Saturday 20 February 2021

#भीष्माष्टमी_माघशुद्धअष्टमी



आज श्रीभीष्माचार्यांचे पुण्यस्मरण ! माघ शुद्ध अष्टमींस इसवी सन पूर्व ३१३८ ह्या दिवशी परमवंदनीय श्रीभीष्माचार्यांनी देहत्याग केला.

व्यक्तिश: आमच्या दृष्टीने भगवान श्रीकृष्णापश्चांत महाभारतातले श्रीभीष्माचार्य हे सर्वोत्तम प्रिय नि आदर्श व्यक्तिमत्व ! आजीवन अखंड ब्रह्मचर्य पालन केलेला हा सिंहह्रदयी पुरुष !

पित्याच्या वचनांसाठी चतुर्दश वर्षे राज्यत्याग करणारे नि विजवनास स्वीकारणारे भगवान श्रीरामचंद्र आम्हांस आदर्श आहेतच. पण त्यांच्याही पुढे जाऊन पित्याच्या सुखासाठी केवळ राज्यत्यागच नव्हे नि तोही कायमचाच पण त्याबरोबरच वैवाहिक सुखाचाही त्याग करून आजीवन अखंड नैष्ठिक ब्रह्मचर्य पालन करून उर्ध्वरेतस होणार्या श्रीभीष्माचार्यांविषयी आम्हांला कधीच आदर का वाटत नाही?


भगवान श्रीकृष्णांनी स्वत: ब्रह्मचर्यं महद्घोरं चीर्त्वा द्वादशवार्षिकम् असे म्हणून स्वपत्नी रुख्मिणीसह विवाहापश्चात द्वादश वर्षे नैष्ठिक ब्रह्मचर्य पालन केलं. पण श्रीभीष्माचार्यांनी तर आजीवन अखंड उर्ध्वरेतस असे जीवन व्यतीत केलं. म्हणूनच प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनीच त्यांची स्तुती करताना त्यांस उर्ध्वरेतस् असंच अनेकवेळा म्हटलंयय. आणि युद्धापश्चांत युधिष्ठिरांस त्यांच्याकडून राजधर्माची शिक्षा प्राप्त करण्यांची आज्ञा दिलीय. 


श्रीभीष्माचार्यांचे षड्वेदाङ्गासहित वेदाध्ययन


श्रीभीष्माचार्यांस देवव्रत, गङ्गादत्त आणि गाङ्गेय अशी तीन नावे आदिपर्वांत दिलेली आहेत. त्यांचे वर्णन असे आहे.


वेदानधिजगे साङ्गान् वसिष्ठादेव वीर्यवान् ।

कृतास्त्र: परमेष्वासो देवराजसमो युधि ।


आदिपर्व - १००.३५ 


अर्थ - महर्षि वसिष्ठांकडून षड्वेदाङ्गांसहित वेदांचे अध्ययन केलेला हा बलवान पुत्र अस्त्रविद्येचा ज्ञाता, महान धनुर्धर आणि देवराज इंद्रासमान पराक्रमी आहे.


पुढे असं वर्णन आहे की ते शुक्राचार्यांप्रमाणेच सर्व नीतीशास्त्राचे ज्ञाते, बृहस्पतिसमानच ज्ञाते नि भगवान परशुरामांची अस्त्रविद्या प्रतिष्ठित असलेले, राजधर्म नि अर्थशास्त्राचे जाणकार असे आहेत.


श्रीभीष्माचार्य गंगेकडून शंतनुंस प्रथम भेटींस आले तेंव्हा त्यांचे वय ३६ होते असे महाभारत सांगते. पुढे त्यांस यौवराज्याभिषेक झाला व पुढील चार वर्षांतच त्यांच्या पित्याचा सत्यवतीशी विवाह झाला. म्हणजेच प्रतिज्ञाकरतेवेळी त्यांचे वय हे ४० होते. त्याचे प्रमाण स समा: षोडषाष्टौ च चतस्त्रोष्टौ तथापरा: असे आहे. म्हणजे १६+८+४+८=३६ वर्षे. साङ्गोपाङ्ग चतुर्वेदाध्ययनासाठी इतका वेळ लागणं क्रमप्राप्तच आहे.


देवव्रतांची भीष्म प्रतिज्ञा


सत्यवतीच्या पित्यांस दाशराजांस ते म्हणतात 


राज्यं तावत्पूर्वमेव मया त्यक्तं नराधिप |

अपत्यहेतोरपि च करोम्येष विनिश्चयम् ||८७||


राज्याचा त्याग तर मी पूर्वीच केलाय. आता अपत्यहेतुचा तो त्याग मी निश्यचाने करेनच.


अद्यप्रभृति मे दाश ब्रह्मचर्यं भविष्यति |

अपुत्रस्यापि मे लोका भविष्यन्त्यक्षया दिवि ||८८||


हे दाशराज, इथूनपुढे माझे नैष्ठिक ब्रह्मचर्य होईल. आणि निपुत्रिक असूनही स्वर्गाचे द्वारे माझ्यासाठी उघडी राहतील.


नहि जन्मप्रभृत्युक्तं मम किंचिदिहानृतम् ।

यावत् प्राणा ध्रियन्ते वै मम देहं समाश्रिता: ।

परित्यजाम्यहं राज्यं मैथुनां चापि सर्वश: ।

उर्ध्वरेता भविष्यामि दाश सत्यं ब्रवीमि ते ।


जन्मापासून एकही असत्य कथन न केलेला मी प्राण जाईपर्यंत राज्यत्याग करून मैथुनाचाही सर्वस्वी त्याग करेन. हे दाशराज, आता मी उर्ध्वरेतस् बनेन. सत्य तेच बोलतो.


देवव्रत आता भीष्म होतात. आणि त्यांची ही घनघोर प्रतिज्ञा पाहून पिता पिता शंतनु त्यांस 


तद्ष्ट्वा दुष्करं कर्म कृतं भीष्मेण शन्तनुः |

स्वच्छन्दमरणं तस्मै ददौ तुष्टः पिता स्वयम् ||९४||


स्वच्छन्दमरणाचे (स्वेच्छामृत्युचे) वरदान देतात.


काय तो त्याग ! केवळ अद्वितीय ! धन्य ते माता-पिता नि धन्य तो पुत्र !


श्रीभीष्माचार्य विवाहित होते काय ?


काही विद्वानांनी श्रीभीष्माचार्यांच्या चारित्र्यांवर संदेह घेतांना त्यांस विवाहित ब्रह्मचारी ठरवलं आहे.


येंविषयी खंडनात्मक नुकताच एक ग्रंथ वाचण्यांत आलाय. 


WAS BHĪSMĀCĀRYA MARRIED ? BY W R ANTARKAR(1978)


ह्या पुस्तिकेमध्ये लेखकाने उपरोक्त सर्व आक्षेपांचे खंडन केलं असून ग्रंथ अत्यंत चिंतनीय आहे. वस्तुत: महाभारतामध्ये २३ वेळा श्रीभीष्माचार्यांस उर्ध्वरेतस म्हटलेलं आहे. श्रीभीष्मांच्या जन्माच्यावेळीच त्यांना इथून पुढे आजीवन स्त्रीपासून विरहित नि आजीवन अखंड ब्रह्मचारी होईल असे वचन आहे. स्वत: महाभारतावरील टीकाकार श्रीनीळकंठाने श्रीभीष्माचार्यांच्या ब्रह्मचर्याचे वर्णन करताना त्यांस अविप्लुत ब्रह्मचर्यं आणि नित्य ब्रह्मचारी असेच म्हटलंय. अर्थात ह्याच नीळकंठांचा गोंधळ बर्याच ठिकाणी दिसतो. कारण हेच नीळकंठ दुसर्या ठिकाणी श्रीभीष्म विवाहित होते असेही म्हणताना दिसतात. अस्तु !


डॉ. दांडेकरांसारखे तथाकथित विद्वानही श्रीभीष्माचार्यांवर षंढ किंवा नपुंसक असल्याचा घाणेरडा आरोप करतात. किती ती लाजिरवाणी गोष्ट ? हे दुसरे शिशुपालच म्हणावे लागतील, नाही का? 


अग्निपुराणामध्ये श्रीभीष्माचार्यांस अविवाहित अर्थात नैष्ठिक ब्रह्मचारीच म्हटलंय. गर्गसंहितेत (१०।७।५४) तर भीष्माचार्यांचे वर्णन करताना 


भीष्मं विना ही मदनं को विजेतुं भवेन्नर:।


श्रीभीष्माचार्याशिवाय मदनांस जिंकण्यांस कोण सामर्थ्यसंपन्न आहे ?


असं म्हटलंय.


श्रीभीष्म-युधिष्ठिर संवाद


श्रीभीष्माचार्यांचे अलौकिक ज्ञान जाणून घ्यायचे असेल तर त्यांचे शांतिपर्वातील उपरोक्त संवाद अभ्यासायलाच हवा.


दहा दिवस घनघोर युद्ध करून स्वत:च्याच युद्धातून पतनाचे रहस्य पांडवांना सांगून अर्जुनाच्या बाणांच्या मारांनी श्रीभीष्माचार्य शरपंजरी पडले. त्यानंतर युधिष्ठिर आणि भगवान श्रीकृष्णांनी श्रीभीष्मांस येऊन त्यांच्या देहावसानाविषयी माहिती देताना म्हटलंय 


पञ्चाशतं षट्च कुरुप्रवीर शेष दिनानां तव जीवितस्य ।

तत: शुभै: कर्मफलोदयैस्त्वं समेष्यसे भीष्म विमुच्य देहम् ।

शांतिपर्व ५१।१४


अर्थ - हे कुरु श्रेष्ठ, आता आपल्या जीवनांतले ५६ दिवसच शेष असून तदनंतर हे श्रीभीष्म, आपण ह्या देहाचा त्याग करून आपल्या शुभकर्मांनी कल्याणकारी फल प्राप्त कराल.


स्वत: श्रीभीष्माचार्य युधिष्ठिरांस आज्ञा देताना म्हणतात की तु उत्तरायण आरंभ होईल तेंव्हा मला भेटींस ये. पुढे युधिष्ठिर त्यांस सूर्य उत्तरायण करण्यासाठी काहीच दिवस शेष असून तो करताच आपण देह त्याग कराल असे म्हणतो आणि पुन्हा त्यांच्या आज्ञेंस शिरसावंद्य मानून हस्तिनापुरांत पन्नास दिवस निवास करून युधिष्ठिर त्यांच्याकडे जावयांस निघतात. तेंव्हा श्रीभीष्माचार्य म्हणतात


परिवृत्तो हि भगवान्सहस्त्रांशुर्दिवाकर: ।

अष्टपञ्चाशतं रात्र्य: शयानस्याद्य मे गता: ।

माघोsयं समनुप्राप्तो मास: पुण्यो युधिष्ठिर: ।

त्रिभागशेष: पक्षोsयं शुक्लो भवितुमर्हति ।


भगवान सूर्य आता उत्तरेंस परिवृत्त झाला असून या शय्येवर पडून मला आता ५८ दिवस झाले आहेत. आता हा पुण्यप्रद असा माघ मासाचा शुक्ल भाग सुरु झाला असून त्या मासाचे तीन भाग शेष आहेत. हा शुक्ल पक्ष होईल.


त्यांच्या देहावसानाचा समय समीप येताच सर्व पांडव भगवान श्रीकृष्णासहित तिथे उपस्थित होतात. वैशंपायन श्रीभीष्माचार्यांच्या देहावसानाचे वर्णन करताना लिहितात. 


भीष्मस्य कुरुशार्दूल देहोत्सर्गं महात्मन: ।

निवृत्तमात्रे त्वयने उत्तरै वै दिवाकरे ।

समावेशयदात्मानमात्मन्येव समाहित: ।


अर्थ - हे युधिष्ठिर तु आता कुरुश्रेष्ठ श्रीभीष्माचार्यांचा देहोत्सर्ग श्रवण कर. सूर्याचे उत्तरायण सुरु झालेलं असून श्रीभीष्माचार्यांनी स्वत:स परमात्म्यांत समाविष्ट केलं.


शुक्लपक्षस्य चाष्टम्यां माघमासस्य पार्थिव ।

प्राजापत्ये च नक्षत्रे मध्यं प्राप्ते दिवाकरे ।


माघमासाच्या शुक्लपक्षाच्या अष्टमींस प्रजापती अर्थात रोहिणी नक्षत्रांस सूर्य मध्यान्ही आला असता श्रीभीष्मांनी देहोत्सर्ग केला.


म्हणजे आजच्याच दिवशी माध्यान्हसमयी श्रीभीष्म गेले. हा काळ आहे इसवी सन पूर्व ३१३८ माघ शुद्ध अष्टमी. म्हणजेच आजपासून ३१३८+२०१९ = ५१५७ वर्षे पूर्व.


श्रीभीष्माचार्य हे अहिताग्नी होते. अर्थात ते नित्य अग्निहोत्र करणारे होते. अगदी शरशय्येवर असतानाही त्यांच्या समीप अग्निहोत्राचा उल्लेख आहे. ऐतरेय ब्राह्मणामध्ये सप्तम पंचिकेत नवम कंडिकेमध्ये ब्रह्मचार्यांस अग्निहोत्राचा अधिकार दिलेलाच आहे. 


जर महाभारत खोटंच असतं तर इतके खगोलीय किंवा ज्योतिषशास्त्रीय संदर्भ कसे काय आले असते ? बरं हे संदर्भ आजही तसेच चालत आलेले आहेत. ह्याचाच अर्थ ही परंपरा गणितीय असून ती अगदी अचूक आहे.


श्रीभीष्माचार्य देहावसानसमयी २३६ वर्षांचे होते असे पंडित कोटा वेंकटाचलम त्यांच्या *The Age of Mahabharata War ह्या ग्रंथामध्ये म्हणतात. अर्थात युद्धसमयी त्यांचे वय एकतर दोनशेंच्या समीप असावं. श्रीव्यास त्यांच्यापेक्षा वीस वर्षे लहान असून युद्धसमयी भीम नि भगवान श्रीकृष्णादिकांचे वयही नव्वदीच्या समीपच होते.


ह्या कुरुश्रेष्ठांस त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कोटी कोटी वंदन नि अभिवादन !


पाखण्ड खण्डिणी 

Pakhandkhandinee.blogspot.com


#श्रीभीष्माचार्यमाघशुद्धअष्टमीदेहोत्सर्ग_उत्तरायण