Wednesday 14 November 2018

अथ ऋग्वेदे यम-यमी सूक्त विचार: । - लेखांक तृतीय

मागील द्वितीय लेखांकात आपण चतुर्वेदभाष्यकार श्रीमत्सायणाचार्यांची वेदभाष्याविषयीची नि एकुणच वेदांविषयीची भूमिका त्यांच्याच शब्दांत पाहिली. ज्यांना तो लेखांक वाचायचा असेल, त्यांनी इथे वाचावा ही विनंती.

*http://pakhandkhandinee.blogspot.com/2018/11/blog-post_10.html?m=1*

आता त्या लेखांतच म्हटल्याप्रमाणेच या लेखामध्ये आपणांस त्यांच्या यम-यमी सूक्ताविषयीच्या विचारांची मांडणी करायची आहे नि त्याची समीक्षा करायची आहे.

सायणांचे भाष्य अनेकांनी प्रकाशित केलं. *आम्ही प्रस्तुत लेखमालेसाठी परमादरणीय राष्ट्रसूत्रधार श्रीलोकमान्य टिळकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पुण्यातच स्थापन झालेल्या वैदिक संशोधन मंडळाने संपादित केलेली ऋग्वेदभाष्याची चतुर्खंडात्मक संपूर्ण संस्कृत प्रतच अभ्यासली आहे. राजवाडे, सातवळेकर आदि विद्वानांनी त्याचे संपादन केलं होते. आंतरजालांवर ती पीडीएफ स्वरुपांत*

https://archive.org/search.php?query=Rg%20Veda%20with%20Sayana%27s%20Commentary

येथे प्राप्य आहे. जिज्ञासूंनी ती इथे अभ्यासावी. अस्तु ।

ह्याचे चार खंड असून चतुर्थ खंडात नवम नि दशम मंडलाचे भाष्य असून पृष्ठ क्रमांक २९४ ते २९९ पर्यंत हे यम-यमी सूक्त आहे. ह्यात सायणाचार्यांनी जागोजागी यम-यमींस भाऊ-बहीणच सिद्ध करण्याचा अट्टाहास केलेला आहे हे ज्याला संस्कृत कळतं त्याला सहज लक्षात येईल. ज्यांना संस्कृत येत नाही त्यांनी पंडित श्रीराम शर्मा आचार्यांचे सायणावलंबी भाष्य अभ्यासावे. तेही पीडीएफ उपलब्ध आहे. किंवा कोणत्याही सायणाचार्यांच्या हिंदी भाष्यकाराचे अभ्यासावे. *सोबत मूळ सायण भाष्य नि त्याचा पंडित भीमसेन शर्माकृत हिंदी भाष्य १८९५ ह्या वर्षीचे हे सर्व पीडीएफ जोडलंच आहे.*

https://drive.google.com/file/d/1yKbm5-TwTZVPmVY5AeDmGJaUVAP9hzNB/view?usp=drivesdk

ह्या सूक्ताच्या प्रथम मंत्रामध्ये सायणाचार्यांच्या मते विवस्वान नामक पुरुषांस जन्माला आलेले यम-यमी नामक पुत्र-पुत्री असून एके दिवशी एका निर्जन अशा विस्तीर्ण समुद्राच्या तीरावर मध्यभागी यमी यमांजवळ येऊन त्यांस प्रणययाचना करते. द्वितीय मंत्रामध्ये आपण दोघे सहोदर असल्याने हा संपर्क योग्य नाही असे बोलून यम तिला नाकारतो. केवळ हा भाग निर्जन आहे म्हणजे आपल्याला इथे कुणी पाहणार नाही हा तर्क खोडताना यम तिला वायु, अंतरिक्ष आदि साक्षीदारांची मांडणी करतो नि ते आपलं हे निंद्यनीय कर्म पाहतील असा तर्क करतो. ईश्वराने ही सर्व व्यवस्था केली आहे असे सांगतो. तृतीय मंत्रात तर यमीचे उत्तर सांगताना सायणांनी  प्रजापतीने अर्थात ब्रह्मदेवाने पूर्वी स्वकन्येशी ते कर्म केलं असा संदर्भ देऊन यमी याचना करते असे भाष्य केलं आहे. किंवा पूर्वी देवांनीही ते कर्म केलं आहे असे लिहिलंय.

सायणाचार्यांसारख्या विद्वानांनी असे लेखन करावे? कधी देवांनी असे निंद्य कर्म केलंय ? हे त्यांच्या समग्र वेदभाष्याविषयीच्या भूमिकेशी, जी आम्ही मागील लेखांकातच मांडलीच आहे, तिच्याशी पूर्ण विद्रोह करणारे आहे. म्हणून आमचं ठाम मत आहे की सायणांचे हे भाष्यच नव्हे. आणि जरी असले तरी हे निंद्यच आहे. मूळीच अनुकरणीय नाही.

*मूळात प्रजापतीने स्वदुहितेशी अर्थात ब्रह्मदेवाने स्ककन्येशी व्यभिचार कर्म केले असा जो आरोप ऐतरेय ब्राह्मणांच्या मूळ सूर्य नि उषेच्या अलंकारिक कथेवरून पुराणकथाकारांनी लावलेला आहे की ज्यावरून वैदिक धर्मांवर वाट्टेल ते घाणेरडे आक्षेप घेण्यांस शत्रुंचं फावतं, ती प्रजापतीची दूहिता ही कथा नेमकी काय आहे येंविषयी निरुक्तकारांनी स्पष्ट अभिप्राय दिला असून, अगदी ऐतरेय ब्राह्मणकारांनीही ती कथा सूर्याचे रुपक आहे असे स्पष्ट सांगूनही तिचा संबंध तथाकथित चतुर्मुखी ब्रह्मदेवाशी जोडून त्यांस निंदित करण्याचे पातक जे झालं आहे, त्याविषयी स्वत:ला पुराणप्रेमी म्हणविणारे काय स्पष्टीकरण देणार आहेत ?*

सुदैवाने ह्यावर सर्वप्रथम *वेदोद्धारक महर्षि दयानंदांनी त्यांच्या *ऋग्वेदादिभाष्यभूमिका* ह्या ग्रंथामध्ये स्पष्टपणे शंका निरसन केलंच आहे. ही *कथा अलंकारिक आहे* हे सप्रमाण सिद्ध केलं आहे. पुढे *वेदमहर्षी श्रीपाद दामोदर सातवळेकरांनीही त्यांच्या वेदभाष्यामध्ये नि *भारतीय संस्कृती* नामक ग्रंथामध्ये ह्या *प्रजापतीची दुहिता* नामक कथेचा विस्तार करताना ती सूर्याची अलंकारिक कथा किंवा *त्या प्रजापतीच्या अर्थात राजाच्या सभा नि समिती अशा दोन कन्या असा राज्यव्यहारपरक अर्थ लावला आहे. ह्यासाठी त्यांनी अथर्ववेदाच्या मंत्राचाच संदर्भ दिला आहे.* ज्याने वैदिक साहित्याचे प्रामााणिक अध्ययन डोळसपणे केलंय, त्याला हे अलंकार सहजगत्या लक्ष्यात येतीलच. अस्तु !

तरीही सायणाचार्य ह्या सूक्तामध्ये प्रजापतीची दूहिता ह्या कथेचा विकृतार्थ काढून यमीच्या मुखातून ते उच्चारतात हे कितपत वैदिक सिद्धांतांस धरून आहे ? यद्यपि पुढील मंत्रांत यमाने तिचा निषेध केला असला तरी हा अर्थ विकृतच आहे. सायणांनी सूर्यापासून सरण्युंस हे दोन पुत्रपुत्री झाले असे यमाच्या तोंडी घातलंय. आता मूळात सूर्य हा जड पदार्थ आहे. तो कसा रुप धारण करेल ? सूर्य नामक जडापासून कशी कुठल्या स्त्रींस कन्यापुत्र होतील ? वेदांमध्ये स्पष्टपणे मनुष्यजीवनिर्मितीसाठी स्त्री-पुरुषांचे रजो-वीर्यमीलन हेच मैथुनी सृष्टीचे कारण यजुर्वेदामध्ये सांगितलं आहे, ज्यात पुरुष हा उपादान कारण असून स्त्री ही निमित्त कारण आहे. अमैथुनी सृष्टी ही केवळ आदिसृष्टीत होते अशी वेदांची स्पष्ट मान्यता असल्यामुळे इथे सूर्याची कुठल्याही स्त्रीपासून संतानोत्पत्ती संभवच नाही. हे सर्व आम्ही यम-यमींस मानवदेहधारी स्त्री-पुरुष अथवा जीवविशेष मानणार्यांसाठी लिहिलं आहे.

पुढील सहाव्या मंत्रामध्ये यमीने स्वर्ग (द्यौ) नि नरक नामक स्थानविशेषाची गोष्ट केली आहे की जी वैदिक सिद्धांतांस मूळीच अनुसरून नाही. *स्वर्ग किंवा नरक हे कोणतेही स्थानविशेष नसून निरुक्तकारांनी स्पष्टपणे त्यांस केवळ सुखादि भावना हेच नाव दिलं आहे. येविषयी आमचा एक आधीचा लेख आहेच. निरुक्तकारांनी स्पष्टपणे अध्याय २ खंड १२ व १३ येथे स्पष्टपणे स्वर्ग हा कोणताही स्थानविशेष नसून तो केवळ सुखनाम आहे असे स्पष्ट सांगितलं आहे. तरीही सायणाचार्य निरुक्तकारांना नाकारताना ते स्थानविशेष असे मानताना दिसतात. हे भाष्य खरंच सायणांचेच आहे का ?*

*स्वत: परमहंस भगवान पुज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांनीही वैकुंठादि लोक स्थानविशेष नाहीत असे स्पष्ट एका स्तोत्रांत लिहिलं आहे. तो संदर्भ मी सविस्तर देईनच.*

*दहाव्या मंत्रामध्ये "जामय:" शब्दाचा अर्थ सायणांनी बहिण असा काढलाय. वास्तविक पाहता निघण्टु मध्ये १.१२ येथे जामि हे उदकनाम अर्थात जल ह्या अर्थाने आहे. अंगुली अर्थात बोट असाही दिलाय.*

अमरकोशामध्ये जामि शब्दाचा अर्थ

*जामि स्त्री। भगिनी*

*समानार्थक: भगिनी,स्वसृ,जामि*

*३।३।१४२।२।२* असा दिला आहे तर तिथेच आणखी कुलस्रिया किंवा स्नुषा अर्थात सून असाही आहे. मनुस्मृतीमध्येही जामयो म्हणजे घरातील स्त्रिया असा शब्द आहेच.

ऋग्वेद ६.२५.३ येथील मंत्रानुसार

*इन्द्र॑ जा॒मय॑ उ॒त येऽजा॑मयोऽर्वाची॒नासो॑ व॒नुषो॑ युयु॒ज्रे । त्वमे॑षां विथु॒रा शवां॑सि ज॒हि वृष्ण्या॑नि कृणु॒ही परा॑चः ॥*

म्हणजेच वेदाच्या प्रत्यक्ष अंत:साक्षीनुसार इथे *जामय शब्दाचा अर्थ पतिव्रता भार्या* असाच घ्यायला हवा. महर्षि दयानंदांनीही तोच घेतला आहे. बहिण म्हणून नव्हे.

*ज्या सायणांनी आपल्या वेदभाष्याच्या भूमिकेत स्पष्टपणे वेदांमध्ये कोणताही मनुष्यादिकांचा किंवा कुणाचाही इतिहास नाही असे स्पष्ट म्हटलं आहे, तेच सायण प्रजापतीने अर्थात ब्रह्म्याने स्वकन्येशी व्यभिचार केला असे लिहितील का? किंवा देवांनी असे कर्म आधी केलं असे लिहितील का ? बरं ह्याच सायणांनी वेद सृष्ट्यारंभीच प्रकाशित झाले असे स्पष्ट लिहिलं आहे. असे सायणाचार्य श्वेताश्वतरोपनिषदाच्या*

*यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै ।*

ह्या वचनानुसार त्या परमात्म्याने त्या ब्रह्म्यांस चार वेद दिले असे वचन कसे नाकारतील ? ह्याचाच अर्थ हे भाष्य सायणांचे नाहीयेच हे सिद्ध होते. अन्यथा ते त्यांच्याच भूमिकेशी विरोध कसा दर्शवतील ? बरं जरी त्यांचं आहे असे मानलं तरी स्वप्रतिज्ञाहानीचा नि पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा अदि सर्वांशीच विरोध केल्यासारखं होईल.

बाराव्या मंत्रातही यमाचा नकार कळविताना सायण बहिण-भावांचा संपर्क पाप आहे असाच अर्थ घेतात. तो पाप आहे हे जाहीरच आहे पण मूळात ते भाऊ बहीणच नाहीत तर. तेराव्यांतही ती यमी यमांस अन्य स्त्रीला तु स्वीकारशील पण मला नाही असा आरोप करते. शेवटी चौदाव्या मंत्रांत यम तिला पुन्हा परपुरुषाशी संपर्क करण्यांस सांगून स्वत:पासून विलग करतो.

असा हा एकुण यम-यमी सूक्ताचा सायणप्रणीत अर्थ आहे. ज्यांना अधिक इच्छा असेल, त्यांनी सायणांचे कोणतेही भाष्य उघडून पहावं. आम्ही वर पीडीएफ दिलीच आहे.

*आता आश्चर्याची गोष्ट अशी आहे की ह्याच सायणांनी यजुर्वेदाच्या १२.६३ येथील मंत्रामध्ये मात्र यम-यमींस पती-पत्नी मानलंय.*

आणि इथे मात्र ते ह्या सूक्तामध्ये तींस भाऊबहिण मानतात. असे का ? मान्यय की सूक्तानुसार नि मंत्रानुसार अर्थ बदलतो. पण इतका विरोध ?

असो पुढील लेखांकामध्ये ह्या सूक्ताविषयी अन्य भाष्यकारांनी दिलेले अर्थ पाहुयांत.

अस्तु ।

क्रमश: ।

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

*#ऋग्वेद_यमयमी_सायणाचार्य_ऋग्वेदभाष्य_वेदकालीन_विवाहसंस्था_राजवाडे_वास्तव_विपर्यास:*

Saturday 10 November 2018

अथ ऋग्वेदे यम-यमी सूक्तविचार: । - लेखांक द्वितीय


सत्य-असत्यासी मन केले ग्वाहीं ।
मानियेलें नाही बहुमता ।

जगद्गुरु श्रीतुकोबाराय

मागील लेखांकात म्हटल्याप्रमाणे इथून पुढे ह्या सूक्तावरील आक्षेपांचे विचारमंथन करायचे आहे. ज्यांना प्रथम लेखांक वाचायचा असेल त्यांनी तो

http://pakhandkhandinee.blogspot.com/2018/11/blog-post_9.html?m=1

इथे वाचावा ही विनंती. आता प्रथम आक्षेपाचा विचार करुयांत.

*आक्षेप क्रमांक १* - म्हणे हे सूक्त यम-यमी नामक भावा बहिणीचे आहे म्हणे - इति सायणाचार्य नि तदनुयायी सर्व सनातनी परंपरेतले वेदभाष्यकार नि त्यांचे अनुयायी नि धर्मप्रेमी विद्वान. सर्व पाश्चात्य नि तदनुयायी एतद्देशीय विद्वान किंवा इतिहासकार

*उपरोक्त आक्षेपाचं समाधानपूर्वक खंडन* -

ह्या सुक्तांस भाऊ बहिण मानायचा भ्रम प्रामुख्याने आरंभ झाला तो इथपासूनच. वास्तविक पाहता सायणाचार्य हे वेदांविषयीचे एक नामांकित नि अतिशय चतुरस्त्र विद्वान. ज्यांनी चारीही वेदांवर प्रथम भाष्य केलं आहे नि तत्संबंधित वैदिक साहित्यावरही विस्ताराने भाष्य केलंय असे सायणाचार्य हे वेदजगतांत गौरवाने उल्लेखिले जातात. त्यांचे स्थान खूप मोठं असल्याने त्यांच्याविरोधात लेखणी हाती घेताना त्यांच्याविषयीच्या आदरांस कुठेही न्यूनता न आणता सत्य मांडण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांचा कालावधी विक्रम संवत १३७२ ते १४४४ आहे. इसवी सन १२३७ ते  १३०९.

सायणाचार्य हे बुक्क प्रथम, कंपण, संगम द्वितीय, हरिहर द्वितीय, विजयनगर आणि उपराज्ये येथील राज्यांचे मंत्री होते. सायणाचार्य हे यजुर्वेदी बौधायनसूत्री ब्राह्मण हे त्यांनी स्वत:च सांगितलं असून त्यांच्या भावाने अर्थात माधवानेही हेच लिहिलं आहे. सायणाचार्यांनी प्रथम यजुर्वेदाची तैत्तिरीय संहिता, काण्व संहिता, ऋग्वेद, अथर्ववेद आणि सामवेद असे चारीही वेदांवर भाष्य केलं असून आठ ब्राह्मणग्रंथांवर नि आरण्यकांवरही त्यांचे भाष्य आहे. त्यांच्या ऋग्वेदभाष्याच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी त्यांनी

*वैदिकमार्गप्रवर्तक श्रीबुक्क महाराजांच्या समयीच ह्या ऋग्वेदभाष्याचे लेखन झालंय*

असे स्पष्ट म्हटलं आहे. ऋग्वेदभाष्यापूर्वी त्यांनी प्रथम तैत्तिरीय संहिता, ब्राह्मण ग्रंथ नि आरण्यकांचे भाष्य केले होते.

*सायणाचार्यांचे भाष्य त्यांचे एकट्याचे नाही हे त्यांनी स्वत:च मान्य केलंय.*

आमच्या आधीच्या काही लेखांमध्ये आम्ही स्पष्ट लिहिलं होते की सायणाचार्यांचे भाष्य हे संपूर्णत: सायणांचे नाहीये. त्याला प्रमाण निम्नलिखित.

त्यांनी त्यांना त्यांच्या वेदभाष्यांत सहाय्यकृत झालेल्या भाष्यकारांचे नावही स्पष्टपणे उल्लेखिलं आहे.त्यांची नावे अशी

१. *नारायण वाजपेययाजी*
२. *नरहरिसोमयाजी*
३. *पंढरी दीक्षित*

ह्याचे कारण हेच आहे की सायणाचार्यानी भाष्य करायच्या आधी प्रत्येकवेळी जी भूमिका लिहिली आहे तींत नि तदनंतर केलेल्या भाष्यांत काहीवेळा परस्परभेद दिसून येतो. हे कसे ते पाहुयांत.

सायणाचार्यांच्या प्रमुख सैद्धांतिक मान्यता पाहुयांत ज्यातून त्यांची वेदभाष्य करण्यामागील दृष्टी लक्षात येईल. सविस्तर प्रमाण न देता केवळ निर्देश करतो आहे.

१. *यस्य निश्वसितं वेदा:* यावरून वेद हे ईश्वरोक्तच असून ते त्याचे नि:श्वास आहेत. *यथा घटपटादि द्रव्याणां..* ह्यावरून ते स्वत: प्रमाण आहेत, त्यांना इतर कुठल्याही प्रमाणाची आवश्यकता नाही. ह्यासाठी त्यांनी पूर्वमीमांसेतल्या १.१.२ येथील *चोदनालक्षणोsर्थोधर्म:* ह्या सूत्रावरील शाबरमूनींचे भाष्य प्रमाण म्हणून दिलंय. इंद्रादि शब्दांवरून प्रत्यक्ष परमेश्वराच्या रुपाचेच ग्रहण करा असे ते सांगतात. हे शाबर भाष्य सुदैवाने पीडीएफ उपलब्ध आहे.

२. *जीवविशेषैरग्निवाय्वादित्यैर्वेदानामुत्पादित्वात्*  ह्यावचनावरून जीवविशेष अशा अग्नी, वायु, आदित्य आणि अंगिरा ह्या चार ऋषींना ईश्वराने वेद हे जीवसृष्ट्यारंभी अंत:करणात प्रकट केले नि तिथून ते आपणांस परंपरेने प्राप्त झाले हेच सांगितलं आहे. *श्रुते: ईश्वरस्य अग्न्यादि प्रेरकत्वेन निर्मातृत्वं द्रष्टव्यम्* असे शब्द वापरले आहेत त्यांनी. त्यासाठी ऐतरेय ब्राह्मण ५.३२ येथील संदर्भ योजिला आहे.

३. जैमिनीच्या पूर्वमीमांसेतील प्रथम अध्यायाच्या द्वितीय पादांतील सूत्र ३१ ते ४५ यावरील शाबरभाष्याचे विस्तारपूर्वक प्रमाण देऊन सायणाचार्यांनी आणखी काही सिद्धांत मांडले आहेत, ज्यात एक म्हणजे वेदमंत्रांचे उच्चारण केवल अदृष्ट नव्हे तर दृष्ट फलासाठीही असल्याने ते निरर्थक नाहीत. मंत्र अर्थासाठीच आहेत.

४. जिथे वेदमंत्रांचा सरळ अर्थ निघत नसेल तिथे गौण अर्थ घ्यावा.उदा. *चत्वारि शृंगा त्रयोsस्य पादा* ह्या मंत्रांत त्या वेदपुरुषांस बेैलासारखे चार शिंगे आहेत असा अर्थ नसून इथे गौण अर्थ म्हणजे ते चार शिंगे हे होता, अध्वर्यु, उद्गाता आणि ब्रह्मा हे चार आहेत असे सायण सांगतात.

५. जिथे वेदांमध्ये परस्परविरोधी वचने आहेत असे वाटेल(तसं ते नाहीयेच तरीही) तिथेही गौण अर्थच घ्यावा. तुच माता नि तुच पिता असा मंत्र असेल तर इथे विरोध आहे असे न धरता एकत्वच आहे असे समजावे.

६. वेदांमध्ये बबर आदि मनुष्यादिकांचा, ऋषींचा, राजांचा किंवा अन्य कुठल्याही अनित्य व्यक्तिविशेषाचा इतिहास आहे का ह्याचे खंडन त्यांनी पूर्वमीमांसेतल्या १.१.३१ येथील *परन्तु श्रुतिसामान्यमात्रम्* ह्या सूत्राचा आधार घेऊन वेदांमध्ये नित्य पक्ष आहे त्यामुळे अनित्य अशा व्यक्तींचा वेदांत इतिहास नाही असा स्पष्ट सिद्धांत मांडला आहे. म्हणजेच वेदांमध्ये मानवांचाच काय कुणाचाच इतिहास मूळीच नाही. वेदांमधील नावे ही यौगिक आहेत, लौकिक नाहीत. कारण ते वेद हे अपौरुषेय आणि नित्य आहेत.

७. वेद कुणी रचले आहेत का ह्याचे खंडन करताना सायणांनी *उक्तं तु शब्दपूर्वत्वम्*, *आख्या प्रवचनात्* ही पूर्वमीमांसेची सूत्रे देताना वेदांचा कुणीही मनुष्य किंवा स्त्रीकर्ता नाही असे स्पष्ट सांगितलं आहे. म्हणजेच वेद कुणीही मनुष्याने रचलेले नाहीत.

८. वेदांच्या अपौरुषेयत्वासाठी अर्थात ईश्वरोक्तत्वासाठी सायणांनी ब्रह्मसूत्रातील (उत्तर मीमांसेतील) *शास्त्रयोनित्वात्*, *अत एव च नित्यत्वम्* ही दोन सूत्रे देऊन आणि *वाचा विरुपा नित्यया* हा ऋग्वेद ८.७५.६ येथील मंत्र देऊन आणि महाभारतातील *अनादिनिधना नित्या वागुपसृष्टा स्वयंभुवा* हा श्लोक देऊन वेदांचे अपौरुषेयत्व सिद्ध केलं आहे. वेदवाणी ही ईश्वरप्रणीत नि जीवसृष्ट्यारंभी हे सांगितलं आहे.

ही एकुण सायणाचार्यांची वेदांविषयीची सैद्धांतिक मान्यता आहे. हे सर्व संदर्भ आम्ही त्यांच्या वेदभाष्यापूर्वीच्या उपोद्घातांतीलच दिले आहेत. जिज्ञासूंनी ते स्वत: अभ्यासावेत.

*आश्चर्य म्हणा किंवा आणखी काहीही*

पण हेच सिद्धांत *आर्य समाजाचे संस्थापक वेदोद्धारक महर्षि दयानंदांनीही दीडशे वर्षांपूर्वीच त्यांच्या *ऋग्वेदादिभाष्यभूमिका* नि *सत्यार्थ प्रकाश* आदि ग्रंथामध्ये मांडले आहेत. तरीही ह्याच महर्षि दयानंदांच्या नि सायणाचार्यांच्या वेदभाष्यांत अनेकठिकाणी भेद आहे. कारण एकच आहे की सायणाचार्यांनी हे सिद्धांत पुढे भाष्य करताना सर्वच ठिकाणी पाळल्याचे दिसतच नाही ही शोकांतिकाय. ह्यावरूनच सायणांचे सर्वच भाष्य हे सायणांचे नाही हे आम्ही जे वर लिहिलंय त्याला पुष्टी मिळते. अन्यथा वेदांत इतिहास न मानणारे सायणाचार्य पुढे वेदमंत्रांचे भाष्य करताना इतिहासपक्ष मांडताना का दिसतात ? नित्य पक्ष सोडून अनित्यपक्ष मांडताना का दिसतात ? ज्यांनी हे सर्व स्वत: मूळातून अभ्यायलंय, त्यांच्याच हे लक्षात येईल. येविषयी भविष्यांत आणखी सविस्तर विवेचन करेनच पण सांप्रत ह्या लेखमालेविषयी विस्तार.

*नामूलं लिख्यते किंचित् नानपेक्षितमुच्यते ।*

आम्ही आधार (पुरावा) असल्याशिवाय कधीच काही लिहित नाही. ही शास्त्राची आम्हांस आज्ञा आहे. ह्यात अहंकार नाही. पुढील लेखांकात सायणांची उपरोक्त यम-यमी सूक्ताविषयीची भूमिका पाहुयांत नि त्याची समीक्षाही करुयांत.


अस्तु ।

क्रमश: ।

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

*#ऋग्वेद_यमयमी_वेदकालीन_विवाहसंस्था_भाऊबहीण_पतीपत्नी_सायणाचार्य_वेदापौरुषेयत्व_वास्तव_विपर्यास*

Friday 9 November 2018

अथ ऋग्वेदे यम-यमी सूक्तविचार: । - लेखांक प्रथम



सकळिकांच्या पायां माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥
अहो श्रोते वक्ते सकळ ही जन । बरें पारखुन बांधा गांठी ॥ध्रु.॥
फोडिलें भांडार धन्याचा हा माल । मी तंव हामाल भारवाही ॥२॥
तुका म्हणे चाली जाली चहूं देशी । उतरला कसीं खरा माल ॥३॥

जगद्गुरु श्रीतुकोबाराय

आज यमद्वितीया अर्थात भाऊबीज. दीपावलीचा शेवटचा दिवस. पद्मपुराण उत्तरखंड नि भविष्यपुराण उत्तरपर्व ह्या पुराणांतरी आलेल्या कथेनुसार आज यमाची बहीण यमुना ह्या दोघांसाठी ही भाऊबीज साजरी होते. पुराणांतल्या ह्या कथेचे मूळ ज्या ऋग्वेदाच्या दशम मंडलाच्या दशम सूक्तामध्ये (१०.१०) आहे, त्या सूक्तामध्ये आश्चर्याने किंवा सुदैवाने म्हणा पण यमुनेचा साधा उल्लेखही नाही. पण *इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृहंयेत* ह्या महाभारत वचनाचा आधार घेऊन इथल्या पुराण शब्दांवरून लगेचच व्यासरचित किंवा संकलित तथाकथित अष्टादश पुराणांचा ह्या सूक्ताशी संबंध जोडून वेदार्थ प्रतिपादन करणार्यांनी ह्या ऋग्वेदातल्या यम-यमीलाही भाऊ-बहीणच मानून वेदार्थ प्रतिपादन केलंय का अशी शंका येते. पुराणांतल्या कथांशी ह्या लेखमालेचा संबंधच नाही नि आमचा तो हेतुही नाही. आम्ही पुराणं पूर्णत: नाकारतही नाही नि ते पूर्णत: स्वीकारतही नाही. तो ह्या लेखमालेचा विषयच नाही. पण ऋग्वेदाच्या ह्या यम-यमी सूक्तामध्ये असलेले हे यम-यमी हे नेमके कोण आहेत, ते ऐतिहासिक स्त्री-पुरुष किंवा खरंच भाऊ-बहिण आहेत का की ते पती-पत्नी आहेत की अन्य काही आहेत? हा प्रस्तुत लेखमालेचा विषय आहे. ते भाऊ-बहिण तर आमच्या मते निश्चितच नाहीतच. मग ते नेमके काय आहेत हाच विचारपूर्वक ठाम सिद्धांत मांडायचा हा प्रयत्न आहे.

निरुक्तादि षड्वेदांगांच्या आणि सर्व प्राचीन भाष्यकारांच्या परामर्शाने आणखी विस्तार करण्यासाठी नि गेली दीड वर्षे हा विषय चित्तांस अस्वस्थ करत असल्यामुळे प्रस्तुत लेखनप्रपंच !

अथ ऋग्वेद परिचय

ऋग्वेदामध्ये एकुण दहा मंडले असून त्यात एकुण १०२८ सूक्ते आहेत. त्यातलं दहावं मंडल हे प्रस्तुत लेखमालेचा विषय आहे, ज्यातले हे दहावं सूक्त आहे.

ऋग्वेदाच्या ह्या दशम मंडलाविषयी पाश्चात्यांनी प्रसृत केलेले भ्रम नि त्यांच्या अनुयायी अशा आधुनिक एतद्देशीयांनी ह्या मंडलाविषयी केलेले विपर्यस्त लेखन नि त्याची समीक्षा हा प्रस्तुत लेखमालेचा विषय आहे. ऋग्वेदाच्या ज्या दशम मंडलातील दशम सूक्तामध्ये हा उपरोक्त यम-यमी संवाद येतो, त्या सूक्ताविषयी सायणाचार्य प्रभृति प्राचीन एतद्देशीय ऋग्वेदभाष्यकारांनी केलेल्या भाष्याचीही समीक्षा करण्याचा इथे विचार आहेच. हा लहानतोंडी मोठा घास असला तरी त्यांच्याविषयी पूर्ण आदर ठेऊनच.

*मूळात आदरणीय सायणाचार्यांच्या आधी ऋग्वेदांवर द्वादश अर्थात १२ भाष्यकार होऊन गेले आहेत हे आमच्या गावीही नसते ही शोकांतिका आहे. ह्यामध्ये परमहंस श्रीमच्छंकराचार्यशिष्य हस्तामलक, सहाव्या शतकांतले श्रीस्कंदस्वामी(ज्यांचे निरुक्तभाष्यही उपलब्ध आहे), नारायण, उद्गीथ, वेङ्कटमाधव, लक्ष्मण, धानुष्कयज्वा, आनंदतीर्थ, जयतीर्थ, नरसिंह, राघवेंद्रयति, आत्मानंद ही सूची आहे. ह्यातले स्कंदस्वामी,उद्गीथ नि वेङ्कटमाधवांचे भाष्य सुदैवाने पीडीएफ उपलब्ध आहे. जिज्ञासूंनी ते इथे पहावे.*

https://archive.org/details/RigVeda31/page/n3

ह्या धाग्यांवर ते प्राप्त होईल.

उपरोक्त भाष्यकारांचे संदर्भ - *वैदिक वाङ्मय का इतिहास - भाग द्वितीय - वेदोंके भाष्यकार - लेखक पंडित भगवद्दत्त रिसर्च स्कौलर, बी ए*

ह्या सूक्ताविषयी अनेकानेक भ्रम मधील काळात प्रसृत झालेले आहेत. मग ते अज्ञानातून असोत किंवा हेतुपुरस्सर दुष्ट हेतुने असोत. आता ह्या सूक्तावर घेतलेल्या आक्षेपांचे चिंतन पाहुयांत.

१. म्हणे हे सूक्त यम-यमी नामक भावा बहिणीचे आहे म्हणे - इति सायणाचार्य नि तदनुयायी सर्व सनातनी परंपरेतले वेदभाष्यकार नि त्यांचे अनुयायी नि धर्मप्रेमी विद्वान. सर्व पाश्चात्य नि तदनुयायी एतद्देशीय विद्वान.

२. म्हणे ह्या सूक्तामध्ये यमी नामक बहिणीने आपल्या यम नामक भावांस प्रणययाचना केली असता यमाने ती धिक्कारून तिचा निषेध केला आहे.

३. म्हणे ह्यावरून त्याकाळी भावा बहिणींत विवाह होत किंवा शरीरसंपर्क होत असा विकृत कुतर्क काही लोक करताना दिसतात. ह्यांच्या मते हे सूक्त रचायच्या आधी हे सर्व प्रकार चालत. पण ह्या सूक्तानंतर अशा भावा-बहिणींच्या संपर्कांस प्रतिबंध घातला म्हणे. (काहीही)

४. म्हणे वेद कुणीतरी रचले आहेत कारण असे संवाद आहेत म्हणून.

५. म्हणे ह्यावरून ह्या सूक्तामध्ये इतिहासपक्ष असून त्यावरून त्या वेदकाळचा भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास सिद्ध करता येतो म्हणे.

६. हे ऋग्वेदाचे दशम मंडलच प्रक्षिप्त असून ते नंतरहून जोडलं गेलंय म्हणे - इति मैक्डौनेल व कीथ व त्यांना बुद्धी गहाण टाकलेले एतद्देशीय विद्वान(???).

सर्वसाधारण आक्षेपांची मांडणी आम्ही इथे केली आहे. विस्तारपूर्वक ह्या लेखमालेत ह्याविषयी सप्रमाण नि ससंदर्भ खंडनात्मक विवेचन आम्ही करणारच आहोत.

*पुराणांतला कथाविस्तार*

भविष्यपुराण उत्तरपर्व अध्याय १४ येथे व पद्मपुराण उत्तरखंड अध्याय १२२ येथे सुदैवाने किंवा दुर्दैवाने म्हणा पण यमाची बहीण ही यमुना दाखविली आहे. यमीचा उल्लेखही इथे नाहीये. तरीही उपरोक्त ऋग्वेद सूक्तामध्ये यम-यमी भाऊ बहिण का मानले जातात हीच शोकांतिका आहे.

*व्याकरणशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर सर्वप्रथम हे आपल्या लक्षात यायला हवं की जेंव्हा कधी पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी शब्दांत रुपांतरण होते, तेंव्हा प्राय: त्या शब्दांस एकतर ई-कारान्त प्रत्यय लागतो किंवा आ-कारान्त. उदाहरणार्थ - ब्राह्मण-ब्राह्मणी किंवा मयुर-मयुरी, रजक-रजकी, कृष्ण-कृष्णा इत्यादि. तेंव्हा, ह्या नियमानुसार पुंल्लिंगी यमाचे स्त्रीलिंगी यमीच होणार. त्यामुळे यमी ही यमाची पत्नीच सिद्ध होते, बहीण नव्हेच.*

*भाष्यकारांमध्ये दुर्दैवाने ह्यांविषयी एकवाक्यता नाही.*

अनेक भाष्यकारांची भाष्ये अभ्यासली की ही गोष्ट लक्षात येते. काही जण तिला भाऊ-बहीण मानतात तर काही पती-पत्नी. काही ऐतिहासिक पक्ष मानतात तर काही नित्यपक्ष मानताना त्यांस दिवस-रात्रीचे रुपक मानतात. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की अशावेळी कुणाचे भाष्य प्रमाण मानावं ? येंविषयीच प्रस्तुत लेखमालेंत विस्तारपूर्वक चिंतन करायचे आहे.

*मी तंव हामाल भारवाही*

अगदी आरंभीसच सांगितल्याप्रमाणे आम्ही केवळ हमालाचे कार्य करत आहोत. ह्यात आमची स्वत:ची प्रज्ञा काहीही नाही. जे प्राचीन परंपरेतून आकळलं तेच मांडायचा प्रामाणिक प्रयत्न आहे. जे सत्य तेच सांगणं, मग ते करताना कुणाचीही भीडमूर्वत न बाळगणं.

*धर्माचे पाळण । करणें पाषांड खंडन ।*
*हे चिं आम्हां करणे काम । बीज वाढवावें नाम ।*

श्रीतुकोबाराय

अस्तु ।

क्रमश: ।

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

*#ऋग्वेद_यमयमी_भाऊबीज_यमद्वितीया_वेदकालीन_विवाहसंस्था_भाऊबहीण_पतीपत्नी_वास्तव_विपर्यास*

Tuesday 6 November 2018

अथ महर्षि दयानन्द निर्वाण अर्थात ऋषिश्रेष्ठ महायोग्याचे एक महाप्रस्थान



*इ॒दं नम॒ ऋषि॑भ्यः पूर्व॒जेभ्यः॒ पूर्वे॑भ्यः पथि॒कृद्भ्यः॑ ॥*

ऋग्वेद - १०.१४.१५

भारतवर्षाच्या इतिहासांत स्थितप्रज्ञ महात्मे अनेक होऊन गेले. श्रीमत्स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे ह्या भरतभूमींस कधीच महापुरुषांची उणीव अशी भासलीच नाही. अशांतच एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धांत एक तेजस्वी तारा ह्या भरतभूमींवर आपल्या जाज्वल्य वेदनिष्ठेने सूर्यासमान प्रखर तेजस्वी विद्युल्लतेसमान प्रकाशित होत होता. आत्मविस्मृत भारतीयांना वेदांचा तेजस्वी जीवनसंदेश *मनुर्भव नि कृण्वन्तो विश्वमार्यम्* ह्या वेदाज्ञेंतून प्रदान करत होता. दीपावलीच्या आजच्या दिवशीच अशा एका वेदभाष्यकाराचे नि समग्र क्रांतीचे अग्रदूत अशा ऋषिश्रेष्ठाचे देहावसान व्हावं ? आणि तेही विषप्रयोगाने ?

सतरा वेळा विषाचे घोट पिणारा हा महायोगी नौली आदि क्रियांनी ते विष अनेकवेळा उत्सर्ग करता झाला. पण ह्या अठराव्या विषप्रयोगांत मात्र सोमल नामक (इंग्रजीत आर्सेनिक एसिड) विष काचेसह दुधातून देण्यात आलं नि ह्या ऋषिश्रेष्ठाचा आजच आश्विन अमावस्येंस अंत झाला.

*आश्विन अमावस्या - ३० ऑक्टोबर, १८८३*

*हा माझा अंतसमय जवळ आलाय, उपचार सोडून द्या आता.*

जहाल विषप्रयोगाने शरीरावर आलेल्या फोडांतून होणारा रक्तस्त्राव सहन करत हा महात्मा आधी काही काळ प्रात:काली ११ वाजता शौच-मुखमार्जन करून, दंतधावन करून, क्षौर करून स्नानासाठी उत्सुक असूनही वैद्यांच्या आदेशे ते करु शकला नाही. ओल्या वस्त्राने शरीर स्वच्छ करताच फोडांमधून वाहणार्या रक्ताने श्वास तीव्रगतीने सुरु झाला.

*एका महायोग्याच्या महाप्रस्थानाचा हा आरंभ होता*

आपलं मन, प्राण तथा आत्मा संपूर्णत: एकाग्र करून त्या परब्रह्म परमात्म्यांवर केंद्रित करून हा योगी महानिर्वाणांस निघाला.

एका शिष्याने त्यासमयी पृच्छा केली

*महाराज, आपले चित्त कसे आहे?*

महर्षि दयानंद - *छान आहे. आज एक मासाने आम्हांस विश्रांतीचा समय प्राप्त झाला आहे.*

लाला जीवनदासांचा प्रश्न - *आपण कुठे आहात ?*

महर्षींचे उत्तर - *ईश्वरेच्छेमध्येच !*

त्या प्रभुभक्त संन्याशाने आपले स्वत्व त्या ईश्वरांस अर्पण केलं.

पुढे सायंकाळी साडेपाचवाजता शिष्यांनी आणखी विचारलं की आता आपले चित्त कसंय?त्यावेळी हा ऋषी उत्तरला

*छान आहे. प्रकाश(तेज) आणि अंध:काराचा भाव आहे.*

कुणाला काहीच समजलं नाही. पुढे त्या ऋषीने तिथी नि वार ज्ञात करून वेदमंत्रांचे पठण केलं. संस्कृत भाषेत ईशस्तवन केलं. तत्पश्चात हिंदी भाषेत परमेश्वराचा गुणानुवाद करून श्रेष्ठ अशा गायत्री मंत्रांचा जप करून आपल्या उत्फुल्ल वदनाने प्रिय अशा

*ॐ विश्वा॑नि देव सवितर्दुरि॒तानि॒ परा॑ सुव । यद्भ॒द्रं तन्न॒ आ सु॑व ॥*

ह्या ऋग्वेदातल्या ५.८२.५ येथील  प्रिय मंत्रांचा गंभीर स्वरोच्चार केला.  अनेकवेळा पुन्हा पुन्हा उच्चार केला. काही वेळ समाधी अवस्थेत जाऊन चित्त एकाग्र केलं नि पुन्हा नेत्र उघडून आपले अंतिम उद्गार त्या ऋषिश्रेष्ठाने उच्चारले ते असे

*हे दयामय सर्वशक्तिमान परमेश्वर, तेरी यही इच्छा है, तेरी यही इच्छा है, तेरी इच्छा पूर्ण हो, अहा तुने अच्छी लीला की ।*

त्यावेळी सरळ झोपलेल्या त्या महात्म्याने एका बाजुंस होऊन एक दीर्घ श्वास घेऊन तो रोखला (कुंभक) नि लगेचच पूर्ण रेचक (श्वास सोडला) केला. तो अमर आत्मा पांचभोतिक देह त्यागून त्या ईश्वरांस प्राप्त झाला. त्याची मानवलीला समाप्त झाली.

*एकोणिसाव्या शतकांतला एक महर्षि, आर्षधर्माचा द्रष्टा, अद्वितीय धर्माचार्य आणि संशोधक, महान समाजोद्धारक, संस्कारक तथा राष्ट्र नि अखिल मानवजातीचा सर्वविधपरिपूर्ण मंगलकामनाकर्ता हा आज महासमाधींस प्राप्त झाला. त्या जगन्नियंत्याने निर्माण केलेल्या ह्या जगन्नामक नाट्यरचनेचा कार्यभाग त्यागून तो महात्मा त्या परमेश्वराच्या आदेशाने नेपथ्यांस जाता झाला. महर्षि मनु, महर्षि व्यास, महर्षि याज्ञवल्क्य, महर्षि जैमिनी, परमहंस भगवान पूज्यपाद श्रीमदाद्यशंकराचार्यांच्या प्रोज्वल परंपरेंचा तो प्रतोस्ता ऋषि, भारतीय नवजागरणाचा पुरोधा आपल्या इहलोकाच्या यात्रेचे संवरण करून कीर्तिशेष होऊन गेला. सायंकाळी सहा च्या सुमारांस.*

वैदिक परंपरेनुसार स्वत:च्या स्वीकार पत्रांत आधीच लिहून ठेवल्याप्रमाणे महर्षींच्या देहांस वैदिक अग्निसंस्कार करण्यांत आला. संन्याशांना सर्वसामान्यत: जे करण्यांत येत नाही पण जे करणं वेदप्रणीत आहे तेच करून वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन ह्या पुरुषश्रेष्ठानं केलं.

*५९ वर्षांचा जीवनकाल संपवून आपल्या पावित्र्याच्या तेजाने तळपणारा, ईश्वरावरील श्रद्धेचे शुभकवच ल्यालेला, मृगेंद्राचे सामर्थ्य नसानसांत स्फुरलेला, दीनदलितांविषयी ह्रदयांत अपार करुणा बाळगलेला दयासागर नि करुणासागर, हिमाचलापासून कन्याकुमारीपर्यंत नि गुजरातपासून ते बंगालपर्यंत सर्वत्र वैदिकधर्माची विजयपताका प्रसारित करणारा, पौरुषाने मुसमुसून संपन्न झालेला हा दयानंद नामक दिवाकर आपल्या दिव्य आभेंस विकीर्ण करत त्या अस्तमानांस जाणार्या प्रभाकरासमानच महाप्रस्थानासाठी अस्तांस निघता झाला. सर्व विश्वांस उदयित करणार्या त्या प्रभाकरांबरोबरच हा द्वितीय प्रभाकर आपल्या प्रिय सविता देवतेंस अर्थात अखिलजगहितेच्छु नि अपौरुषेय अशी वैदिक वाणी प्रदान करणार्या ईश्वरांस प्राप्त करता झाला.*

*धन्यं यश: सुरभितं विमलं कुलन्ते,*
*धन्य: पिता गुणवती जननी च धन्या ।*
*धन्या च गौरववती खलु जन्म-भूमि:,*
*त्वद्-वर्त्मनोsनुगमने वयमत्र धन्या: ।*

*धन्या अपीड्यमुनय: सुनयस्तु येषां ।*
*भूयस्त्वया सुमनसा तपसोद्धृतो वै ।*
*सा शारदा श्रुतिमयी सुतरान्तु धन्या ।*
*याsसूत पूतचरितं सुतमद्वितीयं ।*

*अमन्दसंविन्मकरन्द-माधुरीं, प्रदाय विद्वन्मधुपाय निर्भरम् ।*
*वसुन्धरोद्यानममुञ्चदञ्चितं सुमं प्रतस्थे तु दिबालयं प्रति ।*

वेदार्थ कल्पद्रुम - भाग १ - पृष्ठ ३

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#महर्षि_दयानंद_पुण्यस्मरण_आश्विन_अमावस्या_महानिर्वाण_दीपावली