Friday 26 May 2017

स्वातंत्र्यवीर सावरकर नास्तिक होते का की बुद्धिवादी होते की आस्तिक होते की बुद्धिवादी-आस्तिक होते की विज्ञाननिष्ठ-आस्तिक होते ?????????

#इतिहासाच्या_पाऊलखुणा

#स्वातंत्र्यवीर_सावरकर_विशेष_सप्ताह


यद्यदाचरति श्रेष्ठ: तत्तद्देवेतरो जना: !
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते!
गीता

श्रेष्ठ पुरुषांचे आचरण हे सर्वसामान्यांस नेहमीच अनुकरणीय व अनुसरणीय असल्यामुळे तात्यारावांसारख्या लोकोत्तर पुरुषाच्या व्यक्तिमत्वाचे हे वैशिष्ट्य आकळणे अत्यावश्यक आहे म्हणून हा लेखनप्रपंच!  सांप्रत बुद्धिवाद बुद्धिप्रामाण्यवाद, विवेकवाद वगैरे शब्द सतत कर्णांवर येतात. अनेकांचा असा भ्रम आहे की हे अगदी नवीनच आहे व आमच्या प्राचीन पूर्वज आर्यांस किंवा आम्हांसही जणु काही हे माहितीच नाही. तूर्तास ह्यावर भाष्य करत नाही. स्वतंत्रपणे कधीतरी करीन. पण प्रस्तुत विषयाचा विचार करता तात्यारावांच्या चरित्राचा अभ्यास करताना त्यांच्या प्रखर किंबहुना काहीठिकाणी टोकाच्या अशा बुद्धिवादाची मांडणी अनेकवेळा पहायला मिळते. सुदैवाने त्यांच्या बुद्धिवादावर प्रा. शेषराव मोरे व लंडनस्थित डॉ. वासुदेव शंकर गोडबोले ह्या दोन लेखकांनी विपुल लिखाण व संशोधन केलंय. आदरणीय प्र ल गावडेंचाही प्रबंध बर्याच वर्षांपूर्वी वाचला, त्यांना व्यक्तिगत भेटलोही व संवादही केला. भालबा केळकरांचाही ह्यावर ग्रंथ आहे असे सोबतच्या अंकात वाचायांस मिळालंय पण वाचला नाही अद्याप. असो.

समुळ ग्रंथ पाहिल्यावीण, उगाचच ठेवी जो दूषण!
गुण सांगता अवगुण, पाहें तो एक पढतमूर्ख!
दासबोध - दशक दोन, समास १०

तात्यारावांचे समग्र साहित्य नऊ खंडात प्रसिद्ध आहे. त्यांचे धनंजय कीरांनी लिहिलेलं चरित्र व बाळाराव सावरकरांनी लिहिलेलं चरित्रात्मक चार खंड हे सर्व वाचल्यावर तात्यारावांच्या ह्या व्यक्तिमत्वविशेषाचे चिंतन करणे व त्याविषयींच्या भ्रमांचे निराकरण करणे म्हणून हा लेखनप्रपंच!

नास्तिक शब्दाचा अर्थ ?

नास्तिको वेदनिन्दक: !
जो वेदांची निंदा करतो तो नास्तिक अशी मुळ व्याख्या आहे. सांप्रत ईश्वराचे अस्तित्व नाकारतो तो नास्तिक अशी व्याख्या रुढ आहे. ह्या दोन्ही अर्थाने तात्याराव नास्तिक होते का हा मुळ प्रश्न
आहे.

बुद्धिवादी बुद्धिप्रामाण्यवादी म्हणजे काय?

प्रत्यक्ष, प्रयोग, अनुभव व तर्क इत्यादींच्या आधारे सत्यशोधन करणे ही बुद्धीवादाची शास्त्रीय प्रक्रिया आहे.
बुद्धीला प्रमाण मानणे व जे बुद्धीस रुचेल, पटेल तेच मानणे व आचरणे व धर्मग्रंथात किंवा परंपरेने एखादी गोष्ट सांगितलेली आहे म्हणूनच ती प्रमाण न मानता बुद्धिवादाच्या, तर्काच्या कसोटीवर त्याची परीक्षा करणे हा थोडक्यात मला समजलेला बुद्धिवादाचा अर्थ आहे. जर ह्यात काही चुक असेल तर विद्वानांनी निदर्शनांस आणुन द्यावे ही विनंती!

विज्ञाननिष्ठा म्हणजे काय?

आमच्या धर्मशास्त्रात आम्ही ज्यांस पदार्थ विद्या म्हणतो त्यांस आधुनिक जगात आपण विज्ञान ही संज्ञा देतो. आंग्लभाषेतली साइन्स ही संज्ञा हीदेखील विज्ञानासाठी आपण योजित असतो. तेंव्हा विज्ञाननिष्ठा म्हणजे आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर प्रत्यक्ष प्रयोगाअंती जे सिद्ध होते तेच सत्य स्वीकारार्ह्य अशी साधी सोप्पी व्याख्या करता येईल. दोन गोष्टींतील कार्यकारणभाव ठरविणे हे विज्ञानाचे मुल आहे. चराचर सृष्टीची निर्मिती कशी झाली व तिचे अस्तित्व काय ह्यापासून मनुष्याच्या जीवनात त्याच्या अस्तित्वापर्यंतच्या कार्यकारणभावाची मीमांसा हा विज्ञानाचा विषय आहे. म्हणूनच विज्ञाननिष्ठेचा व बुद्धिवादाचा आधार बुद्धि हा एकच आहे असे प्रा. मोरे सर म्हणतात.

धर्मचिकीत्सा

मानवी जीवनांवर सर्वात महत्वाचा परिणाम असतो तो धर्माचा व तत्जन्य श्रद्धेचा. कुणी कितीही नाकारुदे. त्यामुळे बुद्धिवादाचा किंवा विज्ञाननिष्ठेचा किंवा आस्तिकतेचा-नास्तिकतेचा विचार करताना धर्मचिकीत्सा ही अर्थातच क्रमप्राप्त असते. अर्थात ती करत असताना आपल्याल्या त्या धर्माच्या मूलतत्वांचे ज्ञान असणे व त्या धर्मग्रंथांच्या भाषेचे ज्ञान असणेही आवश्यक असते. हे दुर्दैवाने अनेकजण समजून घेत नाहीत म्हणून गोंधळ होतो.

 असो आता सावरकरांची भूमिका उपरोक्त विषयांच्या संदर्भात काय आहे हे पहायला हवं. मुळ विषयांकडे वळुयांत आता !

सावरकर नास्तिक म्हणजे ईश्वर  नाकारणारे होते का???

अनेकजण तात्यारावांवर नास्तिकतेचे शिक्का चिकटविताना नेहमी त्यांच्या ज्या लेखाचा संदर्भ देतात तो म्हणजे

विश्वाचा देव व मनुष्याचा देव!

सावरकरांच्या गायीविषयीच्या मतांचा जसा विपर्यस्त अर्थ काढला जातो तसाच ह्या लेखाचा काढला जातो. आरंभी ह्यालेखांतून तात्यारावांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा मनुष्यजीवनांवर काहीच परिणाम होत नाही असा अर्थ लावला आहे. पण पुढे जाऊन ह्यावरून तात्याराव ईश्वराचे अस्तित्वच नाकारतात असा जो अर्थ काहीजण काढण्याचा प्रयत्न करतात ती मात्र आम्हांस अत्युक्ती वाटते. कारण की वैदिक सिद्धांतानुसार ईश्वर हा तसा निष्पक्ष आहे. तो आपल्या कार्यात तसाही कुठेच ढवळाढवळ करत नाही. प्रत्येक जीव हा कर्म करण्यांस स्वतंत्र आहे व त्याचे कर्मफलभोग भोगण्यांसही तो स्वतंत्र आहे. हा वैदिक सिद्धांत महर्षि दयानंदांनी त्रैतवाद म्हणून मांडला. आचार्य शंकरांनी मांडलेल्या अद्वैतवाद नाकारणारा हा सिद्धांत असल्याने अनेकांनी ह्याकडे दुर्लक्ष केलं. पण आमचे व्यक्तिश: ठाम मत आहे की आचार्यांनी अद्वैताचा मांडलेला सिद्धांत हा तत्कालीन परिस्थितीवश आहे. सविस्तर ह्यावर आम्ही कधीतरी लिहीन.

तूर्तास ह्या एका लेखांवरून सावरकर हे ईश्वराचे अस्तित्वच नाकारणारे होते असा आरोप प्रा. शेषराव मोरे प्रभृती लोक जो करतात तो आम्हांस अनाठायी वाटतो. कारण तात्यारावांना हेंद्री-फेंद्री सामग्री देवते मान्य नसून विश्वाचा देव एकच मान्य आहे, जो मुळचा वैदिक सिद्धांत आहे. ह्यालेखांवरून तात्याराव नास्तिक किंवा ईश्वर नाकारणारे सिद्ध होऊच शकत नाहीत.

आणि तसेही तात्यारावांनी ईश्वर नाहीच असे कुठेही ठामपणे म्हटलेलं नाहीये. शेषराव स्वत: हे मान्य करतात की ईश्वर आहे किंवा नाही, त्याचे स्वरुप काय यांत सावरकरांनी रस नाही. (पृष्ठ क्रमांक ३८) आणि हेच शेषराव पुढच्या पृष्ठांवर लगेचच ज्या ईश्वरांवर सावरकरांचा विश्वासच नाही असे म्हणतात?  ह्याला काय म्हणायचे? टीका करण्याचा आमचे हेतु नसून भ्रमांचा भोपळा फोडण्याचा हेतु आहे. अकारण निष्कर्ष काढणे वास्तवांस धरुन होणार नाही.

कुंडलिनी जागृतीचा तात्यारावांचा स्वानुभव
संदर्भ - पृष्ठ क्रमांक १८४-१८५ - रत्नागिरी पर्व - बाळाराव सावरकर

माझी जन्मठेपच्या आरंभीसच तात्यारावांनी मी व्यायाम करताना पतंजलींची योगसुत्रे तोंडपाठ म्हणत असे स्पष्ट लिहिलं आहे. अंदमानात त्यांनी कुंडलिनी जागृतीचा प्रयोग केला होता हे जगजाहीर आहे. हिंदुध्वजांवर कुंडलिनी कृपाणांकित करताना व्याख्यानात त्यांनी हा स्वानुभव प्रकट केलाय. ते म्हणतात

"कुण्डलिनी ही प्रत्येक माणसाच्या शरीर शांत पाठीच्या कण्यात असते. कमरेच्या बाजूला असलेल्या तिच्या खालच्या टोकाला मूलाधार म्हणतात. त्यांतील सुप्तशक्ती जागृत करून ती मस्तकांतील सहस्त्र धारापर्यंत पोंचली की मानवांला ब्रह्मानंद होतो, मोक्षांचे सुख मिळते असे योगशास्त्रांत सांगितले आहे. आणि आता विज्ञानानें ते सिद्ध झाले आहे. हा योगाभ्यांसी अधिकार्याचा विषय असल्याने मला त्यांची सत्यता चांगलीशी पटवून देता येणार नाही. तरी पण बंदिवासात असतांना एकट्याची एकांतातील करमणुक म्हणून या संबंधी ने मी जो थोडांसा अनुभव घेतला आहे. आणि ह्या विषयांवर जी अनेक पुस्तके वाचलीं आहेत त्यावर विश्वासून विचारविनिमयाच्या दृष्टीने आणि विद्यार्थी या नात्याने मी हा विषयसर्वांपुढे ठेवतो."

इति तात्याराव

पुढे योगसुत्रांवर तात्यारावांनी केलेलं विवेचन

ही घटना आम्हांस ऐकायला मिळाली की किंजवडेकर शास्त्री नावाच्या तत्कालीन धर्मशास्त्रांवरच्या विद्वानांशी तात्यारावांनी योगसुत्रांवर तासन्तास संवाद केला आहे. ह्यावरून त्यांचा योगाभ्यास सिद्ध होतो. आणि हा मोक्षप्राप्तीच्या दष्टीनेच आहे हे कसे नाकारणार?  केवळ शारीरिक लाभ म्हणून योग केल्याचे उदाहरण वेग ले पण कुंडलिनी जागृतीचा स्वानुभव व योगसुत्रांवर तासन्तास भाष्य हे निश्चितच चिंतनीय आहे. जिज्ञासूंनी ह्याविषयी विचार करावा.

आता ह्यावरूनही तात्यारावांना कुणी नास्तिक म्हणेल का?  तुम्हीच ठरवा !

अनादि मी अनंत मी!

ही कविता ज्या आत्मबलाचे प्रतीक आहे, ते आत्मबल तात्यारावांस नास्तिक सिद्ध करते का?

सावरकर बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ अवश्य होते!

हे आम्ही कुठेही नाकारत नाही. किंबहुना तसे ते असणे हेच त्यांच्यी व्यक्तित्वाचे वैशिष्ट्य आहे. पण बुद्धिवादी असणे म्हणजे नास्तिक असावेच हा कोण ता अट्टाहास? विज्ञाननिष्ठ असणे म्हणजेच ईश्वराचे अस्तित्व नाकारणे हे कुणी ठरविले ??? हा कुठला मापन दंड ???

हे म्हणजे आपली मानसिकता सावरकरांवर लादणे आहे. सावरकर निष्पक्षपातीपणे अभ्यासणे आवश्यक की आपली नास्तिक विचारसरणी त्यांच्यावर थोपविणे???  विचार व्हावा  ही विनंती!!!

काहीजण म्हणतात की सावरकर आधी आस्तिक होते पण ते आयुष्याच्या शेवटी काही वर्षे नास्तिक झाले!

ह्यासाठी हे लोक त्यांचा उपरोक्त लेख,  विज्ञाननिष्ठ निबंध, क्ष किरणे, अंधश्रद्धा निर्मुलन आदि लेखांचा संदर्भ देतात. पण एवढ्यावरूनही त्यांना नास्तिक ठरविणे अश्लाघ्य प्रयत्न ठरेल किंबहुना ती अत्युक्ती ठरेल.

थोडक्यात त्यांच्या समग्र साहित्याचा, चरित्राचा अभ्यास केल्यावर त्यांच्याविषयी निष्कर्ष काढताना ते बुद्धिवादी किंवा विज्ञाननिष्ठ असूनही  आस्तिकच होते असा निष्कर्ष आम्हांस काढण्याशिवाय गत्यंतर नाही!

एवंच लेखनसीमा!

तुकाराम चिंचणीकर
#पाखण्ड खण्डिणी

4 comments:

  1. अनेकदा सावरकरांच्या दोन विधांनामध्ये विसंगती आढळते... याची संगती कशी लावायची ?

    ReplyDelete
    Replies
    1. छान प्रश्न ! देतो उत्तर सविस्तर ! थोडा अवधी द्यावा !

      Delete
  2. अनेकदा सावरकरांच्या दोन विधांनामध्ये विसंगती आढळते... याची संगती कशी लावायची ?

    ReplyDelete
  3. विसंगतीचे एक उदाहरणद्याल ही विनंती.

    ReplyDelete