Tuesday 9 March 2021

श्रीसमर्थांची तथाकथित 'पत्नी' आणि समाजमाध्यमं...



चौथा अत्यंत साक्षेप|फेडावे नाना आक्षेप|अन्यायें थोर अथवा अल्प|क्षमा करीत जावे||

दशक - ११, समास ५


समाजमाध्यमांवर काय प्रसृत करावं आणि करु नये ह्याचा विवेक दुर्दैवाने आह्मीं गमावून बसलोय. दिसला एखादा संदेश की कर गावभर...


त्यातून कोणत्याही आजीवन अखंड ब्रह्मचर्य पालन केलेल्या सत्पुरुषांस अट्टाहासाने कुणीतरी पत्नी होती असे दाखवायचा एक प्रयत्न फार असतो. म्हणजे आधी श्रीहनुमंतांस सूर्यानावाची एक पत्नी बळंच दाखवून झाली. दक्षिणेत ह्मणें त्या दोघांचं मंदीरही आहे. किती दुर्भाग्य! पुढे श्रीभीष्माचार्यांसही विवाहित दाखविण्याचा अट्टाहास भांडारकर वगैरे एतद्देशीय विद्वानांनीच केला. आता राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदासांची न झालेली पत्नी दाखविण्याचा प्रयत्न सुरु आहे.


नुकतीच श्रीदासनवमी झाली व काल योगायोगाने आतंरराष्ट्रीय महिला दिवसही झाला. म्हणूनंच की काय कुणाला तरी समर्थांच्या तथाकथित पत्नीसंबंधी वाट्टेल ती कथा प्रसृत करण्याचा मोह झाला असावा.


*मूळात जिच्याशी समर्थांचा विवाहच झाला नाही ती पत्नी कशी? तिचा उल्लेख नियोजित वधु असाच करायला हवा...! पण व्याकरणाचा गंधही नसणाऱ्यांना हे कुठून कळणार???*


सांप्रत समाजमाध्यमांवर एक निनावी लेख प्रसृत होतो आहे ज्यात श्रीसमर्थांच्या तथाकथित पत्नीसंबंधी वाट्टेल ती भाकडकथा प्रसृत केली जाते आहे जिला समर्थ साहित्यात तर काडीमात्र आधार तर नाहीच पण ती कथा इतकी विपर्यस्त आहे की ती चीड आणणारी तर आहेच आहे पण अत्यंत हास्यास्पद आणि खोटी आहे हे वाचल्याक्षणीच ओळखु येते. असा नतद्रष्टपणा लेखकाला का करावासा वाटला हे तेच जाणो....


वास्तविक ज्यांनी श्रीसमर्थांच्या चरित्राचे अध्ययन केलेलं आहे, त्यामध्ये प्रामुख्याने श्री गिरीधरस्वामींचा समर्थप्रताप, आत्माराम महाराजांचा दासविश्रामधाम वगैरे ग्रंथ संदर्भग्रंथ म्हणून अत्यंत विश्वसनीय आहेत. ज्येष्ठ समर्थभक्त कै. आदरणीय गुरुवर्य श्रीसुनीलजी चिंचोलकरांनी त्यांच्या 'चिंता करितो विश्वाची' ह्या चरित्र ग्रंथामध्ये श्रीसमर्थांच्या विवाहसंबंधी व त्या नियोजित वधुच्या पुढील विवाहासंबंधी विस्तृत विवेचन केलं आहे. त्याचा सांराश असा


"गिरीधरस्वामींच्या समर्थप्रतापमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की समर्थांचे अंतःकरण हे जात्याच वैराग्यप्रवण असल्यामुळे त्यांच्या विवाहसंबंधी चार वेळा स्थळे दाखविण्याचा प्रयत्न झाला जो त्यांनी मूलींच्या पित्याशी बोलूनंच त्यांस नकार देत किंवा त्यांना आपल्या वैराग्यप्रवणतेविषयी सांगून पटवून दिले. ह्यातून समर्थांवर जो आक्षेप घेण्यात येतो त्याचे आपोआप निराकरण होते. पुढे समर्थांच्या मामाच्या मूलीशीच जो त्यांचा विवाह त्यांच्या मातुःश्रींनी ठरविण्याचा अट्टाहास मांडला, ते मामा भानजी गोसावी हे होते. समर्थांनी ऐन विवाहप्रसंगी आपल्या नियोजित वधुचा अव्हेर करून विवाह मंडपातून धुम ठोकली व ते तिथून पसार झाले. आता त्या कन्येचे पुढे काय झालं ह्याचे उत्तर देताना हनुमंत स्वामींच्या बखरीत उल्लेख आहे की तिचा विवाह तिथल्याच तिथे एका बीजवराशी करण्यांत आला. समर्थ अचानक असे बेपत्ता झाल्याचे कळतात लग्नमंडपात उडालेल्या हाहाःकाराला शांत करण्यासाठी गंगाधरपंतांनी मूलीच्या वडिलांना सांगून तिथेच आवाहन करून उपस्थित असलेल्या अंबडच्या देशमुखांशी तिचा विवाह लावला. बीजवर म्हणजे काय तर ज्याची पत्नी सात वर्षाची असतानाच वारली असा तो. त्यामुळे अंबडच्या देशमुखांच्या बीजवर मुलाशीच तिचा विवाह तिथेच लावण्यात आला."


ह्याचाच अर्थ समाजमाध्यमांवर प्रसृत होणारी जी कथा आहे ज्यामध्ये ती कन्या पुढे तशीच अविवाहित राहिल्याचा व अगदी छत्रपती शिवरायांना ती भेटल्याचा, सैन्यनिर्माण केल्याचा व अगदी समर्थांशीही पाच मिनीटं भेट घेतल्याचा अत्यंत बालिश उल्लेख केला आहे, ती अत्यंत खोडारडी तर आहेच पण तर्कदुष्टही आहे....!


असे संदेश प्रसृत करणाऱ्यांवर समाजाने बहिष्कारंच घातला पाहिजे किंवा नैर्बंधिक कृती तरी करायला हवी...


काही जण आक्षेप घेतील की एवढं अट्टाहासाने ह्यावर लिहायचं काय कारण तर आह्मीं सांगु इच्छितो की महापुरुषांविषयी अशा भाकडकथाच पुढे रुढ होत जातात व त्या आख्यायिकेचे रुप धारण करून लोकांना त्याच सत्य वाटायला लागतात. म्हणूनंच योग्य वेळीच त्यांचं खंडन आवश्यक आहे.


लेखासहित आह्मीं गुरुवर्य श्री सुनीलजींच्या त्या चरित्राची पृष्ठे जोडली आहेत ती वाचकांनी वाचावीत ही विनंती. ती आह्मांस आमचे मित्र समर्थभक्त श्री महेश फणसळकरांनी पाठविली त्याविषयी त्यांचे आभार...


अस्तु। 


श्रीसमर्थांसारख्या राष्ट्रपुरुषाविषयी अशा भाकडकथा प्रसृत करण्यांस श्रीसमर्थंच सद्बुद्धी देवोत हीच त्यांच्याचरणी प्रार्थना...!


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#श्रीसमर्थरामदास_चरित्र_त्यांची_तथाकथित_नियोजित_वधु_अंबडचे_देशमुख

No comments:

Post a Comment