Tuesday 25 April 2023

पवित्रयति....






वर्षभर ज्या एकाच तिथीची आतुरतेने वाट पहायची अशी आजची तिथी...


*वैशाख शुद्ध पंचमी अर्थात बौद्धादिबुद्धितमसां खलु चण्डभानु: अशा श्रीमच्छंकरभगवत्पादाचार्यांचा जन्मोत्सव...!*


अद्यापपावेतो युधिष्ठिर शक २६३१ अर्थात इसवी सन पूर्व ५०९ ही जन्मतिथी मानत होतो पण मित्रसूतीतले एक विद्वान Vedveer Arya(वेदवीर आर्य) जे स्वत: एक विद्वान इतिहाससंशोधक आहेत, त्यांच्या संशोधनानुसार ती इसवी सन पूर्व ६ एप्रिल ५७६ निघाली. कारण सूर्य मेष राशीत, शुक्र मीन राशीत, शनी तुळ राशीत, मंगळ सिंह राशीत, बुध मेष राशीत. आणि याला जोडून सूर्य-शुक्राची युती वृषभेत ! हे सर्व तपशील ना इसवी सन पूर्व ५०९ ला जुळतात, ना इसवी सन पूर्व ४४ ना मेकॉलेपुत्रांनी मांडलेल्या व मानलेल्या इसवी सन ७८८ ला...


*पण कालनिर्णय काहीही असला तरी इतकं निश्चित की आचार्यांचा काळही इसवी सन पूर्व ५वं शतकंच आहे, यात कधीच तडजोड नाही. मेकॉलेपुत्रांनी दूर रहावे. या सर्व गोंधळाचे कारण कांची, शृंगेरी, कुंभकोणम् मठांचे अंतर्गत वादविवाद तर आहेतंच. पण बोलायचं कोण?*


या आर्षज्ञानप्रचंड भानुचे जीवनातलं स्थान अचल नि अढळ आहे, होतं नि राहील. महर्षि दयानंदांइतकंच. दोघे मला धर्मजिज्ञासेत पूज्य होते नि राहतील.


यद्यपि माझ्यावर महर्षि दयानंद प्रणीत त्रैतवादाचा प्रभाव असल्याने अद्वैतवाद पूर्ण मान्य करण्यांस अद्यापही माझं मन तयार होत नाही तरीही ह्या दोन वादांमध्ये फारसा काही तात्विक भेद आहे असेही नाहीये. दोघांतली साम्यस्थळं कधीतरी विस्ताराने मांडेन. अनुयायांनी अकारण गोंधळ घातलेला असला तरी मला त्यात‌ रस नाही....


आचार्यांची गुणवैशिष्ट्ये...


ही व्यक्ती सद्गुणांची अशी खाण होती. तिची गुणशालिनता मोजु पाहिली तरी लेखमालेचा विषय होईल. अलोकसामान्य व्यक्तित्व, दिव्योदात्त चरित्र, नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा, अपार नि उत्कट भक्ती, ब्रह्मज्ञानाने तप:पूत देह नि जोडीला तर्कशुद्ध प्रत्युत्पन्न मतीचा धनी असलेला हा योद्धा संन्यासी! बालपणीच पितृछत्र हरपलं तरी संन्यास घेऊनही जन्मदात्री मातेवर निरतिशय प्रेम नि श्रद्धा ठेवणारा हा अद्वितीय मातृभक्त, संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तित्वाला आपलंसं करणारी गुणग्राहकता, आपल्या शिष्यांवर केलेलं अलौकिक प्रेम, भक्तांप्रती असीम दया नि शत्रुंप्रतीही अहैतुकी क्षमा!


आईला दिलेल्या शब्दासाठी संन्यासधर्मही प्रसंगी गुंडाळून ठेवणारा हा थोर मातृभक्त...! आणि त्यावेळी मातृपंचकम् सारखी नेत्रांच्या कडा ओलावणारी रचना करणारा हा कोमल ह्रदयाचा कवी..! माझी आई काहीकाळ आयसीयुत होती त्यावेळी मी ह्या रचनेची पारायणे केली होती. ती बाहेर आली त्यावेळी ह्याची एक पोस्टही केली होती.


*भारतीय दार्शनिकांचा, तत्वचिंतकांचा मुकटमणी...*


अद्वैतवेदांताशी कुणाची सहमती असेल नसेल, हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे, पण त्याकाळी उपलब्ध असलेल्या ६४ मतमतांतरांचा गलबला पाहून कुठेही विचलित न होता, हतोत्साहित न होता, मी एकटा काय करणार‌ असा आपल्यासारखा नकारात्मक विचार कदापिही मनात न आणता हा माणुस आपल्या खड्गाच्या धारेसारखा सुतीक्ष्ण बुद्धीने परमतखंडन नि शुद्ध वैदिक मत पुनर्संस्थापन हेतुने तितक्याच प्रगल्भतेने मीमांसा करत तत्कालीन अवघा आर्य्यावर्त पादाक्रांत करत त्याला सुत्रै मणिगणा: इव या गीतोक्तीप्रमाणे चार पीठाधीश्वरांच्या संन्यासपरंपरेत गुंफत राष्ट्रीय एकात्मता‌ साधत भामतीकार वाचस्पति मिश्रांनी म्हटल्याप्रमाणे


*आचार्यकृतिनिवेशनमप्यवधूतं वचोऽस्मदादीनाम्‌ ।*

*रथ्योदकमिव गङ्गाप्रवाहपातः पवित्रयति: ॥*

भामतीकार वाचस्पति मिश्र...


*म्हणजे ज्याप्रमाणे गंगेचे निर्म्मल जल हे गल्लीतल्या पाण्यालाही निर्म्मल करतं, तद्वतंच आचार्यांची वाणी व लेखणी आमच्यासारख्यांच्या वाणींस व लेखणींस पवित्र करते...*


राष्ट्रीय, सामाजिक, राजकीय, वैश्विक, तात्विक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, वांशिक, दार्शनिक एकात्मता साधणाऱ्या ह्या प्रज्ञासूर्याच्या चरणी २५३२/२५९९ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!


भवदीय...


#श्रीभगवत्पाद_शंकराचार्यजयंती_शांकरमठपरंपरा_वैदिकधर्म_राष्ट्रनिर्णाण_भामती

Saturday 22 April 2023

श्रीपरशुराम होणं तरी कुठं सोप्पंय ???

 


आरंभी घोर तपश्चर्या करत पिनाकपाणीपासून ४६ अस्त्रे प्राप्त करत, पुढे पितृआज्ञेसाठी मातृहत्येचं पातक(टीका) माथी घेताना त्याला काहीच‌ वाटलं नसेल का हो? उद्या इतिहास माझी अवज्ञा मातृहत्यारा म्हणून करेल हा विचार क्षणभरही त्याच्या मनी आलाच नसेल‌ काय? भले पित्याकडून मातेला त्याचे स्मरण न राहण्याचे वरदान घेतलं तरी इतिहासाचं जाऊदे पण जन्मदातीवरंच शस्त्र उचलण्याचे साहस कोण करेल हो? कल्पना तरी? पण पितृआज्ञेसाठी ते पातक त्याने माथी धरलंच ना?


प्रत्येक गोष्टीला अवतारवाद, दैवी लीला वगैरे वेडेपणा करायची मला तरी सवय नाही. कारण मी एक अल्बबुद्धीधारक आहे. श्रीजमदग्नींच्या क्रोधाचं‌ समर्थन होऊ शकतं? ब्राह्मणाला एवढा क्रोध शोभतो? अन्यथा स्कंदपुराणकारांनीच 


पुत्रेणापि पिता शास्या: शिष्येणापि गुरु: स्वयं क्षत्रियै: ब्राह्मणा: शास्या: श्रुतिराह सनातनी|

उन्मार्गगामिनं श्रेष्ठं अपि वेदान्तपारगं नीचै: अपि प्रशास्यिता श्रुतिराह सनातनी|


असे का म्हटलं असते? उपनिषदांनीही 'यान्यस्माकं सुचरितानि' का म्हटलं असतं? 


इतिहासाकडे वस्तुनिष्ठ डोळ्यांनी पहायचं की भगवंतांची लीला म्हणत आंधळ्यासारखं स्वत:ची गोड समजुत घालायची? तो ईश्वरी अवतार असेलही पण आपण मनुष्यंच आहोत की...


अर्थात ह्या प्रसंगानंतर त्यांचा‌ क्रोध कायमचाच शांत झाला असा इतिहास‌ सांगतो...


सहस्त्रार्जुनाने कामधेनु पळवल्यावर त्याच्या पत्नीने मनोरमेने त्याला ती परत करा, हे अपहरण योग्य नाही हे सांगूनही व पुढे चारही भावंडांबरोबर स्वत: श्रीभार्गवरामांनी त्यांस‌ वारंवार कामधेनु परत कर असे विनवूनही त्याने ती न केल्याने उलट युद्धाचे आवाहन दिल्याने अंती निरुपायाने त्याबरोबर युद्ध करत त्याला त्याच्या अधर्माचरणासाठी ठार करत पुन: त्याच्या पुत्रांनी पितृवधाचा सुड घेण्यासाठी आपल्या‌ वडिलांचा सारा आश्रम उध्वस्त करत पित्यावर २१ वार करत‌ त्यांची हत्या केल्यानें आईवरही वार झाल्याने अंती त्याच मातृआज्ञेसाठीच २१ युद्धं करत उन्मत्त क्षात्रसंहाराचे पाप (टीकाही) माथी घेत, शरण आलेल्या क्षत्रियांना अभय देत, जे सदाचरणी आहेत त्यांनाही कुठेच हात न लावता, संपूर्म पृथ्वी कुठेही नि:क्षत्रिय न करता, त्या युद्धांचेही पृथ्वीवर कधीही रात्री न विश्राम करण्याचं यथोचित प्रायश्चित्त घेत, पुनश्च भृगु ऋषींच्या‌ सहाय्याने अकृतव्रणाबरोबर शिल्पवेदाची निर्मिती करत, धनुर्वेदाची संहिताही प्रोक्त करत, सप्तकोंकणाची अर्थात अपरान्हाची निर्मिती करत ती भूमी सुजलाम सुफलाम करणारा हा सृजनकर्ता महर्षि श्रीजमदग्निनंदन...!


ज्याची आई म्हणजे श्रीरेणुकामाताच ही प्रत्यक्ष ईक्ष्वाकुवंशातली होती, त्याच ईक्ष्वाकुवंशातल्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्रासमोर पुढे आपलं तेज विसर्जित करत, त्याचा जयजयकार करत, पुढे द्वापरांती श्रीयोगेश्वरांस सुदर्शन प्रदान करत आणि आपल्याच शिष्यासमोर म्हणजे श्रीभीष्माचार्यांसमोर पराभव पत्करत शिष्याचाही गौरव वाढविणारा असा हा क्षत्रियप्रिय पुरुषश्रेष्ठ श्रीरेणुकानंदन..!


इतकंच काय पण कोळी समाजाला ब्राह्मण करत जातीअंताचा‌ पहिला लढा देणाराही हाच...!


म्हणूनंच म्हणतोय सोप्पं नाही परशुराम होणं...


२१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय हे मूळातंच अतिरेकी विधान आहे. मागेही ह्यावर विस्ताराने लिहिलंय पुनरुक्ती करत नाही. पण केवळ तेवढंच उचलत ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर वाद पेटवायचा आपला नेहमीचा मार्क्सप्रणीत क्लास स्ट्रगलचा अर्थात वर्ग-संघर्षाचा अजेंडा राबवत रहायचा फोडा आणि राज्य कराच्या भेदनीतीचा प्रयत्न कुणी डावे किंवा भारत विखंडन शक्ती किंवा काही राजकारणी खुशाल करोत...


जर हा ब्राह्मण-क्षत्रिय वाद असता तर मध्ययुगीन कालखंडातल्या अनेक राजांनी आपली तुलना श्रीभार्गवरामाशी का केली असती, तसे संदर्भही उपलब्ध आहेत. जो सहस बाह पर राम द्विजराज हैं हे पुण्यश्लोक छत्रपति श्रीशिवरायांनी तरी का मान्य केलं असतं? ते तरी चिपळुणला का गेले असते???


आमच्या दृष्टीने श्रीभार्गवराम होणं सोप्पं तर नाहीच...


कारण केवळ तपाने चिरंजीवी होणं तर दूरंच पण काहीवेळा अप्रिय गोष्टी करूनही तो कटुपणा माथी घेत जगणं हे सोप्पं नाही...!


अंती एकंच...


उपासना, उपासना, उपासना, उपासना|


कशाची? 


तर ब्राह्मतेजाची म्हणजे वेदाध्ययनाची, क्षात्रतेजाची म्हणजे बलसंपन्नतेची, समाजधारणेची म्हणजेच धर्मरक्षणाची, राष्ट्रीयत्वाची म्हणजेच हिंदुत्वाची...!


आजच्या व्याख्यानाचा संक्षेपात सारांश...!


भवदीय...


#अक्षय्यतृतीया_श्रीभगवानपरशुरामजयंती_अपरान्ह_कोंकणनिर्मिती_धनुर्वेद_शिल्पविद्या_सृजनकर्ता

Tuesday 11 April 2023

हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासाचा श्रीराम...


 

कन्दर्प अगणित अमित छवि नवनीलनीरद सुन्दरम्...|


तो कसा आहे, कसा दिसतो, कसा हसतो, कसा चालतो हे कुणाला माहितीय? ज्यांना त्याचं दर्शन झालं, त्या श्रीतुलसीदास, श्रीरामदास, श्रीज्ञानोबा-श्रीतुकोबारायांनाच, श्रीनामदेवरायांस, श्रीचोखोबारायांस, श्रीब्रह्मचैतन्यालाच तो कळला, ओळखता आला, पाहता आला, अनुभवता आला, चित्तात साठवता आला...


राम समजून घ्यायचाच असेल तर श्रीतुलसीदास नि श्रीरामदास वाचलेच पाहिजेच...आणि आत्ताच्या काळात तुलसीपीठाधीश्वर श्रीरामभद्राचार्यजी...! 


अनुभव चित्ता चित्त जाणें...!


तो कन्दर्प कोटी कमनीय आहे. अरे पण कन्दर्पाला कुणी पाहिलंय का? ज्याची उपमा द्यायची ते उपमानंच मूळात जिथे माहिती नाही, पाहिलं नाही, अनुभवलं नाही, तिथे त्यावरून उपमेयाची कल्पना कशी येईल? पण मग म्हणून तो नाहीयेच का? 


तो आहे इतकंच निश्चित! ज्याने श्रद्धेने त्याचं नाम घेतलं, त्याला सतत आळवलं, त्याला तो भले लगेचंच दिसणार नाही, पण त्याची जाणीव तरी खचितंच होईल. आपल्या अंतरात्म्यात एकदा शांतपणे डोकावून पाहिलं तर त्याच्या नामात तो प्रचित होईलंच. कारण नाम आणि नामी अभिन्न आहेत. नाम हे सार, ह्रदयी जपा निरंतर| म्हणूनंच तो अनिर्वचनीय आहे. कारण तो त्याच्या नामातंच आहे...


कुठल्याही संतांचं चरित्र पाहिलं तर झाडून सर्व संत एकंच सांगतात 


नाम घ्या...


श्रीमाऊलीं म्हणतें


तें नाम सोपें रें रामकृष्णगोविंद|

वाचेंसीं सद्गद जपें आधीं|

नामापरतें तत्व नाहीं रे अन्यथा|

वाया आणिका पंथा जाशीं झणें|


नामंच सर्वश्रेष्ठ आहे म्हणजे अन्य मार्ग तुच्छ आहेत असं थोडीचंय? मग असं असूनही संत नामंच का सांगत असतील? संतांना महर्षि पतंजलींचा मूळ वेदप्रणीत योगमार्ग माहिती नव्हता? माऊली तर स्वत: नाथपंथी. मग संतांनी नामंच घ्यायला का सांगावं???


अर्थात पुढे जाऊन योगसाधनेनेच अंतिम ईश्वरप्राप्ती होते हे संतसाहित्य बारकाईनं पाहिलं तर खरं कळेलही. पण तो फार पुढचा विषय. त्याच्या आधीचा पाया नाम आहे. कारण त्याने चित्तशुद्धी होते म्हणून. 


जन्माला आल्यावर पुढे कळायला लागलं की आई म्हणते हाच तुझा बाप. तिथे पितृनिर्णयात मातृवाक्य जसे शब्दप्रामाण्य म्हणून अटल प्रबल प्रमाण असतं तद्वतंच धर्मजिज्ञासेंत संतवाक्य, ऋषिवाक्य प्रबल असतंच असतं. तिथे जास्ती शहाणपणा चालत नाही. चालवला तर माती होते.


पण नाम किती घ्यावं?


जन्मभरीच्या श्वासाइतुकें मोजियेलें हरिनाम|


दिवसभराचे २१,६०० श्वास, वर्षभराचे गुणिले ३६५ किती होतील, संपूर्ण आयुष्याचे किती? प्रत्येकाने गणित करावं आणि आपआपला मेळ घालावा. म्हणूनंच जपमाळेची संख्याही १०८च का? दिवस किंवा रात्रभरात २०० माळा झाल्या की २१,६०० आपोआप होतात. म्हणून १०८. अन्यही प्रमाण आहेत पण इतकं सोप्पंय समजायला. आता संतांनी सगळं इतकं सोप्पं गणित मांडून ठेवूनही आपल्याला संदेह असेल तर आपल्यासारखं करंटे कोण असावं? 


बाकी श्रीरामनामाचा किंवा आपल्या कोणत्याही ईष्टदेवतेचा जप ३ कोटी काय अन् १३ कोटी काय ! कोण मोजत बसतंय? एवढा वेळ कोणालाय? मोजणारा तो आहे, तो मोजेल की. ह्रदयस्थ श्रीराम किंवा अंतरात्मा आहे. संख्येत कशाला अडकायचं?


माझा इतका जप झाला, तितका जप झाला, इतका राहिला, तितका राहिला? कशाला हा फुकटचा दंभ? 


त्याच्या नावात जे सुख आहे ते अनुभवणं महत्वाचं नाही का? 


प्रियकर प्रेयसीला किंवा प्रेयसी प्रियकराला किंवा नवरा-बायको एकमेकांना सांगतात का की मी तुला इतक्या वेळा आय लव्ह‌ यु म्हणलो किंवा म्हणाले?


नाम जपतें रहें, काम करतें रहें|


श्रीसमर्थ म्हणतात


अखंड नाम स्मरावें, परीं दुसरीयासी कळों नेदावें|

निदिध्यास लागलिया राघवें, पाविजें तात्काळ|

काही साक्षात्कार झाला, तो सांगु नयें दुसरियाला|

जरीं आळकेपणें सांगितला, तरीं पुन्हा होणार नाही|

पुन्हा साक्षात्कार कैंचा, जाला तरी वरपंगाचा|

हां मी आपुलें जीवाचा, अनुभव सांगतो|


ह्यातली पहिलीच ओळ महत्वाची आहे. अन्य फारशी नाही. कारण काही झालं की सांगायची फार हौस असते.‌ लगेचंच मी कसा साक्षात्कारी, मला किती अनुभव, ह्याचा दृष्टांत त्याचा दृष्टांत वगैरे वगैरे ...


लेखणींस विराम श्रीमाऊलींच्याच शब्दात करतो. म्हणूनंच ती म्हणते,


ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरीं|

धरोनि श्रीहरीं जपें सदा|


एक तत्व नाम दृढ धरी मना...


तो दिसावा कळावा हाच तर अट्टाहास आहे. कारण तो कसा आहे हे तोच आता सांगेल. 


आमचे आबा श्री. नितिन भानुशाली म्हणतात, तसंच


#भगवंत_ह्रदयस्थ_आहे..


हे सगळं आज‌ लिहायचं कारण कुणीतरी तो कृत्रिम बुद्धिमत्तेने प्रकाशित केलेला (एआयचा-Artificial Intelligence) फोटो श्रीरामाचा म्हणून फिरवलाय सर्वत्र. आह्मांस तो मान्य नाहीच इतकंच कारण तो कुठेही श्रीरामचंद्रांच्या वर्णनाशी जुळत नाही. पण ठीकंय, ज्याची त्याची श्रद्धा...!


भवदीय...


#श्रीराम_नामस्मरण_रामोपासना_साक्षात्कार_अध्यात्म_संतवचन