Monday 29 May 2017

यज्ञोपवीत (जानवे) - एक चिंतन




आर्य सनातन वैदिक हिंदु धर्मात यज्ञोपवीत अर्थात जानव्याला व डोक्यावरच्या सहस्त्रारचक्राच्या ठिकाणच्या शीखेला अतीव महत्व आहे. परमादरणीय श्री भिडे गुरुजींनी जो रायगडी सुवर्ण सिंहासनाचा संकल्प धारण करण्याविषयी चार जुनला येण्यासाठी आम्हा सर्व धारकर्यांना जी आज्ञा दिली आहे, तदनुसार गडावर तत्प्रसंगी सर्वांस यज्ञोपवीत धारण करण्यांस आम्ही सिद्ध आहोत. म्हणूनच आम्हा सर्व धारकरी बंधुंस त्याविषयीच्या स्पष्टतेचा व भ्रमांचा निराकरण करणारा एक लेख आमचे धारकरी बंधु योगेशजी देशपांडेंनी काही सप्ताहापूर्वीच लिहिला. इतर अभ्यासु बंधु धारकर्यांनीही वेळोवेळी त्यावर लिहिलंय. पण त्यावर त्यात शास्त्रीय प्रमाणांसहित थोडं स्पष्टीकरण द्यावे वाटलं म्हणून हा लेखनप्रपंच! पुण्यश्लोक श्रीशिवप्रभूंनी राज्याभिषेकसमयी उपनयन होतांच यज्ञोपवीत धारण करण्याचा व आग्र्याहून सुटकेसमयी धर्मवीर छत्रपती श्रीशंभुराजेंस उपनयन संस्कार केल्याचा उल्लेख सर्वश्रुत आहेच.

स्वराज्यसंकल्पक परमादरणीय श्री. शहाजी महाराजांच्या चरित्रातले उल्लेख

जयराम पिंडे नावाच्या समकालीन राजप्रासादातल्या (दरबारातल्याच) लेखकाने "राधामाधवविलासचम्पु"  नावाच्या अप्रतीम ग्रंथामध्ये शहाजी महाराजांची दिनचर्या दिलीय. त्यात वेदमंत्रांच्या पठनाने त्यांची पहाट होत असे लिहिलेय. जिज्ञासूंनी तो ग्रंथ मुळातून वाचावा ही विनंती!

पृष्ठ क्रमांक ३४-३५ - दिनचर्या
(सोबत पाने जोडली आहेत)

शहाजी महाराज अस्खलित संस्कृत मधून संवाद करीत व संस्कृत कोडी टाकत व ती पूर्ण करणार्यांस पारितोषिक देऊन सन्मान करत. प्रश्नांची कवींना उत्तरे द्यायला सांगत.

बजाजी निंबाळकरांच्या शुद्धीकरणाचा इतिहास हा सर्वश्रुत आहे कारण शुद्धीकरण करताना जो यज्ञ करतात त्यात गळ्यात यज्ञोपवीत घालणं आवश्यक आहे. कोणताही यज्ञ करताना ते घालावंच लागतं. कारण यज्ञोपवीताशिवाय यज्ञ करता येत नाही.

शंभुराजेंनी सुद्धा एका कुलकर्ण्याचे शुद्धीकरण केल्याचा इतिहास आहे.
लग्न करताना सुद्धा अनेक जण यज्ञोपवीत घालतात. आणि हे सर्व जातींमध्ये आहे.

नुकताच माझ्याच घरासमीप श्रीसंत नामदेव मंदीरातच पंढरपूरात कालच म्हणजे २८ मेला एक श्रीविश्वकर्मा त्वष्टापांचाळ समाज, पंढरपूर ह्यांचा सामुदायिक उपनयन सोहळा संपन्न झाला. चाळीस ते पन्नास जणांना मी स्वत: त्या कार्यक्रमात पाहिलंय. संध्याकाळी मोटी शोभायात्रा निघाली होती. पंढरपूरात ये ऊन खात्री करून घ्यावी. हे पांचाल समाजाचे आहेत. (सोबत चित्र जोडलं आहे)


महाराष्ट्र राज्य सरकारने प्रकाशित केलेल्या "महाराष्ट्राचा इतिहास - मराठा कालखंड - भाग १" - शिव काल (इ.स. १६३० ते १७०७) ह्या ग्रंथात

धार्मिक चालीरीती व परंपरा ह्या शीर्षकाखाली स्पष्ट लिहिलं आहे की त्या काळात सर्व जातीत ६ संस्कार केले जात. प्रमुख म्हणजे मौंजीबंधन (मुंज ), विवाह, गर्भाधान व अन्य संस्कार!

पृष्ठ क्रमांक ६१६
(सोबत चित्र जोडलं आहे)

ह्या ग्रंथाची ओनलाईन पीडीएफ www.msblc.Maharashtra.gov.inवर मिळेल.


आता आधुनिक इतिहास पाहुयांत

डॉ. आंबेडकरांनी ६,००० अनुयायांस वाटलेली यत्रोपवीतं !
( सोबत सर्व चित्रे जोडली आहेत. )

धनंजय कीर लिखित आंबेडकर चरित्रात पृष्ठ क्रमांक १४८ वर आंबेडकरांनी जानवी वाटल्याचा उल्लेख आह तो खालीलप्रमाणे.

"परिषदेच्या कार्याचा समारोप करतेवेळी प्रतिनिधींना यज्ञोपवीते वाहण्यात आली. आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी देवराव नाईक ह्यांनी पौरोहित्य स्वीकारून सहा सहस्त्र प्रतिनिधींचा वेदमंत्रांच्या गजरात हा समारंभ पार पाडला."

पुढे आंबेडकर गोलमेज परिषदेसाठी लंडनला ४ ओक्टोबर, १९३० साली "व्हॉईसरॉय ओफ इंडिया" ह्या बोटीने निघायच्या आधी आपले वरील ब्राह्मण मित्र देवराव नाईकांविषयी ते म्हणतात

"देवराव नाईक हे आपले उजवे हात असुन ते आपल्या(माझ्या) अनुपस्थितीत चळवळीला मार्गदर्शन करतील. "
ह्याच नाईकांवर पुढे त्यांनी "बहिष्कृत भारत" ह्या आपल्या मुखपत्राची जबाबादारी सोपवून संपादक पद दिले.

थोडक्यात त्यावेळी त्यावर कुणीही आक्षेप घेतला नाही. पण ३ जुनच्या प्रतिष्ठानच्या सिंहासन संकल्पांस व जानवी धारणांस मात्र काही द्वेष्टे लोक विरोध करताहेत. अर्थात अशा मुर्खांकडे कोण लक्ष द्यावे?

सावरकरांनीही जानवे वाटप केल्याचे उदाहरण

बाळाराव सावरकर लिखित रत्नागिरी पर्वातही सावरकरांनी अनेक ब्राह्मणेतर लोकांना गायत्री मंत्र, गीता, स्तोत्र शिकविल्याचे अनेक उल्लेख आहेत. वैश्य बंधुंचा वैदिक पद्धतीनेच उपनयनाचाही उल्लेख आहे. अनेक तथाकथित पृर्वास्पृश्य अशा आमच्या महार बंधुंस सावरकरांनी सर्वाधिकार दिल्याचे प्रसंग जागोजागी आढळतील. ह्या रत्नागिरीच्या स्थाबद्धतेत त्यांनी केलेली सामाजिक क्रांती ही केवळ अवर्णनीय व विलक्षण आहे. महत्वाचे म्हणजे आंबेडकर-सावरकर भेटीही ह्यावेळीच झाल्या आहेत. जिज्ञासूंनी हा ग्रंथ वाचावा. असो.

एका महत्वाच्या आक्षेपाला उत्तर

ब्राह्मणांनी आम्हाला जो अधिकार नाकारला तो आता का देताहेत????

ह्या आक्षेपांला पुरावा तर काहीच नाही. उलट आता अधिकार दिला नाही म्हणून बोंबलणारे तो आता देताहेत तर विरोध करताहेत. वाह रे वाह !

आता डॉ. आंबेडकर अधिकार नकार ह्याबाबतीत काय म्हणताहेत ते आपण पाहुयांत.

‘‘जहां तक उपनयन संस्कार और यज्ञोपवीत धारण करने का प्रश्न है, इस बात का कहीं कोई प्रमाण नहीं मिलता कि यह शूद्रों के लिए वर्जित था। बल्कि ‘संस्कार गणपति’ में इस बात का स्पष्ट प्रावधान है और कहा गया है कि शूद्र उपनयन के अधिकारी हैं।’’
(समग्र आंबेडकर हिंदी वांग्मय - खंड ७, पृष्ठ क्रमांक ३२५-३२६ - भारत सरकार)

म्हणजे उपनयन सर्वांना होतं हे स्वत: बाबासाहेबच म्हणताहेत. आता किती विरोध करणार????


बरं ही काही पहिली वेळ नाही प्रतिष्ठानने जानवी वाटायची!

धारकर्यांना माहिती असेल की ह्याआधीही अनेकवेळा आदरणीय गुरुजींनी सर्वांस जानवी धारण करण्यांस सांगितले आहे. थोडक्यात रायगडावरच्या यज्ञोपवीत धारणाला विरोध करणार्यांना व त्यातही अकारण ब्राह्मण-ब्राह्मणेतर किंवा वैदिक-अवैदिक वाद शोधु पहाणार्यांना आमच्या धारकरी बंधुंनी दुर्लक्षित करावे. आपलं काम आपण करावे ही विनंती ! त्यांना आता काही काम नसल्याने केवळ विरोधाला विरोध करायचे काम शेष आहे. दुर्लक्षावे ही विनंती!

आता धर्मशास्त्रीय मुळ संदर्भ पाहुयांत!

आमच्या हिंदुधर्मांतल्या १६ संस्कारांचे मुळ हे वेदांमध्ये आहे. त्यामध्ये जो दहावा असा उपनयन संस्कार आहे, त्यात प्रत्येकांस यज्ञोपवीत धारण करण्याचा अधिकार आहे. विशेषत: डोक्यावर शिखा (शेंडी) व गळ्यात यज्ञोपवीत (जानवे) ह्याचा आधार वैदिक आहे तो निम्नलिखित

शिखिभ्य: स्वाहा  !
अथर्ववेद - १९.२२.२५

इथे शिखा हा शब्द स्पष्टपणे आलाय..

उपवीतिने पुष्टानां पतये नम:!
यजुर्वेद - १६.१७

इथे उपवीत म्हणजेच यज्ञोपवीत धारण करणार्या पतींचा सन्मान करा अशी आज्ञा आहे.

अथर्ववेदाचे ब्रह्मचर्य सूक्त ११ वे कांड, ५ वा अध्याय हा स्पष्टपणे उपनयनाचे व यज्ञोपवीताचा उल्लेख करतो. म्हणूनच वेदांवरचे सर्वश्रेष्ठ भाष्यकार महर्षि दयानंद

"यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतेर्यत् सहजं पुरस्तात् !
आयुष्यमग्र्यं प्रतिमुञच् शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेज:!
पारस्कर गृह्यसूत्र - २.२.१०
वैखानस व बौधायन गृह्यसुत्र सुद्धा !

हा संदर्भ देतात सत्यार्थ प्रकाश मध्ये.

यज्ञोपवीताची वैज्ञानिक कारणमीमांसा

यज्ञोपवीत का आवश्यक ह्याची वैज्ञानिक कारणमीमांसा उपरोक्त श्लोकात आहे. तिथे पुरस्तात् असा शब्द आहे ज्याचा अर्थ हे यज्ञोपवीत आधीपासूनच आहे असा होतो. आता आधीपासून म्हणजे कधी?

तर मातेच्या गर्भापासून!

 तिथे आपल्या शरीराचे भरणपोषण ज्या जोडलेल्या नाळीने होते, जी आपल्या नाभींस जोडलेली असते, त्याचे चित्र जर आपण पाहिले तर तेही आपल्या यज्ञोपवीताप्रमाणेच दिसते. (सोबत गर्भस्थ शिशुचे चित्र जोडले आहे.) थोडक्यात ज्याप्रमाणे मातेच्या गर्भात तिची नाळ आपले पोषण व रक्षण करते तद्वतच उपनयनानंतर आपले गुरु आपणांस ते यज्ञोपवीत घालून आपले रक्षण करतात असा भावार्थ आहे. ही झाली वैज्ञानिक कारणमीमांसा! बाकी यज्ञोपवीताचे शारीरिक लाभ तर आहेतच. मनुस्मृतीतही हा उल्लेख आहे पहा



मातुरग्रेsधिजनं द्वितीयं मौञजीबन्धने!  तृतीय यज्ञदीक्षायाम् !
२.१६९

म्हणजे आधी आईच्या गर्भात, दुसरे उपनयनावेळी व तिसरे यज्ञाच्या दीक्षेवेळी.

आयुर्वेदांत आयुष्यवर्धक अमृता नाडी म्हटलंय यज्ञोपवीताला !

जर गर्भातली ती नाळ तुटली तर जसे आपण जीवित नाही राहु शकणार तद्वतच यज्ञोपवीताचे आहे. म्हणूनच आयुर्वेदांत त्याचा असा गौरव आहे. असेच यज्ञोपवीत व शिखेचे उल्लेख गृह्यसुत्रादि धर्मग्रंथांमध्ये व नंतरच्या सर्व परवर्ती साहित्यातही आढळतात.विस्तारभयास्तव ते इथे देत नाही.

यज्ञोपवीतांस परमपवित्र समजलं जायचं कारण वेदाध्ययन, यज्ञाधिकार ह्या सर्वांस तो संस्कार आवश्यक असल्याने त्यांस विद्यासुत्र, यज्ञसूत्र, ब्रह्मसूत्र अथवा सावित्रीसूत्र अशी नावे आहेत. यज्ञोपवीत उपनयनाचा आत्मा असल्याने सर्व हिंदुंना तो अधिकार आहे. सर्व म्हणजे सर्व. हे आम्ही पूर्ण अभ्यासाअंती लिहितोय. असो.

वेदांचा अधिकार सर्वांस आहे व त्यासाठी यज्ञोपवीत आवश्यक आहे.

आता काही जण विचारतील की आदरणीय गुरुजी तिथे काय वेदाध्ययन करणार आहेत का?  तर तसे नाही. मी केवळ मुळ संदर्भ द्यावा म्हणून लिहिलंय. त्यामुळे सर्व धारकर्यांनी ते आणायलाच हवं. तिथे आपण बत्तीस मण सुवर्ण सिंहासनाचा पवित्र सत्यसंकल्प घ्यायचा असल्याने त्या यज्ञोपवीताच्या साक्षीने तो घ्यायचा आहे. म्हणूनच हा लेखनप्रपंच!

स्त्रियांना सुद्धा यज्ञोपवीताचा अधिकार

वाल्मीकि रामायणात सीतेने यज्ञोपवीत धारण केल्याचा, संध्या केल्याचा व मेघनाथाने युद्धात माया निर्माण करण्यासाठी सीतेची प्रतिकृती निर्माण करून तिचे यज्ञोपवीत कापल्याचे उदाहरण आहे. म्हणजे सीता यज्ञोपवीत धारण करत होती. संदर्भ

यज्ञोपवीतमाधुय भिन्नता तेन तपस्विनी
युद्धकांड - ६२.३१

 तिची सासु कौसल्याही यज्ञ केल्याचा उल्लेख आहेच. वालीची पत्नी तारा देखील मंत्रविद् होती असे म्हटलंय. (किष्किन्धा कांड - १६.१२) महाभारतात कुंती स्वत: यज्ञ करत होती. (वनपर्व २८९-२०)

जर स्त्रिया धारण करत होत्या तर आपणांस काय धाड भरली आहे???

यज्ञोपवीत ९६ पेरांचेच का?

कारण प्रकृती ही ९६ तत्वांनी बनलेली आहे व आपण त्या प्रकृतीने बाध्य आहोत ही भावना रहावी म्हणून. दुसरे महत्वाचे कारण असे की मानवी आयुष्य शंभर वर्षांचे कमीतकमी मानलेलं आहे व चौथ्या वर्षानंतर मुंज केल्यांस आयुष्यांत ९६ वर्षे शेष राहतात म्हणूनही हा संदर्भ आहे.

ते डाव्याबाजूवरून उजव्या बाजुंसच उतरते का घालायचे?

वामांसदक्षकट्यन्तं ब्रह्मसूत्रं तु सव्यत: !
अन्तर्बहिरिवात्रयर्थं तत्वतन्तुसमन्वितम्!
परब्रह्मोपनिषद - १०

ह्याचे कारण हेच आहे की ह्यात तीन अवयवांचा प्रामुख्याने समावेश येतो. एक ह्रदय, द्वितीय आपली नाभी व तिसरे उजवा हाताचा मुठ. आपले ह्रदय हे डाव्या बाजुंस असून ते जानवे नाभीपर्यंत येत असल्याने त्याची जाणीव ह्रदय म्हणून श्रद्धा, नाभी म्हणून सामर्थ्य किंवा वीर्य ह्या अध्यात्मिक अर्थाने आपणांस ज्ञात राहावी हा हेतु असतो. उजवा हात हा पुरुषार्थाचा प्रतीक आहे ह्याचे प्रमाण अथर्ववेदांत आहे

कृतं मे दक्षिणे हस्ते जियो मे सव्य आहित: !
७.५०.८

खरंतर विस्तारभयास्तव जानव्याच्या अर्थाविषयी जास्ती स्पष्टीकरण देऊ शकत नाही. क्षमस्व !

हा झाला धर्मशास्त्रीय इतिहास.


अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु!!!


भवदीय,

©तुकाराम चिंचणीकर
#पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

Friday 26 May 2017

स्वातंत्र्यवीर सावरकर नास्तिक होते का की बुद्धिवादी होते की आस्तिक होते की बुद्धिवादी-आस्तिक होते की विज्ञाननिष्ठ-आस्तिक होते ?????????

#इतिहासाच्या_पाऊलखुणा

#स्वातंत्र्यवीर_सावरकर_विशेष_सप्ताह


यद्यदाचरति श्रेष्ठ: तत्तद्देवेतरो जना: !
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते!
गीता

श्रेष्ठ पुरुषांचे आचरण हे सर्वसामान्यांस नेहमीच अनुकरणीय व अनुसरणीय असल्यामुळे तात्यारावांसारख्या लोकोत्तर पुरुषाच्या व्यक्तिमत्वाचे हे वैशिष्ट्य आकळणे अत्यावश्यक आहे म्हणून हा लेखनप्रपंच!  सांप्रत बुद्धिवाद बुद्धिप्रामाण्यवाद, विवेकवाद वगैरे शब्द सतत कर्णांवर येतात. अनेकांचा असा भ्रम आहे की हे अगदी नवीनच आहे व आमच्या प्राचीन पूर्वज आर्यांस किंवा आम्हांसही जणु काही हे माहितीच नाही. तूर्तास ह्यावर भाष्य करत नाही. स्वतंत्रपणे कधीतरी करीन. पण प्रस्तुत विषयाचा विचार करता तात्यारावांच्या चरित्राचा अभ्यास करताना त्यांच्या प्रखर किंबहुना काहीठिकाणी टोकाच्या अशा बुद्धिवादाची मांडणी अनेकवेळा पहायला मिळते. सुदैवाने त्यांच्या बुद्धिवादावर प्रा. शेषराव मोरे व लंडनस्थित डॉ. वासुदेव शंकर गोडबोले ह्या दोन लेखकांनी विपुल लिखाण व संशोधन केलंय. आदरणीय प्र ल गावडेंचाही प्रबंध बर्याच वर्षांपूर्वी वाचला, त्यांना व्यक्तिगत भेटलोही व संवादही केला. भालबा केळकरांचाही ह्यावर ग्रंथ आहे असे सोबतच्या अंकात वाचायांस मिळालंय पण वाचला नाही अद्याप. असो.

समुळ ग्रंथ पाहिल्यावीण, उगाचच ठेवी जो दूषण!
गुण सांगता अवगुण, पाहें तो एक पढतमूर्ख!
दासबोध - दशक दोन, समास १०

तात्यारावांचे समग्र साहित्य नऊ खंडात प्रसिद्ध आहे. त्यांचे धनंजय कीरांनी लिहिलेलं चरित्र व बाळाराव सावरकरांनी लिहिलेलं चरित्रात्मक चार खंड हे सर्व वाचल्यावर तात्यारावांच्या ह्या व्यक्तिमत्वविशेषाचे चिंतन करणे व त्याविषयींच्या भ्रमांचे निराकरण करणे म्हणून हा लेखनप्रपंच!

नास्तिक शब्दाचा अर्थ ?

नास्तिको वेदनिन्दक: !
जो वेदांची निंदा करतो तो नास्तिक अशी मुळ व्याख्या आहे. सांप्रत ईश्वराचे अस्तित्व नाकारतो तो नास्तिक अशी व्याख्या रुढ आहे. ह्या दोन्ही अर्थाने तात्याराव नास्तिक होते का हा मुळ प्रश्न
आहे.

बुद्धिवादी बुद्धिप्रामाण्यवादी म्हणजे काय?

प्रत्यक्ष, प्रयोग, अनुभव व तर्क इत्यादींच्या आधारे सत्यशोधन करणे ही बुद्धीवादाची शास्त्रीय प्रक्रिया आहे.
बुद्धीला प्रमाण मानणे व जे बुद्धीस रुचेल, पटेल तेच मानणे व आचरणे व धर्मग्रंथात किंवा परंपरेने एखादी गोष्ट सांगितलेली आहे म्हणूनच ती प्रमाण न मानता बुद्धिवादाच्या, तर्काच्या कसोटीवर त्याची परीक्षा करणे हा थोडक्यात मला समजलेला बुद्धिवादाचा अर्थ आहे. जर ह्यात काही चुक असेल तर विद्वानांनी निदर्शनांस आणुन द्यावे ही विनंती!

विज्ञाननिष्ठा म्हणजे काय?

आमच्या धर्मशास्त्रात आम्ही ज्यांस पदार्थ विद्या म्हणतो त्यांस आधुनिक जगात आपण विज्ञान ही संज्ञा देतो. आंग्लभाषेतली साइन्स ही संज्ञा हीदेखील विज्ञानासाठी आपण योजित असतो. तेंव्हा विज्ञाननिष्ठा म्हणजे आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर प्रत्यक्ष प्रयोगाअंती जे सिद्ध होते तेच सत्य स्वीकारार्ह्य अशी साधी सोप्पी व्याख्या करता येईल. दोन गोष्टींतील कार्यकारणभाव ठरविणे हे विज्ञानाचे मुल आहे. चराचर सृष्टीची निर्मिती कशी झाली व तिचे अस्तित्व काय ह्यापासून मनुष्याच्या जीवनात त्याच्या अस्तित्वापर्यंतच्या कार्यकारणभावाची मीमांसा हा विज्ञानाचा विषय आहे. म्हणूनच विज्ञाननिष्ठेचा व बुद्धिवादाचा आधार बुद्धि हा एकच आहे असे प्रा. मोरे सर म्हणतात.

धर्मचिकीत्सा

मानवी जीवनांवर सर्वात महत्वाचा परिणाम असतो तो धर्माचा व तत्जन्य श्रद्धेचा. कुणी कितीही नाकारुदे. त्यामुळे बुद्धिवादाचा किंवा विज्ञाननिष्ठेचा किंवा आस्तिकतेचा-नास्तिकतेचा विचार करताना धर्मचिकीत्सा ही अर्थातच क्रमप्राप्त असते. अर्थात ती करत असताना आपल्याल्या त्या धर्माच्या मूलतत्वांचे ज्ञान असणे व त्या धर्मग्रंथांच्या भाषेचे ज्ञान असणेही आवश्यक असते. हे दुर्दैवाने अनेकजण समजून घेत नाहीत म्हणून गोंधळ होतो.

 असो आता सावरकरांची भूमिका उपरोक्त विषयांच्या संदर्भात काय आहे हे पहायला हवं. मुळ विषयांकडे वळुयांत आता !

सावरकर नास्तिक म्हणजे ईश्वर  नाकारणारे होते का???

अनेकजण तात्यारावांवर नास्तिकतेचे शिक्का चिकटविताना नेहमी त्यांच्या ज्या लेखाचा संदर्भ देतात तो म्हणजे

विश्वाचा देव व मनुष्याचा देव!

सावरकरांच्या गायीविषयीच्या मतांचा जसा विपर्यस्त अर्थ काढला जातो तसाच ह्या लेखाचा काढला जातो. आरंभी ह्यालेखांतून तात्यारावांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा मनुष्यजीवनांवर काहीच परिणाम होत नाही असा अर्थ लावला आहे. पण पुढे जाऊन ह्यावरून तात्याराव ईश्वराचे अस्तित्वच नाकारतात असा जो अर्थ काहीजण काढण्याचा प्रयत्न करतात ती मात्र आम्हांस अत्युक्ती वाटते. कारण की वैदिक सिद्धांतानुसार ईश्वर हा तसा निष्पक्ष आहे. तो आपल्या कार्यात तसाही कुठेच ढवळाढवळ करत नाही. प्रत्येक जीव हा कर्म करण्यांस स्वतंत्र आहे व त्याचे कर्मफलभोग भोगण्यांसही तो स्वतंत्र आहे. हा वैदिक सिद्धांत महर्षि दयानंदांनी त्रैतवाद म्हणून मांडला. आचार्य शंकरांनी मांडलेल्या अद्वैतवाद नाकारणारा हा सिद्धांत असल्याने अनेकांनी ह्याकडे दुर्लक्ष केलं. पण आमचे व्यक्तिश: ठाम मत आहे की आचार्यांनी अद्वैताचा मांडलेला सिद्धांत हा तत्कालीन परिस्थितीवश आहे. सविस्तर ह्यावर आम्ही कधीतरी लिहीन.

तूर्तास ह्या एका लेखांवरून सावरकर हे ईश्वराचे अस्तित्वच नाकारणारे होते असा आरोप प्रा. शेषराव मोरे प्रभृती लोक जो करतात तो आम्हांस अनाठायी वाटतो. कारण तात्यारावांना हेंद्री-फेंद्री सामग्री देवते मान्य नसून विश्वाचा देव एकच मान्य आहे, जो मुळचा वैदिक सिद्धांत आहे. ह्यालेखांवरून तात्याराव नास्तिक किंवा ईश्वर नाकारणारे सिद्ध होऊच शकत नाहीत.

आणि तसेही तात्यारावांनी ईश्वर नाहीच असे कुठेही ठामपणे म्हटलेलं नाहीये. शेषराव स्वत: हे मान्य करतात की ईश्वर आहे किंवा नाही, त्याचे स्वरुप काय यांत सावरकरांनी रस नाही. (पृष्ठ क्रमांक ३८) आणि हेच शेषराव पुढच्या पृष्ठांवर लगेचच ज्या ईश्वरांवर सावरकरांचा विश्वासच नाही असे म्हणतात?  ह्याला काय म्हणायचे? टीका करण्याचा आमचे हेतु नसून भ्रमांचा भोपळा फोडण्याचा हेतु आहे. अकारण निष्कर्ष काढणे वास्तवांस धरुन होणार नाही.

कुंडलिनी जागृतीचा तात्यारावांचा स्वानुभव
संदर्भ - पृष्ठ क्रमांक १८४-१८५ - रत्नागिरी पर्व - बाळाराव सावरकर

माझी जन्मठेपच्या आरंभीसच तात्यारावांनी मी व्यायाम करताना पतंजलींची योगसुत्रे तोंडपाठ म्हणत असे स्पष्ट लिहिलं आहे. अंदमानात त्यांनी कुंडलिनी जागृतीचा प्रयोग केला होता हे जगजाहीर आहे. हिंदुध्वजांवर कुंडलिनी कृपाणांकित करताना व्याख्यानात त्यांनी हा स्वानुभव प्रकट केलाय. ते म्हणतात

"कुण्डलिनी ही प्रत्येक माणसाच्या शरीर शांत पाठीच्या कण्यात असते. कमरेच्या बाजूला असलेल्या तिच्या खालच्या टोकाला मूलाधार म्हणतात. त्यांतील सुप्तशक्ती जागृत करून ती मस्तकांतील सहस्त्र धारापर्यंत पोंचली की मानवांला ब्रह्मानंद होतो, मोक्षांचे सुख मिळते असे योगशास्त्रांत सांगितले आहे. आणि आता विज्ञानानें ते सिद्ध झाले आहे. हा योगाभ्यांसी अधिकार्याचा विषय असल्याने मला त्यांची सत्यता चांगलीशी पटवून देता येणार नाही. तरी पण बंदिवासात असतांना एकट्याची एकांतातील करमणुक म्हणून या संबंधी ने मी जो थोडांसा अनुभव घेतला आहे. आणि ह्या विषयांवर जी अनेक पुस्तके वाचलीं आहेत त्यावर विश्वासून विचारविनिमयाच्या दृष्टीने आणि विद्यार्थी या नात्याने मी हा विषयसर्वांपुढे ठेवतो."

इति तात्याराव

पुढे योगसुत्रांवर तात्यारावांनी केलेलं विवेचन

ही घटना आम्हांस ऐकायला मिळाली की किंजवडेकर शास्त्री नावाच्या तत्कालीन धर्मशास्त्रांवरच्या विद्वानांशी तात्यारावांनी योगसुत्रांवर तासन्तास संवाद केला आहे. ह्यावरून त्यांचा योगाभ्यास सिद्ध होतो. आणि हा मोक्षप्राप्तीच्या दष्टीनेच आहे हे कसे नाकारणार?  केवळ शारीरिक लाभ म्हणून योग केल्याचे उदाहरण वेग ले पण कुंडलिनी जागृतीचा स्वानुभव व योगसुत्रांवर तासन्तास भाष्य हे निश्चितच चिंतनीय आहे. जिज्ञासूंनी ह्याविषयी विचार करावा.

आता ह्यावरूनही तात्यारावांना कुणी नास्तिक म्हणेल का?  तुम्हीच ठरवा !

अनादि मी अनंत मी!

ही कविता ज्या आत्मबलाचे प्रतीक आहे, ते आत्मबल तात्यारावांस नास्तिक सिद्ध करते का?

सावरकर बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ अवश्य होते!

हे आम्ही कुठेही नाकारत नाही. किंबहुना तसे ते असणे हेच त्यांच्यी व्यक्तित्वाचे वैशिष्ट्य आहे. पण बुद्धिवादी असणे म्हणजे नास्तिक असावेच हा कोण ता अट्टाहास? विज्ञाननिष्ठ असणे म्हणजेच ईश्वराचे अस्तित्व नाकारणे हे कुणी ठरविले ??? हा कुठला मापन दंड ???

हे म्हणजे आपली मानसिकता सावरकरांवर लादणे आहे. सावरकर निष्पक्षपातीपणे अभ्यासणे आवश्यक की आपली नास्तिक विचारसरणी त्यांच्यावर थोपविणे???  विचार व्हावा  ही विनंती!!!

काहीजण म्हणतात की सावरकर आधी आस्तिक होते पण ते आयुष्याच्या शेवटी काही वर्षे नास्तिक झाले!

ह्यासाठी हे लोक त्यांचा उपरोक्त लेख,  विज्ञाननिष्ठ निबंध, क्ष किरणे, अंधश्रद्धा निर्मुलन आदि लेखांचा संदर्भ देतात. पण एवढ्यावरूनही त्यांना नास्तिक ठरविणे अश्लाघ्य प्रयत्न ठरेल किंबहुना ती अत्युक्ती ठरेल.

थोडक्यात त्यांच्या समग्र साहित्याचा, चरित्राचा अभ्यास केल्यावर त्यांच्याविषयी निष्कर्ष काढताना ते बुद्धिवादी किंवा विज्ञाननिष्ठ असूनही  आस्तिकच होते असा निष्कर्ष आम्हांस काढण्याशिवाय गत्यंतर नाही!

एवंच लेखनसीमा!

तुकाराम चिंचणीकर
#पाखण्ड खण्डिणी

Wednesday 10 May 2017

भगवान बुद्ध आणि वेद





गेली दीडशे वर्षे हे सांगण्यात येतंय की भगवान बुद्धाने एक नवीन धर्म स्थापन केला व त्यांनी मुळच्या वैदिक धर्माच्या विरोधात बंड उभारले. ज्यांचा वेदांचा तर राहुदेत पण बुद्धसाहित्याचाही अभ्यास आहे असे अभ्यासु लोकही असा बालिश तर्क करतात हे पाहून आश्चर्य वाटतं. ज्यांचा काहीच अभ्यास नाही त्या विषयी काय बोलावं ???? मुळात तत्कालीन इतिहासाचा अभ्यास केल्यावर एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते की बुद्धांनी नवीन काहीच सांगितले नाही. जैनादि-बौद्ध पंथ हे केवळ वैदिक धर्मातल्या महाभारतकालानंतरच्या काही निर्माण झालेल्या अवैदिक प्रथांना विरोध करण्यासाठी निर्माण झालेले प्रतिक्रियात्मकच आहेत असे स्पष्ट लक्षात येते. पण ना वेदांचा अभ्यास ना बौद्ध साहित्याचा!  केवळ पाश्चिमात्यांच्या लिखाणावर आपली मते बनवायची ही सांप्रतकालची विद्वत्तेची कसोटी आहे की काय असे म्हटल्यांस अत्युक्ती ठरणार नाही.  म्हणूनच सत्य काय आहे हे सिद्ध करण्यासाठी केलेला हा लेखनप्रपंच!


बुद्धाने हिंदु धर्म सोडून मी नवीन धर्म संस्थापत आहे असं एकही वाक्य मला कुठेही आढळलं नाही. तो मुळात जन्माने हिंदुच होता व मेलाही हिंदुच म्हणूनच की काय राहुल सांस्कृत्यायन ह्या बौद्ध पंडिताने देखील असं स्पष्ट म्हटलं की बौद्ध श्रमण व ब्राह्मण हे एकत्र राहत व त्यांना दोघांना जर कोणती उपाधी द्यायची तर ती फक्त आणि फक्त हिंदुच असेल. ह्याबबातीत राष्ट्रपती व एक विद्वान डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णनांचं एक वाक्य फार महत्वाचे आहे. ते त्यांच्या भारत सरकारनेच प्रकाशित केलेल्या बुद्धधर्मावरच्या २५०० वर्षाच्या इतिहासकथन करणार्या एका ग्रंथात म्हणतात

बुद्धाने कोणताही नवा धर्म संस्थापिला नाही ! तो हिंदुच म्हणून जगला व महा निर्वाण करता झाला.

भारत सरकारने प्रकाशित केलेला हा ग्रंथ 👇

Buddha did not feel that he was announcing a new religion. He was born, grew up and died up a Hindu. He was restating with a new emphasis the ancient ideals of Indo-aryan civilization.

 अर्थ - बुद्धाला आपण नवा धर्म संस्थापित आहोत असं कुठेही वाटलं नाही. तो हिंदु म्हणूनच जन्माला आला, वाढला व मेलाही हिंदु म्हणूनच. त्याने इण्डो-आर्यन संस्कृतीची प्राचीन तत्वे नव्या उत्साहात पुनरुज्जीवित केली.

Dr Radhakrishnan in his Foreward to "2500 years of Buddhism", page no.68
Govt. Of India, Publication Division

ह्याचा अर्थ काय? स्पष्ट आहे.

आता काहीजण आक्षेप घेतील तर आम्ही एकच प्रश्न विचारतो की त्यांनी बुद्धाने नवीन धर्म संस्थापिल्याचे एकतरी वाक्य आणून दाखवावं.

बुद्धाला वेदद्वेष्टा ठरविणार्यांनी खालील बुद्धाचेच वेदस्तुतीचे संदर्भ पहावेत


सम समानाय वतानि जन्तु उच्चावच्च गच्छति सन्नसत्तो !
विद्वा च वेदेहि समेच्च धम्मं न उच्चावच्चं गच्छति भूरिपँजो !
सुत्तनिपात - २६२

अर्थ - इंद्रियाधीन होऊन आपल्या इच्छेने काही कर्म किंवा तप करून लोक उच्च नीच अवस्थेला प्राप्त होतात. पण जो विद्वान वेदांचा आश्रय घेऊन धर्मज्ञान प्राप्त करतो, त्याची अवनती कधीच होत नाही.

थोडक्यात धर्माचे ज्ञान हे फक्त वेदांनीच होतं हे ते स्पष्ट सांगतो. ही त्याची वेदनिष्ठा नव्हे काय???

एव पि यो वेदगु भावितत्तो बहुस्सुतो होति अवेध धम्मो !
सो खो परे निँझपये पजाना, सोतो वधानूपनिसूपपन्नो !
सुत्तनिपात ३२२

अर्थ- ज्याने वेद जाणले आहेत, ज्याने स्वत:ला स्थिर ठेवलं आहे, जो बहुश्रुत आहे व ज्याने वेदांना सत्यप्रकारे जाणलं आहे, तो स्वत: ज्ञानी बनून इतरांना जे ज्ञानाचे अधिकारी आहेत, त्यांना ज्ञान देऊ शकतो.


इथेही पुन्हा वेदज्ञानीच सर्वज्ञानी आहे असा पुनरुच्चार केलाय.

यो वेदगू ज्ञानरतो सतीमा, संबोधिपत्तो सरणं बहूनाम् !
कालेन तम्हि हव्येन पवेच्छे, यो ब्राह्मणो पुँजपेक्खो यजेय !
सुत्तनिपात - ५०३

अर्थ - जो वेदांना जाणणारा(वेदगू), ध्यानपरायण, उत्तमस्मृती असलेला(सतीमा), जो अनेकांना शरण देणारा आहे, जो पुण्य अर्जित करणारा यज्ञ करतो, त्यालाच भोजन द्या !


इथे देखील खर्या वेदज्ञ मनुष्याबद्दल आदर आहे.
आता वेदज्ञ ब्राह्मणाची केलेली प्रशंसा पाहुयात.

यं ब्राह्मणं वेदगुं अाभिजन्ना, अकिचनं कामभावे असत्तं !
अद्धा हि सो ओघमिम अतारि, तिण्यो च पारं अखिलो अकखो !
सुत्तनिपात - १०५६

अर्थ - ज्याने त्या वेदज्ञ ब्राह्मणाला जाणलं की जो अकिंचन म्हणजे धनहीन आहे, कामहीन आहे, तो आसक्तीरहित असा ह्या संसारातून नक्कीच तारला जातो.

थोडक्यात वेद जाणणाराच संसारसागरातून पर होतो.

विद्वा च सो वेदगु नरोइव, भवाभवे संग इम विसज्जा !
सो विततण्णो अनिघो निरासो अतारि सो जाति जरांति ब्रूमीति !
सुत्तनिपात - १०६०

अर्थ - वेदांना जाणणारा विद्वान (वेदगु) ह्या संसारात जन्म किंवा मृत्युमध्ये आसक्ति सोडून, तृष्णा व पापरहित होऊन, जन्म व वृद्धावस्था रहित होतो, असं मी (बुद्ध) म्हणतो.

थोडक्यात पुन्हा इथे वेदज्ञानी मनुष्याचे कौतुक केलं असून तो पापरहित होऊन मुक्ती प्राप्त करतो हे स्वत: बुद्धच सांगतोय.

ब्रूमीति म्हणजे मी म्हणतो असा अर्थ आहे ! मी म्हणजे बुद्ध स्वत: !

ने वेदगु दिठ्ठिया न मुतिया स मानमेति नहि तन्मयोसो !
न कम्मुना नापि श्रुतेन नेय अनुपनीत: न निविशनेषु !

अर्थ - वेदांना जाणणारा कधीही सांसारिक दृष्टी व असत्यविचाराने कधी अंहकारास प्राप्त होत नाही. केवळ कर्म नि श्रवणाने तो कधीही प्रेरित होत नाही.


बुद्धाने जी काही निंदा केलीय ती खोट्या वैदिकांची ! सत्य जाणणार्या वैदिकांची नव्हे ! जे स्वत:ला वैदिक म्हणवितात परंतु वेदांचा अर्थच जाणत नाही, त्यांची निंदा केलीय. अर्थात अशी निंदा निरुक्तकार यास्काचार्यांनी पण केलीय. पण म्हणून त्यांना कुणी वेदनिंदक म्हणतं काय???तसंच हे बुद्धाचे आहे.

संस्कृतमध्ये एक श्लोक आहे

यथा खरश्चंदनभारवाही न तु वेत्ति तत्वत: !

म्हणजे चंदनाचा भार वाहणार्या गाढवाला त्याचं ज्ञान असतं का? नाही ! कारण त्याच्यासाठी ते फक्त ओझंच असतं.

तसंच वेद नुसते पाठ करणारे पण त्याचा अर्थ न जाणणार्यांबद्दल व त्यानुसार आचरण न करणार्यांबद्दल बुद्धाने म्हटलंय. ह्याचा अर्थ वेदपठण करणारे गाढव आहेत असे नसून त्यांनी अर्थही जाणावा अशी अपेक्षा असते. आता ह्यावरून बुद्धाला वेदनिंदक म्हणणे हे वदतो व्याघाताचे उदाहरण होणार नाही काय???


मी ब्राह्मणच आहे - इति बुद्ध

एक कथा पाहणं आवश्यक आहे

सुंदरिक भारद्वाज सुत्ता मध्ये कथा येते की सुंदरिक ब्राह्मणाने जेंव्हा यज्ञ समाप्त केला, तेंव्हा त्या यज्ञाचा शेषभाग तो एका ब्राह्मणाला देऊ इच्छित होता. त्याने संन्यासी गौतमाला पाहिलं व त्याची ज्ञाती (जात) विचारली. तेंव्हा बुद्ध म्हणाला

"जात विचारु नये. मी ब्राह्मणच आहे."

 तो पुढे म्हणतो

यदन्तगू वेदगु यन्नकाले, यस्साहूति लभे तरस इज्जेति ब्रूमि
सुत्तनिपात ४५८

अर्थ - वेदांना जाणणारा (वेदगु) ज्याच्या आहूतीस प्राप्त करतो, त्याचा यज्ञ सफल होतो, असं मी म्हणतो.

पुढे सुंदरिक भारद्वाज म्हणतो की,

"माझा यज्ञ आज सफल झाला कारण आपल्यासारखा वेदज्ञ महापुरुष आज माझा यज्ञशेष प्राप्त करता झाला."

आता ह्यावरूनही बुद्ध हा यज्ञांचा समर्थक ठरत नाही काय? की हे वाचूनही त्याकडे दुर्लक्ष करणार??की ह्यावरून बुद्धाला ब्राह्मणद्वेष्टा ठरविणार??? पण तरीही काही लोक बुद्धांस यज्ञद्वेष्टा ठरवितात.

काय म्हणावं ह्यांच्या बुद्धीमांद्यास???


बुद्धाचे वेदाध्ययन


डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या "बुद्ध आणि त्याचा धम्म" ह्या ग्रंथात बुद्धाच्या वेदाध्ययनासंबंधी सविस्तर लिहिलं आहे. तरीही
ललितविस्तार नामक ग्रंथात बुद्धाच्या वेदाध्ययनाची कथा सविस्तर आलीय.

सिद्धार्थाने ब्रह्मचारी राहून चारीही वेदांचं अध्ययन केलंय ह्याचा पुरावा ललितविस्तार मध्ये आहे.

स ब्रह्मचारी गुरुगेह वासी, तत्कार्यकारी विहितान्नभजी !
सायं प्रभातं च हुताशसेवो, वूतेन वेदाश्च समध्यगीष्ट !

अर्थ - त्याने ब्रह्मचारी बनून गुरुगृही निवास करून त्यांची सेवा करून शास्त्रविहीत भोजन करून प्रात:सायं यज्ञ करून वेदांचं अध्ययन केलंय.

बुद्धाने यज्ञाची निंदा केली नसून यज्ञातल्या पशुहत्येची निंदा केलीय.

ब्राह्मणाधिगम्य सुत्त नावाने जे सुत्त आहे, त्यात बुद्धाच्या यज्ञाची निंदा वाचायांस मिळते. पण ही निंदा यज्ञाची नसून हिंसक यज्ञाची आहे. ज्या यज्ञात पशुहत्या केली जाते व प्राण्यांचा जीव घेतला जातो, त्या यज्ञांची निंदा बुद्धाने केलीय.पण काही दीडशहाण्यांनी ह्याचा विपरीत अर्थ काढून बुद्धाला यज्ञद्वेष्टा ठरविला.

त्रिपीटककारांनी स्पष्टपणे बुद्धाचा वेद व यज्ञावरचा विश्वास प्रकट केलाय.

बुद्ध स्वत:स वेदगु व वेदांतगु म्हणतो

(संदर्भ - चुल्लनिद्देश्य २.४.१८ व २.४.२८,  महानिद्देस्स १.९.८१ व १.१५.१८२, सिघनिक्काय)


संयुत्त निकाय हे पाच वेदांचा उल्लेख करतो. आता पाचवा वेद म्हणजे महाभारत किंवा इतिहास असेल हे स्पष्ट आहे. कारण महाभारताला पंचम वेद म्हणण्याची परंपरा आहे.

"टिन्नम् वेदनम् परगु" असं शैल ब्राह्मण मझ्झिम निकाय मध्ये स्पष्ट म्हणतो. इथे वेदनम् हा शब्द स्पष्ट आहे.

उज्जय सुत्त, सम्युत्त निकाय व सहावग्गसुत्त हे ३.९ मध्ये स्पष्टपणे बुद्धाच्या दृष्टिकोनातुन खरा यज्ञ कोणता व खोटा कोणता हे स्पष्ट करतं.

"एतम् यन्नं महाफ्फलो, एतं यजेत मेधावी, एतं हि यजमानसेवा सेयं होति " असे उल्लेख स्पष्ट आहेत.

आता अग्निहोत्राचा उल्लेख

अंगुत्तरनिकाय, सम्युक्त निकाय, मझ्झिमनिकाय ह्यामध्ये अग्निहोत्र करा असा उल्लेख निषाद व रथाकारास आहे.

गौतम बुद्ध हा यज्ञ च्या ऐवजी "यन्न" हा पालीभाषेतला शब्द वापरतो फक्त एवढाच फरक.  अनेक ठिकाणी बुद्धाने यज्ञसंस्थेचे कौतुक केल्याची उदाहरणे आहेत व ती विश्वासार्ह आहेत. अगदी धम्मपदाची किंवा सुत्तनिपात किंवा तत्सम ग्रंथांची उपरोक्त उदाहरणे नक्कीच अभ्यसनीय आहेत.

आता तुम्हीच ठरवा सत्य काय ते !

तुका म्हणे सत्य असत्यासी !
मन केले ग्वाही !

© तुकाराम चिंचणीकर
पाखंड खंडिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

महात्मा गौतम बुद्ध जयंतीनिमित्त त्याच्या हिॅदुत्वाचं चिंतन!



एक असत्य सहस्त्रवेळा सांगितलं की ते सत्य वाटायला लागतं - इति गोबेल्स, मार्क्सवादी साम्यवादी, सेक्युलर, पुरोगामी, सर्धर्मसमभावी, बामसेफी, ब्रिगेडी तंत्र

गेली दीड दोन शतके ब्रिटीशप्रणित व मार्क्सवादी साम्यवादी दृष्टीकोनातून हिॅदुस्थानच्या इतिहासासंबंधित असा काही भ्रम हेतुपुरस्सर पसरविण्या येतो की 
१. बुद्धाने हिॅदु धर्म सोडून नवीन धर्म संस्थापिला
२. बुद्धाने वैदिक धर्माच्या विषमतेला कंटाळून त्याला विरोध करून आपल्या नवीन धर्माची संस्थापना करून फार मोठी सामाजिक क्रांती केली. जैनांनीही ही अशीच क्रांती केली असाही प्रवाह आहे.
३. बुद्धाने व जैनांनीच अनादिकाळापासून असेलेली अस्पृश्यता नष्ट केली व बहुजन समाजास ब्राह्मणांच्या दास्यातून मुक्त केले. 
४. बुद्धाचा जन्म अडीच सहस्त्र वर्षापूर्वीचा ! 
५. बुद्धाने वेद व यज्ञ संस्थेच्या विरोधातच बंड पुकारले व यज्ञ बंद पाडले. 
६. बुद्धाने ब्राह्मणांचं परंपरागत श्रेष्ठत्व नष्ट केलं किंवा तो ब्राह्मणद्वेष्टा होता.
७. बुद्धाने यज्ञातील पशुहिॅसेस विरोध केला व यज्ञ बंद पाडले
८. बुद्धाने सर्वांस समान अधिकार दिले व ब्राह्मणशाही नष्ट केली.
९. बुद्ध हे डुकराचे मांस खाऊन मेला काय???

आता ह्या थोतांड असलेल्या आक्षेपांचं थोडक्यात निराकरण आपण करुयात. कारण आज बुद्ध जयंती असल्याबद्दल ह्या महान हिॅदुश्रेष्ठास योग्य न्याय देणं हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो म्हणूनच हा लेखनप्रपंच ! 

आम्ही पुनश्च एकदा सांगु इच्छितो की आम्हांस बुद्धाबद्दल नितांत आदरच आहे परंतु त्यांच्याबद्दल पसरविल्या जाणार्या कपोलकल्पित कल्पनांना आमचा विरोध आहे व त्यांचं निकाकरण करणं हीच आम्ही त्याला एक श्रद्धांजली समजतो. असो

पहिला आक्षेपाचं खंडण

बुद्धाने हिॅदु धर्म सोडून मी नवीन धर्म संस्थापत आहे असं एकही वाक्य मला कुठेही आढळलं नाही. तो मुळात जन्माने हिॅदुच होता व मेलाही हिॅदुच म्हणूनच की काय राहुल सांस्कृत्यायन ह्या बौद्ध पंडिताने देखील असं स्पष्ट म्हटलं की बौद्ध श्रमण व ब्राह्मण हे एकत्र राहत व त्यांना दोघांना जर कोणती उपाधी द्यायची तर ती फक्त आणि फक्त हिॅदुच असेल. ह्याबबातीत उपराष्ट्रपती व एक विद्वान डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णनांचं एक वाक्य फार महत्वाचे आहे. ते त्यांच्या भारत सरकारनेच प्रकाशित केलेल्या बुद्धधर्मावरच्या २५०० वर्षाच्या इतिहासकथन करणार्या एका ग्रंथात म्हणतात


बुद्धाने कोणताही नवा धर्म संस्थापिला नाही ! तो हिॅदुच म्हणून जगला व मेला.

भारत सरकारने प्रकाशित केलेला हा ग्रंथ 👇

Buddha did not feel that he was announcing a new religion. He was born, grew up and died up a Hindu. He was restating with a new emphasis the ancient ideals of Indo-aryan civilization. 
 अर्थ - बुद्धाला आपण नवा धर्म संस्थापित आहोत असं कुठेही वाटलं नाही. तो हिॅदु म्हणूनच जन्माला आला, वाढला व मेलाही हिॅदु म्हणूनच. त्याने इण्डो-आर्यन संस्कृतीची प्राचीन तत्वे नव्या उत्साहात पुनरुज्जीवित केली.

Dr Radhakrishnan in his Foreward to "2500 years of Buddhism", page no.68

Govt. Of India, Publication Division

ह्याचा अर्थ काय? स्पष्ट आहे. 

आता काहीजण आक्षेप घेतील तर आम्ही एकच प्रश्न विचारतो की त्यांनी बुद्धाने नवीन धर्म संस्थापिल्याचे एकतरी वाक्य आणून दाखवावं.


दुसर्या आक्षेपांचे खंडण 

म्हणे बुद्धाने व जैनांनी वैदिक धर्माच्या विषमतवादी धोरणांस कंटाळून वेगळा धर्म संस्थापून फार मोठी वेगळी सामाजिक क्रांती केली.

हा विचार किती तथ्यहीन व तर्कदृष्ट व वास्तवांस सोडून आहे हे आता पाहु.

बुद्ध हा स्वत:च विषमता वादी अर्थात वर्णश्रेष्ठत्वाचा अभिमानी होता - हे घ्या पुरावे

न बोधिसत्ता हीनकुलेषु उपद्यन्ते

म्हणजे बौधिसत्व हे हीन कुळात कधीच जन्म घेत नाही.

ह्याचा अर्थ काय? ह्याला वर्णवर्चस्वाचा अभिमानच म्हणणार ना??? बुद्धाच्या शाक्य कुळात भावा बहिणींची लग्ने होत होती ! स्वत: बुद्ध अंबष्ठसुतात अंबष्ठ ब्राह्नणाला सांगतो की "आम्ही क्षत्रिय वंशाचे शुद्धत्व राखण्यासाठी बहिणींशी लग्न करतो !"

गौतम बुद्ध हा कुळाचे वंशाचे शुद्धत्व राखणारा आहे म्हणजेच तो जातीवादी होता ! अशा जातीवादी बुद्धाला आंबेडकर शरण का गेले हेच कळत नाही. हे बुद्धाचे रिडल्स आंबेडकरांना का दिसले नाही???

गौतमाचा पुर्वज औक्काक राजा ! त्याच्या मुलामुलींनी भाऊ बहीण असून आपसांत लग्न केली ! म्हणजेच वंशाचे व कुळाचे शुद्धत्व राखले ! ह्यावरून बुद्धाने फार मोठी सामाजिक क्रांती केली ह्याचा पुरावा काय???

थोडक्यात आंबेडकरांचा बुद्ध हा मुळ बुद्धापेक्षा वेगळा आहे

हे तत्कालीन महाबोधी मासिकाने व बौद्ध पंडितांनी वेळोवेळी आंबेडकरांच्या धम्मांतराबद्दल मांडलेले मत आहे. आंबेडकरांनी श्रीरामाला शिव्या घातल्या पण स्वत: बुद्ध हा श्रीरामचंद्राबद्दल काय म्हणतो ते पहा
जातककथा स्पष्ट सांगते की बुद्ध हा रामाचाच अवतार आहे ! दशरथ जातक सांगते की स्वत: गौतम बुद्ध म्हणतात की, " शुद्धोधन म्हणजे दशरथ, कौसल्या म्हणजे महामाया, सीता म्हणजे यशोधरा व राम म्हणजे मी स्वत: गौतम ! 


तिसर्या आक्षेपाला उत्तर

म्हणे अस्पृश्यता ही वैदिक धर्मप्रणितच होती व ती बुद्धांनी व जैनांनी नष्ट करून फार मोठे उपकार केले.

एकतर ह्या सिद्धांताला एकही तत्कालीन पुरावा नाहीये. जो बुद्ध स्वत: वंशश्रेष्ठत्व राखतो, तो अस्पृश्यता नष्ट करीलच कसा??? व अस्पृश्यता त्याच्या आधी होती ह्याचा एकही पुरावा नाहीये. आता खालील पुरावे घ्या.

जातीव्यवस्था नि अस्पृश्यता हिॅदुस्थानात कशी आली ह्यासंदर्भात अनेकांनी अनेक तर्कवितर्क करून वेगवेगळे सिद्धांत मांडले आहेत. 

पण आंबेडकर व महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंच्या मतानुसार हिॅदुस्थानात ह्या कुप्रथा ह्या बौद्ध व जैनकाळातच निर्माण झाल्या !

आंबेडकरांनी तर पहिल्या खंडात (इंग्रजी) स्पष्ट सांगितलंय की अस्पृश्यता किॅवा जातीव्यवस्था ही ब्राह्नणांनी निर्माण केली असा जो आपला समज आहे तो चुकीचा आहे. वस्तुत: ही गोष्ट त्यांच्या क्षमतेबाहेरची आहे असं ते म्हणतात ( Brahmins are to be blamed for many things but as far as creation of untouchability is concerned, such creation of Untouchability or Casteism was a work beyond the mettle of the Brahmins.)

महर्षी विठ्ठल रामजी शिॅदेंनी तर "अस्पृश्यतेचा प्रश्न" ह्या त्यांच्या निबंधात तर स्पष्ट पुराव्यासहित प्रतिपादन केलंय की बौद्धांनी व जैनांनीच नंतर
ह्या कुप्रथा निर्माण केल्या.

अस्पृश्यता ही वेदप्रणीत नाहीच नाही.

त्यामुळे आधी हे सर्व होते व बुद्धाने येऊन हे सर्व झुगारून देऊन फार मोठी समाजिक क्रांती केली हा तथ्यहीन सिद्धांत आहे. थोडक्यात बुद्धाने सामाजिक क्रांती केली हे केवळ थोतांड असून खरं तर त्यानेच जातीव्यवस्था निर्माण केली असा आरोप करायलाही जागा आहे. कारण तो वंशश्रेष्ठत्वाचा अभिमानी आहे. 

आता ह्याबाबतीत डाॅ सर्वपल्ली राधाकृष्णन पुन्हा त्यांच्या  "Indian Philosophy" ह्या त्यांच्या द्विखंडात्मक ग्रंथात ते म्हणतात. 
की बुद्धाने व जैनांनी कोणतीही सामाजिक क्रांती केलीच नाही ! घ्या पुरावे ' 👇


The Myth of Buddha's Social revolution

Actually Buddha did not create any kind of social revolution. 

"We cannot say that Buddha abolished caste, for the religion of buddha is an aristocratic one. We cannot say that Buddha effected any Social revolution. Even Birth in a Bramhin family, Buddha allows it to be a reward for the merit.

The still very prevalent notion that Buddhism and Jainism were reformatory movements, and that more especially they represented the revolt against the tyranny of caste, is quite erroneous. 

Buddha was not social reformer."

अर्थ - आपण असं नाही म्हणु शकत की बुद्धाने ज्ञातीव्यवस्था नष्ट केली, कारण बुद्धाचा पंथ हा स्वत:च वंशाभिमानी आहे. त्यामुळे बुद्धाने फार मोठी सामाजिक क्रांती केली असं आपण म्हणूच शकत नाही. कारण बुद्ध हा ब्राह्नण कुलात जन्म घेणं हेदेखील एक गुणश्रेष्ठत्वाचे प्रतीक मानतो. 

बुद्ध व जैन चळवळी ह्या ज्ञातीव्यवस्थेच्या छळाविरुद्ध झालेल्या आहेत ही आजपर्यंत असलेली समजूतच पूर्ण चुकीची आहे. कारण बुद्धाने कोणतीही सामाजिक क्रांती केली नाही. 

Dr Radhakrishnan - Indian Philosophy Volume 1  - pg no. 437-441


अर्थात इथे एक गोष्ट जाता जाता सांगायला हवी की आंबेडकरांनी ह्या संदर्भात अनेक कोलांट्या उड्या मारल्या आहेत. प्रसिद्ध अभ्यासक शेषराव मोरे सरांचं पण हेच मत आहे की बुद्धाला श्रेष्ठ ठरविण्यासाठी आंबेडकरांनी फार फिरवफिरवी केली आहे. असो तो स्वतंत्र विषय कधीतरी लिहु.


चौथ्या आक्षेपाचं खंडण

पाश्चिमात्य इतिहासकारांनी विशेषत: ब्रिटीशांनी अठराव्या, एकोणिसाव्या व विसाव्या शतकाच्या सुरुवातीस जे काही भारताबद्दल इतिहासलेखन केलं, त्यात भारताचा इतिहास हा दीड ते दोन सहस्त्र वर्षांनी पुढे आणण्याचं एक घोर पातक त्यांनी केलं. बुद्धाचा काळच ह्या लोकांनी १५०० ते १८०० वर्षे पुढे आणला ! त्यामुळे आदि शंकराचार्यांचा काळही तेराशे वर्षे अकारण पुढे आला जो आज चुकीचा असा इ स ७८८ ते ८२० असा मानला जातो ! 
पण पु ना ओक व इतिहासभूषण श्रीपाद दत्तात्रय कुलकर्णी ह्या दोन सत्यनिष्ठ व प्रथितयश इतिहासकारांनी मात्र ह्या थोतांडांना उघड्यावर पाडुन वास्तव मांडलं. पण लोक त्यांना मानायला तयारच नाहीत कारण डोक्यावर अजुनही मार्क्सवादाचा पगडा आहे. ओकांच्याही पुढे जाऊन कुलकर्णींनी त्यांच्या भीष्म नावाने प्रकाशित केलेल्या अष्टादश खंडात्मक इतिहासविवेचनातून हिॅदुस्थानचा इतिहास हा संदर्भासहित व पुराव्यासहित मांडला. त्यात त्यांनी बुद्धाचा व आदि शंकराचार्यांचा काळही हे दोघेही वास्तव स्वरुपात कित्येक वर्षे मागे नेले.

शंकराचार्यांचे जन्मवर्ष सामान्यत: इ स ७८८ धरण्याच येते जे चुक असून एकही शंकराचार्यांची गादी किॅवा पीठाधीशांचे संदर्भ हे मानत नाहीत. विशेष म्हणजे ह्या सर्व पीठाधीशांकडे ज्या काही आचार्यांच्या जन्मतिथ्या आहेत, त्यात सर्वत्र त्यांची जन्मवर्ष हे ई. सन पूर्वीचंच आहे 
संदर्भ - भारतीय इतिहास संशोधनातील घोडचुका - पु ना ओक

म्हणूनच आचार्यांचा काळ १२९७ वर्षे मागे म्हणजेच इस पूर्व ५०९ हाच योग्य जन्मकाल आहे !

हे इतिहासभूषण श्रीपाद दत्तात्रय कुलकर्णींचे मत ग्राह्य व योग्य व वस्तुनिष्ठतेस धरून आहे. 

आता हे पाश्चिमात्यांनी असं का केलं?

साहजिकय की पाश्चिमात्यांना त्यांच्या येशु ख्रिस्तांच्या अवतरणपूर्वी सर्व जग हे अंधारातच आहे असं वाटत होतं. त्यामुळे त्या अट्टाहासापायीच त्यांनी भारतीय इतिहासलेखन करताना ह्या दोन महापुरुषांवर हा अन्याय केला. आणि इतकंच नव्हे तर ह्याच इतिहासकारांनी अनेक ठिकाणी त्यांच्या प्रसिद्ध "फोडा आणि राज्य करा"
ह्या नीतीसाठीच हे केलं हे उघड आहे. बुद्धाला व जैनांना वेगळा पाडलं की आपोआप हिंदुसमाज विभाजित होतो हे षडयंत्र होतं. असो.

पाचव्या आक्षेपाच खंडण

बुद्ध हा यज्ञ व वेद विरोधी होता असा एक खोडसाळ प्रचार केला जातो, जो कितपत सत्य आहे आता आपण पाहु. खरंतर ह्यासाठी एक स्वतंत्र ग्रंथनिर्मिती करता येईल असा हा विषय आहे. तरीही थोडक्यात पाहु.

त्रिपीटककारांनी स्पष्टपणे बुद्धाचा वेद व यज्ञावरचा विश्वास प्रकट केलाय. 

बुद्ध स्वत:स वेदगु व वेदांतगु म्हणतो

(संदर्भ - कल्लनिद्गेश्य २.४.१८ व २.४.२८, 
 महानिद्देस्स १.९.८१ व १.१५.१८२, सिघनिक्काय)

सम्युत्त निकाय हे पाच वेदांचा उल्लेख करतो. आता पाचवा वेद म्हणजे महाभारत किॅवा इतिहास असेल हे स्पष्ट आहे. कारण महाभारताला पंचम वेद म्हणण्याची परंपरा आहे. 

टिन्नम् वेदनम् परगु असं शैल ब्राह्मण मझ्झिम निकाय मध्ये स्पष्ट म्हणतो. इथे वेदनम् हा शब्द स्पष्ट आहे.

उज्जय सुत्त, सम्युत्त निकाय व सहावग्गसुत्त हे ३.९ मध्ये स्पष्टपणे बुद्धाच्या दृष्टिकोनातुन खरा यज्ञ कोणता व खोटा कोणता हे स्पष्ट करतं. 
"एतम् यन्नं महाफ्फलो, एतं यजेत मेधावी, एतं हि यजमानसेवा सेयं होति " असे उल्लेख स्पष्ट आहेत.

 अग्निहोत्राचा उल्लेख

अंगुत्तरनिकाय, सम्युक्त निकाय, मझ्झिमनिकाय ह्यामध्ये अग्निहोत्र करा असा उल्लेख निषाद व रथाकारास आहे. 

गौतम बुद्ध हा यज्ञ च्या ऐवजी "यन्न" हा पालीभाषेतला शब्द वापरतो फक्त एवढाच फरक.   अनेक ठिकाणी बुद्धाने यज्ञसंस्थेचे कौतुक केल्याची उदाहरणे आहेत व ती विश्वासार्ह आहेत. अगदी धम्मपदाची किंवा सुत्तनिपात किंवा तत्सम ग्रंथांची उदाहरणे नक्कीच अभ्यसनीय आहेत. त्यामुळे बुद्धाला यज्ञद्वेष्टा ठरविणं अशक्य आहे. ह्याविषयांवर स्वतंत्रपणे मी लेख लिहीनच तूर्तास तरी एवढंच सांगतो की जिज्ञासुंनी श्रीपाद दत्तात्रय कुलकर्णी लिखित "Dharma and Vedic Foundations" हा ग्रंथाच्या शेवटचा भाग वाचावा ज्यात म्हणजे  VIII Chapter हा Buddha's love for Cow and yajnya" असा विषय आहे जो पृष्ठ क्रमांक ३४७ ते ३५६ वर विस्तारलेला आहे.


सहाव्या आक्षेपाचं खंडण

बुद्धाला ब्राह्नणद्वेष्टा ठरविणार्यांनी खालील गोष्टी पहाव्यात. 

आपला धम्म म्हणजे ब्राह्मणधर्मच आहे हे त्रिपिटकात शेकडो वेळा सांगितलेलं आहे.

१) संयुकातनिकाय-महावग्ग

"भिख्खू हो! ब्राह्मण्य म्हणजे काय आणि ब्राह्मणफल म्हणजे काय ते तुम्हास उपदेशितो."

२) खुद्दकनिकाय- उद्दालकजातक.

(नर कशाने) ब्राह्मण होतो , कसा केवली होतो. ' असा प्रश्न आहे. त्याचे उत्तर ' अग्निचयन करणारा , जलसिंचन करणारा , यज्ञासाठी यूप उभारणारा असा ब्राह्मण क्षेमी होतो आणि तो धर्माच्या ठायी प्रतिष्ठित समजावा (ध्म्मे ठित)

३) थेरगाथा- सुनीतथेर.

तपाने, ब्रह्मचर्याने , संयमाने , दमाने , ह्याने (माणूस) ब्राह्मण होतो. हेच उत्तम ब्राह्मण्य.

४) खुद्दकनिकाय मोरजातक.

जे ब्राह्मण सर्वधर्माच्या बाबतीत वेदज्ञ (वेदगू) असतात त्यांना मी नमितो , ते माझे रक्षण करोत .

५) अपण्णकजातक -

त्याचे शरीर ब्रह्मतेजाने झळकत होते. ब्रह्मस्वराने त्याने धर्म कथा सांगितली.

६) खुद्दकनिकाय - महावग्ग - अजपालकथा.

जो ब्राह्मण पापवृत्ती सोडून , निरहंकारी होवून ,संयत होवून ब्रह्मचर्य आचरितो (असा) वेदज्ञान (वेदांतगू) ब्राह्मण त्यानेच 'ब्रह्म ' वाद सांगावा.

७) खुद्दकनिकाय- महावग्ग बोधिकथा -

जेंव्हा प्रयत्नशील , ध्यानी ब्राह्मणासाठी प्रकटतात अस्तित्वधर्म (गौतमाला बोधी प्राप्त झाल्यानंतर त्याच्या मुखातून   उमटलेल्या पहिल्या काही उद्गारात ' ब्राह्मणाचा ' उल्लेख आहे.) आणि हा श्लोक तीन वेळा पुनरुक्त आहे.

८) अंगुत्तरनिकाय -

परीव्राजकांनो! ही चार ब्राह्मणसत्ये , ती मी स्वत: जाणून , साक्षात पाहून उपदेशिली.

९) धम्मपदामध्ये एक संपूर्ण प्रकरण (वग्ग)
ब्राह्मणस्तुतिमय आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने ते प्रकाशित केलंय. संकेतस्थळांवर ते आहे. 

मनुलाही हेवा वाटेल अशा शब्दात गौतमाने ब्राह्मणांचा आणि ब्राह्मण्याचा गौरव केला आहे. ह्या प्रकरणात एक्केचाळीस श्लोक आहेत. त्यातील अनेक श्लोकात ' तमहं ब्रुमि ब्राह्मणं' ' त्यास मी म्हणे ब्राह्मण ' हे पालुपद येते. गौतमबुद्धाला प्रिय असलेला हा ब्राह्मणम्हणजे भगवद्गीतेतील स्थितप्रज्ञ , गुणातीत ,भक्त, योगी , संन्यासी , कर्मयोगी , सात्विक वगैरे. ह्या संपूर्ण ब्राह्मणवग्गांच निरुपण स्वतंत्र शोधलेखाचा विषय आहे.ह्या आदर्श ब्राह्मणाला गौतमाने स्नातक , वृषभ (नेता) प्रवर , वीर ,महर्षी , अर्हत , सुगत आणि बुद्धसुद्धा ह्या संज्ञा वापरून गौरविले आहे. ह्या सर्व संज्ञा तीपिटक-ग्रंथात अनेकवार बुद्धाला स्वत:ला लावलेल्या आढळतात.

धम्मपदातील ३८९ वा श्लोक नोंद घेण्यासारखा आहे.

'ब्राह्मणांचे वाईट करू नका , आपल्यावर हल्ला करणाऱ्यावरही ब्राह्मणाने धावून जाऊ नये. जो ब्राह्मणावर प्रहार करील त्याचा धिक्कार असो. '

१०) खुद्दकनिकाय- भूरिदत्तजातक.

ब्राह्मण १) अध्ययन करणारा.
            २) भिक्षचर्य आचरणारा.
            ३) आहुताग्नी असतो. ह्या तीन गोष्टींमुळे ब्राह्मण हा अवध्य ठरतो.

११) खुद्दक- निमिजातक.

जे अत्यंत पापी लोक श्रमणाला किंवा ब्राह्मणाला इजा करतात किंवा आणतात, ते भीषणकर्मे लोक पाप प्रसवून,  खाली डोके (अश्या अवस्थेत) (उकळत्या) लोहकुंभीत पडतात.

१२) मजिझ्म- जे धम्म श्रमणकरणीय ,ब्राह्मणकरणीय , ते स्वीकारून आम्ही आचरु.

१३) मजिझ्म - ह्या भिक्खुला , अरे भिक्खु हो! श्रमण म्हणतात, ब्राह्मण म्हणतात.

चांगल्या अर्थाने गौतमाला ब्राह्मण्याने झपाटलेलं होतं. ( obsessed) आता आजच्या बुद्धिस्टांना हे पटणार आहे काय?

की ह्यालाही बामणी कावा म्हणूनच तुम्ही ठोकरणार आहात??? स्वत:च्या सोयीनुसार??? 

हे वाचल्यावर बुद्ध हा मनुपेक्षा ब्राह्नणवादी जास्ती आहे हे का लक्षात येत नाही लोकांच्या???


सातव्या आक्षेपाचं खंडण

बुद्धाने यज्ञातील पशुहिॅसेस विरोध केला व यज्ञ बंद पाडले असा एक खोटा सिद्धांत मांडला जातो, जो थोतांड आहे. कारण वर आपण पाहिलेच आहे की बुद्ध हा यज्ञसंस्थेचा किती स्तुतीपाठक होता. जो वेदांना मानतो तो यज्ञाला मानणार हे जगजाहीर आहे. 

फक्त प्रश्न आहे यज्ञातील मांसाहाराचा किंवा पशुहत्येचा

त्याबाबतीतही केवळ गृह्यसुत्रांचा संदर्भ देऊन काही लोकांनी गोहत्या वेदप्रणीतच आहे असा सोयीचा निष्कर्ष काढला आहे व तोच मुळात तर्कहीन व आधारहीन आहे. खरंतर ह्यावर आम्ही स्वतंत्रपणे ग्रंथनिर्मिती करतच आहोत व त्यात ह्याबद्दल पूर्ण भूमिका मांडूच. तूर्तास तरी एक सांगणं आवश्यक आहे की जर बुद्ध हा मांसांच्या विरोधात होता तर मग तो स्वत: मांस खात होता हे का? त्याचा मृत्यु डुकराच्या मांसखाल्याने झाला असा एक प्रचार आहे व अनेक बौद्ध इतिहासकार हे मानतात पण हे व्यक्तिश: मला पटत नाही. त्यावर मी स्वतंत्रपणे कधीतरी लिहीनच. पण तूर्तास तरी हे सांगु इच्छितो की त्याकाळी वेदांना न जाणणार्या वामपंथी लोकांनी कदाचित यज्ञात प्राणीहत्या सुरु केलीही असेल व बुद्धाने ती बंद केली असेल. पण म्हणुन तो यज्ञद्वेष्टा होता हे मात्र चुकीचं आहे हे वेगळं सांगायला नको.



आठव्या आक्षेपाचं खंडण

बुद्धाने सर्वांस समान अधिकार दिले व ब्राह्नणशाही नष्ट केली हा आक्षेप किती तथ्यहीन आहे ते पाहु. एकतर बुद्ध हा वंशश्रेष्ठत्व राखतो त्यामुळे तो समरसता आणतो व सर्वांना समान लेखतो ही गोष्टच चुकीची आहे. दुसरं असं की त्याने सर्वांना समान अधिकार दिले हेही खोटं आहे कारण ते अधिकार हिॅदुधर्मात सर्वांना आधीपासूनच होते. मुळात हा अधिकारवादच नंतरच्या काळात निर्माण झालाय. जर तसं नसतं तर मग बुद्धाने उच्यकुळातच जन्म घेणं का पसंत केलं असतं??? 
जर सर्व समान आहेत, हे बुद्धाचे मत असतं तर मग हे का घडतं??


मुळात वैदिक धर्म हा समता प्रणितच आहे

ज्यांनी वेदांचा सखोल अभ्यास केला असेल त्यांना हे माहिती असेल की वेदांतले अनेक ऋषी हे ब्राह्नण नाहीयेत. कारण जन्माने मनुष्य शुद्र म्हणजे संस्कारहीन असून तो कर्मामे ब्राह्मण बनतो हा वेदप्रणित हिॅदुधर्माचा अकाट्य सिद्धांत आहे. हाँ ही गोष्ट खरी की लोकांनी हे विसरून जाऊन नंतरच्या काळात जन्माधिष्ठित व्यवस्था निर्माण केली असेल पण त्याचा दोष वेदांना द्यायचा संबंधच कुठे येतो??? हा कुठला न्याय??

सगळी उपनिषदे ही क्षत्रियांनी रचलीयेत. काही तर स्त्रियांनी रचली असताना बुद्धाने स्त्रियांवर फार मोठे उपकार केले हा डांगोरा पिटण्यात काय हशील???

मुळात बुद्दाच्या नंतर त्याच्या संघातच किती स्वैराचार माजला हे जिज्ञासुंनी अभ्यासावे व खरेतर ते जगजाहीर आहे. तरीही लोक हे हेतुपुरस्सर विसरून वैदिक हिॅदु धर्माला शिव्या घालतात व बुद्धाला फार मोठा समाजसुधारक मानतात व बंडखोर मानतात, हे अज्ञानाचेच लक्षण नव्हे काय???



पाश्चिमात्यांनी केलेली इतिहासमीमांसा

फोडा आणि राज्य करा ह्या नीतीचा अवलंब करून पाश्चिमात्यांनी हेतुपुरस्सर इतिहासाची मीमांसा करताना
buddhism and Brahminism 
किंवा 
buddhism and Hinduism 
किंवा 
Hinduism and Brahminism असा हेतुपुरस्सर बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला जो किती चुकीचा होता हे माझ्या वरील समग्र विवेचनावरून लक्षात येईल. तेंव्हा एतद्देशीयांनी तर ह्या असल्या भूलथापांना बळी पडून आपला घात करून घेऊ नये व बुद्धाला विनाकारण वेगळा समजू नये.

आता महत्वाची शंका व त्याचं उत्तर

जर हे सर्व खरं असेल तर कुमारील भट्ट व आदि शंकराचार्यांसारख्यांनी आपलं अख्खं आयुष्य ह्या बौद्ध व जैन मत खंडणासाठी व वैदिक धर्म पुनर्संस्थापनेसाठी का खर्चिलं???

ह्याचं उत्तर

बुद्धाच्या नंतरच्या काळात त्यांच्या अनुयायांनी बुद्धाच्या संदेशाचा चुकीचाच प्रचार केला. जो आजही केला जातो हे वरील माझ्या सविस्तर विवेचनावरून लक्षात येईल. त्यामुळे मुळचा बौद्ध पंथ जो वैदिकच होता, त्याला अनुयायांनी अकारण वैदिकद्वेष्टा बनविलं व त्यानंतर हिॅदुस्थानात वेदद्वेष सुरु झाला. व खोट्या बौद्धमतांचं प्रसार व्हायला लागला. त्यामुळेच ह्या खोट्या बौद्धमताचे खंडण करण्यासाठीच कुमारील भट्ट व आदि शंकराचार्यांनी जीवाचं रान केलं हा इतिहास आहे. आणि त्यामुळेच खोटं बौद्ध नष्ट करून खर्या बुद्धमताचा प्रचार त्यांनी केला म्हणूनच की काय शंकराचार्यांना "प्रच्छन्न बुद्ध" ही संज्ञा प्राप्त झाली.
आणि त्यातही शंकराचार्यांच्या वेळी हिॅदुस्थानात नक्की बौद्ध मत किती अस्तित्वात होतं हाही एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. इतिहासभूषण श्रीपाद दत्तात्रय कुलकर्णींनी हा विषय स्वतंत्रपणे मांडलाय जिज्ञासूंनी तो अभ्यासावा. 

नवव्या आक्षेपाचं खंडण

बुद्ध डुकराचे मांस खाऊन मेले नाहीतच हे माझं स्पष्ट मत आहे.

खरंतर हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे कारण ह्यात अनेक संस्कृत विषयांचा अभ्यास असल्याने मी स्वतंत्रपणे केंव्हातरी माझी भूमिका मांडेनच. तूर्तास तरी एवढंच सांगु इच्छितो की वैदिक संस्कृत व आताची लौकिक संस्कृत ह्यात फरक आहे हे माहिती असणं आवश्यक आहे. तो न कळल्यामुळेच बुद्धाच्या मृत्युचा संबंध "सूकरं मद्दवं खादयित्वा" ह्यातल्या सूकरं मद्दवं ह्या शब्दावरून डुकरांचं मांस असा सोयीस्कर अर्थ लोक काढतात जो चुकीचा आहे असं माझं स्पष्ट मत आहे. ह्यावर मी स्वतंत्र पणे कधीतरी लिहीन. माझ्याकडे पुरावे आहेत. तूर्तास तरी मला बुद्धावरचा हा आरोप मान्य नाहीये.

हिॅदुमहासभेने केलेला अलौकिक प्रयोग

१९३५ साली हिॅदुमहासभेने बौद्ध भिक्षु उत्तमा ह्यांना हिंदुसभेचे अध्यक्ष केलं होतं हे अनेकांना माहितीही नसेल. बौद्ध भिक्षु उत्तमा हे अभ्यासु वृत्तीचे व नामांकित बौद्ध होते व त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात स्पष्टपणे हिॅदु व बौद्ध एकच आहेत ठासून सांगितलं होतं. जिज्ञासूंनी हिॅदुमहासभेचा इतिहास वाचावा. असो. पुढे अनेक वर्षे ते हिॅदु सभेचे उपाध्यक्षही होते. पुढे जाऊन त्यांनी ब्रह्मदेशाच्या निर्मितीला कडाडून विरोध केला होता. ते वाचावं ही विनंती आहे.

आता हा सर्व लेखनप्रपंच कशासाठी??? हा अट्टाहास कशासाठी???

हिॅदुस्थानातले नवबौद्ध हे अकारण स्वत:ला हिॅदुद्वेष्टा बनवितात किंवा बनविले जातात. कारण त्यांचा ह्या विषयांतला अभ्यास कमी असल्याने व त्यांच्या मनावर गोबेल्स तंत्राने पकड घेतल्याने ते हिॅदुद्वेषी ठरतात व हे थांबावं हाच उद्देश्य आहे म्हणूनच हा प्रामाणिक लेखनप्रपंच ! 


नवबौद्धांनी स्वत:ला वेगळं न समजता आपण हिॅदुच आहोत हे ठरवून ह्या हिंदुराष्ट्राच्या निर्मितीस आपलं योगदान द्यावं हीच विनंती ! 

आजच्या बुद्धपौर्णिमेनिमित्त त्या महात्म्यास माझे विनम्र प्रणाम व आदरांजली !!!

©तुकाराम चिंचणीकर