Sunday 7 March 2021

माघ वद्य नवमी अर्थात दास नवमी





 *असो ऐसें सकळहीं गेले | परंतु येकचिं राहिलें | जे स्वरुपाकार जालें | आत्मज्ञानी ||*

श्रीमद्दासबोध


ज्यांना आत्मज्ञान झालं तेच कीर्तीने जीवित राहतात, अन्येषां कृते जीवितं मूतकमेव मन्ये। असे म्हटल्यांस अत्युक्ती नाही.


*पैशाच पंथी इस्लामी पाशवी अत्याचाराच्या आक्रमणाने गांजलेल्या नि पंधराव्या शतकांत पाच पातशहांच्या परदास्यतेत बद्ध झालेल्या महाराष्ट्रांस तारलं ते संतांनींच. महाराष्ट्राक्षितिजांवर संतसम्राट कैवल्यचक्रवर्ती श्रीज्ञानोबांच्या रुपाने स्वधर्मसूर्याचा जो उदय झाला, भक्तशिरोमणी श्रीनामदेवांनी ज्या भागवतधर्माची पताका अगदी पंजाबांपर्यंत नेली, श्रीगोरोबाकाका, श्रीसेनामहाराज, श्रीचोखोबादि संतांनी ज्या भक्तिरसाचा डांगोरा कळिकाळाच्याही माथा सोटा हाणत पिटला, त्याच भागवतधर्मांस अर्थात वैदिक धर्माच्या अत्यंत विशुद्ध अशा स्वरुपांस इतिहासाचार्य वि का राजवाड्यांनी म्हटल्याप्रमाणे सहिष्णुपासून जयिष्णु बनविण्याचे कार्य महाराष्ट्रधर्म नावाच्या संजीवनीने प्राप्त झालं. संतचरित्रकार श्री पांगारकरांनी म्हटल्याप्रमाणे त्या महाराष्ट्रधर्माचा पाया ज्या श्रीनाथांच्या रुपाने रचला गेला, जगद्गुरु संतश्रेष्ठ श्रीतुकोबारायांच्या रुपाने ज्या महाराष्ट्रधर्माची ईमारत फळांस आली त्याच महाराष्ट्रधर्मांस राष्ट्रगुरु श्रीसमर्थांच्या तेजस्वी नि विजीगीषु वृत्ती निर्माण करणाऱ्या वाणीने, लेखणीने, कृतीने, आचाराने, व्यवहाराने सहिष्णु पासून जयिष्णु बनवलं नि त्यावर कळस चढविला, ज्यांस पुण्यश्लोक श्रीशिवप्रभुंच्या अरिशोणितप्राशी खड्गाच्या तीक्ष्ण धारेने हिंदवी स्वराज्याचा मुकुटमणीच धारण केला, त्या श्रीसमर्थांच्या समाधीचा आजचा दिवस...*


*मुख्य तें हरिकथा निरुपण।दुसरें तें राजकारण।तिसरें तें सावधपण। सर्वांविषयी।*


असे म्हणत मुख्य त्या हरिकथेला कुठेही न त्यागता राष्ट्रहिताचे राजकारण करणारा नि सर्वांविषयी सावधपणा बाळगायला सांगणारा हा राष्ट्रसंत


*भेटो कोणी एक नर। महार धेंड चांभार।त्याचे राखावे अंतर। या नाव भजन।*


सर्व हिंदुंसमाजाचं अंतर्बाह्य संघटन करणारा


*पतित करावे पावन।शहाणे करावे जन।सृष्टीमध्ये भगवद्भजन। वाढवीत जावे।*


पतितांना पावन करणारा नि सर्वांना शहाणं करणारा कृतिशील समाजोद्धारक


ईश्वरांस काय मागावं हे सांगताना


*कोमलवाणी दे रामा।विमल करणी दे रामा।सज्जनसंगती दे रामा।अभेदभक्ती दे रामा। बहुजन मैत्री दे रामा।*


प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांनी अगदी सार्थ म्हटल्याप्रमाणे 


*"म्हणजे सज्जनसंगती, अभेदभक्ती, बहुजनमैत्री ह्या तीन शब्दांसाठी भावनिक एकात्मकतेचे नोबेल पारितोषिक ह्या माणसाला द्यायला खरंतर काही हरकत नाही !"*


*विद्यावैभव अर्थारोहण दे रामा।जनसुखकारक, प्रसंगओळख, आंतरपारख दे रामा।*


असा ज्ञानी भक्त आणि इतका सर्व विश्वप्रपंच करत असतानाही


*विवेक आणि वैराग्य हेचि जाणावे महद्भाग्य।*


विवेक नि वैराग्याशी सतत संधान साधणारा हा वैराग्यसंपन्न महात्मा...



हिंदुधर्मरक्षक पुण्यश्लोक श्रीशिवप्रभुंच्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी, रक्षणासाठी नि संवर्धनासाठी त्या जगन्मातेकडे


*दुष्ट संहारिले मागे। ऐसे उदंड ऐकतो। परंतु रोकडे काही। मुळ सामर्थ्य दाखवी।*


*तुझा तो वाढवीं राजा। सीघ्र आह्मांसि देखिजा।*


अशी काकुळतेने प्रार्थना करणारा हा जगन्मातेचा भक्त...


पुण्यश्लोक श्रीशिवप्रभुंच्या स्वराज्यनिर्मितीपश्चात त्यांस आपल्या स्वप्नीं पाहिलेल्या रामराज्याची आनंदवनभूवनाची संज्ञा देत कृतकृत्यतेचा अनुभव करणारा कर्तृत्वसंपन्न पुरुषश्रेष्ठ...


*म्हणौनि आम्ही रामदास। रामचरणी आमुचा विश्वास।कोसळोनि पडो हे आकाश। परि आणिकांचि वास न पाहो।*


असे म्हणत ह्या नश्वर देहाचा त्याग करणारा हा आत्मज्ञानी ऋषि...


आज त्यांच्या चरणी कृतानेक साष्टाङ्ग दंडवत...!


आज नरवीर नरश्रेष्ठ श्री तानाजी मालुसरे ह्यांचेही पुण्यस्मरण...सावरकरांच्या शब्दांमध्ये


*धन्य शिवाजी तो रणगाजी, धन्य चि तानाजीं। प्रेमें आजि सिंहगडाचा, पोवाडा गाजी।*


माघ वद्य नवमी अर्थात दास नवमी...


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#दासनवमी_श्रीसमर्थ_रामदास_राष्ट्रगुरु_राष्ट्रसंत_श्रीशिवप्रभु_हिंदवीस्वराज्य_महाराष्ट्रधर्म

No comments:

Post a Comment