Wednesday 25 September 2019

*स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक गुण आहेत - इति मनुस्मृती*



महाराजा मनुंनी केलेली स्त्री-प्रशंसा

हा श्लोक वर्तमान मनुस्मृतीमध्ये कोणत्याही संस्करणामध्ये उपलब्ध नाहीये. मधील काळात तो हटलाही असेल. कारण मनुस्मृतीचे ९व्या शतकांतलं मेधातिथीचे भाष्य १२व्या शतकापर्यंत नष्ट झालं होते हे कुल्लुकभट्टाच्या भाष्यांत आपणांस उल्लेख प्राप्त होतोच. इतरही संदर्भ आहेतंच. परंतु प्रसिद्ध ज्योतिर्विद श्रीवराहमिहीरांनी त्यांच्या संहितेमध्ये हा श्लोक मनुमहाराजांचा म्हणून नोंद केली आहे. पहा.

*प्रब्रूत सत्यं कतरोङ्गानानां दोषोस्ति यो नाचरितो मनुष्यै:।*
*धाष्टर्येन पुम्भि: प्रमदा निरस्ता गुणाधिकास्ता मनुनात्र चोक्तम्।।*

वराही संहिता अध्याय ७४, श्लोक ६वा

अर्थ - *जर आपण विरक्त (निष्पक्ष) आहात तर सांगा की स्त्रियांमध्ये असे कोणते दोष आहेत, जे पुरुषांनी पूर्वी केले नसतील. अर्थात् सर्व दोष पुरुषांमध्ये पूर्वीच होते. पुरुषांनी धृष्टतेने स्त्रींस जिंकलंय, वास्तवांत पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक गुण आहेत असे मनु महाराजांनीच म्हटलंय..*

*मनुनात्र उक्तम्।*

धर्मशास्त्राचे प्रमुख आचार्य श्रीमनुमहाराजांनी हे विधान स्त्रियांविषयी केलंय असे श्रीवराहमिहीर सांगताहेत.

हा बृहत्संहितेचा संपूर्ण ७४वा अध्याय स्त्रीस्तुतीने भरलेला आहे. आता एवढ्यावरून पुरुषांनी मनु महाराजांना किंवा वराहमिहीरांस पुरुषद्वेष्टा म्हणावं का ? नाही ना. मग उगाचच विरोधाला विरोध का???

*स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक गुण आहेत हे मनुमहाराज सांगताहेत ह्यापेक्षा अधिक स्पष्टीकरण त्यांच्या निःपक्षपातीपणाचे काय आहे?*

*आता मग स्त्रीनिंदा करणार्या वाईट श्लोकांचे काय???*

काही जण विचारतील की मनुस्मृतीमध्ये स्त्रियांविषयी गौरवोद्गार काढणारे अनेक श्लोक जसे आहेत किंवा पूर्वी असायचे तसे दुसरीकडे काही ठिकाणी त्यांची निंदा करणारे आक्षेपार्ह श्लोकही आज विद्यमान आहेतंच.

इतका परस्परविरोध एकाच ग्रंथांत कसा काय असु शकतो?

*मनुमहाराजांच्या नावाने त्यांना स्त्रीद्वेष्टा म्हणून चोवीस तास बेंबीच्या देठापासून बोंबलणारे जशी ही गोष्ट लक्षांत घेत नाहीत किंवा घेऊ इच्छितही नाहीत, तद्वतंच मनुस्मृतीत काहीच दोष नाहीत किंवा ती अगदी निर्दोष आहे किंवा तिच्यात काहीच प्रक्षेप विक्षेप झालेले नाहीत असे मानणारे आमचे कथित सनातनी परंपरेचे अंधाभिमानी विद्वान नि धर्मपंडितही ही गोष्ट लक्ष्यीं घेत नाहीत ही शोकांतिका नव्हे तर काय???*

हा मनुमहाराजांवरचा घोर अन्याय नव्हे काय ???

*ज्यांनी मनुस्मृती कोणताही पूर्वग्रहदोष न ठेवता अत्यंत चिकीत्सकपणे नि सुक्ष्मदृष्टीने किंवा अगदी वरवर व्यवस्थित शब्दशः वाचलीय, त्यांना हे कळेलंच की तींत अनेकठिकाणी अनेकविषयांत परस्परविरोध आहे. हा विरोध का आहे त्याची संपूर्ण समीक्षा किंवा कारणमीमांसा करण्याचे हे स्थान नव्हेच. ते भविष्यांत करुच. अनेक विद्वानांनी ते पूर्वी केलंच आहे. पण ज्यांना हे पहायची इच्छाच नाही त्यांची गोष्ट काय करावी म्हणा??? मग ते कुठल्याही विचारधारेचे, संप्रदायाचे, परंपरेचे, मानसिकतेचे असोत. कुठल्याही.*

सर्वांनाच विनंती आहे की वरहामिहीरांच्या ह्या श्लोकासंबंधी तुमचं काय म्हणणं आहे? उपरोक्त श्लोकावरून मनुमहाराजांच्या मनांत स्त्रियांविषयी किती आदर होता हे दिसून येते. ह्यापूर्वीही आमच्या लेखांत आम्ही लिहिलंय की वेदांच्या चार संहिता घनपाठादि अष्टधा विकृतीने संरक्षित असल्याने त्या सोडून अन्य कोणताही ग्रंथ निर्दोष नाही. मनुस्मृतीत मधल्या काळांत प्रक्षेप नि विक्षेप दोन्हीही झाले आहेत. ह्यावर आम्ही आमच्या एका परमादरणीय श्रीभिडेगुरुजींवरील वृत्तपत्रांतील एका लेखांत सविस्तर मीमांसा केलीच आहे.

सांगण्याचा उद्देश्य इतकाच आहे की प्रस्तुत श्लोक वराहमिहीरांच्या वेळी मनुस्मृतीत होता पण आजच्या उपलब्ध एकाही मनुस्मृतीच्या प्रतीत तो नाहीये असा निष्कर्ष काढण्यांस कोणतीही अत्युक्ती आम्हांस वाटत नाही. लेखासह आम्ही संदर्भ जोडलेच आहेत.



ज्यांना ही अत्युक्ती वाटते त्यांनी हे आमचं विधान सप्रमाण खंडन करावं. कारण मनुस्मृतीत अनेक श्लोक असे आहेत की जिथे मनुरवेब्रवीत असे म्हटलंय. म्हणजे हा श्लोक मनुमहाराजांनी सांगितलंय अशा अर्थाची वचने आहेत. आता जर हे श्लोक मनुमहाराजांनी स्वतः रचले असते तर त्यांनी हे 'मनुने म्हटलंय' असे विधान कशाला केलं असतं ??? भले मनुस्मृती ही भृगुप्रोक्त आहे असे काही मतांत मानलं जात असलं तरीही त्यान्यायाने उपरोक्त वराहमिहीरांचा श्लोकही मनुस्मृतीचाच भाग होता हे लक्ष्यीं येते.

पण काही एकदोन अपवाद वगळता आजपर्यंतच्या एकाही मनुस्मृतीभाष्यकारांस ही गोष्टही लक्ष्यीं येऊ नयें ह्यापेक्षा शोकांतिका ती काय???

अर्थात ज्यांना सत्य स्वीकारायचीच मानसिकता नाही त्यांना कितीही घसा खरडून सांगितलं तरी त्यांना हे मान्य होणार नाही ही गोष्ट वेगळी. अस्तु।

*नोलुकोप्यवलोकते दिवा सूर्यस्य किं दूषणम्।*

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#मनुस्मृती_स्त्रियांची_स्तुती_प्रशंसा_गुण_पुरुष_वराहमिहीर

Monday 23 September 2019

*तथाकथित आर्याक्रमण किंवा स्थलांतर नि भारतीयांची वैचारिक दारिद्रता*


*हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं।*
*तत्वं पृषन्नपावृणु सत्यधर्माय दृष्टये।*

ईशावास्योपनिषद - १।१।१५

गेली एकवीस वर्षे इतिहासाचा अभ्यास करतोय. शाळेत असल्यापासूनंच...आपण सर्वंच करताहोत. एकंच गोष्ट सतत ऐकतोय नि वाचतोय....

आर्य बाहेरुन आले किंवा त्यांचे स्थलांतर झालं...???????

किती दिवस हे मिथ्यावचन???

*वैचारिक दारिद्रता नि परदास्यता हा भारतीयांचा गेल्या तीन शतकांतला जणु स्थायीभाव बनला आहे. कुणीही यावं, काहीही लिहावं आणि आम्ही ते प्रमाण मानावं. पाश्चात्यांनी भारतीय इतिहासांवर संशोधन करावं नि आमचे डोळे दिपून जावेत. अहाहाहाहाहा. त्यांचा हेतु काय होता तेही आम्ही न अभ्यासावं. काय दरिद्रता असावी एका देशाची? हेच कार्य आमच्या एतद्देशीय विद्वानांनी कुणी केलं तर मात्र तो आमच्या विचारधारेचा नाही म्हणून आम्ही त्याला अनुल्लेखानेच टाळावं.*

*किती दिवस पाश्चात्यांना आम्ही बुद्धी गहाण टाकणाराहोत?*

स्वत्व-स्वाभिमान नि तज्जन्य स्वयंप्रज्ञेचा विनाश झालेल्या भारतीयांनी आपल्या प्राचीन परमोज्वल इतिहासाकडे परकीयांच्या द्वेषपूर्ण नि पक्षपाती दृष्टी असलेल्या उपनेत्रांतूनच पहावेत ह्यापेक्षा शोकांतिका ह्या राष्ट्राची काय असु शकते ? काही सन्माननीय अपवाद, होय अगदी काहीच असे अपवाद वगळता, इथल्या सर्वच विद्वानांची नि राष्ट्रपुरुषांची बुद्धी ही परकीयांना इतकी दास्यभावाने कशी काय आत्मविस्मृतीने बद्ध होते हे अनाकलनीय आहे. बाबा वाक्यं प्रमाणं ह्याप्रमाणे *मैक्स वेबर अथवा मैक्सम्युलर, विल्यम जोन्स, व्हिन्सेंट स्मिथ वाक्यं प्रमाणं* ही इथली शोकांतिका कशी काय असु शकते?

*दीड-दोनशे वर्षांपूर्वी माथी मारलेला थोतांड आर्याक्रमण सिद्धांत*

*केंब्रिज हिस्टरी ओफ इंडियाच्या* माध्यमांतून नि मैक्सम्युलरच्या पन्नास खंडात्मक विकृत साहित्यातून ब्रिटीशांनी 'फोडा आणि राज्य करा'साठी आमच्या माथी मारलेला हा विभाजनकारी सिद्धांत अद्यापही पाठ्यपुस्तकांतून अध्ययनांस प्राप्त होतो ह्यापेक्षा शोकांतिका ती काय? आपल्या एकाही धर्मग्रंथात कुठेही आर्य बाहेरुन आल्याचा पुसटसाही उल्लेख नाही. काही पढतमूर्ख लोक वेदांमध्ये आर्य-अनार्य हा कथित ऐतिहासिक वाद शोधण्याचा एक बालिश प्रयत्न करतात. ह्यांची कीव जितकी करावी तितकी थोडीच. अशांचे स-प्रमाण खंडन खुप पूर्वीच एतद्देशीय पण पाश्चात्यांना बुद्धी गहाण न टाकलेल्या स्वयंप्रज्ञेच्या विद्वानांकडून झालंय. आम्ही आमच्या आठशे पृष्ठांच्या स्वतंत्र ग्रंथांतही हे केलंच आहे. ह्या लेखाच्या माध्यमातून आम्ही सर्वांस उघड आव्हान अर्थात ओपन चेलेंज देतो की वेदांमध्ये कुणीही आर्य-अनार्य हा कथित ऐतिहासिक वाद शोधून दाखवावा व सिद्ध करावा. ज्यांना व्याकरणांतलं वंही कळंत नाही, ते लोक कुणाची तरी पुस्तके वाचतात नि गप्पा ठोकतात. समाजमाध्यमे अर्थात सोशल मीडियावर तर अशांचा भडिमार आहे. आमची बुद्धिमत्ता इतकी लयांस गेलीय का?

*परवर्ती साहित्यातही कुठेच आर्य बाहेरुन आल्याचाही संदर्भ नाही*

वेदांत राहुदे, निदान पुराणांत वगैरे तरी तो असावा कारण ते इतिहासग्रंथ आहेत. तोही नाही. तरीही ब्रिटिश तो माथी मारतात नि आमचे सर्व विद्वान त्याचे एकतर समर्थन किंवा फारतर विरोध करण्यांत जीवनाची इतिकर्तव्यता मानतात. हीच आमची विद्वत्ता ??हीच आमची बुद्धिमत्ता?? हीच आमच्या बुद्धिवैभवाची परिसीमा???

*माणसं ओळखायला आम्ही कधी शिकणाराहोत???*

मैक्सम्युलरसारख्या ख्रिस्ती मिशनर्याला ज्याचा सर्व पत्रव्यवहार आम्ही पूर्ण अभ्यासला आहे, त्याला ब्रिटीशांनी ख्रिस्तीपैशाचपंथाच्या प्रचारासाठी वेदादि साहित्याचा अत्यंत विकृत अनुवाद करायला पाठवलं, ज्याला मरेपर्यंत संस्कृत बोलताही येत नव्हतं, ह्याचे प्रमाण उपलब्ध आहे, त्याला आमचे स्वामी विवेकानंद नि लोकमान्य टिळक सायणाचार्यांचा अवतार घोषित करतात. त्या मैक्सम्युलरने रामकृष्णांचे चरित्र काय लिहायला घेतलं विवेकानंद त्याच्यावर स्तुतीसुमनं उधळतात. लोकमान्यांना मैक्सम्युलर डोंगरीच्या कारावासांतून बाहेर यायला सहकार्य काय करतो, लोकमान्य आर्य उत्तर ध्रुवावरून आले असा सिद्धांत मांडतात. त्यांच्या समकालीन पावगी नामक पुण्यातल्याच एका चित्पावनानेच (हेतुपुरस्सर हा उल्लेख) भारतीय साम्राज्य नावाचे चोवीस खंड लिहून नि आर्यावर्तिक होम नावाचा स्वतंत्र ग्रंथ लिहून टिळकांना भेटून हा सिद्धांत खोडूनही टिळक दुराग्रहाने तो मान्यंच करत नाहीत..प्रमाण उपलब्ध आहे...मैक्सम्युलर उत्तरायुष्यांत बदलला खरं पण आधीचे काय ?

*इतकी शोकांतिकाय इथल्या विद्वानांची ????*

*पण टिळकांच्या विरोधांत काही बोलायचं नाही, लिहायचं नाही....का ते महापुरुष होते म्हणून ?*

*विवेकानंदांच्या विरोधांत काही लिहायचं नाही ते विवेकानंद होते म्हणून*

*हे दोन्हीही राष्ट्रपुरुष पूज्यनीय आहेतंच. निःसंशय पण...*

*ही अंधभक्ती नि व्यक्तीपूजा आमच्या पतनाचे कारण हे आमच्या लक्ष्यींही येऊ नयें?*

*माणसं ओळखायला कधी शिकणार आहोत आम्ही???*

*इतिहासातून काहीच शिकायचं नाहीये का ?*

*व्यक्तीपूजेचा नि अंधभक्तीचा त्याग कधी करणाराहोत?*

*चुकीला चूक कधी म्हणणार आहोत?*

*कधी विचार करणाराहोत???*

*आर्याक्रमण किंवा स्थलांतर कधी नाकारणाराहोत???*

*एकटा आर्यसमाज सोडला तर कुणीही हे सर्वप्रथम खोडलेलं नाहीये.*

*ब्रिटीशांना जाऊन ७० वर्षे झाली तरीही स्थितींत काही परिवर्तन नाहीये...*

*नेहरुप्रणीत लाल पावट्या इतिहासकारांनी तर ह्यात आणखी तेल ओतलं नि ओतताहेत...*

आम्हाला जाग कधी येणार?

*भारतीय इतिहासाचे पुनर्लेखन भारतीय दृष्टिकोनातून कधी होणार???*

विचार व्हावा ही विनंती...!

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#आर्याक्रमण_आर्यस्थलांतर_ब्रिटीश_भारतीयइतिहास_लोकमान्य_विवेकानंद