Monday 22 June 2020

स्त्रियांचा वेदाधिकार, यज्ञोपवीताधिकार नि गायत्री मंत्राधिकार - आक्षेप नि खंडन


वैदिक स्त्री-दर्शन लेखांक पंचम

आमच्या स्त्रियांचा वेदाधिकार, यज्ञोपवीताधिकार नि गायत्री मंत्राधिकार ह्या लेखांवर आह्मीं दिलेल्या आह्वानाला आमच्या काही सनातनी विद्वान मंडळीकडून प्रतिवाद प्राप्त झालेला आहे, त्याविषयी आह्मीं त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. आमच्यासारख्या एका यःकश्चित मनुष्याचे लेख त्यांनी एवढे मनावर घ्यावेत हा त्यांचा आमच्यावरचा स्नेह नि अनुरागंच मानतो आह्मीं. आणि म्हणूनंच त्यांनी केलेल्या प्रतिवादाची नि आक्षेपांची समीक्षा करण्यासाठी नि त्यांना वेदसंमत उत्तर देण्यासाठी आमचा हा लेखनप्रपंच...!ह्यात कुठेही त्यांचा अनादर करण्याचा हेतु नाही किंवा आह्मांला खूप कळतं असे दर्शविण्याचाही हेतु नाही. हा सरळ संवाद आहे.

*धर्म जिज्ञासमानानां प्रमाणं परमं श्रुतिः।*

हे वचन मनुस्मृतीचं असलं तरी हे सर्व परंपरांमध्ये सर्वमान्य आहे. *ज्याला वैदिक हिंदु धर्मशास्त्राचे प्रामाणिक अध्ययन करायचं आहे, त्याला श्रुती अर्थात वेदांशिवाय अन्य कोणताच मार्ग नाही. नान्यः पन्था विद्यतेऽयनाय ॥ ( यजुर्वेदः ३१-१८)।* ज्यांना अधिक प्रमाण आवश्यक आहे, त्यांनी मनुस्मृतीवरील दहा संस्कृत टीकाकारांच्या टीका तरी अभ्यासाव्यांत. त्यातल्या ९ तरी भारतीय विद्या भवनने प्रकाशित केल्याहेत, ज्या पीडीएफ आंतरजालांवर उपलब्ध आहेत. केवल एका श्रीकुल्लुकभट्टांची टीका पाहुयांत...

 *धर्मं च ज्ञातुमिच्छन्तां प्रकृष्टं प्रमाणं श्रुतिः। प्रकर्षबोधननेच स्मृतिस्मृतिविरोधे स्मृत्यर्थो नादरणीयः इति भावः।* 

*म्हणजे धर्म जाणण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी श्रुति अर्थात वेदंच सर्वोत्तम आहे. जर श्रुति नि स्मृतींमध्ये कुठे विरोध जाणवला तर स्मृतींचा अर्थ आदरणीय नाही अर्थात तो त्याज्य आहे. म्हणजेच अशावेळी श्रुतीच प्रमाण आहे. म्हणजेच स्मृतींपेक्षा श्रुतीच सर्वोच्च प्रमाण आहे.*

पुढे ह्याच श्रीकुल्लुकभट्टांनी प्रमाण सादर केलेलं आहे, ते श्रीजाबालोपनिषदांतलं. ते म्हणतात 

*अतएव जाबालः*-----
*श्रुतिस्मृतिविरोधे तु श्रुतिरेव गरीयसी।*

*जाबाल ऋषि म्हणतात की श्रुति नि स्मृतींच्या परस्परविरोधामध्ये श्रुतीच श्रेष्ठ नि प्रमाण आहे.*

आमच्या एका उपरोक्त श्रीमनुमहाराजांच्या वचनाच्या शीर्षकाधारित लेखामध्ये आमच्या ह्या श्रुतीमान्यतेची व्याख्या आह्मीं स्पष्ट केलेली आहे. जिज्ञासूंनी ती

http://pakhandkhandinee.blogspot.com/2019/10/blog-post_9.html?m=1

इथे अभ्यासावी ही नम्रतेची विनंती! 

वास्तविक आमच्या *पुराकल्पेषु तु नारीणां* ह्या श्लोकातंच आह्मीं कल्प शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. हे जे लोक त्याचा इतिहासपरक असा मागील कल्पातला अर्थ घेतात, त्यांचा तो अर्थ चुकीचा आहे हे आह्मीं सप्रमाण सिद्ध केलंय तेही अनेक प्रमाणांनी. आता त्यांचा हा इतिहासपरक अर्थ क्षणभर प्रमाण जरी मानला तरी त्यातून पूर्वी तो वेदाधिकार स्त्रियांना होता हेच स्पष्ट होते. आता तो अधिकार होता ह्याचाच अर्थ असा श्लोक रचणाऱ्यांना धर्मशास्त्राचे यथोचित ज्ञान होते हे अभिप्रेत आहेच. पुराकल्पेषु ह्याचा अर्थ मागील कल्पांत तो होता असा क्षणभर अर्थ घेतला तरी ह्याचा अर्थ हाच आहे की मागील कल्पांत तसा वेदमंत्र असायलाच हवा...!कारण वेदमंत्राच्या अर्थात श्रुतीच्या आधाराशिवाय असा अधिकार कसा असेल???

आणि हा जगन्मान्य सिद्धांत आहे की आज आपल्याला उपलब्ध असलेले वेद हे मागील कल्पांतलेच वेद आहेत. कारण आमच्या नित्याच्या संध्येमध्ये आह्मीं जो ऋग्वेदांतला मंत्र आसेतुहिमाचल म्हणतो तो असा

*सू॒र्या॒चं॒द्र॒मसौ॑ धा॒ता य॑थापू॒र्वम॑कल्पयत् । दिवं॑ च पृथि॒वीं चां॒तरि॑क्ष॒मथो॒ स्वः॑ ॥*
ऋग्वेद - १०।१९०।३

ह्या ऋग्वेदवचनानुसार ईश्वर अर्थात तो धाता गतकल्पात जशी सूर्यचंद्रपृथिव्यादि सृष्टी निर्माण करतो, तशी ती ह्या कल्पातही आहे तशीच करतो. आणि त्या कल्पातले वेदही त्याच अनुपूर्वीसहित ह्याच कल्पात आहे तसे प्रकट होतात. म्हणजेच आजचे वेद तर मागील कल्पांत जे होते, ते आहे तसेच ह्या कल्पांतही प्राप्त आहेत. म्हणजेच ह्या आज आपणां सर्वांस उपलब्ध असलेल्या वेदांनाच प्रमाण मानणं आपल्या सर्वांना क्रमप्राप्त आहे. ह्याविषयी संदेह असण्याचे काहीच कारण नाही.

जर त्याच कल्पातले वेद ह्या कल्पांतही आहे तसेच प्रकट झाले आहेत, तर ह्या वेदांमध्येच स्त्रियांचा वेदाधिकार सिद्ध करणारे मंत्र असलेच पाहिजेत. 

इथे जाता जाता एक स्मरण 

*आमच्या उपरोक्त *पुराकल्पेषु तु नारीणां श्लोकावरील लेखांवर संवाद करताना एकाने तो श्लोकंच प्रक्षिप्त आहे असे अतिसाहसी विधान केलं. म्हणजे एरवी प्रक्षेप शब्द उच्चारला की ईंगळी डसल्याचा अनुभव करणारे हे लोक सोयीस्कर कशी प्रक्षेप संकल्पना स्वीकारतात ते पहा.*

*आणि हो काही ठिकाणी हा श्लोक पुराकल्पेषुच्या ऐवजी पुरायुगेषु असाही आला आहे. वाटल्यास यावर सविस्तर पुन्हा येईन.*

अस्तु। 

आता स्त्रियांना वेदाधिकार नाकारणाऱ्या ह्या स्वतःस सनातनी म्हणविणाऱ्या आक्षेपकांचा वैचारिक गोंधळ पहा...प्रस्तुत लेखक अर्थात आह्मींही सनातनीच आहोत परंतु काही प्रामाणिक मतभेद आहेत इतकंच. आता ह्यांच्याह्यांच्यातंच ह्या विषयांत किती मतभेद आहेत ते पहावे ही विनंती...!

*एक जण म्हणतो स्त्रियांना मूळीच वेदाधिकार नाही. दुसरा म्हणतो वेदकालीन ऋषिकांनाच तो केवल अधिकार होता की ज्या अत्यंत अधिकारी होत्या. तिसरा म्हणतो की हारित धर्मसूत्रानुसार (२१।२०।२४) ब्रह्मवादिनी नि सद्योवधु असे स्त्रियांचे दोन प्रकार असून केवळ ब्रह्मवादिनी स्त्रियांनाच तो अधिकार आहे. सद्योवधुंना तो नाही. इथे ब्रह्मवादिनी म्हणजे आजीवन अखंड ब्रह्मचर्य पालन करणाऱ्या नि वेदाध्ययन करणाऱ्या स्त्रिया. आणि सद्योवधु म्हणजे विवाहसंस्कार करणाऱ्या गृहस्थाश्रमी स्त्रिया. असे ह्यांचे मत आहे. वास्तव काय ते आपण पुढे पाहुच. चौथा असे म्हणतो की उर्वशी आदि अधिकारी स्त्रियांनाच केवळ एकदेशी अधिकार आहे. आता एकदेशी काय हे त्यांचे त्यांनाच ज्ञात. पांचवा म्हणतो की मैत्रेयी आदि स्त्रिया केवल ब्रह्मचिंतनापूरताच अधिकारी होत्या, त्यांनाही वेदाधिकार नव्हता. सहावा म्हणतो विवाहापश्चात स्त्रियांना केवळ काही विशिष्ट मंत्र म्हणण्याचाच अधिकार प्राप्त होतो. पूर्ण वेदांचा अधिकार त्यांना नाही ह्मणें. सातवा म्हणतो आमच्या गुरुचरित्रांत वेदाधिकार नाकारलाय म्हणें. आठवा म्हणतो विवाह हेच स्त्रीचं उपनयन आहे म्हणे. नववा म्हणतो विवाहवेळी यज्ञोपवीताचा अधिकार प्राप्त होतो तो केवळ पतींबरोबर दैनिक नित्य यज्ञ करण्यासाठी. दहावा म्हणतो नाही ते यज्ञोपवीत नसून ते यज्ञोपवीतासारखे वस्त्र नेसतात.*

आता जर ह्यांच्याच मतानुसार स्त्रीला उपनयनाचाच अधिकार नाही, तर तिचा विवाहतरी तिचं उपनयनंच कसं काय सिद्ध होऊ शकतं??? किती गोंधळंय पहा.

आता असे पहा की हे लोक उपनिषदांनाही अपौरुषेय वेद मानतात. मन्त्रब्राह्मणयोर्वेदनामधेयं म्हणे. ह्याची तर्ककठोर समीक्षा आह्मीं आमच्या वेदपरिचय चिंतनमालेमध्ये केलीच आहे. लेखमालाही आधी लिहिली आहे. पुढेही करुच पण तो स्वतंत्र विषय आहे. अस्तु। 

*ब्राह्मणग्रंथ-उपनिषदं-आरण्यकांमध्ये वेदमंत्रांचेच भाष्य आहे. आणि स्त्रियांना जर वेदाधिकार नाहीच, तर मग उपनिषदांमध्ये काही स्त्रिया वेदमंत्रोच्चारण करताना कशा काय दिसतात???*

तर ह्यावर ह्या लोकांचे उत्तर वर पांचव्यात दिलंय. हे त्यांचे उत्तर आहे, आमचं नाही.

*ह्यावरूनंच ह्या स्वतःला सनातनी म्हणविणाऱ्यांमध्येच स्त्रियांच्या वेदाधिकारांविषयी कशी एकवाक्यता नाही हे लक्ष्यीं येते...!*

ह्यात कुठेही ह्या लोकांचा अवमान करण्याचा हेतु नाही...!

आता हे ह्यांचे असे वर्तन का होते???

ह्याचे कारण एकंच आहे की हे लोक स्वतःला नुसतंच वेदप्रामाण्यवादी म्हणून मिरवितात परंतु प्रमाण मानताना हे मधील काळांत निर्माण झालेल्या प्रक्षेपांना प्रमाण मानतात जिथे हा निषेध सांगितलेला असतो. आता हे प्रक्षेप कशावरून ते आह्मीं पुढे येणारंच आहोत. पण जेंव्हा आह्मी ह्यांस विचारतो की स्त्रियांचा वेदाधिकार नाकारणारा एक तरी मंत्र वेदांच्या संहितांमध्ये दाखवा. तर ह्यातल्या एकालाही वेदमंत्रांचे सादरीकरण अद्याप एकदाही करता आलेलं नाही नि येणारही नाही.

गेली तीन वर्षे आह्मीं एकंच प्रश्न ह्या सर्वांना विचारत आलो आहोत की 

*स्त्रियांना वेदाधिकार नाकारणारा असा निषेधात्मक एकतरी वेदमंत्र आह्मांस चारवेदांच्या संहितांमध्ये दाखवा...*

*गेल्या तीन वर्षांत एकालाही हा मंत्र अद्याप सादर करता आलेला नाही.*

*तीनंच नव्हे तर गेली दीडशे वर्षे आर्यसमाजाच्या वतीने ह्या कथित सनातनी विद्वानांना हा प्रश्न विचारण्यांत आलेला असूनही ह्या दीडशे वर्षांत एकालाही असा मंत्र सादर करता आलेला नाही.*

*कारण कारण कारण...*

*असा एकही निषेधात्मक मंत्र वेदांच्या संहितांमध्ये नाहीच नाही. अहो असला तर सादर करणार ना???*

*जे नाहीच ते दाखवणार तरी कुठून?*

*आणि म्हणून हे लोक आधार घेतात ते परवर्ती प्रक्षेपयुक्त स्मृतींचा. की ज्या वेदबाह्य असल्याने त्याज्य आहेत. ज्या मनुस्मृतीला हे अगदी प्रमाण मानतात, अगदी प्रक्षेपरहित मानतात, त्याच मनुस्मृतीमध्ये*

*या वेदबाह्याः स्मृतयः याश्च काश्च कुदृष्टयः।*

असे वचन आहे. म्हणजेच ज्या स्मृत्या वेदविरुद्ध आहेत, त्या त्याज्य आहेत असे स्पष्ट मांडलं आहे. ह्या स्मृतीसंदर्भांवर आह्मीं ह्या लेखमालेत स्वतंत्र येणारंच आहोत. पण तत्पूर्वी...

आता ह्यावर हे लोक आह्मांस आवाहन करतात की मग वेदमंत्रांमध्येच स्त्रियांना वेदाधिकार आहे हे दाखविणारा एकतरी मंत्र सादर करा. तर ह्या लोकांच्या ह्या आज्ञेंस ह्मणा की आह्वानांस ह्मणां मान्य करून आता आह्मीं वेदमंत्रांतलेच स्त्रियांचा वेदाधिकार, यज्ञोपवीताधिकार नि गायत्र्यादि मंत्राधिकार सिद्ध करणारे प्रमाण सादर करणाराहोत. आज सायंकाळपासून लेख येतीलंच.

ह्या आगामी लेखमालेत आह्मीं निम्नलिखित संदर्भ सादर करणाराहोत 

लेखांक क्रमांक ६ - वेदमंत्रांच्या आधारे वेदाधिकार, यज्ञोपवीताधिकार, गायत्रीमंत्राधिकार 

लेखांक क्रमांक ७ - ब्राह्मणग्रंथ-उपनिषदं-आरण्यकांच्या आधारे...

लेखांक क्रमांक ८ - वेदाङ्गे, षट्दर्शने ह्यांच्या आधारे

लेखांक क्रमांक ९ - श्रौतसुत्रं, गृह्यसूत्रांच्या आधारे 

लेखांक क्रमांक १० - स्मृतिविमर्श 

लेखांक क्रमांक ११ - रामायण-महाभारत-पुराणादि नि अन्य ऐतिह्य संदर्भांच्या आधारे 

लेखांक क्रमांक १२ - उपरोक्त सर्व लेखांवरील शंका समाधान नि समारोप 

अशा प्रकारे ही लेखमाला येणार आहे.

हे सर्व लिहिण्याचा उद्देश्य किंवा अट्टाहास हा कुणाची निंदा करण्याचा मूळीच नाही. सत्यशोधन व्हावं हा हेतु आहे.

भवदीय...

पाखण्ड खण्डिणी 
Pakhandkhandinee.blogspot.com

#स्त्रियांचा_वेदाधिकार_यज्ञोपवीताधिकार_गायत्री_मंत्राधिकार_उपनयन_वेदश्रुतिस्मृतिविमर्श

No comments:

Post a Comment