Wednesday 18 March 2020

क्रांतिवीर श्री बाबाराव सावरकर अमृतमहोत्सवी पुण्यस्मरण - सांगली वृत्तांत



त्वत्स्थंडिली अतुल-धैर्य वरिष्ठ बंधु।
केला हवीं परमकारुण पुण्यसिन्धु।
हें आपुलें कुलहिं त्यामधि ईश्वरांश।

ज्यांचे समग्र जीवन क्रांतिप्रवण होते नि ज्यांचे विचार क्रांतिगर्भ होते, अशा स्वातंत्र्यवीरांच्या ज्येष्ठ बंधुंच्या, त्यांच्या पाठी पित्यासमान असलेल्या एका अतुल धैर्य वरिष्ठ बंधुंच्या, ज्यांचं समग्र जीवनंच उपेक्षित अंधार्या कारावासांत नि अप्रसिद्धीच्या गुहागुंफात संपून गेले, ज्यांचे जीवन म्हणजे अमूल्य रत्नांची खाणंच आहे नि ज्यांत उदात्त अन् उज्ज्वल प्रसंगांचे कोहिनूर ठासून भरलेले आहेत, ज्यांनी सोसलेल्या नरकयातना ह्या तात्यारावांइतक्याच, किंबहुना अधिक आहेत, ज्यांचे समग्र जीवन हिंदुराष्ट्राच्या नि हिंदुत्वाच्या नि हिंदुसमाजाच्या उत्कर्षासाठीच वाहिलेले होते, अनेक गुप्त क्रांतिकारी संघटनांचे जे उद्गाते नि अनेक तरुण क्रांतिकारकांचे जे मार्गदर्शक, रा स्व संघासारख्या आज हिमालयाएवढ्या उत्तुंग अशा राष्ट्रव्यापी नि विश्वव्यापी संघटनेचे जे उद्गाते, असे अंदमानदंडित क्रांतिवीर श्री गणेश दामोदर उपाख्य श्रीबाबाराव सावरकर ह्यांच्या अमृतमहोत्सवी पुण्यस्मरणानिमित्त सांगलींस जाण्याचा योग नुकताच १६ मार्चला प्राप्त झाला.

महाराष्ट्र प्रदेश हिंदुसभेचे भूतपूर्व अध्यक्ष, आमच्या पंढरपूर हिंदुसभेचे श्री अभयसिंह कुलकर्णींचा अट्टाहास होता की हे कार्य आपण तरी करायला हवंच. आधीच सावरकर कुटुंबाची घोर उपेक्षा नि त्यातून बाबाराव तर विस्मृतंच. त्यामुळे हे सतीचं वाण हिंदुसभाच पेलु शकते. म्हणून भुवैकुंठ पंढरीतल्या सर्व हिंदुसभायांसह आह्मीं सर्व सांगलीस श्रीबाबारावांना अभिवादन करण्यासाठी निघालो. ह्यावेळी हिंदुसभेचे श्री विवेक बेणारे, विद्यमान अध्यक्ष श्री बाळासाहेब डिंगरे, महाराष्ट्र प्रदेश हिंदुसभेचे विद्यमान अध्यक्ष श्री अनिल पवार, सोलापूरचे श्री कल्याणी, वारकरी संप्रदाय पाईक संघाची धडाडती )तोफ श्री रामकृष्ण महाराज वीर, पेशवे युवा मंचाची तोफ श्री गणेश लंके आणि श्री महेश भंडारकवठेकर, हिंदुसभेचेच आनंद कुलकर्णी, सुवर्णा पोवार इ. अशी मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सांगलीतलेच हिंदुसभाई श्री अरुण गडचे ह्यांनी भूषविले.


सांगलीत चारच्या दरम्यान पोहोचताच सांगलीतले आमचे पंढरपूरचेच मूळचे स्नेही संस्कृत भाषेंवर प्रभुत्व असलेले आचार्य श्रीरघुवीर रामदासींकडे चहा पाण्याची व्यवस्था झाली. सांगलीतल्या ज्या गावभागांत बंधार्यासमीप श्रीबाबारावांचे स्मारक आहे, तिथून जवळंच ह्यांचा निवास आहे. साडेचारच्या समीप कार्यक्रमस्थळी पोहोचलो. मधील काळांत सांगलीतल्या जलप्रलयाच्या थैमानाने स्मारकाची झालेली वाताहात पाहवंत नव्हती. सुदैवाने पूर्वसूचना दिल्याने काही स्वच्छता होतीच. प्रवेशद्वारांवरंच एका पाटीवर त्या वास्तुच्या तत्कालीन उद्घटनाची अक्षरे कोरलेली दिसली. भूतपूर्व पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी नि बाबारावांचे शिष्य हिंदुसभाई थोर चित्रपटकार श्रीभालजी पेंढारकरांच्या हस्तेच हे उद्घाटन झालं होते. त्यावेळी श्री अटलजींचे झालेलं व्याख्यानही उपलब्ध आहे. कथा क्रांतिवीरांच्या - विश्वास सावरकर

स्मारकांत श्रीबाबारावांची अत्यंत दिव्य अशी हातीं ग्रंथ घेतलेली बैठक असलेली तेजस्वी मूर्ती पाहून धन्यता वाटली. त्या नररत्नांस अभिवादन करण्यासाठी नकळंत हात जोडले गेले. इतक्या जलप्रलयाचा आघात सोसूनही मूर्तीवरचे तेज किंचितही ढळलं नव्हतं.

कार्यक्रमाचा आरंभ श्रीभंडारकवठेकरांच्या वेदमंत्रपठनाने नि श्री रामकृष्ण वीर महाराजांच्या हस्ते मूर्तीपूजनाने झाला. त्यानंतर महाराष्ट्र हिंदुसभेच्या वतीने चैत्र पाडवा पासूनच्या दिनदर्शिकेचे विमोचन झाले. पुढे नियोजित कार्यक्रमपत्रिकेनुसार श्रीतात्यारावांच्या अखिल हिंदु विजय ध्वज गीताने आरंभ होऊन  श्रीअभयसिंह कुलकर्णींचे प्रास्ताविक झालं. त्यानंतर मान्यवरांची व्याख्याने झाली तींत प्रामुख्याने हिंदुसभेचे श्री गांधी, श्री रामकृष्ण महाराज वीर, श्री तुकाराम चिंचणीकर (अस्मादिक) ह्यांचे चिंतन झाले. ह्यात उपरोल्लेखित श्री रघुवीर रामदासी ह्यांनीही संस्कृतमध्ये श्रीबाबारावांवर छानसं चिंतन प्रकट केलं. अंती अध्यक्ष श्री अरुण गडचेंचे ह्यांचे अध्यक्षीय चिंतन झालं.

कार्यक्रमाचे पूर्ण सूत्रसंचालन हे श्री विवेक बेणारे ह्यांनी केले. कार्यक्रमांस उपस्थितांची संख्या जरी न्यून म्हणजे वीस-पंचवीसच्या समीप असली तरी कार्यक्रम उत्साहांत पार पाडला. आटपाडीतले आमचे एक धारकरी मित्र नि बंधु श्री प्रथमेश देशपांडे आमच्या स्नेहाखातर उपस्थित राहिले. सांगलीतले स्थानिक मित्र श्री संदीपजी कुलकर्णीही उपस्थित होते. दुर्दैव इतकंच की अपेक्षेप्रमाणे सांगलीकरांची उपस्थिती फारंच न्यून होती. आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांची उपेक्षाही. अस्तु।

कार्यक्रमाची सांगता अध्यक्ष श्री बाळासाहेब डिंगरेंच्या आभारप्रदर्शनाने नि आमच्या वंदे मातरम गायनाने झाली...


ज्या सांगलीत श्रीबाबारावांच्या जीवनांतला अंतिम काळ गेला, त्याच वास्तुंत त्यांना अभिवादन करणे हे आमच्या दृष्टीने अत्यंत भाग्याचे लक्षण होते. क्रांतिवीरांना सर्व जग विस्मृतीच पाठवेल पण आह्मीं हिंदुसभाई मात्र हे सतीचे वाण कधीच त्यागणार नाही.

ह्या कार्यक्रमांत आह्मांस त्या भीषण जलप्रलयाने ओलसर झालेल्या काही ग्रंथांचीही प्राप्ती झाली. त्यावर सविस्तर पुढील लेखांत येऊच.

ह्या कार्यक्रमाच्या काही महत्वपूर्ण चित्रफीती

सौजन्य श्री रामकृष्ण महाराज वीर

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3037763949621784&id=100001646254878

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3037803272951185&id=100001646254878

आमचं वन्दे मातरम्

https://youtu.be/HAt-Ww5NiHw

सौजन्य श्री प्रथमेश देशपांडे

वि रा करंदीकरांच्या शब्दांतंच लेखणींस विराम देतो..

निज राष्ट्राच्या उदयासाठी
हिंदु जातीच्या विजयासाठी
तुमुल संगरी प्राणपणाने लढलें जे बेभान
मंगल ते बलिदान। त्यांचे। मंगल ते बलिदान।

भवदीय,

पंढरपूर हिंदुसभा

#क्रांतिवीर_बाबाराव_सावरकर_अमृतमहोत्सवी_पुण्यस्मरण_सांगली_अटलबिहारीवाजपायी_भालजीपेंढारकर

Wednesday 11 March 2020

जगद्गुरु श्रीतुकोबारायांचे सदेह वैकुंठगमन - व्याकरणशास्त्रदृष्ट्या काही विचार




*वेदानिंदी चांडाळ, भ्रष्ट सुतकिया खळ।*
जगद्गुरु श्रीतुकोबाराय

वेदनिंदकांना चांडाळांची उपमा देणार्या जगद्गुरु श्रीतुकोबारायांची आज सदेह वैकुंठगमन तिथी...! जगद्गुरुंच्या वेदनिष्ठेंवर भविष्यांत कधीतरी लिहीनंच. आज तिथीने जन्मांस येणें हे आमच्या दृष्टीनेही परमभाग्यंच. प्रतिवर्षी श्रीतुकोबारायांच्या सदेह वैकुंठगमनासंबंधी काही चिंतन करतोच, सांप्रतही काहीसं. *ऐतिह्य प्रमाणांचा विचार करता रामायण-महाभारतकालापासून सदेह स्वर्गगमनाचे उल्लेख आहेत. श्रीतुकोबारायांचे चरित्रकार श्रीलक्ष्मण रामचंद्र पांगारकरांनी श्रीतुकोबारायांच्या चरित्रामध्ये हे उल्लेख सविस्तर दिलेले आहेत.* जिज्ञासूंनी तिथे अभ्यासावेंत ही विनंती.

हे स्वर्ग-नरक-वैकुण्ठादि लोक स्थानविशेष आहेत का ह्यासंबंधी एकवाक्यता आढळत नाही. हे स्थानविशेष नाहीत असे निरुक्तकार महर्षि श्रीयास्काचार्यांचे नि शबर स्वामी आदि पूर्वमीमांसकांचे मन्तव्य आहे. वेदमहर्षि श्रीपाद दामोदर सातवळेकर आदिंनी स्वर्गादि लोक हिमालयापलीकडील भाग आहे असे सांगितलं आहे. ह्या वादांत पडण्याचे हे स्थान नव्हे. प्रस्तुत लेखासंदर्भांत केवळ *वैकुण्ठ शब्दाच्या व्युत्पत्तीसंबंधी विचार करता हा शब्द प्रथम ऋग्वेदाच्या दशम मंडलांमध्ये प्राप्त होतो* हे आपणांस. त्याविषयी...

*इन्द्र नि वैकुण्ठ शब्दाचा अर्थ...*

*ऋग्वेदाच्या दशम मंडलामध्ये ४८-५० ही तीन सूक्ते आहेत, ज्यांचा ऋषि नि देवता हा इन्द्र-वैकुण्ठ आहे. ह्या सूक्तांमध्ये इन्द्र शब्दाने प्रत्यक्ष परमात्म्याचे अर्थात ईश्वराचे ग्रहण आहे.* सूक्ताच्या विस्तारांत जाण्याचे हे स्थल नसल्याने इन्द्र शब्दाच्या व्युत्पत्तीसंबंधी इतकंच सांगणं आवश्यक आहे की ह्या शब्दाच्या अनेक निरुक्ती किंवा व्युत्पत्त्या देता येतील. *इन्द्र शब्दाचे धात्वर्थाने पाहता ११ अर्थ होऊ शकतात. आमच्या आधीच्या अनेक लेखांत आह्मीं सिद्ध केल्याप्रमाणे वैदिक शब्द हे धातुज असल्याने एकापेक्षा अनेक धातुंनी त्यांची सिद्धी करणे संभव आहे.* विस्तारांत जाणे नाही.

*वैकुण्ठ ह्या शब्दाच्या व्युत्पत्तीच्या दृष्टीने विचार करता निरुक्तकारांनी "विगताः कुण्ठाः यस्य सः।" 'ज्यांच्या सर्व कुण्ठा अर्थात दुःखादि विकारांचा नाश झालेला आहे, असा तो.' किंवा "विकुण्ठमप्रतिहतं पदं मोक्षधाम तस्य स्वामी इन्द्र-वैकुण्ठः।"*

*'जिथे सर्व दुःखादि विकार समाप्त होतात, त्या मोक्षधामाचा स्वामी इन्द्र-वैकुण्ठ आहे. अर्थात परमात्म्याचे नाव इन्द्र-वैकुण्ठ आहे. कारण ईश्वराच्या ठिकाणी सर्वच दुःखादि विकारांची समाप्ती आहे.'*

श्रीतुकोबाराय वैकुंठास गेले ह्याचाच अर्थ त्यांच्या सर्व कुण्ठा समाप्त झाल्या. आत्मानंदाने परिपूर्ण असे ते आत्मस्वरुपांस प्राप्त झाले. हा विचार वैकुंठादि लोक स्थानविशेष न मानणार्यांसाठी आहे. क्षणभर हे मन्तव्य सत्य मानलं तरी श्रीतुकोबारायांचे वैकुंठगमन उपरोक्त निर्वचनांच्या आधारे सिद्ध होते. आणि जरी ते स्थानविशेष मानलं तरी ते सिद्ध होतंच. *वारकरी संप्रदायांतल्या अनेक अधिकारी सत्पुरुषांनी श्रीतुकोबारायांच्या वैकुंठगमनावर भाष्य केलंच आहे. त्यामध्ये प्रामुख्याने श्रीलक्ष्मण रामचंद्र पांगारकर, वारकरी संप्रदायाचे विद्यमान भीष्माचार्य श्रीनिवृत्ती महाराज वक्ते बाबा, हभप श्री रामकृष्णबुवा लहवीतकर, मंगेश रामचंद्र टाकी वगैरे वगैरे.*

*योगसामर्थ्यानेही श्रीतुकोबारायांचे वैकुंठगमन संभव आहे. पातंजल योगदर्शनामध्ये योग्यांस प्राप्त होणार्या अनेक सिद्धींचे वर्णन आहेच. जिज्ञासूंनी अधिक अध्ययनासाठी महर्षि श्रीपतंजलींच्या योगसूत्रांवरील श्रीव्यासकृतभाष्य नि त्यावरील भोजराजाची वृत्ति अभ्यासावी. पीडीएफ आहे. वामनकवींनी 'योगाची सिद्धि हे तुकारामीं' असे म्हटलंच आहे.*

*वैकुंठगमनासंबंधी शिवकालीन संदर्भ*

जगद्गुरु श्रीतुकोबारायांच्या सदेह वैकुंठगमनासंबंधी *प्रत्यक्ष श्रीशंभुछत्रपतींनी पुढे श्रीतुकोबारायांच्या चिरंजीवांस म्हणजे श्रीमहादोबांस वर्षासनाची सनद दिल्याचा उल्लेख श्रीसंभाजीकालीन पत्रसारसंग्रह मध्ये आहे. भाद्रपद शुद्ध पंचमी, शके १६०२चं आहे.* ते पत्र आह्मीं जोडलं आहेच.


जगद्गुरुंचे चरित्रकार श्रीलक्ष्मण रामचंद्र पांगारकरांनीही *श्रीशाहु छत्रपतींच्या संबंधीनेही सदेह वैकुंठगमन केल्याचे वर्णन केल्याचा एक उल्लेख केलाय. श्रीतुकोबारायांचे सुपुत्र श्रीनारायणबोवा ह्यांना श्रीशाहु छत्रपतींनी तीन गावं इनाम दिली आहेत. राज्याभिषेक शके ३० मध्ये.* तो संदर्भ निम्नलिखित

*"राजश्री तुकोबा गोसावी सत्पुरुष यांचे पुत्र नारोबा गोसावी याणी किले प्रसिद्धगडचे मुकामी आपले शिष्य सखोबा गोसावीं याबरोबर पत्र पाठवले तेथें लिहिलें की तुकोबा गोसावीं सत्पुरुष हे मौजे देहु उर्फ हवेली प्रांत पुणे भगवतकथा करिता अदृश्य झालें ही गोष्ट विख्यात आहे. त्याचे हाती पुज्या श्रींच्या देवाची मूर्तीची होत होती ती पूजा चालवींत आहे."*


आता प्रत्यक्ष दोन्ही छत्रपतींनीच वैकुंठगमन मान्य केल्यावर अन्यांचा प्रश्नंच येत नाही.

*तेंव्हा आजच्या पवित्रदिनी श्रीतुकोबारायांच्या चरणी कोटी कोटी अभिवादन नि शिरसाष्टाङ्ग दंडवत!*

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#जगद्गुरु_श्रीतुकोबाराय_सदेह_वैकुंठगमन_शंभुछत्रपती_शाहुछत्रपती_वारकरीसंप्रदाय