Friday 28 May 2021

प्लेग, सावरकर आणि सद्यःस्थिती

 




*पावित्र्याच्या तेजाने तळपणारे, ईश्वरावरील श्रद्धेचे शुभकवच ल्यालेले, मृगेंद्राचे सामर्थ्य नसानसांत स्फुरत असलेले, दीनदलितांबद्दल ह्रदयांत अपार करुणा असणारे सहस्त्रो युवक नि युवती हिमाचलापासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र संचार करतील; मूक्ती, सेवा आणि सामाजिक पुनरुत्थानाचे आणि सर्व प्रकारच्या सामाजिक समानतेचे आवाहन करतील नि हा देश पुन्हा पौरुषाने मुसमुसून उठेल.*


स्वामी विवेकानंद


आज सर्वत्र कोरोना नामक वैश्विक आपत्तीने अक्षरशः सर्व मानवजातींस जणु धारेंवर धरले आहे. अर्थात हे सर्व षड्यंत्र आहे. पण तरीही अशा अत्यंत विपन्नावस्थेमध्ये समाजासाठी, राष्ट्रासाठी, मानवतेसाठी कार्य करणाऱ्या हातांची आवश्यकता आहे. इतिहासांत काही पुरुषश्रेष्ठांनी अशाच जीवघेण्या आपदेमध्ये समाजाला सहाय्यतेचा आधार देऊन स्वकर्तव्यनिष्ठेचे पालन केले आहे. वर ज्यांचे उद्धरण दिलं आहे, त्या विश्वमानव श्रीमत्स्वामी विवेकानंदांनीही एक संन्यासी असूनही बंगालमध्ये जेंव्हा अशीच रोगाची साथ आली होती, तेंव्हा आपल्या सर्व संन्यासी गुरुबंधुंसह पूर्ण सामर्थ्यानिशी सेवाभावनेने सहाय्यता केली होती. जीवाची कोणतीही पर्वा न करता. त्याच काळांत...


इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणतात, ते काही खोटे नाही. त्यांच्याच प्रमाणे आज ज्यांची जयंती आहे, अशा हिंदुराष्ट्रपति श्री स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचीही एक घटना इथे प्रसंगोचित आहे.


*प्लेगचा कहर...*


आजपासून अगदी जवळ एकशे सव्वाशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रांत प्लेगची साथ आली होती. चाफेकर बंधुंची कथा सर्वांस ज्ञात असेलंच. ज्या नाशकांत स्वातंत्र्यवीर अगदी लहानाचे मोठे होत होते, तिथेही प्लेगने अक्षरशः थैमान घातले होते. आज कोरोनाची जी अवस्था आहे तीपेक्षाही अधिक भयाण अवस्था तींकाळी होती. आणि सावरकरांनी ती प्रत्यक्ष अनुभवली होती. त्यांनी त्यांच्या 'माझ्या आठवणी' ह्या आत्मचरित्रपर ग्रंथामध्ये ह्यासंबंधींच्या आठवणी दिल्याहेत. ते लिहितात की 


*"घरात एक माणसू प्लेगने लागला की देखोदेखी बायका-मुले, माणसे, घरचे घर एखाद्याआगीत भस्म व्हावे त्याप्रमाणे पटापट मृत्युमुखीपडून नष्ट व्हावें. एकेका घरात पाच-पाच, सहा-सहा प्रेतएकामागून एक पडलेली. कोणाचे प्रेत कोण उचलणार! वाड्याचा वाडा, पेठांच्या पेठा, घरोघर कण्हणेकिंकाळ्या, प्रेते, पळापळ, रडारड चाललेली, जे दुसऱ्याचे प्रेत आज उचलीत, तेच उद्या त्या संसर्गारशीप्लेगने लागनू परवा त्यांची प्रेते त्याच मार्गाने तिसऱ्यांस न्यावी लागत.तिथे कोण कोणाचे प्रेतउचलणार, मुलेें आई-बापाची प्रेते टाकून पळत, आई-बाप मुलांची प्रेते सोडून पळत; कारण घरात प्रेत आहे असे कळताच सरकारी अधिकाऱ्यांच्या आडदाडं सोजिराशी गाठ पडे! घर शुद्ध करण्यासाठी म्हणून उध्वस्त करणार. सामानाची जाळपोळ, लुटालुट होणार आणि उरलेले कुटुंबचे कुटुंब वनवासात नेऊन“सेग्रिगेशन"च्या अटकेत पडणार. पण तिथेही प्लेग, घरी प्लेग, दारी प्लेग! दैवी प्लेग, राजकीय प्लेग, ती भयंकर वर्णने वाचताना अंगावर अगदी शहारे उठत."*


त्या काळचे सेग्रिगेशन म्हणजेच आजचं क्वारण्टाईन...


पुढे सावरकर लिहितात की 


*आमच्या कुटुंबावरंही प्लेगचे संकट शेवटी कोसळलेच*


एकेदिवशी आमच्या कुटुंबावरही ते प्लेगचे संकट कोसळलेच. थोरले बंधु श्रीबाबाराव नि जन्मदाते पिताश्री दोघेही प्लेगला बळी पडले. धाकटे भाऊही. पुढे ते सगळे दोन तीन महिन्यांत बरेही झाले. त्यापूर्वी नाशिकांतले त्यांचे एक सहकारी श्रीरामभाऊ दातार म्हणून होते, ज्यांना प्लेगची लागण होताच, स्वतः सावरकरांच्या वडिलांनी त्यांच्या कुटुंबांला जीव धोक्यांत घालून सहकार्य केले होते. म्हणजेच इतरांसाठी आपला जीव संकटांत घालण्याची सावरकर कुटुंबाची परंपरा ही अशी होती.


मधील काळांत दुर्दैवाने त्यांच्या वडिलांचे देहावसानही झाले. घरांवर आर्थिक संकटही कोसळले.


*नाशकांतले त्यांचे एक परिचित असे उपरोक्त श्रीरामभाऊ दातार हे ह्याची जाण ठेऊन पुढे सावरकर कुटुंबाच्या सहकार्यांस तर धाऊन आलेच पण सावरकरांनी स्वतः आता भीड मोडून नि योग्य ती काळजी घेऊन प्लेगने गांजलेल्या समाजासाठी काही कार्य करायचे ठरवले. या कामी त्यांनी त्यांच्या गुप्त संघटनेचे स्वयंसेवकांचे एक पथक बनविले. कारण या काळातंच सावरकरांनी एका गुप्त मंडळाची स्थापना त्यांचे मित्र श्री म्हसकर नि श्री पागे नि प्लेगमधून सुटून आलेले त्यांचे दोन बंधु यांच्या मदतीने केली होती.*


*मित्रमेळ्याची स्थापनाही यांच काळात.*


भविष्यांत जिने अभिनव भारत ह्या संघटनेचे स्वरुप धारण केले, ती मित्रमेळाही ह्याच काळांत स्थापिली गेली. आश्चर्य म्हणजे सावरकरांना मात्र प्लेगची लागण त्यांच्या सौभाग्याने झाली नाही. यद्यपि त्यांना देवी लागण येऊन गेली होती. अर्थात ते योग्य ती काळजी घेतंच होते. पुढे त्यांनी त्या स्वयंसेवकांच्या संघाच्या वतीने प्लेगनिवारणाचे कार्य आरंभ केले. ते लिहितात


*प्रेते जाळणारे स्वयंसेवक पथक*


*"पुढे कधीकधी असंभाव्य वाटणारी बाबांची (बाबाराव सावरकर) ही सहनक्षमता, परोपकारता, मनोधैर्य तेंव्हा देखील निरनिराळ्या स्वरुपांत का होईना पण मधूनमधून प्रकट होई. त्यात सन १९००व्या आणि १९०१व्यावर्षाच्या मध्यंतरी नाशकास प्लेगची वार्षिक फेरी पुन्हा एकदा आली. आह्मीं मंडळी आता प्लेगला अगदीनिढार्वलो होतो. प्लेग येताच पळापळ होणाच्या जागी आह्मीं गावातंच राहावे. इतकेच नव्हे, तरनिराश्रित अशा प्लेगच्या रोग्यांची शुश्रुषा स्वतः करून शेवटी त्यांची प्रेते स्वतः खांद्यावर वाहून न्यावी. या कामी पुढाकार म्हणजे बाबांचा (थोरल्या बंधुंचा) आणि रामभाऊ दातारांचा. स्मशानाच्या वाऱ्या रात्रीबेरात्री आह्मीं जीवाची चिंता सोडून इतक्यांदा केल्या, की स्मशानाचे भय असे न उरता ते एखाद्या गजबजलेल्याजगतातल्या चौकासारखे बैठकीचा अड्डा वाटावे."*


म्हणजे आज जसे काही जण कोरोना योद्धे म्हणून समाजासाठी सर्वस्वाचा त्याग करून जीव संकटांत घालून सेवावृत्तीने लोकशुश्रुषेचे नि प्रसंगी प्रेत वहायचे काम करताहेत, तद्वतंच त्याकाळीही सावरकरांसारखे युवकही जणु 'प्लेग योद्धे' म्हणून समाजासाठी शुश्रेषेचे, प्रेत उचलायचे व ते जाळायचेही काम करत. एक स्वयंसेवक म्हणून हे कार्य करणं वाटतं तितकं सोप्पं नव्हे. कारण प्लेगची साथ इतकी भयानक होती की प्रेत उचलून नेणाराच दुसऱ्या दिवशी त्याच साथीने जायचा. म्हणून आजच्या कोरोना नामक वैश्विक संकटामध्ये सावरकरांचे हो निष्काम लोकसेवेचे उदाहरण अगदी वंदनीय ठरते...


ह्या समाजक्रांतिकारकांस त्यांच्या आजच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन...!


भवदीय...


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#स्वातंत्र्यवीर_सावरकर_प्लेग_मृत्यु_शव_कोरोना_स्वयंसेवक_समाजसेवक

Saturday 15 May 2021

उद्या भगवत्पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांची २५३०वी जयंती...

 


*शंकराचार्य...ही पाच अक्षरे ऐकली म्हणजे कर्णी आली की जणु पंचप्राण त्याठिकाणी एकवटल्यासारखे वाटते. अर्थात ही पाच अक्षरे म्हणजे जणु वैदिक हिंदुधर्माचा पंचप्राणंच आहेत.*


पूज्यपाद श्रीआचार्यांविषयी लिहायची माझी तरी योग्यता नाही. कारण आचार्यांच्या केवल चिंतनानेच अंतःकरणांत अश्रुंचा पूर येतो. खुंटला शब्द अशी अवस्था येते...तरीही गेल्या वर्षभरामध्ये आचार्यांची १९ संस्कृत नि इंग्रजी अनुवादित चरित्रे अभ्यासून माझ्या अल्पमतींस जे काही कळलं, ते संपूर्ण मांडण्याचा प्रयत्न यद्यपि ह्या लेखामध्ये संभव नसला तरी शीघ्रातिशीघ्र यावर येऊच. ती वेळ अर्थात आलीच आहे. 


ह्या सर्व चरित्रचिंतनातून भगवत्पाद पूज्यनीय श्रीमच्छंकराचार्यांच्या चरित्राचा कालपट निम्नलिखित पद्धतीने मांडता येणं संभव आहे. आह्मीं यापूर्वीही यावर लिहिलंच आहे पण ते फारंच संक्षेपाने. ही कालनिर्णयात्मक सूची पूज्यनीय श्रीभगवत्पादाचार्यांनीच स्थापिलेल्या श्रीशारदापीठाच्या अनुसारंच आहे. व उपरोल्लेखित १९ चरित्रांच्या अन्वये... अर्थात आमचा हा प्रयत्न 


*फोडिलें फांडार, धन्याचा हा माल।*

*मी तों हमाल, भार वाहें।*


इतकाच आहे.


*भगवत्पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांची उद्या २५३०वी जयंती... इसवी सन पूर्व ५०९ ते इसवी सन पूर्व ४७७ हा त्यांचा काल. ती ५०९ अधिक आजची २०२१ वर्षे. एकुण २५३०वी जयंती...*


*श्रीशारदापीठानुसार पूज्यपाद श्रीआचार्यांचा जीवनक्रम*


जन्म - वैशाख शुद्ध पंचमी - युधिष्ठिर शक २६३१ 


उपनयन संस्कार - चैत्र शुक्ल नवमी - युधिष्ठिर शक २६३६


संन्यास - कार्तिक शुक्ल एकादशी - युधिष्ठिर शक २६३९


गुरु श्रीगोविंदपादाचार्यांकडे शिक्षण पूर्ण - फाल्गुन शुक्ल द्वितीया - युधिष्ठिर शक २६४०


श्रीबद्रिकाश्रमामध्ये भाष्य पूर्ण - ज्येष्ठ वद्य अमावस्या - युधिष्ठिर शक २६४६


श्रीज्योतिर्मठाची संस्थापना - तत्रैव


ह्या ज्योतिर्मठाच्याच २५००व्या महोत्सवाची पत्रिका माझ्याकडे होती. मी त्यावर चार वर्षांपूर्वी लेख लिहिला होता. 


श्रीमंडनमिश्रांशी शास्त्रार्थ - मार्गशीर्ष वद्य तृतीया - युधिष्ठिर शक २६४७ 


श्रीशारदामठाची स्थापना - कार्तिक वद्य त्रयोदशी - युधिष्ठिर शक २६४८


श्रीशृंगेरी मठाची स्थापना - फाल्गुन शुक्ल नवमी - युधिष्ठिर शक - २६४८


श्रीमंडनमिश्रांस संन्यासदीक्षा देऊन त्यांचे नामकरण श्रीसुरेश्वराचार्य - चैत्र शुक्ल नवमी - युधिष्ठिर शक २६४९


सुधन्वा नावाच्या राजाशी संपर्क व त्याला वैदिक धर्मात पुनः आणणे - मार्गशीर्ष शुक्ल दशमी - युधिष्ठिर शक २६४९


श्रीसुरेश्वराचार्यांस श्रीशारदापीठांवर आरोहण - माघ शुक्ल सप्तमी -युधिष्ठिर शक २६४९


दिग्विजयाचा आरंभ - वैशाख शुक्ल तृतीया - युधिष्ठिर शक २६५०


श्रीतोटकाचार्यांचे आगमन - श्रावण शुक्ल सप्तमी - युधिष्ठिर शक २६५३


श्रीहस्तामलकांचे आगमन - आश्विन शुक्ल एकादशी - युधिष्ठिर शक २६५४


श्रीतोटकाचार्य आणि श्रीहस्तामलकांचे अनुक्रमे श्रीज्योतिर्मठ आणि श्रीशृंगेरी इथे आरोहण - पौष शुक्ल पौर्णिमा - युधिष्ठिर शक २६५४


श्रीगोवर्धन मठाची स्थापना - वैशाख शुक्ल दशमी - युधिष्ठिर शक २६५५


श्रीपद्मपादाचार्यांचे श्रीगोवर्धन मठांवर आरोहण - तत्रैव


दिग्विजय सुरुच - भाद्रपद पौर्णिमा - युधिष्ठिर शक २६५५ ते


श्रीशारदापीठांवरील अंतिम निवास - पौष अमावस्या - युधिष्ठिर शक २६६२


निजधामगमन - कार्तिक पौर्णिमा युधिष्ठिर शक २६६३


*कलियुगाचा आरंभ इसवी सन पूर्व ३१०२, १८ फेब्रुवारी. म्हणजे आजपासून ५१२३ वर्षे पूर्व. यापूर्वी ३८ वर्षे भर घातली की युधिष्ठिर शकाचा आरंभ. म्हणजेच इसवी सन पूर्व ३१४०.*


*आता आचार्यांचा जन्म युधिष्ठिर शक २६३१ म्हणजे ह्या ३१४० मधून २६३१ वजा केली...इसवी सन पूर्व ५०९ ठरतो..म्हणजेच आजपासून २५३० वर्षांपूर्वाचा...*


अस्तु।


उद्या आलोच तर युट्युबचैनलवर लाईव्ह येऊच...निश्चित नाही. विचार आहे पाहु....


भवदीय...


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#भगवत्पूज्यपाद_श्रीमच्छंकराचार्य_जयंती_शांकरदेशिक_शंकरविजय_युधिष्ठिरशक_कलियुग

Friday 14 May 2021

*भगवान भृगुनंदन श्रीपरशुराम आणि वेद*



अथर्ववेदाच्या पंचम कांडाच्या अठराव्या सूक्तामध्ये वेदविद्येच्या रक्षणाचा उपदेश केला आहे. ह्या संपूर्ण सूक्तामध्ये ब्राह्मण आणि राजन्य अर्थात क्षत्रियांच्या कर्तव्याचा उपदेश केला आहे. ब्राह्मण अर्थात ब्रह्म अर्थात वेदाध्ययन करणारे व अध्यापन करणारे जे आहेत व क्षतात् त्रायते इति क्षत्रियः, जे संकटापासून रक्षण करतात असे क्षत्रिय यांचे चिंतन करताना वेदमंत्रांनी जे काही प्रकट झाले ते भगवान श्रीभार्गवरामांच्या जयंतीदिनी पाहणं आवश्यक आहे. इथे राजन्य हा शब्द क्षत्रियांसाठीत योजिला आहे. कारण काही भारत विखंडन शक्ती राजन्य नि क्षत्रिय दोन्हीं वेगळे आहेत असे मांडण्याचा दुष्ट प्रयत्न करताहेत, आह्मीं मागेच त्यांचं षड्यंत्र हाणून पाडलं होते ही गोष्ट वेगळी. सावध रहावे ही विनंती. अस्तु।


भगवान श्रीभार्गवरामाचे वर्णन हे अग्रतश्चतुरो वेदाः असे केलं जातं. चारही वेद वेदाङ्गांसहित ज्यांच्या अग्रभागी आहेत, असे श्रीभार्गवराम. त्याचबरोबर पृष्ठतः सशरं धनुः म्हणजे ज्यांच्या पाठी शरासहित भाता आहे. असे ब्राह्मतेज नि क्षात्रतेज धारण करणारा हा अवतारश्रेष्ठ वेदमंत्रांच्या आधारे चिंतन करण्यांस युक्त आहे. वेदभगवान अशा क्षत्रिय नि ब्राह्मणाची मांडणी करताना म्हणतो की ब्राह्मण हा वेदतत्वाच्या आधारे चालणारा असेल तरंच तो महाप्रबल असतो. अन्यथा नाही. म्हणजे वेदाध्ययनहीन ब्राह्मण हा वेदांस मान्य नाही. 


*ओ३म् जि॒ह्वा ज्या भव॑ति॒ कुल्म॑लं॒ वाङ्ना॑डी॒का दन्ता॒स्तप॑सा॒भिदि॑ग्धाः। तेभि॑र्ब्र॒ह्मा वि॑ध्यति देवपी॒यून् हृ॑द्ब॒लैर्धनु॑र्भिर्दे॒वजू॑तैः ॥*


५।१८।८


*[ब्राह्मणाची] (जिह्वा) जीभ (ज्या) धनुष्याची प्रत्यंचा (असते), (वाक्) वाणी (कुल्मलम्) बाणाचा दंड (भवति) असते आणि [त्याची] (नाडीकाः) गळ्याचा भाग (तपसा) अग्नीने (अभिदिग्धाः) तापलेल्या (दन्ताः) बाणाच्या दातांसमान म्हणजे अग्रासमान असतो. (ब्रह्मा) ब्राह्मण (हृद्बलैः) हृदय तोडणाऱ्या (देवजूतैः) विद्वानांनी पाठविलेल्या (तेभिः) त्या (धनुर्भिः) धनुष्यांनी (देवपीयून्) विद्वानांस सतावणाऱ्यांस (विध्यति) छेदतो. ॥८॥*


हे अलंकारिक वर्णन भार्गवरामांस किती यथार्थ लागु होते.




पुढील मंत्रामध्ये तर आणखी बहारीचे वर्णन आहे. वेदभगवान म्हणतो...


*ओ३म् ती॒क्ष्णेष॑वो ब्राह्म॒णा हे॑ति॒मन्तो॒ यामस्य॑न्ति शर॒व्या॑३ न सा मृषा॑ । अ॑नु॒हाय॒ तप॑सा म॒न्युना॑ चो॒त दु॒रादव॑ भिन्दन्त्येनम् ॥*


अथर्ववेद - ५।१८।९


*(तीक्ष्णेषवः) तीक्ष्ण बाण असणारे, (हेतिमन्तः) वज्रासमान शस्त्र धारण करणारे (ब्राह्मणाः) ब्राह्मण लोक (याम्) ज्या (शरव्याम्) बाणांच्या समुहांस (अस्यन्ति) सोडतात, (सा) ती (मृषा) मिथ्या (न) नसते. (तपसा) तपाने (च)आणि (मन्युना) क्रोधाने (अनुहाय) पाठलाग करत (दूरात्) दुरूनंच (उत) ही (एनम्) ह्या वैरींस (अव भिन्दन्ति) छेदतात॥९॥*


म्हणजे इथे केवल तपानेच ब्राह्मण शत्रुंस पराभूत करतो हे सांगितलं आहे.


ह्या मंत्रांच्या आधीच्या मंत्रांमध्ये क्षत्रियाचे वर्णन असून तेही क्षात्रतेज अंगी धारण केलेल्या श्रीभार्गवरामांस लागु पडणारे आहेच. भगवान श्रीभार्गवरामांचे वर्णन करणारे अनेक श्लोक पुराणांतरी, रामायण-महाभारतीं असतील, पण ह्या वेदमंत्रांचे चिंतन पाहता इतके सुंदर वर्णन त्यांस लांगु होईल ह्यात काही संदेहंच नाही. 


*भगवान श्रीभार्गवरामांचे चरित्रचिंतन महाभारतादि ग्रंथांमधून पाहता त्यांच्या आजोबांस म्हणजे ऋचिकांस धनुर्वेद प्रत्यक्ष प्रकट झाल्याचा उल्लेख आहे. तर यांच महाभारताच्या आरण्यकपर्वामध्ये प्रत्यक्ष धनुर्वेदंच श्रीजमदग्नींसमोर चार अस्त्रांच्या सह प्रकट झाल्याचा उल्लेख आहे. अन्य ठिकाणी आहे. श्रीभीष्माचार्यांशी अंबेसंबंधी युद्ध करतानाही वर्णन आहे. संक्षेपांत धनुर्वेदाची किंवा विद्येची परंपरा श्रीभार्गवरामांस कशी प्राप्त झाली ते महाभारत सांगताना आपल्याला दिसते.*


*पण आश्चर्य म्हणजे परशुच्या विनियोगासंबंधी फारंच त्रोटक माहिती आहे. त्यामुळे शंकेस वाव आहे. अर्थात हा स्वतंत्र चिंतनाचा विषय असल्यामुळे हा विषय इथेच सोडतो...*


*अर्थात इथे जाता जाता सांगणं आवश्यक आहे की हे वर्णन केवल अलंकारिक म्हणून सांगितलं आहे. म्हणजे काही लोक ह्या वेदमंत्रांमध्येच श्रीभार्गवरामांचे वर्णन आहे असा कुतर्क करतील व वेदांमध्ये अवतारवाद शोधण्याचा किंवा इतिहास शोधण्याचा बालिशपणा करतील. हा प्रयत्न अर्थातंच लैदिक सिद्धांताना छेद देणारा असल्यामुळे आह्मीं त्यांचा संबंध भार्गवरामांशी जोडण्याचे कारण केवळ नि केवळ त्यांचे क्षात्रतेज नि ब्राह्मतेज दर्शविण्यासाठी जोडलेला आहे. कर्णपर्वात वर्णन आहे.*


कुणीही यावरून ह्या वेदमंत्रांमध्ये अवतारवाद शोधतील तर ते वडाची साल पिंपळाला जोडण्यासारखेचं होईल.


अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु।


भगवान श्रीभार्गवरामांस त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!


भवदीय...


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#भगवान_श्रीभार्गवराम_श्रीपरशुराम_भृगुनंदन_ब्राह्मणक्षत्रियराजन्य_महाभारत_परशु_धनुर्वेद

Friday 7 May 2021

भारतरत्न महामहोपाध्याय श्रीपांडुरंग वामन काणे जयंती विशेष

 



(७ मे, १८८० ते १८ एप्रिल, १९७२)


*अथातो धर्मशास्त्रेतिहासस्य जिज्ञासा।*


ईश्वरीय अशा आर्यसनातन वैदिक हिंदुधर्मशास्त्राचा सारगर्भित, सप्रमाण नि साधार इतिहास अध्ययन करणे हे येरागबाळ्याचे काम तर नोव्हेंच. पण त्यातही तो समग्र इतिहास शब्दबद्ध करणे हे तर त्याहूनही अत्यंत दुष्कर कार्य. हा सर्व इतिहास आपल्या विचक्षण विवेचनाने शब्दबद्ध करणाऱ्या एका विद्वद्वर्य्याची आज जयंती. 


*एक प्रखर धर्मसुधारक*


*अस्पृश्यता-केशवपनादि विकृत नि वेदविरुद्ध प्रथांवर कोरडे ओढणारा हा धर्मशास्त्रज्ञ महाराष्ट्रांत जन्माला आला हे आमचं भाग्य. विधवाविवाह नि विवाहविच्छेद(घटस्फोट) आदिंना धर्मशास्त्रीय प्रमाणांतून समर्थन करणारा हा धर्मसुधारक. इतकंच काय पण आमच्या भूवैकुंठ पंढरीत एका सकेशा विधवेच्या श्रीविठ्ठलपूजेच्या अधिकार प्राप्तीसाठी तिचे विधीज्ञपत्र घेणारा हा विधीज्ञ. आंतरज्ञातीय विवाहाचाही पुरस्कर्ता. लोणावळा येथे मीमांसातज्ञ श्री केवलानंद सरस्वती यांनी श्रीरघुनाथशास्त्री कोकजे, मम. श्रीधरशास्त्री पाठक आदि अनेक मान्यवरांच्या आधारे स्थापन केलेल्या धर्मनिर्णयमंडळाचाही सक्रिय पुरस्कर्ता...*


जरी ते धर्मसुधारक असले तरी आजच्या कथित धर्मसुधारकांसारखे धर्मविध्वंसक खचितंच नव्हते. त्यांचे एक महत्वाचे मत आह्मीं लेखाच्या अंती दिले आहे तें वाचावें.


*भारतरत्न श्रीकाणेंचे Magnum-Opus*


*History of Dharmashastra - Five Volumes - Seven Parts*


मुळ आंग्ल भाषेतले विचारधन - एकुण पृष्ठसंख्या ६४२७ - प्रथमावृत्ती



साडे-सहा सहस्त्र पृष्ठांचे हे मुळ आंग्ल साहित्य हे पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्राने सहा दशकांपूर्वीच प्रकाशित केलेलं आहे. सुदैवाने ते सर्व खंड आज पीडीएफ स्वरुपात www.archive.org ह्या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत. ह्याचा हिंदी अनुवाद उत्तर प्रदेश हिंदी संस्थानाने पाच खंडात प्रकाशित केला असून तो आमच्या संग्रही आहे. मराठीतही यशवंत आबाजी भटांनी तो अनुवादित केला असून अगदी संक्षेपांत दोन खंडांमध्ये राज्य सरकारने प्रकाशित केला आहे. तो अनुवाद खरंतर पूर्ण प्रकाशित होणार होता पण संक्षेपातंच झाला. तोही संग्रही आहे. पीडीएफ आहेतंच. जिज्ञासूंनी ते अवश्य संग्राह्य करावेत. 


हिंदुधर्मशास्त्राचा एवढा सखोल अभ्यास करून त्याची सविस्तर मांडणी करणारा पुरुष हा विरळाच ! काणेंचे हे कर्तृत्व अलौकिकंच म्हणून की काय भारत सरकारने त्यांना "महामहोपाध्याय व भारतरत्न" ह्या सर्वोच्च सन्मानाने संबोधित केलं होतं. 


अर्थात ह्या पंचखंडात्मक ग्रंथामध्ये काणेंनी केलेला धर्मग्रंथांचा कालनिर्णय मात्र त्यांनीच प्रामाणिकपणे तो अंतिम प्रमाण मानु नये असे लिहिल्याने तो स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे. 


*या खंडांविषयी काही विवेचन*


खरंतर हा स्वतंत्र लेखनाचा विषय असला तरी काही गोष्टींचा निर्देश अगदी संक्षेपाने करणं क्रमप्राप्त आहे.

 

*काणेंनी आपला परिचय पांचव्या खंडाच्या द्वितीय भागामध्ये दिलेला आहे, तो वाचण्यासारखा आहे. ह्याच पांचव्या खंडामध्ये बौद्धधम्माच्या किंवा पंथाच्या भारतातून नाहीसे होण्यामागच्या कारणांची जी मीमांसा त्यांनी केली आहे, ती फारंच चिंतनीय आहे. कारण ब्रिटीश नि वामपंथी म्हणजे डाव्या इतिहासकारांनी बौद्धविरुद्ध हिंदु संघर्ष पेटविण्यासाठी इतिहासाचे जे विकृत चित्र उभे केले आहे, त्याची साधार समीक्षा श्रीकाणेंनी केलेली आहे, जी वाचायलाच हवी. अधिक संदर्भ अर्थात हेमचंद्र रायचौधरींच्या पॉलिटिकल हिस्टरी ऑफ इंडिया मध्ये विस्ताराने आहेत, तिथे वाचावेत. तृतीय खंडात त्यांनी केलेल्या हिंदुंच्या प्राचीन आहारपद्धतीविषयीचे विवेचन काहीसं अमान्य आहे म्हणूनंच त्यांच्या मधुपर्काविषयीच्या लेखनाची समीक्षा आह्मीं आमच्या मधुपर्कावरील लेखांत स्वतंत्रपणे केली आहे, त्यांच्याविषयी पूर्ण आदर ठेऊनंच. पांचव्या खंडातंच त्यांनी हिंदुस्थानांतील धर्मस्थळांची जी माहिती दिली आहे, त्यांत आमच्या पंढरीविषयीचे विवेचन फार उत्तम आहे. विठ्ठलमूर्तीवरील आक्षेपांचे खंडनही चिंतनीय आहे. इतर खंडांमध्ये त्यांनी पुराणांचा केलेला समन्वयही अभ्यसनीय आहे.

 

विस्ताराने ह्या सर्व खंडांवरील परिचयात्मक लेखमाला वेळ मिळाल्यांस आह्मीं भविष्यांत कधीतरी लिहुच.


ह्याबरोबरंच काणेंनी इतरही विपुल ग्रंथसंपदा निर्माण केलीच केली, जिची विकीपीडियावर माहिती आहेच. विशेषतः संस्कृत काव्यशास्त्रांवरचा त्यांचा ग्रंथ फार चिंतनीय आहे. पाश्चात्यांनी घेतलेल्या आक्षेपांचे सप्रमाण खंडन काणेंच्या तर्कशुद्ध नि प्रत्युत्पन्न मतीचं प्रदर्शक आहे.


*जाता जाता...*


हिस्टरी ओफ धर्मशास्त्राच्या प्रस्तावनेत काणेंनी अतिशय सूचक व मार्मिक वक्तव्य केले आहे, जे चिंतनीय आहे. ते म्हणतात. 👇


आदरणीय काणेंची प्रस्तावना - मुळ आंग्ल खंड द्वितीय - दिनांक १५ मे, १९४१


*"धर्मशास्त्राच्या विशिष्ट विषयांचे प्रतिपादन करणारी उत्कृष्ट पुस्तके प्रख्यात विद्वानांनी जगाला सादर केली आहेत. तथापि, माझ्या माहितीप्रमाणे कोणत्याही एका लेखकाने समग्र धर्मशास्त्राची चिकीत्सा करण्याचा आत्तापर्यंत प्रयत्न केलेला नाही. त्या दृष्टीने हा ग्रंथ त्या विषयांवरील अग्रेसर ग्रंथाच्या स्वरुपाचा आहे. अनेक युरोपियन आणि भारतीय ग्रंथकारांची अशी रूढी पडून गेली आहे की भारताला सांप्रतकाळी पीडा देणाऱ्या बहुतेक अनिष्ट गोष्टी जातीव्यवस्था आणि धर्मशास्त्रात वर्णन केलेला जीवनक्रम ह्याच्यामुळे उत्पन्न झाल्या असल्याचे प्रदिपादन करावयाचे. बऱ्याच प्रमाणात मला हे मत मान्य नाही. मी असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे की मनुष्याचा स्वभाव महत्त्वाच्या बाबतीत सर्व जगभर एकसारखाच असल्याकारणाने भारतात उत्पन्न झालेल्या प्रकारच्याच अनिष्ट प्रवृती आणि अनिष्ट गोष्टी सर्वही देशात उत्पन्न होत असतात आणि त्या देशात जातिव्यवस्था अस्तित्वात असली अथवा नसली तरीही तेथील मूळच्या उपयुक्त संस्थांची कालांतराने भारतातल्याप्रमाणेच अनिष्ट अशी रुपांतरे होतात. जातिनिर्बंधामुळे काही विशिष्ट अनिष्ट परिणाम झाले आहेत ही गोष्ट मला मान्य केली पाहिजे; परंतु जातिव्यवस्था ही एकंच बाब अशा स्वरूपाची नाही. कोणतीही समाजव्यवस्था पूर्णत्वाला पोचलेली नसते आणि अशा अनिष्ट परिणामापासून सुरक्षितही नसते. मी स्वत: जरी ब्राह्मणप्रमुख अशा समाजात वाढलो असलो तरी विद्वान लोक एवढे मान्य करतील की मी सर्व प्रश्नांच्या साधक आणि बाधक अशा दोन्हीही बाजु मांडल्या असून नि:पक्षपातीपणाने प्रतिपादन करण्याचा प्रयत्न केला आहे."*


काणेंचे हे शब्द अत्यंत सूचक आहेत.


ते राज्यभेचे सदस्यही होते.


अशा विद्वत्तेच्या महासागरांस आज जयंतीनिमित्त साष्टाङ्ग प्रणाम...!


Pakhandkhandinee.blogspot.com


#भारतरत्न_महामहोपाध्याय_श्रीपांडुरंग_वामन_काणे_धर्मशास्त्राचा_इतिहास_अस्पृश्यता_केशवपन_विधवाविवाह

Sunday 2 May 2021

मृत्युंजयाचा अंदमानविजय

 




मृदनन् मृत्स्नां पुनरपि पुनर्हस्तजानुप्रहारैः, 

चक्रभ्रान्ति-व्यवसितकरोऽताडयन् मुद्गरीभिः।

निक्षिप्याग्नावदहदनिशं चेन्धनैः कुम्भकारः, 

सोऽहं धन्यो यदुपकृतये जीवनं धारयामि।


२ मे, १९२१...


पंचवीस नि पंचवीस वर्षांची अशा दोन काळ्या पाण्याची ठोठविलेल्या शिक्षा सहन करण्यासाठी २७ वर्षांचा एक तरुण त्या अंदमान नामक मृत्युच्या दाढेत शिरला. बैरिस्टर झालेला प्रज्ञावंत युवक


त्वत्स्थंडिली ढकलली गृहवित्तमत्ता 


म्हणत त्या काळ्या पाण्याच्या प्राशनासाठी उद्युक्त झाला. रामायणकाली श्रीरामांस ज्याप्रमाणे वनवासामध्ये त्याच्या कनिष्ठ सौमित्राने क्षणन्क्षण सहवास केला, तद्वतंच

 

त्वत्स्थंडिली अतुलधैर्य वरिष्ठ बंधु, 

केला हविं परमकारुणपुण्यसिंधु 


म्हणत त्याचा ज्येष्ठ बंधुही तिथेच त्याच अंदमानात सहबंदीवान म्हणून काळ कंठित होता. ज्यांचे समग्र जीवन क्रांतिप्रवण होते नि ज्यांचे विचार क्रांतिगर्भ होते, अशा स्वातंत्र्यवीरांच्या ज्येष्ठ बंधुंच्या, त्यांच्या पाठी पित्यासमान असलेल्या एका अतुल धैर्य वरिष्ठ बंधुंच्या, ज्यांचं समग्र जीवनंच उपेक्षित अंधाऱ्या कारावासांत नि अप्रसिद्धीच्या गुहागुंफात संपून गेले, ज्यांचे जीवन म्हणजे अमूल्य रत्नांची खाणंच आहे नि ज्यांत उदात्त अन् उज्ज्वल प्रसंगांचे कोहिनूर ठासून भरलेले आहेत, ज्यांनी सोसलेल्या नरकयातना ह्या तात्यारावांइतक्याच, किंबहुना अधिक आहेत, ज्यांचे समग्र जीवन हिंदुराष्ट्राच्या नि हिंदुत्वाच्या नि हिंदुसमाजाच्या उत्कर्षासाठीच वाहिलेले होते, अनेक गुप्त क्रांतिकारी संघटनांचे जे उद्गाते नि अनेक तरुण क्रांतिकारकांचे जे मार्गदर्शक असे अंदमानदंडित क्रांतिवीर श्री गणेश दामोदर उपाख्य श्रीबाबाराव सावरकर...



ह्या दुष्टचक्रांतही तो वीर श्रीविनायक नि ते श्रीबाबाराव तिथल्या सहबंदिवानांस संघटित करत, त्यांना सुशिक्षित करत, त्यांच्यातला आत्मविश्वांस दृढ करत, त्यांची धर्मनिष्ठा बलिष्ठ करत, त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करत, त्यांच्यासाठी सहस्त्रो ग्रंथांचे ग्रंथालय निर्माण करत त्यांच्या बौद्धिक विकासांस हातभार लावत होतेच. पण इतकं करूनही तो महाकवी बालपणी पाहिलेलं आपलं महाकाव्याचे स्वप्न पूर्ण करण्यांस हाच काळ योग्य आहे म्हणून खिळ्यांच्या नि भिंतींच्या सहाय्याने आपले कमला, विरहोच्छवास, गोमांतक आदि हे दहा सहस्त्र ओळींचे काव्य निर्मीत होता. ह्या महाकवीच्या नवनवोन्मेषशालिनी प्रतिभेच्या आस्वादाचे चिंतन करण्यांस कुणी प्रतिभावंतांनेच पुढे व्हावं. आमची ती योग्यता नाही.

अंदमानाची ती कालकोठरी ही बंदिवानासाठी जणु मृत्युच ठरणारी होती. इतकं कार्य करूनही हा युवक आपल्या ज्येष्ठ बंधुसह त्या जन्मठेपेतून बाहेर आला. जणु तो मृत्युवर विजय प्राप्त करता झाला. मृत्युंजयाचा तो आत्मयज्ञ २ मे, १९२१ या दिवशी पूर्ण झाला तो एका नूतन प्रवासासाठी. अंदमानपर्वाची ती समाप्ती त्या दोन्हीं मृत्युंजयवीरांस दिगदिगांतांत कीर्ती प्रदान करतीं झाली.

ह्या दोन्हीं वीरांस अंदमानपर्वाच्या त्या समाप्तीच्या शतकमहोत्सवानिमित्त कोटी कोटी अभिवादन नि शिरसाष्टाङ्ग दंडवत...!


लेखाच्या आरंभी योजिलेल्या श्लोकाचा अर्थ


मातीला पुनः पुनः हातांच्या नि गुडघ्यांच्यां प्रहारांनी तथा चक्राच्या भ्रमणाने हात लाऊन कुंभाराने जणु आह्मांस प्रहार केला. तत्पश्चात अग्नीमध्ये आह्मांस निरंतर जाळलं. इतकी कठिणता सहन करून आह्मीं धन्य झालो. कारण ह्या परोपकाररुपी पिपासुंची पिपासा क्षमविण्यासाठी आह्मीं ह्या जीवनांस अर्थात जलांस धारण करत आहोत.


भवदीय...


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#सावरकर_अंदमानपर्व_शताब्दी_महोत्सव_बाबाराव_काळेपाणी_क्रांतिवीर