Monday 22 June 2020

स्त्रियांचा वेदाधिकार, यज्ञोपवीताधिकार नि गायत्री मंत्राधिकार - आक्षेप नि खंडन


वैदिक स्त्री-दर्शन लेखांक पंचम

आमच्या स्त्रियांचा वेदाधिकार, यज्ञोपवीताधिकार नि गायत्री मंत्राधिकार ह्या लेखांवर आह्मीं दिलेल्या आह्वानाला आमच्या काही सनातनी विद्वान मंडळीकडून प्रतिवाद प्राप्त झालेला आहे, त्याविषयी आह्मीं त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. आमच्यासारख्या एका यःकश्चित मनुष्याचे लेख त्यांनी एवढे मनावर घ्यावेत हा त्यांचा आमच्यावरचा स्नेह नि अनुरागंच मानतो आह्मीं. आणि म्हणूनंच त्यांनी केलेल्या प्रतिवादाची नि आक्षेपांची समीक्षा करण्यासाठी नि त्यांना वेदसंमत उत्तर देण्यासाठी आमचा हा लेखनप्रपंच...!ह्यात कुठेही त्यांचा अनादर करण्याचा हेतु नाही किंवा आह्मांला खूप कळतं असे दर्शविण्याचाही हेतु नाही. हा सरळ संवाद आहे.

*धर्म जिज्ञासमानानां प्रमाणं परमं श्रुतिः।*

हे वचन मनुस्मृतीचं असलं तरी हे सर्व परंपरांमध्ये सर्वमान्य आहे. *ज्याला वैदिक हिंदु धर्मशास्त्राचे प्रामाणिक अध्ययन करायचं आहे, त्याला श्रुती अर्थात वेदांशिवाय अन्य कोणताच मार्ग नाही. नान्यः पन्था विद्यतेऽयनाय ॥ ( यजुर्वेदः ३१-१८)।* ज्यांना अधिक प्रमाण आवश्यक आहे, त्यांनी मनुस्मृतीवरील दहा संस्कृत टीकाकारांच्या टीका तरी अभ्यासाव्यांत. त्यातल्या ९ तरी भारतीय विद्या भवनने प्रकाशित केल्याहेत, ज्या पीडीएफ आंतरजालांवर उपलब्ध आहेत. केवल एका श्रीकुल्लुकभट्टांची टीका पाहुयांत...

 *धर्मं च ज्ञातुमिच्छन्तां प्रकृष्टं प्रमाणं श्रुतिः। प्रकर्षबोधननेच स्मृतिस्मृतिविरोधे स्मृत्यर्थो नादरणीयः इति भावः।* 

*म्हणजे धर्म जाणण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी श्रुति अर्थात वेदंच सर्वोत्तम आहे. जर श्रुति नि स्मृतींमध्ये कुठे विरोध जाणवला तर स्मृतींचा अर्थ आदरणीय नाही अर्थात तो त्याज्य आहे. म्हणजेच अशावेळी श्रुतीच प्रमाण आहे. म्हणजेच स्मृतींपेक्षा श्रुतीच सर्वोच्च प्रमाण आहे.*

पुढे ह्याच श्रीकुल्लुकभट्टांनी प्रमाण सादर केलेलं आहे, ते श्रीजाबालोपनिषदांतलं. ते म्हणतात 

*अतएव जाबालः*-----
*श्रुतिस्मृतिविरोधे तु श्रुतिरेव गरीयसी।*

*जाबाल ऋषि म्हणतात की श्रुति नि स्मृतींच्या परस्परविरोधामध्ये श्रुतीच श्रेष्ठ नि प्रमाण आहे.*

आमच्या एका उपरोक्त श्रीमनुमहाराजांच्या वचनाच्या शीर्षकाधारित लेखामध्ये आमच्या ह्या श्रुतीमान्यतेची व्याख्या आह्मीं स्पष्ट केलेली आहे. जिज्ञासूंनी ती

http://pakhandkhandinee.blogspot.com/2019/10/blog-post_9.html?m=1

इथे अभ्यासावी ही नम्रतेची विनंती! 

वास्तविक आमच्या *पुराकल्पेषु तु नारीणां* ह्या श्लोकातंच आह्मीं कल्प शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. हे जे लोक त्याचा इतिहासपरक असा मागील कल्पातला अर्थ घेतात, त्यांचा तो अर्थ चुकीचा आहे हे आह्मीं सप्रमाण सिद्ध केलंय तेही अनेक प्रमाणांनी. आता त्यांचा हा इतिहासपरक अर्थ क्षणभर प्रमाण जरी मानला तरी त्यातून पूर्वी तो वेदाधिकार स्त्रियांना होता हेच स्पष्ट होते. आता तो अधिकार होता ह्याचाच अर्थ असा श्लोक रचणाऱ्यांना धर्मशास्त्राचे यथोचित ज्ञान होते हे अभिप्रेत आहेच. पुराकल्पेषु ह्याचा अर्थ मागील कल्पांत तो होता असा क्षणभर अर्थ घेतला तरी ह्याचा अर्थ हाच आहे की मागील कल्पांत तसा वेदमंत्र असायलाच हवा...!कारण वेदमंत्राच्या अर्थात श्रुतीच्या आधाराशिवाय असा अधिकार कसा असेल???

आणि हा जगन्मान्य सिद्धांत आहे की आज आपल्याला उपलब्ध असलेले वेद हे मागील कल्पांतलेच वेद आहेत. कारण आमच्या नित्याच्या संध्येमध्ये आह्मीं जो ऋग्वेदांतला मंत्र आसेतुहिमाचल म्हणतो तो असा

*सू॒र्या॒चं॒द्र॒मसौ॑ धा॒ता य॑थापू॒र्वम॑कल्पयत् । दिवं॑ च पृथि॒वीं चां॒तरि॑क्ष॒मथो॒ स्वः॑ ॥*
ऋग्वेद - १०।१९०।३

ह्या ऋग्वेदवचनानुसार ईश्वर अर्थात तो धाता गतकल्पात जशी सूर्यचंद्रपृथिव्यादि सृष्टी निर्माण करतो, तशी ती ह्या कल्पातही आहे तशीच करतो. आणि त्या कल्पातले वेदही त्याच अनुपूर्वीसहित ह्याच कल्पात आहे तसे प्रकट होतात. म्हणजेच आजचे वेद तर मागील कल्पांत जे होते, ते आहे तसेच ह्या कल्पांतही प्राप्त आहेत. म्हणजेच ह्या आज आपणां सर्वांस उपलब्ध असलेल्या वेदांनाच प्रमाण मानणं आपल्या सर्वांना क्रमप्राप्त आहे. ह्याविषयी संदेह असण्याचे काहीच कारण नाही.

जर त्याच कल्पातले वेद ह्या कल्पांतही आहे तसेच प्रकट झाले आहेत, तर ह्या वेदांमध्येच स्त्रियांचा वेदाधिकार सिद्ध करणारे मंत्र असलेच पाहिजेत. 

इथे जाता जाता एक स्मरण 

*आमच्या उपरोक्त *पुराकल्पेषु तु नारीणां श्लोकावरील लेखांवर संवाद करताना एकाने तो श्लोकंच प्रक्षिप्त आहे असे अतिसाहसी विधान केलं. म्हणजे एरवी प्रक्षेप शब्द उच्चारला की ईंगळी डसल्याचा अनुभव करणारे हे लोक सोयीस्कर कशी प्रक्षेप संकल्पना स्वीकारतात ते पहा.*

*आणि हो काही ठिकाणी हा श्लोक पुराकल्पेषुच्या ऐवजी पुरायुगेषु असाही आला आहे. वाटल्यास यावर सविस्तर पुन्हा येईन.*

अस्तु। 

आता स्त्रियांना वेदाधिकार नाकारणाऱ्या ह्या स्वतःस सनातनी म्हणविणाऱ्या आक्षेपकांचा वैचारिक गोंधळ पहा...प्रस्तुत लेखक अर्थात आह्मींही सनातनीच आहोत परंतु काही प्रामाणिक मतभेद आहेत इतकंच. आता ह्यांच्याह्यांच्यातंच ह्या विषयांत किती मतभेद आहेत ते पहावे ही विनंती...!

*एक जण म्हणतो स्त्रियांना मूळीच वेदाधिकार नाही. दुसरा म्हणतो वेदकालीन ऋषिकांनाच तो केवल अधिकार होता की ज्या अत्यंत अधिकारी होत्या. तिसरा म्हणतो की हारित धर्मसूत्रानुसार (२१।२०।२४) ब्रह्मवादिनी नि सद्योवधु असे स्त्रियांचे दोन प्रकार असून केवळ ब्रह्मवादिनी स्त्रियांनाच तो अधिकार आहे. सद्योवधुंना तो नाही. इथे ब्रह्मवादिनी म्हणजे आजीवन अखंड ब्रह्मचर्य पालन करणाऱ्या नि वेदाध्ययन करणाऱ्या स्त्रिया. आणि सद्योवधु म्हणजे विवाहसंस्कार करणाऱ्या गृहस्थाश्रमी स्त्रिया. असे ह्यांचे मत आहे. वास्तव काय ते आपण पुढे पाहुच. चौथा असे म्हणतो की उर्वशी आदि अधिकारी स्त्रियांनाच केवळ एकदेशी अधिकार आहे. आता एकदेशी काय हे त्यांचे त्यांनाच ज्ञात. पांचवा म्हणतो की मैत्रेयी आदि स्त्रिया केवल ब्रह्मचिंतनापूरताच अधिकारी होत्या, त्यांनाही वेदाधिकार नव्हता. सहावा म्हणतो विवाहापश्चात स्त्रियांना केवळ काही विशिष्ट मंत्र म्हणण्याचाच अधिकार प्राप्त होतो. पूर्ण वेदांचा अधिकार त्यांना नाही ह्मणें. सातवा म्हणतो आमच्या गुरुचरित्रांत वेदाधिकार नाकारलाय म्हणें. आठवा म्हणतो विवाह हेच स्त्रीचं उपनयन आहे म्हणे. नववा म्हणतो विवाहवेळी यज्ञोपवीताचा अधिकार प्राप्त होतो तो केवळ पतींबरोबर दैनिक नित्य यज्ञ करण्यासाठी. दहावा म्हणतो नाही ते यज्ञोपवीत नसून ते यज्ञोपवीतासारखे वस्त्र नेसतात.*

आता जर ह्यांच्याच मतानुसार स्त्रीला उपनयनाचाच अधिकार नाही, तर तिचा विवाहतरी तिचं उपनयनंच कसं काय सिद्ध होऊ शकतं??? किती गोंधळंय पहा.

आता असे पहा की हे लोक उपनिषदांनाही अपौरुषेय वेद मानतात. मन्त्रब्राह्मणयोर्वेदनामधेयं म्हणे. ह्याची तर्ककठोर समीक्षा आह्मीं आमच्या वेदपरिचय चिंतनमालेमध्ये केलीच आहे. लेखमालाही आधी लिहिली आहे. पुढेही करुच पण तो स्वतंत्र विषय आहे. अस्तु। 

*ब्राह्मणग्रंथ-उपनिषदं-आरण्यकांमध्ये वेदमंत्रांचेच भाष्य आहे. आणि स्त्रियांना जर वेदाधिकार नाहीच, तर मग उपनिषदांमध्ये काही स्त्रिया वेदमंत्रोच्चारण करताना कशा काय दिसतात???*

तर ह्यावर ह्या लोकांचे उत्तर वर पांचव्यात दिलंय. हे त्यांचे उत्तर आहे, आमचं नाही.

*ह्यावरूनंच ह्या स्वतःला सनातनी म्हणविणाऱ्यांमध्येच स्त्रियांच्या वेदाधिकारांविषयी कशी एकवाक्यता नाही हे लक्ष्यीं येते...!*

ह्यात कुठेही ह्या लोकांचा अवमान करण्याचा हेतु नाही...!

आता हे ह्यांचे असे वर्तन का होते???

ह्याचे कारण एकंच आहे की हे लोक स्वतःला नुसतंच वेदप्रामाण्यवादी म्हणून मिरवितात परंतु प्रमाण मानताना हे मधील काळांत निर्माण झालेल्या प्रक्षेपांना प्रमाण मानतात जिथे हा निषेध सांगितलेला असतो. आता हे प्रक्षेप कशावरून ते आह्मीं पुढे येणारंच आहोत. पण जेंव्हा आह्मी ह्यांस विचारतो की स्त्रियांचा वेदाधिकार नाकारणारा एक तरी मंत्र वेदांच्या संहितांमध्ये दाखवा. तर ह्यातल्या एकालाही वेदमंत्रांचे सादरीकरण अद्याप एकदाही करता आलेलं नाही नि येणारही नाही.

गेली तीन वर्षे आह्मीं एकंच प्रश्न ह्या सर्वांना विचारत आलो आहोत की 

*स्त्रियांना वेदाधिकार नाकारणारा असा निषेधात्मक एकतरी वेदमंत्र आह्मांस चारवेदांच्या संहितांमध्ये दाखवा...*

*गेल्या तीन वर्षांत एकालाही हा मंत्र अद्याप सादर करता आलेला नाही.*

*तीनंच नव्हे तर गेली दीडशे वर्षे आर्यसमाजाच्या वतीने ह्या कथित सनातनी विद्वानांना हा प्रश्न विचारण्यांत आलेला असूनही ह्या दीडशे वर्षांत एकालाही असा मंत्र सादर करता आलेला नाही.*

*कारण कारण कारण...*

*असा एकही निषेधात्मक मंत्र वेदांच्या संहितांमध्ये नाहीच नाही. अहो असला तर सादर करणार ना???*

*जे नाहीच ते दाखवणार तरी कुठून?*

*आणि म्हणून हे लोक आधार घेतात ते परवर्ती प्रक्षेपयुक्त स्मृतींचा. की ज्या वेदबाह्य असल्याने त्याज्य आहेत. ज्या मनुस्मृतीला हे अगदी प्रमाण मानतात, अगदी प्रक्षेपरहित मानतात, त्याच मनुस्मृतीमध्ये*

*या वेदबाह्याः स्मृतयः याश्च काश्च कुदृष्टयः।*

असे वचन आहे. म्हणजेच ज्या स्मृत्या वेदविरुद्ध आहेत, त्या त्याज्य आहेत असे स्पष्ट मांडलं आहे. ह्या स्मृतीसंदर्भांवर आह्मीं ह्या लेखमालेत स्वतंत्र येणारंच आहोत. पण तत्पूर्वी...

आता ह्यावर हे लोक आह्मांस आवाहन करतात की मग वेदमंत्रांमध्येच स्त्रियांना वेदाधिकार आहे हे दाखविणारा एकतरी मंत्र सादर करा. तर ह्या लोकांच्या ह्या आज्ञेंस ह्मणा की आह्वानांस ह्मणां मान्य करून आता आह्मीं वेदमंत्रांतलेच स्त्रियांचा वेदाधिकार, यज्ञोपवीताधिकार नि गायत्र्यादि मंत्राधिकार सिद्ध करणारे प्रमाण सादर करणाराहोत. आज सायंकाळपासून लेख येतीलंच.

ह्या आगामी लेखमालेत आह्मीं निम्नलिखित संदर्भ सादर करणाराहोत 

लेखांक क्रमांक ६ - वेदमंत्रांच्या आधारे वेदाधिकार, यज्ञोपवीताधिकार, गायत्रीमंत्राधिकार 

लेखांक क्रमांक ७ - ब्राह्मणग्रंथ-उपनिषदं-आरण्यकांच्या आधारे...

लेखांक क्रमांक ८ - वेदाङ्गे, षट्दर्शने ह्यांच्या आधारे

लेखांक क्रमांक ९ - श्रौतसुत्रं, गृह्यसूत्रांच्या आधारे 

लेखांक क्रमांक १० - स्मृतिविमर्श 

लेखांक क्रमांक ११ - रामायण-महाभारत-पुराणादि नि अन्य ऐतिह्य संदर्भांच्या आधारे 

लेखांक क्रमांक १२ - उपरोक्त सर्व लेखांवरील शंका समाधान नि समारोप 

अशा प्रकारे ही लेखमाला येणार आहे.

हे सर्व लिहिण्याचा उद्देश्य किंवा अट्टाहास हा कुणाची निंदा करण्याचा मूळीच नाही. सत्यशोधन व्हावं हा हेतु आहे.

भवदीय...

पाखण्ड खण्डिणी 
Pakhandkhandinee.blogspot.com

#स्त्रियांचा_वेदाधिकार_यज्ञोपवीताधिकार_गायत्री_मंत्राधिकार_उपनयन_वेदश्रुतिस्मृतिविमर्श

Sunday 7 June 2020

श्रीशिवराज्याभिषेकांतल्या 'सोमो अस्माकं ब्राह्मणानां राजा' ह्या मंत्राच्या अर्थाचे स्पष्टीकरण...


सांप्रत समाजमाध्यमांवर श्रीशिवराज्याभिषेक प्रयोगातल्या एका मंत्राचा विकृत अर्थ प्रसृत करून आपला छुपा ब्राह्मणद्वेष रेटला जातोय. त्यासाठी हे स्पष्टीकरण !

उपरोक्त मंत्र हा यजुर्वेदाच्या ९व्या अध्यायांतला अंतिम असा ४० वा मंत्र असून त्याच्या चुकीच्या मराठी अनुवादाचे एक छायाचित्र प्रसृत करून हा द्वेष रेटला जातो आहे. सर्वप्रथम तो निम्नलिखित मंत्र काय आहे ते पाहुयांत.


*ॐ इ॒मन्दे॑वा ऽअसुप॒त्नᳯ सु॑वध्वम्मह॒ते क्ष॒त्राय॑ मह॒ते ज्यै॑ष्ठ्याय मह॒ते जान॑राज्या॒येन्द्र॑य॑ । इ॒मम॒मुष्य॑ पु॒त्रम॒मुष्यै॑ पु॒त्रमस्यै वि॒शऽए॒ष वो॑मी॒ राजा॒ सोमो॒ स्माक॑म्ब्राह्म॒णाना॒ राजा॑ ॥*
 
यजुर्वेद ९।४०

ह्या मंत्राचा जो अर्थ त्या चित्रामध्ये दिलेला आहे तो चुकीचा तर आहेच कारण तिथे 'सोमो अस्माकं ब्राह्मणांना राजा' असा एवढाच अर्धवट संदर्भ घेऊन 'सोम हाच आह्मां ब्राह्मणांचा राजा' असा विकृतार्थ काढलेला आहे. वास्तविक पूर्ण मंत्र किती मोठा आहे हे सर्वांस आता कळलंच असेल. आता त्या मंत्राचा शब्दशः अर्थ पाहुयांत 

*महते क्षत्राय ज्यैष्ठ्याय महते जानराज्याय - महान क्षात्रबलासाठी, महान अशा राज्यपदासाठी, महान अशा जनसंख्येंवर राज्य करण्यासाठी*

*इन्द्रस्य इन्द्रियाय, देवाः असपत्नम् इमम् सुवध्वम् - परम् ऐश्वर्यवान इंद्र अर्थात राजाच्या ऐश्वर्यप्राप्तीसाठी, देवगण शत्रुरहित ह्या योग्यपुरुषांस अभिषिक्त करोत*

*इमं अमुष्य पुत्रं अमुष्यै पुत्रं अस्यै विशे - ह्या पित्याचा हा पुत्र, ह्या अमुक मातेचा पुत्र, ह्या प्रजेसाठी (त्याचा) राज्याभिषेक केला जात आहे.*

*अमी - हे अमुक अमुक राजे लोकहो, प्रजे लोकहो*

*वः एषः राजाः सोमः - आमचा आह्मां सर्वांचा हा राजा सोमाच्या समान पवित्र आहे*

*(सः) अऽस्माकं ब्राह्मणानां राजा - तो आह्मां ब्राह्मणांचाही राजा आहे*

आता हाच मंत्र श्रीगागाभट्टांच्या पोथीमध्ये आहे तसा दिला असून तिथे पुढे 

*अत्र सर्वनामस्थाने राजनाम तत्पितृनाम् तन्मातृनाम् गृण्हीयात्*

म्हणजे उपरोक्त मंत्रामध्ये अमुक अमुकच्या ठिकाणी श्रीशिवाजी महाराजांचे, त्यांच्या पिताश्रींचे, त्यांच्या मातुःश्रींचे नाव उच्चारावं असे म्हटलंय.

त्यामुळे इथं सोम ही संज्ञा प्रत्यक्ष राजाला अर्थात श्रीशिवछत्रपतींना वापरली असून तेच आह्मां सर्व ब्राह्मणांचे राजे आहेत असं स्पष्ट विवेचन आहे. परंतु मराठी अनुवादकर्त्याने सोम हाच आमचा राजा आहे असे विकृत अर्थ केला आहे. अनुवादक कोण आहेत ते आह्मांस ज्ञात नाही.

*आता काहींना हा आह्मीं दिलेला मंत्रार्थ खोटा वाटेल त्यांच्यासाठी स्वतः ज्येष्ठ इतिहासकार वा सी बेंद्रेंचा अनुवाद पाहुयांत*

पृथ्वीवरचे साक्षात् तत्कालीन कलियुगीचे ब्रह्मदेव असे वर्णन ज्यांचे केलं केलं, त्या वेदमूर्ती श्रीगागाभट्टांनी जी श्रीशिवराज्याभिषेकाची पोथी रचली, त्याचे प्रथम प्रकाशन आधुनिक काळामध्ये फेब्रुवारी १९६० मध्ये श्री वा सी बेंद्रेंनी संपादनरुपी केलं. त्याला ५९ पृष्ठांची त्यांची प्रस्तावना असून त्यातंच ह्या मंत्राचे स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे ते पाहूयांत. हा १४१ पृष्ठांचा ग्रंथ आज पूर्ण पीडीएफ आहे. कुणीही अभ्यासु शकता.



आता ज्येष्ठ इतिहासकार श्री वासुदेव सीताराम बेंद्रेंनी पृष्ठाङ्क ४९ व ५० वर ह्या मंत्राचा काय अर्थ केलाय ते पहा....

*Then they took him to the bathing hall saying..'महते क्षत्राय...' Thus making him the king of Brahmins*

म्हणजे *त्या पुरोहितांनी त्यांना (श्रीशिवछत्रपतींना अवभृत स्नानासाठी) स्नानगृहाकडे नेताना तो मंत्र म्हटला व सर्व ब्राह्मणांचा त्यांना राजा केला.*

पुढे हेच बेंद्रे म्हणतात की

*Thus by this special bath, they accepted Shivaji Maharaj as the king of all including the Brahmins.*

 *"ह्या विशेष स्नानाने ते शिवाजी महाराज हे त्या सर्वांचेच ज्यांत ब्राह्मणसुद्धा आले, त्यांचे सुद्धा राजेच झाले."*

म्हणजेच बेंद्रेंच्या इंग्रजी अनुवादानुसार महाराजांना ब्राह्मणांनीसुद्धा आपला राजाच आनंदाने स्वीकारलं आहे.

पण सांप्रत समाजमाध्यमांवर प्रसृत होत असलेल्या मराठी अनुवादाच्या पृष्ठांवर मात्र चुकीचा अर्थ दिला आहे. म्हणजेच मराठी अनुवाद चुकलेला असून उपरोक्त आह्मीं दिलेला अर्थ व श्री बेंद्रेंचा अर्थ दोन्ही एकंच आहेत.

*आणि हो जाता जाता...*

*एरवी हेच वा सी बेंद्रे श्रीशंभुछत्रपतींच्या चरित्रासाठी ह्या आक्षेपकांना प्रमाण असतात बरंका. आता मात्र कदाचित सोयीस्कर अप्रमाण ठरतील. कारण ब्राह्मणद्वेष....!*

ज्यांना आणखी अतंरंगात जाऊन पहायचं आहे, त्यांनी वेदमहर्षी श्रीपाद दामोदर सातवळेकरांनी केलेला हिंदी अर्थ पहावा ही विनंती. महर्षि दयानंद सरस्वति ह्यांनी दीडशे वर्षांपूर्वीच करून ठेवलेला अर्थही पहावा ही विनंती. हे सर्व संदर्भ आह्मीं सोबत जोडलेच आहेत. जिज्ञासूंनी पहावेत ही नम्रतेची विनंती.




*अशाप्रकारे महाराष्ट्रांत जातीयवदाचे विष पेरणार्या विकृत लोकांपासून आपण सर्व शिवभक्तांनी सावध रहावे ही नम्रतेची विनंती...!*

तरीही ज्यांना खाजंच आहे, त्यांना आमचं उघड आह्वान आहे की शास्त्रार्थ करावा...!

भवदीय,

पाखण्ड खण्डिणी 
Pakhandkhandinee.blogspot.com 

#शिवराज्याभिषेकप्रयोग_मंत्रार्थ_ब्राह्मणद्वेष_वासीबेंद्रे_श्रीगागाभट्ट

Friday 5 June 2020

महायोगी महर्षि श्रीअरविंदांचे सावित्री नावाचे महाकाव्य



आज वटपौर्णिमा अर्थात सावित्री पौर्णिमा...! सत्यवान नि सावित्रीची कथा सर्वांना ज्ञात आहेच. ह्या कथेवर चोवीस सहस्त्र ओळींचं आङ्ग्ल भाषेंतले जगांतलं सर्वात मोठं महाकाव्य रचणार्या महर्षि महायोगी श्रीअरविंदांविषयी नि त्या सावित्री नामक कवितेविषयी हा लेखनप्रपंच!

साक्षात् सरस्वतीच ज्यांच्या जिव्हाग्रांवर नांदत होती, अशा प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांच्या महायोगी अरविंद ह्या ध्वनिफीतीचे श्रवण ज्यांनी केलं असेल नि त्यांनीच लिहिलेलं महर्षींचे चरित्र ज्यांनी अभ्यासलं असेल, त्यांना महर्षि अरविंद हे महान व्यक्तिमत्व ज्ञात असेलंच. मागे आह्मीं त्यांच्यावर एक लेखही लिहिला आहे विस्ताराने. महर्षि महायोगी श्रीअरविंदांची चार तपांची साधना म्हणजे हे महाकाव्य आहे.

*महर्षि हे वेदभाष्यकार होते. निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त केलेल्या ह्या व्यक्तित्वाने 'वेदरहस्य' नामक ग्रंथामध्ये वेदांविषयी केलेलं चिंतन ज्यांनी अभ्यासले असेल, त्यांना महर्षींच्या 'ऋषयो मन्त्रद्रष्टारः' ह्या निरुक्तकारांच्या वचनसाक्षित्वाची प्रचिती आलीच असेल. सावित्री नि सत्यवानाच्या ह्या उपाख्यानाचा महायोगी श्रीअरविंदांनी लावलेला यौगिक अर्थ नि त्यातून त्यांनी केलेले हे महाकाव्य हे आङ्ग्ल भाषेंतले एक अद्वितीय लेणं आहे असे म्हटल्यांस अत्युक्ती ठरणार नाही.*

*आपल्या चार तपांच्या अध्यात्मसाधनेने तपःपूत अशा महर्षींच्या साहित्यातली त्यांची अतिमानसाची संकल्पना, त्या अतिमानसाच्या संकल्पनेचे त्यांनी केलेले विवरण, त्यातूनंच पृथ्वीवरंच स्वर्ग निर्माण करण्याची त्यांची मनिषा हे सर्व अक्षरशः चिंतनीय आहे, विलोभनीय आहे.* 

*महर्षींच्या सावित्रीची मूलकथा*

महर्षि हे वैदिक साहित्याचे भाष्यकार होते. *त्यांच्या स्वतःच्या साधनेने त्यांस प्राप्त झालेल्या सिद्धी नि त्यामुळे त्यांच्या अंतःकरणांमध्ये विश्वाच्या गुढ रहस्येविषयी निर्माण झालेली उत्कंठा, अनेक गूढविद्यांचा त्यांना झालेला साक्षात्कार नि त्याविषयीचं चिंतन, त्यांची अतिमानवी शक्तींवरची दृढ विश्वासार्हता, वैदिक तत्त्वज्ञानाचे प्रकटीकरण, मानवाच्या उत्पत्तीपासून नि अद्यापपावेतोचा त्याच्या उत्क्रांतीचा इतिहास, देवदेवता नेमक्या काय आहेत ह्याविषयीचे प्रकटीकरण, चराचर सृष्टीची उत्पत्ती-स्थिती नि प्रलयाविषयीचे चिंतन, सभोवतालचा हा रम्य असा निसर्ग, हे विश्व का निर्माण झाले ह्याची त्यांनी केलेली मीमांसा, ह्याचे भवितव्य काय असेल, मानवाचा भवितव्यकाल या सर्व चिंतनाचा शब्दाविष्कार म्हणजे महर्षींचे हे खंडकाव्य आहे.*

सत्यवान-सावित्रीच्या उपाख्यानाचा अन्वयार्थ विशद करताना ते म्हणतात

 *"‘सत्यवान-सावित्री ही मृत्यूवर विजय मिळविल्याची कथा महाभारतात आहे. तथापि त्यात संकेत असा दिलेला आहे की दैवी सत्य जाणणारा आत्मरूपी सत्यवान हा अज्ञान आणि मृत्यूच्या तडाख्यात सापडलेला आहे. सावित्री ही ज्ञानी सूर्यकन्या त्या दुष्टचक्रातून मानवाला मुक्त करण्यासाठी आली आहे. तिचा पिता अश्वपती हा आध्यात्मिक वाटचालीत उपयुक्त ठरणाऱ्या तपस्येचे प्रतीक आहे. सत्यवानाचे वडील द्युमत्सेन हे अंध झालेले पवित्र मन आहे. अशा मानवी व्यक्तिरेखांद्वारे मर्त्य जीवनापासून दिव्य चैतन्यापर्यंत कसे जाऊन पोहोचायचे, याचे मार्गदर्शन आपल्याला मिळते."*

ज्याप्रमाणे सावित्री आपल्या तपोबलाने त्या सत्यवानांस पृथ्वीवर आणते व स्वर्ग निर्माण करते, तद्वतंच महर्षींना ह्या महाकाव्यातून पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करायचा आहे.

ही कविता आङ्ग्लभाषेत असल्यामुळे नि त्यातही महर्षींचे इंग्रजी हे मूळ लैटिनच्या त्यांच्या प्रभुत्वामुळे नि तत्कालीन पल्लेदार वाक्यांचं दुर्बोध असे इंग्रजी असल्यामुळे शब्दकोशाची आवश्यकता पडतेच. अर्थात ज्यांना महर्षींच्या भाषेचा परिचय आहे, त्यांना हे फार अवघड जाणार नाही. पण तरीही ज्याना हे इंग्रजीतून संभव नसेल तर निदान मराठीतूनतरी अभ्यासायचं आहे, त्यांच्यासाठीही अरविंद आश्रमाने त्याचा मराठी अनुवाद केलाच आहे. अनुवादकार - सौ शैलजादेवी वहिनीसाहेब प्रतिनिधी 

*आणखी तीन ग्रंथ अभ्यसनीय आहेत.*

महर्षींचे समग्र वाङ्मय मूल आङ्ग्ल ३७ खंडांमध्ये प्रकाशित आहे. त्यात खंड ३३व ३४ हे सावित्रीचे आहेत. सावित्री कवितेविषयी महर्षींनी *VOLUME 27 - LETTERS ON POETRY AND ART* मध्ये चिंतन केलेलं आहे ते अभ्यसनीय आहे. सावित्री वाचण्यापूर्वी महर्षींचे  *'अतिमानव' नि 'पृथ्वीवर अतिमानसाचा आविष्कार'* हे आणखी दोन ग्रंथही चिंतनीय आहेत. सुदैवाने पीडीएफ उपलब्ध आहेत.






*निम्नलिखित संकेतस्थळांवर महर्षि श्रीअरविंदांचे साहित्य मूल आङ्ग्ल व त्याचे काही मराठी व काही हिंदीतून अनुवादही* उपलब्ध आहेत. ज्यांना जिज्ञासा असेल त्यांनी हे अभ्यासावेच.

https://www.motherandsriaurobindo.in/#_StaticContent/SriAurobindoAshram/-09%20E-Library/-01%20Works%20of%20Sri%20Aurobindo/-07%20Marathi

*इंग्रजीभाषेत अतिमानसाची संकल्पना मांडणारे श्रीअरविंद हे प्रथमंच*

संपूर्ण युरोप किंवा अमेरिकेतही इतके इंग्रजी साहित्यिक,महाकवी होऊन गेले पण श्रीअरविंदांच्या भाषेतंच सांगायचं तर ह्यातल्या एकालाही अतिमानसाच्या संकल्पनेस स्पर्श करता आला नाही. श्रीअरविंदांनी स्वतः एका पत्रांत हे म्हटलंय. उपरोक्त खंड २७ मध्ये ते अभ्यासता येईल. सोबत पृष्ठ जोडलंच आहे.


ह्या कवितेचा आस्वाद मूळ आङ्ग्लभाषेतून एकदा तरी घ्यावाच ही विनंती. 

*सत्यवान-सावित्री नि महर्षींच्या चरणी अभिवादन करतो नि लेखणींस विराम देतो...!*

भवदीय,

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#सत्यवानसावित्री_वटपौर्णिमा_महायोगीमहर्षि_अरविंद_महाकाव्य_अतिमानव_स्वर्गपृथ्वी