Thursday 11 March 2021

महाशिवरात्री अर्थात बोधोत्सव दिवस...



*उदीच्य प्रकाश नामक ग्रंथानुसार कैक शतकांपूर्वी सौराष्ट्रप्रांती अर्थात विद्यमान गुजरातमध्ये अन्हलवाडा ह्या संस्थानचे अधिपति मूलराज सौलंकीनी एका विशिष्ट कार्यासाठी संपूर्ण भारतातून १००० एक सहस्त्र सच्चरित्र नि सत्वशील ब्राह्मणांना बोलाविलं होते. तेच ब्राह्मण पुढे ह्या सौराष्ट्रप्रांती उदीच्य ब्राह्मण नावाने प्रसिद्ध झाले.  दोनशे वर्षांपूर्वी याच काठियावाडीमध्ये टंकारा नामक ग्रामी ह्याच परंपरेत कर्शनजी लालजी तिवाडी ह्या औदिच्य किंवा उदीच्य सामवेदी ब्राह्मणाच्या गृही विक्रम संवत १८८१ अर्थात इसवी सन १८२४ मध्ये एका बालकाचा जन्म झाला. माघ वद्य दशमींस...मूलशंकर हे पाळण्यातले नाव असलेले हे बालक पुढे जगद्विख्यात यतिवर महर्षि दयानंद सरस्वति नावाने प्रसिद्ध झाले...*


हे घराणे मूलतः शैवपंथी असल्यामुळे भगवान शंकरांचे अनन्य भक्त...


पांचव्या वर्षी ह्या बालकाची शिक्षा आरंभ झाली आणि आठव्या वर्षी उपनयन संस्काराने ह्याच्य् द्वितीय जन्मांस प्राप्ती झाली. यजुर्वेदाचे अध्ययन आरंभ करताच रुद्रपाठाची आवर्तने सुरु झाली आणि १४व्या वर्षांपर्यंत व्याकरण आणि शब्दरुपावली वगैरे कंठस्थ झाली. अगदी यजुर्वेदही संपूर्ण कंठस्थ झाला. 


*शिवभक्तीचे संस्कार*


बालपणापासूनंच ह्या बालकांवर शिवभक्तीचे संस्कार झाल्याने नित्यनियमाने पिंडीची पूजा करणे वगैरे कार्यक्रम सुरु झाले. आणि अखेर तो दिवस उजाडला. शिवभक्त असल्याने ह्या बालकांस महाशिवरात्रीचे उपवास, तत्संबंधित उपासना ह्या सर्वांचीच शिक्षा आधीपासूनंच देण्यात आली.


*महाशिवरात्रीची रात्र आणि मूलशंकरचा बोधोत्सव*


अखेर ती महाशिवरात्रीची रात्र आली. दिवसभराचा उपवास करून हा बालक  रात्रीच्या प्रहरी असलेल्या चार शिवपुजांसाठी मंदिरात गेला. तीन पुजा करतातच त्याच्या लक्ष्यीं आलं की मंदिरातला पुजारी व आपले सर्व मित्र झोपी गेले आहेत. चौथ्या पुजेच्या आरंभ करण्यापूर्वीच एक अकस्मात घटना घडली नि...


*शिवरात्रींस निद्रा घेणं हा व्रतभंग असल्याने बालक मूलशंकर हा सतत डोळ्यांवर पाणी मारत होता. त्यांचे वडील स्वतः झोपी गेले पण हा बालक मात्र पित्याची आज्ञा पालन करत अक्षुण्ण जागा राहिला. रात्रीची नीरव शांतता आणि ती निस्तब्धता ह्या मूलशंकरांच्या जीवनांत मात्र एका महान नाट्यासम कलाटणी देणारी ठरली. ह्याच वेळी त्या नीरव शांततेमध्ये त्या बालकाने पाहिलं की त्या शिवाच्या पिंडीवर काही उंदरं हालचाल करताहेत. त्या पिंडीवरील तांदुळ ते भक्ष करताहेत. हे पाहून त्या बालकाच्या अंतःकरणांत उठलेल्या प्रश्नांनी त्या बालकांस आत्ममग्न बनविलं. त्याच्या मनांत विचार आला असेल की 


*"इतके दिवस अनेक कथांमधून ऐकत आलो की भगवान शिव हे तर शांतीचे अनुपम प्रतीक. योग्यांचाही योगी अससेला महायोगी, हे तर पाशुपतास्त्रधारी, रुद्रांचेही रुद्र, सर्वांचे महेश्वर, प्रबल प्रतापी, दुर्दान्त-दैत्य-दलनकारी असे हे महादेव त्या चार पाच उंदरांना साधे हटवु शकत नाहीत? आपण जे शिव ऐकले ते हेच का की वेगळे??? जे चालतात, फिरतात, बोलतात, हाती त्रिशुल धारण करतात, डमरु वाजवितात, शाप नि वर दोन्ही देतात, असे ते त्रिनेत्रधारी शिव नक्की आहेत तरी कोण???"*


आपल्या अंतःकरणांतले हे शंकांचे काहूर शांत करण्यासाठी ह्या मूलशंकरने शिवचतुर्दशीच्या रात्री, शिवमंदिरामध्ये, शिवमूर्तीसमोर, आपले महान शिवभक्त पिताश्री श्री कर्शनजींना विचारलं की हे शिव निश्चित आहेत तरी कोण जे स्वतःची त्या उंदरांपासून साधी रक्षा करु शकत नाहीत???


आपल्या पुत्राच्या ह्या प्रश्नाचे समाधान पिता करुच शकले नाहीत पण त्या असमाधानाने सुरु झाला शोध एका आत्मचिंतनाचा, एका आत्मगौरवाचा...!


*एका मूलशंकर नामक बालकाने त्याचवेळी प्रतिज्ञा केली की खऱ्या सत्यनिष्ठ शिवाचं दर्शन मला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी ह्या शिवमूर्तीची किंवा पिंडीची पूजाच करणार नाही...*


एका शिवभक्त कुटुंबामध्ये शिवपिंडीचीच पूजा नाकारणारा हा नास्तिक पुत्रंच जन्माला यावं असंच त्या पित्याला वाटलं असणार तर काय नवल?


पण हा बालक तर आस्तिकांचाही आस्तिक होता, कारण तो निघाला होता एका अनंताच्या प्रवासासाठी...


*तिवारींचा मुलगा निघाला होता आपल्या खऱ्या शिवाच्या अर्थात रुद्राच्या शोधासाठी...आपल्या अंतरात्म्यांतल्या सत्यनिष्ठ शिवाच्या साक्षात्कारासाठी...*


*हा बालक निघाला होता आर्ष ग्रंथांच्या उद्धारासाठी नि वैय्याकरणातला सूर्य होण्यासाठी...*


*हा बालक निघाला होता श्रुतिभास्कर आजीवन अखंड आदित्य बालब्रह्मचारी वेदोद्धारक महर्षि श्रीमद्दयानंद बनण्यासाठी....*


*हा बालक निघाला होता वेदांवरचा सर्वोत्तम भाष्यकार होण्यासाठी, तासन्तास समाधी लावून मगंच वेदार्थ करण्यासाठी...*


*हा बालक निघाला होता प्राचीन आर्यांचा तेजस्वी व गौरवशाली असा वेदरुपी वारसा त्यांना पुन्हा प्रदान करण्यासाठी...*


*हा बालक निघाला हिंदुंना अर्थात आर्यांना त्यांच्या विस्मृत आत्मगौरवाचा साक्षात्कार करून देण्यासाठी...*


*हा बालक निघाला होता हिंदुंना कृण्वन्तो स्वयमार्यं तथा विश्वमार्यंम् हे बनविण्यासाठी...*


अशा ह्या बालकासाठी ही चतुर्दशीची रात्र ठरली ती बोधोत्सव रात्र...आत्मचिंतनासाठी, आत्मस्वरुपाच्या शोधासाठी, आत्मगौरवाच्या पुनर्प्राप्तीसाठी, आत्मसंस्थित होण्यासाठी...


आपणही असा काही बोध आजच्या ह्या पवित्र रात्री घेऊयांत...आपल्यातल्या सत्यनिष्ठ शिवतत्वाला जाणण्यासाठी...


आपल्या मूलतत्वांस जाणण्यासाठी, आपल्यातल्या आत्मस्वरुपास ओळखण्यासाठी...


*(वैधानिक सूचना - प्रस्तुत लेखाचा उद्देश्य मूर्तीपूजेची निंदा करण्याचा किंवा तिला नाकरण्याचा मूळीच नाही. लेख व्यवस्थित वाचावा ही पुनश्च विनंती. न समजल्यांस सोडून द्यावा किंवा आमच्या पुंढील लेखांची वाट पहावी...धन्यवाद)*


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#महाशिवरात्री_बोधोत्सव_महर्षि_दयानंद_वेदोद्धारक_शिवपिंड_भगवानशंकर_रुद्र

No comments:

Post a Comment