Friday 3 November 2023

सांख्यदर्शन निरीश्वरवादी नाही, कुठलंच वैदिक दर्शन निरीश्वरवादी नाही

 


सांख्यदर्शन निरीश्वरवादी नाही, कुठलंही वैदिक दर्शन निरीश्वरवादी नाहीयेच...

मागेही लिहिलंय की हे सर्व भ्रम आचार्यांच्या भाष्यामुळे व ते नीट समजून न घेतल्याने निर्माण झालेले भ्रम आहेत, मग ते अद्वैती असोत, द्वैती असोत किंवा अन्य असोत. यातही सर्वस्वी त्यांचा दोष नाहीये. त्यामागेही हेतु आहे. तो कसा ते पाहुयांत..

मूळात निरीश्वरवादी म्हणजे लगेचंच ईश्वर नाकारणं असेही नव्हे, सांख्यदर्शनाच्या संबंधी निरीश्वरवादाचा अर्थ केवळ जगत्सृष्ट्यत्वामध्ये ब्रह्म किंवा ईश्वराचा नियंता या रुपानेच स्वीकार आहे, सांख्यकार श्रीकपिल महामुनी हे प्रकृतींस जगताचे मूल उपादान कारण मानतात आणि ईश्वर किंवा अन्य कोणत्याही तत्वाला जगत्सृष्ट्यत्वामध्ये असिद्ध मानतात किंवा फारतर नियंता मानतात इतकंच. ते लगेचंच ईश्वराचं अस्तित्व नाकारतात असा त्याचा अर्थ नव्हे...

पण सांख्यदर्शनात खालील सुत्रांवरून त्याच्या ईश्वरनिष्ठेची साक्ष पटते. ती खालीलप्रमाणे....

ईश्वरासिद्धेः या सूत्रामध्ये ईश्वर हा केवळ उपदानाकारणत्वाच्या दृष्टीने असिद्ध सांगितला आहे याचा इथे ईश्वराचा सर्वार्थाने किंवा सरसकट निषेध नसून त्याच्यावरचे अवलंबित्व सिद्ध आहे, तो केवळ नियंता आहे इतकंच. पण या सूत्राचा अर्थ सांख्यदर्शनकार महर्षि श्रीकपिलांनी ईश्वरालाच नाकारलंय असा भ्रमाने काढला गेल्याने गोंधळ झालेला आहे.

दुसरा संदर्भ - सांख्य - ३/५६-५७
"स हि सर्ववित् सर्वकर्ता"

ह्या सूत्रांत स्पष्टपणे तो (स:) ईश्वर हा सर्वांतर्यामी थोडक्यात सर्व जाणणारा व सर्वकर्ता म्हणजेच सर्व सृष्टीचा रचयिता आहे हे स्पष्ट सांगितले आहे, यद्यपि प्रकृती उपादानकारण असली तरी.

पुढे लगेचच म्हटलंय "इदृशेश्वरसिद्धि: सिद्धा:"
म्हणजे ह्यावरूनच ईश्वराची सिद्धी दृढतेने केली गेली आहे. पांचव्या अध्यायातही सुत्र २ ते १२ ह्यातही सांख्यदर्शनकार श्रीकपिलमहामुनींची ईश्वरनिष्ठा स्पष्ट दृग्गोचर होते.

पण मग हा नेमका घोळ कुठे झाला ते पाहुयांत...

ईश्वरकृष्णांच्या सांख्यकारिकेमुळे...

ब्रह्मसूत्रशाङ्करभाष्य जर आपण व्यवस्थित अभ्यासलं तर स्पष्ट लक्षात येतं की आमच्या भगवत्पाद श्रीमच्छंकराचार्यांनी सुद्धा बौद्धमत निराकरणासाठी आपल्या लक्ष्यसाध्य हेतु ईश्वरकृष्णांच्या सांख्यकारिकासारख्या ग्रंथांचा आधार घेऊन सांख्यदर्शनाच्या कथित निरीश्वरवादाचा क्षणभर आश्रय घेतला पण याचा अर्थ भगवत्पाद श्रीमच्छंकराचार्यांना मूळ सांख्यदर्शन हे निरीश्वरवादी होते असं म्हणायचं मुळीच नव्हतं हे भाष्य नीट अभ्यासलं तर कळेल. ब्रह्मसूत्रशाङ्करभाष्याच्या २।१।१ येथील सूत्रावर आचार्यांनी 'कापिलस्य तन्त्रस्य वेदविरुद्धत्वं वेदानुसारिमनुवचनविरुद्धत्वंं च।' असे जे म्हटलंय त्यातही हेतु आहे. कारण सांख्यदर्शनकार श्रीकपिल महामुनी हे स्पष्टपणे 'पुरुषबहुत्वं व्यवस्थातः।' (६।४५) या सूत्रामध्ये स्पष्टपणे पुरुषजीवांची अनेकता सिद्ध करतात. भगवत्पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांनी या 'ईश्वरासिद्धे:' सूत्राला नास्तिकताप्रदर्शक म्हटलेलं आहे आणि प्रकृतीच्या उपादान कारणत्वाला व जीवांच्या नानात्वाला वेदविरुद्ध यासाठी म्हटले आहे कारण त्यांच्या मायावादाच्या प्रतिपादनास त्याने विरोध येतो म्हणून. त्यांना अद्वैतमतप्रतिष्ठापनेसाठी त्या मांडणीची आवश्यकता होती. श्रीरामानुजाचार्यांनी सुद्धा त्यांच्या विशिष्टाद्वैत प्रतिपादनासाठी १।४।२३ या सूत्रांवर भाष्य करताना आचार्यांचंच अनुसरण केलेलं आहे.

मुळात ईश्वरकृष्णांची सांख्यकारिका हा आधुनिक ग्रंथ आहे, वात्सायनाच्या वेळी त्याचं अस्तित्वही नव्हतं हे स्पष्ट सिद्ध होतं कारण त्याने वार्षगण्याला उद्धृत केलं आहे, ईश्वरकृष्णांना नाही.

सांख्यदर्शनावर निरीश्वरवादाचा आरोप करणाऱ्यांनी आणखी "वार्षगण्य" नावाच्या एका विद्वानाचा संदर्भ दिला आहे की ज्यांनी मुळ कपिलांच्या सांख्यदर्शनाच्या विरोधात काही मतभेद प्रकट केला. आणि बौद्धांनी त्याचाच वापर ईश्वरखंडनासाठी म्हणजे नास्तिकतेसाठी केला. पुढे भाष्यकारांनी त्यालाच प्रमाण मानुन हे सांख्य हे निरीश्वरवादी आहेत हा सिद्धांत मांडला. दुर्दैवाने श्रीकरपात्री स्वामींसारखा प्रकांड विद्वानही 'वेदार्थपारिजातमध्ये' हेच मांडताना दिसतो अर्थात त्यामागे त्यांचा हेतुही केवळ आर्यसमाजाला विरोध करणं हाच होता. असो तो स्वतंत्र विषय...

षड्दर्शनांना निरीश्वरवादी ठरवणं हे चूक असलं तरी ती त्या आचार्यांची तत्कालीन बौद्धमत निराकरणासाठी केलेली तात्पुरती व्यवस्था होती...

आमच्या प्रज्ञाचक्षु श्रीगुलाबराव महाराजांनी यावर सुंदर विवेचन केलेलं आहे जे समन्वयाच्या दृष्टीने ते द्रष्टव्य आहे. महाराजांनी स्पष्टपणे सांख्यदर्शन हे निरीश्वरवादी नसून सेश्वर दर्शन आहे हे व्यवस्थित रीतीने पटवून दिलं आहे. आणि त्याचा वेदांताशी समन्वय करून दिला आहे. महाराज स्पष्ट म्हणतात की भगवत्पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांनी प्रकृतीची सत्यता आणि पुरुषबहुत्व या मतांचे खंडन केले परंतु सृष्टीच्या उत्पतीचा क्रम मात्र सांख्यानुसारच घेतला. आचार्यांनी गीताभाष्यामध्ये आणि विष्णुसहस्त्रनाम भाष्यामध्ये महर्षि श्रीकपिलांचे व सांख्यशास्त्राचे वैदिकत्व स्वीकारून ते प्रमाणही मानले आहे. म्हणजे ब्रह्मसूत्रशाङ्करभाष्यामध्ये एकीकडे हेच आचार्य सांख्यदर्शनाला अवैदिक किंवा वेदविरुद्ध ठरवतात आणि दुसरीकडे त्याचा मुक्तहस्ताने वापर करतात हा विवेक आपण लक्षात घ्यायला हवा...

षट्दर्शने म्हणजे प्रत्येक दर्शन मूळातून स्वत: संप्रदायपूर्वक म्हणजे गुरुमुखातून ब्रह्मचर्य्यपूर्वक तेही आर्षपद्धतीने अध्ययन न करता केवळ अंतिम असे वेदांत दर्शन किंवा त्यावरील आधुनिक भाष्ये अभ्यासून षट्दर्शनांविषयीची सैद्धांतिक भूमिका समजाऊन घेण्याचा प्रयत्न करणे हा आत्मघात नव्हे काय? दुर्दैवाने आर्ष भाष्यांची अनुपलब्धता हाही दोष आहे. आता उपरोक्त भाष्यकारांनी ती मूळातून अभ्यासलीच नव्हती असे समजणं चूक असलं तरी स्वत: मूळातून ती अभ्यासण्यांत हानीपेक्षा लाभंच आहे असे म्हटल्यांस अत्युक्ती ठरेल काय? ह्यात पुन्हा द्वैत-अद्वैत-त्रैत वाद वेगळाच पण तो स्वतंत्र. अंतिम मत अनुभूतीचा विषय पण आधी अभ्यासणं तरी महत्वाचं..

पूर्वमीमांसेवर श्रीव्यासांचे, वैशेषिकांवर श्रीगौतमांचे, न्यायावर श्रीवात्सायनांचे, योगसूत्रांवर श्रीव्यासांचेच की स्वोपज्ञ(?), सांख्यावर श्रीभागुरीमुनींचे, वेदांतावर श्रीवात्सायनाचे किंवा श्रीबौधायनाचं - इति महर्षि दयानंद

ही आर्ष म्हणजे ऋषिमुनीकृत भाष्ये! ही अभ्यासणं म्हणजे समुद्राच्या गर्भात जावं व मौल्यवान मोती वर आणावीत असे साहित्य. ह्यातली केवळ न्याय व योगाची आज उपलब्ध आहेत. अन्य चार काळाच्या ओघात नष्ट झाली. आज जर ही सर्व भाष्ये उपलब्ध असती तर? तर षट्दर्शनांविषयी जो गोंधळ झाला व मतमतांतरे निर्माण झाली ती झाली नसती. हा द्वैत-अद्वैत-त्रैत वादही निर्माण झाला नसता. आपलं दुर्दैव...! अस्तु!

समूळ ग्रंथ पाहिल्यावीण, उगाचंच ठेवीं जो दूषण।
गुण सांगता अवगुण, पाहें तो येक पढतमूर्ख।
दासबोध

अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु।

भवदीय,

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#सांख्यदर्शन_निरीश्वरवाद_सेश्वरवाद_श्रीशंकराचार्य_श्रीगुलाबराव_महाराज_षट्दर्शने_प्रकृती_सांख्यकारिका


No comments:

Post a Comment