Monday 28 February 2022

इ॒यं विसृ॑ष्टिः कुत॑ आजा॑ता॒ - नासदीय‌ सूक्त

 


वैदिक विज्ञान नि आधुनिक विज्ञान - समन्वय की अंधविरोध???


ज्या आधुनिक सैद्धांतिक भौतिकीला (Modern theorytical Physics) ज्यामध्ये Cosmology, Astrophysics, Quantum Field Theory, Plasma Physics, Particle Physics, String theory या‌सर्वांशी संबंधित समस्यांचे निराकरण करता आलेलं नाहीये, ज्या आधुनिक विज्ञानाला सृष्टीनिर्मितीचे‌ रहस्य अद्याप नीटसं उलगडता आलं नाहीये, महाविस्फोट (बिग बैंग) सिद्धांतानुसार तो स्फोट का झाला ह्याचेही उत्तर आधुनिक विज्ञान देऊ शकत नाही, मूळात तो सिद्धांतही अनेकजण मानत नाहीत, स्टेडी स्टेटवाले विरोधातंच आहेत, पण तेही एकवेळ बाजुंस ठेऊ...चैतन्याचे अस्तित्वंच‌ जिथे‌ मानलं जात नाही, पण एरवी प्रत्येक गोष्टीत का हे उत्तर शोधणारे आधुनिक विज्ञान नि तत् अंधानुयायी ह्यावर मात्र सोयीस्कर मौन बाळगून आहेत आणि त्यांचे हे कथित अनुयायी जगाला विज्ञाननिष्ठेचे नि बुद्धिवादाचे नि धर्मप्रामाण्यवादाच्या नि शब्दप्रमाण्यवादाच्या‌ निषेधाचे डोस पाजतात...हसावं की रडावं???


ज्या डार्विनप्रणीत थोतांड‌ विकासवादाची मांडणी अद्यापही इतिहासाच्या नि विज्ञानाच्या पुस्तकातून रेटून केली जाते, विकासवाद अगदीच‌ त्याज्य आहे असे नसून त्याचे जे‌ स्वरुप मांडलं जातं ते हास्यास्पद आहे....


धर्मग्रंथांच्या शब्दप्रामाण्यवादाला विरोध करणारे कथित विज्ञानवादी विज्ञानातल्या अंधशब्दप्रमाण्यवादाला मात्र सोयीस्कर बळी पडून विरोध करायला विसरतात ह्यासारखे दुटप्पी वागणं जगात नसेल...


मूळात ज्या‌ वैदिक धर्मातली आस्तिक अशी षट्दर्शनेच 'अथातो जिज्ञासा' ह्या शब्दांनी आरंभ होतात, ज्या षट्दर्शनांमध्ये सृष्टीनिर्मितीचे रहस्यही प्रामुख्यत्वाने सूत्ररुपात विशद आहेच, ते सत्यसिद्धांत गुरुमुखातून आर्षपद्धतीने अध्ययन करून आकळून न घेता त्याकडे केवळ कर्मकांड म्हणून पूर्वग्रहदूषित दृष्टीने पाहून त्याची हेटाळणी करणे ह्यालाच आजच्या भाषेत विज्ञाननिष्ठा नि बुद्धिवाद म्हणायची फैशन असल्याने असला थोतांडवाद तुमच्या तुम्हालाच लखलाभ...


सृष्टीचे उपादान कारण असलेल्या‌ वेदांमध्ये

सृष्टीनिर्मितीसंबंधी वैदिक सिद्धांत काय सांगतात हे अगदी स्फटिकासमान स्पष्ट आहे जे अत्यंत बुद्धींस नि तर्कांस अनुकूल असून मान्य करण्याजोगंही आहे..अर्थात त्याचीही तर्ककठोर समीक्षा व्हायलाच हवी...पण केवळ विरोधासाठी विरोध ही भूमिका अत्यंत निंदनीय आहे...


आधुनिक विज्ञानांस आमचा मूळी विरोधंच आहे असा भ्रम ज्यांना करून घ्यायचा आहे त्यांनी खुशाल करावा...


विज्ञान हा शब्दंच‌ मूळात वेदांमधला आहे...


अणु-रेणुपासून ते सर्व सृष्टीपर्यंत नि त्याच्या कर्त्यापर्यंतचे यथार्थ ज्ञान हाच तर वेदांचा हेतु आहे...


वास्तविक वैदिक विज्ञान नि आधुनिक विज्ञान ह्या दोन्हींच‌ा समन्वय हीच आमची भूमिका असल्याने दोन्हींच्या समन्वयाने पदार्थ विद्येचे ग्रहण करून मानवी जीवनाचा विकास करणे हे श्रेयस्कर आहे...


ज्या समस्यांचे‌ समाधान आधुनिक विज्ञान करु शकलेले नाहीये, त्यावर वैदिक विज्ञानाने काही तोडगा निघु शकतो का ह्याचा विचार व्हायला हवा...


दोन्हींच्या मर्यादा नि दोन्हींची बलस्थाने लक्ष्यीं घेऊनंच समन्वयात्मक प्रयत्न आवश्यक आहेतंच...


सैद्धांतिक‌ स्पष्टता जोपर्यंत‌ येणार नाही तोपर्यंत ह्या‌ समस्यांचे‌ निराकरण तर होणारंच नाही नि हा वादही असाच सुरुच राहील


पण बुडतीं हे जन देखवेना डोळा...


भवदीय...


पाखण्ड खण्डिणी

pakhandkhandinee.blogspot.com


#राष्ट्रीयविज्ञानदिवस_सायन्स_फीजिक्स_सृष्टीनिर्मिती_वैदिकविज्ञान

Saturday 12 February 2022

तमेतमृषिशार्दूलं महर्षिं कवयो विदुः। - अभियुक्त




*ब्राह्मणेन निष्कारणो धर्मः षडङ्गो वेदाध्येयो ज्ञेयोश्च।*


भगवान महर्षि श्रीपतंजली कृत व्याकरण महाभाष्य 


आजीवन अखंड ब्रह्मचर्य्य पालन करून सहा वेदाङ्गांसहित वेदांचे नि आर्ष ग्रंथांचे गुरुमुखातून संप्रदायपूर्वक अध्ययन करून, पश्चात् योगसाधनेने निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त करून, ईश्वरसाक्षात्कार करून वैदिक सिद्धांतांचे यथार्थ ज्ञान झालेला, अविप्लुत ब्रह्मचर्यावस्था प्राप्त असलेला एखादा ऋषि जेंव्हा वेदार्थप्रतिपादनांस तत्पर होतो, तेंव्हा 'ऋषयो मन्त्रद्रष्टारः।' ह्या निरुक्तकारांच्या वचनांस तो ऋषि म्हणून सिद्ध होतो. तोच पुढे त्या वैदिक धर्माच्या सत्यनिष्ठ आचरणाने महर्षि बनतो...


आपल्याकडे माघ वद्य दशमी अर्थात उत्तरेत फाल्गुन कृष्ण दशमींस, विक्रम संवत १८८१, शनिवारी, मूळ नक्षत्रांवर, १२ फेब्रुवारी, १८२५ मध्ये म्हणजेच कालपासून १९७ वर्षांपूर्वी गुजरातमधल्या टंकारा नामक ग्रामी कर्शनजी तिवारी नामक एका औदिच्य ब्राह्मण दांपत्याच्या पोटी मूलशंकर नामक एका प्रज्ञासूर्याचा उदय झाला. वेदोद्धारक आदित्य बालब्रह्मचारी ब्रह्मवर्चसी अशा त्यांचीच काल आङ्ग्लदिनांकाने जयंती होती...


या सत्पुरुषाचं माझ्या जीवनांतलं स्थान इतकंच आहे की हा सत्पुरुष नसता तर मी आज जे आहे ते नसतो. इतकंच काय तर जो ब्लॉग लेखन आह्मीं करतो तोही नसता...


But for him we would have lost our Vedas! 


ब्रिटीशकाळात ब्रिटीशांना किंचितही बुद्धी गहाण न टाकलेला एकमेव स्वयंप्रज्ञ महापुरुष..शुद्ध भारतीय वृत्तीचा नि परंपरेचा आग्रही अभिमानी...


हिंदुंना त्यांच्या मूल विशुद्ध अशा वैदिक धर्माकडे पुनः पुनः खेचून नेणारा आर्ष धर्मोपदेशक...


माझ्या पाखण्ड खण्डिणी नामक ब्लॉगचा हाच खरा निर्माता...


पाखण्ड खण्डिणीची सहा-सात वर्षे...


सात वर्षांपूर्वी तिथीने श्रीगणेश चतुर्थींस पाखण्ड खण्डिणी ह्या आमच्या ब्लॉगचा श्रीगणेशा आह्मीं केला होता. हा ब्लॉग का काढावासा वाटला, त्यातंच ह्या सत्पुरुषाच्या जयंतीचं गमक आहे...


जणु एका अस्वस्थ दशकाचा प्रवास..


कारण त्याला तशी पार्श्वभूमी होती त्याच्याही पूर्वीच्या तीन वर्षांच्या सततच्या चिंतनाची, अस्वस्थतेची नि संशोधनाची. अर्थात ब्लॉग सुरु करावं हे सुरु करायच्या काही दिवस आधीही काहीच निश्चित नव्हतं. ब्लॉगची नोंदणी वगैरे अचानक झालेली असली तरी त्या आधीचं काहीसं अनुभवकथन...


समग्र विवेकानंद ग्रंथावलीचे अध्ययन २०१२


त्यावेळी विवेकानंद केंद्रामध्ये निवासी होतो. त्यावेळी सीएसची आर्टिकल्स नुकतीच संपल्याने वेळंच वेळ असल्याने समग्र विवेकानंद पुन्हा नव्याने अभ्यासायला घेतले. इयत्ता नववीत राजयोग, ज्ञानयोग, कर्मयोग अभ्यासून झाले होतेच. माझा मित्र चिदानंदची कृपा...


पण आता समग्र विवेकानंद अभ्यासत असताना स्वामीजींना ज्या एका श्लोकरुपी प्रश्नाने छळलं होतं, तो म्हणजे


*अश्वालम्भं गवालम्भं संन्यासं च पलपैतृकम्।*

*देवराच्च सुतोत्पत्तिं कलौ पंच विवर्जयेत्।*

कलिवर्ज्य


प्रमदानंदांना त्यांनी विचारलेल्या ह्या श्लोकरुपी पत्राने आमच्याही अंतःकरणांत जो काही अस्वस्थतेचा प्रवास त्यावेळी आरंभ झाला, तो पुढे २०१५ मध्ये समग्र आंबेडकर वाङ्मयाच्या काही खंडांच्या अध्ययनाने त्यात आणखीच तुपाची धार पडल्यासारखे झालं व तो वणवा त्या साली अक्षरशः पेटला...


हिंदु लोक नि त्यातही यज्ञ करणारे विशेषतः ब्राह्मण लोकंच पूर्वी गोमांस किंवा इतर मांस खायचे???


प्रत्यक्ष वेदांमध्येच गोमांसाचे व अन्य मांसाशनाचे समर्थन आहे काय???


वैदिक यज्ञांमध्येच पशुहिंसेचे समर्थन किंवा तशी आज्ञा वेदभगवान खरंच देतो आहे काय???


अस्पृश्यतेचा उगम खरंच वेदांशी संबंधित आहे काय???


डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या 'अस्पृश्य कोण होते' ह्या ग्रंथामध्ये केलेली ही विपर्यस्त मांडणी, त्याला विवेकानंदांच्या साहित्यातली आधीची अत्यंत परस्परविरोधी विधानं जी अत्यंत गोंधळात टाकणारी होतीच, त्यांचे समाधान काय ह्या विचाराने अक्षरशः त्यावेळी आमची झोप उडाली होती. खरंच झोप उडाली होती...


विवेकानंद केंद्रामध्ये रात्र रात्र तिथल्या संगणकांवर ह्या Is there a Beef in Vedas ह्याचे समाधान शोधत बसायचो...


ज्या वेदांविषयी आह्मां हिंदुंना अपार श्रद्धा आहे, त्या वेदांमध्ये अशी आक्षेपार्ह विधाने असतील काय???


आह्मीं खरं तर नावाचे ब्राह्मण...


कारण आमच्या घरात कुणीच वेदाध्ययन केलेले नसल्याने वेदांतलं वंही कुणाला ज्ञात असण्याचा संभव नव्हताच. इयत्ता बारावीत संस्कृतच्या पाठ्यपुस्तकामध्ये वेदांचा अगदी किंचितसा परिचय झाला होता. पण तो असून नसल्यासारखा....ह्या सर्व प्रश्नांनी रात्रंदिवस अस्वस्थ झालेल्या आह्मांस शंकासमाधान लाभलं ते ह्या चार अक्षरांनी - दयानंद!


त्यापूर्वी ना कुठला संत आमचे समाधान करु शकला ना कुठला आधुनिक काळातला अवतारी पुरुष! त्या सर्वांविषयी आदर ठेऊनही ह्या वेदोद्धारक सत्पुरुषाच्या चरणी आमच्या धर्माचा मूलाधार अशा त्या चतुर्वेदभगवानांच्या 'सत्यार्थ प्रकाशासाठी' तरी आह्मीं चिरकाल ऋणी आहोत...


इथे एक गोष्ट सांगणं आवश्यक आहे की प्रत्येक महापुरुषाकडून काही ना काही चांगलं घेणं आवश्यक आहे. कुणीही सर्वार्थाने त्याज्य नाही नि सर्वार्थाने स्वीकारार्ह्यही. विवेकाचा आश्रयो।


२०१४ साली नुकतंच व्हॉट्सप सुरु केलं व एण्ड्रॉईड मोबाईल आला. त्यामुळे २०१५ पासून गुगलवर शोधाशोध सुरु झाली होती...


आणि आणि आणि...


एक चमत्कार म्हणा काहीही म्हणा...


मी तरी ही दैवी कृपाच मानतो...


वेदांमध्ये गोमांस किंवा मांस नाही किंवा आहे हे शोधताना प्रथम वेदमहर्षि सातवळेकर व पश्चात् महर्षि दयानंद नि त्यांचा 'सत्यार्थ प्रकाश' हा मला अमृतासमान असा ग्रंथराज प्राप्त झाला नि माझ्या अंतःकरणांतल्या प्रस्तुत विषयाविषयीच्या शंकासुराला कुठेतरी वैदिक समाधानाच्या अस्त्राने तात्पुरतं शांत केलं. पुढे त्यांचा आणखी अमृताहुनीही अमृतोपम असा 'ऋग्वेदादिभाष्यभूमिका' हा ग्रंथ प्राप्त झाला नि प्रस्तुत विषयासंबंधीच्या सर्वच शंका मिटायकडे प्रवास सुरु झाला...


खरंतर ह्या दोन ग्रंथांनी माझ्या आयुष्यांत काय केलं हे लिहायसाठी स्वतंत्र लेखमाला लिहावी लागेल. आता त्यावर काहीच लिहीत नाही पण एकाच वाक्यात सांगायचं झालं तर


वैदिक धर्माचे अत्यंत विशुद्ध असे स्वरुप आकळून घेण्यासाठीची सद्बुद्धी ह्या ग्रंथद्वयींनी मला प्राप्त करून दिलीच पण त्याहीपेक्षा अत्यंत चिकीत्सक अशी बुद्धी दिली जिच्याने समोर येणारं साहित्य प्रत्येकवेळी तर्काच्या, प्रमाणांच्या आधारांवर तपासून घेण्याची अत्यंत विचक्षण दृष्टी प्राप्त झाली...

महर्षींनी मला काय शिकवलं???


*तापाच्छेदाच्च निकषात् सुवर्णमिव पण्डितैः।*

*परीक्ष्य मद्वचो ग्राह्यं न तु पुरुषगौरवात्।*


तत्वसंग्रह


सोनं ज्याप्रमाणे कसोटीवर घासून ते तावून सुलाखून ठोकून वगैरेच शुद्ध मानलं जातं, तद्वतंच माझी वचने परीक्षा करूनंच सत्य मानावीत, केवळ मोठेपणा पाहून नव्हे...


ह्या वचनाप्रमाणे ही वृत्ती विकसित झाली नि तिथूनंच पाखण्ड खण्डणाची चिकीर्षा निर्माण झाली...


*युक्तियुक्तं वचो ग्राह्यं न तु पुरुषगौरवात्।*

श्री भास्कराचार्य


म्हणजे कोणतेही वचन तर्क-युक्ती आदिंनी तपासून सत्य म्हणून स्वीकारावे, केवळ कुणी मोठ्याने म्हटलंय म्हणून नव्हे...हा विवेक ज्या यतिवर ऋषिश्रेष्ठामुळे प्राप्त झाला त्याची काल जयंती...


अर्थात हे सर्व सांगायचं कारण काय???


हा काही अंहकार प्रदर्शनासाठी मांडलेला डाव नव्हे किंवा आपण किती अभ्यासु आहोत, चिकीत्सक आहोत, जिज्ञासु आहोत वगैरे दाखवण्याचा बालिश अट्टाहासही नव्हे...


मग तरीही हे लेखन का???


तर काल ज्या सत्पुरुषाची आङ्ग्ल दिनांकांने जयंती होती, त्यांचे माझ्यावरचं जे ऋण ते व्यक्त करण्यासाठी हा लेखनप्रपंच...


कारण हिंदु म्हणुन जन्मांस आल्यावर जी काही ऋणं फेडावी लागतात, त्यांत ऋषिऋण नावाचं एक ऋण आहे...


अर्थात ह्या ऋषीचं एक ऋण आह्मांस फेडायचं आहेच...ईश्वरी कृपा झाली तर पाहुयांत....


इथे एक महत्वाचे सांगणं आवश्यक आहे...


आह्मीं ऋषिवर श्रीदयानंदांस मानतो म्हणजे त्यांची सर्वच मते आह्मीं आंधळ्यासारखी प्रमाण मानतो असे नव्हे. त्यांचे प्रत्येक वाक्य आह्मीं उपरोक्त श्लोकांप्रमाणे घासून-पुसूनंच मग स्वीकारतो व इथून पुढेही स्वीकारंत राहु. आजही दयानंदांचे कोणतंही वाक्य वाचताना त्याला आधार काय हेच पाहतो व पुढे जातो. आणि हाच खरा नियम सर्व सत्पुरुषांविषयी लागु करावा ह्या मताचे आह्मीं आहोत...


अर्थात ह्यात कुठेही त्या सर्व महापुरुषांचा अवमान करण्याचा हेतु खचितंच नव्हे. उलट हाच विवेक आहे...


आप्तस्तु यथार्थवक्ता असे न्यायदर्शन सांगतं..


अर्थात कोणत्याही महापुरुषाची मते अभ्यासताना तो कोणत्या काळात जन्मांस आला हेही लक्ष्यीं घ्यावं लागतं. तरंच सारासार विचार होतो...


जाता जाता ह्या आदित्य बालब्रह्मचारींस अभिवादन करताना एक श्लोक आठवतो


*आदित्यब्रह्मचर्याभिधविमलमहःपुञ्जतो ध्वान्तवृन्दंभिन्दानो वाममार्गाचरणनिशिचरानन्दरात्रीनिहन्ता।*

*पुण्यात्माम्भोजकान्तो निगममतवनोद्धासने चेतनांशुः संसारोद्बोधनोऽयं विलसतु हृदये श्रीदयानन्दभानुः।*


*आदित्य ब्रह्मचर्य्यरूपी निर्मल तेज:पुंजाने पापांधकारांस नष्ट करणारे, वेद विरुद्ध मार्गामध्ये विचरण करणाऱ्या निशाचरांस आनंद देणाऱ्या रात्रीचा नाश करणारे, वैदिकमत रूपी उपवनांस बुद्धिरूपी किरणांनी प्रफुल्लित करणारे आणि संसारांस मोहनिद्रेतून जागवणारे स्वामी दयानंद मुनीरुपी सूर्यभगवान आमच्या अंतःकरणांस ज्ञानाने प्रकाशित करोत...


भवदीय


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#महर्षि_दयानंद_जयंतीविशेष_वैदिकधर्म_वेदांमध्ये_गोमांस_मांस_पशुबली_अस्पृश्यता_विवेकानंद_आंबेडकर

Monday 7 February 2022

मला 'बिनमरणाचा नवरा' हवाय असे म्हणणाऱ्या माता रमाईंस जयंतीनिमित्त प्रणाम....!

 



महापुरुषांची पत्नी होणं सोप्पं काम नसतं....


त्यातही बाबासाहेबांसारख्या अत्यंत वादळी व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिमत्वाशी संसार करणं हे तर त्याहून कठीण...


अत्यंत धर्मनिष्ठ व तितकीच पतिव्रता स्त्री...


आपला नवरा काय आहे, तो कोणत्या उंचीचा आहे हे तींस ज्या प्रकारे ज्ञात होते ते कळून घ्यायचे असेल तर एका घटनेकडे पहावं लागेल...


१९३२ साली गोलमेज परिषदेहून बाबासाहेब परत आल्यावर ज्यावेळी त्यांचा भव्य सत्कार ते बोटीतून उतरल्यावरंच जेंव्हा सुरु झाला, त्यावेळी असंख्य हार त्यांच्या गळ्यात होते. पण सर्वात शेवटीचा हार जो होता तो रमाईंचा होता. तत्कालीन जनता पत्राचे संपादक श्री बापुसाहेब सहस्त्रबुद्धे (मनुस्मृती जाळणारा एकमेव ब्राह्मण) ह्यांनी त्यावेळच्या रमाईंच्या ज्या आठवणी टिपल्या आहेत, त्या महत्वाच्या आहेत. त्यांनी रमाईंना दोन प्रश्नांवर बोलायला सांगितलं 


१ त्यांनी बाबासाहेबांना सर्वात शेवटी हार का घातला?

२ हार घातल्यावर त्या बाबासाहेबांच्या पायाकडे का पाहत होत्या? (इतर सर्वजण बाबासाहेबांच्या चेहऱ्याकडे पाहत होते)


तसं त्यांना सभेत बोलायची सवय नव्हतीच. यापूर्वी त्या एकदाच बोलल्या होत्या. त्यामुळे त्या गडबडल्या खऱ्या पण बोलायला उभारल्यावर त्यांनी जे काही उत्तर दिलंय, ते चिंतनीय आहे. त्या म्हणाल्या...


१. बाबासाहेबांचं दर्शन सर्वसामान्यांना कधीकाळीच होत होते म्हणून त्या सर्वांना मी ती संधी प्राप्त व्हावी म्हणून मी सर्वात शेवटी हार घातला...


२. माझ्या पतिराजांनी ज्या गोरगरीबांच्या, दीन-दलितांच्या उद्धाराचे कंकण बांधलं आहे, त्यांची मी धर्मपत्नी आहे, म्हणून त्या कंकणांस कुणाची दृष्ट लागु नये म्हणून मी त्यांच्या चरणांकडे पाहत होते...


खरंतर ह्यावर अधिक काही लिहावं ह्याची आवश्यकता नाही पण तरीही शीर्षकातल्या दोन शब्दांसाठी आणखी विवेचन


बिनमरणाचा नवरा...


रमाईंनी लहानपणी आईवडिलांकडून भगवान शंकर-पार्वतीची कथी ऐकली होती. पार्वतीमातेने 'बिनमरणाचा नवरा हवा' असा अट्टाहास धरला. आता असा नवरा घोर तपाशिवाय, उपासनेशिवाय कुणाला मिळणार? कोण असणार भगवान शंकराशिवाय? म्हणून तिच्या आईने सांगितल्यानुसार तिने त्याचीच आराधना केली. ह्या कथेचा माता रमाईंच्या मनावरही परिणाम झाला व त्यांनी त्यांच्या आईला विचारलं की मला असा बिनमरणाचा नवरा मिळेल काय?आईने तेच उत्तर दिलं की,


"पार्वतीसारखे कष्ट उपसून तप करावं लागेल."


ह्यावर माता रमाई उत्तरल्या की


*"मग मी करीन तप व भोगील हालअपेष्टा ! काढीन मी उपासतपास व मिळवीन मी 'बिनमरणाचा नवरा'!"*


हा प्रसंग का सांगितला???


पतिनिष्ठा काय असते हे आजच्या आपल्या सगळ्या पिढींस तर कळावंच पण धर्मनिष्ठाही कळावी...


ह्या महान स्त्रींस आयुष्य तसं अल्प लाभलं. जर त्या आणखी जगत्या तर कदाचित पुढच्या काही धर्मांतरासारख्या गोष्टी घडल्या नसत्या...


जाता जाता...


माता रमाईंना आमच्या पंढरपूरच्या श्रीविठ्ठलाचे दर्शन घ्यायची फार इच्छा होती पण बाबासाहेबांनी ते घेऊ दिलं नाही. धनंजय कीरांनी त्यावर लिहिलं आहे. असो...


तरीही त्या दोघांच्या चरणी अभिवादन...


माता रमाईंस विशेष अभिवादन...


भवदीय...


पाखण्ड खण्डिणी 

Pakhandkhandinee.blogspot.com


#माता_रमाई_आंबेडकर_जयंती_पार्वतीशंकर_धर्मनिष्ठा

Sunday 6 February 2022

वेत्ति पारं सरस्वत्या लतानाम गानसरस्वती।

 



वेत्ति पारं सरस्वत्या लतानाम गानसरस्वती।

लतानाम गानसरस्वत्याः पारं वेत्ति सरस्वती।


श्रीमधुसूदन सरस्वतींची क्षमायाचना करून आज म्हणावंसं वाटतं की


श्रीसरस्वतीची थोरवी गानसरस्वती लतादीदींच जाणतात व गानसरस्वती लतादीदींची थोरवी प्रत्यक्ष श्रीसरस्वतीच जाणते....

 

दीपावलीच्या भल्या पहाटे उठावं व अभ्यंगस्नान उरकून सूर्योदयापर्यंत गायत्री करत संध्याही उरकून घ्यावी व प्रा. राम शेवाळकरांचं 'ज्ञानदेव म्हणे' ऐकायला घ्यावं. 'ॐ नमोजी आद्याच्या' आरंभीचे त्यांचे चिंतन श्रवण करून गानसरस्वतीच्या (...इथे माझी लेखणी खरी थांबली होती कारण पुढचे शब्द काहीच सुचत नव्हते) अधरामृतातून कैवल्यचक्रवर्ती संतश्रेष्ठ श्रीज्ञानोबारायांच्या भावार्थदीपिकेच्या त्या अद्वितीय मंगलाचरणाचे ते तीन शब्द ऐकण्यासाठी जणु कर्णांच्या ठायीं सर्व शक्ती एकवटाव्यात. परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीसाठी व्याकुळ झालेल्या जीवात्म्याची कोकिळेच्या आर्तस्वरांनी आरंभ झालेली ती अभंगावली, त्या सावळ्यासुंदर कासेपीतांबरु श्रीविठ्ठलाच्या दर्शनासाठी अभिभावित होत, ह्रदयरुपी भुंग्याने प्रकट केलेल्या गुंजारवाने ऋणुझणु करत विश्वाचें आर्त मनी प्रकटत, तो सोनियाचा दिवस जणु पाहत, वृत्तीची निवृत्ती आपणां सकट होत अवघेचिं वैकुंठ जणु चतुर्भूज होत नि अंती सौभाग्यसुंदरु अशा त्या बापरखुमादेवीवरुच्या साक्षात्काराने त्या आत्मतत्वाचा तो मोगरा फुलंत फुलंत अंती त्या विश्वेश्वरांस तोषविण्यासाठी त्या श्रीमाऊलींने ते पसायदान मागत तो वाग्यज्ञ सुसंपन्न करींत त्या विश्वस्वधर्मसूर्याचे दर्शन घडवावं....


शब्दसृष्टीचा जणु ईश्वरंच अशा त्या श्रीज्ञानराज माऊलीने आत्मानुभूतीने शब्दब्रह्मामध्ये संबद्ध केलेली ही अभंगरचना ज्या शब्दांतही न मांडता येणाऱ्या दिव्यानुभूतीचा संस्पर्श श्रोत्यांस घडविते, ती ज्या गानसरस्वतीने गायिलीं तिचं वर्णन म्या पामराने काय करावं??? आजपासून ती प्रत्यक्ष त्या आळन्दीवल्लभ श्रीज्ञानेशासंच तो सर्व अभंगनाद ऐकवंत नसेल कशावरून???




शिवकल्याण राजा...


तीनशे वर्षे! तीनशे वर्षे महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंधःकारांत चाचपडंत होता....


मला सव्वाशे वर्षांचे आयुष्य हवंय, शिवचरित्र ब्रह्मांडापल्याड नेण्यासाठी म्हणत आयुष्याची १०० वर्षे शिवचरित्राचा पोत नाचवत जो गोंधळी नुकताच शिवलोकांस आपल्या आराध्य दैवतांस कायमचं भेटण्यासाठी कैलासगमन करता झाला, त्यांच्या उपरोक्त धीरगंभीर निवेदनाने श्रोत्यांच्या कर्णीं जणु सर्व प्राण एकवटावेंत नि हिंदुपदपातशाह हिंदवीस्वराज्यसंस्थापक श्रीशिवप्रभुंच्या चरित्राचे जणु सारंच असे 'प्राणीमात्र जालें दुःखी पासून ते शिवकल्याण राजा'पर्यंत असलेलं ११ गीतांचं ते ध्वनिमुद्रित शिवभारत ज्या गानसम्राज्ञीच्या स्वरांनी आरंभ होतं नि अंतही पावतं, ते ऐकत असताना तिच्या मुखातून ऐकलेल्या अन्य सहस्त्रावधी गीतांचा विसरही आपणांस पडल्याशिवाय राहणारही नाही इतके माधुर्य तींमध्ये आहे...ह्यात काही अत्युक्ती वाटावीं असे आह्मांस तरी वाटत नाही...!




जयोस्तुते...


स्वातंत्र्याच्या सूर्याची ती आरती ज्या महाकवी अशा प्रत्यक्ष कविकुलगुरुचा वारसा चालविणाऱ्या क्रांतिसूर्याच्या लेखणीतून उदयांस आली, ते स्वतंत्रतेचे महन्मंगल स्तोत्र जिच्या मुखांतून स्वरबद्ध झालं, त्या गानकोकिळेचा तो स्वर आज स्वर्गी त्या हिंदुराष्ट्रपतींसही तृप्त करत नसेल कशावरून???


ने मजसीं नें...


मातृभूमीच्या विरहाने ओथंबलेले ते सागरसूक्त ज्या मातृभक्त विनायकाच्या शब्दप्रतिभेचा सर्वोत्तम आविष्कार ठरलं, ती मातृवंदना ज्या दीदींनी भावंडासमवेत गायिलीं, ती दीदी आज नसली तरी त्या गीताने ती अमर आहेच...


भेटीं लागें जीवा लागलीसें आस...


जिच्या अधरद्वयांतून लक्षावधी सूर गेली ९ दशके प्रकटली आहेत, तिने गायिलेल्या असंख्य गीतांचे चिंतन करण्यासाठी सरस्वतीच्या लेखणीतली शाईही संपावी, अशा त्या स्वरसम्राज्ञीने ही आयुष्यभर केलेली स्वरसाधनाही त्या अनंताच्या भेटीसाठीच असावी. *संतश्रेष्ठ जगद्गुरु श्रीतुकोबारायांच्या आत्मानंदपरिप्लुत अभंगसमुद्रांतली ही   त्यांच्या उपास्यदेवतेच्या प्राप्तीसाठी असलेली विरहोत्कटतेची परिसीमा गाठणारी रचना ऐकताना ती गाणारीही जो जीव ओतून ती गातें, ते श्रवण करून आज तिची तीं आर्तता त्या श्रीविठ्ठलापर्यंत पोहोचलीं व त्याने तिला त्याच्या..*


सुंदर ते ध्यान उभे विटेंवरी...


अशा सगुण रुपाचे दर्शन तेच तिचें सर्वसुख बनवलं.....


ती लता आज मूक्त जाहलीं....


तिच्या असंख्य श्रवणीय नि तितक्यांच चिंतनीय गीतांमधल्या आह्मांस आमच्या व्यक्तिगत जीवानमध्ये सर्वांत जास्त भावलेल्या स्वराविष्कारांविषयीची आमची ही शब्दरुप भावांजली...


भवदीय


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com

 #लतामंगेशकर_श्रीविठ्ठल_श्रीज्ञानेश्वरमाऊली_श्रीतुकोबाराय_छत्रपतिशिवाजीमहाराज_सावरकर_बाबासाहेबपुरंदरे