Thursday 11 March 2021

महाशिवरात्री अर्थात बोधोत्सव दिवस...



*उदीच्य प्रकाश नामक ग्रंथानुसार कैक शतकांपूर्वी सौराष्ट्रप्रांती अर्थात विद्यमान गुजरातमध्ये अन्हलवाडा ह्या संस्थानचे अधिपति मूलराज सौलंकीनी एका विशिष्ट कार्यासाठी संपूर्ण भारतातून १००० एक सहस्त्र सच्चरित्र नि सत्वशील ब्राह्मणांना बोलाविलं होते. तेच ब्राह्मण पुढे ह्या सौराष्ट्रप्रांती उदीच्य ब्राह्मण नावाने प्रसिद्ध झाले.  दोनशे वर्षांपूर्वी याच काठियावाडीमध्ये टंकारा नामक ग्रामी ह्याच परंपरेत कर्शनजी लालजी तिवाडी ह्या औदिच्य किंवा उदीच्य सामवेदी ब्राह्मणाच्या गृही विक्रम संवत १८८१ अर्थात इसवी सन १८२४ मध्ये एका बालकाचा जन्म झाला. माघ वद्य दशमींस...मूलशंकर हे पाळण्यातले नाव असलेले हे बालक पुढे जगद्विख्यात यतिवर महर्षि दयानंद सरस्वति नावाने प्रसिद्ध झाले...*


हे घराणे मूलतः शैवपंथी असल्यामुळे भगवान शंकरांचे अनन्य भक्त...


पांचव्या वर्षी ह्या बालकाची शिक्षा आरंभ झाली आणि आठव्या वर्षी उपनयन संस्काराने ह्याच्य् द्वितीय जन्मांस प्राप्ती झाली. यजुर्वेदाचे अध्ययन आरंभ करताच रुद्रपाठाची आवर्तने सुरु झाली आणि १४व्या वर्षांपर्यंत व्याकरण आणि शब्दरुपावली वगैरे कंठस्थ झाली. अगदी यजुर्वेदही संपूर्ण कंठस्थ झाला. 


*शिवभक्तीचे संस्कार*


बालपणापासूनंच ह्या बालकांवर शिवभक्तीचे संस्कार झाल्याने नित्यनियमाने पिंडीची पूजा करणे वगैरे कार्यक्रम सुरु झाले. आणि अखेर तो दिवस उजाडला. शिवभक्त असल्याने ह्या बालकांस महाशिवरात्रीचे उपवास, तत्संबंधित उपासना ह्या सर्वांचीच शिक्षा आधीपासूनंच देण्यात आली.


*महाशिवरात्रीची रात्र आणि मूलशंकरचा बोधोत्सव*


अखेर ती महाशिवरात्रीची रात्र आली. दिवसभराचा उपवास करून हा बालक  रात्रीच्या प्रहरी असलेल्या चार शिवपुजांसाठी मंदिरात गेला. तीन पुजा करतातच त्याच्या लक्ष्यीं आलं की मंदिरातला पुजारी व आपले सर्व मित्र झोपी गेले आहेत. चौथ्या पुजेच्या आरंभ करण्यापूर्वीच एक अकस्मात घटना घडली नि...


*शिवरात्रींस निद्रा घेणं हा व्रतभंग असल्याने बालक मूलशंकर हा सतत डोळ्यांवर पाणी मारत होता. त्यांचे वडील स्वतः झोपी गेले पण हा बालक मात्र पित्याची आज्ञा पालन करत अक्षुण्ण जागा राहिला. रात्रीची नीरव शांतता आणि ती निस्तब्धता ह्या मूलशंकरांच्या जीवनांत मात्र एका महान नाट्यासम कलाटणी देणारी ठरली. ह्याच वेळी त्या नीरव शांततेमध्ये त्या बालकाने पाहिलं की त्या शिवाच्या पिंडीवर काही उंदरं हालचाल करताहेत. त्या पिंडीवरील तांदुळ ते भक्ष करताहेत. हे पाहून त्या बालकाच्या अंतःकरणांत उठलेल्या प्रश्नांनी त्या बालकांस आत्ममग्न बनविलं. त्याच्या मनांत विचार आला असेल की 


*"इतके दिवस अनेक कथांमधून ऐकत आलो की भगवान शिव हे तर शांतीचे अनुपम प्रतीक. योग्यांचाही योगी अससेला महायोगी, हे तर पाशुपतास्त्रधारी, रुद्रांचेही रुद्र, सर्वांचे महेश्वर, प्रबल प्रतापी, दुर्दान्त-दैत्य-दलनकारी असे हे महादेव त्या चार पाच उंदरांना साधे हटवु शकत नाहीत? आपण जे शिव ऐकले ते हेच का की वेगळे??? जे चालतात, फिरतात, बोलतात, हाती त्रिशुल धारण करतात, डमरु वाजवितात, शाप नि वर दोन्ही देतात, असे ते त्रिनेत्रधारी शिव नक्की आहेत तरी कोण???"*


आपल्या अंतःकरणांतले हे शंकांचे काहूर शांत करण्यासाठी ह्या मूलशंकरने शिवचतुर्दशीच्या रात्री, शिवमंदिरामध्ये, शिवमूर्तीसमोर, आपले महान शिवभक्त पिताश्री श्री कर्शनजींना विचारलं की हे शिव निश्चित आहेत तरी कोण जे स्वतःची त्या उंदरांपासून साधी रक्षा करु शकत नाहीत???


आपल्या पुत्राच्या ह्या प्रश्नाचे समाधान पिता करुच शकले नाहीत पण त्या असमाधानाने सुरु झाला शोध एका आत्मचिंतनाचा, एका आत्मगौरवाचा...!


*एका मूलशंकर नामक बालकाने त्याचवेळी प्रतिज्ञा केली की खऱ्या सत्यनिष्ठ शिवाचं दर्शन मला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी ह्या शिवमूर्तीची किंवा पिंडीची पूजाच करणार नाही...*


एका शिवभक्त कुटुंबामध्ये शिवपिंडीचीच पूजा नाकारणारा हा नास्तिक पुत्रंच जन्माला यावं असंच त्या पित्याला वाटलं असणार तर काय नवल?


पण हा बालक तर आस्तिकांचाही आस्तिक होता, कारण तो निघाला होता एका अनंताच्या प्रवासासाठी...


*तिवारींचा मुलगा निघाला होता आपल्या खऱ्या शिवाच्या अर्थात रुद्राच्या शोधासाठी...आपल्या अंतरात्म्यांतल्या सत्यनिष्ठ शिवाच्या साक्षात्कारासाठी...*


*हा बालक निघाला होता आर्ष ग्रंथांच्या उद्धारासाठी नि वैय्याकरणातला सूर्य होण्यासाठी...*


*हा बालक निघाला होता श्रुतिभास्कर आजीवन अखंड आदित्य बालब्रह्मचारी वेदोद्धारक महर्षि श्रीमद्दयानंद बनण्यासाठी....*


*हा बालक निघाला होता वेदांवरचा सर्वोत्तम भाष्यकार होण्यासाठी, तासन्तास समाधी लावून मगंच वेदार्थ करण्यासाठी...*


*हा बालक निघाला होता प्राचीन आर्यांचा तेजस्वी व गौरवशाली असा वेदरुपी वारसा त्यांना पुन्हा प्रदान करण्यासाठी...*


*हा बालक निघाला हिंदुंना अर्थात आर्यांना त्यांच्या विस्मृत आत्मगौरवाचा साक्षात्कार करून देण्यासाठी...*


*हा बालक निघाला होता हिंदुंना कृण्वन्तो स्वयमार्यं तथा विश्वमार्यंम् हे बनविण्यासाठी...*


अशा ह्या बालकासाठी ही चतुर्दशीची रात्र ठरली ती बोधोत्सव रात्र...आत्मचिंतनासाठी, आत्मस्वरुपाच्या शोधासाठी, आत्मगौरवाच्या पुनर्प्राप्तीसाठी, आत्मसंस्थित होण्यासाठी...


आपणही असा काही बोध आजच्या ह्या पवित्र रात्री घेऊयांत...आपल्यातल्या सत्यनिष्ठ शिवतत्वाला जाणण्यासाठी...


आपल्या मूलतत्वांस जाणण्यासाठी, आपल्यातल्या आत्मस्वरुपास ओळखण्यासाठी...


*(वैधानिक सूचना - प्रस्तुत लेखाचा उद्देश्य मूर्तीपूजेची निंदा करण्याचा किंवा तिला नाकरण्याचा मूळीच नाही. लेख व्यवस्थित वाचावा ही पुनश्च विनंती. न समजल्यांस सोडून द्यावा किंवा आमच्या पुंढील लेखांची वाट पहावी...धन्यवाद)*


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#महाशिवरात्री_बोधोत्सव_महर्षि_दयानंद_वेदोद्धारक_शिवपिंड_भगवानशंकर_रुद्र

Tuesday 9 March 2021

श्रीसमर्थांची तथाकथित 'पत्नी' आणि समाजमाध्यमं...



चौथा अत्यंत साक्षेप|फेडावे नाना आक्षेप|अन्यायें थोर अथवा अल्प|क्षमा करीत जावे||

दशक - ११, समास ५


समाजमाध्यमांवर काय प्रसृत करावं आणि करु नये ह्याचा विवेक दुर्दैवाने आह्मीं गमावून बसलोय. दिसला एखादा संदेश की कर गावभर...


त्यातून कोणत्याही आजीवन अखंड ब्रह्मचर्य पालन केलेल्या सत्पुरुषांस अट्टाहासाने कुणीतरी पत्नी होती असे दाखवायचा एक प्रयत्न फार असतो. म्हणजे आधी श्रीहनुमंतांस सूर्यानावाची एक पत्नी बळंच दाखवून झाली. दक्षिणेत ह्मणें त्या दोघांचं मंदीरही आहे. किती दुर्भाग्य! पुढे श्रीभीष्माचार्यांसही विवाहित दाखविण्याचा अट्टाहास भांडारकर वगैरे एतद्देशीय विद्वानांनीच केला. आता राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदासांची न झालेली पत्नी दाखविण्याचा प्रयत्न सुरु आहे.


नुकतीच श्रीदासनवमी झाली व काल योगायोगाने आतंरराष्ट्रीय महिला दिवसही झाला. म्हणूनंच की काय कुणाला तरी समर्थांच्या तथाकथित पत्नीसंबंधी वाट्टेल ती कथा प्रसृत करण्याचा मोह झाला असावा.


*मूळात जिच्याशी समर्थांचा विवाहच झाला नाही ती पत्नी कशी? तिचा उल्लेख नियोजित वधु असाच करायला हवा...! पण व्याकरणाचा गंधही नसणाऱ्यांना हे कुठून कळणार???*


सांप्रत समाजमाध्यमांवर एक निनावी लेख प्रसृत होतो आहे ज्यात श्रीसमर्थांच्या तथाकथित पत्नीसंबंधी वाट्टेल ती भाकडकथा प्रसृत केली जाते आहे जिला समर्थ साहित्यात तर काडीमात्र आधार तर नाहीच पण ती कथा इतकी विपर्यस्त आहे की ती चीड आणणारी तर आहेच आहे पण अत्यंत हास्यास्पद आणि खोटी आहे हे वाचल्याक्षणीच ओळखु येते. असा नतद्रष्टपणा लेखकाला का करावासा वाटला हे तेच जाणो....


वास्तविक ज्यांनी श्रीसमर्थांच्या चरित्राचे अध्ययन केलेलं आहे, त्यामध्ये प्रामुख्याने श्री गिरीधरस्वामींचा समर्थप्रताप, आत्माराम महाराजांचा दासविश्रामधाम वगैरे ग्रंथ संदर्भग्रंथ म्हणून अत्यंत विश्वसनीय आहेत. ज्येष्ठ समर्थभक्त कै. आदरणीय गुरुवर्य श्रीसुनीलजी चिंचोलकरांनी त्यांच्या 'चिंता करितो विश्वाची' ह्या चरित्र ग्रंथामध्ये श्रीसमर्थांच्या विवाहसंबंधी व त्या नियोजित वधुच्या पुढील विवाहासंबंधी विस्तृत विवेचन केलं आहे. त्याचा सांराश असा


"गिरीधरस्वामींच्या समर्थप्रतापमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की समर्थांचे अंतःकरण हे जात्याच वैराग्यप्रवण असल्यामुळे त्यांच्या विवाहसंबंधी चार वेळा स्थळे दाखविण्याचा प्रयत्न झाला जो त्यांनी मूलींच्या पित्याशी बोलूनंच त्यांस नकार देत किंवा त्यांना आपल्या वैराग्यप्रवणतेविषयी सांगून पटवून दिले. ह्यातून समर्थांवर जो आक्षेप घेण्यात येतो त्याचे आपोआप निराकरण होते. पुढे समर्थांच्या मामाच्या मूलीशीच जो त्यांचा विवाह त्यांच्या मातुःश्रींनी ठरविण्याचा अट्टाहास मांडला, ते मामा भानजी गोसावी हे होते. समर्थांनी ऐन विवाहप्रसंगी आपल्या नियोजित वधुचा अव्हेर करून विवाह मंडपातून धुम ठोकली व ते तिथून पसार झाले. आता त्या कन्येचे पुढे काय झालं ह्याचे उत्तर देताना हनुमंत स्वामींच्या बखरीत उल्लेख आहे की तिचा विवाह तिथल्याच तिथे एका बीजवराशी करण्यांत आला. समर्थ अचानक असे बेपत्ता झाल्याचे कळतात लग्नमंडपात उडालेल्या हाहाःकाराला शांत करण्यासाठी गंगाधरपंतांनी मूलीच्या वडिलांना सांगून तिथेच आवाहन करून उपस्थित असलेल्या अंबडच्या देशमुखांशी तिचा विवाह लावला. बीजवर म्हणजे काय तर ज्याची पत्नी सात वर्षाची असतानाच वारली असा तो. त्यामुळे अंबडच्या देशमुखांच्या बीजवर मुलाशीच तिचा विवाह तिथेच लावण्यात आला."


ह्याचाच अर्थ समाजमाध्यमांवर प्रसृत होणारी जी कथा आहे ज्यामध्ये ती कन्या पुढे तशीच अविवाहित राहिल्याचा व अगदी छत्रपती शिवरायांना ती भेटल्याचा, सैन्यनिर्माण केल्याचा व अगदी समर्थांशीही पाच मिनीटं भेट घेतल्याचा अत्यंत बालिश उल्लेख केला आहे, ती अत्यंत खोडारडी तर आहेच पण तर्कदुष्टही आहे....!


असे संदेश प्रसृत करणाऱ्यांवर समाजाने बहिष्कारंच घातला पाहिजे किंवा नैर्बंधिक कृती तरी करायला हवी...


काही जण आक्षेप घेतील की एवढं अट्टाहासाने ह्यावर लिहायचं काय कारण तर आह्मीं सांगु इच्छितो की महापुरुषांविषयी अशा भाकडकथाच पुढे रुढ होत जातात व त्या आख्यायिकेचे रुप धारण करून लोकांना त्याच सत्य वाटायला लागतात. म्हणूनंच योग्य वेळीच त्यांचं खंडन आवश्यक आहे.


लेखासहित आह्मीं गुरुवर्य श्री सुनीलजींच्या त्या चरित्राची पृष्ठे जोडली आहेत ती वाचकांनी वाचावीत ही विनंती. ती आह्मांस आमचे मित्र समर्थभक्त श्री महेश फणसळकरांनी पाठविली त्याविषयी त्यांचे आभार...


अस्तु। 


श्रीसमर्थांसारख्या राष्ट्रपुरुषाविषयी अशा भाकडकथा प्रसृत करण्यांस श्रीसमर्थंच सद्बुद्धी देवोत हीच त्यांच्याचरणी प्रार्थना...!


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#श्रीसमर्थरामदास_चरित्र_त्यांची_तथाकथित_नियोजित_वधु_अंबडचे_देशमुख

Sunday 7 March 2021

माघ वद्य नवमी अर्थात दास नवमी





 *असो ऐसें सकळहीं गेले | परंतु येकचिं राहिलें | जे स्वरुपाकार जालें | आत्मज्ञानी ||*

श्रीमद्दासबोध


ज्यांना आत्मज्ञान झालं तेच कीर्तीने जीवित राहतात, अन्येषां कृते जीवितं मूतकमेव मन्ये। असे म्हटल्यांस अत्युक्ती नाही.


*पैशाच पंथी इस्लामी पाशवी अत्याचाराच्या आक्रमणाने गांजलेल्या नि पंधराव्या शतकांत पाच पातशहांच्या परदास्यतेत बद्ध झालेल्या महाराष्ट्रांस तारलं ते संतांनींच. महाराष्ट्राक्षितिजांवर संतसम्राट कैवल्यचक्रवर्ती श्रीज्ञानोबांच्या रुपाने स्वधर्मसूर्याचा जो उदय झाला, भक्तशिरोमणी श्रीनामदेवांनी ज्या भागवतधर्माची पताका अगदी पंजाबांपर्यंत नेली, श्रीगोरोबाकाका, श्रीसेनामहाराज, श्रीचोखोबादि संतांनी ज्या भक्तिरसाचा डांगोरा कळिकाळाच्याही माथा सोटा हाणत पिटला, त्याच भागवतधर्मांस अर्थात वैदिक धर्माच्या अत्यंत विशुद्ध अशा स्वरुपांस इतिहासाचार्य वि का राजवाड्यांनी म्हटल्याप्रमाणे सहिष्णुपासून जयिष्णु बनविण्याचे कार्य महाराष्ट्रधर्म नावाच्या संजीवनीने प्राप्त झालं. संतचरित्रकार श्री पांगारकरांनी म्हटल्याप्रमाणे त्या महाराष्ट्रधर्माचा पाया ज्या श्रीनाथांच्या रुपाने रचला गेला, जगद्गुरु संतश्रेष्ठ श्रीतुकोबारायांच्या रुपाने ज्या महाराष्ट्रधर्माची ईमारत फळांस आली त्याच महाराष्ट्रधर्मांस राष्ट्रगुरु श्रीसमर्थांच्या तेजस्वी नि विजीगीषु वृत्ती निर्माण करणाऱ्या वाणीने, लेखणीने, कृतीने, आचाराने, व्यवहाराने सहिष्णु पासून जयिष्णु बनवलं नि त्यावर कळस चढविला, ज्यांस पुण्यश्लोक श्रीशिवप्रभुंच्या अरिशोणितप्राशी खड्गाच्या तीक्ष्ण धारेने हिंदवी स्वराज्याचा मुकुटमणीच धारण केला, त्या श्रीसमर्थांच्या समाधीचा आजचा दिवस...*


*मुख्य तें हरिकथा निरुपण।दुसरें तें राजकारण।तिसरें तें सावधपण। सर्वांविषयी।*


असे म्हणत मुख्य त्या हरिकथेला कुठेही न त्यागता राष्ट्रहिताचे राजकारण करणारा नि सर्वांविषयी सावधपणा बाळगायला सांगणारा हा राष्ट्रसंत


*भेटो कोणी एक नर। महार धेंड चांभार।त्याचे राखावे अंतर। या नाव भजन।*


सर्व हिंदुंसमाजाचं अंतर्बाह्य संघटन करणारा


*पतित करावे पावन।शहाणे करावे जन।सृष्टीमध्ये भगवद्भजन। वाढवीत जावे।*


पतितांना पावन करणारा नि सर्वांना शहाणं करणारा कृतिशील समाजोद्धारक


ईश्वरांस काय मागावं हे सांगताना


*कोमलवाणी दे रामा।विमल करणी दे रामा।सज्जनसंगती दे रामा।अभेदभक्ती दे रामा। बहुजन मैत्री दे रामा।*


प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांनी अगदी सार्थ म्हटल्याप्रमाणे 


*"म्हणजे सज्जनसंगती, अभेदभक्ती, बहुजनमैत्री ह्या तीन शब्दांसाठी भावनिक एकात्मकतेचे नोबेल पारितोषिक ह्या माणसाला द्यायला खरंतर काही हरकत नाही !"*


*विद्यावैभव अर्थारोहण दे रामा।जनसुखकारक, प्रसंगओळख, आंतरपारख दे रामा।*


असा ज्ञानी भक्त आणि इतका सर्व विश्वप्रपंच करत असतानाही


*विवेक आणि वैराग्य हेचि जाणावे महद्भाग्य।*


विवेक नि वैराग्याशी सतत संधान साधणारा हा वैराग्यसंपन्न महात्मा...



हिंदुधर्मरक्षक पुण्यश्लोक श्रीशिवप्रभुंच्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी, रक्षणासाठी नि संवर्धनासाठी त्या जगन्मातेकडे


*दुष्ट संहारिले मागे। ऐसे उदंड ऐकतो। परंतु रोकडे काही। मुळ सामर्थ्य दाखवी।*


*तुझा तो वाढवीं राजा। सीघ्र आह्मांसि देखिजा।*


अशी काकुळतेने प्रार्थना करणारा हा जगन्मातेचा भक्त...


पुण्यश्लोक श्रीशिवप्रभुंच्या स्वराज्यनिर्मितीपश्चात त्यांस आपल्या स्वप्नीं पाहिलेल्या रामराज्याची आनंदवनभूवनाची संज्ञा देत कृतकृत्यतेचा अनुभव करणारा कर्तृत्वसंपन्न पुरुषश्रेष्ठ...


*म्हणौनि आम्ही रामदास। रामचरणी आमुचा विश्वास।कोसळोनि पडो हे आकाश। परि आणिकांचि वास न पाहो।*


असे म्हणत ह्या नश्वर देहाचा त्याग करणारा हा आत्मज्ञानी ऋषि...


आज त्यांच्या चरणी कृतानेक साष्टाङ्ग दंडवत...!


आज नरवीर नरश्रेष्ठ श्री तानाजी मालुसरे ह्यांचेही पुण्यस्मरण...सावरकरांच्या शब्दांमध्ये


*धन्य शिवाजी तो रणगाजी, धन्य चि तानाजीं। प्रेमें आजि सिंहगडाचा, पोवाडा गाजी।*


माघ वद्य नवमी अर्थात दास नवमी...


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#दासनवमी_श्रीसमर्थ_रामदास_राष्ट्रगुरु_राष्ट्रसंत_श्रीशिवप्रभु_हिंदवीस्वराज्य_महाराष्ट्रधर्म