Wednesday 22 March 2023

कुत॒ आजा॑ता॒ कुत॑ इ॒यं विसृ॑ष्टिः । ऋग्वेद - १०|१२९|६

 










को अ॒द्धा वे॑द॒ क इ॒ह प्र वो॑च॒त्कुत॒ आजा॑ता॒ कुत॑ इ॒यं विसृ॑ष्टिः । अ॒र्वाग्दे॒वा अ॒स्य वि॒सर्ज॑ने॒नाथा॒ को वे॑द॒ यत॑ आब॒भूव॑ ॥

भावार्थ - ही विविध सृष्टी कोणत्या निमित्तकारणाने आणि कोणत्या उपादानकारणाने उत्पन्न झाली, या गोष्टींस कुणी विरळा असा विद्वानंच यथार्थरुपामध्ये जाणु शकतो, कारण सर्वच विद्वान् हे सृष्टी उत्पन्न झाल्यापश्चातचे आहेत. अर्थात् कोणी तत्त्ववेत्ता योगीच हिला समजु शकतो आणि हिचं प्रवचन करु शकतो...!

ऋग्वेदातल्या नासदीय सूक्ताचा हा सहावा मंत्र. आज चैत्रशुद्ध प्रतिपदा अर्थात गुढी पाडवा अर्थात सृष्टीच्या नवसंवत्सरारंभाचा दिवस ! सर्वप्रथम सर्वांना नवसंवत्सराच्या अर्थात गुढीपाडव्याच्या निमित्त हार्दिक अभीष्टचिंतन ! हे अखिल सृष्टीचं नवसंवत्सर आहे, केवळ मराठी किंवा हिंदु नवसंवत्सर किंवा नववर्षारंभ नव्हे...! अर्थात‌ हिंदुधर्म हा अनादि अनंत‌ सत्य सनातन अशा स्वरुपाचा असल्याने तसं म्हटलं तरी चालेल. या नासदीय सूक्ताचा अत्यंत विचित्र नि विकृत अर्थ काही लोक काढतात. काहींनी तर यात‌ नास्तिकता आहे असे मत मांडलंय. कीव येते खरी. वास्तविक वेदमंत्रांची शैली माहिती नसणाऱ्यांना या‌ सूक्तामधली प्रश्नार्थक शैली पाहून असा नास्तिकतेचा भ्रम होणं स्वाभाविक आहे पण नीट पाहिलं तर इथे नास्तिकतेचा गंधही नाहीये. असो कधीतरी या‌ सूक्तावर भाष्य करुच.

ही चराचर सृष्टी कुणी निर्माण केली, कशी केली, का केली, कधी केली, केंव्हा केली, कुठून केली हे सर्व प्रश्न आपल्याला कधी ना कधी तरी आयुष्यांत पडले असतीलंच की. भले त्यांचे समाधान शोधण्याची संधी आपणांस प्राप्त झालीही नसेल पण प्रश्न तरी निश्चित पडले असणारंच की...! मग त्याचे उत्तर देणार कोण? कुठे मिळायची?? कुठे शोधायची???

त्यामुळे याचा विचार करताना हे उत्तर सापडते की ही सृष्टी निर्माण झाली, तेंव्हा आपल्या प्राचीन ऋषिमुनींना जे सत्वगुणविशिष्ट योगज शक्तिसंपन्न परावरज्ञ होते, ज्यांना वेद हे साक्षात् होते, जे आपल्या उपासनेने सिद्ध झालेल्या दिव्य मानसिक शक्तीने या चराचर जगतातल्या परमाणु पासून ते परम महत्तत्वापर्यंतच्या समस्त पदार्थांना हस्तामलकवत् प्रत्यक्ष करु शकत होते, त्यांना ह्या चराचर ब्रह्मांडाचे रहस्य सहजबोध्य होते. याचे प्रमाण आपल्याला निम्नलिखित प्राप्त होते..

पुरा खलु अपरिमितशक्तिप्रभाववीर्यायुरारोग्यसुखैश्वर्यधर्म- सत्त्वशुद्धतेजसः पुरुषा बभूवुः। तेषां क्रमादपचीयमानसक्त्वानामुपचीयमानरजस्तमस्कानां लोभः प्रादुरभवत्‌.....!

(भट्ट उत्पल कृत वराहमिहीराची बृहत्संहिता टीका, पृष्ठ १२ वर उद्धत, सोबत पृष्ठ जोडलंय)




त्यावेळी वेद सोडून अन्य कोणतेही शास्त्र, पंथ, धर्म, उपासना, मार्ग अस्तित्वातंच नव्हता. परंतु पुढे पुढे जेंव्हा उत्तरकाळामध्ये मानव क्रमशः सत्त्वहीन, रजोगुण आणि तमोगुणाने युक्त होऊन अल्पमतीधारक झाले, उपदेशाद्वारासुद्धा वेदमंत्रांमध्ये विद्यमान विविध विद्यांना जाणण्यांस असमर्थ झाले, त्यावेळी या सर्व अल्पमेधावाल्या मनुष्यांसाठी विविध विद्यांचे ज्ञान देण्यासाठी विविध शास्त्रांचे प्रवचन महर्षींनी केलं.

हाच शास्त्रावताररूप इतिहास भगवान् महर्षि श्रीयास्कमुनींनी निरुक्तामध्ये 'साक्षात्कृतधर्माण ऋषयो...' या वचनात सांगितला आहे, तिथे पहावा.

भगवान् श्रीयाज्ञवल्क्यही म्हणतात

'दुर्बोधं तु भवेद्यस्मादध्येतुं नैव शक्यते।
तस्मादुद्धृत्य सर्व हि शास्त्रं तु ऋषिभिः कृतम्।।
बृहद्योगियाज्ञवल्क्यस्मृति १२।२॥

ज्यांच्यासाठी हे ज्ञान दुर्बोध झालं आणि जे वेदांचे अध्ययन करु शकले नाहीत, त्या सर्वांसाठी वेदामधले ज्ञान घेऊन ऋषि महर्षि लोकांनी सर्व शास्त्रे बनवली.

महाभारत शांतिपर्वामध्ये २८४।९२ येथे भगवान् श्रीवेदव्यास लिहितात- 'वेदात् षडङ्गान्युद्धृत्य', अर्थात् 'वेदांवरूनंच वेदाङ्गांची रचना केली गेली.

मागील वर्षी याच पाडव्याच्या तिथींस आह्मीं 'अघमर्षण सूक्त' नावाने ऋग्वेदातील सृष्टीनिर्मितीच्या सुक्तासंबंधीचं काहीसं विवेचन केलं होते. मागील वर्षीचा लेख 

https://pakhandkhandinee.blogspot.com/2022/04/blog-post.html?m=1

इथे प्राप्त होईलंच. 

सृष्टीनिर्मितीचं रहस्य हेच वेदांचं मुख्य प्रयोजन...

आह्मीं यापूर्वीही अनेकवेळा लिहिलंय की वेदांमध्ये चराचर सृष्टीच्या निर्मितीचं ज्ञान अत्यंत सूक्ष्मरुपाने बीजरुपाने विद्यमान आहे. वेदांना मनुस्मृतीमध्ये 'सर्वज्ञानमयो हि स:|' हे उगाचंच म्हटलं नाहीये. वेद हे अभ्युदय-नि:श्रेयसाबरोबरंच सृष्टीनिर्मितीचं‌ रहस्य सांगण्यासाठीही प्रकट झालेत हा सिद्धांत आमचा मनगढंत नसून प्रत्यक्ष वेदांचाच आहे. निरुक्तकार महर्षि यास्काचार्यांचे मतही तेच आहे. कारण सृष्टी निर्माण होतेवेळी किंवा त्याआधी आपल्यापैकी कुणीच मानव उपस्थित नव्हता व असणं संभवही नाही. मग ते सृष्टीनिर्मितीचं रहस्य कळणार कसं? पृथ्वीवर जेंव्हा मानव प्रथम प्रकट झाला असेल, आधुनिक डार्विनप्रणीत विकासवादी वैज्ञानिक काय मानतात हा विषय वेगळा, पण अगदी त्यांचाही विचार केला तरी या मानवांस हे सर्व विश्व का निर्माण झाले, कसे झाले वगैरे प्रश्न पडलेच असणार आहेत. त्याचे उत्तर त्याला वेदांनी प्रकट झाले. कारण वेद हे मानवसृष्ट्यारंभी म्हणजे मानवोत्पत्ती पृथ्वीवर झाली, त्यावेळी चार ऋषींच्या अंत:करणी प्रकाशित झाले. याविषयी सविस्तर अनेकवेळा लिहिलंय, पुनरुक्ती करत नाही. वेद का प्रकट झाले याचं उत्तरंच या प्रश्नामध्ये आहे. वेदांच्या मुख्य प्रयोजनामध्ये धर्मज्ञानाबरोबर सृष्टीरहस्यही मुख्य आहेच.‌ कारण वेदांशिवाय हे ज्ञान असंभव आहे.

वेदा: यज्ञार्थमभिप्रवृत्ता:|

मधील काळात वेद हे केवळ यज्ञीय कर्मकांडासाठीच आहेत, त्यांचे अन्य कोणतंही प्रयोजन नाही असा एक अत्यंत संकुचित सिद्धांत उपरोक्त वचनाचा अधिदैविक गुढार्थ न आकळल्याने, रुढ झाला. आजही काही परंपरावादी स्वमतांधग्रस्त लोक वेद हे केवळ यज्ञीय कर्मकांडासाठीच आहेत, वेदांमध्ये केवल कर्मकाडंच आहे, त्यांचे अन्य कोणतंही प्रयोजन नाही व खरं ज्ञान तर उपनिषदांमध्येच(ज्ञानकांड) आहे असंच मानतात.‌ हे मत का चुकीचं आहे यावर सविस्तर कधीतरी भाष्य करेन. वास्तविक उपरोक्त मंत्रामध्ये यज्ञ हा शब्द कोणत्या अर्थाने वापरलाय हे पहायला हवं. ही चराचर सृष्टी, हे सकल ब्रह्मांड हेच मूळात एक यज्ञ आहे. गीतेमध्ये ४|२८ इथे द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्याययज्ञ नि ज्ञानयज्ञ असे यज्ञाचे प्रकार सांगितले आहेतंच. यातल्या केवळ द्रव्य यज्ञाचा विचार करुयांत. कात्यायन श्रौतसूत्रामध्ये निर्दिष्ट २१ यज्ञप्रकार जिज्ञासूंनी पूर्वमीमांसा शाबर भाष्यात पहावेत.

देवतोद्देशेन द्रव्यस्य त्यागो यज्ञ:| 

विशिष्ट देवतेंस काही द्रव्य देण्याचं नाव यज्ञ आहे.

ही यज्ञ शब्दाची व्याख्या केवळ द्रव्य यज्ञाशी संबंधित आहे. यज्ञ शब्दाचे विविध धात्वर्थ महर्षि भगवान पाणिनींनी सांगितले आहेत, तिथे पहावेत.

मूळात यज्ञ नावाची ही संकल्पना का आली असेल??? मूळात यज्ञ संस्था का निर्माण झाली असेल??? 

ब्रह्मांड आणि अध्यात्माची रचना समजण्यासाठीच यज्ञसंस्थेचा उदय...

सर्वसामान्य मनुष्याला पिंड आणि ब्रह्मांडाचे यथार्थ ज्ञान होण्याची योग्यता प्राप्त नसल्याने त्याला ते ज्ञान व्हावं ह्या हेतुनेच या द्रव्ययज्ञांची निर्मिती किंवा मांडणी करण्यांत आली. यातून सृष्टीनिर्मितीचं रहस्य आकळावं हाही हेतु होताच, इतर अन्य हेतु होतेच पण मुख्य प्रयोजन हेच. अधिदैविक अर्थानेच ही सर्व प्रक्रिया जाणून घेण्यासारखी आहे. 

यज्ञवेदीचा संबंध हा पृथ्वीनिर्मितीशीच आहे...

यज्ञवेदीनिर्माण आणि पृथ्वी-सर्ग किंवा सृजन

आपण ज्या पृथ्वीवर राहतो, ती पृथ्वी कशी निर्माण झाली, तिचा दृष्टांत कळावा या हेतुनेच ही वेदी निर्माण केली गेला. वैदिक यज्ञांमध्ये जी‌ यज्ञवेदी निर्माण केली जाते, तिची प्रक्रिया आपण पूर्वमीमांसेतून किंवा वेदांवरची व्याख्याने असे ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे आरण्यके आणि श्रौतसूत्रादि कल्प साहित्यातून समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असे कळते की यज्ञवेदी निर्माणाचे साम्य हे पृथ्वीनिर्माणाच्या प्रक्रियेशी आहे. यज्ञामध्ये अग्न्याधानामध्ये जी प्रक्रिया आहे ती पाहिली तर पृथ्वीच्या निर्मितीचीच प्रक्रिया तिथून स्पष्ट होते. कशावरून? तर याचे प्रमाण यजुर्वेदामध्ये प्राप्त होते. यजुर्वेद २३|६२ येथे इ॒यं वेदिः॒ परो॒ऽअन्तः॑ पृथि॒व्याऽ| ही वेदी नि पृथ्वीची साम्यता दर्शवणारी श्रुती आहे. शतपथ ब्राह्मणामध्ये ६|१|१|१३ येथे 

'स श्रान्तस्तेपान: फेनमसृजत्| इथून ते तेनेमां पृथिवीं प्राच्छादयत्|' इथपर्यंत पृथ्वीच्या ९ प्रकारच्या सृष्टीचे म्हणजे स्थितींचे वर्णन करता करता हा विस्तार केला आहे जो अगदी यज्ञवेदीच्या निर्मितीप्रक्रियेशी साम्य दाखवणारा आहे. यावर सविस्तर कधीतरी येऊ. थोडक्यात इथे पृथ्वी कशी निर्माण झाली ते तिच्या प्राथमिक सलील अवस्थेपासून ते अंती तिच्यावर औषधी-वनस्पति, पशु निर्माण होईपर्यंतची प्रक्रिया लक्षात येते. पुरुषसूक्तामध्येही ही प्रक्रिया‌ सांगितली आहेच. हे सगळं कधी घडलं हे पाहताना आपण कुणी होतो का? नाहीच. 

म्हणून तर आपल्या ऋषिमुनींनी हा इतिहास शब्दबद्ध करून ठेवला. कारण वेदमंत्रांचे हे अर्थ व ही सर्व प्रक्रिया कळणं सर्वसामान्याचे काम नाही. किंबहुना या दृष्टीने वेदांकडे पहावं ही कल्पनाही आमच्यातल्या बव्हतांशाना सहन होत नाही. अगदी आधुनिक काळात ज्यांच्या पिढ्यान्पिढ्या वेदाध्ययनामध्ये गेल्यात‌ त्यांनाही. ह्याचा अर्थ आह्मीं जे मांडतोय ते काही नवीनंच किंवा क्रांतिकारी नसून

फोडिलें भांडार, धन्याचा हा माल| ह्याच‌ हेतुने आहे. प्राचीन शास्त्रकारांनी 

पशुयज्ञ हे मूळात सृष्टीयज्ञ आहेत...

वैदिक यज्ञामध्ये अनेक पशुयज्ञ आपल्याला आढळतात ज्यात पुरुषमेध(नृमेध), अश्वमेध, गोमेध, वगैरे सापडतात.‌ वास्तविक ह्यांचा अर्थ हा अधिदैविक भावनेने सृष्टीनिर्मितीशीच आहे हे इथे सांगणं क्रमप्राप्त आहे. कारण ब्राह्मणग्रंथ-कल्पादि साहित्य हेच उच्चरवाने उद्घोषून सांगतात. अधिदैविक पदार्थांसाठीच इथे पशु शब्दाचा‌ विचार केला गेला आहे.

अ॒ग्निः प॒शुरा॑सी॒त् तेना॑यजन्त॒...| वा॒युः प॒शुरा॑सी॒त् तेना॑यजन्त॒...| सूर्यः॑ प॒शुरा॑सी॒त् तेना॑यजन्त॒...|
शुक्ल यजुर्वेद - २३|१६

या मंत्रांमध्ये हाच भाव आहे.

संक्षेपांत काय तर वेदांमधलं सृष्टीनिर्मितीचं रहस्य कळण्यासाठी ऋषिमहर्षींनी पुढे षड्वेदांगे, षड्दर्शने, स्मृत्या, पुराणे वगैरेंचा विस्तार केला. कारण सर्वसामान्य मनुष्याला ते सर्व कळावं म्हणून. म्हणूनंच वेदांमध्ये सृष्टीनिर्मितीचं रहस्य असणं यात अप्रस्तुत काहीच नाही किंबहुना त्यांचे प्रयोजनंच त्यासाठीच आहे. अर्थात हे कळायसाठी वेदांकडे पहायची आर्ष दृष्टी हवी. ही आर्षदृष्टी म्हणजे ऋषिप्रणीत ग्रंथांच्या, सत्शास्त्रांच्या अध्ययनाने, संप्रदायपूर्वक वेदाध्ययन केल्याने नि योगसाधना केल्याने प्राप्त होईल. अन्यथा केवळ वेदमंत्रांचे कुणीतरी केलेले अनुवाद वाचून काहीही कळणार नाही. त्यातही गत दोनशे वर्षात जगभरात वेदांवर व्यक्त होणाऱ्या मेकॉलेपुत्रांची वाढंच वाढ‌ झाल्याने अशांची पुस्तके वाचून सत्यार्थ आकळायपेक्षा भ्रमंच भ्रम अधिक होण्याचा‌ संभव आहे. म्हणून सत्य जाणण्याची इच्छा असणाऱ्यांनी सावध रहावे...!

आपल्या नित्याच्या संकल्पामध्ये पृथ्वी कधी निर्माण झाली नि आपण कधीपासून पृथ्वीवर आहोत हे आमच्या मागील वर्षीच्या लेखामध्ये आह्मीं विस्ताराने मांडलंय त्यामुळे पुनरुक्ती न करता केवळ संकल्पाचा निर्देश करून लेखणींस‌ विराम देतो...

(सृष्ट्यादिसंवत्-संवत्सर-अयन-ऋतु-मास-तिथि -नक्षत्र-लग्न-मुहूर्त)       🔮🚨💧🚨 🔮

ओं तत्सत्-श्रीब्रह्मणो द्वितीये परार्द्धे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथमचरणे 【एकवृन्द- सप्तनवतिकोट्ये कोनत्रिंशल्लक्षैकोनपञ्चाशत्सहस्र-  पञ्चविंशशत्यधिकशततमे ( *१९७२९४९१२५* ) सृष्ट्यब्दे】【 अशीत्युत्तरद्विसहस्रतमे ( *२०८०* ) वैक्रमाब्दे】  *पिङ्गल*- संवत्सरे *उत्तरायणे- वसन्त ऋतौ* मासानां मासोत्तमे *मधु मासान्तर्गते* *चैत्र शुद्ध प्रतिपदायां, तिथौ* उत्तरा भाद्रपदा नक्षत्रे मीन- लग्नोदये *शिव*- मुहूर्ते भूर्लोके जम्बूद्वीपे भारतवर्षे भरतखण्डे आर्यावर्तान्तर्गते.......

सृष्टी संवत् - १,९७,२९,४९,१२५
त्यानंतर मानवसृष्टीसंवत् - १,९६, ०८,५३, १२४ वर्षे
कलियुग - ५१२५
विक्रमाब्द - २०८०
शालिवाहन शक - १९४५

अलमतिविस्तरेण बुद्धिवमद्वर्य्येषु|

भवदीय,

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#गुढीपाडवा_चैत्रशुद्धप्रतिपदा_संवत्सर_सृष्टीनिर्मिती_वेदभगवान_वैदिकधर्म_यज्ञसंस्था


Wednesday 8 March 2023

आंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्त...

 


स्त्रियांवर सहस्त्रो वर्षे अन्याय किंवा अत्याचार झाला, त्यांना शिकुच‌ दिलं गेलं नाही, लिहु-वाचुही दिलं नाही, चूल नि मुल यातंच अडकवून ठेवलं, स्त्रियांचे सहाव्या किंवा आठव्या वर्षी विवाह, केशवपन, विधवापुनर्विवाह निषेध, सतीची प्रथा(ही मूळात नव्हतीच), पडदा प्रथा हा सर्व अन्याय सहस्त्रो वर्षे किंवा अनादि काळापासून सुरुच होता यासारखा भ्रम एकीकडे...


तर दुसरीकडे स्त्रियांवर कधीच अजिबात अत्याचार किंवा अन्याय झालाच नाही, त्यांच्यावर कुठलीही बंधने लादलीच गेली नाहीत, मूळ आचारापासून भ्रष्ट झालोच नाहीत, उपरोक्त कुठल्याही अनिष्ट प्रथा मूळात नव्हत्याच किंवा ज्या होत्या त्या‌ अनिष्ट नव्हत्याच उलट शास्त्रसंमतंच होत्या, स्त्रियांचे‌ हित करणाऱ्याच होत्या हा नि ह्यासारखा भ्रम दुसरीकडे...


या दोन्ही अतिरेकी नि अवास्तव भ्रमांतून समस्त स्त्री-पुरुष हे दोघे ज्यादिवशी बाहेर येतील आणि सत्य ते स्वीकारून, चांगलं ते पुढे घेऊन नि वाईट ते त्यागून व्यष्टी नि समष्टीच्या हितासाठी पात्रापात्रविवेक धारण करत पुढे जातील, तोच खरा आंतरराष्ट्रीय महिला दिन किंवा पुरुष दिन ठरेल !


*स्त्रिया ह्या स्त्रियाच राहुन त्यांच्यातलं स्त्रीत्व नष्ट न करता त्यांना दिवसेंदिवस अधिकाधिक पुरुष‌ न बनवता आणि पुरुषही पुरुषंच राहून त्यांच्यातलेही पुरुषत्व नष्ट न करता त्यांना दिवसेंदिवस स्त्रैण न करता ज्यादिवशी दोघे एकत्र होऊन स्व-स्वरुपाचा बोध घेत एकमेकांच्या मर्यादा नि एकमेकांची बल-शबल स्थाने योग्य प्रकारे ज्ञात करून आत्मोद्धारासाठी जगतील, त्यादिवसापासून महिला किंवा पुरुष दिनाची मूळी आवश्यकताच भासणार नाही...*


थोडा इतिहास पाहुयांत...


आमच्या वैदिक हिंदु धर्माचा किंवा न्यूनतम या भारतवर्षाच्या, भरतभूमीच्या इतिहासाचा विचार केला तरी महाभारतकालापर्यंत तरी, ज्यांस वेदकाळ म्हणता येईल, इथे वेदकाळ म्हणजे जोपर्यंत एकंच वेदमत सर्वत्र प्रतिष्ठापित होते असा महाभारतकाळापर्यंतचा काळ, निदान या काळापर्यंत तरी स्त्रियांविषयी सर्वत्र आदराचीच भावना होती. ज्या काही कुप्रथा वर सांगितल्या‌हेत त्या‌ त्याकाळापर्यंत तरी अस्तित्वात असल्याचे काडीचंही प्रमाण उपलब्ध नाही. एखादा उल्लेख महाभारती आढळत असेल तर तो प्रक्षेप आहे नि:संदेह. कुणाला पटो न पटो...


पण त्यापश्चात् एक-दीड सहस्त्र वर्षांनी जैन नि बौद्ध मतांचा झालेला उदय‌ पाहिला तर भगवान बुद्धाच्या साहित्यात केलेली स्त्रियांची आत्यंतिक निंदा पाहिली तर हा स्त्रियांविषयी मूळचा उदार असा वैदिक दृष्टिकोन बौद्ध काळात कुठेतरी संकुचित होत गेल्याचा दिसतो. आह्मीं भगवान बुद्धाचं समग्र साहित्य जे त्रिपीटक नावाने विस्तारलेलं आहे, ते बव्हतांश अभ्यासल्यानेच हे विधान करतोय. स्वत: भगवान बुद्धांचंच त्याच्या बौद्धपंथामध्ये माजलेला अनाचार पाहून 'येत्या पाचशे वर्षात माझा बुद्ध धम्म नष्ट होईल' हे चुल्लवग्गातलं(विनयपिटक) आनंदाशी झालेलं संभाषण आहेच. हा काळ इसवी सन पूर्व १८वं शतक आहे, ब्रिटीशांनी ठरविलेला काळ आह्मीं मानत नाही. त्यानंतर सातशे वर्षांनी चंद्रगुप्त मौर्याचं अभूतपूर्व साम्राज्य(इसवी सन पूर्व ११व्या शतकाच्या समीप) ह्यात हा अनाचार दिसत नसला तरी त्यानंतर किंवा त्या काळात निर्माण झालेली अनेक अवैदिक मतं नि त्याने वैदिक धर्मांस आलेली ग्लानी ज्यावर पुढे सहाशे वर्षांनी भगवत्पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांनी(इसवी सन पूर्व ५वं शतक) वैदिक धर्माचे पुनरुत्थान करत वैदिक सिद्धांताची पुनर्प्रतिष्ठापना केलेली दिसत असली तरी त्यांच्या‌ साहित्यातही(चरित्रात नव्हे) काही स्थळी स्त्रियांविषयी वेदाधिकार नाकारणारी विधाने दिसतात. अर्थात ही प्रक्षिप्त असावीत असं आमचं आचार्यांच्या समग्र १९ चरित्रांचे व साहित्याचं अवगाहन केल्यानंतरचं मत आहे. भले अनेकांना ते मान्य होणार नाही विशेषत: स्वत:ला शांकरमतानुयायींना तरी. पण क्षणभर ते सोडलं तरी भारतीयांचा‌ स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन हा पुन्हा आचार्यांच्या काळात पूर्वीच्या वेदकाळासारखा उदात्त झालेलाच दिसतो. 


*मग नेमकं कुठं चुकलं???*


तर उत्तर आहे इस्लामी आक्रमणानंतर...होय कारण ही आक्रमणे अत्यंत पाशवी आणि न भूतो अशी होती. इथूनंच स्त्रियांवर नको ती बंधने लादण्यांत आली, अगदी केवळ ब्राह्मण समाजापुरती मर्यादित असणारी केशवपन किंवा विधवा पुनर्विवाह निषेधासारखी वचने आपल्याला धर्मशास्त्राचा अविभाज्य भाग असल्याची दिसतात. हाच वैदिक धर्माच्या पतनाचा खरा आरंभ आहे. पण याचा अर्थ असाही नाही की अगदीच स्त्रियांवर बंधने आली. म्हणजे त्यांना लिहायला वाचायला शिकु दिलंच नाही, सतीप्रथा सरसकट होतीच असा भ्रम जो आपण करून घेतो तो अत्यंत आत्मघातकी आहे. कारण भारतीय इतिहासांत कधीही असा काळ फारसा नव्हता की जिथे स्त्रियांना लिहायला वाचायला अगदीच प्रतिबंध होता. कारण आजपासून ६०० वर्षांपूर्वी म्हणजे १४व्या शतकांत काश्मीरमध्ये शेतामध्ये‌ काम करणाऱ्या माता-भगिनी संस्कृतमध्ये काव्यरचना करत होत्या असा लेखी संदर्भ आहे(विक्रमांकदेवचरितम्) आह्मीं यावर सविस्तर लेख मागे लिहिला आहेच. आह्माला स्वत:ला अद्याप संस्कृतमध्ये एक श्लोक रचता आला नाहीये. पण लौकिक शिक्षण नाकारलं नसलं तरी 


*'स्त्रीशुद्रौ नाधीयताम्'*


अशा काही विकृत स्मृतीवचनांमुळे स्त्रियांना वेदाधिकार मात्र या काळात मात्र नाकारला गेला असेल हे आह्मीं मान्य करतोच. त्यामुळे आह्मीं असे म्हणत नाही की सगळंच छान होते पण अगदीच वाईट होतं असेही दिसत नाही. पण इस्लामी आक्रमणानंतर आह्मां भारतीयांचा स्त्रियांविषयीचा मूळचा उदार दृष्टिकोन हा काही अंशी संकुचित व्हायला सुरुवात झाली हे त्रिवार सत्य. याचं दायित्व मुस्लिमांचे नसून आमचंच आहे हे मान्यंच करावं लागेल. वेदमहर्षि सातवळेकरांनी त्यांच्या 'वैदिक व्याख्यानमाले'मध्ये हा विषय काहीअंशी साधार मांडला आहे तिथे अभ्यासावा. यावर कधीतरी येऊच...


*अर्थात ज्या धर्मात स्त्रीला भद्रा, काली, दुर्गा, रमा, सरस्वती, अंबिका, चंडिका म्हणुन पूजिलं जातं, त्याच धर्मात नि त्याच राष्ट्रात स्त्रियांप्रती केवळ ब्राह्मणसमाजापुरता असलेला केशवपनाचा आग्रह, सतीचा काही ठिकाणीच आढळणारा अपवादात्मक अतिरेक किंवा निदान तो वेदसंमतंच आहे असे मानणारी वेदमंत्रांचा वाट्टेल तो अर्थ काढणारी सायणाचार्यांची काही ठिकाणी विकृत अशी वेदभाष्ये नि त्यालाच प्रमाण मानणारी धर्ममार्तंड मंडळी, आमच्या धर्मसिंधुसारख्या ग्रंथांमध्ये ६-८व्या वर्षीच कन्यांचा‌ विवाह लावण्याच्या अत्यंत शास्त्रविरुद्ध नि वेदविरुद्ध अशा आज्ञा,‌ इतक्या लहान वयात त्या विधवा झाल्यातर आयुष्यभर पुनर्विवाहाचा निषेध, म्हणजे आयुष्यभर केशवपन करीत त्यांनी तसंच रहायचं, यद्यपि हे केवळ ब्राह्मण समाजापुरतं असलं तरी जिथे हा धर्ममार्तंड म्हणविणारा समाजंच इतका भरकटला होता, तिथे धर्माची ग्लानी वेगळी काय सांगायची? हा सर्व विकृत प्रकर घडत असताना वेळोवेळी हिंदुस्थानात अनेक सत्पुरुष‌ निर्माण झाले नि त्यांनी स्त्रियांच्या उत्थानासाठी अलौकिक कार्य केलं. मग त्यामध्ये अगदी समर्थ रामदासांसारखे संत असतील किंवा आधुनिक काळात कर्व्यांसारखे, स्वामी विवेकानंदांसारखे, सावरकरांसारखे कर्ते सुधारक असतील. पण ह्या‌ सर्वात महर्षि दयानंदांचे नाव मात्र अग्रगण्याने घ्यावं‌ लागेल ज्यांनी या सर्व मध्यकालीन वेदविरुद्ध स्मृतींना धिक्कारून मूळ वेदांच्या आधारावरंच स्त्रियांना वेदसंमत वेदाधिकार, पुनर्विवाहाचा अधिकार, पूर्ण यौवनावस्था प्राप्त झाल्यावरंच विवाह वगैरे जे क्रांतिकारक असे वेदाधारित सिद्धांत मांडून वैदिक धर्माची पुनर्प्रतिष्ठापना केली, त्याने स्त्रियांकडे पाहण्याची दृष्टी पुन्हा ढवळून निघाली आणि ती अत्यंत स्वच्छ नि शुद्ध झाली. अर्थात महर्षींच्या या दृष्टिकोनाला तुच्छ‌ लेखणारे व त्यांचा विद्वेष करणारी मंडळीही त्याकाळी होती व आजही आहेतंच जी अद्यापही मध्ययुगीन मानसिकतेमध्ये जगणारी आहेत. कुणाचं नाव घेण्याची आवश्यकता नाही.*


पण हा झाला इतिहास - वर्तमानाचं काय?


काही जण म्हणतील अहो सारखं काय इतिहास उगाळता? आजच्या आमच्या तरुण पिढीला या तुमच्या इतिहासाशी काही घेणंदेणं नाहीये तुम्ही काय इतिहास उकरून काढता? तर आह्मीं सांगु इच्छितो की असा रस खरंच नसेल तर एका दृष्टीने ते चांगलंच आहे. पण दुसरीकडे ह्या इतिहासाचे भांडवल करून त्याचे विकृतीकरण करत संपूर्ण सत्य‌ न मांडता केवळ आपल्या‌ स्वार्थाला सोयीस्कर तेवढं मांडून हिंदु धर्म नि संस्कृतीचा अपलाप करण्याची जी कथित पू-रोगामी, अ-बुद्धिवादी, स'माज'वादी, साम्यवादी, नास्तिक, कथित विवेकवादी, कथित स्त्रीवादी अशी म्हणजेच संक्षेपात हिंदुद्वेष्टी अशी जी काही समाजविघातक वृत्ती मागील सात आठ दशकांत फोफावलीय, जीतून समाजमन कलुषित करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो, ती पाहता या सर्व इतिहासाचा विचार करणं आवश्यक वाटल्याने हा लेखनप्रपंच...!


*या‌ सर्व लेखनाचा हेतु काय?*


पूर्वजांच्या चुकांवर पांघरुण घालणं? असे वरील लेखात कुठेतरी दिसतंय का वाचकांनी पहावं. मग नेमका हेतु काय? 


आपल्या इतिहासाचा अयोग्य वापर करून कुणी आपला बुद्धिभेद करत असेल तर त्याला आपण योग्य प्रत्युत्तर देणं व त्यातून आपली एकात्मता कुठेही विघटित होऊ न देणं हेच आजंच नव्हे येत्या काळातही राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीने नि मानवतेच्या दृष्टीनेही श्रेयस्कर आहे. म्हणूनंच युवापिढीने यादृष्टीने विचारमंथन करणे आवश्यक असल्याने आज महिलादिनाच्या निमित्ताने हा प्रपंच...!


*स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे...*


*कारण इतिहासात आमच्यावर पिढ्यान्पिढ्या अन्याय झाला म्हणून आता आह्मीही त्याचा‌ सूड घेऊ, वाट्टेल तसे वागु, स्वैराचार करु ही भावना स्त्रीवादाच्या नावाने कुठेतरी फोफावत असेल तर समाजधारणेच्या दृष्टीने ते फार घातक आहे. ते होऊ नये म्हणून हा अट्टाहास. अर्थात हे सर्व पुरुषांनाही लागु होते. दोघांनीही मर्यांदाचे भान राखलं पाहिजे. एकमेकांचा आदर केला पाहिजे.*


लेखाचा अंत एकाच वाक्याने करतो


स्वामी विवेकानंदांनी तत्कालीन स्वत:ला स्त्रीसमाजसुधारक म्हणविणाऱ्यांना एका ठिकाणी छान कान उघाडणी केलीय. ते म्हणतात


"स्त्रियांचा उद्धार करणारे आपण कोण आहोत? त्यांच्या कल्याणाची तुम्हाला खरंच तळमळ असेल तर त्यांना शिक्षण द्या, सुशिक्षित करा, इतकंच करा. बाकीचा उद्धार त्या त्यांचा स्वत:चा स्वत:च करून घेतील. तुम्ही लुडबूड करु नका."


*स्वामीजींचे शब्द नेमके असे नसतील तरी भाव हाच आहे. आह्मीं स्त्रियांचा उद्धार करु शकतो ही भावना पुरुषांनी मनातून काढून टाकली पाहिजे. अरे जी साक्षात् भवानी आहे, सृष्टीकर्ती आहे, जगज्जननी आहे, जगत्स्रष्टी आहे, जिच्या उदरातून योगेश्वर भगवान श्रीकृष्ण नि भगवान श्रीरामचंद्र, पुण्यश्लोक शिवाजी, ज्ञानोबा-तुकोबांसारखे लोकोत्तर पुरुष जन्माला आले, मैत्रेयी, गार्गीसारख्या स्त्रिया निर्माण झाल्या, सीता-रुक्मिणी, सत्यवान-सावित्रीसारख्या पतिनिष्ठ स्त्रिया निर्माण झाल्या, ईश्वराने सृजनाचे अलौकिक कार्य जिच्या उदरी सोपावलं, तिचा उद्धार करणारा तु कोण? तु तिला केवळ योग्य शिक्षण संस्कार दे, ती केवळ तिचाच नव्हे तर जगाचाही उद्धार करेल...कारण ती साक्षात् नारायणी आहे...*


आंतरराष्ट्रीय‌ महिला दिनानिमित्त समस्त स्त्रीवर्गांस अभिवादन करत इतकंच...


भवदीय,


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#आंतरराष्ट्रीयमहिलादिन_स्त्रीवाद_वैदिकधर्म_फेमिनिझम_सतीप्रथा_पुनर्विवाह