Wednesday 1 May 2024

महाराष्ट्र शब्दाचा इतिहास....

 


आज महाराष्ट्र दिन ! 

चार वर्षांपूर्वी महाराष्ट्री भाषेचा इतिहास नामक लेखात आह्मीं महाराष्ट्री अर्थात मराठी भाषेच्या संबंधाने काही मांडलेलं होते, तरीही पुनश्च महाराष्ट्र शब्दाच्या विस्ताराने!  

ब्रिटीशांनी मांडलेला विभाजनकारी आर्याक्रमण सिद्धांत ते गेल्यावरही पद्धतशीरपणे इतिहासलेखनाच्या माध्यमातून रेटण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात अत्यंत नेटाने होताना दिसतोच, त्यात संस्कृत भाषेविषयीचा द्वेष जसा ठासून भरलेला आहे, तसा कथित मूळनिवाशीवादाचा व परकीय आर्य म्हणजे पूर्वी ब्राह्मण व आता गेल्या काही दशकांत क्षत्रिय व वैश्यही परकीय आर्य आहेत असे रेटण्याचा प्रयत्न सातत्याने भारत विखंडन शक्तींकडून सुरुच आहे, त्याचाच एक प्रयत्न म्हणजे महाराष्ट्र शब्दाची व्युत्पत्ती नि इतिहास !

संस्कृत प्राकृतपासून झाली हा विकृत सिद्धांत त्याचेच अपत्य यद्यपि या आरोपाचं सप्रमाण खंडन आह्मीं मागे संस्कृत-दिनाच्या त्रिदिनात्मक फेबु लाईव्ह व्याख्यानमालेत केलंच आहे.

महाराष्ट्र हा शब्द मूलतः संस्कृतंच आहे.

पण भारत विखंडन शक्तींकडून व त्यांच्या विखारवंताकडून महाराष्ट्र हा शब्द महार+राष्ट्र असा तयार झाल्याच्या हास्यास्पद उत्पत्ति दिल्या जातात, त्याचं कारण आमचे हिंदु महार बांधव हे इथले मूळनिवासी आहेत व संस्कृत बोलणारे आर्य बाहेरचे ही छुपी आर्याक्रमण थेअरी रेटण्याचा त्यांचा अजेंडा ! 

डॉ. जॉन विल्सनने त्याच्या मोल्सवर्थ शब्दकोशामध्ये सर्वप्रथम महार राष्ट्र ते महाराष्ट्र अशी अत्यंत खोटारडी व्युत्पत्ती दिली, त्यांनाच बुद्धी गहाण टाकलेल्या राजवाडे, भांडारकर, शं बा जोशी वगैरे भले उजव्या असलेल्यांनी सुद्धा महारठ्ठ पासून संस्कृत महाराष्ट्र झाले असे हास्यास्पद तर्क केले आहेत, राजाराम शास्त्री भागवतांनी तर महारथीपासून महाराष्ट्र अशी व्युत्पत्ति दिलीय जी भले संस्कृत व्युत्पन्न वरवरपाहता वाटत असली तरी चुकीची आहे. शं बा जोशींनी तर कानडी मरहट्ट - झाडीमंडळ पासून महाराष्ट्र झालाय असे लिहिलंय.

भल्या भल्या विद्वानांचे हे लिखाण त्यांच्या संस्कृत भाषेच्या सिद्धांताचं अज्ञान दर्शवितं. 

हे सर्व अभ्यासक का चुकले आहेत ते सिद्ध करण्यासाठीच हा लेख आहे.

आह्मीं मागे लिहिलंय की मूळात वैदिक संस्कृत भाषेचा विस्तार किंवा विकास न होता पुढे अपभ्रंश, ह्रास आदि मार्गांनी ती संकुचित होत जाते हा मूळचा वैदिक सिद्धांत आहे, पण डार्विनच्या विकासवादाने अंध झालेली मागील दोन शतकांतली मेकॉलेपुत्रांची व अभ्यासकांची पिढी, त्यातली काही अपवाद अशी भले आर्याक्रमण नाकारणारी व शुद्ध भारतीय विचारधारेची असली तरीही पाश्चात्य इंडॉलॉजिस्टच्या 'आधुनिक तुलनात्मक भाषाशास्त्राध्ययनाच्या' (कंपेरिटिव्ह फिलॉलॉजी) डार्विनप्रणीत सिद्धांतांना भूललेली असल्याने तिला संस्कृत-प्राकृत भाषेच्या वस्तुनिष्ठ इतिहासाचं ज्ञानही नसणं हे स्वाभाविक आहे.

वस्तुतः मागेही लिहिलंय की आपल्या प्राचीन वैदिक नि तत्सम परवर्ती संस्कृत वाङ्मयामध्ये भाषेच्या उत्पत्तीचा, तिच्या विस्ताराचा, ह्रासाचा, संस्कृत-प्राकृत संबंधाचा इतिहास अत्यंत सुस्पष्टपणे नि साद्यंत मांडलेला असूनही आह्मांला तो वाचावासा वाटत नाही, कारण आमची बुद्धी डार्विनने ग्रासली असल्याने ! यासंबंधी कोणतं साहित्य अभ्यासायला हवं असा एक लेख मागे संक्षेपात लिहिलाच आहे, जिज्ञासूंनी तो फेबुवर शोधावा. त्यामुळे इतकं स्फटिकासमान स्वच्छ असं वाङ्मय आपल्याकडे असताना त्याच्याकडे केवळ ते 'ब्राह्मणी साहित्य' आहे अशी भ्रामक समजूत करत त्याची हेटाळणी करून आपला व जगाचा भ्रम वाढविणे हे हिताचं आहे का याचा ज्याचा त्याने विचार करावा!

महाराष्ट्र हा शब्द मूलतः संस्कृतंच आहे आणि पुढेच त्याचा अपभ्रंश महारट्ट आदि शब्दांमध्ये झालेला आहे हे संस्कृत साहित्याचा परामर्श घेतलं की सहज लक्ष्यीं येते, त्यासंबंधीचं आरंभी उल्लेख केलेल्या लेखातलं काही विवेचन !

वैदिक संस्कृतपासून उद्भवलेल्या किंवा विकार पावलेल्या प्राकृतभाषांमध्ये सर्वप्रथम जिचा आविष्कार झाला, ती म्हणजे शौरसेनी प्राकृत. ह्या शौरसेनी प्राकृतचे पुढे जे तीन प्रमुख भेद झाले, त्यामध्ये महाराष्ट्री ही प्रथम असून मागधी नि पैशाची ह्या दोन पश्चातच्या आहेत. प्राकृतभाषांच्या अध्ययनासाठी जो सर्वात प्रथम नि अधिकारी ग्रंथ असा जो उपरोक्त भरतमूनींचा नाट्यशास्त्र नावाने सुपरिचित आहे, ज्याचा कालावधी महाभारतकालाच्या पूर्वीचा आहे, त्या ग्रंथामध्ये १७।४८ येथे नाट्याचार्य श्रीभरतमूनींनी

सर्वास्वेव हि शुद्धासु जातिषु द्विजसत्तमाः।

शौरसेनीं समाश्रित्य भाषां काव्येषु योजयेत्।

असे म्हटलंय. विक्रम संवत पूर्व पांचव्या शतकांतले महान मीमांसक श्रीकुमारिल भट्टपाद हे त्यांच्या तंत्रवार्त्तिक ह्या अत्यंत प्रसिद्ध ग्रंथामध्ये

मागध-दाक्षिणात्य-तदपभ्रंशप्रायासासाधुशब्दनिबन्धिना।

असे म्हणतात. इथे मागधी व दाक्षिणात्यावरून महाराष्ट्री अथवा जैनीचा अभिप्राय श्रीकुमारिलभट्टांस आहे असे लक्ष्यीं येते. अपभ्रंशही आहे.

महाकवी श्रीदंडीचा काव्यादर्श मधील संदर्भ

ज्याचे पदलालित्य प्रसिद्ध आहे, असा श्रीदंडी त्याच्या काव्यादर्श ह्या ग्रंथामध्ये महाराष्ट्री अर्थात मराठीविषयी जे लिहितो  महत्वाचे आहे.

महाराष्ट्राश्रयां भाषां प्रकृष्टं प्राकृतं विदुः।

सागरः सूक्तिरत्नानां सेतुबन्धादि यन्मयम्।

महाराष्ट्रामध्ये बोलली जाणारी भाषा हींस लोक प्रकृष्ट प्राकृत समजतात. ह्यामध्ये सूक्तीरुपी रत्नांचा सागर आहे ज्यात सेतुबंध नावाचे काव्य रचलं गेलंय.

ह्या सेतुबंधग्रंथाच्या टीकेमध्ये रामदास नामक लेखकाने 'महाराष्ट्रभाषायां' असा शब्दप्रयोग केला आहे. कर्पुरमञ्जिरी ह्या ग्रंथामध्येही शौरसेनी व महाराष्ट्री दोन्हींचा उल्लेख आहे.

प्राकृतभाषेच्या बव्हतांश सर्व वैय्याकरणींनी एकमुखाने महाराष्ट्रींस सर्वोत्तम प्राकृत मानलं आहे आणि मुख्यतः तिचेच नियम दिले आहेत. विस्ताराने ह्यावर पुढे लिहुच.

पुरुषोत्तम नावाच्या व्याकरणकाराने त्याच्या 'प्राकृतानुशासन' नावाच्या ग्रंथामध्ये ११।१ येथे शौरसेनी व महाराष्ट्री अर्थात मराठी दोन्ही एकंच आहेत असे प्रतिपादन केलं आहे. आपल्याला अभिमान हवा की संस्कृतला सर्वांत जवळ भाषा कोणती असेल तर ती मराठी आहे. एक मराठीभाषिक म्हणून, महाराष्ट्रीय म्हणून आपल्या मातृभाषेच्या निर्मितीसंबंधी काहीसं चिंतन आवश्यक आहे म्हणून हा लेखनप्रपंच.

महाराष्ट्र शब्दाचे शिलालेखीय संदर्भ

महाराष्ट्राचा प्राचीन उल्लेख मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील एरणगावच्या स्तंभ लेखांमध्ये सापडलेला आहे, त्यामध्ये इसवी सन ३६५ मध्ये श्रीधरवर्म्याचा आरक्षित व सेनापती सत्यनाग याने स्वतःला 'महाराष्ट्रीय' असे संबोधले आहे.

याबरोबरच एक उल्लेख वराहमिहीराच्या बृहत्संहितेमध्ये आढळतो, या ग्रंथांमध्ये 'भाग्ये रसविक्रयिणः पण्यस्त्रीकन्यका महाराष्ट्राः।' असा आहे.

वराहमिहीराचा काळ काही विद्वान ६वं शतक समजतात पण तो त्याआधीचा आहे. तो इसवी सन पूर्व १लं शतक न्यूनतम आहे.

ऐहोळचा शिलालेख (इसवी सन पूर्व २७)

रविकीर्तीच्या या शिलालेखामध्ये सत्याश्रय पुलकेशीच्या संबंधाने 'त्रि-महाराष्ट्रिका' असे शब्द आहेत. हा शिलालेख न्यूनतम इसवी सन पूर्व २७ असा आहे.

सांगायचं तात्पर्य इतकंच की महाराष्ट्र शब्द मूळ संस्कृतंच असून तो प्राकृतपासून झालेला नाही...!

आज महाराष्ट्रदिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा!


भवदीय,

पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com

#महाराष्ट्र_शब्दाचा_इतिहास_अर्थ_व्युत्पत्ती_संस्कृत_प्राकृत

Saturday 20 April 2024

चर्मण्वती/चंबळ नदीचा वास्तविक अर्थ


चर्मण्वती किंवा चंबळ नदीचं नाव गाईच्या चामड्यावरून, गोमांसावरून पडलं आहे काय???

९ वर्षांपूर्वी जेव्हा पाखण्ड खण्डिणी नावाने ब्लॉग सुरू केला, तेव्हाच खरं तर यावर लिखाण करून झालेलं आहे पण पुन्हा पुन्हा हिंदुधर्म, संस्कृती आणि परंपरा यावर आक्षेप घेणाऱ्यांची वावटळ उठते आणि म्हणून ती शांत करण्यासाठी पुन्हा पुन्हा आह्मांस लेखणी हातात घ्यावी लागते....

कुणीतरी लिहिलंय म्हणे की चर्मण्वती किंवा चंबळ नदीचे नाव हे राजा रंतिदेवाच्या यज्ञांमध्ये रोजच्या २००० गाईंच्या आणि २००० अन्य पशुंच्या रोज केल्या जाणाऱ्या हत्येवरून आणि त्याचं मांस किंवा चामडं धुतल्या जाणाऱ्या पाण्यावरून निर्माण झालेल्या नदीरुपाने पडलंय म्हणे!

याचं सप्रमाण खंडन👇👇👇

मूळात व्याकरणानुसार “चर्मण्वती' हे पद 'चर्मन् + वत् + ई असे बनतं.

मराठीत आपण चर्म शब्द चामडं या अर्थाने घेतो हे बरोबर आहे पण संस्कृत शब्दांचे धात्वर्थानुसार एकापेक्षा अनेकार्थ होतात व प्रकरणानुसार ते घ्यावे लागतात यावर मागे अनेकवेळा लिहून झालंय, जुने लेख शोधावेत, त्यामुळे एकच अर्थ घेतल्याने अनर्थ ओढवतो कसा ते पाहुयांत. वस्तुतः आपल्या पूर्वजांना याची जाणीव होती म्हणून त्यांनी फार आधीच या भ्रमाचं निरसन करून ठेवलंय. उणादि कोश या व्याकरणकोशामध्ये चर्म शब्दाचा वास्तविक अर्थ आहे- 

चरति गच्छन्ति येन तत्‌ चर्मः।
( उणादि कोष ८।११५)

ज्याने पुढे जातो, कीर्तींस प्राप्त होतो असं ते चर्म ! इथे चर्म शब्दाचा चामड्याशी किंवा गायीच्या मांसाशी किंवा चामड्याशी किंवा त्याला धुतल्या जाणाऱ्या पाण्याशी काहीही संबंध नाही बरंका !

या विकृत आरोपाचं मूळ कुठंय???

हिंदुद्वेष्ट्या मार्क्सवादी विचारवंत राहुल सांस्कृत्यायनांचे 'व्होल्गा ते गंगा' हे विकृत पुस्तक

ज्या महाभारतातल्या राजा रंतिदेवाच्या संदर्भाने ही गोष्ट सांगितली जाते, तो रंतिदेव नावाचा राजा म्हणे यज्ञामध्ये रोज २००० गायी व २००० अन्य पशु रोज ब्राह्मणांसाठी कापून त्यांचं मांस त्यांना खायला देत असे म्हणे व ते मांस किंवा त्यावरचं चामडं धुताना जे पाण्याचे पाट वाहिले, ती म्हणे चर्मण्वती नदी !

कदाचित राहुलजी व त्यांचे मानसपुत्र आक्षेपक हा प्रसंग रोज पहायला गेले असावेत किंवा समय यंत्र म्हणजे टाईम मशीन असावं त्यांच्याकडे !

दुर्दैवाने हाच आरोप आहे तसा मूळ महाभारताच्या एखाद्या श्लोकाचाही कुठलाही संदर्भ न देता The History and Culture of Indian People खंड द्वितीय पृष्ठांक ५७९वर केला गेला आहे. कुठलाही संदर्भ न देता!

मला एक सांगा रोज २००० म्हटलं तर त्याच्यासाठी पाणी किती लागेल बरं इतकं मांस रोज खाल्ल्यानंतर ते ब्राह्मण लोक किंवा कोणताही माणुस जिवंत राहु शकेल का? कुणी कितीही अट्टल मांसाहारी असला तरी त्याने रोज गोमांस हजारो किलोने खाऊन दाखवावं बघु. राहुलजींसारख्या आक्षेपकांनी रोज किलोभर तरी खावं.

बरं मूळात हा भारतदेश, इथलं वातावरणही पाश्चात्य राष्ट्रांसारखं मांसाहार पचवायसाठी अनुकूल नाही. तिथंही ते कितपत पचत असेल ते मांसाहार करणारेच जाणोत. यात कुठेही मांसाहाऱ्यांची निंदा किंवा तुच्छता अभिप्रेत नाही.

बरं दिवसाला २००० म्हणजे वर्षभरात गोवंश अख्खा आणि पशुवंश पूर्ण नष्ट होऊन जाईल म्हणजे व्यावहारिक दृष्टीने विचार केला तरी हे विधान अत्यंत बालिशपणाचं आणि अत्युक्तीचं वाटतं.

पण 'व्होल्गा ते गंगा' हा ग्रंथ लिहिणाऱ्या मार्क्सवादी विचारवंत राहुल सांस्कृत्यायनजींना याचा थोडाही विवेक सुचला नाही, त्यांनी लिहिलं की ह्मणें

राजा रंतिदेवाकडून अशा दररोजच्या २००० गाईंच्या आणि अन्य २००० पशुंच्या मांसांने किंवा चामड्याने धुतल्या जाणाऱ्या पाण्याने ही चर्मण्वती नावाची नदी तयार झाली म्हणे व तिने रंतिदेवाला कीर्ति प्राप्त झाली म्हणे...

वास्तविक पाहता महाभारतामध्ये रंतिदेवाला कीर्ती म्हणजे नावलौकिक कोणत्या कारणामुळे प्राप्त झाला हे स्पष्ट सांगताना म्हटलेलं आहे की त्याने अनेक ऋषीमुनींना आणि ब्राह्मणांना कंदमुळे, फळे, अन्न, गायी, बैल वगैरे यांचे दान केलं म्हणून तो कीर्तीस प्राप्त झाला, यात कुठेही मांस दिल्यामुळे किंवा गोमांस दिल्यामुळे तो कीर्तींस पावला असे पुसटसंही म्हटलेलं नाही...

तो श्लोक असा आहे

रन्तिदेवेन लोकेष्टा सिद्धिः प्राप्ता महात्मना।
फलपत्रैरथो मूलैर्मुनीनर्चितवांश्च सः।

महाभारत शांतिपर्व अध्याय २९२

इथे रंतिदेवांस प्राप्त झालेली कीर्ती ही त्याने ऋषिमुनींना दिलेल्या कंदमुळे, फलादिंनी झालीय असे स्पष्ट लिहिलंय, इथे कुठेही मांसाचा पुसटसाही उल्लेख नाही. गोमांस तर नाहीच नाही...

तरीदेखील महाभारताच्या श्लोकातल्या काही शब्दांचा सोयीस्कर अर्थ काढून राहुल सांस्कृत्यायन या मार्क्सवादी लेखकाने ही चूक केली व त्यांच्या हिंदुद्वेष्ट्या, वेदद्वेष्ट्या मानसपुत्रांनी म्हणजे सर्व डाव्यांनी, पू-रोगाम्यांनी, समाजवाद्यांनी, सगळ्यांनीच त्यांचीच री ओढत गरळ ओकली व ओकताहेत...गेली अडीचशे वर्षे!

आता महाभारतामध्ये रंतिदेवाचं मूळ चरित्र काय आहे ते पाहुयांत...

अनुशासन पर्व ११५ अध्याय गीताप्रेसच्या प्रतीनुसार श्लोक संख्या ६३ पासून ते ६७ पर्यंत अनेक राजांची नावे घेतली गेलेली आहेत, ज्यांनी कधीही आयुष्यात मांस खाल्लं नाही, त्यामध्ये राजा रंतिदेवाचं सुद्धा नाव आहे, भांडारकर आणि चित्र शाळेच्या प्रतींमध्ये हाच प्रसंग थोड्या वेगळ्या श्लोक संख्या आणि अध्यायाच्या प्रमाणे आहे पण रंतिदेव शुद्ध शाकाहारी होता हेच सांगितलं आहे.

जर राजा रंतिदेव आपल्या रोजच्या यज्ञामध्ये हजारो गाईंची हत्या करून ब्राह्मणांना खायला गोमांस देत असेल तर यज्ञाचा प्रसाद म्हणून थोडं तरी त्याने स्वतः ग्रहण करायला हवं होतं की? काय अडचण होती? पण वर म्हटल्याप्रमाणे त्याचा उल्लेख कधीही मांस न खाल्लेल्या राजांमध्ये आहे, का बरं???

बरं याच महाभारतामध्ये शांतिपर्वामध्ये राजधर्म प्रकरणांमध्ये अध्याय २९ मध्ये महाभारत युद्ध संपल्यावर कुलक्षय झाल्याच्या शोकाने ग्रसित असलेल्या युधिष्ठिराला उपदेश करताना भगवान श्रीकृष्णाने ज्या प्राचीन राजांची कथा व नावे सांगितली आहेत की ज्यांना आपल्या कर्तुत्वाने अनेक शुभकर्मांनी कीर्ती प्राप्त झाली, नावलौकिक प्राप्त झाला, त्यामध्ये राजा रंतिदेवाचा उल्लेख आहे आणि ही कीर्ती त्यांना अनेक प्रकारचे दान केल्याने प्राप्त झाली असे म्हटले आहे, कुठेही गोमांस किंवा अन्य पशुंचे मांस ब्राह्मणांना किंवा ऋषिमुनींना किंवा याचकांना खायला घातलं म्हणून कीर्ति प्राप्त झाली असं भगवान श्रीकृष्णांनी म्हटलेलं नाही.

आलम्भन, आलभ्यन्त आदि शब्दाचा अर्थ स्पर्श करून सोडून देणे आहे, हत्या किंवा हिंसा करणे नव्हे बरंका...

वैदिक यज्ञामध्ये हिंदु लोक पूर्वी अनेक प्रकारच्या पशूंना किंवा गाईंना मारून त्यांचं मांस खायचे असा घाणेरडा आरोप करणारे लोक वेदमंत्रांमध्ये किंवा अन्य संस्कृत साहित्यामध्ये येणाऱ्या पशुयज्ञाच्या संबंधाने आलम्भन या शब्दावरून लगेचंच त्या निर्दोष पशुची हत्या असा विकृत अर्थ काढतात, दुर्दैवाने अनेक सनातनीही तसाच अर्थ काढतात, खरंतर दोषी हे लोक आहेत, कुणाला राग आला, लोभ आला, मी कुणाचा मान राखत नाही....

पण आमच्या पूर्वमामांसाकारांनी स्पष्टपणे आलम्भन शब्दाच्या दृष्टीने विवेचन करून ठेवले आहे

मीमांसा दर्शन २।३।१७ येथील सुबोधिनी टीकेमध्ये

आलम्भः स्पर्शो भवति।

स्पर्श हेच आलंभन आहे असे म्हटलं आहे, म्हणजेच पशुची कोणतीही हिंसा इथे अभिप्रेत नाही. याच पूर्वमीमांसेमध्ये

अपि वा दानमात्रं स्याद्भक्षशब्दानभिसम्बन्धात्।
पूर्वमीमांसा - १०।७।१५

येथे 'भक्ष्य' शब्दावरून खाणे न करता केवळ दान सांगितलं आहे म्हणजेच वैदिक पशुला सोडून देणे...

शांतिब्रह्म संत श्रीएकनाथांनी सुद्धा नाथ भागवतामध्ये आलंभन शब्दाने यज्ञीय पशुला स्पर्श करून सोडून देणे इतकाच अर्थ सांगितला आहे, त्याला मारणे असं नव्हे.

वास्तविक पाहता ९ वर्षांपूर्वीच यावर सविस्तर लिहिलेलं आहे, आमचा ब्लॉग पहावा!

आता सांस्कृत्यायनजींचं संस्कृतचं घोर अज्ञान पहा

द्रोणपर्वाच्या अध्याय ६७ च्या 'यस्य द्विशतसाहस्रा आसन् ।' या श्लोकाचा अनुवाद त्यांनी करताना असे लिहिलंय की राजा रंतिदेवाच्या पाकगृहामध्ये २००० बल्लव म्हणजे स्वयंपाकी लोक गोमांस तयार करायचे.

द्विशतसाहस्राचा अनुवाद २लाख करायचा सोडून २००० केला आहे, ही ह्यांची विद्वत्ता ! संस्कृतचं थोडंफार ज्ञान असलेल्या कुठल्याही शेंबड्या मुलालाही द्विशतसाहस्राचा अर्थ २लाख सोडून २००० करावासा वाटेल का हो? पण या मार्क्सवाद्यांनी वाट्टेल ते लिहायचं, त्यांच्या मानसपुत्रांनी तेच रेटायचं व आह्मींही तेच वाचायचं???

बरं या राहुल सांस्कृत्यायन यांची आणखी विकृती पहा

यांनी महाभारतातल्या अनेक श्लोकांमध्ये मासं असा शब्द गाळून मांसं असा सोयीस्कर श्लोक आपल्या पुस्तकात लिहिलाय व वाट्टेल ते अर्थ काढलेत. आता याला मार्क्सवाद नाहीतर काय म्हणायचं??? मास(महिना) नि मांस दोन्ही शब्द वेगळे आहेत हे सांगायची आवश्यकता आहे???

क्षणभर मांस शब्द योग्य आहे असेही समजुयात....

९ वर्षांपूर्वीच लिहिलंय की शतपथ ब्राह्मण या यजुर्वेदाच्या व्याख्यानरुपी ग्रंथामध्ये

'एतदु ह वै परमान्नाद्यं यन्मांस। (११।७।१।३)

इथे मांसाचा अर्थ परमान्न म्हणजेच अमरकोशानुसार 'परमान्नं तु पायसम् (२।७।२४)' म्हणजे मांस शब्दाचा अर्थ पायस घ्यावा असाच आदेश आहे. आता पायस म्हणजे दुध आणि तांदळाची गोड खीर ! कारण यज्ञाची दीक्षा घेतलेल्याला मैथुन करण्याचा किंवा मांस खाण्याचा अधिकारच नाही, अशी स्पष्ट वेदांची आज्ञा आहे. त्यामुळे पशुचं मांस हा अर्थ कुठेच सिद्ध होत नाही. त्यामुळे वैदिक यज्ञामध्ये हिंदू लोक वेगवेगळ्या प्रकारचे मांस खायचे किंवा त्यांना तशी वेदांची आज्ञा आहे हा आरोप इथेच पूर्णतः निराधार सिद्ध होतो...

पण तरीही आज रोज रोज हेच खोटं रेटलं जातं की हिंदु लोक वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे यज्ञामध्ये गोमांस मारून खायचे. किती दिवस ही विकृती सहन करायची???

गेली अडीचशे वर्षे हेच सुरु आहे...

बर या सगळ्या मागे या लोकांचा मूळ हेतु काय आहे???

तर हिंदू संस्कृती कशी तुच्छ होती, वाईट होती, असं सिद्ध करण्याचा अट्टाहास !

इतकंच नव्हे तर मुस्लिमांकडून किंवा ख्रिश्चनांकडून जी गोहत्या हत्या केली जाते व आपला गोवंश संपवण्याचा अट्टाहास सुरू आहे, त्याचं समर्थन करण्यासाठी आमच्या हिंदू धर्मशास्त्रांमध्येच कसं गोमांस खायला सांगितलं आहे असं बळंच रेटण्याचा प्रयत्न करणे हे डावं षडयंत्र आहे...

मी मागे लिहिलेलं आहे की एकीकडे हे लोक भारत देश हा बळीराजाचा देश आहे म्हणजेच शेतकऱ्यांचा देश आहे, इथली कृषी आधारित अर्थव्यवस्था आहे म्हणून बेंबीच्या देठापासून बोंबलतात आणि दुसरीकडे हेच लोक गोमांस खाण्याचं समर्थन करतात

किती हलकटपणा आहे पहा !

वेळीच सावध व्हा!

विनाकारण बुद्धिभेद करून मूळ विषयापासून लक्ष भरकटविणे हे डाव्यांचे जुने धंदे आहेत!

वैधानिक सूचना - मांसाहार कुठे वाईट आहे, हिंदूंनी मांस खाल्लं तर बिघडतं कुठे अशा प्रकारचा हास्यास्पद युक्तिवाद करणाऱ्या स्वयंघोषित बुद्धिवादी नवहिंदुत्ववाद्यांनी म्हणजे उजव्या समाजवाद्यांनी मला अक्कल शिकवायला इथे येऊ नये, वाईट शब्दांमध्ये पुन्हा एकदा अपमान केला जाईल हे आधीच सांगतो...

भवदीय,

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#राजारंतिदेव_चर्मण्वती_नदी_चंबळ_नदी_महाभारत_गोमांसाहार_वैदिकयज्ञसंस्था


Wednesday 17 April 2024

त्यागेनैके अमृतत्वमानुषुः।


१८० लक्ष वर्षांपूर्वीचं रामायण आजही का प्रमाण वाटतं? (याची कालगणना मागे दिलीय, आह्मीं शास्त्र प्रमाण मानणारे आहोत) ज्याला आपण प्रत्यक्ष कधी पाहिलं सुद्धा नाही, ना तो आपल्या नात्यातला ना गोत्यातला ना आपला तसा काही रक्ताने पूर्वज असा, अशी व्यक्ती आपल्याला का आदर्श वाटावी? दोन शब्दांत दोन संस्कृती असा लेख लिहिणारे अनेक असतीलही, कुणाविषयी अनादर नाही, पण विश्वदिग्विजयी श्रीमत् स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे भारतीय संस्कृती ज्या त्याग आणि सेवा या दोन आदर्शांवर आधारलेली आहे, किंबहुना या दोन आदर्शांशिवाय भारतीय संस्कृतीचं अस्तित्वही आपण कल्पू शकत नाही, त्यातला त्याग हा जो काही आदर्श आहे तो ज्या या पुराणपुरुषाच्या, इतिहास पुरुषाच्या चरित्रामध्ये सातत्याने दृग्गोच्चर होतो, त्या अमृतत्वाची प्राप्ती केलेल्या लोकोत्तर आणि महनीय व्यक्तिमत्त्वाचं चिंतन आम्हास का करावसं वाटतं???

काही क्षणांमध्ये ज्याचा राज्याभिषेक होणार आहे असा एक युवक ती राज्याभिषेकाची आज्ञा ऐकनाताही शांत, निश्चल नि निर्विकार होताच, पण ज्याला पुढील काही क्षणभरात सांगितले जाते की तुला आता १४ वर्षांचा वनवास स्वीकारावा लागेल आणि हे ऐकल्यावरही तो कुठल्याही प्रकारची उद्विग्नता, आक्रोश, हास्य, द्वेष, दुःख, असूया, वेदना, पीडा, विलाप न दर्शविता अत्यंत शांतपणे तशा प्रकारची आज्ञा देणाऱ्या आपल्या त्या मातेचे कोड कौतुक तर करतो आणि जणू काही तिने आपल्यावर उपकार केले आहेत, अशा प्रकारची भाषा करतो.

सकाळी साधा वेळेवर चहा किंवा उपाहार नाही मिळाला तर आमची दिवसभर चीडचीड होते, आम्हाला त्रास होतो, संताप होतो, दिवसाची सुरुवात कोणाचे तोंड पाहून झाली अशी भावना आमच्या अंतकरणात येते; अशावेळी हा ऐन सदतिसाव्यांत पोहोचलेला युवक (आषोडशात् सप्ततिवर्षपर्यम्तं यौवनम् - कामसूत्र) की माझ्यावर आता खऱ्या अर्थाने उपकार झालेले आहेत आणि मला मिळालेली वनवासाची आज्ञा ही माझ्या दृष्टीने अत्यंत वरदानच ठरणार आहे.

आश्चर्य म्हणजे ज्याच्यामुळे ही आज्ञा त्याला मिळाली, तो त्याचा जन्मदाता पितासुद्धा त्याला तु मला कारावासात का डांबत नाहीस अशी स्पष्टपणे आज्ञा देत असूनही हा माणूस चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची रेषही न ढळता की आपल्या जन्मदात्या पित्यालाच निजकर्तव्याचा बोध देत शांत करतो आणि रघुकुलाची 'प्राण जाई मगर बचन न जाई' या वचनाची स्मृती जागृत करतो.

सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये आपल्या चित्ताची समतोलता कुठेही न ढळु देणारा हा पुरुषोत्तम केवळ भारतीयंच नव्हे तर अखिल मानवज्ञातीचा जीवनादर्श का आहे??? 

आहुतस्याभिषेकाय विसृष्टस्य वनाय च। न मया लक्षितस्तस्य स्वल्पोप्याकारविभ्रमः।

महानाटक 

राज्याभिषेकाला बोलाविते समयी आणि वनवासाची आज्ञा दिल्यानंतर वनवासाला जाते वेळी ज्याच्या चेहऱ्यावरची एक रेषही हलली नाही, म्हणजेच चेहऱ्यावरचे भाव दोन्ही अवस्थांमध्ये समान होते, याचा अर्थ तो भावनाशून्य होता किंवा निर्लज्ज होता किंवा संवेदनाशून्य होता असा नसून त्याच्या अलौकिक स्थितप्रज्ञतेचा नि पुरुषश्रेष्ठत्वाचा तो मूर्तिमंत साक्षात्कार होता.

तो ईश्वरी अवतार आहे किंवा नाही हा भाग स्वतंत्र आहे, तो प्रत्येकाच्या स्वतंत्र चिंतनाचा, अनुभवाचा, श्रद्धेचा सद्गुरु प्राप्त कृपाशिर्वादाचा विषय आहे, ज्याचं त्याने ठरवावं, पण आमचा इतिहासपुरुष म्हणून आह्मीं जेंव्हा रामादिवत् वर्तितव्यं म्हणतो, तेंव्हा त्याचा आधार काय???

तर कैवल्योपनिषदांत म्हटल्याप्रमाणे त्यागानेच प्राप्त होणारं हे अमरत्व, कैवल्यत्व!

हे प्रजेने किंवा संततीने किंवा धनप्राप्तीने होत नाही तर केवळ त्यागानेच होते.

त्याच्या अखंड नामस्मरणाने प्राप्त होणारी बुद्धीची स्थिरता हा प्रत्येकाच्या अनुभूतीचा विषय आहे, संतसम्राट कैवल्य चक्रवर्ती श्रीज्ञानोबारायांनी म्हटल्याप्रमाणे सुरवंटामध्ये रूपांतर होणे असा काहीसा जो दृष्टांत आहे, हा जो काही विषय आहे प्रत्येकाच्या श्रद्धेचा असल्याने त्यावर इथे विस्तार करणे नको, कारण हे असे विषय बोलूच नयेत....

पण तरीही उपास्य देवतेची भक्ती म्हणजेच त्याचे गुण आपल्या अंगी धारण करणं हीच तर भक्तीची व्याख्या आहे असे म्हटल्यांस वावगं ठरणार नाही...

भगवान श्रीरामरायाच्या जन्मोत्सवानिमित्त त्याच्या चरणी ही वाग्पुष्पांजली !


भवदीय,


पाखण्ड खण्डिणी 

PakhandKhandinee.blogspot.com


#श्रीरामनवमी_श्रीरामजयंती_वनवास_भारतीय_संस्कृती_त्याग_विवेकानंद

 

Monday 8 April 2024

मृत्युंजय...

 



मृत्यू न ह्मणें हा भूपती। मृत्यू न ह्मणें हा चक्रवर्ती।

दासबोध ३।९।११

हिंदुस्तानच्या इतिहासातील तीन मृत्युंजय रत्ने - एक महाभारतातील श्री भीष्माचार्य, द्वितीय श्रीशंभुछत्रपती आणि तृतीय स्वातंत्र्यवीर श्रीविनायक दामोदर सावरकर ! एक इच्छामरणाचे वरदान लाभल्याने ५६ दिवस शरशय्येवर राहतो, दुसरा ४० दिवस सर्व अंगाची सालटी काढली जाताना, अवयव तोडले जात असताना, डोळ्यांत तप्त सळई घुसवली जाताना व जिव्हा कापली जात असतानाही मृत्युला आवाहन देतो आणि तिसरा प्रायोपवेशनाने मृत्युस झुंजवतो! तो महाभारतातला कर्ण मृत्युंजय वगैरे नाही बरंका उगाचच कादंबरीकारांच्या नादी लागू नये.


सर्वसामान्यांना मृत्यूशी झुंज द्यावी लागते, मृत्युचा पाश यमदेवता आवळत असताना आमच्यासारखे त्यातून सुटण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतात, पण काही वीर असे असतात की अशांशी मृत्यु झुंजत असतो, कारण मृत्यु त्यांच्यापुढे जणु पराजित असतो, शेवटी त्यांनाच मृत्युची दया येते व ते त्याला जवळ ये म्हणतात आणि कवटाळतात.

अत्युक्ती वाटेल पण ज्वलज्वलनतेजस मृत्युंजय श्रीसंभाजीराजांच्या जीवनाकडे पाहिलं, विशेषतः माघ वद्य सप्तमीपासून ते आजच्या फाल्गुन वद्य अमावस्येपर्यंत जवळजवळ ४० दिवस त्यांच्याशी मृत्यूने दिलेली झुंज, त्यांनी मृत्युशी दिलेली नव्हे, ती पाहता उपरोक्त वचन अत्युक्ती ठरणार नाही. बुऱ्हाणपूरची लूट आणि मोंगली मुलखात चालवलेली लचकेतोड, तत्कालीन खडकी म्हणजे औरंगाबाद अर्थात आजच्या संभाजीनगरांवर श्रीशंभुछत्रपतींनी बसविलेली दहशत यामुळे औरंगजेब अत्यवस्थ झाला होता. शिवाय औरंगजेबाचा शहजादा अकबर संभाजीराजांच्या आश्रयाला येऊन राहिला होता. म्हणूनच खाफीखानाने म्हटल्याप्रमाणे 'दक्षिणेतल्या काफीरांचा बीमोड' करण्यासाठी स्वराज्यावर निघालेला यवनाधम म्लेंच्छ पातशहा ७ लाखांची फौज घेऊन श्रीशंभुछत्रपतींशी ९ वर्षे झुंजताना त्यांच्या तळपत्या खड्गाने तो स्वतःचाच किमाँश खाली उतरवता झाला. तिकडे गोव्यात इसवी सन १५३५ पासून ते १७१५ पर्यंत पोर्तुगीजांनी म्हणजेच ख्रिस्त्यांनी केलेले अनन्वित अत्याचार पाहून ज्यांनी हडकोळणला 'हे हिंदू राज्य आता जाहलें आहे' म्हणून शिलालेख कोरत त्या अत्याचारांस पायबंद घातला होता, मातब्बरखानाच्या पत्राप्रमाणे तळकोंकणातल्या मशिदी व मदरसे उध्वस्त करून ज्यांनी इस्लामच्या प्रचारास खीळ बसवली, अशा ज्वलज्वलनतेजस श्रीशंभुराजेंच्या चरित्राचे चिंतन करण्याचा मोह टाळता येत नाही.

कारण हा विस्तव आहे हे कितीही सत्य असलं, हातीं घेणाऱ्याला तो पोळवणारा असला तरीही ! इतिहासाचा अभ्यास आणि मांडणी ही व्यक्तिनिष्ठ पद्धतीने न करता वस्तुनिष्ठ पद्धतीने करावी हा नियम कितीही निष्ठेने पाळला तरीही !


तरीही तो ४० दिवसांचा छळ असह्य आहे...


कारण अत्यंत कविमनाचा हा रसिक योद्धा त्या सर्व असह्य पीडा सोसण्यासाठीच कसा काय जन्मला झाला होता हे कळत नाही. आपल्यासारखा कोणी असता तर पहिल्याच दिवशी शरण गेला असता आणि सुंता करून घेता. श्रीशंभुछत्रपतींची धर्मनिष्ठा मात्र वादातीत होती. बलिदानाच्या काही महिने आधी म्हणजे १६८८ मध्ये श्रीशंभुछत्रपतींनी रचलेल्या 'सातशतक' नामक काव्याकडे पाहता अंतिमतः त्यांचा डोळा हा ईश्वरी अधिष्ठानाकडे लागलेला होता हे लक्षात येते

रंग अनेक रंगे मन मेरे कहू। रंग साँवरे मे रंगि जे हैं।

अर्थ - माझं मन पूर्वी अनेक रंगांमध्ये रंगलेलं असलं तरी आता मात्र ते त्या सांवळ्या कृष्णाच्या रंगीच रंगले आहे.

संदर्भ - छत्रपति संभाजी स्मारक ग्रंथ - पृष्ठांक ३०७ 

'मन राम रंगी रंगले हो' याप्रमाणेच त्यांचे अंतःकरण आता कृष्णरंगी रंगलं होते. राष्ट्रसूत्रधार श्रीलोकमान्यांनी 'आशेची निराशा व निराशेची आशा' या लेखामध्ये म्हटल्याप्रमाणे 'निर्वाणीचे धैर्य' हा जो शब्दप्रयोग केला आहे, तो इथे श्रीशंभुछत्रपतींना अत्यंत लागू होतो. 


जाता जाता...

औरंगजेबाने रहल्लुखानामार्फत श्रीशंभुछत्रपतींना विचारलेल्या दोन प्रश्नांमध्ये भले 'मुसलमान हो' म्हटल्याचा संदर्भ नसला तरी सुद्धा राजाराम महाराजांच्या आज्ञेने लिहिलेल्या चिटणीस बखरीमध्ये तो प्रश्न विचारल्याचा आणि श्रीशंभू छत्रपतींनी त्याला बाणेदारपणे नकारात्मक व अपमानास्पद प्रत्युत्तर दिल्याचा उल्लेख आहेच, पण भले तो संदर्भ समकालीन नसला तरीही त्याने श्रीशंभुछत्रपतींच्या धर्मवीरत्वावर कुठेही प्रश्नचिन्ह येत नाही. पुढे ९ मे, १७०३ला औरंगजेबाने हाच 'मुसलमान हो' प्रश्न श्रीशाहुछत्रपतींना विचारला आणि त्यांनी बाणेदारपणे नकार दिला, तो संदर्भ 'मोंगल दरबारची बातमीपत्रे खंड तीन' मध्ये जिज्ञासूंनी पहावा. आंतरजालांवर पीडीएफ सहज प्राप्य आहे.

मृत्युंजयाच्या चरणी ३३५व्या पुण्यतिथीनिमित्त कोटी अभिवादन ! 

भवदीय,

पाखण्ड खण्डिणी 

Pakhandkhandinee.blogspot.com

#मृत्युंजयअमावस्या_धर्मवीर_श्रीशंभुछत्रपति_बलिदान_हिंदवीस्वराज्य_हिंदुधर्म


Tuesday 13 February 2024

महर्षि श्रीमद्दयानंदांची जन्मद्विशताब्दी

 


आज आपण जीवित असता तर आपण २०० वर्षांचे असता आणि आह्मींही आमचं जीवन आपल्या चरणी आपल्या संकल्पित वेदभाष्यासाठी निश्चित वाहिलं असतं ! १२ फेब्रुवारी १८२४ ते आज !


गेल्या २० वर्षात जितक्या महापुरुषांचं चरित्र आणि साहित्य अभ्यासलंय, त्यात जे पाच अनुकरणीय नि आदरणीय वाटतात, त्यातला हा चौथा सत्पुरुष! 


युक्तियुक्तं वचो ग्राह्यं न तु पुरुषगौरवात्।


कुठलाही महापुरुष हा १००% निर्दोष नि अचूक कधीच नसतो, अपवाद केवळ भगवान श्रीरामचंद्र नि भगवान श्रीकृष्ण, हे दोन सोडले तर मी माझ्या आयुष्यात कुणालाच अंतिम नि निर्दोष मानत नाही, त्यामुळे महर्षि श्रीदयानंद नामक आपल्या काही मंतव्याशी माझेही काही प्रामाणिक मतभेद अवश्य आहेत नि राहतील, पण तरीही या सर्वांमागची आपली भूमिका निःसंदेह निःस्वार्थी नि निरलस नि विशुद्ध अंतःकरणाची होती ह्यात काहीच शंका नाही. आपल्या पाखंड खंडणाच्या हेतुविषयी माझ्या मनात तरी कधीच शंका नव्हती नि नाही. इतरांचं मला घेणंदेणं नाही, माझ्यापुरता मी ठाम आहे! इतकंच नव्हे तर आपल्या काही मंतव्यांमध्ये बदल करण्यासही मी आपणांस भाग पाडलं असतं कारण मी व्यक्ती पूजक नाही.


इतकं निश्चित आहे की श्रीदयानंदांची वेदांविषयीची भूमिका जी त्यांनी ऋग्वेदादिभाष्यभूमिका या त्यांच्या अमर ग्रंथामध्ये मांडली आहे, तीविषयी मी पूर्ण निश्चित आहे. अर्थात या ग्रंथाचे किंवा श्रीदयानंद प्रणीत मंतव्याचे खंडन करण्याचे कितीतरी प्रयत्न मागील दीडशे वर्षात अनेक विद्वानांकडून झालेले असले तरी व त्याला प्रत्यक्ष महर्षींकडून जीवितपणी व पश्चात् आर्यसमाजातल्या विद्वानांकडून तितकंच प्रत्युत्तर व पुन्हा त्याला इकडून उत्तर असा खेळ बराच झालेला असल्याने व तो सर्व अभ्यासला असल्यानेच मी श्रीदयानंदांच्या वेदांविषयीच्या भूमिकेशी तरी पूर्ण सहमत आहे, कालत्रयीही तींत बदल होईल असे आत्ता तरी वाटत नाही...!


आता प्रामाणिक मतभेदाचे जे दोन चार विषय आहेत, ते कधीतरी निवांत मांडीन ! 


कुठलाही महापुरुष नि त्याचे विचार हा त्याकाळचा उत्पाद असतो, त्यामुळे आज शेकडो वर्षानंतर आपल्या घरी निवांत खुर्चीवर बसून हातात कर्णपिशाच्च घेऊन तत्कालीन महापुरुषांच्या मतांची चिकीत्सा किंवा समीक्षा करणं हे कित्तीही सोप्पं असलं तरी ते करताना आपलीही तितकी लायकी आहे का हे पाहणं आवश्यक आहे, हा विवेक अंगी बाळगला तर बरेच वाद मिटतील.


कारण व्यक्तीपुजेने या राष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण मानव समाजाची जितकी हानी झालेली आहे, तितकी अन्य कशानेही नाही. एकीकडे लाभही झाला आहे हेही तितकंच खरं. पण वेद व्यक्तीपुजेची मान्यता देत नाहीत, हिंदुसमाज हा व्यक्तीपूजक कधीच नव्हता, तो व्यक्तीच्या आदर्शांची, सद्गुणांची, चारित्र्याची पुजा करणारा होता, त्यामुळेच तो एखादा महापुरुष चुकला तर त्याच्या चुकीला चुक म्हणणारा होता. गुरोरप्यवलिप्तस्य। किंवा उन्मार्गगामिनं - स्कंद पुराण


पण हिंदुसमाज हा या वेदमार्गापासून दूर गेल्याने मधील काळात मतमतांतराचा झालेला गलबला हा या व्यक्तीपुजेचाच परिणाम आहे ही गोष्ट कोणत्याही सूज्ञांस नाकारता येणार नाही. आज ही परिस्थिती फारशी काही वेगळी आहा अशातला भाग नाही. आणि म्हणून या मतमतांतराच्या गलबल्याने चिंतित झाल्याने या श्रीदयानंद नामक दिवाकराने सर्व मतांची समीक्षा करण्याचा जो घाट सत्यार्थ प्रकाश या त्यांच्या अमर ग्रंथामध्ये घातला, त्या ग्रंथालाही जितकी खंडणं विद्वानांकडून मागील दीड शतकांत निर्मिली गेली, त्यालाही वाद-प्रतिवाद झाले, आजही होताहेत, तेही सर्व अभ्यासल्यानंतर महर्षींच्या प्रत्येक वाक्याची तपासणी करून मूळ हेतुविषयी शंका घेण्याचं पाप मी तरी करणार नाही. 


मतभेद असणं हे बुद्धी जीवित असल्याचे लक्षण आहे...


आपल्या पूर्वजांनी या मत-मतांतराच्या गलबल्याला कधीही धिक्कारलं नाही आणि श्रीदयानंद यांचा प्रयत्न सुद्धा काही अशा तुच्छ हेतूचा होता अशातलाही भाग नाही.


अर्थात गेल्या १२-१३ वर्षांच्या तुलनात्मक अध्ययनापश्चात् निष्कर्षाला येताना जाताजाता इतकंच सांगणं आवश्यक आहे की


एक दोन-चार गोष्टी सोडल्या तर श्रीदयानंदांची मंतव्ये ही सर्व प्राचीन परंपरेला अनुसरूनंच आहेत, त्यांनी फार काही नवीन मत मांडलंय अशाचा भाग मूळीच नाहीये, वरवरपाहता आपल्याला तसं वाटायला लागतं, अर्थात संप्रदायाभिनिवेशी नि स्वमतांध लोकांना हा समन्वयाचा विवेक असणं संभव नाही नि आमची तशी त्यांच्याकडून अपेक्षाही नाही.


म्हणूनंच आमच्यापुरतं आह्मीं एकीकडे श्रीशंकराचार्य, श्रीज्ञानोबा-श्रीतुकोबांनाही धर्ममजिज्ञासेत आप्त म्हणून प्रमाण मानतो व इकडे त्यांच्या काही मतांची समीक्षा करणाऱ्या श्रीदयानंदांनाही तितकंच मानतो. 


यात काही आक्षेपार्ह आह्मांस तरी वाटत नाही!!! अन्ततोगत्वा सर्व एकंच आहेत !


हा सत्पुरुष आज जीवित असता तर आमचा हा आर्यावर्त, हे प्राचीन हिंदुराष्ट्र निःसंदेह विश्वगुरूच्या पदावर केव्हाच आरुढ झालं असतं! पण दैवदुर्विलास ! अर्थात या सर्व महापुरुषांनी आपल्या स्कंधावर दिलेलं त्यांच्या मार्गावर चालण्याचं दायित्व मात्र शेवटपर्यंत वहन करणं आवश्यक आहे!!!


शेष, वेदांकडे पुन्हा वळणं म्हणजे हिंदू धर्माला किंवा संस्कृतीला, परंपरेला, हिंदुसमाजाला एका पुस्तकापुरतं मर्यादित करणे म्हणजे संकुचित करणं असं ज्या पढतमूर्खांना आणि आजच्या तथाकथित नवहिंदुत्ववाद्यांना वाटतं, त्यांच्या बुद्धिमत्तेची कीव करण्याची माझी इच्छा मुळीच नाही, कारण त्यांच्यासाठी मला खरंच वेळ नाही! ज्या हिंदुत्ववाद्यांची इतिहासाची सुरुवात ही वेदांमध्ये आमचे आर्य इकडून आले की तिकडून गेले हे मांडण्यातूनंच होते, त्या आंधळ्यांनी मला तरी अक्कल शिकवायला येऊ नये हे नम्रतेची विनंती!


अंतिमतः महर्षींचे स्वतःचे शब्द आहेत ते पाहुयांत...


"बन्धु, हमारा कोई स्वतंत्र मत नही हैं| मैं तो वेद के अधीन हूं और हमारे भारत में पच्चीस कोटी आर्य हैं| कई कई बात में किसी किसी में कुछ कुछ भेद हैं, सो विचार करने से आप ही छूट जायेगा| मैं एक संन्यासी हूँ और मेरा कर्तव्य यही है कि जो आप लोगों का अन्न खाता हूँ इसके पर्यायमें जो सत्य समझता हूँ उसका निर्भयता से उपदेश करता हूँ| मैं कुछ कीर्तिका रागी नहीं हूँ| चाहे कोई मेरे स्तुति करें व निन्दा करें, मैं अपना कर्तव्य समझके धर्म बोध करता हूँ| कोई चाहे माने वा न माने, इसमे मेरी कोई हानि लाभ नहीं हैं|"


वेदंच सर्वोच्च प्रमाण माना म्हणणारं आपलं हे मत पुढे जाऊन आपली ही आर्यसमाजाची विचारधाराच एक स्वतंत्र पंथ किंवा मत किंवा संप्रदाय बनेल ह्याची भीती‌ प्रकट करताना सर्वांना सावध करताना महर्षि श्रीदयानंद म्हणतात...


मी सर्वज्ञ नाही - इति महर्षि दयानंद


"..और मै सर्वज्ञ भी नही हूँ| इससे यदि कोई मेरी गलती आगे पाई जाय, युक्तिपूर्वक परीक्षा करके इसी को भी सुधार लेना| यदि ऐसा न करोगे तो आगे यह भी(आर्य्य समाज विचारधारा) एक मत हो जायेगा और इसी प्रकार से 'बाबा वाक्यं प्रमाणं' करके इस भारत में नाना प्रकार के मत मतान्तर प्रचलित होके, भीतर भीतर दुराग्रह के रख के लढके नाना प्रकार की सद्विद्या का नाश करके यह भारत वर्ष दुर्दशा को प्राप्त हुआ हैं| इसमे यह भी एक मत (आर्य समाजका) का बढ़ेगा| मेरा अभिप्राय तो हैं कि इस भारत वर्ष मे नाना प्रकार के मतमतान्तर प्रचलित हैं वो भी, ये सब वेदों को मानते हैं इससे वेदशास्त्र रुपी समुद्र में यह सब नदी नाव पुन: मिला देने से धर्म ऐक्यता होगी| और धर्म ऐक्यता से सांसारिक और व्यावहारिक सुधारणा होगी और इससे कला कौशल आदि सब अभीष्ट सुधार होके मनुष्य मात्र का जीवन सफल होके अन्त में अपना धर्म बल से अर्थ, काम और मोक्ष मिल सकता है|"


कालच्या २००व्या जयंतीनिमित्त या अत्यंत वंदनीय नि महनीय ऋषिश्रेष्ठाच्या चरणी कोटी अभिवादन !!!


भवदीय,


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#महर्षि_देव_दयानंद_आर्यसमाज_जन्मद्विशताब्दी_वैदिकहिंदुधर्म_संप्रदाय_उपासना