Wednesday 14 November 2018

अथ ऋग्वेदे यम-यमी सूक्त विचार: । - लेखांक तृतीय

मागील द्वितीय लेखांकात आपण चतुर्वेदभाष्यकार श्रीमत्सायणाचार्यांची वेदभाष्याविषयीची नि एकुणच वेदांविषयीची भूमिका त्यांच्याच शब्दांत पाहिली. ज्यांना तो लेखांक वाचायचा असेल, त्यांनी इथे वाचावा ही विनंती.

*http://pakhandkhandinee.blogspot.com/2018/11/blog-post_10.html?m=1*

आता त्या लेखांतच म्हटल्याप्रमाणेच या लेखामध्ये आपणांस त्यांच्या यम-यमी सूक्ताविषयीच्या विचारांची मांडणी करायची आहे नि त्याची समीक्षा करायची आहे.

सायणांचे भाष्य अनेकांनी प्रकाशित केलं. *आम्ही प्रस्तुत लेखमालेसाठी परमादरणीय राष्ट्रसूत्रधार श्रीलोकमान्य टिळकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पुण्यातच स्थापन झालेल्या वैदिक संशोधन मंडळाने संपादित केलेली ऋग्वेदभाष्याची चतुर्खंडात्मक संपूर्ण संस्कृत प्रतच अभ्यासली आहे. राजवाडे, सातवळेकर आदि विद्वानांनी त्याचे संपादन केलं होते. आंतरजालांवर ती पीडीएफ स्वरुपांत*

https://archive.org/search.php?query=Rg%20Veda%20with%20Sayana%27s%20Commentary

येथे प्राप्य आहे. जिज्ञासूंनी ती इथे अभ्यासावी. अस्तु ।

ह्याचे चार खंड असून चतुर्थ खंडात नवम नि दशम मंडलाचे भाष्य असून पृष्ठ क्रमांक २९४ ते २९९ पर्यंत हे यम-यमी सूक्त आहे. ह्यात सायणाचार्यांनी जागोजागी यम-यमींस भाऊ-बहीणच सिद्ध करण्याचा अट्टाहास केलेला आहे हे ज्याला संस्कृत कळतं त्याला सहज लक्षात येईल. ज्यांना संस्कृत येत नाही त्यांनी पंडित श्रीराम शर्मा आचार्यांचे सायणावलंबी भाष्य अभ्यासावे. तेही पीडीएफ उपलब्ध आहे. किंवा कोणत्याही सायणाचार्यांच्या हिंदी भाष्यकाराचे अभ्यासावे. *सोबत मूळ सायण भाष्य नि त्याचा पंडित भीमसेन शर्माकृत हिंदी भाष्य १८९५ ह्या वर्षीचे हे सर्व पीडीएफ जोडलंच आहे.*

https://drive.google.com/file/d/1yKbm5-TwTZVPmVY5AeDmGJaUVAP9hzNB/view?usp=drivesdk

ह्या सूक्ताच्या प्रथम मंत्रामध्ये सायणाचार्यांच्या मते विवस्वान नामक पुरुषांस जन्माला आलेले यम-यमी नामक पुत्र-पुत्री असून एके दिवशी एका निर्जन अशा विस्तीर्ण समुद्राच्या तीरावर मध्यभागी यमी यमांजवळ येऊन त्यांस प्रणययाचना करते. द्वितीय मंत्रामध्ये आपण दोघे सहोदर असल्याने हा संपर्क योग्य नाही असे बोलून यम तिला नाकारतो. केवळ हा भाग निर्जन आहे म्हणजे आपल्याला इथे कुणी पाहणार नाही हा तर्क खोडताना यम तिला वायु, अंतरिक्ष आदि साक्षीदारांची मांडणी करतो नि ते आपलं हे निंद्यनीय कर्म पाहतील असा तर्क करतो. ईश्वराने ही सर्व व्यवस्था केली आहे असे सांगतो. तृतीय मंत्रात तर यमीचे उत्तर सांगताना सायणांनी  प्रजापतीने अर्थात ब्रह्मदेवाने पूर्वी स्वकन्येशी ते कर्म केलं असा संदर्भ देऊन यमी याचना करते असे भाष्य केलं आहे. किंवा पूर्वी देवांनीही ते कर्म केलं आहे असे लिहिलंय.

सायणाचार्यांसारख्या विद्वानांनी असे लेखन करावे? कधी देवांनी असे निंद्य कर्म केलंय ? हे त्यांच्या समग्र वेदभाष्याविषयीच्या भूमिकेशी, जी आम्ही मागील लेखांकातच मांडलीच आहे, तिच्याशी पूर्ण विद्रोह करणारे आहे. म्हणून आमचं ठाम मत आहे की सायणांचे हे भाष्यच नव्हे. आणि जरी असले तरी हे निंद्यच आहे. मूळीच अनुकरणीय नाही.

*मूळात प्रजापतीने स्वदुहितेशी अर्थात ब्रह्मदेवाने स्ककन्येशी व्यभिचार कर्म केले असा जो आरोप ऐतरेय ब्राह्मणांच्या मूळ सूर्य नि उषेच्या अलंकारिक कथेवरून पुराणकथाकारांनी लावलेला आहे की ज्यावरून वैदिक धर्मांवर वाट्टेल ते घाणेरडे आक्षेप घेण्यांस शत्रुंचं फावतं, ती प्रजापतीची दूहिता ही कथा नेमकी काय आहे येंविषयी निरुक्तकारांनी स्पष्ट अभिप्राय दिला असून, अगदी ऐतरेय ब्राह्मणकारांनीही ती कथा सूर्याचे रुपक आहे असे स्पष्ट सांगूनही तिचा संबंध तथाकथित चतुर्मुखी ब्रह्मदेवाशी जोडून त्यांस निंदित करण्याचे पातक जे झालं आहे, त्याविषयी स्वत:ला पुराणप्रेमी म्हणविणारे काय स्पष्टीकरण देणार आहेत ?*

सुदैवाने ह्यावर सर्वप्रथम *वेदोद्धारक महर्षि दयानंदांनी त्यांच्या *ऋग्वेदादिभाष्यभूमिका* ह्या ग्रंथामध्ये स्पष्टपणे शंका निरसन केलंच आहे. ही *कथा अलंकारिक आहे* हे सप्रमाण सिद्ध केलं आहे. पुढे *वेदमहर्षी श्रीपाद दामोदर सातवळेकरांनीही त्यांच्या वेदभाष्यामध्ये नि *भारतीय संस्कृती* नामक ग्रंथामध्ये ह्या *प्रजापतीची दुहिता* नामक कथेचा विस्तार करताना ती सूर्याची अलंकारिक कथा किंवा *त्या प्रजापतीच्या अर्थात राजाच्या सभा नि समिती अशा दोन कन्या असा राज्यव्यहारपरक अर्थ लावला आहे. ह्यासाठी त्यांनी अथर्ववेदाच्या मंत्राचाच संदर्भ दिला आहे.* ज्याने वैदिक साहित्याचे प्रामााणिक अध्ययन डोळसपणे केलंय, त्याला हे अलंकार सहजगत्या लक्ष्यात येतीलच. अस्तु !

तरीही सायणाचार्य ह्या सूक्तामध्ये प्रजापतीची दूहिता ह्या कथेचा विकृतार्थ काढून यमीच्या मुखातून ते उच्चारतात हे कितपत वैदिक सिद्धांतांस धरून आहे ? यद्यपि पुढील मंत्रांत यमाने तिचा निषेध केला असला तरी हा अर्थ विकृतच आहे. सायणांनी सूर्यापासून सरण्युंस हे दोन पुत्रपुत्री झाले असे यमाच्या तोंडी घातलंय. आता मूळात सूर्य हा जड पदार्थ आहे. तो कसा रुप धारण करेल ? सूर्य नामक जडापासून कशी कुठल्या स्त्रींस कन्यापुत्र होतील ? वेदांमध्ये स्पष्टपणे मनुष्यजीवनिर्मितीसाठी स्त्री-पुरुषांचे रजो-वीर्यमीलन हेच मैथुनी सृष्टीचे कारण यजुर्वेदामध्ये सांगितलं आहे, ज्यात पुरुष हा उपादान कारण असून स्त्री ही निमित्त कारण आहे. अमैथुनी सृष्टी ही केवळ आदिसृष्टीत होते अशी वेदांची स्पष्ट मान्यता असल्यामुळे इथे सूर्याची कुठल्याही स्त्रीपासून संतानोत्पत्ती संभवच नाही. हे सर्व आम्ही यम-यमींस मानवदेहधारी स्त्री-पुरुष अथवा जीवविशेष मानणार्यांसाठी लिहिलं आहे.

पुढील सहाव्या मंत्रामध्ये यमीने स्वर्ग (द्यौ) नि नरक नामक स्थानविशेषाची गोष्ट केली आहे की जी वैदिक सिद्धांतांस मूळीच अनुसरून नाही. *स्वर्ग किंवा नरक हे कोणतेही स्थानविशेष नसून निरुक्तकारांनी स्पष्टपणे त्यांस केवळ सुखादि भावना हेच नाव दिलं आहे. येविषयी आमचा एक आधीचा लेख आहेच. निरुक्तकारांनी स्पष्टपणे अध्याय २ खंड १२ व १३ येथे स्पष्टपणे स्वर्ग हा कोणताही स्थानविशेष नसून तो केवळ सुखनाम आहे असे स्पष्ट सांगितलं आहे. तरीही सायणाचार्य निरुक्तकारांना नाकारताना ते स्थानविशेष असे मानताना दिसतात. हे भाष्य खरंच सायणांचेच आहे का ?*

*स्वत: परमहंस भगवान पुज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांनीही वैकुंठादि लोक स्थानविशेष नाहीत असे स्पष्ट एका स्तोत्रांत लिहिलं आहे. तो संदर्भ मी सविस्तर देईनच.*

*दहाव्या मंत्रामध्ये "जामय:" शब्दाचा अर्थ सायणांनी बहिण असा काढलाय. वास्तविक पाहता निघण्टु मध्ये १.१२ येथे जामि हे उदकनाम अर्थात जल ह्या अर्थाने आहे. अंगुली अर्थात बोट असाही दिलाय.*

अमरकोशामध्ये जामि शब्दाचा अर्थ

*जामि स्त्री। भगिनी*

*समानार्थक: भगिनी,स्वसृ,जामि*

*३।३।१४२।२।२* असा दिला आहे तर तिथेच आणखी कुलस्रिया किंवा स्नुषा अर्थात सून असाही आहे. मनुस्मृतीमध्येही जामयो म्हणजे घरातील स्त्रिया असा शब्द आहेच.

ऋग्वेद ६.२५.३ येथील मंत्रानुसार

*इन्द्र॑ जा॒मय॑ उ॒त येऽजा॑मयोऽर्वाची॒नासो॑ व॒नुषो॑ युयु॒ज्रे । त्वमे॑षां विथु॒रा शवां॑सि ज॒हि वृष्ण्या॑नि कृणु॒ही परा॑चः ॥*

म्हणजेच वेदाच्या प्रत्यक्ष अंत:साक्षीनुसार इथे *जामय शब्दाचा अर्थ पतिव्रता भार्या* असाच घ्यायला हवा. महर्षि दयानंदांनीही तोच घेतला आहे. बहिण म्हणून नव्हे.

*ज्या सायणांनी आपल्या वेदभाष्याच्या भूमिकेत स्पष्टपणे वेदांमध्ये कोणताही मनुष्यादिकांचा किंवा कुणाचाही इतिहास नाही असे स्पष्ट म्हटलं आहे, तेच सायण प्रजापतीने अर्थात ब्रह्म्याने स्वकन्येशी व्यभिचार केला असे लिहितील का? किंवा देवांनी असे कर्म आधी केलं असे लिहितील का ? बरं ह्याच सायणांनी वेद सृष्ट्यारंभीच प्रकाशित झाले असे स्पष्ट लिहिलं आहे. असे सायणाचार्य श्वेताश्वतरोपनिषदाच्या*

*यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै ।*

ह्या वचनानुसार त्या परमात्म्याने त्या ब्रह्म्यांस चार वेद दिले असे वचन कसे नाकारतील ? ह्याचाच अर्थ हे भाष्य सायणांचे नाहीयेच हे सिद्ध होते. अन्यथा ते त्यांच्याच भूमिकेशी विरोध कसा दर्शवतील ? बरं जरी त्यांचं आहे असे मानलं तरी स्वप्रतिज्ञाहानीचा नि पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा अदि सर्वांशीच विरोध केल्यासारखं होईल.

बाराव्या मंत्रातही यमाचा नकार कळविताना सायण बहिण-भावांचा संपर्क पाप आहे असाच अर्थ घेतात. तो पाप आहे हे जाहीरच आहे पण मूळात ते भाऊ बहीणच नाहीत तर. तेराव्यांतही ती यमी यमांस अन्य स्त्रीला तु स्वीकारशील पण मला नाही असा आरोप करते. शेवटी चौदाव्या मंत्रांत यम तिला पुन्हा परपुरुषाशी संपर्क करण्यांस सांगून स्वत:पासून विलग करतो.

असा हा एकुण यम-यमी सूक्ताचा सायणप्रणीत अर्थ आहे. ज्यांना अधिक इच्छा असेल, त्यांनी सायणांचे कोणतेही भाष्य उघडून पहावं. आम्ही वर पीडीएफ दिलीच आहे.

*आता आश्चर्याची गोष्ट अशी आहे की ह्याच सायणांनी यजुर्वेदाच्या १२.६३ येथील मंत्रामध्ये मात्र यम-यमींस पती-पत्नी मानलंय.*

आणि इथे मात्र ते ह्या सूक्तामध्ये तींस भाऊबहिण मानतात. असे का ? मान्यय की सूक्तानुसार नि मंत्रानुसार अर्थ बदलतो. पण इतका विरोध ?

असो पुढील लेखांकामध्ये ह्या सूक्ताविषयी अन्य भाष्यकारांनी दिलेले अर्थ पाहुयांत.

अस्तु ।

क्रमश: ।

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

*#ऋग्वेद_यमयमी_सायणाचार्य_ऋग्वेदभाष्य_वेदकालीन_विवाहसंस्था_राजवाडे_वास्तव_विपर्यास:*

Saturday 10 November 2018

अथ ऋग्वेदे यम-यमी सूक्तविचार: । - लेखांक द्वितीय


सत्य-असत्यासी मन केले ग्वाहीं ।
मानियेलें नाही बहुमता ।

जगद्गुरु श्रीतुकोबाराय

मागील लेखांकात म्हटल्याप्रमाणे इथून पुढे ह्या सूक्तावरील आक्षेपांचे विचारमंथन करायचे आहे. ज्यांना प्रथम लेखांक वाचायचा असेल त्यांनी तो

http://pakhandkhandinee.blogspot.com/2018/11/blog-post_9.html?m=1

इथे वाचावा ही विनंती. आता प्रथम आक्षेपाचा विचार करुयांत.

*आक्षेप क्रमांक १* - म्हणे हे सूक्त यम-यमी नामक भावा बहिणीचे आहे म्हणे - इति सायणाचार्य नि तदनुयायी सर्व सनातनी परंपरेतले वेदभाष्यकार नि त्यांचे अनुयायी नि धर्मप्रेमी विद्वान. सर्व पाश्चात्य नि तदनुयायी एतद्देशीय विद्वान किंवा इतिहासकार

*उपरोक्त आक्षेपाचं समाधानपूर्वक खंडन* -

ह्या सुक्तांस भाऊ बहिण मानायचा भ्रम प्रामुख्याने आरंभ झाला तो इथपासूनच. वास्तविक पाहता सायणाचार्य हे वेदांविषयीचे एक नामांकित नि अतिशय चतुरस्त्र विद्वान. ज्यांनी चारीही वेदांवर प्रथम भाष्य केलं आहे नि तत्संबंधित वैदिक साहित्यावरही विस्ताराने भाष्य केलंय असे सायणाचार्य हे वेदजगतांत गौरवाने उल्लेखिले जातात. त्यांचे स्थान खूप मोठं असल्याने त्यांच्याविरोधात लेखणी हाती घेताना त्यांच्याविषयीच्या आदरांस कुठेही न्यूनता न आणता सत्य मांडण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांचा कालावधी विक्रम संवत १३७२ ते १४४४ आहे. इसवी सन १२३७ ते  १३०९.

सायणाचार्य हे बुक्क प्रथम, कंपण, संगम द्वितीय, हरिहर द्वितीय, विजयनगर आणि उपराज्ये येथील राज्यांचे मंत्री होते. सायणाचार्य हे यजुर्वेदी बौधायनसूत्री ब्राह्मण हे त्यांनी स्वत:च सांगितलं असून त्यांच्या भावाने अर्थात माधवानेही हेच लिहिलं आहे. सायणाचार्यांनी प्रथम यजुर्वेदाची तैत्तिरीय संहिता, काण्व संहिता, ऋग्वेद, अथर्ववेद आणि सामवेद असे चारीही वेदांवर भाष्य केलं असून आठ ब्राह्मणग्रंथांवर नि आरण्यकांवरही त्यांचे भाष्य आहे. त्यांच्या ऋग्वेदभाष्याच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी त्यांनी

*वैदिकमार्गप्रवर्तक श्रीबुक्क महाराजांच्या समयीच ह्या ऋग्वेदभाष्याचे लेखन झालंय*

असे स्पष्ट म्हटलं आहे. ऋग्वेदभाष्यापूर्वी त्यांनी प्रथम तैत्तिरीय संहिता, ब्राह्मण ग्रंथ नि आरण्यकांचे भाष्य केले होते.

*सायणाचार्यांचे भाष्य त्यांचे एकट्याचे नाही हे त्यांनी स्वत:च मान्य केलंय.*

आमच्या आधीच्या काही लेखांमध्ये आम्ही स्पष्ट लिहिलं होते की सायणाचार्यांचे भाष्य हे संपूर्णत: सायणांचे नाहीये. त्याला प्रमाण निम्नलिखित.

त्यांनी त्यांना त्यांच्या वेदभाष्यांत सहाय्यकृत झालेल्या भाष्यकारांचे नावही स्पष्टपणे उल्लेखिलं आहे.त्यांची नावे अशी

१. *नारायण वाजपेययाजी*
२. *नरहरिसोमयाजी*
३. *पंढरी दीक्षित*

ह्याचे कारण हेच आहे की सायणाचार्यानी भाष्य करायच्या आधी प्रत्येकवेळी जी भूमिका लिहिली आहे तींत नि तदनंतर केलेल्या भाष्यांत काहीवेळा परस्परभेद दिसून येतो. हे कसे ते पाहुयांत.

सायणाचार्यांच्या प्रमुख सैद्धांतिक मान्यता पाहुयांत ज्यातून त्यांची वेदभाष्य करण्यामागील दृष्टी लक्षात येईल. सविस्तर प्रमाण न देता केवळ निर्देश करतो आहे.

१. *यस्य निश्वसितं वेदा:* यावरून वेद हे ईश्वरोक्तच असून ते त्याचे नि:श्वास आहेत. *यथा घटपटादि द्रव्याणां..* ह्यावरून ते स्वत: प्रमाण आहेत, त्यांना इतर कुठल्याही प्रमाणाची आवश्यकता नाही. ह्यासाठी त्यांनी पूर्वमीमांसेतल्या १.१.२ येथील *चोदनालक्षणोsर्थोधर्म:* ह्या सूत्रावरील शाबरमूनींचे भाष्य प्रमाण म्हणून दिलंय. इंद्रादि शब्दांवरून प्रत्यक्ष परमेश्वराच्या रुपाचेच ग्रहण करा असे ते सांगतात. हे शाबर भाष्य सुदैवाने पीडीएफ उपलब्ध आहे.

२. *जीवविशेषैरग्निवाय्वादित्यैर्वेदानामुत्पादित्वात्*  ह्यावचनावरून जीवविशेष अशा अग्नी, वायु, आदित्य आणि अंगिरा ह्या चार ऋषींना ईश्वराने वेद हे जीवसृष्ट्यारंभी अंत:करणात प्रकट केले नि तिथून ते आपणांस परंपरेने प्राप्त झाले हेच सांगितलं आहे. *श्रुते: ईश्वरस्य अग्न्यादि प्रेरकत्वेन निर्मातृत्वं द्रष्टव्यम्* असे शब्द वापरले आहेत त्यांनी. त्यासाठी ऐतरेय ब्राह्मण ५.३२ येथील संदर्भ योजिला आहे.

३. जैमिनीच्या पूर्वमीमांसेतील प्रथम अध्यायाच्या द्वितीय पादांतील सूत्र ३१ ते ४५ यावरील शाबरभाष्याचे विस्तारपूर्वक प्रमाण देऊन सायणाचार्यांनी आणखी काही सिद्धांत मांडले आहेत, ज्यात एक म्हणजे वेदमंत्रांचे उच्चारण केवल अदृष्ट नव्हे तर दृष्ट फलासाठीही असल्याने ते निरर्थक नाहीत. मंत्र अर्थासाठीच आहेत.

४. जिथे वेदमंत्रांचा सरळ अर्थ निघत नसेल तिथे गौण अर्थ घ्यावा.उदा. *चत्वारि शृंगा त्रयोsस्य पादा* ह्या मंत्रांत त्या वेदपुरुषांस बेैलासारखे चार शिंगे आहेत असा अर्थ नसून इथे गौण अर्थ म्हणजे ते चार शिंगे हे होता, अध्वर्यु, उद्गाता आणि ब्रह्मा हे चार आहेत असे सायण सांगतात.

५. जिथे वेदांमध्ये परस्परविरोधी वचने आहेत असे वाटेल(तसं ते नाहीयेच तरीही) तिथेही गौण अर्थच घ्यावा. तुच माता नि तुच पिता असा मंत्र असेल तर इथे विरोध आहे असे न धरता एकत्वच आहे असे समजावे.

६. वेदांमध्ये बबर आदि मनुष्यादिकांचा, ऋषींचा, राजांचा किंवा अन्य कुठल्याही अनित्य व्यक्तिविशेषाचा इतिहास आहे का ह्याचे खंडन त्यांनी पूर्वमीमांसेतल्या १.१.३१ येथील *परन्तु श्रुतिसामान्यमात्रम्* ह्या सूत्राचा आधार घेऊन वेदांमध्ये नित्य पक्ष आहे त्यामुळे अनित्य अशा व्यक्तींचा वेदांत इतिहास नाही असा स्पष्ट सिद्धांत मांडला आहे. म्हणजेच वेदांमध्ये मानवांचाच काय कुणाचाच इतिहास मूळीच नाही. वेदांमधील नावे ही यौगिक आहेत, लौकिक नाहीत. कारण ते वेद हे अपौरुषेय आणि नित्य आहेत.

७. वेद कुणी रचले आहेत का ह्याचे खंडन करताना सायणांनी *उक्तं तु शब्दपूर्वत्वम्*, *आख्या प्रवचनात्* ही पूर्वमीमांसेची सूत्रे देताना वेदांचा कुणीही मनुष्य किंवा स्त्रीकर्ता नाही असे स्पष्ट सांगितलं आहे. म्हणजेच वेद कुणीही मनुष्याने रचलेले नाहीत.

८. वेदांच्या अपौरुषेयत्वासाठी अर्थात ईश्वरोक्तत्वासाठी सायणांनी ब्रह्मसूत्रातील (उत्तर मीमांसेतील) *शास्त्रयोनित्वात्*, *अत एव च नित्यत्वम्* ही दोन सूत्रे देऊन आणि *वाचा विरुपा नित्यया* हा ऋग्वेद ८.७५.६ येथील मंत्र देऊन आणि महाभारतातील *अनादिनिधना नित्या वागुपसृष्टा स्वयंभुवा* हा श्लोक देऊन वेदांचे अपौरुषेयत्व सिद्ध केलं आहे. वेदवाणी ही ईश्वरप्रणीत नि जीवसृष्ट्यारंभी हे सांगितलं आहे.

ही एकुण सायणाचार्यांची वेदांविषयीची सैद्धांतिक मान्यता आहे. हे सर्व संदर्भ आम्ही त्यांच्या वेदभाष्यापूर्वीच्या उपोद्घातांतीलच दिले आहेत. जिज्ञासूंनी ते स्वत: अभ्यासावेत.

*आश्चर्य म्हणा किंवा आणखी काहीही*

पण हेच सिद्धांत *आर्य समाजाचे संस्थापक वेदोद्धारक महर्षि दयानंदांनीही दीडशे वर्षांपूर्वीच त्यांच्या *ऋग्वेदादिभाष्यभूमिका* नि *सत्यार्थ प्रकाश* आदि ग्रंथामध्ये मांडले आहेत. तरीही ह्याच महर्षि दयानंदांच्या नि सायणाचार्यांच्या वेदभाष्यांत अनेकठिकाणी भेद आहे. कारण एकच आहे की सायणाचार्यांनी हे सिद्धांत पुढे भाष्य करताना सर्वच ठिकाणी पाळल्याचे दिसतच नाही ही शोकांतिकाय. ह्यावरूनच सायणांचे सर्वच भाष्य हे सायणांचे नाही हे आम्ही जे वर लिहिलंय त्याला पुष्टी मिळते. अन्यथा वेदांत इतिहास न मानणारे सायणाचार्य पुढे वेदमंत्रांचे भाष्य करताना इतिहासपक्ष मांडताना का दिसतात ? नित्य पक्ष सोडून अनित्यपक्ष मांडताना का दिसतात ? ज्यांनी हे सर्व स्वत: मूळातून अभ्यायलंय, त्यांच्याच हे लक्षात येईल. येविषयी भविष्यांत आणखी सविस्तर विवेचन करेनच पण सांप्रत ह्या लेखमालेविषयी विस्तार.

*नामूलं लिख्यते किंचित् नानपेक्षितमुच्यते ।*

आम्ही आधार (पुरावा) असल्याशिवाय कधीच काही लिहित नाही. ही शास्त्राची आम्हांस आज्ञा आहे. ह्यात अहंकार नाही. पुढील लेखांकात सायणांची उपरोक्त यम-यमी सूक्ताविषयीची भूमिका पाहुयांत नि त्याची समीक्षाही करुयांत.


अस्तु ।

क्रमश: ।

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

*#ऋग्वेद_यमयमी_वेदकालीन_विवाहसंस्था_भाऊबहीण_पतीपत्नी_सायणाचार्य_वेदापौरुषेयत्व_वास्तव_विपर्यास*

Friday 9 November 2018

अथ ऋग्वेदे यम-यमी सूक्तविचार: । - लेखांक प्रथम



सकळिकांच्या पायां माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥
अहो श्रोते वक्ते सकळ ही जन । बरें पारखुन बांधा गांठी ॥ध्रु.॥
फोडिलें भांडार धन्याचा हा माल । मी तंव हामाल भारवाही ॥२॥
तुका म्हणे चाली जाली चहूं देशी । उतरला कसीं खरा माल ॥३॥

जगद्गुरु श्रीतुकोबाराय

आज यमद्वितीया अर्थात भाऊबीज. दीपावलीचा शेवटचा दिवस. पद्मपुराण उत्तरखंड नि भविष्यपुराण उत्तरपर्व ह्या पुराणांतरी आलेल्या कथेनुसार आज यमाची बहीण यमुना ह्या दोघांसाठी ही भाऊबीज साजरी होते. पुराणांतल्या ह्या कथेचे मूळ ज्या ऋग्वेदाच्या दशम मंडलाच्या दशम सूक्तामध्ये (१०.१०) आहे, त्या सूक्तामध्ये आश्चर्याने किंवा सुदैवाने म्हणा पण यमुनेचा साधा उल्लेखही नाही. पण *इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृहंयेत* ह्या महाभारत वचनाचा आधार घेऊन इथल्या पुराण शब्दांवरून लगेचच व्यासरचित किंवा संकलित तथाकथित अष्टादश पुराणांचा ह्या सूक्ताशी संबंध जोडून वेदार्थ प्रतिपादन करणार्यांनी ह्या ऋग्वेदातल्या यम-यमीलाही भाऊ-बहीणच मानून वेदार्थ प्रतिपादन केलंय का अशी शंका येते. पुराणांतल्या कथांशी ह्या लेखमालेचा संबंधच नाही नि आमचा तो हेतुही नाही. आम्ही पुराणं पूर्णत: नाकारतही नाही नि ते पूर्णत: स्वीकारतही नाही. तो ह्या लेखमालेचा विषयच नाही. पण ऋग्वेदाच्या ह्या यम-यमी सूक्तामध्ये असलेले हे यम-यमी हे नेमके कोण आहेत, ते ऐतिहासिक स्त्री-पुरुष किंवा खरंच भाऊ-बहिण आहेत का की ते पती-पत्नी आहेत की अन्य काही आहेत? हा प्रस्तुत लेखमालेचा विषय आहे. ते भाऊ-बहिण तर आमच्या मते निश्चितच नाहीतच. मग ते नेमके काय आहेत हाच विचारपूर्वक ठाम सिद्धांत मांडायचा हा प्रयत्न आहे.

निरुक्तादि षड्वेदांगांच्या आणि सर्व प्राचीन भाष्यकारांच्या परामर्शाने आणखी विस्तार करण्यासाठी नि गेली दीड वर्षे हा विषय चित्तांस अस्वस्थ करत असल्यामुळे प्रस्तुत लेखनप्रपंच !

अथ ऋग्वेद परिचय

ऋग्वेदामध्ये एकुण दहा मंडले असून त्यात एकुण १०२८ सूक्ते आहेत. त्यातलं दहावं मंडल हे प्रस्तुत लेखमालेचा विषय आहे, ज्यातले हे दहावं सूक्त आहे.

ऋग्वेदाच्या ह्या दशम मंडलाविषयी पाश्चात्यांनी प्रसृत केलेले भ्रम नि त्यांच्या अनुयायी अशा आधुनिक एतद्देशीयांनी ह्या मंडलाविषयी केलेले विपर्यस्त लेखन नि त्याची समीक्षा हा प्रस्तुत लेखमालेचा विषय आहे. ऋग्वेदाच्या ज्या दशम मंडलातील दशम सूक्तामध्ये हा उपरोक्त यम-यमी संवाद येतो, त्या सूक्ताविषयी सायणाचार्य प्रभृति प्राचीन एतद्देशीय ऋग्वेदभाष्यकारांनी केलेल्या भाष्याचीही समीक्षा करण्याचा इथे विचार आहेच. हा लहानतोंडी मोठा घास असला तरी त्यांच्याविषयी पूर्ण आदर ठेऊनच.

*मूळात आदरणीय सायणाचार्यांच्या आधी ऋग्वेदांवर द्वादश अर्थात १२ भाष्यकार होऊन गेले आहेत हे आमच्या गावीही नसते ही शोकांतिका आहे. ह्यामध्ये परमहंस श्रीमच्छंकराचार्यशिष्य हस्तामलक, सहाव्या शतकांतले श्रीस्कंदस्वामी(ज्यांचे निरुक्तभाष्यही उपलब्ध आहे), नारायण, उद्गीथ, वेङ्कटमाधव, लक्ष्मण, धानुष्कयज्वा, आनंदतीर्थ, जयतीर्थ, नरसिंह, राघवेंद्रयति, आत्मानंद ही सूची आहे. ह्यातले स्कंदस्वामी,उद्गीथ नि वेङ्कटमाधवांचे भाष्य सुदैवाने पीडीएफ उपलब्ध आहे. जिज्ञासूंनी ते इथे पहावे.*

https://archive.org/details/RigVeda31/page/n3

ह्या धाग्यांवर ते प्राप्त होईल.

उपरोक्त भाष्यकारांचे संदर्भ - *वैदिक वाङ्मय का इतिहास - भाग द्वितीय - वेदोंके भाष्यकार - लेखक पंडित भगवद्दत्त रिसर्च स्कौलर, बी ए*

ह्या सूक्ताविषयी अनेकानेक भ्रम मधील काळात प्रसृत झालेले आहेत. मग ते अज्ञानातून असोत किंवा हेतुपुरस्सर दुष्ट हेतुने असोत. आता ह्या सूक्तावर घेतलेल्या आक्षेपांचे चिंतन पाहुयांत.

१. म्हणे हे सूक्त यम-यमी नामक भावा बहिणीचे आहे म्हणे - इति सायणाचार्य नि तदनुयायी सर्व सनातनी परंपरेतले वेदभाष्यकार नि त्यांचे अनुयायी नि धर्मप्रेमी विद्वान. सर्व पाश्चात्य नि तदनुयायी एतद्देशीय विद्वान.

२. म्हणे ह्या सूक्तामध्ये यमी नामक बहिणीने आपल्या यम नामक भावांस प्रणययाचना केली असता यमाने ती धिक्कारून तिचा निषेध केला आहे.

३. म्हणे ह्यावरून त्याकाळी भावा बहिणींत विवाह होत किंवा शरीरसंपर्क होत असा विकृत कुतर्क काही लोक करताना दिसतात. ह्यांच्या मते हे सूक्त रचायच्या आधी हे सर्व प्रकार चालत. पण ह्या सूक्तानंतर अशा भावा-बहिणींच्या संपर्कांस प्रतिबंध घातला म्हणे. (काहीही)

४. म्हणे वेद कुणीतरी रचले आहेत कारण असे संवाद आहेत म्हणून.

५. म्हणे ह्यावरून ह्या सूक्तामध्ये इतिहासपक्ष असून त्यावरून त्या वेदकाळचा भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास सिद्ध करता येतो म्हणे.

६. हे ऋग्वेदाचे दशम मंडलच प्रक्षिप्त असून ते नंतरहून जोडलं गेलंय म्हणे - इति मैक्डौनेल व कीथ व त्यांना बुद्धी गहाण टाकलेले एतद्देशीय विद्वान(???).

सर्वसाधारण आक्षेपांची मांडणी आम्ही इथे केली आहे. विस्तारपूर्वक ह्या लेखमालेत ह्याविषयी सप्रमाण नि ससंदर्भ खंडनात्मक विवेचन आम्ही करणारच आहोत.

*पुराणांतला कथाविस्तार*

भविष्यपुराण उत्तरपर्व अध्याय १४ येथे व पद्मपुराण उत्तरखंड अध्याय १२२ येथे सुदैवाने किंवा दुर्दैवाने म्हणा पण यमाची बहीण ही यमुना दाखविली आहे. यमीचा उल्लेखही इथे नाहीये. तरीही उपरोक्त ऋग्वेद सूक्तामध्ये यम-यमी भाऊ बहिण का मानले जातात हीच शोकांतिका आहे.

*व्याकरणशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर सर्वप्रथम हे आपल्या लक्षात यायला हवं की जेंव्हा कधी पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी शब्दांत रुपांतरण होते, तेंव्हा प्राय: त्या शब्दांस एकतर ई-कारान्त प्रत्यय लागतो किंवा आ-कारान्त. उदाहरणार्थ - ब्राह्मण-ब्राह्मणी किंवा मयुर-मयुरी, रजक-रजकी, कृष्ण-कृष्णा इत्यादि. तेंव्हा, ह्या नियमानुसार पुंल्लिंगी यमाचे स्त्रीलिंगी यमीच होणार. त्यामुळे यमी ही यमाची पत्नीच सिद्ध होते, बहीण नव्हेच.*

*भाष्यकारांमध्ये दुर्दैवाने ह्यांविषयी एकवाक्यता नाही.*

अनेक भाष्यकारांची भाष्ये अभ्यासली की ही गोष्ट लक्षात येते. काही जण तिला भाऊ-बहीण मानतात तर काही पती-पत्नी. काही ऐतिहासिक पक्ष मानतात तर काही नित्यपक्ष मानताना त्यांस दिवस-रात्रीचे रुपक मानतात. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की अशावेळी कुणाचे भाष्य प्रमाण मानावं ? येंविषयीच प्रस्तुत लेखमालेंत विस्तारपूर्वक चिंतन करायचे आहे.

*मी तंव हामाल भारवाही*

अगदी आरंभीसच सांगितल्याप्रमाणे आम्ही केवळ हमालाचे कार्य करत आहोत. ह्यात आमची स्वत:ची प्रज्ञा काहीही नाही. जे प्राचीन परंपरेतून आकळलं तेच मांडायचा प्रामाणिक प्रयत्न आहे. जे सत्य तेच सांगणं, मग ते करताना कुणाचीही भीडमूर्वत न बाळगणं.

*धर्माचे पाळण । करणें पाषांड खंडन ।*
*हे चिं आम्हां करणे काम । बीज वाढवावें नाम ।*

श्रीतुकोबाराय

अस्तु ।

क्रमश: ।

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

*#ऋग्वेद_यमयमी_भाऊबीज_यमद्वितीया_वेदकालीन_विवाहसंस्था_भाऊबहीण_पतीपत्नी_वास्तव_विपर्यास*

Tuesday 6 November 2018

अथ महर्षि दयानन्द निर्वाण अर्थात ऋषिश्रेष्ठ महायोग्याचे एक महाप्रस्थान



*इ॒दं नम॒ ऋषि॑भ्यः पूर्व॒जेभ्यः॒ पूर्वे॑भ्यः पथि॒कृद्भ्यः॑ ॥*

ऋग्वेद - १०.१४.१५

भारतवर्षाच्या इतिहासांत स्थितप्रज्ञ महात्मे अनेक होऊन गेले. श्रीमत्स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे ह्या भरतभूमींस कधीच महापुरुषांची उणीव अशी भासलीच नाही. अशांतच एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धांत एक तेजस्वी तारा ह्या भरतभूमींवर आपल्या जाज्वल्य वेदनिष्ठेने सूर्यासमान प्रखर तेजस्वी विद्युल्लतेसमान प्रकाशित होत होता. आत्मविस्मृत भारतीयांना वेदांचा तेजस्वी जीवनसंदेश *मनुर्भव नि कृण्वन्तो विश्वमार्यम्* ह्या वेदाज्ञेंतून प्रदान करत होता. दीपावलीच्या आजच्या दिवशीच अशा एका वेदभाष्यकाराचे नि समग्र क्रांतीचे अग्रदूत अशा ऋषिश्रेष्ठाचे देहावसान व्हावं ? आणि तेही विषप्रयोगाने ?

सतरा वेळा विषाचे घोट पिणारा हा महायोगी नौली आदि क्रियांनी ते विष अनेकवेळा उत्सर्ग करता झाला. पण ह्या अठराव्या विषप्रयोगांत मात्र सोमल नामक (इंग्रजीत आर्सेनिक एसिड) विष काचेसह दुधातून देण्यात आलं नि ह्या ऋषिश्रेष्ठाचा आजच आश्विन अमावस्येंस अंत झाला.

*आश्विन अमावस्या - ३० ऑक्टोबर, १८८३*

*हा माझा अंतसमय जवळ आलाय, उपचार सोडून द्या आता.*

जहाल विषप्रयोगाने शरीरावर आलेल्या फोडांतून होणारा रक्तस्त्राव सहन करत हा महात्मा आधी काही काळ प्रात:काली ११ वाजता शौच-मुखमार्जन करून, दंतधावन करून, क्षौर करून स्नानासाठी उत्सुक असूनही वैद्यांच्या आदेशे ते करु शकला नाही. ओल्या वस्त्राने शरीर स्वच्छ करताच फोडांमधून वाहणार्या रक्ताने श्वास तीव्रगतीने सुरु झाला.

*एका महायोग्याच्या महाप्रस्थानाचा हा आरंभ होता*

आपलं मन, प्राण तथा आत्मा संपूर्णत: एकाग्र करून त्या परब्रह्म परमात्म्यांवर केंद्रित करून हा योगी महानिर्वाणांस निघाला.

एका शिष्याने त्यासमयी पृच्छा केली

*महाराज, आपले चित्त कसे आहे?*

महर्षि दयानंद - *छान आहे. आज एक मासाने आम्हांस विश्रांतीचा समय प्राप्त झाला आहे.*

लाला जीवनदासांचा प्रश्न - *आपण कुठे आहात ?*

महर्षींचे उत्तर - *ईश्वरेच्छेमध्येच !*

त्या प्रभुभक्त संन्याशाने आपले स्वत्व त्या ईश्वरांस अर्पण केलं.

पुढे सायंकाळी साडेपाचवाजता शिष्यांनी आणखी विचारलं की आता आपले चित्त कसंय?त्यावेळी हा ऋषी उत्तरला

*छान आहे. प्रकाश(तेज) आणि अंध:काराचा भाव आहे.*

कुणाला काहीच समजलं नाही. पुढे त्या ऋषीने तिथी नि वार ज्ञात करून वेदमंत्रांचे पठण केलं. संस्कृत भाषेत ईशस्तवन केलं. तत्पश्चात हिंदी भाषेत परमेश्वराचा गुणानुवाद करून श्रेष्ठ अशा गायत्री मंत्रांचा जप करून आपल्या उत्फुल्ल वदनाने प्रिय अशा

*ॐ विश्वा॑नि देव सवितर्दुरि॒तानि॒ परा॑ सुव । यद्भ॒द्रं तन्न॒ आ सु॑व ॥*

ह्या ऋग्वेदातल्या ५.८२.५ येथील  प्रिय मंत्रांचा गंभीर स्वरोच्चार केला.  अनेकवेळा पुन्हा पुन्हा उच्चार केला. काही वेळ समाधी अवस्थेत जाऊन चित्त एकाग्र केलं नि पुन्हा नेत्र उघडून आपले अंतिम उद्गार त्या ऋषिश्रेष्ठाने उच्चारले ते असे

*हे दयामय सर्वशक्तिमान परमेश्वर, तेरी यही इच्छा है, तेरी यही इच्छा है, तेरी इच्छा पूर्ण हो, अहा तुने अच्छी लीला की ।*

त्यावेळी सरळ झोपलेल्या त्या महात्म्याने एका बाजुंस होऊन एक दीर्घ श्वास घेऊन तो रोखला (कुंभक) नि लगेचच पूर्ण रेचक (श्वास सोडला) केला. तो अमर आत्मा पांचभोतिक देह त्यागून त्या ईश्वरांस प्राप्त झाला. त्याची मानवलीला समाप्त झाली.

*एकोणिसाव्या शतकांतला एक महर्षि, आर्षधर्माचा द्रष्टा, अद्वितीय धर्माचार्य आणि संशोधक, महान समाजोद्धारक, संस्कारक तथा राष्ट्र नि अखिल मानवजातीचा सर्वविधपरिपूर्ण मंगलकामनाकर्ता हा आज महासमाधींस प्राप्त झाला. त्या जगन्नियंत्याने निर्माण केलेल्या ह्या जगन्नामक नाट्यरचनेचा कार्यभाग त्यागून तो महात्मा त्या परमेश्वराच्या आदेशाने नेपथ्यांस जाता झाला. महर्षि मनु, महर्षि व्यास, महर्षि याज्ञवल्क्य, महर्षि जैमिनी, परमहंस भगवान पूज्यपाद श्रीमदाद्यशंकराचार्यांच्या प्रोज्वल परंपरेंचा तो प्रतोस्ता ऋषि, भारतीय नवजागरणाचा पुरोधा आपल्या इहलोकाच्या यात्रेचे संवरण करून कीर्तिशेष होऊन गेला. सायंकाळी सहा च्या सुमारांस.*

वैदिक परंपरेनुसार स्वत:च्या स्वीकार पत्रांत आधीच लिहून ठेवल्याप्रमाणे महर्षींच्या देहांस वैदिक अग्निसंस्कार करण्यांत आला. संन्याशांना सर्वसामान्यत: जे करण्यांत येत नाही पण जे करणं वेदप्रणीत आहे तेच करून वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन ह्या पुरुषश्रेष्ठानं केलं.

*५९ वर्षांचा जीवनकाल संपवून आपल्या पावित्र्याच्या तेजाने तळपणारा, ईश्वरावरील श्रद्धेचे शुभकवच ल्यालेला, मृगेंद्राचे सामर्थ्य नसानसांत स्फुरलेला, दीनदलितांविषयी ह्रदयांत अपार करुणा बाळगलेला दयासागर नि करुणासागर, हिमाचलापासून कन्याकुमारीपर्यंत नि गुजरातपासून ते बंगालपर्यंत सर्वत्र वैदिकधर्माची विजयपताका प्रसारित करणारा, पौरुषाने मुसमुसून संपन्न झालेला हा दयानंद नामक दिवाकर आपल्या दिव्य आभेंस विकीर्ण करत त्या अस्तमानांस जाणार्या प्रभाकरासमानच महाप्रस्थानासाठी अस्तांस निघता झाला. सर्व विश्वांस उदयित करणार्या त्या प्रभाकरांबरोबरच हा द्वितीय प्रभाकर आपल्या प्रिय सविता देवतेंस अर्थात अखिलजगहितेच्छु नि अपौरुषेय अशी वैदिक वाणी प्रदान करणार्या ईश्वरांस प्राप्त करता झाला.*

*धन्यं यश: सुरभितं विमलं कुलन्ते,*
*धन्य: पिता गुणवती जननी च धन्या ।*
*धन्या च गौरववती खलु जन्म-भूमि:,*
*त्वद्-वर्त्मनोsनुगमने वयमत्र धन्या: ।*

*धन्या अपीड्यमुनय: सुनयस्तु येषां ।*
*भूयस्त्वया सुमनसा तपसोद्धृतो वै ।*
*सा शारदा श्रुतिमयी सुतरान्तु धन्या ।*
*याsसूत पूतचरितं सुतमद्वितीयं ।*

*अमन्दसंविन्मकरन्द-माधुरीं, प्रदाय विद्वन्मधुपाय निर्भरम् ।*
*वसुन्धरोद्यानममुञ्चदञ्चितं सुमं प्रतस्थे तु दिबालयं प्रति ।*

वेदार्थ कल्पद्रुम - भाग १ - पृष्ठ ३

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#महर्षि_दयानंद_पुण्यस्मरण_आश्विन_अमावस्या_महानिर्वाण_दीपावली

Saturday 27 October 2018

आज पंडित भगवद्दत्त रिसर्च स्कौलर ह्यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मशताब्दी !





(२७ ऑक्टोंबर, १८९३ ते २२ नोव्हेंबर, १९६८)

*यह जीवन मैनें वैदिक वाङ्मय के अर्पण कर रखा है ।*

प्रस्तावना पृष्ठ ख - वैदिक वाङ्मय का इतिहास - भाग प्रथम

ज्यांची योग्यता असूनही ज्यांना कुठलाही पुरस्कार कधीच मिळाला नाही, पुरस्कार तर राहुदेत पण साधा निर्देशही कुठे होत नाही, अशा विद्वानांचे साहित्य अभ्यासायला प्राप्त होणं हे भाग्याचे लक्षण. आणि असे विद्वान आर्यसमाजी परंपरेतच जास्ती निर्माण व्हावेत हे दुसर्या अर्थाने दुर्भाग्याचे लक्षण ! कारण केवळ आणि केवळ उपेक्षा आणि उपेक्षाच ! अस्तु !

मागील वेळीच पंडित युधिष्ठिर मीमांसकावरील लेखात ज्या पंडित भगवद्दत्तांचा उल्लेख केला होता, त्यांच्याविषयी हे चिंतन ! संशोधन काय नि किती नि कसं करावे व तेही स्वकीय भारतीय दृष्टिकोनातून; भारताचा इतिहास पाश्चात्यांना बुद्धी गहाण न टाकता स्वकीय भारतीय दृष्टीकोनातून कसा सप्रमाण नि ससंदर्भ लिहावा ह्याचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारे व्यक्तिमत्व म्हणजे पंडित भगवद्दत्तजी, बीए, रिसर्च स्कौलर ! ज्यांच्या नावापुढे रिसर्च स्कौलर हे शब्द अगदी यथार्थ प्रतिबिंबित होतात, त्या एका संशोधकाचे हे किंचितसे चरित्रचिंतन !


पंडितजींचा जन्म नि अध्ययन

पंडितजींचा जन्म अमृतसर मध्ये २७ ऑक्टोंबर, १८९३ ह्यादिवशी चंदनलाल नि हरिदेवी ह्या मातापित्यांच्या पोटी झाला. पंडितजींनी १९१३ साली बीएसाठी लाहौरच्या दयानंद महाविद्यालयांत प्रवेश घेताच संस्कृत भाषेचे अध्ययन आरंभ केले. त्या आधी तत्कालीन इंटरमिजिएटमध्ये ते विज्ञानशाखेचे विद्यार्थी होते. *१९१५ ला बीए उत्तीर्ण होताच त्यांनी वेदाध्ययन हेच त्यांच्या जीवनाचे अंतिम लक्ष नि ध्येय्य ठरविलं नि त्यानुसार आयुष्यभर कालक्रमणा केली.* त्याचे कारण प्रत्यक्ष महर्षि दयानंदांकडून योगदीक्षा शिकलेले स्वामी लक्ष्मणानंद हे त्यांचे प्रेरक.

७००० हून अधिक हस्तलिखितांचे संकलन नि संशोधन

त्या स्वातंत्र्यपूर्व अशा कठीण काळामध्येच पंडितजींनी दयानंद लाहौर विद्यालयांतून प्रथम अवैतनिक(विनामूल्य) असे  अध्यापनाचे नि तदनंतर महात्मा हंसराजजींच्या कृपेने तिथल्याच  *वैदिक संशोधन मंडलातच* सदस्यता प्राप्त करून वैदिक साहित्याच्या संशोधनाचे आलोडनात्मक कार्य आजीवन केलं. ह्याच काळात त्यांनी सात सहस्त्रांहून अधिक हस्तलिखितांचे संकलन नि संपादन केलं. *ह्या एकोणीस वर्षांच्या कालावधीतच पंडितजींनी इथेच वैदिक नि तत्संबंधित सर्व संस्कृत साहित्याचे विपुल अध्ययन केलं. तेच त्यांच्या जीवनाचे इप्सित नि एकमेव ध्येय होते.*

वैदिक वाङ्मय का इतिहास

पंडितजींच्या संपूर्ण जीवनांत त्यांच्या विद्वत्तेवर कळस चढविणारा ग्रंथ म्हणजे ही त्रिखंडात्मक रचना. वास्तविक पाहता हा ग्रंथ चतुर्खंडात्मक होता. प्रथम खंडामध्ये पंडितजींनी *वेदों की शाखाएँ* ह्या शीर्षकान्वये वेदांच्या संहिता, त्यांचे ब्राह्मणग्रंथ, त्यांच्या शाखा, त्यांचे चरण ह्याविषयी विस्तृत विवेचन केलं असून चतुर्थ अध्यायांत अगदी स्पष्टपणे त्यांनी व्यासांनी एका वेदांचे चार विभाग केले का ह्या पुराणप्रणीत अवैदिक नि थोतांड सिद्धांताचे प्रमाणपूर्वक खंडन केलंय. ह्यातून व्यासांची निंदा करण्याचा कोणताही हेतु नसून त्यांच्या प्रती होणार्या आदरातूनच त्यांच्या नावाने प्रसृत होणार्या भ्रमांचे निराकरण हा विशुद्ध हेतु आहे नि होता. वेद आधीच चार असताना व्यांसांनी त्याचे चार विभाग करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. पण पुराणपंकामध्ये गर्त रुतलेली बुद्धी सत्य कशी स्वीकारणार ? अस्तु !


शुक्लयजुर्वेदासंबंधी महाराष्ट्राशी संपर्क

पंडितजींनी ग्रंथाच्या प्रस्तावनेतच शुक्ल यजुर्वेदासंबंधीच्या विवेचनासंबंधी नाशिकच्या *शुक्ल-याजुष-विद्या प्रवीण पंडित अण्णा शास्त्री वारे नि त्यांचे चिरंजीव विद्याधर शास्त्री वारे* ह्याद्वयींविषयी आदरपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आहे. म्हणजेच पंडितजींचा महाराष्ट्राशी छान संपर्क होताच.

द्वितीय खंडात पंडितजींनी *वेदोंके भाष्यकार* ह्या शीर्षकान्वये वेदांच्या भाष्यकारांविषयी विस्तृत विवेचन केलं आहे. आज पर्यंत सर्वसामान्यत: लोकांचा भ्रम असतो की वेदांवर सायणाचार्य हे एकच भाष्यकार होऊन गेले. पण सायणांच्या आधीही अनेक भाष्यकार चतुर्वेदांवर होऊन गेले आहेत हे अतिशय मोलाचे संशोधनात्मक कार्य पंडितजींनी ह्या द्वितीय खंडात केलंय. ही सर्व हस्तलिखिते त्यांनी स्वत: प्राप्त केली.  वस्तुत: वेदांवरील शंभरहून अधिक भाष्यकारांची हस्तलिखिते आज प्राप्त आहेत. पण आम्हाला सायण सोडून पलीकडे पहायची इच्छाच कुठेय ?

स्कंदस्वामी हे ऋग्वेदांवरील प्रथम भाष्यकार जे सहाव्या शतकांतले. हे नाव तरी कित्येकांना परिचित आहे? अस्तु !

तृतीय खंडात *ब्राह्मण तथा आरण्यक* ह्या साहित्याविषयी पंडितजींनी विस्तृत विवेचन केलं आहे.

*चतुर्थ भाग दुर्दैवाने प्रकाशित व्हायचा राहिला.*

ह्या चतुर्थ भागात पंडितजींनी वेदांशी संबंधित कल्पसूत्रादि साहित्याविषयी विवेचन करण्याचं योजिलं होते. परंतु हे सर्व साहित्य नि तत्संबंधी जुळविलेली कागदपत्रे विभाजनासमयी नष्ट झाल्याने हा भाग अप्रकाशितच राहिला.

*विभाजनाने पंडितजींचे बव्हतांश साहित्य अक्षरश: नष्टप्राय झालं.*

ज्यांना विभाजनाची गोष्ट भारतावरील उपकार वाटते, त्या उजव्या स"माज"वाद्यांना अशा संशोधनात्मक साहित्याची आस्था नि व्यथा कशी नि काय कळणार म्हणा ? अस्तु !

*पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयाशी पंडितजींचा संपर्क होता*

वैदिक साहित्याचे माहेरघर म्हणून पुण्यातले डेक्कन महाविद्यालय तसं जगप्रसिद्धच आहे. ह्या महाविद्यालयाशी पंडितजींचा संपर्क होता हे त्यांच्या साहित्यावरून स्पष्ट होते. विशेषत: उपरोक्त वैदिक वाङ्मयाचा इतिहास ह्या ग्रंथातून.

*पाश्चात्यांचा दुष्ट हेतु त्यांच्या पत्रातूनच उघड करणारे पंडितजी*

ज्यांच्या नावापुढे भारतीय विद्वान नतमस्तक होताना दिसतात, त्या मैक्सम्युलर, ग्रिफीथ, व्हिटने, मोनियर विल्यम्स, मैक्डोनेल, कीथ, जेम्स मिल, विल्यम जोन्स आदि आदि पाश्चात्यांचे सत्यस्वरुप नि उघडउघड भारताविषयीचा आत्यंतिक द्वेष नि पराकोटीचा पूर्वग्रहदोष नि तज्जन्य विकृत लेखन त्यांच्याच साहित्यातून नि पत्रव्यवहारातून उघड करणारा हा पंडित्वर्य्य एतद्देशीयांस कसा भावेल म्हणा? एकीकडे मैक्सम्युलर पती-पत्नींना वसिष्ठ-अरुंधतींचा किंवा सायणांचा अवतार म्हणविणारे विवेकानंद असतील तर दुसरीकडे ह्याच मैक्सम्युलरला त्याच्या जीवितपणीच त्याची पत्रव्यवहारातून नि स्वतंत्र वेदभाष्यातून अक्षरश: चिरफाड करून त्याविषयी *यस्मिन्देशे द्रुमो नास्ति तत्रैरण्डोपि द्रुमायते* या एकाच वचनावरून त्याची योग्यता दर्शविणारे महर्षि दयानंद असतील. आणि ह्याच परंपरेतून महर्षींचा वारसा तितक्याच संपन्नतेने नि त्याच चिकाटीने नि विजीगीषु वृत्तीने यथार्थपणे वाहणारे पंडितजी असतील !

*Western Indologists - A Study in Motives*

ह्या ग्रंथातून ह्या सर्व पाश्चात्यांची वैदिक साहित्य नि भारतीय इतिहासाविषयीची दृष्टी पंडितजींनी सर्वप्रथम उघड केली. दुर्भाग्य असे की अद्यापही आमच्या लोकांना जाग येत नाही. वैचारिक दरिद्रता हा आमच्या विद्वत्तेला लागलेला शापच जणु !

*पंडितजींची आणखी काही विपुल नि संशोधनात्मक अशी ग्रंथसंपदा*

१) *अथर्ववेदीय पञ्चपटलिका* - हा संग्रही आहे पण वाचला नाही.

२) *अथर्ववेदीय मांडुकीशिक्षा* - संग्रही आहे पण वाचला नाही.

३) *वाल्मीकीय रामायणाचे बाल, अयोध्या तथा अरण्य काण्डाचे पश्चिमोत्तर काश्मिरी संस्करणाचे संपादन* ह्यातील पुढील भागांचे संपादन पुढे विश्वबंधु नि राम लभया ह्यांनी केल्याचे आपणांस प्राप्त होते. ह्याची प्रस्तावना वाचनीय आहे.

४) *ऋग्वेद पर व्याख्यान* - ह्या ग्रंथात वेदार्थविषयक अनेक महत्त्वपूर्ण समस्यांचे समाधान आहे. विशेषत: शाखा नि संहिता ह्यातील भेद उत्तमरीतीने स्पष्ट केलाय. हा ग्रंथ वेदाध्ययनासाठी अत्यावश्यकच आहे.

५) *ऋग्मन्त्र व्याख्या* :- हा ग्रंथ मी वाचला नाहीये.

६) *वेदविद्या निदर्शन* - ह्या ग्रंथामध्ये वेदमंत्रातील पदार्थ विद्येसंबंधी अर्थात वैज्ञानिक अर्थासंबंधी विस्तृत विवेचन आहे. वेदांतील विज्ञान हा विषय इथे विस्तृत आहे. अनेक अनाकलनीय नि गुढ सिद्धांत पंडितजींनी ह्यांत मांडलेले आहेत.

७) *यास्कीय निरुक्त विस्तृत विवेचन* - पंडितजींनी ह्यामध्ये *सिद्धेश्वर वर्मा तथा पुण्याचे इतिहासाचार्यांचे बंधु वैजनाथ काशिनाथ राजवाडे (निरुक्ताचे मराठी भाषांतर) ह्यांसारख्यांनी यास्काचार्यांवर घेतलेल्या भ्रममूलक नि पक्षपाती आक्षेपांचे खंडन केले असून यास्कीय शैलीचे तर्कशुद्ध विवेचन केलं आहे.* आपलेच विद्वान म्हणविणारे आपल्याच ऋषीमूनींची निंदा करताना दिसतात हे राजवाड्यांसारख्यांच्या लेखनावरून स्पष्ट होतं. असो. दुर्भाग्य !

८) *भारतवर्ष का बृहद् इतिहास* - ह्या द्विखंडात्मक ग्रंथामध्ये पंडितजींनी भारताचा सविस्तर नि बृहदेतिहास जो अनेक संदर्भांनी विवेचनात्मक शैलीत सिद्ध केलेला आहे. ह्या ग्रंथाच्या अंती पंडितजींनी दिलेल्या संदर्भग्रंथांची सूची चिंतनीय आहे. विशेषत: भारतीय इतिहासाचे लेखन भारतीय दृष्टिकोनातून कसे करावे हे ह्यापेक्षा उत्तम कुठेच दिग्दर्शित होत नाही. ह्याच्या तृतीय अध्यायांतच पंडितजींनी पाश्चात्यांनी भारतीय इतिहासाविषयी प्रसृत केलेल्या भ्रमांचा परामर्श घेतलेला आहे.

९) *भारतवर्ष का सांस्कृतिक इतिहास*

१०) *ऋषि दयानन्द जी सरस्वती के पत्र और विज्ञापन* ह्याचे एकुण चार खंड असून ह्यात महर्षींच्या पत्रांचे संकलन नि संपादन आहे.

११) *पूना प्रवचनों में कथित व थियोसोफिस्ट में प्रकाशित जीवनी का सम्पादन*

१२) *सत्यार्थप्रकाशचे हिंदी संपादन*

१३) *Western Indologists : A Study in Motives* वर ह्याविषयी लिहिलंच आहे. हा उपरोक्त बृहदेतिहास ग्रंथाचाच तृतीय अध्याय आहे.

१४) *भाषा का इतिहास*

पंडितजींचा एक अतिमहत्वाचा ग्रंथ म्हणजे भाषेचा त्यांनी लिहिलेला इतिहास. वैदिक संस्कृत पासून सर्वच भाषांची त्यांनी केलेली समीक्षा पंडित रघुनंदन शर्मांच्या वैदिक संपत्तीपेक्षाही जास्ती विस्तृत नि चिकीत्सक आहे. भाषांचा उद्गम, विकास नि ह्रास ह्याविषयी पाश्चात्य नि एतद्देशीय सर्वच मतांची चिकित्सा ह्या ग्रंथात पंडितजींनी केली आहे. विशेषत: ब्रिटीशांनी निर्माण केलेला आर्य नि द्रविड भाषांविषयीचा विघटनकारी नि देशद्रोही संघर्ष पंडितजींनी सप्रमाण ससंदर्भ खोडून काढलेला आहे.  जिज्ञासूंनी हा ग्रंथ अवश्य अभ्यासावा.

१४) *वैदिक कोश* - पंडित भगवद्दत्तांनी व हंसराजांनी दोघांनी मिळून संपादित केलेला हा वैदिक कोश वैदिक शब्दांसंबंधी उपयुक्त आहे.ह्याच्या प्रथम भागांत पंडितजींनी ब्राह्मण ग्रंथ हे वेद आहेत का ह्याविषयी विवेचन केलं आहे.

१५) *वैदिक कोष* - राजवीर शास्त्रीजींनी संपादित केलेला हा वैदिक कोष ह्याचे मुख्य संपादक पंडितजीच असून हा अकराशेंहून अधिक पृष्ठांचा आहे. ह्यात प्रत्येक वैदिक शब्दांची व्युत्पत्ती दिली असून महर्षि दयानंदांच्या साहित्यातला संदर्भही दिला आहे.

१६) *पंडित गुरुदत्तांच्या लेखांचा अनुवाद* - हा पंडितजींनीच केला असून तो पीडीएफ आहे.

१७) *बार्हस्पत्य अर्थशास्त्रम्* ह्या आंग्लग्रंथांस प्रस्तावना

पंडितजींची आणखीही काही ग्रंथसंपदा आहे जी आम्ही अद्याप वाचलीच नाही. त्यामुळे तिचा स्वतंत्र निर्देश जोडलेल्या पृष्ठांत केलाच आहे तिथे जिज्ञासूंनी पहावा.

*पंडितजी सनदी अधिकार्यांना शिकवायचे*

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या उत्तीर्ण विद्यार्थांना (आयएएस-आयपीएस) पंडितजी इतिहासाविषयी मार्गदर्शन केल्याचा संदर्भ आहे. स्वत: पंडित नेहरुंनी त्यांच्या विद्वत्तेची प्रशंसा केलीय.

ह्यातली सर्व ग्रंथसंपदा आज प्रकाशित असून ती पीडीएफही उपलब्ध आहे. ज्यांना जिज्ञासा असेल त्यांनी www.vedrishi.com वरून ही मागवावी. किंवा पीडीएफही अभ्यासावीच.

*अंतिम निवेदन*

आज त्यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मशताब्दी असूनही अनेकांना त्यांचे नावही ज्ञात नसावं ही केवढी मोठी शोकांतिका ! म्हणूनच खरी श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर त्यांचे साहित्य क्रय करून ते अध्ययन करून आपल्या इतिहासाविषयी नि साहित्याविषीच्या भ्रमांचे निराकरण व्हावे नि यथार्थ आकलन व्हावे हीच त्या जगदीश्वराच्या चरणी प्रार्थना !

जयोस्तु आर्य सनातन वैदिक हिंदु धर्म ।
जयोस्तु आर्यावर्त(हिंदुराष्ट्रम्)
जयोस्तु पंडित भगवद्दत्तजी ।

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#पंडित_भगवद्दत्त_रिसर्च_स्कौलर_शतकोत्तर_रौप्य_जन्मशताब्दी_वैदिक_वाङ्मय_इतिहास_वेद_पुणे_डेक्कनमहाविद्यालय

पदवाक्यप्रमाणज्ञ महामहोपाध्याय वैदिक विद्वान पंडित श्रीयुधिष्ठिरजी मीमांसक जयंतीविशेष

२२ सप्टेंबर, १९०९ जन्मतिथी आज एका मीमांसकांची नि वैय्याकरणीची जयंती ! आर्यसमाजाने मागील शतकांत जी काही विद्वत्निष्ठांची एक परंपरा निर्माण केली त्यातले एक अग्रगण्य नाव. व्याकरणशास्त्रांपासून ते पूर्वमीमांसेपर्यंत ते न्यायदर्शनापर्यंत ते दर्शनशास्त्रांपर्यंत नि वेद व वेदाङ्गांपर्यंत अगदी सर्वच विषयांत प्रवीण नि निष्णांत असं व्यक्तिमत्व ! विकीपीडियावर पंडितजींविषयी जी काही माहिती हिंदीत आहे, ती वाचनीय आहेच. पण ती सोडून सांगायचे तर पंडितजी वैदिक षड्वेदाङ्गे नि सर्वच वैदिक साहित्यावरील नि विशेषत: व्याकरण व मीमांसेवरील एक उत्तम भाष्यकार झाले. ब्राह्मणेन निष्कारणो धर्म: षडङ्गो वेदाध्येयो ज्ञेयोश्च। हे महर्षी पतंजलींचे वचन प्रत्यक्षात आचरण्यासाठी ज्या षड्वेदांगावर भाष्य करणं आवश्यक आहे, ते भाष्य पंडितजींनी त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून केलं. त्यांच्या ग्रंथसंपदेचा परिचय विकीपीडियावर आहेच. पण तरीही विशेष अधिक सांगायचे तर पंडितजींचा महाराष्ट्राशी छान संपर्क होता. मराठी भाषेचेही ज्ञान त्यांचं होतं. महर्षि दयानंदांच्या १८७५ साली झालेल्या पुण्यातील १६ व्याख्यानांचा मूळ हिंदीतून मराठीत झालेला अनुवाद व त्या पुन्हा मराठीतून पुन्हा हिंदीत विशुद्धानुवादाचे कार्य त्यांनी केलं. प्रबोधनयुगातील व्याख्यानमाला अथवा उपदेशमंजिरी नावाने हा ग्रंथ प्रकाशित आहे. जिज्ञासूंनी ह्याचा लाभ घ्यावा. मराठीत पीडीएफ आहेच. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंनी ही महर्षींची व्याख्यानमाला पुण्यात आयोजित केली होती हे विशेष. आईकडूनच गुरुकुलाची आवड पंडितजींचे पूर्वचरित्र सांगायचे तर त्यांच्या मातु:श्रींचीच इच्छा होती की आपल्या मुलाने गुरुकुलांतच वेदाध्ययन करावं. मृत्युसमयी त्यांनी तशी शपथच त्यांच्या पतींस घातली. त्यांच्या त्या अकाली निधनाने पुढे पिताश्रींनी पंडितजींना गुरुकूलात अध्ययनासाठी पाठविलं. धन्य ते मातापिता ! नाहीतर आजचे मातापिता ? असो. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी । पिता यस्य शुचिर्भूतो माता यस्य पतिव्रता। उभाभ्यां यस्य सम्भूति: तस्य नोच्चलते मन:। पदवाक्यप्रमाणज्ञ पंडित ब्रह्मदत्त जिज्ञासु व पंडित भगवद्दत्त रिसर्च स्कौलर हे त्यांचे प्रमुख गुरुद्वय पंडित ब्रह्मदत्तजींकडे त्यांनी १४ वर्षे व्याकरण शास्त्र नि इतर वैदिक साहित्याचे अध्ययन केलं. दोघांनी मिळून व्याकरणांवर केलेलं अध्ययन ग्रंथरुपाने प्रकाशित आहे. संस्कृत पठनपाठन की सरलतम विधी नावाने दोघांचे ग्रंथ प्रकाशित आहेत. पुढे रिसर्च स्कौलर नावाने प्रख्यात अशा पंडित भगवद्दत्तजींनीही त्यांस प्रवृत्त केलं. ह्या दोघांनी वैदिक व्याकरणांवर केलेलं कार्य पाहिलं की थक्क व्हायला होते. संस्कृत व्याकरणशास्त्र का इतिहास - तीन खंड पंडितजींच्या एकुण ग्रंथसंपदेपैकी किंवा त्यांच्या एकुणच जीवनातला सर्वोत्तम ग्रंथराज म्हणून वर्णन करायचे झाले तर हा त्रिखंडात्मक ग्रंथ पहावाच लागेल. संस्कृत व्याकरणशास्त्राचा वेदकाळापासूनच अतिशय विचक्षण नि चिकीत्सक इतिहास तोही तीन खंडात सतराशे पृष्ठांच्याअधिक संख्येत लिहिणं ही कृती त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देतेच. ह्या ग्रंथातून त्यांनी संस्कृत भाषेविषयीच्या पाश्चात्य नि तदनुयायी एतद्देशीय विद्वानांच्या आक्षेपांच केलेलं सप्रमाण खंडन जसं चिंतनीय आहे, तद्वतच ते अभ्यासाच्या दृष्टीने अनुकरणीय आहे. विषयाच्या अगदी गर्भापर्यंत जाऊन चिकीत्सा करणे आर्य समाजी परंपरेचे एक वेगळं वैशिष्ट्य आहे. अर्थात चतुर्वेदांविषयीची अक्षुण्ण नि एकमेव निष्ठा हे प्रमुख कारण. ह्याच ग्रंथात पंडितजींनी संस्कृतविषयी जे मत स्पष्टपणे व्यक्त केलं आहे, ते सर्व भाषाविदांनी लक्षात घेणं आवश्यकच आहे. आमच्या मागील वेदविषय-शंका समाधान लेखांक द्वितीय मध्ये आम्ही ते विस्ताराने दिलंय. तिथे वाचावे ही विनंती ! काशीमध्ये राहूनच त्यांनी सनातनी विद्वानांकडून मीमांसाशास्त्राचे केलेलं अध्ययन पूर्वमीमांसेतला तत्कालीन सूर्य अशी ज्यांची ख्याती होती असे महामहोपाध्याय पंडित अ. चिन्नास्वामी शास्त्री तथा पंडित पट्टाभिराम शास्त्री नामक सनातनी परंपरेतल्या व आर्य समाजाशी काहीविधेयांत तात्विक विरोध असलेल्या विचारधारेतल्या मीमांंसकांकडून ह्या शास्त्राचे गहन अध्ययन केल्यामुळे त्यांचा ह्या शास्त्राविषयीचा अधिकार होता. आश्चर्य म्हणजे याच पंडित अ. चिन्ना स्वामींनी काशीच्या बनारस हिंदू विश्वविद्यापीठामध्ये स्त्रियांना वेदांचा शिक्षणाचा अधिकार सनातनी असूनही प्रदान केला होता. काशीमध्ये त्यांच्या ह्या निर्णयाने त्यावेळी गोंधळही उडाला होता. श्रौत यज्ञ मीमांसा परमादरणीय श्री करपात्री महाराजांच्या श्रौत यज्ञ मीमांसा ह्या वेदार्थ पारिजातमधील विभागाची समीक्षा करणारी ही पुस्तिका आहे. अतिशय न्यून मूल्यांत १००/- रुपयेंमध्ये ही उपलब्ध आहे.पीडीएफही आहे. श्रौत यज्ञासंबंधी विस्तृत विवेचन ह्या ग्रंथात आधी संस्कृत नि पश्चात हिंदी असे आहे. चित्र जोडलंच आहे. पंडितजींनी मीमांसेचे केलेले विचक्षण अध्ययन नि विशेषत: महर्षींनी सांगितल्याप्रमाणे मीमांसेवरील शाबरभाष्याचे त्यांनी केलेलं हिंदी भाष्य नि अनुशीलन ह्या सर्वांचा विचार ह्या ग्रंथात आहे. हे शाबरभाष्य मूळ संस्कृत आज सुदैवाने उपलब्ध आहे पीडीएफ. असो. आर्षमतवविमर्शिनी पंडितजींचे शाबरभाष्यांवरील सातखंडात्मक भाष्य ह्याच्या हिंदी अनुवादाचे सात खंड असून त्यावर त्यांची आर्षमतविमर्शिनी नावाची हिंदी टीकाही उपलब्ध आहे. अद्याप आम्हांस ही प्राप्त झालेली नाही. बघुया भविष्यांत होईलच. वैदिक छंदोमीमांसा व वैदिक स्वर मीमांसा पंडितजींचे आणखी दोन महत्वाचे ग्रंथ म्हणजे उपरोक्त. ह्या दोन ग्रंथामध्ये त्यांनी ह्या वेदाङ्गांविषयी केलेलं विस्तृत विवेचन वेदार्थ प्रतिपादनाविषयी अनुकरणीय आहे. छंदोमीमांसेच्या प्रस्तावनेत त्यांनी छन्द:शास्त्र का इतिहास हा ग्रंथ त्यांनी लिहिलाय व तो प्रकाशित होतोय असे लिहिलंय. आर्य विद्वानांना विनंती की हा ग्रंथ प्रकाशित झाला असल्यांस त्याच्या उपलब्धतेविषयी माहिती द्यावी ही विनंती. प्रकाशक संभवत: उपरोक्त दोन ग्रंथांप्रमाणेच रामलाल कपूर न्यासच(ट्रस्ट) असेल ह्यात शंका नाही. तरीही अन्य असेल तरीही सांगावे ही विनंती. मन्त्रब्राह्मणयोर्वेदनामध्येयम् महर्षी दयानंदांच्या आधी वैदिक परंपरेत मंत्र नि ब्राह्मण दोघांसही वेद ही संज्ञा म्हणण्याची एक अंधपरंपरा निर्माण झाली होती. वास्तविक सायणाचार्यांनी स्वत: हा भेद स्पष्टपणे ग्रथित केला असूनही केवळ कात्यायन परिशिष्टांवर विसंबून राहून व कृष्ण यजुर्वेदाशी संबंधित ग्रंथांवर अवलंबून राहून मंत्र नि ब्राह्मण दोघांनाही वेद ठरविण्याचा अट्टाहास गेली कैक शतके सुरु असताना महर्षींनी सर्वप्रथम त्यावर कठोर प्रहार केला. त्यांच्या ह्या मतांस पुष्टी देण्यासाठी पंडितजींनी हा ग्रंथ रचल्याचे त्यांच्या लेखनांत स्पष्ट होतंय. अस्तु ! ऋक्संख्या ऋग्वेदाच्या मंत्रांची संख्या निश्चित करणारा हा ग्रंथ आहे. कारण वेदमहर्षी सातवळेकरांच्या वेदभाष्यांतही व अन्य आर्य भाषातही काही ठिकाणी ऋग्वेदाच्या मंत्रसंख्येत क्रमभेद व संख्याभेद लक्षात आल्यावर आम्हाला गोंधळ निर्माण जो झाला होता, तो ह्या ग्रंथाच्या वाचनाने दूर झाला. ह्यात पंडितजींनी मंत्रसंख्येविषयी सुंदर चिंतन केलंय. ग्रंथ आमच्या संग्रही आहे. पीडीएफ एक प्रसिद्ध नि अति-महत्वाचा शास्त्रार्थ आर्य समाजी विद्वान वैय्याकरणी नि मीमांसज्ञ पंडित युधिष्ठिरजी मीमांसक विरुद्ध गोवर्धनपीठाचे श्रीशंकराचार्य आणि स्वामी श्रीकरपात्रीजी महाराज ह्यातून स्वत:ला श्रीशंकराचार्य म्हणविणारे नि परमादरणीय श्रीकरपात्रींसारखे लोकही शास्त्रार्थ करताना कसे पतंजली-पाणिनींना सुद्धा स्वत:च्या सोयीसाठी झिडकारतात हे दिसून येते. सत्य स्वीकारण्याची प्रवृत्ती ह्या स्वत:ला सनातनी म्हणविणार्यांमध्ये दुर्दैवाने नाही हे सिद्धय. अन्यथा पाणिनी पतंजलींनाही नकारण्याची प्रज्ञा ह्यांची झालीच नसती ? सर्वच असे आहेत असं मूळीच नाही पण निदान ह्या दोघांविषयी तरी दुर्भाग्य आहे. ह्याचे पीडीएफ आमचे एक ज्येष्ठ भ्रातासदृश विद्वान आचार्य वेदानुरागी विश्वप्रियजी ह्यांजकडून मूलत: नि पश्चात अमेरिकास्थित आमचे मित्र रणजीतजी ह्यांसकडून प्राप्त झाली त्यासाठी त्यांचे आभार ! आजच्या जयंतीदिनी त्यांचा हा शास्त्रार्थ चिंतनीय आहे. गुगल ड्राईव्हवर आम्ही तो संग्राह्य केला आहे. तो इथे प्राप्त होईल. https://drive.google.com/file/d/1wJreMQV4GUF9tbwjW5XZZuVwhQ8yGGpy/view?usp=drivesdk पंडित युधिष्ठिर मीमांसक ग्रंथावली त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रकाशित करण्यांत आलेल्या ग्रंथसंपदेतील प्रथम भागाचे अध्ययन करता आले. त्यात त्यांनी वेदार्थ की विविध प्रक्रियाओंकी ऐतिहासिक मीमांसा शीर्षकान्वये आतापर्यंतच्या वेदार्थ परंपरेविषयी उत्तम विवेचन केलं आहे. केवळ ७७ पृष्ठांचा हा ग्रंथ आहे. वेदांतले सर्व शब्द यौगिक अर्थात धातुज आहेत. ह्या ग्रंथात पंडितजींनी एक महत्वाचे प्रतिपादन केलंय, जे महर्षींनीही केलं होते, ते असे की वेदांत ऐतिहासिक अर्थ शोधणारे आधुनिक नि काही प्राचीन सोडले तर सर्वच परंपरांमध्ये प्राचीन काळी वेदार्थ प्रतिपादनांत यौगिक अर्थात धातुज अर्थच घेतला जायचा, ऐतिहासिक घेतला जातच नव्हता. म्हणजेच धातुनुसारच त्या वैदिक शब्दांचा अर्थ घेतला जायचा. कालांतराने वैदिक पदांचे रुढार्थ घेतल्याने योगार्थ बाजूंस पडून वैचित्रमत निर्मिती झाली. हे सांगण्यासाठी ते शर्ववर्मन रचित कालापतंत्र नावाच्या ग्रंथावरील दुर्गसिंह नावाच्या भाष्यकाराचे प्रमाण देताना लिहितात वृक्षादिदवदमी रुढा कृतिना न कृता कृत:। कात्यायनेन ते सृष्टा: विबुधप्रतिपत्तये। संक्षेपांत भावार्थ सांगायचा तर आदिकाळांत वेदार्थ प्रक्रियेत वैदिक शब्दांचे अर्थ हे यौगिकच अर्थात धातु पाहूनच केले जायचे. पण नंतर नंतर ते बंद झाले म्हणून वेदार्थांविषयी इतका गोंधळ मधील काळात निर्माण झालेला आहे. असो. क्षीरतरङ्गिणी नावाचा त्यांचा व्याकरणशास्त्रावरील पूर्ण संस्कृत ग्रंथही आम्हांस प्राप्त झाला परंतु अद्याप आम्ही तो वाचला नाही. पंडितजींची ग्रंथसंपदा निम्नलिखित संकेतस्थळांवरून प्राप्त करु शकता www.vedrishi.com आम्हीही इथूनच केलेली आहे व भविष्यांतही करणारच आहोत. आर्य समाजी विद्वानांची ग्रंथसंपदा ही अतिशय न्यूनातिन्यून मूल्यांत आहे हे विशेष आहे. १९८९ साली त्यांना वाराणशीच्या डॉ. संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयाने महामहोपाध्याय ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. असो. वैदिक सिद्धांत मीमांसा - दोन खंड वैदिक सिद्धांत समजून घेण्यासाठी हे दोन खंड चिंतनीय आहेत. पीडीएफ आहेत. वेदाङ्ग प्रकाश - १६ खंड महर्षी दयानंदांनी वेदार्थ प्रतिपादनासाठी वेदाङ्ग प्रकाश नावाने जे १६ खंड लिहिले, त्याच सोळा खंडांवर आणखी विस्तृत भाष्य करून पंडितजींनी हे सर्व खंड पुन्हा संपादित केलेले आहेत. पंडितजींची आणखी काही ग्रंथसंपदा आहे जी विकीपीडियावर उपलब्ध आहे. परंतु आमच्या वाचनांत न आल्याने तींवर काही लिहणं युक्त नसल्याने थांबतो! व्याकरणांवर नि पूर्वमीमांसेवर ह्या विद्ववत्श्रेष्ठाने केलेलं कार्य पाहून ह्यांच्या चरणी कितीही दंडवत घातले तरी न्यूनंच ! अशा ह्या विद्वत्श्रेष्ठांस आज त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन ! 🙏🙏🙏 अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु । पाखण्ड खण्डिणी Pakhandkhandinee.blogspot.com #पण्डितयुधिष्ठिरजीमीमांसकजयंतीपूर्वमीमांसावेदआर्यविद्वानसंस्कृतव्याकरण_श्रीकरपात्रीमहाराज

Sunday 14 October 2018

*वैदिक स्त्री-दर्शन - लेखांक चतुर्थ*

*श्रीशारदीय नवरात्रोत्सवानिमित्त विशेष लेखमाला*

*वैदिक स्त्री दर्शन - लेखांक चतुर्थ*

स्त्रियांचा वेदाधिकार - पुराकल्पे तु नारीणां येविषयी काही विचार

कन्या किंवा कोणतीही स्त्री ही यज्ञोपवीताची अधिकारिणी आहे का येविषयी प्रस्तुत लेखांत विचार करायचा आहे. मागील वर्षीच्या नवरात्रोत्सवानिमित्तच्या लेखमालेत वेदाधिकाराविषयी द्वितीय लेखांकात विचार केलाच होता. पण तरीही अधिक विवेचनासाठी पुन्हा लेखनप्रपंच ! ह्या पूर्वीचे लेख ब्लॉगवर आहेतच तिथे वाचावेत.

*पुरा कल्पेषु तु नारीणां मौञ्जी बन्धनमिष्यते ।*
*अध्यापनं च वेदानां सावित्रीवचनं तथा ।*

यमस्मृति

स्त्रियांचा वेदाधिकार मांडताना तत्पक्षीयांकडून हा श्लोक उद्धत केला जातो. ह्यावर त्यांना वेदाधिकार नाकारणार्या सनातन म्हणविणार्या काहींकडून मात्र कल्प शब्दाच्या इतिहास परक अर्थावरून विरोध केला जातो. त्याचा समीक्षात्मक विचार करुयांत. पूर्वपक्ष नि उत्तरपक्ष अशी मांडणी लेखांत केली आहे.

*पूर्वपक्षी* - कल्प हा शब्द कालवाचक आहे नि त्यामुळे पुरातनकाळीच किंवा पूर्वीच्या कल्पातच स्त्रियांस वेदाधिकार होता. ह्या कल्पात तो नाहीये असा ह्याचा अर्थ आहे.

*सिद्धांतपक्षी (आम्ही)* - इथे कालवाचक अर्थ घेणं व्याकरणशास्त्रांस धरून नाही. कारण *इष्यते* शब्द वर्तमानकालीन असल्यामुळे तो जुळत नाही. हा *इष्यते* शब्द *परोक्षे लिट्* ह्या पाणिनीच्या सूत्रानुसार भूत अनद्यतन परोक्षकाळात लिट् लकार यायला हवा. *इष्यते* शब्दाचा अर्थ इष्ट असा आहे, नाकी *ऐतिहासिक इष्ट होता असा.* म्हणूनच इथे कल्प शब्दाचा अर्थ *"पूर्वविधिषु"* अर्थात वेदाध्ययन, सावित्रीवचन तथा विवाहादि क्रिया करण्यापूर्वी मौञ्जीबंधन अर्थात त्यांचे उपनयन असा अर्थ अभिप्रेत घ्यायला हवा. इथे कल्प शब्दाविषयी प्रमाण पाहूयांत

*अमरकोषे*

*कल्पे विधिक्रमौ - १७।४०*

कल्प, विधि, क्रम असे तीन अर्थ आहेत.

बरं आता साक्षात मनु महाराज काय सांगतात ते पाहुयांत.

मौञ्जीबंधनाच्या आधी वेदोच्चार करु नये.

*नह्यस्मिन्युज्यते कर्म किञ्चिदामौञ्जिबन्धनात् ।*

२।१७१

हा कल्प शब्द विधी अर्थीनेच संस्कृत साहित्यातही द्रष्टव्य आहे. जसे उत्तरकांड प्रमाण मानणारे तुम्ही लोक. भवभूतीच्या उत्तररामचरित्रात

*तदनन्तरं भगवतैकादशे वर्षे क्षात्रैण कल्पेनोपनीय त्रयीविधामध्यापितौ ।*

अर्थ - भगवान वाल्मीकिंनी लव नि कुश ह्यांस एकादश वर्ष पूर्ण होताच क्षात्रकल्प अर्थात क्षात्रविधिपूर्वक उपनयन करून त्यांस त्रयी विद्येचे अध्यापन केलं.

इथे त्रयी विद्या असा शब्द आहे. म्हणजे तीन वेद नव्हे बरं. तर तीन विद्या ज्या चार वेदांत आहेत अशा अर्थाने चारीही वेद शिकविले असा अर्थ आहे.

इथे कल्प शब्दांवर भाष्य करताना टीकाकार वीर राघव लिहितो

*कल्प्यतेsनुष्ठीयतेsनेनेति कल्प अनुष्ठान परिपाटी प्रकाशक ग्रन्थ: ।*


*पूर्वपक्षी* - बरं मग जर हे सत्य असेल तर जसे बालकांच्या उपनयनाविषयी अमुक वर्षी उपनयन नि अमुक प्रकारचे यज्ञोपवीत अशी विधाने आहेत तशी कन्यांविषयी का नाहीत?

*सिद्धांतपक्षी* - छान शंका आहे  ह्याचे समाधान निम्नलिखित आहे.

ज्यांनी वैदिक व्याकरणशास्त्राचा अभ्यास केला आहे,  त्यांस हे ज्ञात असेलच की शास्त्रकारांनी जिथे जिथे सामान्य विधानांत पुंल्लिंगाचा प्रयोग केलाय तिथे ते स्त्रीलिंगाचाही निर्देश ग्रहण करतातच. वैद्यकशास्त्रामध्ये किंवा आधुनिक दंडविधानामध्ये (इंडियन पीनल कोड) जसे पुंल्लिंगी (He) प्रयोग होतात, तेंव्हा त्यावरून स्त्रींने अपराध केल्यांस केवळ स्त्रीलिंगी शब्दांचा उल्लेख नसल्याने त्या अपराधमूक्त होतात की काय ? नाही ना.

जसं *य: कोsपि विषं भुङ्क्ते स स्त्रियते* ( जो कुणी विष प्राशन करेल तो मृतच होईल) ह्या वचनांत पुंल्लिंगी *य:* व *स:* शब्द आल्यामुळे स्त्रीलिंगी शब्द नसल्यामुळे स्त्रियांनी विष प्राशन केलं तर त्या जीवित राहतील काय?

अगदी पूर्वमीमांसेतही आमच्या शास्त्रकारांनी स्पष्टपणे निर्देश करताना

*जातिं तु बादरायणो ऽविशेषात्, तस्मात् स्त्र्यापि प्रतीयेत जात्यर्थस्याविशिष्टत्वात् ।६.१.८।*

ह्यावरील शाबरांचे भाष्य प्रमाण आहे. ते काय लिहितात ते पाहुयांत.

*तुशबः पक्षं व्यावर्तयति नैतद् अस्ति, पुंसो एवाधिकार इति{५/१९२}, जातिं तु भगवान् बादरायणो{५/१९३} ऽधिकृतां मन्यते स्म । आह । किम् अयं [६०९]{५/१९४} स्वर्गकाम इति जातिशब्दः समधिगतः? नेत्याह । कथं तर्हि । यौगिकः, स्वर्गेच्छायोगेन वर्तते। केन तर्हि शब्देन जातिरुक्ता, या अधिकृतेति गम्यते? नैव च{५/१९५} वयं ब्रूमो, जातिवचन इह शब्दोऽधिकारक इति । किं तर्हि । स्वर्गकामशब्देनोभावपि स्त्रीपुंसावधिक्रियेते इति । अतो न विवाक्षतं पुंलिङ्गम् इति कुतः? अविशेषात् । न हि शक्नोति एषा विभक्तिः स्वर्गकामं लिङ्गेन विशेष्टुम् । कथम्? लक्षणत्वेन श्रवणात् । स्वर्गे कामो यस्य, तमेष लक्षयति शब्दः । तेन लक्षणेनाधिकृतो यजेतेति शब्देनोच्यते । तत्र लक्षणमविशिष्टं स्त्रियां पुंसि च । तस्माच्छब्देनोभवापि स्त्रीपुंसावधिकृताविति गम्यते । तत्र केनाधिकारः स्त्रिया निवर्त्यते । विभक्त्येति चेत् । तन्न । कस्मात्? पुंवचनत्वात् । स्त्रीनिवृत्तावशक्तिः. पुंसो विभक्त्या पुनर्वचनमनर्थकम् इति चेन् न । आनर्थक्येऽपि स्त्रीनिवृत्तेरभावः, परिसङ्ख्यायां स्वार्थहानिः परार्थकल्पना प्राप्तबाधश्च । न चानर्थक्यम् । निर्देशीर्थत्वात् । तस्मात् स्त्र्यपि प्रतीयेत जात्यर्थस्याविशिष्टत्वात् ।*

ह्या सारांश सांगायचा तर इतकाच की इथे शाबरांना पुंल्लिंगच केवळ विवक्षित नसून दोन्ही अपेक्षित आहे. म्हणजेच तस्मात् शब्दावरून यज्ञांस स्त्री-पुरुष दोघांचा अधिकार सिद्ध होतो. इतर ठिकाणीही पुंल्लिंगाचा निर्देश असला तरी तिथे स्त्रीलिंगांचेही ग्रहण आहेच. जसे मनुस्मृतीत जातकर्म संस्काराचे प्रतिपादन करताना

*प्राङनाभिवर्धनात् पुंसो जातकर्म विधीयते ।*
२।२९

नाभिछेदनापूर्वी पुरुषांस जातकर्म करावे. इथे *पुंस:* शब्दावरून स्त्रीचाही उल्लेख अभिप्रेत आहेच.

*नामधेयं दशम्यां तु द्वादश्यां वास्य कारयेत् ।*

*चतुर्थे मासि कर्तव्यं शिशोर्निष्क्रमणं गृहात् ।  षष्ठेsन्नप्राशनम् ।*

इथे नामकरणामध्ये *अस्य* आणि निष्क्रमणामध्ये *शिशो:* शब्द पुंल्लिंगी असूनही तिथे स्त्रीचेही ग्रहण सिद्ध आहेच.

शांखायन कल्पामध्ये आचार्य लिहितात

*घृतवन्तं कुलायिनं रायस्पोषं सदस्त्रिणं वेदो दधातु वाजिनमिति वेदे पत्नीं वाचयति ।*

शांखायन - श्रौतसूत्र - १।५

अर्थ - घृतवन्त आदि वेदमंत्र पत्नींस म्हणायला लावावेत.

जर स्त्रियांना वेदाधिकार नसताच तर हा वेदमंत्र म्हणण्याचा विषयच आला नसता.

*विवाहसमयी स्त्रींस यज्ञोपवीताचा अधिकार*

ज्यांनी विवाह केला असेल त्यांस ज्ञात असेल की विवाह मंडपांत कन्येंस आणताना तिला यज्ञोपवीत धारण करण्यांस सांगितलंच आहे. ह्याचे प्रमाण

गोभिल गृह्यसूत्र - २।१।१९

*प्रावृतां यज्ञोपवीतिनीमम्बुदायन् जपेत् सोमोsददद् गन्धर्वाय ।*

अर्थ - उत्तरीयवस्त्राने आच्छादित तथा यज्ञोपवीत धारण केलेल्या त्या कन्येंस विवाह मंडपांत आणावे.

*पत्नींस यज्ञासंबंधी अधिकार*

*पत्युर्नो यज्ञसंयोगे ।*

अष्टाध्यायी - ४।१।३३

*पतिशब्दस्य नकारादेश: स्यात् यज्ञेन सम्बन्धे ।*

अर्थात पत्नी शब्द यज्ञाच्या संबंधाचा बोधक आहे.

गोभिल गृह्यसूत्रातले आणखी प्रमाण

*कामं गृह्यsग्नौ पत्नीं जुहुतात्सायं प्रातर्होमौ, गृहा: पत्नी, गृह्य एषोग्निर्भवतीति ।*
१।३।१५

ह्यावर भाष्यकार लिहितो

*पत्नीमध्यापयेत् कस्मात् ? पत्नी जुहुयादितिवचनात् न खल्वनधीत्य शक्नोति पत्नी होतुमिति ।*

अर्थात स्त्रींस वेदादिशास्त्र शिकविलेच पाहिजेत. कशासाठी ? तर तिने अग्निहोत्र करावे हे विधान असल्यामुळे. अध्ययन केल्याशिवाय ती हवन करण्यांस योग्य होत नाही. ह्याच गृह्यसूत्रातील *दम्पती एव ।* १।४।१५ इथेही दोघांचाही यज्ञाधिकार सिद्ध आहे.

*पूर्वमीमांसा दर्शनांत दोघांसही यज्ञाचा अधिकार*

*स्ववतोस्तु वचनादकैककर्म्यं स्यात् ।*
६।९।१७

*एवं प्राप्ते व्रूमः,-“स्ववतोस्तु वचनात्तयोः सहक्रियाएवं स्मरन्ति,--‘ धर्म्मे चार्थे च कामे च नातिचरि-तव्यः’ --इति, तथा‘ सह धर्म्मश्चरितव्यः, सहापत्यम् उत्पादयितव्यम्’ । तत्र यागोवश्यं सहपत्न्या कर्तव्य इति ।*

शाबरभाष्य - पूर्वमीमांसा

अर्थात स्त्री-पुरुष दोघांस एकच कर्म करण्याच्या वचनांनी बोध असल्यामुळे एकत्रच कार्य अभिप्रेत आहे. धर्मार्थकामात स्त्रींस पृथक करु नये अशी स्मृती आहे. म्हणूनच पत्नींसह अवश्य याग केलेच पाहिजेत.

तसेच पुन्हा मीमांसेत ६।१।२१ येथेही *फलवतां च दर्शयति ।* ह्या सूत्रावरील शाबरभाष्य पाहिलं तर दोघांसही यज्ञाधिकार एकत्र व दोघांसही स्वर्गांत आविनाश ज्योतींस धारण करण्याचा अधिकार आहे. शाबरांनी पुढे स्पष्टपणे *तस्मादप्युभौ अधिकृताविति सिद्धम् ।* ह्यावरून दोघांचाही अधिकार सिद्ध केलाय.

एवंच ।

*पूर्वपक्षी* - इथे केवळ वेदमंत्र म्हणायला सांगितले आहेत. त्यावरून वेदाध्ययन सिद्ध होत नाही.

*सिद्धांतपक्षी* - अर्थ न जाणता केलेल्या मंत्रपठणाला निरुक्तकारांनी दोषच दिला आहे.

भट्टभास्करभाष्यामध्ये १।१।१ येथे

*तज्ज्वलति कर्हिचित् ॥ (नि. 1.18) इति । किञ्च - स्थाणुरयं भारहार: किलाभूदधीत्य वेदं न विजानाति योऽर्थम् । योऽर्थज्ञ इत्सकलं भद्रमश्नुते स नाकमेति ज्ञानविधूत पाप्मा ॥ (नि. 1.18) इति । स्वाध्यायोऽध्येतव्यः (तै.आ. 2.15.1) इति विधिना चार्थज्ञानपर्यन्तमध्ययनं विधीयत इति न्यायसिद्धम् ।*

इथे वेदार्थ न जाणणार्यांस निरुक्तकारांचे वचन देऊन केवळ भारवाही म्हटलंय. व शेवटी अर्थज्ञानासहित अध्यापनच न्यायसिद्ध ठरवलं आहे. ह्यावरूनच वेदाध्ययन नि मंत्रपठण दोन्ही अर्थासहितच सिद्ध होते.

इतक्या सविस्तर विवेचनांवरून आम्ही स्त्रियांस वेदाधिकार नि यज्ञोपवीताचा अधिकार सिद्ध केला आहे. येत्या लेखांत आणखी विवेचन येईलच.

*अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु ।*

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#स्त्रियांचा_वेदाधिकार_पूर्वमीमांसा_गोभिलगृह्यसूत्र_विवाह_वैदिक_स्त्रीदर्शन_शारदीय_नवरात्रोत्सव

Sunday 2 September 2018

वेदविषय - शंका समाधान - लेखांक द्वितीय


*प्रश्न द्वितीय* -  संस्कृत भाषा वेद आने के पहले से थी तो संस्कृत भाषा ईश्वर की भाषा कैसे ?

*समाधान* -  संस्कृत भाषा वेद आनेके पूर्वथी ऐसा किस नें कहा है भाई ?

*सर्वेषां स तु नामानि कर्माणि च पृथक् पृथक् ।*
*वेदशब्देभ्य: एवादौ पृथक्संस्थाश्च निर्ममे ।*

इस मनुस्मृतिके सिद्धान्तके अनुसार(यहीं सिद्धान्त सर्व प्राचीन ऋषियोनें एवं स्वयं आद्य शंकराचार्यजीने उनके ब्रह्मसूत्र भाष्यमेंभी मान्य किया है) वेद प्रथम है, पश्चात् सर्व साहित्य एवं वस्तुएं है । इसविषयपर हमारा एक लेख है वह पढ लीजियें ।

इसके अनुसार वेदके नामोंसे उन आदिसृष्टिकें ऋषिमुनियोनें उनकी भाषा, उनके आचारविचार, उनकी सर्व वस्तुओंका नामकरण किया । भाषा का नामकरण भी वैसे ही हुआ ।

और हाँ जाते जाते यह कहना आवश्यक है की वह भाषा वैदिक संस्कृत थी, आजकलकी लौकिक संस्कृत नहीं । यह लौकिक एवं वैदिक भेद क्या है इसपर कभी भविष्यमें लिखेंगे विस्तारसे ।

*वेद की लिपी है देवनागरी*

भाषा के हेतु आवश्यक है लिपी क्यौंकि लिपी के बिना भाषा सम्भवहीं नहीं । वेदकी भाषा है देवनागरी । इसका प्रमाण स्वयं वेद में है

*अष्टाचक्रा नवद्वारा देवानां पूरयोध्या ।*

यह मन्त्र जैसे अथर्ववेदमें है वैसे तैत्तिरीय आरण्यकमें भी है । यह लिपी ब्रह्मा ने आदिसृष्टिमें निर्माण की यह स्वयं बृहस्पति का वचन है । वह कहता है

*षाण्मासिकेsपि समये भ्रान्तिस्सञ्जायते नृणाम् ।*
*धात्राक्षराणि सृष्टानि पत्रारुढान्यत: पुरा ।*

सन्दर्भ - *आहुनिकतत्व, ज्योतिष्तत्व, व्यवहारप्रकाश आदि ग्रन्थ*

अर्थ - *छः मांस के अन्तरकालमें मनुष्य को भ्रान्ति (विस्मृति) होती है । इस हेतु उस आदि ब्रह्माने पूर्वमें निर्माण किए हुए अक्षरोंको लोग पत्रारुढ कहते है ।*

नारद स्मृतिमें (१।५।७०) लिखा है की

*नाकरिष्यद्यदि ब्रह्मा लिखितं चक्षुरुत्तमम् ।*
*तत्रैयमस्य लोकस्य नाभविष्यच्छुभा गति: ।*

(बृहस्पति का वार्तिक)

अर्थ - *लिखित अक्षर नामके अक्ष अर्थात नेत्र ब्रह्माने निर्माण किये ना हुए होते, तो पृथ्वी के सर्व व्यवहार ठीकसें नहीं हो पातें ।*

*वेद में लेखनकला*

कुछ मूढ लोग यह कहते है की वेद मौखिक परम्परा से हमें प्राप्त हुए तो इस कारण उस समय लेखनपरम्परा आर्योंको ज्ञात नहीं थी । यह आक्षेप भी निर्मूल है एवं निराधार है । वेदमें लेखनकला का उपदेश है इस विषय पर विपुल संशोधन भारतीय विद्वानोनें किया है । जैसे महर्षि दयानन्द एवं सर्व आर्य समाजी विद्वान । वैदिक विज्ञान नामसे आर्य समाजी विद्वानोंका एक मासिक प्रकाशित होता था, उसका पीडीएफ है, उसमें इस विषय पर कुछ लेख है ।

*तथा वेदमहर्षि सातवलेकरजी(तर्कसे वेदका अर्थ इस ग्रन्थमें)*

*वैदिक विद्वान गणपतिशास्त्री हेब्बार (भारतीय लिपींचे मौलिक एकरुप नाम सें उनके ग्रन्थमें )*

*पण्डित गौरीशङ्कर ओझा (उनके प्राचीन भारतीय लिपीमाला नामके ग्रन्थमें)*

*पण्डित रघुनन्दन शर्मा (उनके वैदिक सम्पत्ति एवं अक्षर विज्ञान नामक ग्रन्थमें )*

*पण्डित भगवद्दत्त रिसर्च स्कौलर उनके भाषा का इतिहास इस ग्रन्थमें*

और भी बहौतसे है । अस्तु ।

*उपरोक्त सर्व ग्रन्थ हमारे समीप पीडीएफ है ।*

निरुक्तकार यास्कके ग्रन्थपर जो दुर्गाचार्य की वृत्ति है उसमेंभी दुर्गाचार्यजीनें वेद कण्ठस्थ थे तो लेखन कला नहीं थी इस आक्षेप का खण्डन किया है । आप वहाँ पढ सकते है ।

अस्तु ।

*भाषा का ह्रास होता है या विकास ?*

आधुनिक डार्विनके मतानुयायी विकासवादी एवं उनके पक्षधर पाश्चात्य तथा कुछ अन्धानुयायी पौर्वात्य लोग कहते है की भाषा का विकास होता है एवं भाषा शनै: शनै: विकसित होती रहती है । यह पूर्ण रूपसे निराधार एवं कोरी कल्पना है इन विद्वानोंकी ।

वास्तवमें जैसे हमने पूर्वमेंही कथन किया था की वैदिक संस्कृत भाषा विश्वकी एकमेवही भाषा है, जिसमें आदिकालसें अद्यदिनपर्यंत कोई भी परिवर्तन नहीं हुआ । किंचितभी नहीं हुआ । जो कुछ भी परिवर्तन आज वैदिक एवं लौकिक संस्कृत के भेदसे दिखाई पड़ता है वह वास्तव में इस भाषा के ह्रास का विषय है ।

और यह मैं नहीं कर रहा हुँ क्योंकि मै कोई संस्कृत भाषा का विद्वान थोडी ही हुँ ?अभी तो मैं एक अल्पज्ञ एवं अज्ञानी व्यक्ति हुँ देव । *यह कह रहा एक ऐसा विद्वान जिसने अपने जीवनके साँठ (६०) वर्ष अर्थात छ: दशकसे अधिक वर्ष केवल संस्कृत भाषा के अध्ययनमें व्यय किये है । इस विद्वान का नाम है पण्डित युधिष्ठिर मीमांसक !* इस मूर्धन्य स्वनामधन्य विद्वानने ६० वर्ष के अध्ययनपश्चात् जिस त्रिखण्डात्मक *संस्कृत व्याकरणशास्त्र का इतिहास* नामक ग्रन्थ का निर्माण किया है, उसके प्रथम खण्डमें प्रस्तावनामें वे क्या लिखते है द्रष्टव्य है । लेखकनें और भी बहोतसा साहित्य निर्माण किया है जिसपर हम कभी भविष्य में लिखेंगे । अस्तु । वे लिखते है 👇

*संस्कृतभाषा विश्व की आदि भाषा है वा नहीं इसपर इस ग्रन्थमें विचार नहीं किया । परंतु भाषा विज्ञान के गम्भीर अध्ययन के अनन्तर हम इस परिणाम पर पहुंचे है कि संस्कृतभाषा में आदि(चाहे उसका आरम्भ कहीं से क्यों न माना जाय) से आज तक यत्किंचित परिवर्तन नहीं हुआ । आधुनिक भाषाशास्त्री संस्कृत भाषा में जो परिवर्तन दिखाते है, वह सत्य नहीं है ।  हाँ आपापत: सत्य अवश्य प्रतीत होते है परंतु उस प्रतीति का एक विशेष कारण है। और वह है संस्कृतभाषा का ह्रास ।  संस्कृतभाषा अतिप्राचीन कालमें बहुत विस्तृत थी ।  शनै: शनै: देशकाल और परिस्थितियों के परिवर्तन के कारण म्लेंच्छ भाषाओं की उत्पत्ति हुई और उत्तरोत्तर उनकी वृद्धि के साथ-साथ संस्कृतभाषा का प्रयोगक्षेत्र सीमित होता गया । इसीलिए विभिन्न देशोमें प्रयुक्त होनेवालें संस्कृतभाषा के विशिष्ट शब्द संस्कृतभाषा से लुप्त होगये । भाषाविज्ञानवादी संस्कृतभाषामें जो परिवर्तन दर्शाते है वह सारा इसी पदलोप अथवा संस्कृतभाषा के संकोच (ह्रास) के कारण प्रतीत होता है । वस्तुत: संस्कृतभाषा में कोई मौलिक परिवर्तन नहीं हुआ । हमनें इस विषय का विशद निरुपण इस ग्रन्थ के प्रथमाध्याय में किया है । अपने पक्ष की सत्यता दर्शाने के लिए हमनें १८ प्रमाण दिये है। हमनें अपनें विगत ६० वर्ष के संस्कृत अध्ययन तथा अध्यापनकालमें संस्कृत भाषा का एक भी ऐसा शब्द नहीं मिला, जिसके लिए कहा जा सके की अमुक समयमें संस्कृतभाषामें इस शब्द का यह रुप था और तदुत्तपकालमें इसका यह रुप होगया ।*

प्रस्तावना - संस्कृत व्याकरणशास्त्र का इतिहास - खण्ड प्रथम - पण्डित युधिष्ठिर मीमांसक - चतुर्थ संस्करण - पृष्ठ १३

(हमारे समीप इसका द्वितीय, तृतीय एवं चतुर्थ ऐसे तीनों संस्करण पीडीएफ स्वरुपमें उपलब्ध है)

पण्डितजी जैसा सुविद्य विद्वान यदि ऐसा सिद्धान्त मण्डित करता है तो हमें इसपर विश्वास करना कोई अत्युक्ति नहीं होगी । तथापि हम स्वयं इसका अनुभव कर सकते है ।

यद्यपि पाणिनीय व्याकरणमें द्वितीय बहुवचन का भेद वैदिक संस्कृत सें दर्शित होता है, इसके कारण कुछ भाषाविद यह लौकिक एवं वैदिक संस्कृत का भेद जानकर, जैसा की हमने प्रथमलेखमेंहि निर्देश किया था, यह अनुमान लगाते है की वैदिक संस्कृत में परिवर्तन हुआ है ।

किन्तु यह आरोप भी निराधार है ।

क्यौंकि देखिए वेदसंहिता के प्रत्येक शब्द एवं मंत्रमें पूरें भारतमें कहींभी उच्चारण का भेद तो नहीं वरन साम्यता ही है । एक अवाक्षर काभी भेद नहीं पाया जाता ।

क्यों भाई ? ऐसा क्यौं ?

यदि भाषा का विकास होता तो वैदिक संस्कृतमें परिवर्तन आ जाता ना । इससे सिद्ध है की वैदिक भाषा अपरिवर्तनीय तो हैही अपितु वह अपौरुषेयभी है ।

तुकाराम चिंचणीकर
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#वेदज्ञान_ईश्वरीयज्ञान_ईश्वर_भाषा_विकास_उत्पत्ति_विकासवाद_मनुष्य_संस्कृत_अपरिवर्तनीयता

Thursday 30 August 2018

वेदविषय - शंका समाधान - लेखांक प्रथम


यह लेखमाला का प्रथम भाग है । इसके अग्र पाच और प्रश्न एवं उनका समाधान ऐसे लेख आयेंगे ।

*प्रश्न* - यदि वेद ईश्वरीय ज्ञान है और आदिमें चार ऋषियोंको उनकें आत्मामें दिया है तो कुछ प्रश्न है । सृष्टि का प्रथम दिन ।

*समाधान* - सर्वप्रथम तो यह आपको ज्ञान होना आवश्यक है कि वेदज्ञान ईश्वर का नित्यज्ञान है और यह मान्यना सर्व प्राचीन ऋषियों कि है, केवल महर्षि दयानन्द वा आर्य समाज की नहीं । वसिष्ठ-विश्वामित्र-वाल्मीकिसे जैमिनी पतंजलि पर्यंत सर्व ऋषि वेद को नित्यज्ञान कि संज्ञा देते है । जैसे ईश्वर नित्य है वैसे उसका ज्ञान जो वेदरुपी चतुर्संहिताओंमें शब्द बद्ध है, वहभी नित्य है । अब नित्य शब्द का अर्थ क्या है इसका समाधान आपको ऋषिकृत *ऋग्वेदादिभाष्यभूमिकामें* प्राप्त हो जायेगा । इसके उपर हम पश्चातमें संवाद करेंगे । ऋषीके मन्तव्यानुसार जो उनका निजी नहिं अपितु सर्व प्राचीन परम्परा प्राप्त ऋषियोंका है, उसके अनुसार वेद जीवसृष्ट्यारम्भमें प्रदत्त ईश्वरीय ज्ञान है । आपने सृृष्टिका प्रथम दिन ऐसा उल्लेख किया है । यहाँ आपको क्या अर्थ प्रतिपादित है यह आपहीं कथन कीजिये । सृष्टि निर्माण होके तो चार अब्ज बत्तीस कोटी वर्ष हो गये है । हाँ मानवसृष्टि के वर्ष जो नित्यसंकल्पमें हम गिनते है उतने हुए है । आप देख सकते है ।महर्षीने वेदोंका आविर्भाव काल मानवसृृष्टिकें आरम्भ का काल माना है जो उपरोक्त नित्यसंकल्पका काल है और उसमें ना कुछ हानीं है ना कुछ त्रुटिं है ।

आपकी शंका है की

१. *उस समय यदि भाषा नहीं थी तो ज्ञान दिया कैसे ?*

*समाधान* - किसी भी भाषा कें सिवाय ज्ञान हो हीं नहीं सकता । वेद तो वैदिक संस्कृत भाषामें है एवं देनवागरीं लिपीमें है जो उन ऋषियोंके अन्त:करणमें प्रकट हुए । इसका प्रमाणभी वेदमेंही है हमने दिया था कुछ मास पूर्व । पुन: देंगे । उस परमात्मानेंही प्रकाश किया उनका ।

वास्तवमें ज्ञान की परिभाषा क्या है ? आपको किसी भी वस्तु का ज्ञान होता है इसका अर्थ क्या है ? कोई माध्यम तो आवश्यक है ना,
जैसे यह आपके और मेरे हातमें भ्रमणभाष्य (मोबाईल) है यह कैसे ज्ञान हुआ ? किसीने उसको वह नाम दिया है उसके लक्षणोंसेंही हमनें उस वस्तुका ज्ञान प्राप्त किया ना ।

योगदर्शन में कहा है की

*स एष पूर्वेषामपि गुरु: कालेनानवच्छेदात् । १.२६*

वह ईश्वर सर्व गुरओंका गुरु है जो कभी कालसें बंधता नहीं ।

क्योंकि ज्ञान उसको कहते हैं कि जिससे ज्यों का त्यों जाना जाय। जब परमेश्वर अनन्त है तो उसको अनन्त ही जानना ज्ञान, उससे विरुद्ध अज्ञान और अनन्त को सान्त और सान्त को अनन्त जानना अज्ञान अर्थात् ‘भ्रम’ कहाता है।

 ‘यथार्थदर्शनं ज्ञानमिति’ (तुलना-भ० गी० 13.11.)

 जिसका जैसा गुण, कर्म, स्वभाव हो, उस पदार्थ को वैसा ही जानकर मानना ही ‘ज्ञान’ और ‘विज्ञान’ कहाता है और उससे उलटा ‘अज्ञान’ है। इसलियेः-

*क्लेशकर्मविपाकाशयैरपरामृष्टः पुरुषविशेष ईश्वरः॥*

यो० सू० समाधिपाद-24

जो अविद्यादि क्लेश, कुशल, अकुशल, इष्ट, अनिष्ट और मिश्र फलदायक कर्मों की वासना से रहित है, वह सब जीवों से विशेष ‘ईश्वर’ कहाता है।

भाषा की उत्पत्ति एवं विकास के सन्दर्भमें भारतीय मनीषियोंने जो चिन्तन किया है वह वेद से सन्दर्भ स्थापित करता है । यद्यपि पश्चिमी चिन्तक आजपर्यंत इस विषयपर अंतिम निर्णय नहीं कर पाएं, तथापि इसपर उन्होनें प्रमुखता से चार सिद्धान्तोंका मंडन किया है । इस विषय पर पण्डित भगवद्दत्तजीका *भाषा का इतिहास* यह ग्रन्थ अवलोकन करें यह विनती है । वास्तवमें तो विकासवाद को माननेहारे पश्चिमी एवं उनके अनुकरण करनेहारे एतद्देशीय अन्धानुयायी आधुनिक विद्वान भाषा का विकास होता है यह जो तर्कहीन सिद्धान्त का मण्डन करते है वह तर्ककी कसौटी पर तो टिक ता ही नहीं ।

इनके दुर्भाग्यसे मैक्सम्युलर सहित एतद्देशीय कुछ प्रामाणिक विद्वानभी यहीं अनुप्राणित करते है की आदिभाषा एक ही थी, उसमें कालान्तरसें विकार होकर उसके अनेक रुपान्तर हो गयें ।स्वयं मैक्सम्युलरभी उसके *भाषाविज्ञान (सायन्स ओफ लैंग्वेज)* इस ग्रन्थमें लिखता है की

*We are more accustomed to all those changes in the growth of language, but it would be more appropriate to call this process of phonetic change a decay. On the whole, this history of all the Aryan Languages is nothing but a gradual process of decay.*

Page no. 51 and 272 - Volume I - Science of Language - Maxmullers

डार्विनका विकासवाद भाषा के सिद्धान्त पर तो पूर्ण रुपसे धराशायी होता है ।पण्डित रघुनन्दन शर्माजीने उसका समग्र विवरण वैदिक सम्पत्तिमें किया ही है, आप वहां देख सकते है ।

*Darwinism tested by the Science of Language*

इस ग्रन्थमें विकासवाद की भाषा के अध्ययन पर  धज्जियाँ उडायी गयीं है । डार्विनके विकासवाद को जर्मनी भाषा शास्त्रज्ञ श्लाईशरनेंभी इस ग्रन्थमें पूर्ण रुपसे खण्डित किया था । लंदनसे प्रकाशित यह ग्रंथ का आंग्लानुवाद १८५९ में हुआ था जिसमें डार्विनका भाषा का विकास होता है इसपक्ष की समीक्षा लेखकनें की है । वैदिक सिद्धान्त के अनुसार तो भाषा का ह्रास होता है, विकास नहीं ।

अब भाषा प्राप्त कैसे हुई ?

वैदिक सिद्धान्त के अनुसार ब्रह्मा आदि ऋषियोनेंही (जी हाँ ऋषिही थे वे लोग) उनसे मनुष्य को वेदाश्रित भाषा प्रदान प्राप्त हुई । पौराणिक ग्रन्थोंमें उन्हे चार मुख वाला जो कहा जाता है वह गप्प है । इसका खण्डन स्वयं श्वेताश्वेतरोपनिद करता है । अस्तु ।

भाषा का इतिहास यह सिद्ध करता है की जिस किसी भी भाषा को सर्व भाषाओंका मूल मानना होगा, वह समृद्धही होनी आवश्यक है । यह विकासवाद के सर्वथा विपरित है । जिसको हम अन्त:प्रेरणा अथवा Revealation कहते है, उसकी आवश्यकता हैही जीवनमें । क्योंकि केवल ईश्वर को स्वाभाविकी ज्ञान होता है, मनुष्य को नहीं। आदिकालमें उस परमात्मानें चार ऋषियोंके अन्त:करणमें वेद ज्ञान का प्रकाश करना आवश्यक ही है ।

क्यौंकि कोई भी व्यक्ति अथवा मनुष्य ज्ञान स्वयं नहीं प्राप्त कर सकता है । यदि ऐसा होता तो हम पाठशालामें जाकर शिक्षा क्यौं प्राप्त करतें ? जन्मसेंही हमें ज्ञान क्यौं नहीं होता ?

कहाँ गये विकासवादी ? है कोई उत्तर ? सो शिक्षा की आवश्यकता तो हैही । इस हम नकारही नहीं सकते ।मैक्सम्युलर स्वयं लिखता है उपरोक्त ग्रन्थमें स्वयं देखिए

*If there is God who has created heaven and Earth, it will be unjust on His part, if He deprived millions of Souls born before moses of His Divine Knowledge. Reason and comparative study of religions declare that God gives His Divine Knowledge to Mankind from his first appearance on earth.*

एक ख्रिस्ती मिशनरी होकर भी वह सत्य को प्रकाशित करता है जो महर्षीनें भी प्रकाशित किया है ।

तुकाराम चिंचणीकर
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#वेदज्ञान_ईश्वरीयज्ञान_ईश्वर_भाषा_विकास_उत्पत्ति_विकासवाद_मनुष्य

Friday 17 August 2018

अटलस्य पश्य॒ काव्यं॒ न म॑मार॒ न जी॑र्यति । - लेखांक - प्रथम






अथर्ववेदामध्ये एक मंत्र आहे.

*ॐ अन्ति॒ सन्तं॒ न ज॑हा॒त्यन्ति॒ सन्तं॒ न प॑श्यति । दे॒वस्य॑ पश्य॒ काव्यं॒ न म॑मार॒ न जी॑र्यति ॥*

अथर्ववेद - १०.८.३२

*त्या देवाचे काव्य पहा जे कधीच जीर्ण होत नाही किंवा मरतही नाही. नाश पावत नाही.*

कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्रीज्ञानोबारायांनी कवित्वाची लक्षणे सांगताना

*वाचे बरवें कवित्व ।*
*कवित्वीं बरवें रसिकत्व ।*
*रसिकत्वीं परतत्व ।*
*स्पर्श जैसा ।*

ज्ञानेश्वरी - १८-३४७

असे लिहिलंय.

आदरणीय श्री अटलजींच्या काव्यप्रतिभेचे चिंतन करताना ह्या उपरोक्त वचनांचा आधार घेण्याचा मोह टाळता येत नाही.

अगदी स्पष्टच आरंभी सांगायचे तर मला काव्यातलं क'ही कळत नाही. पण तरीही सिंबायोसिस महाविद्यालयांत असताना २००८ मध्ये आदरणीय अटलजींच्या *मेरी इक्यावन कविताएँ* हा काव्यसंग्रह वाचनांत आला. माझं भाग्य हे की आदरणीय अटलजी पंढरीत पंतप्रधान म्हणून आले असताना त्यांना पाहण्याचं भाग्य लाभलं. मी अगदी लहानच अकरा बारा वर्षांचाच होतो. लाडक्या पंतप्रधानाला समोर पाहणं हे खचितच स्वप्नपूर्तीचे लक्षण होतं. त्यावेळी अटलजींच्या कविता फारशा ज्ञातही नव्हत्या. पण पुढे सिंबायोसिस मध्ये त्या वाचल्या.

*अटलजींच्या वाणींस कवित्व, कवित्वांस रसिकत्व व रसिकत्वांस परतत्वाचा संस्पर्श होता. आणि हे परतत्व दुसरे आणखी काय असणार तर हे हिंदुराष्ट्रीयत्वच ! हे राष्ट्रीयत्वच त्यांचे कवित्व, रसिकत्व व परतत्व संस्पर्शत्व होतं.*


*अथ काव्यलक्षणम् ।*

आमच्या प्राचीन शास्त्रकारांनी काव्य शब्दाची मीमांसा करताना अनेक व्युत्पत्या दिल्या आहेत. *साहित्यशास्त्रकार श्री मम्मटाचार्यांनी*

*तददोषौ शब्दार्थौ सगुणौ ।*

अर्थ - *काव्यगुणसंपन्न निर्दोष शब्दरचना, शब्दसंहितारचना म्हणजे काव्य होय.*

तर *संतश्रेष्ठ श्रीज्ञानोबारायांनी* ज्ञानेश्वरीच्या आरंभी मंगलाचरणामध्ये वेदस्वरुप सांगताना अर्थात वेदांचे अपौरुषेयत्व सूचित करताना *काव्याचे लक्षण* ही ध्वनित केलंय. ते म्हणतात

*हे शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष ।*
*जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ।*

ह्यात निर्दोष शब्दरचना व लावण्याने नटलेली अर्थ शोभा हे काव्याचे प्रधान अंग सांगितलंय.

ह्याचेच पुढे चिंतन *रसगंगाधरकार श्रीजगन्नाथ पंडितांनी* करताना

*रमणीयार्थं प्रतिपादक: शब्द: काव्यम् ।*

अर्थ - *रमणीय अर्थ प्रतिपादन करणारी शब्द रचना म्हणजे काव्य होय.*

अटलजींच्या काव्यप्रतिभेचे चिंतन करताना *साहित्यदर्पणकार* आचार्य श्रीविश्वनाथाच्या *साहित्यसुधासिन्धु* ह्या ग्रंथाचे स्मरण होतं. तो लिहितो

*जायते परमानन्दो ब्रह्मानन्दो सहोदर: ।*
*यस्य श्रवणमात्रेण तद्वाक्यं काव्यं उच्चते ।*

*काव्य कशांस म्हणावं ? विश्वनाथ लिहितो की ज्याच्या श्रवणमात्रानेच ब्रह्मानंदासह त्याचा सहोदर परमानंदांसही आपण प्राप्त होतो, त्यांस काव्य म्हणावं.*


इथे अटलजींच्या व आम्हा रसिकांच्या दृष्टीनेही जो ब्रह्मानंद व त्याचा सहोदर परमानंद आहे, त्याचा *प्रतिपाद्य विषय हा साक्षात हे प्राणप्रिय हिंदुराष्ट्र, ही भारतमाता आहे.* अगदी सावरकरांच्या भाषेत

*तूंतेचीं अर्पिलीं नवी कविता रसाला ।*
*लेखाप्रति विषय तुंचि अनन्य जाहला ।*

इथे अटलजींच्या काव्याचा चिंतनाचा विषय वर सांगितल्याप्रमाणेच केवळ राष्ट्रच आहे. तोच एक अनन्य विषय आहे.

*काव्ये नवरसात्मक: ।*

काव्य हे रसात्मक आहे. हे रस नऊ आहेत असे वचन आहे. भरतमूनी मात्र त्याच्या नाट्यशास्त्रांत *अष्टौ नाट्ये रसास्मृता* अर्थात आठच रस मानतो. पण ह्यात एका *आणखी दोन रसांची भर आमच्या गुरुदेवांनी परमादरणीय श्री किसन महाराज साखरेंनी घातलेली आहे.* जिज्ञासूंनी त्यांचा *नवरसीं भरवीं सागरु* हा त्यांचा ग्रंथ वाचावा. असो. ह्या रसांचे चिंतन करताना गुरुदेव लिहितात की 

*हा रसभाव पूर्ण विदग्धवृत्तीनें अर्थात ह्रदयांस भिडून त्याचे विवक्षित परिणाम श्रोत्यांवर होतील, अशा शहाणपण लाभलेल्या चातुर्याने वर्णिलें आहेत ज्ञानोबारायांच्या साहित्यात.*



आदरणीय अटलजींच्या काव्यातही हे नऊरसांपैकी काही रस आपणांस दृष्टिपथांत येतातच. त्यांपैकीच काहींचे चिंतन इथे प्रस्तुत लेखमालेचा विषय आहे. प्रामुख्याने अटलजींच्या काव्यामध्ये वीर, करुण, अद्भूत, रौद्र, वात्सल्य व शांत रस येतात. ह्यातला वात्सल्य हा आविष्कार श्रीगुरुदेवांचाच आहे. असो.

येत्या लेखमालेंत ह्याचा काहीसा विचार करण्याचा आमचा हेतु आहे.

अगदी आरंभीच म्हटल्याप्रमाणे मला काव्यातलं क ही कळत नाहीच. तरीही गेली दीडच्या समीप दशक ह्या तरल प्रतिभेच्या नि कविमनाच्या अजातशत्रु राष्ट्रनेत्याचे हे काव्यचिंतन श्रवण करतो आहे. म्हणून माझ्या अल्पबुद्धिनुसार ह्या राष्ट्रपुरुषांस एक आदरांजली वाहण्याच्या हेतुने हा लेखनप्रपंच !

पुढील लेखांत भेटुच !

क्रमश: ।

भवदीय,

तुकाराम चिंचणीकर
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#अटलजी_बिहारीवाजपेयी_पंतप्रधान_राष्ट्रपुरुष_राष्ट्रनेता_कवित्व_रसिकत्व_राष्ट्रीयत्व_हिंदुत्व_नऊरस

Tuesday 17 July 2018

मनुस्मृती, परमादरणीय श्रीभिडे गुरुजी, राज्यघटना व डॉ. आंबेडकर



परमादरणीय श्री भिडे गुरुजींच्या *मनुस्मृती ही जगातील प्रथम घटना* ह्या उल्लेखावरून त्यांच्यावर तोंडसुख घेणारे पत्रभडवे, प्रेश्यावृत्तीने कार्यकरणारी प्रसारमाध्यमे (प्रेस्टिट्युट्स), त्यांचा द्वेष करणारी समाजमाध्यमांवर व्यक्त होणारी अर्ध्या हळकुंडांत पिवळी झालेली अक्कलशून्य पिलावळ, त्यांचेच वाचून किंवा पाहून भ्रमित झालेली सर्वसामान्य जनता ह्या सर्वांसाठी.👇

*स्वत: महामानव डॉ. आंबेडकरांनीच मनुस्मृतीचा उल्लेख आद्य घटनाकार असाच केलेला आपणांस साहित्यांत आढळतो.* निम्नलिखित सर्व संदर्भ आम्ही त्यांच्या समग्र आंबेडकर हिंदी वाङमयातले दिलेले आहेत, जे भारत सरकारने प्रकाशित केलेले आहे. हे सर्व साहित्य आंतरजालांवर पीडीएफ स्कैन्डही आहे.

*आम्ही प्रथमच सांगु इच्छितो की व्यावहारिक जीवनांत आम्हांस भारतीय राज्यघटना प्रमाण व मान्यच आहे. पण तरीही तिच्या नावाखाली उगाचच मनुला शिव्या देणार्यांसाठी हा लेखन प्रपंच.*

परमादरणीय श्रीगुरुजींच्या नावाने कंठशोष करणार्यांनी आधी आंबेडकरांची मते वाचावीत.👇

*आंबेडकरांनी केलेली मनुस्मृतीची स्तुती*

ते स्वत: मान्य करतात की मनु हा जगातला प्रथम राज्यघटनाकार

१. ‘‘स्मृतियां अनेक हैं, तो भी वे मूलतः एक-दूसरे से भिन्न नहीं हैं।………इनका स्रोत एक ही है। यह स्रोत है ‘मनुस्मृति’ जो ‘मानव धर्मशास्त्र’ के नाम से भी प्रसिद्ध है। अन्य स्मृतियां मनुस्मृति की सटीक पुनरावृत्ती हैं। इसलिए हिन्दुओं के आचार-विचार और धार्मिक संकल्पनाओं के विषय में पर्याप्त अवधारणा के लिए मनुस्मृति का अध्ययन ही यथेष्ट है।’’

(डॉ. अम्बेडकर समग्र हिन्दी वाङ्मय, खण्ड ७, पृ० २२३)

 (ख) *‘‘अब हम साहित्य की उस श्रेणी पर आते हैं जो स्मृती कहलाता है। जिसमें से सबसे महत्वपूर्ण मनुस्मृति और याज्ञवल्क्यस्मृति हैं।’’*

(वही, खण्ड ८, पृ० ६५)

(ग) *‘‘मैं निश्चित हुँ कि कोई भी रूढिवादी हिन्दू ऐसा कहने का साहस नहीं कर सकता कि मनुस्मृति हिन्दू धर्म का धर्मग्रन्थ नहीं है।’’*

(वही, खण्ड ६, पृ० १०३)

(घ) *‘‘मनुस्मृति को धर्मग्रन्थ के रूप में स्वीकार किया जाना चाहिए।’’*

(वही, खण्ड ७, पृ० २२८)


*मनुस्मृती हा निर्बंधशास्त्राचाच अर्थात विधीनियमांचाच ग्रंथ - इति डॉ. आंबेडकर*👇👇👇


*(ङ) ‘‘मनुस्मृति कानून का ग्रन्थ है, जिसमें धर्म और सदाचार को एक में मिला दिया गया है। चूंकि इसमें मनुष्य के कर्तव्य की विवेचना है, इसलिए यह आचार शास्त्र का ग्रन्थ है। चूंकि इसमें जाति (वर्ण) का विवेचन है, जो हिन्दू धर्म की आत्मा है, इसलिए यह धर्मग्रन्थ है। चूंकि इसमें कर्तव्य न करने पर दंड की व्यवस्था दी गयी है, इसलिए यह कानून है।’’*
(वही खण्ड ७, पृ. २२६)

 अशा प्रकारे मनुस्मृती ही एक *तत्कालीन संविधान आहे, धर्मशास्त्र आहे, आचार शास्त्र आहे. हीच प्राचीन भारतीय साहित्यातली मान्यता आहे.डॉ.आंबेडकरांचे सुद्धा हेच मत होते.*

*मनुस्मृति का रचयिता मनु आदरणीय है*

 डॉ.आंबेडकर स्वत: उक्त मनुस्मृतीच्या रचयित्यांस आदरपूर्वक स्मरण करतात.

(क) *‘‘प्राचीन भारतीय इतिहास में मनु आदरसूचक संज्ञा थी।’’*
(वही, खंड ७, पृ० १५१)

(ख) *‘‘याज्ञवल्क्य नामक विद्वान् जो मनु जितना महान् है।’’*
(वही, खंड ७, पृ० १७९)


*आंबेडकर स्वत:च मनुला घटनाकार अर्थात विधीप्रणेता मानतात.*


*मनु हा विधिप्रणेता अर्थात घटनाकारच– डॉ. आंबेडकर*

ते स्वायंभूव मनूंस प्रथम घटनाकार मानतात. कसे ते पाहुयांत.

 *(क) ‘‘इससे प्रकट होता है कि केवल मनु ने विधान बनाया। जो स्वायम्भुव मनु था।’’*

(डॉ. अम्बेडकर समग्र हिन्दी वाङ्मय, खण्ड ८, पृ. २८३)

 ह्या मनुचे वंश विवरण देताना बाबासाहेबांनी सुदास राजाला इक्ष्वाकुच्या ५० व्या पीढींत मानलंय. इक्ष्वाकु हा सातव्या मनु वैवस्वताचा पुत्र होता आणि  वैवस्वत मनु हा स्वायंभुव मनुच्या सुदीर्घ वंशपरपरेतला सातवा मनु आहे.

(संदर्भ - वही खण्ड १३, पृ. १०४, १५२)

 *(ख) ‘‘मनु सर्वप्रथम वह व्यक्ति था जिसने उन कर्त्तव्यों को व्यवस्थित और संहिताबद्ध किया, जिन पर आचरण करने के लिए हिन्दू बाध्य थे।’’*

 (वही, खण्ड ७, पृ. २२६)

 (ग) *‘‘मनुस्मृति कानून का ग्रन्थ है।…..चूकिं इसमें कर्त्तव्य न करने पर दंड की व्यवस्था दी गयी है, इसलिए यह कानून है।’’*

 (वही, खण्ड ७, पृ. २२६)

 (घ) *‘‘पुराणों में वर्णित प्राचीन परपरा के अनुसार, जितनी अवधि के लिए किसी भी व्यक्ति का वर्ण मनु और सप्तर्षि द्वारा निश्चित किया जाता था, वह चार वर्ष की ही होती थी और उसे युग कहते थे।’’*
(वही, खण्ड ७, पृ. १७०)


 (ङ) *‘‘ये नियम मनु, याज्ञवल्क्य, नारद, विष्णु, कात्यायन आदि की स्मृतियों आदि से संकलित किए गए हैं। ये कुछ ऐसे प्रमुख विधि-निर्माता हैं जिन्हें हिन्दू विधि के निर्माण के क्षेत्र में प्रमाण-स्वरूप मानते हैं।’’*
(वही, खण्ड ९, पृ. १०४)

*(च) ‘‘इसे हिन्दुओं के विधि निर्माता मनु ने मान्यता प्रदान की है।’’*
 (वही, खण्ड ९, पृ. २६)


तुकाराम चिंचणीकर
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#मनुस्मृती_राज्यघटना_श्रीभिडेगुरुजी_डॉ.आंबेडकर_संविधान_सत्य_विपर्यास