Sunday 18 July 2021

आज विद्वान श्री. गोविंदलाल हरगोविंद भट्ट (जी. एच भट्ट) यांची पुण्यतिथी...

 


कोण गोविंदलाल भट्ट??


५-६ वर्षांपूर्वी श्रीमद्वाल्मीकि रामायणाचे अध्ययन जेंव्हा आरंभ केलं, त्यावेळी हे नाव आह्मांस कळलं. १९६६ मध्ये पुण्याच्या विश्वविख्यात अशा भांडारकर प्राच्यविद्या संस्थेने महाभारताची एक अत्यंत चिकीत्सक प्रत प्रकाशित केली, सहस्त्रो हस्तलिखितांची नि प्रतींची चिकीत्सक मीमांसा करून जिचं नाव CRITICAL EDITION OF MAHABHARATA, जी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णनांच्या हस्ते प्रकाशित करण्यांत आली. जिचे प्रमुख संपादक हे सुखटणकर होते. अनेक उच्चकोटीचे विद्वान ह्यावर कैक दशकं अध्ययन करत होते. तिच्याच अगदी सहा वर्षे आधीच बडौद्याच्या श्रीमंत सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या प्राच्यविद्या संस्थेने १९६० मध्येच श्रीमद्वाल्मीकि रामायणाचीही अशीच एक चिकीत्सक प्रत प्रकाशित केली होती. जिला आङ्ग्लभाषेमध्ये Critical Edition of Valmiki Ramayana असे म्हटलं जातं. 


४० वर्षे संशोधनाअंती प्रकाशित 


बडौद्याच्या श्रीमंत सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या प्राच्यविद्या विभागाने हे कार्य चार दशके संशोधन करून पूर्ण केलं होते. अनेक विद्वान ह्यामध्ये होते ज्यामध्ये प्रामुख्याने श्री भारतरत्न महामहोपाध्याय श्री पांडुरंग वामन काणे, श्रीसुखटणकर आदि मंडळी होती, जी भांडारकर प्रतीतही काम करत होती.


एकुण २००० हस्तलिखितांचे अध्ययन करून ही प्रत संपादित करण्यात आली होती. आणि ह्या सर्व उपक्रमाचे मुख्यसंपादक होते श्री गोविंदलाल हरगोविंद भट्ट जे प्राच्यविद्या केंद्राच्या रामायण विभागाचे मुख्यसंपादक नि अध्यक्ष होते. भट्टांच्या अध्यक्षतेखाली हे कार्य करण्यांत आलं होते. यद्यपि त्यांचे देहावसान अगदी अकाली झालं तरीही. 


वाल्मीकि रामायणाची चिकीत्सक प्रत


ज्यांना श्रीमद्वाल्मीकि रामायणाचं अध्ययन करायचं आहे,

त्यांना ही प्रत अभ्यासणं आवश्यकच नव्हे तर अपरिहार्य आहे.


या प्रतीमध्ये एकुण सात खंड असून उत्तरकांडही त्यांनी रामायणाचा भाग मानलेलंच आहे. शेवटी रामायणाची पदसुचीचाही खंड आहे. अर्थात ते उत्तरकांड कितपत ग्राह्य मानावे हा स्वतंत्र विषय आहे, त्याविषयी अंतिम मत प्रकट करण्याचे हे स्थान नव्हे.


ही प्रत अगदी अंतिम प्रत आहे असे आमचं म्हणणं नसून अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाची आहे इतकंच मत आहे.


वास्तविक रामायणांवर बोलण्यापूर्वी किंवा त्याविषयी आपले अंतिम मत बनविण्यापूर्वी रामायणांवरील ३० संस्कृत टीका अभ्यासायला हव्यांत, ज्यांचा उल्लेख आह्मीं राम मंदिर निर्णयाच्या वेळीच्या लेखामध्ये केला आहे. पण इतका चिकीत्सक अभ्यास करण्याची मानसिकता सांप्रत आपल्याकडे आहे का हा प्रश्न निदान इतिहासाच्या प्रामाणिक विद्यार्थ्यांनी तरी स्वतःला विचारायला हवा. असो.


सुदैवाने ही समग्र प्रत अगदी टंकलिखित आंतरजालांवर उपलब्ध आहे...


CRITICAL EDITION OF VALMIKI RAMAYANA


नावाने गुगल केलं की समग्र प्रत टंकलिखित प्राप्तही होते. किंवा पीडीएफही प्राप्त होते.


ही प्रत तयार करण्यासाठी अगदी विविध लिपींतल्या रामायणाच्या प्रतींचे अध्ययन झालं होते, ज्यामध्ये प्रामुख्याने देवनागरीबरोबरंच  शारदा, मेवारी, मैथिली, बंगाली, तेलगु, कानडी, तामीळ,मल्याळम, नंदिनागरी, ग्रंथ वगैरे लिप्याही होत्या. म्हणूनंच या प्रतीचे एक विशेष महत्व आहे.


भट्टांची आणखी काही ग्रंथसंपदा


त्यांनी एकुण ६४ ग्रंथ लिहिले असून ११५च्या वर संपादित आहेत. एकुण पाच भाषांमध्ये त्यांचे लेखन आहे.


महाप्रभु श्रीवल्लभाचार्यांच्या जीवनावरील नि तत्वज्ञानावरील परिचयात्मक असा त्यांचा ग्रंथ अगदी चिंतनीय आहे. त्याचे पीडीएफ आहे. गुगल केलं तरी मिळेल.श्रीवल्लभाचार्यांच्या ब्रह्मसूत्रावरील श्रीमत् अणुभाष्याचेही संपादन त्यांच्याच शिष्याने केलं होते.


द्रौपदी वस्त्रहरण - महाभारतातील प्रक्षिप्त प्रकरण


The Draupadīvastraharaṇa Episode: An Interpolation in the Mahābhārata


मद्रासमधून महामहोपाध्याय प्रा. श्री. कुप्पुस्वामी शास्त्री ह्यांनी सुरु केलेले एक The Journal of Oriental Research हे एक नामांकित त्रैमासिक प्रकाशन होते. सुदैवाने त्याचे बरेचसे अंक आज पीडीएफ आंतरजालांवर उपलब्ध आहेत. ह्याचा १९५१चा जो त्रैमासिक अंक आहे, त्यामध्ये श्री गोविंदलाल भट्टांचा द्रौपदी वस्त्रहरणासंबंधी एक अत्यंत अभ्यसनीय लेख आहे. तो जिज्ञासुंनी वाचणं अत्यंत आवश्यक आहे.


https://archive.org/details/in.ernet.dli.2015.76405/page/n3/mode/2up



वास्तविक द्रौपदी वस्त्रहरण झालं की नाही ह्यासंबंधी विद्वानांमध्ये अत्यंत टोकाचे मतभेद आहेत नि दोन्ही बाजुचे विद्वान आपलंच मत कसं सत्य आहे हे मांडण्यांत अत्याग्रही असतात, ते स्वाभाविकही आहे. पण तरीही या विषयांवर भट्टांचा हा लेख व आणखी संशोधनासाठी श्री म अ मेहेंदळेंचे संशोधनही अत्यंत चिंतनीय आहे. त्याबरोबरंच श्री अर्जुन विनायक जातेगांवकर व वासंती अर्जुन जातेगांवकर या दोघांनी लिहिलेला भांडारकरच्या Annals of BORI - Volume 92 मध्ये प्रकाशित झालेला लेखही चिंतनीय आहे.


आमचे पूज्यनीय स्वामी वरदानंद भारती जे पूर्वाश्रमीचे श्री अनंत दामोदर आठवले ह्यांनी त्यांच्या 'महाभारताचे वास्तव दर्शन' ह्या अभूतपूर्व ग्रंथामध्ये वस्त्रहरण व वस्त्रावताराचे समर्थन केलं असून त्यांच्या पुत्राने मात्र 'याज्ञसेनी द्रौपदी' ह्या पुस्तिकेमध्ये पित्याची मते खोडली आहेत. या सर्व विद्वानांच्या चरणी आह्मीं नतमस्तक आहोत. असो...


आमचं ह्याविषयी अंतिम मत प्रकट करण्यांस सांप्रत आह्मीं अभ्यासाअभावी असमर्थ असलो तरी भगवान श्रीकृष्णांचा वस्त्रावतार झालेलाच नाही हे त्यांच्याच वनपर्वांतल्या वचनांवरून सिद्ध झालेले असल्यामुळे तेवढ्यापुरते तरी आह्मीं ह्याविषयी मात्र ठाम आहोत. नि अंतिम क्षणापर्यंत राहु. महाभारतावरील सर्व टीका अभ्यासल्याशिवाय अंतिम मत प्रकट करणे तसं घाईचे असल्याने थांबतो....


श्रीमद्वाल्मीकि रामायणाच्या अध्ययनाच्या दृष्टीने ह्या प्रतीचे अत्यंत महत्व असल्याने हिचे संपादकत्व श्री भट्टांकडे असल्याने त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चरणी अभिवादन करून लेखणींस विराम देतो...


भवदीय...


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#वाल्मीकि_रामायण_चिकीत्सक_प्रत_बडौदा_प्राच्यविद्या_गोविंदलाल_भट्ट_भांडारकर_उत्तरकांड

No comments:

Post a Comment