचा वैदिक साहित्यातील उल्लेख, तारकापुंज, त्यांचे स्थान, आग्रहायण म्हणजेच मृगशीर्ष नक्षत्र, त्याचे स्थान, ग्रीक साहित्याशी त्याचा संदर्भ, त्याचे ग्रीक साहित्यात ओरायन हे नाव, ऋग्वेदातले ऋभु आणि वृषाकपि हे सूक्त हे सर्व विषय ग्रंथामध्ये विस्ताराने अभ्यासले असून त्यावरून त्यांनी निम्नलिखित कालनिर्णय केला आहे.

ओरायनपूर्व काल - ख्रिस्त पूर्व ६००० ते ४०००

कृत्तिका नक्षत्र काल - ख्रिस्त पूर्व २५०० ते १४००

बुद्धपूर्व काल - ख्रिस्त पूर्व १४०० ते ५००

हा त्यांच्या उपरोक ग्रंथाचा एकूण निष्कर्ष आहे. 

*आता आर्क्टिक होम अर्थात वैदिक आर्यांचे मूल वसतिस्थान अर्थात उत्तरध्रुवांवरील वसाहती ह्या ग्रंथाविषयी पाहुयांत*

पहिल्या ग्रंथापश्चात लोकमान्यांनी आर्यांच्या मूल वसतिस्थानाचा विचार करण्यासाठी हा ग्रंथ रचला. त्यामध्ये लोकमान्यांनी उत्तरध्रुवावरच पाहिल्याने वनस्पती आणि जीवसृष्टीला सुरुवात झाली आहे असे अनेक शास्त्रज्ञांचे मत आहे असे मांडून आर्यांचे मूलस्थान उत्तरध्रुवांवरच आहे ह्या निष्कर्षाप्रत येण्यासाठी ऋग्वेद आणि पारश्यांचा झेंद अवेस्ता ह्या दोन ग्रंथांचा आधार घेतला. त्यांनी पृथ्वीवर मागे आलेले हिमयुग, नवपाषाण युग, धातुयुग, उत्तरध्रुवांवरील परिस्थिती, ऋग्वेदातले दीर्घकालीन रात्र आणि दिवसाचे कथित मंत्रसंदर्भ, देवांची रात्र, वैदिक उषा म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त वेळी दिसणारी अवकाशांतली लालिमा, मास आणि ऋतु, इंद्र-वृत्रासूर आदि वैदिक कथा, प्रातःकालिक देवता, अवेस्तामधला संदर्भ, तुलनात्मक गाथाशास्त्र आदि गोष्टींचा विचार उपरोक्त ग्रंथामध्ये करून त्यांच्या आधीच्या ग्रंथामध्ये त्यांनी मांडलेला काळ इसवी सन पूर्व ४५०० वरून मागे नेऊन त्यांनी इसवी सन पूर्व ८००० इतका ठरविला. 

अगदी सारांश ह्या ग्रंथाचा सांगायचा झाला तर वेदांमध्ये दीर्घकालीन दिवस आणि रात्रींचा आणि उषेचा संबंध लोकमान्यांनी उत्तर ध्रुवाशी लावून आर्यांचे अस्तित्व तिथले असा निष्कर्ष काढला.

उपरोक्त दोन ग्रंथांचे लोकमान्य प्रणीत संक्षेपांत विवेचन हे असे आहे.

*आता ह्या दोन ग्रंथांविषयी नि तज्जन्य सिद्धांताविषयीची आमची समीक्षा पाहुयांत*

श्रीलोकमान्यांविषयी पूर्ण आदर ठेवून आम्हांस खेदाने म्हणावेसे वाटते की उपरोक दोन्ही ग्रंथातील संशोधन हे वैदिक सैद्धांतिक दृष्टया अत्यंत निराधार आहे. लोकमान्यांनी वेदांच्या संहितामध्ये अर्थात मंत्रांमध्ये इतिहास शोधण्याचा आणि त्याचा संबंध इतिहासकालीन घटनांशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे हे तर अगदी स्पष्ट आहे. त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्येही ही गोष्ट वारंवार सांगितली आहे. टिळकांच्या मते वेदांमध्ये आणि वैदिक साहित्यामध्ये प्राचीन आर्यांनी स्वतः पाहिलेल्या, प्रत्यक्ष अनुभवलेल्या घटना ग्रथित करून ठेवल्या आहेत. जसे की उत्तरध्रुवांवरील कथित दीर्घकालीन रात्री आणि दिवस...

आमचा टिळकांशी नेमका मतभेद आहे तो इथेच. 

वेदार्थ लावायचा कसा?

*ब्राह्मणेन निष्कारणो धर्म: षडङ्गो वेदाध्येयो ज्ञेयोश्च।*

पातंजल महाभाष्य

सहा वेदांगांसहित वेदांचे अध्ययन ब्रह्म जाणण्याची इच्छा करणाऱ्याने करावे असा शास्त्र सिद्धांत आहे. 

ही सहा वेदांगे कोणती? तर छंद, कल्प, शिक्षा, निरुक्त, ज्योतिष आणि व्याकरण. 

टिळकांच्या प्रतिपादनाविषयी मान्यता का नाही त्याची कारणमीमांसा करण्यापूर्वी इतिहास म्हणजे काय ह्याची व्याख्या पाहुयांत.

*सर्वप्रथम इतिहास शब्दाचा विचार करुयांत*

इतिहास हा शब्द वैदिक संस्कृतमधील असल्याने त्याच्या व्युत्पत्तीच्या दृष्टीने विचार करणं अत्यावश्यक आहे. आम्ही वर म्हटल्याप्रमाणे वेदांच्या अध्ययनासाठी ज्या षड्वेदाङ्गांचे अध्ययन संप्रदायपूर्वक अर्थात गुरुपरंपरेतुनच करावंच लागतं, त्यामध्ये निरुक्त हे एक वेदाङ्ग आहे. ह्यामध्ये वैदिक शब्दांची निरुक्ती अर्थात निर्वचन अर्थात विवेचन किंवा फोड देताना किंवा अर्थ विस्तार करताना निघण्टु ह्या वैदिक शब्दांच्या कोशावरील भाष्यकार महर्षी श्रीयास्काचार्य म्हणतात 

*निदानभूत: इतिह एवमासीत इति य उच्यते स इतिहास: ।*
२।३।१

म्हणजे प्राचीन काली घडून गेलेल्या गोष्टींचे नाव इतिहास ह्या अर्थाने आहे.

*आता इतिहास शब्दाची व्युत्पत्ती पाहुयांत*

*इ+क्तिन् म्हणजे इ अक्षरांस क्तिन् प्रत्यय लागून इति शब्द तयार होतो. आणि पुढे ह+आस् असा इतिहास पूर्ण शब्द बनतो.*

*धर्मार्थकामोक्षाणामुपदेशसमन्वितम् पूर्ववृत्तं कथायुक्तमितिहासं प्रचक्षते ।*

(स्वामी विद्यानंद सरस्वती - भूमिका भास्कर - पृष्ठ ३०७)

अशी एक इतिहास शब्दाची आणखी एक व्याख्या करता येईल की उपरोक्त चतुर्विध पुरुषार्थ प्राप्तीचे कथायुक्त असलेले पूर्ववृत्त म्हणजे इतिहास होय.

ह्या अर्थाने इतिहास हा शब्द पाहता येईल. अस्तु।

*वेदांमध्ये इतिहास आहे का?*

उत्तर - मुळीच नाही.

हे कशांवरून? हे आमच्या मनाचे मांडे नाहीयेत. ह्यासाठी आम्ही निम्नलिखित प्रमाण सादर करतो.

*प्रत्यक्ष वेदांची अंतःसाक्षी*

ज्या ग्रंथांचे अध्ययन आपण करत आहोत, लोकमान्यांच्या भाषेमध्ये ज्यांवर आपली सारी भिस्त आहे, त्याच वेदांमध्ये प्रत्यक्षपणे इतिहास नाही असे स्पष्ट सांगितले आहे. इतकंच काय, तर ह्याच वेदांवरील ऋषीमुनिकृत व्याख्यानरूपी असे ब्राह्मणग्रंथ, त्यांचाच भाग असलेली उपनिषदे, आरण्यके, स्वतंत्र असे सूत्र ग्रंथ ह्या सर्व साहित्यामध्ये कुठेही वेदांमध्ये ऐतिहासिक वर्णने आहेत असे म्हंटलेलं नाहीये. इतकेच काय आम्ही वर म्हंटल्याप्रमाणे पतंजलींच्या आदेशाप्रमाणे ज्या षडङ्गो म्हणजे सहा वेदांगांच्या साहाय्याने वेदार्थ प्रतिपादन करणे क्रमप्राप्त आहे, त्या सहा वेदांगमध्येही कुठेही वेदांमध्ये ऐतिहासिक वर्णने आहेत असे म्हंटलेलं नाहीये. आणखी महत्वाचे म्हणजे आपली जी षडदर्शने आहेत, त्यांमध्येही कुठेही वेदांत कुठल्याही ऐतिहासिक कथांचे, स्थळांचे, नद्यांचे, मनुष्याचे, त्यांच्या अनुभवांचे वर्णन आहे असे सांगितले नाही. कारण वेद हे नित्य आहेत. 

वेदांमध्येच वेदांना नित्य म्हटले आहे 

इतिहास हा अनित्य वस्तूंचा, व्यक्तींचा, घटनांचा, प्रदेशांचा, नद्यांचा, राजांचा, राण्यांचा, ऋषींचा, प्राण्यांचा आदिंचा असतो. पण वेदांमध्ये असा अनित्य इतिहास नाहीये.

*तस्मै॑ नू॒नम॒भिद्य॑वे वा॒चा वि॑रूप॒ नित्य॑या । वृष्णे॑ चोदस्व सुष्टु॒तिं ॥*
ऋग्वेद - ८।७५।६

ह्या मंत्रामध्ये वेदवाणींस नित्या म्हटलेले आहे. अगदी महाभारतामध्येही 

*अनाधिनिधना नित्या वागुत्सृष्टा स्वयंम्भुवा।*
*आदौ वेदमयी दिव्या यत: सर्वा: प्रवृत्तय:।*

शांतिपर्व - २३३.२४

अर्थ - सृष्टीच्या आरंभी त्या स्वयंभू परमात्म्याने आदि आणि अंत नसलेली अशी नित्य अशी वेदवाणी प्रदान केली ज्यामुळे विश्वातल्या सर्व प्रवृत्तीचा प्रकाश झाला आहे. श्वेताश्वेतर उपनिषदमध्येही

*यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै।*

असं म्हटलंय.

आम्ही वर ज्या षड्वेदांगांचा उल्लेख केला, त्यातले उत्तरमीमांसाकार बादरायणमुनी म्हणतात

*अतएव च नित्यत्वम्।*

१।३।२९ 

ह्या सूत्रातून वेदांचे अनादित्व सिद्ध करतात. वेदांना नित्य सांगतात. स्वतः लोकमान्यांनीच आंग्ल भाषेमध्ये ह्यावर भाष्य केले आहे. त्यांनी स्वतः ब्रह्मसूत्र वर भाष्य केलेलं असताना वेदांमध्ये ते इतिहास शोधतात ही गोष्ट न पटणारी आहे. त्यांच्याविषयी पूर्ण आदर ठेवून!

वेद कुणी मनुष्याने किंवा ऋषींनी रचले आहेत काय ह्याचे खंडन करताना म्हणतात

*ब्रह्माद्या ऋषिपर्य्यन्ता स्मारका न तु कारका:।*

ब्रह्मापासून ते सर्व ऋषींपर्यंत वेदांचा कुणीच कर्ता नाहीये, केवळ स्मर्ता आहे. 

वेदांमध्ये कुणा मानवाचा, ऋषींचा इतिहास किंवा भूगोल आहे का ह्याचे खंडण करताना पूर्वमीमांसाकार महर्षि जैमिनी म्हणतात 

*वेदांश्चैके सन्निकर्षं पुरुषाख्या:।*

१।१।२७

पुन्हा हेच पूर्वमीमांसाकार वेदांमध्ये कुणा अनित्य व्यक्तींचा, ऋषींचा रचनाकार म्हणून उल्लेख आलेला आहे का ह्याचे खंडण करताना

*उक्तन्तु शब्दपूर्वत्वम्।*

१।१।२९

सांख्यदर्शनकार महर्षि कपिल वेदांची रचना कोणत्याही मुक्त किंवा बद्ध पुरुषाने किंवा स्त्रीने केलीच नाही असे स्पष्ट नि ठासून सांगताना म्हणतात

*मुक्तामुक्तयोरयोग्यत्वात।*
५।४७

हे सूत्र सांगतात.

अनेकवेळा वेदांमध्ये ऋषींची म्हणजे व्यक्ती विशेषांची, नद्यांची, स्थानांची, पर्वतांची, भौगोलिक प्रदेशांची नावे आहेत असे दिसते, त्याचे काय? 

ह्याचे उत्तर नाही असेच आहे. ते केवळ नामसाधर्म्य आहे . ह्याचे समाधान आम्ही वर अनेक प्रमाण देऊन सिद्ध केलेलेच आहे. तरीही एक महत्वाचा सूत्राने हे सांगतो

*सर्वेषां तु स नामानि कर्माणि च पृथक् पृथक्।*
*वेदशब्देभ्य: एवादौ पृथक् संस्थाश्च निर्ममे।*

हे मनुस्मृतीचे २।२१ येथील वचन आहे. ह्याचा अर्थ असा आहे की वेदांतल्या शब्दांवरून नंतरच्या काळात सर्व वस्तूंची, संस्थांची अर्थात सर्व स्थावर जंगमाची नावे ठेवली गेली. म्हणजेच वेद सर्वांच्या आधी आहेत, त्यांना कुणीच रचले नाही. त्यांच्या आधी कुणीच नव्हते.

सर्व प्राचीन षड्दर्शनकारांनी व षड्वेदांगकारांनी स्पष्ट नि ठासून सांगितलंय की सर्व वैदिक शब्द हे योगिक अर्थात धातुज आहेत. ह्याचे प्रमाण प्रत्यक्ष *निरुक्ताचे टीकाकार दुर्गाचार्य १।१, २।१।३, ५।१।३* येथे देतातच. तिथे पहावे ही विनंती.

वेदांमध्ये लौकिक शब्द नाहीत त्यामुळे वेदार्थात लौकिक अर्थ प्रतिपादन होऊच शकत नाही. जे लोक ऐतिहासिक अर्थ वेदांचा घेतात, त्यांना ही गोष्ट मान्य होत नाही ही शोकांतिकाय. 

निरुक्तकारांनी 

*एकार्थमनेकशब्दमित्येतदुक्तम्; अथ यान्यनेकार्थान्येकशब्दानि तान्यतोsनुक्रमिष्याम: ।*

अर्थ - *अनेक शब्दांचा एक अर्थ व एकाच शब्दाचे अनेक अर्थ होतात असे स्पष्ट सांगितलंय.*

 अगदी पातंजल महाभाष्यकारही 

*बह्वर्था: धातवो भवन्ति - १।३।१*

असे म्हणतातच.

हे लक्ष्यात न घेता व वर मांडलेले सिद्धांत लक्षात न घेता केलेलं भाष्य जर कुणाचे असेल तर ते कसं प्रमाण मानायचे ? 

वेदांमध्ये ऐतिहासिक युध्द वर्णने आहेत काय? 

उत्तर - मुळीच नाही. 

*तत्रोपमार्थेन युद्धवर्णो भवन्ति ।*

असे निरुक्तकार स्पष्ट सांगतात. म्हणजे वेदांतली युद्ध वर्णने ही अलंकारिक उपमार्थाने आहेत, रुपक आहेत. ती ऐतिहासिक नाहीत.

आता कुणी शंका उपस्थित करेल की जर वेदांमध्ये इतिहासच नाही तर मग त्या मंत्रांची ऐतिहासिक वर्णनसदृश रचना का आढळते?

ही शंका अगदी योग्य आहे. त्याचे समाधान निम्नलिखित...

ह्याच वेदांमध्ये वर्तमानकालीन आणि भविष्यकालीन शब्दप्रयोगही येतात. त्यांवरून वेदांची रचना आता वर्तमानकाळात होतेय किंवा भविष्यांत होणार आहे असे कुणी म्हणणार आहे का? हे जसे हास्यास्पद आहे तसे इतिहास शोधणेही वैदिक सिद्धांतांस सोडून आहे.

तैत्तिरीयोपनिषदामध्ये वेदार्थाच्या पाच प्रक्रियांचा निर्देश आपणांस प्राप्त होतो. 

*अथात: संहिताया उपनिषदं व्याख्यास्याम: ।पञ्चस्वधिकरणेषु ― अधिलोकम्, अधिज्योतिषम्, अधिविद्यम्, अधिप्रजम्, अध्यात्मम् ।*

१।३।१

ह्यात पाच प्रक्रिया सांगितल्याच आहेत स्पष्ट. लोकमान्यांनी ह्याचा पुसटसा निर्देशही आपल्या दोन्ही ग्रंथामध्ये केलेला नाहीये. असे का ? ह्याचे उत्तर आपणास निम्नलिखित संवादात मिळेल.

*वेदकालनिर्णय ह्याविषयी लोकमान्य आणि परमपूज्य दक्षिणामुर्ती स्वामी संवाद*

इसवी सन १९०० मध्ये आदरणीय लोकमान्य जेंव्हा वाराणसीत गेले, तेंव्हा त्यांचा परमपूज्य दक्षिणामुर्ती स्वामींशी संवाद झाला. त्या संवादाचे लेखन समग्र लोकमान्य टिळक आख्यायिका व आठवणी खंड तृतीय पृष्ठ ९३ वर प्रकाशित आहे. किंवा हाच संवाद समग्र लोकमान्य टिळक वाङ्मय खंड ६ मध्ये पृष्ठ क्रमांक ११३ ते ११७ वर प्रकाशित आहे. ह्यात लोकमान्यांनी वेदांविषयी करून घेतलेल्या स्वमान्य सिद्धांताचे आणि शंका कुशंकांचे सप्रमाण समाधान स्वामींनी केल्याचे आपणांस प्राप्त होते. जिज्ञासूंनी तेथूनच ते वाचावे ही विनंती. आम्हांस विस्तारभयास्तव ते इथे देणे संभव नाही. अगदी संक्षेपांत हा संवाद देतो

*लोकमान्य - आपण म्हणतां त्याप्रमाणे वेदांचे अनादि अपौरुषेयत्व बुद्धीस पटत नाही.*

*स्वामी - संप्रदायपूर्वक शास्त्राध्ययन नाहीं, हेंच त्यांचें कारण.*

मुळात आर्य कुठूनही बाहेरून आलेलेच नाहीयेत.

आर्य्य: ईश्वरपुत्र:।

अशी निरुक्तकारांनी आर्य शब्दाची व्याख्या दिली आहे.

ज्या देशाला नष्ट करण्याचे आहे त्या देशाचा इतिहास नष्ट करायचा असतो ह्या हेतूने ब्रिटिशांनी आपल्यात कलह निर्माण करण्यासाठी आर्याक्रमण सिद्धांत मांडला. ज्या मॅक्सम्युलरने हा सिद्धांत मांडला त्यानेच पुढे जाऊन हा सिद्धांत खोडला. हा मूळचा ख्रिस्ती मिशनरी होता आणि वेदांच्या विकृत अनुवादाचे काम त्याला देण्यात आले होते. त्याने ह्या सर्व गोष्टींची मान्यता त्याच्या पत्रव्यवहारात दिलेली आहे. ज्यांना जिज्ञासा असेल, त्यांनी त्याचे पत्रव्यवहाराचे दोन खंड वाचावेत. पुढे तो बदलला हेही सत्य आहेच. अर्थात त्याचे श्रेय महर्षी दयानंद ह्यांना जाते.अस्तु. त्याने मध्य पूर्व आशियातून आर्य आक्रमक म्हणून आले असा सिद्धांत मांडला होता. लोकमान्यांनी त्यांच्या उपरोक्त 'आर्क्टिक होम' ह्या ग्रंथामध्ये त्याच्या नावाचा ९६ वेळा उल्लेख केला आहे. स्वतः लोकमान्यांना डोंगरीच्या कारावासातून सोडण्यांस त्यानेच सहकार्य केले होते हे टिळकांनीच एका अभिव्यक्तीमध्ये(मुलाखत) मान्य केले आहे जी समग्र लोकमान्य टिळक खंड तृतीय मध्ये पृष्ठ १०६ पासून प्रकाशित आहे. त्यात टिळकांनी आपण आपले मत भविष्यात मागे घेऊ शकतो असे स्पष्ट म्हटले आहे. टिळक म्हणतात

*मी बहुतेक ऋग्वेदाचाच अभ्यास केला, त्यास टीकांची मदत झाली. त्यावरून मी असा तर्क बांधला आहे की, आर्य लोकांचे पूर्वज ज्या ठिकाणी 'दोन महिन्याची रात्र' होती अशा ठिकाणी म्हणजेच उत्तर ध्रुवांजवळच्या मुलखात होते. परंतु हळूहळू ते दक्षिणेकडे येऊं लागले. माझ्या म्हणण्यांस भूशास्त्रवेत्त्यांच्या शोधांचे पाठबळ आहे. तथापि तुरुंगात मला फारशी पुस्तकें मिळाली नाहीत, तीं अद्यापि पहावयाची आहेत. पहिल्यानंतर कदाचित माझे मत फिरण्याचाही संभव आहे.*

आता इथे टिळकांनी ज्या भूशास्त्रवेत्त्यांचा संदर्भ दिला आहे त्या भूशास्त्रानुसारही टिळकांचे मत त्याकाळीच खोडले गेले होते. कसे ते पाहुयांत.

*भारतीय साम्राज्य नावाचे २२ खंड लिहिणारे विद्वान ज्येष्ठ इतिहासकार श्री. नारायणराव भवानराव पावगी ह्यांच्याकडून*

पुण्यातलेच एक विद्वान इतिहासकार श्री पावगींनी लोकमान्यांना भेटून त्यांचे सिद्धांत खोडले होते. त्यांनी "Aryavartic Home" ह्या ग्रंथामध्ये टिळकांच्या आर्य उत्तरध्रुव निवासाचे खंडण केले होते. ते करायच्या आधी त्यांच्या "भारतीय साम्राज्य" नामक ११ खंडांची हस्तलिखिते त्यांनी टिळकांनाच दाखविली होती. इतकंच काय ह्याच पावगींनी  त्यांच्या "Vaidik Fathers of Geology" ह्या ग्रंथामध्ये भूस्तरशास्त्राच्या सहाय्यानेच आर्यांची मूलभूमी भारत हेच सिद्ध केले होते आणि ते टिळकांना दाखविलेही होते. अर्थात टिळकांनी ते मान्य केलेच नाही ही गोष्ट वेगळी. ज्यांना हे सर्व संदर्भ पहायचे आहेत त्यांनी 'लोकमान्य टिळक आख्यायिका व आठवणी खंड द्वितीय' पहावा ही विनंती. पावगींनी ही आठवण त्यात सविस्तर दिली आहे. 

*आणखी एका बंगाली लेखकाचा महत्वाचा संदर्भ*

उमेशचंद्र विद्यारत्न ह्या बंगाली लेखकाने *"मानवेर आदि जन्मभूमि"* हा बंगाली ग्रंथ लिहिला असून त्या ग्रंथाच्या शेवटी स्वतः लोकमान्यांनी दिलेला अभिप्राय आहे, ज्यात ते टिळकांना घरी भेटायला आल्याचे आणि त्यांचा संवाद झाल्याचा संदर्भ आहे. १८ जानेवारी १९१६ चे हे पत्र आहे टिळकांचे. उपरोक्त ग्रंथाची pdf उपलब्ध आहे. लेखाच्या शेवटी धागा दिला आहे. 

*लोकमान्यांनी आपला सिद्धांत मागे घेतला???*

एक वैदिक विद्वान श्रीगणपतीशास्त्री हेब्बार ह्यांनी *"भारतीय लिपीचे मौलिक एकरूप"* हा एक अत्यंत मौलिक ग्रंथ लिहिला आहे. हा ग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाने प्रकाशित केला आहे. ह्या ग्रंथामध्ये लोकमान्यांच्या समकालीन अशा गीताप्रेस गोरखपूरचे संस्थापक श्री हनुमानप्रसाद पोद्दार ह्यांची आठवण दिली आहे. त्यांचे आत्मचरित्र *"जीवनयात्रा"* नावाने. टिळकांच्या आर्योत्तरध्रुव सिद्धांताच्या मांडणीपश्चात पोद्दार टिळकांना भेटले होते आणि त्यांनी त्यांच्याशी त्याविषयी संवाद केला होता. त्यावर टिळकांनी त्यांना आपला सिद्धांत मागे घेतल्याचे सांगितले होते आणि त्याचे हस्तलिखितही दाखविले होते. पण ते प्रकाशित करायच्या आत टिळक गेले. पुढे पोद्दारांनी त्यांच्या वंशजांशी संपर्क केला पण त्यांना पुढे काहीच माहिती मिळाली नाही असे त्यांनी लिहिले आहे. प्रथमावृत्ती पृष्ठ ४८८ - संपादक श्री गोपीनाथ कविराज

*ह्या सर्व लेखनाचा आमचा हेतु काय?*

दोनशे वर्षांपूर्वी ज्या आर्य सिद्धांताविषयी जगांत कुठेही चर्चा नव्हती, तो सिद्धांत अत्यंत विकृतपणे ब्रिटिशांकडून आम्हा भारतीयांचा बुद्धभेद करण्यासाठी मांडला जातो आणि आजही इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांतून तो सिद्धांत आम्हाला आहे तसाच शिकविला जातो. अनेक भारतीय विद्वानांनी आणि पाश्चात्य विद्वान त्यांनीही हा सिद्धांत गेल्या काही दशकांमध्ये सप्रमाण खोडून काढलेला आहे. तरीदेखील तो पुन्हा पुन्हा रेटला जातो ही आमची शोकांतिकाच नव्हे तर काय?

टिळकांविषयी आमच्या अंतःकरणामध्ये पूज्यभाव आहे हे वेगळं सांगायची आवश्यकताच नाही. स्वतः टिळकांनी आमचे उपरोक्त विवेचन अभ्यासले असते  तरीही त्यांनी काही विचार केला असताच. यद्यपि उपरोक्त विवेचन अत्यंत न्यून असले तरी मार्गदर्शक अवश्य आहे. विस्ताराने लिहायचे झाल्यांस स्वतंत्र ग्रंथनिर्मिती करावी लागेल ह्याची आम्हांस निश्चिती आहे. काहीजण शंका विचारतील की आम्ही जी वैदिक आणि तत्सम साहित्यातली प्रमाणे मांडली आहेत ती टिळकांस ज्ञात नव्हतीच की काय? असे आम्हांस मुळीच म्हणायचं नाहीये. कारण स्वतः टिळकांनीच षड्दर्शनापैकी एक असे वेदांतदर्शन अर्थात ब्रह्मसूत्र ह्यावर आंग्ल भाषेत भाष्य केलेच आहे. त्यातलीच प्रमाणे आम्ही वर उद्धृत केली आहेत. असे असताना टिळकांना ती मान्य न व्हावीत असे कसे व्हावे? कदाचित असे असेल की पाश्चात्यांच्या धोरणांस प्रत्यक्ष विरोध न करता द्राविडी प्राणायाम करून त्यांना मत मांडायचे असेल. ह्यावर श्रीगणपती शास्त्री हेब्बरांचे मत सांगतो आणि लेखणींस विराम देतो.

*"वेदातील खगोलशास्त्रीय व प्रदेश परिचायक उल्लेख लोकमान्य टिळक उद्धृत करून आपले प्रतिपादन मांडतात. वास्तविक एखाद्या प्रदेशाचे वर्णन करणारा त्या वर्णनावरून तेथील रहिवासी आहे असा निश्चित निर्णय करता येत नाही. कारण त्या प्रदेशाचा प्रवास करून आलेला मनुष्य ही त्या प्रदेशाचे व तेथील भौगोलिक स्थितीचे वर्णन करू शकतो. दुसरे असे की ग्रहांचे चार पुन्हापुन्हा आवृत्त होणारे असल्याने कोणत्या चक्रास घेऊन कालनिर्णय करावा याविषयी आधाराला कांहीच नाही. अर्वाचीन अभ्यासक जवळचे चक्रास घेतात तें त्यांचें मनानें वा त्यांचे सोयीनुसार आहे. फा हि यान, ह्यू एन स्तंग, अल्बेरुणी, मेगॅस्थेनीस, ट्रॅव्हर्नियर इत्यादिंनी त्यांचे ग्रंथात हिंदुस्थानचे सविस्तर वर्णन केले आहे, तेवढ्यावरून ते हिंदुस्थानचे रहिवासी होतात काय? मुळीच नाही. याच दृष्टिकोनातून वैदिक उल्लेखांचा मागोवा घेतल्यास तेवढ्यावरून आर्यांचे त्या ऋषींचे मूळ वसतिस्थानाचा निर्णय घेता येत नाही हे दिसते. आर्य बाहेरून आले कां येथूनच बाहेर गेले याचा निश्चित निर्णय करण्याजोगे प्रमाण पाश्चात्त्यां जवळ नाही."*

*"वेद हे परमेश्वराचे निःश्वास आहेत...हा सर्व भाग लोकमान्य जाणत नव्हते असे नाहीं, तर त्यांचे लेखन त्यांचे पूर्वीच्या पाश्चात्य लेखकांचे जे मत 'आर्य मध्य आशियातून आले–' यांविषयी संदिग्धता निर्माण करण्याचा उद्देश्य ठेऊन असावे असे आम्हांस वाटतें. अत्यंत परकीय प्रभावाचा निरास सर्वत: विरुद्ध प्रतिपादनाने होत नाही तर परकीय मतांत संदिग्धता निर्माण करून तद्वारा इष्ट मतात हळूंहळूं पर्यवसान करून होतो. याच धोरणी विचारानें लोकमान्यांचे लेखन आहे असें आम्हांस वाटतें."*

इत्यलम्।

भवदीय,

तुकाराम चिंचणीकर
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com


Thursday 2 July 2020

पंढरीचा श्रीविठ्ठल बुद्ध किंवा बौद्ध, जैन किंवा वीरगळ आहे काय???




*लेखांक प्रथम*

*धर्माचे पालन, करणे पाषांड खंडण।*
*हेचिं आह्मांसि करणे काम, बीज वाढवावें नाम।*
जगद्गुरु श्रीतुकोबाराय  

आमच्या मागील लेखांत आम्ही म्हटल्याप्रमाणे ह्या लेखमालेत आमच्या भूवैकुंठाधिपती परमात्मा श्रीपंढरीशाच्या मूर्तींवर नि एकूणच इतिहासांवर गेल्या काही दशकांत जे काही निराधार आक्षेप घेतले गेले आहेत, त्यांचे निराकरण करण्याचे कार्य करणार आहोत. वास्तविक हे कार्य आमच्या पूर्वसूरींनी केंव्हाच करून ठेवलं आहेच. त्यात *वै. हभप. श्री सोनोमामा दांडेकर* असतील, आमच्या पंढरीतले *डॉ. श्री. गोपाळराव बेणारे* असतील, पंढरीतलेच संतसाहित्याचे अभ्यासक आणि भाष्यकार आणि *'वारकरी संप्रदायाचा उगम आणि इतिहास'* हा अभ्यासपूर्ण ग्रंथ निर्माण करणारे *श्री भा पं बहिरट* असतील, *ज्येष्ठ इतिहासकार, पुरातत्ववेत्ते आणि मूर्तीशास्त्रज्ञ श्री ग ह खरे उपाख्य तात्या खरे* असतील. ह्या सर्वांनीच भगवान श्रीविठ्ठल मूर्तीवरील निरर्गल नि निराधार वादांचे निराकरण आपल्या प्रगल्भ बुद्धीने, तर्कशुद्ध विवेचनाने, प्रत्युत्पन्न मतीने आणि सप्रमाण ससंदर्भ विवरणाने साडेतीन दशकांपूर्वीच करून ठेवले आहे. त्यामुळे आमची भूमिका केवळ 

*फोडिलें भांडार, धन्याचा हा माल।*
*मी तव हमाल, भारवाही।*

अशीच आहे. ह्या श्रीतुकोक्तीप्रमाणे हा लेखनप्रपंच करताहोत.

गेली अडीच वर्षे हा विषय अंतःकरणात असल्याने येविषयीं लिहिण्याची इच्छा वारंवार व्हायची. मागील वर्षीच ह्या दृष्टीने अध्ययन केल्याने तेंव्हाच लेखन करायचे होते पण ते तसेच कार्यबाहुल्यामुळे राहिले. म्हणूनच आषाढी एकादशीच्या निमित्ताने काही दिवस हा प्रपंच करताहोत.

*भारत विखंडन शक्तींचे षडयंत्र*

इतिहासाच्या नि वर्तमानाच्या विकृतीकरणातून समाजाचा किंवा मानवसमूहाचा बुद्धिभेद करणे हा देशविघातक शक्तींचा नेहमीचा प्रयत्न असतो. त्यातूनच मग हे असे प्रयत्न वारंवार केले जातात.

प्रतिवर्षी आषाढी किंवा कार्तिकी आली की समाज माध्यमांवर पंढरीश श्रीविठ्ठलाच्या विषयी वाट्टेल ते लेख प्रसृत व्हायला लागतात. हे एकवेळ ठीक होते. पण हे द्वेषाचे वावटळ इतके उठलं की अडीच वर्षांपूर्वी आमच्या काही नवबौध्द बांधवांनी कोरेगाव भीमाच्या उदात्तीकरणासाठी कोरेगाव ते पंढरी यात्राही सुरू केली. इतकंच काय पण पंढरीतच श्रीविठ्ठल मंदिराभोवती ह्यातल्या काही कथित भिक्षूंनी प्रदक्षिणा घालून विठ्ठल हा आमचाच बुद्ध आहे अशीही खोटीच आवई उठविण्याचा एक बालिश प्रयत्न केला. त्यावेळी श्रीमहाद्वारासमोर दुर्भाग्याने ते दृश्य आम्ही पाहिलं होते. 

*मुळात तत्कालीन भाजप सरकारने मतांच्या लाचारीसाठी जिथे ह्या कोरेगाव भीमासारख्या प्रसंगाचे उदात्तीकरण केलंय, तिथे ह्या आमच्या नवबौध्द बांधवांना आवेशात येऊ वाटणार त्याचे नवल ते काय? सरकारी पाठिंब्यानेच हे सर्व होत असेल तर काय लिहावे? आणि काही कथित उजव्या समाजवाद्यांनीही सामाजिक समरसतेच्या नावाने ह्यांस मूक संमतीही दिलीच होती. शेवटी एकदा पेशव्यांना जातीयवादी घोषित केलं की संपलंच ना. असो तो स्वतंत्र विषय.*

पण जगद्गुरु श्रीतुकोबारायांच्या भाषेंत

*बुडते हे जन देखवेना डोळा । म्हणोनि कळवळा येतो आम्हां ॥*

*इतर कुणी ह्याविषयी भीतीने किंवा लांगुलचालनाच्या दुष्प्रवृत्तीने मूग गिळून गप्प राहत असतील तर खुशाल राहोत, आम्ही शांत राहूच शकत नाही म्हणून हा अट्टाहास. कारण आपल्यासमोर हा सत्याचा प्रकट अपलाप होताना आपण तो षंढपणे पाहत बसणे ह्यासारखी आत्मवंचना नव्हेच. म्हणूनच...*

ह्याआधी ह्याच श्रीविठ्ठल मूर्तींवर ती जैन असल्याचा, ती वीरगळ असल्याचा तर काही रा चिं ढेरेंसारख्या अभ्यासकांनी तो मूळचा यादव जनजातींचा म्हणजे  आमच्या गवळी-धनगर बांधवांचा लोकदेव असल्याचा आणि पुढे त्याचे वैदिकीकरण केल्याचाही मिथ्या आरोप केला होता. वास्तविक हे आमचे बांधवंच आहेत. त्यामुळे त्यांनी त्यावर अधिकार सांगितला तर त्यात वाईट काहीच नाही. परंतु ह्या वादाला एक वेगळा रंग आहे जो सहजासहजी दिसणारा नाही. 

आणि त्यातही त्यांनी माढ्याची मूर्ती मूळ असाही तर्क केला होता.

*पण सुदैवाने त्याचवेळी उपरोल्लेखित ज्येष्ठ इतिहासकार श्री तात्या उपाख्य ग ह खरेंनी त्यांच्या 'श्रीविठ्ठल आणि पंढरपूर' आणि 'महाराष्ट्रातील चार दैवते' ह्या दोन ग्रंथांमध्ये ह्या आक्षेपांचे साधार नि सप्रमाण खंडण साडेतीन दशकांपूर्वीच केलं आहे. त्याआधी केसरीत त्यांनी लेखमालाही सविस्तर लिहिली होतीच आणि ढेरेंचं सारंच कथित संशोधन खोडून काढले होतेच. दुर्दैवाने ढेरेंचा ग्रंथ प्रकाशितही आहे. त्याचे खंडण झाल्याचेही लोकांस ज्ञात नाही ही शोकांतिका आहे.*

*हभप डॉ. बेणारेंचा विशेष उल्लेखनीय ग्रंथ किंवा पुस्तिका*

पंढरीतल्या श्रीविठ्ठलांस पहाटे वेदमंत्रांनी जागृत करण्याचे कार्य जे बेणारे परंपरेने करत आले होते, त्याच बेणारे वंशातले *ज्ञानेश्वरी वरील मराठी आणि हिंदी भाष्यकार डॉ. श्रीगोपाळराव बेणारे ह्यांनीही "श्रीविठ्ठलमूर्ती वाद नि खंडण" नावाने एक पुस्तिका लिहून उपरोक्त आक्षेपांचे सप्रमाण खंडण केले होते. आश्चर्य म्हणजे पुण्यातल्या प्रथितयश भारत इतिहास संशोधक मंडळ इथे ह्याविषयी एक अभ्यास परिषद किंवा परिसंवाद झाला असताना त्यांस ग ह खरे, प्र. न. जोशी आदि इतिहासक्षेत्रातील दिग्गज मंडळी आणि डॉ. बेणारे स्वतः उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रणही करण्यात आले होते.*

*आश्चर्य म्हणा किंवा काहीही म्हणा पण रा चिं ढेरे पुण्यात असूनही नि त्यांना निमंत्रण असूनही ह्या कार्यक्रमात हेतुपुरस्सर ते उपस्थित राहिलेच नाहीत. ह्यावरूनच त्यांच्या कथित संशोधनाची सत्यता आकळते.* ह्यावर ह्या लेखमालेतच सविस्तर आम्ही येणारंच आहोत.

*२१ मार्च १९८१ ह्या दिवशी हा परिसंवाद भारत इतिहास संशोधक मंडळात झाला होता.* म्हणूनच जे कार्य पूर्वसुरीच्या विद्वानांनी करून ठेवलं आहे, तेच पुढं आणायचा हेतु आहे. भूमिका मांडण्यासाठीच हा प्रथम लेख आहे. इथून पुढे प्रथम् बुद्ध किंवा बौद्ध ह्या आक्षेपांचे खंडण करूयांत.

*आमच्या हिंदु नवबौध्द बांधवांना नम्रतेची विनंती !*

*आंबेडकरांच्या नावाखाली काही देशविघातक शक्ती, ज्या भारत विखंडन शक्ती नावाने कार्यरत आहेत, त्या आमच्या हिंदु नवबौध्द बांधवांना अकारण त्यांच्याच बांधव असलेल्या आम्हा शेष हिंदू समाजाच्या विरोधात पेटविण्याचा प्रयत्न करताहेत. नवबौध्द बांधवांनी कृपा करून ह्या राष्ट्रविघातक शक्तींपासून दूर राहावे ही नम्रतेची विनंती !*

एका महत्त्वाच्या शंकेचे निरसन 

*जर श्रीविठ्ठल सर्वांचाच आहे तर त्यावर नवबौद्धांनी केवळ आपला अधिकार सांगितला तर त्यात आक्षेप काय?*

*ह्याचे समाधान मुळात असे आहे की मुळात जे नाहीच ते ठसवायचा प्रयत्न का? श्रीविठ्ठलाच्या भक्तीचा सर्वांना अधिकार आहेच. तुम्हांस भक्ती करायची असेल तर श्रीविठ्ठल म्हणुनच करायला काय अडचण आहे तुम्हांस? त्याला अकारण विठ्ठल नसून बुद्ध किंवा बौद्ध सिद्ध करायचा अट्टाहास का? कारण एकीकडे बुद्धाने देवाचं अस्तित्वच नाकारलं, मूर्तीपूजाच नाकारली, ईश्वराचे अस्तित्वंच नाकारलं असं म्हणायचे आणि दुसरीकडे श्रीविठ्ठल हाच बुद्ध आहे असे म्हणायचे हा कुठला भंपकपणा आहे? ही कसली आंबेडकरी पद्धत आहे संशोधनाची???*

*एकीकडे २२ प्रतिज्ञा उच्चारून सर्व हिंदू देवी देवतांचा द्वेष करायचा आणि दुसरीकडे सर्व देवतांवर आता त्या आमच्याच मूळ बुद्ध आहेत असा वाद निर्माण करायचा? हे कुठले संशोधन?*

*आम्ही तुम्हांस आमचे बंधुच समजतो. पण एकीकडे आपल्याच बांधवांच्या देवतांचा द्वेष करायचा आणि दुसरीकडे सगळे देव आमचेच आहेत अशी टिमकी वाजवायची? हा कुठला न्याय???*

अस्तु।

पुढील लेखांत श्रीविठ्ठल मूर्तीचे बुद्ध किंवा बौद्ध आक्षेप पाहुयांत आणि निराकरण करूयांत.

भवदीय,

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com 

#पंढरपूरचा_श्रीविठ्ठल_बुद्धबौद्धजैननाहीच_आंबेडकर_आषाढीवारी_इतिहासाचे_विकृतीकरण