Monday 13 November 2023

महाप्रस्थानाच्या पथावर

 


यतिवर ऋषिश्रेष्ठ श्रीमद्दयानंद सरस्वति पुण्यस्मरण 

(तिकडे कार्तिक वद्य अमावस्या, आपल्याकडे अश्विन वद्य अमावस्या)

जब मैं आर्यजातिकीं सार्वत्रिक अधोगति और अवनति देखता हूँ, तो मेरी वेदना का पार नहीं रहता।

इति महर्षि श्रीदयानंद


कृण्वन्तो विश्वमार्यम् ही वेदांची नि श्रावयेच्चतुरो वर्णान् ही प्रत्यक्ष श्रीमन्महाभारताची प्रत्यक्ष जगभर वेदप्रचार करण्याची आज्ञा धिक्कारून वेदांपेक्षा मध्यकालीन स्मृतींना प्रमाण मानत विदेशयात्रा गमन निषेध करून विश्वव्यापी विश्वगुरु वैदिक धर्मांस संकुचित करणाऱ्या समुद्रबंदी सारख्या रुढींचं प्राबल्यत्व, वैदिक यज्ञामध्ये निर्दोष पशुंची हिंसा, बळीप्रथेचे थोतांड, कलिवर्ज्याचं थोतांड, शास्त्रात् रुढीर्बलीयसी ही मानसिकता, स्वमतसिद्धांतासाठी षट्दर्शनांची वेदविरुद्ध विकृत मांडणी, अवतारवादाचा अतिरेक, आठव्या किंवा सहाव्या वर्षी मुलींचा विवाह लावण्याची विकृती (धर्मसिंधु), सतीसारख्या विकृतींना वेदसंमत ठरविण्याचा अट्टाहास, केवळ ब्राह्मण स्त्रियांचे केशवपन, एखादी विधवा स्त्री केशवपन न करता समोर आली तर तिला तुच्छ लेखत दर्शन नाकारणारे कथित संन्यासी, विधवांना पुनर्विवाहास निषेध करून त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी नि त्यातून आमच्या ब्राह्मण समाजाला त्या निष्पाप माता भगिनींचे लागलेलं अश्रांत शाप, वेदांपेक्षा आपल्या कथित परंपरा प्रमाण मानणारे आचार्य नि त्यांचे अंधानुयायी, स्त्री-शुद्रांनी वेद ऐकु नये सारखी वचने स्मृतिग्रंथात घालून त्यांना वेदाधिकारापासून वंचित ठेवणे, याने अकारण ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाला शत्रुंकडून घातले गेलेलं खतपाणी, श्रीसीतेसारख्या महासाध्वीचा विवाह सहाव्या वर्षी दाखवून मध्ययुगीन स्मृतींचे विकृत समर्थन, सोवळ्याच्या नावाखाली केवल चंडालांपुरती मर्यादित असलेल्या अस्पृश्यतेला सर्वच शुद्रांसाठी जन्मजात सिद्ध करण्याचा कथित 'सनातनी' अट्टाहास नि वर्णव्यवस्था जन्माधिष्ठित सिद्ध करण्याचा अवैदिक प्रयत्न...


वैदिक धर्माचे वाट्टोळं करणाऱ्या या धर्मविध्वंसक प्रथांना आपल्या सुतीक्ष्ण तर्काने नि अपार वेदनिष्ठेने छेद देणारा ऋषिश्रेष्ठ महात्मा आजच्याच तिथींस १८व्या विषप्रयोगाने देहदान करता झाला...


बर या सर्व गोष्टी नाकारणारे महर्षी श्रीदयानंद हे पहिले व्यक्ती होते अशातलाही भाग नाही, त्यांच्याही आधी नि नंतर अनेकांनी यातल्या काही तर काहींनी सर्वर गोष्टी धिक्कारलेल्याच आहेत, त्यामुळे श्रीदयानंदांनी हे सर्व नाकारून फार मोठ्ठा सनातन द्रोह केला असेही नव्हे, पण केवळ मूर्तीपुजा-अवतारवाद नाकारला इतकंच घोकत या दोन कारणांसाठी म्हणून ते कुणासाठी शत्रु असतील तर हे शत्रुत्व आह्मींही आजीवन मिरवु भलें आह्मीं मूर्तीपुजा अवतारवाद नाकारत नसलो तरीही...

भारतीय विद्वत्ता जेंव्हा पाश्चात्यांच्या अभ्यासाने दिपून जाऊन दिग्भ्रमित होऊन पुढे लोटांगणं घालत आर्याक्रमण मान्य करत आपल्या इतिहासाचे आपल्याच हाताने श्राद्ध घालत होती, तेंव्हा 'यस्मिन्देशे द्रुमो नास्ति तत्रैरण्डोऽपि द्रुमायते' अशी मैक्सम्युलरची निर्भ्रर्त्सना करत भारतीय इतिहासाची विशुद्ध भारतीय पंरपरेवर आधारित यथोचित ऐतिह्य मांडणीचे दिग्दर्शन नि सूत्रपात करणारा इतिहासवेत्ता आज लोपला

आपल्या आजीवन अखंड अविप्लुत नैष्ठिक ब्रह्मचर्याने नि योगसाधनेने तपःपूत देहांत त्या नीलकंठाप्रमाणे १७वेळाचा विषप्रयोग स्वीकारत आपलं मूलशंकर हे मूळ नाम सार्थ करणारा तो महायोगी आज अमावस्येच्या तिथींस स्वलोकधामी निर्गमन करता झाला...

मला चारही वेदांचे भाष्य करायला ४०० वर्षे लागतील - इति महर्षि दयानंद

जर ते जीवित असते तर आज न्यूनतम २०० वर्षांच्या आयुचे असते आणि त्यांच्या हातून वेदभाष्य तरी पूर्ण झालं असतं पण नियतीला काही गोष्टी मान्य नसतात. जर तरला इतिहासात काहीच स्थान नसतं. इतकंच काय पण त्यांनीच त्यांच्या मतप्रणालीत स्वतःहून बदलही निश्चित केला असता, कारण ते स्वतःला कधी सर्वज्ञ मानत नव्हते.

त्यांची प्रत्येक गोष्ट आंधळ्यासारखी मानावीच असा अट्टाहास त्यांच्याविषयीच्या अंधभक्तीचा सोहळा ठरण्यापेक्षा आपल्या उपासनेने, अध्ययनाने नि डोळस वृत्तीने त्यांचे जे योग्य ते स्वीकारून नि अयोग्य ते त्यागून राष्ट्रप्रथम ही वृत्ती अंगी दृढ करत वैदिक सिद्धांतानुसार जीवनाचा मार्ग धरणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल...

आज खूप काही लिहायची इच्छा होती पण वेळेअभावी इतकंच.

महर्षि दयानंद खरंच ऋषि होते का?

ज्या सत्पुरुषाचा समग्र प्रयत्न हा या भारत देशामध्ये पुन्हा एकदा वैदिक आणि आर्ष युगाच्या प्रोज्वल आणि पुनीत जीवन प्रणालीला पुनर्स्थापित करणे हा होता, ज्याचा संपूर्ण पुरुषार्थ हा प्राचीन ऋषीमुनींच्या चिंतनाला आणि कर्तुत्वाला पुनर्जीवित करणे हा होता, हेच कारण आहे की ब्रम्ह्यापासून ते महर्षी जैमिनीपर्यंतच्या ऋषि परंपरेची पुनः पुनः आठवण करून देणाऱ्या महर्षी श्रीदयानंद यांची गणना सुद्धा वशिष्ठ, विश्वामित्र आणि व्यासांसारख्या ऋषींच्या कोटीमध्ये होऊ लागली होती. दानापूर नावाच्या एका ग्रामी त्यांचं आर्ष चिंतन आणि कर्तुत्वाला, वक्तृत्वाला पाहून एकाने विचारलं की

'महाराज, आपण तर ऋषी आहात!' 

पण अत्यंत निर्लोभी, निर्मम, निरहंकारी असणाऱ्या या संन्याशाने स्वतःला त्या ऋषीपरंपरेचा अकिंचन अनुयायी आणि आर्षधारणांचा विनम्र पक्षपोषक मानत असताना अत्यंत विनम्रपणे जे उत्तर दिलं ते पाहण्यासारखे आहे, श्रीदयानंद म्हणतात

'बंध, पुराकालीन ऋषियों के अभाव में तुम मुझें कुछ भी कह लो, किन्तु यदि सांख्य एवं वैशेषिक दर्शनोंके प्रवक्ता महर्षि कपिल और कणादके युग में मैं होता, तो मेरी गणना साधारण विद्वान के रूप मे भी कथञ्चित ही हो होती।'


सरलता आणि विनम्रतेचा अनुपम साक्षात्कार करणाऱ्या या ऋषिश्रेष्ठाच्या चरणी आज पुण्यस्मरणानिमित्त कोटी कोटी दंडवत प्रणाम!


भवदीय,


पाखण्ड खण्डिणी 

Pakhandkhandinee.blogspot.com


#महर्षि_दयानंद_पुण्यस्मरण_दीपावली_अमावस्या_सनातन_वैदिकधर्म

Friday 3 November 2023

सांख्यदर्शन निरीश्वरवादी नाही, कुठलंच वैदिक दर्शन निरीश्वरवादी नाही

 


सांख्यदर्शन निरीश्वरवादी नाही, कुठलंही वैदिक दर्शन निरीश्वरवादी नाहीयेच...

मागेही लिहिलंय की हे सर्व भ्रम आचार्यांच्या भाष्यामुळे व ते नीट समजून न घेतल्याने निर्माण झालेले भ्रम आहेत, मग ते अद्वैती असोत, द्वैती असोत किंवा अन्य असोत. यातही सर्वस्वी त्यांचा दोष नाहीये. त्यामागेही हेतु आहे. तो कसा ते पाहुयांत..

मूळात निरीश्वरवादी म्हणजे लगेचंच ईश्वर नाकारणं असेही नव्हे, सांख्यदर्शनाच्या संबंधी निरीश्वरवादाचा अर्थ केवळ जगत्सृष्ट्यत्वामध्ये ब्रह्म किंवा ईश्वराचा नियंता या रुपानेच स्वीकार आहे, सांख्यकार श्रीकपिल महामुनी हे प्रकृतींस जगताचे मूल उपादान कारण मानतात आणि ईश्वर किंवा अन्य कोणत्याही तत्वाला जगत्सृष्ट्यत्वामध्ये असिद्ध मानतात किंवा फारतर नियंता मानतात इतकंच. ते लगेचंच ईश्वराचं अस्तित्व नाकारतात असा त्याचा अर्थ नव्हे...

पण सांख्यदर्शनात खालील सुत्रांवरून त्याच्या ईश्वरनिष्ठेची साक्ष पटते. ती खालीलप्रमाणे....

ईश्वरासिद्धेः या सूत्रामध्ये ईश्वर हा केवळ उपदानाकारणत्वाच्या दृष्टीने असिद्ध सांगितला आहे याचा इथे ईश्वराचा सर्वार्थाने किंवा सरसकट निषेध नसून त्याच्यावरचे अवलंबित्व सिद्ध आहे, तो केवळ नियंता आहे इतकंच. पण या सूत्राचा अर्थ सांख्यदर्शनकार महर्षि श्रीकपिलांनी ईश्वरालाच नाकारलंय असा भ्रमाने काढला गेल्याने गोंधळ झालेला आहे.

दुसरा संदर्भ - सांख्य - ३/५६-५७
"स हि सर्ववित् सर्वकर्ता"

ह्या सूत्रांत स्पष्टपणे तो (स:) ईश्वर हा सर्वांतर्यामी थोडक्यात सर्व जाणणारा व सर्वकर्ता म्हणजेच सर्व सृष्टीचा रचयिता आहे हे स्पष्ट सांगितले आहे, यद्यपि प्रकृती उपादानकारण असली तरी.

पुढे लगेचच म्हटलंय "इदृशेश्वरसिद्धि: सिद्धा:"
म्हणजे ह्यावरूनच ईश्वराची सिद्धी दृढतेने केली गेली आहे. पांचव्या अध्यायातही सुत्र २ ते १२ ह्यातही सांख्यदर्शनकार श्रीकपिलमहामुनींची ईश्वरनिष्ठा स्पष्ट दृग्गोचर होते.

पण मग हा नेमका घोळ कुठे झाला ते पाहुयांत...

ईश्वरकृष्णांच्या सांख्यकारिकेमुळे...

ब्रह्मसूत्रशाङ्करभाष्य जर आपण व्यवस्थित अभ्यासलं तर स्पष्ट लक्षात येतं की आमच्या भगवत्पाद श्रीमच्छंकराचार्यांनी सुद्धा बौद्धमत निराकरणासाठी आपल्या लक्ष्यसाध्य हेतु ईश्वरकृष्णांच्या सांख्यकारिकासारख्या ग्रंथांचा आधार घेऊन सांख्यदर्शनाच्या कथित निरीश्वरवादाचा क्षणभर आश्रय घेतला पण याचा अर्थ भगवत्पाद श्रीमच्छंकराचार्यांना मूळ सांख्यदर्शन हे निरीश्वरवादी होते असं म्हणायचं मुळीच नव्हतं हे भाष्य नीट अभ्यासलं तर कळेल. ब्रह्मसूत्रशाङ्करभाष्याच्या २।१।१ येथील सूत्रावर आचार्यांनी 'कापिलस्य तन्त्रस्य वेदविरुद्धत्वं वेदानुसारिमनुवचनविरुद्धत्वंं च।' असे जे म्हटलंय त्यातही हेतु आहे. कारण सांख्यदर्शनकार श्रीकपिल महामुनी हे स्पष्टपणे 'पुरुषबहुत्वं व्यवस्थातः।' (६।४५) या सूत्रामध्ये स्पष्टपणे पुरुषजीवांची अनेकता सिद्ध करतात. भगवत्पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांनी या 'ईश्वरासिद्धे:' सूत्राला नास्तिकताप्रदर्शक म्हटलेलं आहे आणि प्रकृतीच्या उपादान कारणत्वाला व जीवांच्या नानात्वाला वेदविरुद्ध यासाठी म्हटले आहे कारण त्यांच्या मायावादाच्या प्रतिपादनास त्याने विरोध येतो म्हणून. त्यांना अद्वैतमतप्रतिष्ठापनेसाठी त्या मांडणीची आवश्यकता होती. श्रीरामानुजाचार्यांनी सुद्धा त्यांच्या विशिष्टाद्वैत प्रतिपादनासाठी १।४।२३ या सूत्रांवर भाष्य करताना आचार्यांचंच अनुसरण केलेलं आहे.

मुळात ईश्वरकृष्णांची सांख्यकारिका हा आधुनिक ग्रंथ आहे, वात्सायनाच्या वेळी त्याचं अस्तित्वही नव्हतं हे स्पष्ट सिद्ध होतं कारण त्याने वार्षगण्याला उद्धृत केलं आहे, ईश्वरकृष्णांना नाही.

सांख्यदर्शनावर निरीश्वरवादाचा आरोप करणाऱ्यांनी आणखी "वार्षगण्य" नावाच्या एका विद्वानाचा संदर्भ दिला आहे की ज्यांनी मुळ कपिलांच्या सांख्यदर्शनाच्या विरोधात काही मतभेद प्रकट केला. आणि बौद्धांनी त्याचाच वापर ईश्वरखंडनासाठी म्हणजे नास्तिकतेसाठी केला. पुढे भाष्यकारांनी त्यालाच प्रमाण मानुन हे सांख्य हे निरीश्वरवादी आहेत हा सिद्धांत मांडला. दुर्दैवाने श्रीकरपात्री स्वामींसारखा प्रकांड विद्वानही 'वेदार्थपारिजातमध्ये' हेच मांडताना दिसतो अर्थात त्यामागे त्यांचा हेतुही केवळ आर्यसमाजाला विरोध करणं हाच होता. असो तो स्वतंत्र विषय...

षड्दर्शनांना निरीश्वरवादी ठरवणं हे चूक असलं तरी ती त्या आचार्यांची तत्कालीन बौद्धमत निराकरणासाठी केलेली तात्पुरती व्यवस्था होती...

आमच्या प्रज्ञाचक्षु श्रीगुलाबराव महाराजांनी यावर सुंदर विवेचन केलेलं आहे जे समन्वयाच्या दृष्टीने ते द्रष्टव्य आहे. महाराजांनी स्पष्टपणे सांख्यदर्शन हे निरीश्वरवादी नसून सेश्वर दर्शन आहे हे व्यवस्थित रीतीने पटवून दिलं आहे. आणि त्याचा वेदांताशी समन्वय करून दिला आहे. महाराज स्पष्ट म्हणतात की भगवत्पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांनी प्रकृतीची सत्यता आणि पुरुषबहुत्व या मतांचे खंडन केले परंतु सृष्टीच्या उत्पतीचा क्रम मात्र सांख्यानुसारच घेतला. आचार्यांनी गीताभाष्यामध्ये आणि विष्णुसहस्त्रनाम भाष्यामध्ये महर्षि श्रीकपिलांचे व सांख्यशास्त्राचे वैदिकत्व स्वीकारून ते प्रमाणही मानले आहे. म्हणजे ब्रह्मसूत्रशाङ्करभाष्यामध्ये एकीकडे हेच आचार्य सांख्यदर्शनाला अवैदिक किंवा वेदविरुद्ध ठरवतात आणि दुसरीकडे त्याचा मुक्तहस्ताने वापर करतात हा विवेक आपण लक्षात घ्यायला हवा...

षट्दर्शने म्हणजे प्रत्येक दर्शन मूळातून स्वत: संप्रदायपूर्वक म्हणजे गुरुमुखातून ब्रह्मचर्य्यपूर्वक तेही आर्षपद्धतीने अध्ययन न करता केवळ अंतिम असे वेदांत दर्शन किंवा त्यावरील आधुनिक भाष्ये अभ्यासून षट्दर्शनांविषयीची सैद्धांतिक भूमिका समजाऊन घेण्याचा प्रयत्न करणे हा आत्मघात नव्हे काय? दुर्दैवाने आर्ष भाष्यांची अनुपलब्धता हाही दोष आहे. आता उपरोक्त भाष्यकारांनी ती मूळातून अभ्यासलीच नव्हती असे समजणं चूक असलं तरी स्वत: मूळातून ती अभ्यासण्यांत हानीपेक्षा लाभंच आहे असे म्हटल्यांस अत्युक्ती ठरेल काय? ह्यात पुन्हा द्वैत-अद्वैत-त्रैत वाद वेगळाच पण तो स्वतंत्र. अंतिम मत अनुभूतीचा विषय पण आधी अभ्यासणं तरी महत्वाचं..

पूर्वमीमांसेवर श्रीव्यासांचे, वैशेषिकांवर श्रीगौतमांचे, न्यायावर श्रीवात्सायनांचे, योगसूत्रांवर श्रीव्यासांचेच की स्वोपज्ञ(?), सांख्यावर श्रीभागुरीमुनींचे, वेदांतावर श्रीवात्सायनाचे किंवा श्रीबौधायनाचं - इति महर्षि दयानंद

ही आर्ष म्हणजे ऋषिमुनीकृत भाष्ये! ही अभ्यासणं म्हणजे समुद्राच्या गर्भात जावं व मौल्यवान मोती वर आणावीत असे साहित्य. ह्यातली केवळ न्याय व योगाची आज उपलब्ध आहेत. अन्य चार काळाच्या ओघात नष्ट झाली. आज जर ही सर्व भाष्ये उपलब्ध असती तर? तर षट्दर्शनांविषयी जो गोंधळ झाला व मतमतांतरे निर्माण झाली ती झाली नसती. हा द्वैत-अद्वैत-त्रैत वादही निर्माण झाला नसता. आपलं दुर्दैव...! अस्तु!

समूळ ग्रंथ पाहिल्यावीण, उगाचंच ठेवीं जो दूषण।
गुण सांगता अवगुण, पाहें तो येक पढतमूर्ख।
दासबोध

अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु।

भवदीय,

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#सांख्यदर्शन_निरीश्वरवाद_सेश्वरवाद_श्रीशंकराचार्य_श्रीगुलाबराव_महाराज_षट्दर्शने_प्रकृती_सांख्यकारिका