Thursday 27 February 2020

मराठी किंवा महाराष्ट्री भाषेचा इतिहास - एक चिंतन


*इयें मराठीचियें नगरीं। ब्रह्मविद्येचा सुकाळुं करीं।*

कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती श्रीज्ञानोबाराय

भाषेच्या इतिहासाचा जेंव्हा आपण विचार करतो तेंव्हा वैदिक संस्कृत ही आदिभाषा आहे अशी सर्व प्राचीन अशा एतद्देशीय व्याकरणकारांची नि भाषाशास्त्रज्ञांची संमती आपणांस प्राप्त होते. वैदिक शब्दांवर आधारित नि वैदिक-पद-बहुला लोकभाषा जी ब्रह्मा आणि सप्तर्षींद्वारे सृष्ट्यारंभीच्या आदि मानवांमध्ये व्यवह्रत झाली, जिचा उल्लेख भरतमूनीने त्याच्या नाट्यशास्त्रामध्ये १७।२७ आणि २८ येथे अतिभाषा किंवा आदिभाषा असा केला आहे, अश्या ह्या मूल वैदिक संस्कृतपासून लौकिक संस्कृत नि प्राकृतभाषांचा विस्तार नि विकार पुढील काळांत झाला. वैदिक संस्कृतपासून उद्भवलेल्या किंवा विकार पावलेल्या प्राकृतभाषांमध्ये सर्वप्रथम जिचा आविष्कार झाला, ती म्हणजे शौरसेनी प्राकृत. ह्या शौरसेनी प्राकृतचे पुढे जे तीन प्रमुख भेद झाले, त्यामध्ये महाराष्ट्री ही प्रथम असून मागधी नि पैशाची ह्या दोन पश्चातच्या आहेत. प्राकृतभाषांच्या अध्ययनासाठी जो सर्वात प्रथम नि अधिकारी ग्रंथ असा जो उपरोक्त भरतमूनींचा नाट्यशास्त्र नावाने सुपरिचित आहे, ज्याचा कालावधी महाभारतकालाच्या पूर्वीचा आहे, त्या ग्रंथामध्ये १७।४८ येथे नाट्याचार्य श्रीभरतमूनींनी

*सर्वास्वेव हि शुद्धासु जातिषु द्विजसत्तमाः।*
*शौरसेनीं समाश्रित्य भाषां काव्येषु योजयेत्।*

असे म्हटलंय. विक्रम संवत पूर्व पांचव्या शतकांतले महान मीमांसक श्रीकुमारिल भट्टपाद हे त्यांच्या तंत्रवार्त्तिक ह्या अत्यंत प्रसिद्ध ग्रंथामध्ये

*मागध-दाक्षिणात्य-तदपभ्रंशप्रायासासाधुशब्दनिबन्धिना।*

असे म्हणतात. इथे मागधी व दाक्षिणात्यावरून महाराष्ट्री अथवा जैनीचा अभिप्राय श्रीकुमारिलभट्टांस आहे असे लक्ष्यीं येते. अपभ्रंशही आहे.

*महाकवी श्रीदंडीचा काव्यादर्श मधील संदर्भ*

ज्याचे पदलालित्य प्रसिद्ध आहे, असा श्रीदंडी त्याच्या काव्यादर्श ह्या ग्रंथामध्ये महाराष्ट्री अर्थात मराठीविषयी जे लिहितो  महत्वाचे आहे.

*महाराष्ट्राश्रयां भाषां प्रकृष्टं प्राकृतं विदुः।*
*सागरः सूक्तिरत्नानां सेतुबन्धादि यन्मयम्।*

महाराष्ट्रामध्ये बोलली जाणारी भाषा हींस लोक प्रकृष्ट प्राकृत समजतात. ह्यामध्ये सूक्तीरुपी रत्नांचा सागर आहे ज्यात सेतुबंध नावाचे काव्य रचलं गेलंय.

ह्या सेतुबंधग्रंथाच्या टीकेमध्ये रामदास नामक लेखकाने 'महाराष्ट्रभाषायां' असा शब्दप्रयोग केला आहे. कर्पुरमञ्जिरी ह्या ग्रंथामध्येही शौरसेनी व महाराष्ट्री दोन्हींचा उल्लेख आहे.

प्राकृतभाषेच्या बव्हतांश सर्व वैय्याकरणींनी एकमुखाने महाराष्ट्रींस सर्वोत्तम प्राकृत मानलं आहे आणि मुख्यतः तिचेच नियम दिले आहेत. विस्ताराने ह्यावर पुढे लिहुच.

पुरुषोत्तम नावाच्या व्याकरणकाराने त्याच्या 'प्राकृतानुशासन' नावाच्या ग्रंथामध्ये ११।१ येथे शौरसेनी व महाराष्ट्री अर्थात मराठी दोन्ही एकंच आहेत असे प्रतिपादन केलं आहे. आपल्याला अभिमान हवा की संस्कृतला सर्वांत जवळ भाषा कोणती असेल तर ती मराठी आहे. एक मराठीभाषिक म्हणून, महाराष्ट्रीय म्हणून आपल्या मातृभाषेच्या निर्मितीसंबंधी काहीसं चिंतन आवश्यक आहे म्हणून हा  लेखनप्रपंच.

*प्राकृत ही संस्कृतपासूनंच*

सर्व प्राचीन संस्कृत नि प्राकृत व्याकरणकार ज्यांत हेमचंद्र नावाचा जैन व्याकरणकार आहे, हा स्पष्ट लिहितो की प्राकृत ही संस्कृत पासून निर्माण आहे. त्याने वैदिक संस्कृत सर्व भाषांची जननी मानलीय. ईसवी सन पूर्व ५६ च्या विक्रमाच्या प्रासादांतला जो नवरत्नांपैकी एक असा कालिदास वगैरे, त्यांतलाच एक म्हणजे आचार्य वरऋचि हा प्रथितयश व्याकरणकार नि निरुक्तकार. हा संस्कृतबरोबर प्राकृत भाषांचाही व्याकरणकार होता. हा त्याच्या *प्राकृत प्रकाश* ह्या ग्रंथांतही लिहितोच की

*प्राकृत ही संस्कृत पासूनंच आहे. वैदिक संस्कृत सर्व एतद्देशीय भाषांची जननी आहे...*

सांप्रत काही ब्रेकिंग इंडिया फोर्सेस अर्थात भारत विखंडन शक्ती ह्या प्राकृत नि संस्कृत ह्यात भेद दाखवून,भेद आहेच, पण तो भेद आर्य विरुद्ध अनार्य वादासाठी दाखवून हिंदु समाजांत फुट पाडण्याचे काम करताहेत. सूज्ञांनी सावध रहावे ही विनंती. भविष्यांत ह्यावर विस्ताराने येऊच.

भवदीय,

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#संस्कृत_प्राकृत_मराठीभाषा_महाराष्ट्री_भरतमूनी_वरऋचि

Saturday 22 February 2020

#मार्क्सवाद_आणि_भारतीय_इतिहासलेखन #लेखांक_प्रथम




The history of hitherto existing society is the history of class struggle.

Communist Manifesto - Karl Marx and Frederic Engels
London 30th January, 1888

ख्रिस्ती मिशनरी(हे आह्मीं मागेच सिद्ध केलंय) अशा मार्क्सने नि त्याचा साथीदार एंजल्सने त्यांच्या उपरोक्त ग्रंथामध्ये मध्ये अगदी आरंभीच म्हटलं आहे की सर्व मानवजातीचा किंवा समाजाचा इतिहास हा केवळ वर्ग-संघर्षाचा इतिहास आहे. मार्क्सचे हेच वाक्य अगदी प्रमाण मानून पुढे सर्व मार्क्सवाद्यांनी ह्यावरूनंच सर्व विश्वाचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही मार्क्सवादी इतिहासकाराची पुस्तके पाहिली तरी हीच मांडणी आपणांस दिसून येते. अगदी ह्या उपरोक्त एंजल्सचे The Origin of the Family, Private Property and the State हा ग्रंथ वाचला तरी हीच मांडणी लक्ष्यी येतें. यद्यपि हा ग्रंथ हेगेल्सच्या ग्रंथांस प्रतिवाद होता. मार्क्सवाद्यांनी हा विश्वेतिहास निम्नलिखित चार अवस्थांमध्ये कोंडून टाकलाय, त्या म्हणजे

१. Primitive Communism - प्रारंभिक साम्यवाद
२. Slavery - गुलामगिरी
३. Feudalism - सामंतशाही किंवा सरंजामशाही
४. Capitalism - भांडवलशाही

सर्व मार्क्सवाद्यांच्या मते सर्व जग किंवा कोणताही मानव-समुह ह्या चार अवस्थांमधून गेलेलाच असतो. आणि म्हणून ह्या चार अवस्थांमधून जगाला बाहेर काढणं व शेवटी साम्यवाद अर्थात Communism कडे वळविणे, हेच त्यांचे उद्दिष्ट असतं. त्यांच्या दृष्टीने साम्यवाद ही आदर्श व्यवस्था असते.

अगदीच एतद्देशीय उदाहरण द्यायचे तर भारतात मार्क्सवादी पक्षाची संस्थापना करणारे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे ह्यांचं India from Primitive Communism to Slavery हा ग्रंथ जिज्ञासूंनी अभ्यासावा. त्यातही डांग्यांनी हीच मांडणी केलेली आपणांस दिसून येते....

आता प्रश्न असा पडतो की भारतीय इतिहासाला ही मांडणी लागु पडते का???

तर उत्तर नाही असे येतं.

कारणमीमांसा निम्नलिखित

मार्क्सने नि एंजल्सने केलेली ही वर्गसंघर्षाच्या इतिहासाची मांडणी भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने कोणत्याही पुराव्याशिवाय व इतिहासाच्या प्रमाण व आधाराशिवाय होती.

अर्थात भारतातल्या नेहरुप्रणीत मार्क्सवाद्यांनीही भारताच्या समग्र इतिहासाची मांडणी करताना ह्याचपद्धतीने मांडणी केलीय. दुर्भाग्य म्हणजे भारतीय इतिहासात ही मांडणी कुठेही बसत नाही. तरीही गेली सत्तर वर्षे हीच इतिहासाची परंपरा आपण वाचतो आहोत व त्याविरुद्ध स्वर उठविण्याचे सामर्थ्यही आपल्यांत नाही. मार्क्सवादी इतिहासकारांनी केलेला इतिहासद्रोह हा विषय यद्यपि विस्ताराचा असला तरी ज्याची सद्सद्विवेकबुद्धी जागृत आहे असा मनुष्यही त्यांची लेखनशैली समजून घेऊ शकतो. ह्यावर विस्ताराने आह्मीं मागे एक लेख लिहिला होता Marxism and the writing of Indian History नावाने...

सविस्तर पुढील लेखांकात येऊच...

#साम्यवाद_सप्ताह_इतिहासाच्या_पाऊलखुणा

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

Wednesday 12 February 2020

वेदोद्धारक ऋषिश्रेष्ठ महर्षि श्रीमद्दयानन्द सरस्वति जयंतीविशेष...



भगवान पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्य, मीमांसक श्रीकुमारिल भट्ट, मीमांसक श्रीउदयनाचार्य ह्यांच्या परंपरेमध्ये ज्या आदित्य बालब्रह्मचारी-उर्ध्वरेतस्-ब्रह्मवर्चसी अशा ऋषिश्रेष्ठाचे स्मरण व्हावं अशा योग्याची आज जयंती...भगवान श्रीपरशुरामवत् अन्यायसंहारी, श्रीबृहस्पतिवत् वेदवक्ता, श्रीवसिष्ठवत् वेदप्रचारक, सत्यवक्ता, निर्भीड, दीर्घदर्शी, समदर्शी, वाग्मी, जितेंद्रिय, सुवक्ता असा निर्म्मल, निर्विकार, समुद्रवतगंभीर, पृथ्वीवत् क्षमाशील, अग्निवत् दैदिप्यमान, पर्वतवत् कर्तव्यस्थिर, सदैव ब्रह्मपरायण असा हा ऋषिश्रेष्ठ...

काय लिहावं ह्या महापुरुषाविषयी? अनेक महापुरुषांची जीवनचरित्रे अद्यापपावेतो अभ्यासली पण ह्या योग्याचे चरित्र काही निराळंच आहे.

*सविकल्प समाधी अवस्था प्राप्त करूनंच मग वेदार्थ प्रकट करणारा हा ऋषिश्रेष्ठ वेदोद्धारक...

निरुक्तकारांनी भारतवर्षाच्या युद्धापश्चांतचं चित्र रेखाटताना तत्कालीन परिस्थितीचे वर्णन करताना *"को नः ऋषिर्भवति"* ह्या प्रश्नाचे उत्तर देताना जे म्हटलंय ते अगदी सार्थ आहे. *तर्क हाच ऋषि. ह्या तर्क नावाच्या ऋषीचा अर्थात उहेचा विनियोग ज्याने आपल्या बृहस्पतिसमान प्रगल्भ बुद्धीने केला,त्या ऋषिश्रेष्ठाची आज जयंती...*

प्रत्येक वेदमंत्रांचे किंवा तत्संबंधित सूक्ताचे भाष्य करण्यापूर्वी तासन्तास समाधी लाऊनंच मगंच वेदार्थ प्रकट करणारा हा वेदभाष्यकार...

*"मला चारीही वेदांचे समग्र भाष्य करायला चारशे वर्षे लागतील..."*

असे सांगणारा हा वेदानुशीलनकर्ता...

ह्या ऋषिश्रेष्ठाचे वेगळेपण ते काय की त्याची इतकी स्तुती करावी???

*स्त्रियांना व शुद्रांनाही वेदांचा अधिकार जो पूर्वी होताच, तो मागील काळांत नाकारला गेला, तो वेदांच्या अंतःसाक्षीच्या आधारेच सर्व मानवज्ञातींस प्रदान करणारा हा समदर्शी अखिलमानवहितकर्ता...*

*आर्ष ग्रंथांचा उद्धारकर्ता...*

अनार्ष ग्रंथांमुळे वैदिक धर्मांस आलेल्या ग्लानींस दूर करण्यासाठी नि विशुद्ध वैदिक मताच्या पुनर्संस्थापनेसाठी ज्याने आर्ष अर्थात ऋषिप्रणीत ग्रंथांचाच आयुष्यभर पुढाकार केला नि त्यांचाच निर्भयपणे प्रसार केला असा हा सत्यनिष्ठ ऋषि. *कौमुदी, चंद्रिका, सारस्वत, मुग्धबोध, आशुबोध, मनोरमा आदि अनार्ष व्याकरण ग्रंथांनी वैदिक व्याकरणाविषयी नि वेदार्थ प्रतिपादनाविषयी जो काही गोंधळ मधील काळांत निर्माण झाला, तो धातुपाठ, अष्टाध्यायी नि व्याकरण महाभाष्याच्या अध्ययनाने अर्थात आर्ष ग्रंथांच्या अध्ययनाने नि प्रसाराने ज्याने दूर केला नि वेदार्थाची वाट सूकर केली, अशा व्याकरणसूर्याची आज जयंती. ज्याचे वर्णन व्याकरणसूर्य नि महान वैय्याकरणी असंच करावं लागेल असा हा वैय्याकरणी. काशीच्या ज्या शास्त्रार्थांस यावर्षी १५० वर्षे पूर्ण झाली, त्या शास्त्रार्थांत ज्यांनी पातंजल महाभाष्यांतली कल्म संज्ञा सनातनी विद्वानांना विचारतांच जे निरुत्तर झाले, ज्याने संस्कृत व्याकरण अतिशय सुलभ केलं आणि ज्याच्या परंपरेतल्या "पदवाक्यप्रमाणज्ञ वारावारिणः" अशा ब्रह्मदत्त जिज्ञासु नि युधिष्ठिर मीमांसकजींसारख्या वैय्याकरणींनी ही पदवी सार्थ केली, असा तो वैय्याकरणसूर्य...*

हिंदुंना अर्थात आर्यांना विशुद्ध वैदिक मत प्रदान करताना ज्याने अन्य अवैदिक मतांचीही समीक्षा अत्यंत तर्ककठोर नि अभ्यसनीय पद्धतीने केली नि ज्यामुळे अनेक मूळच्या हिंदु असलेल्या परंतु परपंथांत गेलेल्या लक्षावधींनी वैदिक धर्माचा स्वीकार केला, अशा *सत्यार्थ प्रकाश* नामक एका अद्वितीय ग्रंथांचा जो रचयिता... *एकीकडे सर्वधर्म एकाच ईश्वराप्रती जातात असा भोंगळ सिद्धांत मांडणारे एतद्देशीय भलेभले विद्वान असावेंत, अशांच्या मांदियाळींत सर्व पैशाचपंथांची चिकित्सा तर्काच्या नि वैदिक मताच्या आधारे करणारा हा धर्माचा पुनर्संस्थापनकर्ता...*

*शास्त्रार्थ महारथी...*

वैदिक हिंदुंची अत्यंत प्राचीन अशी शास्त्रार्थ परंपरा ज्याने पुनरुज्जीवित केली नि अनेक शास्त्रार्थांमध्ये पैशाचपंथींसहच स्वकीय अशा काही भरकटलेल्या मतानुयायींनाही ज्याने शास्त्रार्थांत पराभूत करून वैदिक पथांवर आरुढ केलं, अशा लेखारंभी उल्लेखिलेल्या शास्त्रार्थ महारथींच्या रांगेत बसणारा हा प्रखर वेदनिष्ठ...

*स्वातंत्र्याचा उद्गाता...*

लोकमान्य टिळकांनी म्हटल्याप्रमाणे स्वराज्य ही संकल्पना सर्वप्रथम महर्षि दयानंदांनीच मांडली. इतकं पुरेसंय.

*हिंदुसमाजाचा सत्यनिष्ठ उद्धारकर्ता...*

तत्कालीन सर्व अनिष्ठ रुढी नि प्रथांना प्रखर विरोध करणारा नि सर्व हिंदुंचे संघटन करणारा उद्धारकर्ता...

*ह्या सर्व लोकोद्धाराच्या महान कार्यासाठी ४४ वेळा प्राणहरणाचे कष्ट सहन केलेला, ज्यातले सतरा प्रयोग हे विषपानाचे आणि इतकं होऊनही सर्वांस क्षमा करणारा क्षमाशील...*

काय नि किती लिहावं...

*लेखणी बोथट होते, वाणी हिंपुटी होते...*

ह्या ऋषिवर्यांस जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन....!

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#ऋषिश्रेष्ठ_महर्षिश्रीदयानंद_जयंतीविशेष_वेदोद्धारक_आर्यसमाज_सत्यार्थप्रकाश