Friday, 19 August 2022

यथा सत्यं च धर्मश्च मयि नित्यं प्रतिष्ठितौ|


 



भगवान योगेश्वराच्या चरित्रांतला हा एकंच प्रसंग...एकंच एकंच...


जो अभ्यासताना, वाचताना, लिहिताना, सांगताना अंत:करणाची काय अवस्था होते हे शब्द धजावंत नाहीत व्यक्त व्हायला. मी मूळ महाभारत पूर्ण संस्कृत संहिता व हिंदी अनुवाद पूर्ण अभ्यासलं जेंव्हा होते, तेंव्हाही हा प्रसंग वाचल्यावर काही क्षण अक्षरश: नि:शब्द झालो होतो.‌ डोळ्यांतून अश्रुपात‌ तर होताच पण कंठही अवरुद्ध झाला होता. त्यावेळी अंत:करण योगेश्वराच्या अलौकिक दिव्य आभेने ज्या प्रकारे व्यापून गेले होते, त्याचं शब्दांत वर्णन करणं माझ्याच्याने तरी संभवंच नाही. मागील वर्षी पूज्यनीय स्वामी वरदानंद भारतींच्या (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले उपाख्य अप्पा) 'भगवान श्रीकृष्ण एक दर्शनाचे' चिंतन करतानाही ग्रंथाचा अंतंच पूज्यनीय अप्पांनी ह्याच प्रसंगाने केला असल्यामुळे ह्यावर बोलताना प्रचंड रडलो होतो. अप्पांनी हा प्रसंग काय रंगवलाय बापरे...! अप्पांच्या प्रतिभेंस दंडवत...! अप्पा आज जीवित असते तर मी त्यांच्यासमोर हे वाचत वाचत धाय मोकलून रडलो असतो. चारित्र्यनिर्माण काय असतं, प्रसंग असा आहे...


आत्ता हे लिहितानाही कंठ अवरुद्ध आहे...


अश्वमेधिक पर्वातले श्रीकृष्णांचे आणखी एक ब्रह्मचर्याचे उदाहरण


अश्वत्थाम्याने आपल्या पित्याच्या वधाचा प्रतिशोध घेण्याच्या दृष्टीने द्रौपदीच्या पाच पुत्रांची ते पांडवंच आहेत असे समजून रात्रीच्या वेळी झोपेतंच निर्मम हत्या केली. पण ते पांडव नव्हते हे कळल्यावर त्याचा क्रोध शांत व्हायच्या पेक्षा अधिकंच वाढला नि सुडाग्नीने त्याने पांडवांचा वंशंच नष्ट करायचे ठरवले व त्यासाठी त्याच्याजवळ असलेले ब्रह्मशिरास्त्र नामक अस्त्र उत्तरेच्या गर्भावर सोडले. हे तेच ब्रह्मशिरास्त्र आहे जे‌ त्याने पूर्वी भगवान योगेश्वरांस देऊ केले होते व त्याबदल्यात त्यांचे सुदर्शन मागितले होते. आमच्या आधीच्या‌ कैक लेखांमध्ये तो प्रसंग आह्मीं मांडला आहे तेंव्हा पुनरुक्ती करत नाही. त्या जणु विश्वसंहारक अशा अस्त्राने उत्तरेच्या गर्भावर जाताच त्यातून भविष्यांत जन्माला येणारे मुल जे पुढे परीक्षित (विष्णुरात) नावाने ओळखले गेले, ते त्या अस्त्राच्या प्रभावाने मृत म्हणूनच जन्माला आले. श्रीमद्भगवतामध्ये भगवंतांनी गर्भामध्ये जाऊन त्याचे रक्षण केलं म्हणून त्याचे नाव विष्णुरात पडले अशी कथा आहे पण ती निखालस‌‌ खोटी आहे हेच‌ सिद्ध होते. कारण जर‌ परीक्षितीचे रक्षण भगवंतांनी त्या अस्त्राने गर्भातंच केले असते तर बाहेर आल्यावर ते मृत असायला नकोच होते. व पुढील‌ कथाविस्ताराला महाभारती विपर्यास निर्माण होतो. आणि आह्मांस महाभारत अधिक प्रमाण आहे, भागवत नाही. त्यातही भगवंतांचे प्रत्यक्ष शब्द सर्वोच्च...! असो.


परीक्षित ह्या शब्दाच्या अनेक निरुक्त्या व त्यातून निघणारे अनेकार्थ आहेत, त्यावर सविस्तर कधीतरी. मृत बालकांस जीवित कोण करणार? एवढं सामर्थ्य कुणामध्ये ? तेंव्हा पांडवांचा हा वंश खुंटणार की काय ह्या भीतीने सर्व पांडवपक्षातल्या स्त्रिया विलाप करीत असताना द्रौपदी मात्र योगेश्वर भगवान श्रीकृष्णांच्या आगमनाची वाट पाहत बसली. कारण तिला माहिती होते‌ केवळ भगवानंच ह्यातून आपणांस सोडवतील. भगवान तिथे येताच ती त्यांस म्हणाली...


“यादवश्रेष्ठा कृष्णा, अरे तु दिलेले वचन पूर्ण करशील ना? तु पराक्रमी, धर्मवेत्ता सत्यप्रतिज्ञ आहेस. त्रिभुवन सारे मृत झाले तरी त्याला जीवित करण्याचे सामर्थ्य तुझ्यात आहे. मग भाच्याच्या मुलाला जीवित करण्याचे तुला काय कठीण आहे? तुझे सामर्थ्य ज्ञात असल्यानेच तुझ्यापुढे हे हात जोडून मी मागणे मागत आहे.”


पुढे उत्तरेनेही भगवान श्रीकृष्णांची करुणा भाकल्यावर त्यांनी तिला अभय देताना म्हटले. हे जे श्लोक आहेत ना ते सुवर्णाक्षरांत नोंदवावेत..! भगवान म्हणतात


न ब्रवीम्युत्तरे मिथ्या सत्यमेतद्भविष्यति |

एष सञ्जीवयाम्येनं पश्यतां सर्वदेहिनाम् ||१८||

नोक्तपूर्वं मया मिथ्या स्वैरेष्वपि कदाचन |

न च युद्धे परावृत्तस्तथा सञ्जीवतामयम् ||१९||

यथा सत्यं च धर्मश्च मयि नित्यं प्रतिष्ठितौ |

तथा मृतः शिशुरयं जीवतामभिमन्युजः ||२२||


महाभारत भांडारकर प्रत – अश्वमेधिक पर्व - अध्याय ६८


अर्थ - उत्तरे, माझे भाषण अन्यथा कधी होणार नाही; ते सत्यच होईल...मी आजवर कधी थट्टेनेही असत्य भाषण केले नाही, ब्रह्मचर्य व्रताचे निष्ठेने पालन केले आहे, कधी युद्धांत पाठ दाखविली नाही. तरी त्या पुण्याने हा बालक जीवित होवो ! सत्य आणि धर्म जर माझ्या ठायीं असतील तर हा अभिमन्यूपुत्र जीवित होवो !!!”


अरे चारित्र्य यापेक्षा वेगळं काय असतं? का नाहीत हे प्रसंग शालेय अभ्यासक्रमांत?? का सांगत नाहीत आमचे कथाकार हे प्रसंग???


इथे ब्रह्मचर्य व्रताचे निष्ठेने पालन आणि सत्यनिष्ठा हे शब्द सर्व काही सूचित करणारे आहेत. त्यामुळे आणखी काही संदर्भ द्यायची आवश्यकता मला तरी वाटत नाही ! वाचक सुज्ञ आहेत !!!


विवाहापूर्वी १२ वर्षे‌ स्वपत्नीसह नैष्ठिक ब्रह्मचर्य‌ हिमालयांत पालन केलेला व पुन्हा आयुष्यभर गार्हस्थ्य ब्रह्मचर्याचे पालन केलेला हा भगवान...!


भगवान हा‌ शब्द प्रत्येकवेळी ईश्वरी अवतारासाठीच‌ वापरला जातो असे नव्हे बरंका...! नाही म्हणजे सांगितलेलं बरं...! नाहीतर पुन्हा आह्मांस शब्दांत पकडायला यायचे‌ काहीजण. असो...


अशा योगेश्वराच्या चरित्राचे चिंतन नि अनुकरण कधी करणार आहोत ?


काय तर म्हणे श्रीकृष्णाचे अनुकरण करु नये, अनुसरण करावं ? का? त्यांनी केलेले ब्रह्मचर्य पालन आम्ही नाही आचरु शकत? त्यांनी केलेले वेदाध्ययन आम्ही नाही आचरु शकत? त्यांनी केलेले आजीवन सत्यवचनाचे व्रत आम्ही नाही आचरु शकत ? 


केवळ श्रीकृष्ण कथा करायच्या, जन्माष्टम्या करायच्या, दहीहंडी नाचवायच्या, पण आचरण ???


जन्माष्टमीच्या‌ निमित्ताने एवढी एक कथा आयुष्यभर चिंतनांस ठेवली तरी पुरेसं...!


अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु।


पाखण्ड खण्डिणी 

Pakhandkhandinee.blogspot.com 


#भगवान_श्रीकृष्ण_योगेश्वर_ब्रह्मचर्य_पुराण_महाभारत_जन्माष्टमी_गोकुळाष्टमी_अश्वत्थामा

Thursday, 11 August 2022

संस्कृत दिवस संस्कृतसप्ताह - लेखांक प्रथम

 


आज‌ श्रावण पौर्णिमा, नारळीपौर्णिमा, राखीपौर्णिमा अर्थात संस्कृतदिवस...! परवा म्हटल्याप्रमाणे आजपासून संस्कृत भाषेंवर लेखन आरंभ....

*भाषा कशाला म्हणायचं???*

*स्फुटवाक्करणोपात्तो भावाभिव्यक्तिसाधक:|*
*संकेतितो ध्वनिव्रात: सा भाषेत्युच्यतेबुधै:|*
पद्मश्री डॉ. कपिलदेव द्विवेदी

स्फुट वाणीने बनलेली, भाव अभिव्यक्तीचे साधन असलेली, वैविध्यपूर्ण संकेत नि ध्वनी असलेली अशी जी अभिव्यक्ती, तिला विद्वान लोक भाषा म्हणतात.

नामानि सर्वाण्याख्यातजानीति शाकटायनो नैरुक्तसमयश्च| निरुक्त १|१३

नाम च धातुजमाह निरुक्ते व्याकरणे | व्याकरणमहाभाष्य ३|३|१

संस्कृत भाषेमध्ये कुठलाही शब्द हा आख्यातज म्हणजे धातुपांसून निष्पन्न आहे असे निरुक्तकार महर्षि श्रीयास्काचार्यांचं नि श्रीशाकटाचार्यांचे मन्तव्य आहे. उगाचंच रला र आणि टला ट असा काहीही प्रत्यय‌ किंवा अक्षर लावून संस्कृत भाषेमध्ये कोणताही अशास्त्रीय शब्द तयार होतंच नाही. आह्मीं आजपर्यंत कैकवेळा लिहिलं आहे व बोललोही आहोत की संस्कृत भाषेमधला प्रत्येक शब्द हा धातुज असतो. म्हणजेच‌ विशिष्ट धातुंपासून तो प्रक्रिया होऊन निर्माण होतो. म्हणजेच या सर्व शब्दांची मूल प्रकृती म्हणजे धातु आहेत. आणि हे मत आमचं स्वत:चे नसून वर दिलेलं महर्षि श्रीयास्काचार्य नि भगवान महर्षि पतंजलीसदृश दिग्गजांचं आहे. भगवान महर्षि श्रीपाणिनींनी त्याच धातुपाठाचे‌ संकलन केलं असून त्यावर त्यांची अष्टाध्यायी सर्वांना परिचित आहेच. त्यांनी या‌ धातुंचे एकुण ११ गण केलेलं असून त्यावर भगवान महर्षि श्रीपतंजलींचे व्याकरण महाभाष्यही प्रसिद्ध आहे. त्यातलंच प्रमाण वर दिलं आहे.

याच धातुपाठामध्ये भ्वादि गण नावाचा एक गण आहे ज्यामध्ये भाषा हा शब्द 'भाष् व्यक्तायां वाचि|' (१|४०७) ह्या धातुपासून निष्पन्न होतो ज्याचा अर्थ आहे 'भाष्यते व्यक्तवागरुपेण अभिव्यंजते इति भाषा| '. व्यकीच्या वाणीरुपाने अभिव्यक्त होणारी, भाषित होणारी ती भाषा...! म्हणजेच भाषा शब्द हा मूळ धातुज असून त्याचा अर्थ काय होतो हे आपण पाहिले.

आता भाषा कशी निर्माण होते असा प्रश्न पडतो. अनेकांनी अनेक प्रकारे ह्याचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. पण बव्हतांश जणांनी डार्विनच्या विकासवादावर आधारित‌ मते मांडलेली असल्यामुळे ती मते अत्यंत अशास्त्रीय आहेत. नि म्हणूनंच अग्राह्य आहेत. त्यांच्या मते माणुस हा सर्वप्रथम वनामध्ये जनावरांप्रमाणे अत्यंत अप्रगत अवस्थेत राहत होता.‌ त्याला बोलायचं कसं हेदेखील माहिती नव्हतं म्हणे. मग तो हळुहळु आजुबाजुच्या पशुपक्ष्यांची वगैरे भाषा पाहून, आवाज ऐकून स्वत:चे‌ शब्द, हावभाव, संकेत वगैरे विकसित करु लागला व हळुहळु त्याला बोलायला यायला लागलं म्हणे व त्याने त्या बोलीभाषेतून भाषा‌ विकसित केल्या म्हणे. आधुनिक भाषाशास्त्रज्ञांनी भाषेच्या उत्पत्तीसंबंधी इतके हास्यास्पद नि तर्कहीन सिद्धांत मांडून ठेवले आहेत‌ की बास. म्हणूनंच भाषाशास्त्रासंबंधी नि तिच्या विज्ञानासंबंधी आपल्या प्राचीन शास्त्रकारांनी जी मते मांडली आहेत ती अभ्यासणं महत्वाचं आहे. भाषेच्या अध्ययनाच्या दृष्टीने वैदिक नि तत्सम सर्व प्राचीन संस्कृत वाङ्मयाच्या आलोडनाची जितकी आवश्यकता आहे, तितकी अन्य कशाचीच नाही. आणि तीही शुद्ध भारतीय वैदिक दृष्टिकोनातून. स्फोटायन=कक्षीवान् (द्वापराच्या पूर्वीचा काळ), औपमन्यव, औदुंबरायण(विसं ३१००पूर्व) महर्षि यास्क (विसं ३१००पूर्व), महर्षि वेदव्यास (विसं ३०४४पूर्व), व्याडि(२९०० विसंपूर्व), पतंजलि (विसं१५००पूर्व), भर्तृहरि (विसं ८००पूर्व) ह्या सर्वांनीच भाषेच्या उत्पत्तीचा इतिहास अगदी अनविच्छिन्न स्वरुपामध्ये शब्दबद्ध ठेवलेला आहेच मूळातंच, जो एकमात्र सूक्ष्म तर्क-युक्त, सत्य आणि विज्ञानसिद्ध सिद्धांतारुढ आहे. यात विक्रम संवतापासून तितकी वर्षे पूर्व असा अर्थ अभिप्रेत आहे. आता विक्रम संवत कोणतं ते वाचकांना सांगायची आवश्यकता नसली तरी सांगतो. इसवी सन पूर्व ५६ ला जो विक्रमादित्य राजा सिंहासनारुढ झाला, त्याने त्याचे संवत सुरु केलं. आजचं संवत २०७८ सुरु आहे. आपण हिंदु लोक नित्याच्या‌ संकल्पामध्ये हे गातो.

आता हा इतिहास कळायचा कसा?‌ वर नावे तर सांगितली पण साहित्य कोणतं अभ्यासायचं? त्यासंबंधी निम्मलिखित विस्तार

१. समस्त शिक्षाग्रंथ(पाणिनीय शिक्षा, याज्ञवल्क्य शिक्षा वगैरे) आणि त्यांची व्याख्या किंवा त्यावरील भाष्ये
२. समस्त संस्कृत‌व्याकरणशास्त्र तथा त्यावरील व्याख्या
३. मीमांसा ग्रंथ आणि त्यावरील व्याख्या
४. निरुक्तग्रंथ आणि त्यावरील व्याख्या
५. वैदिक शाखा, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद
६. प्रातिशाख्य आणि त्यावरील व्याख्या
७. भरत नाट्यशास्त्र नि त्यावरील व्याख्या
८. प्राकृत-पालि-अपभ्रंश व्याकरणावरील ग्रंथ नि त्यावरील व्याख्या

संस्कृत भाषेचा अभ्यास करण्यासाठी, भाषा विज्ञान अभ्यासण्यासाठी इतकं सर्व अभ्यासणं आवश्यक आहे. आमचं दुर्दैव हे आहे की इतकं सर्व साहित्य आमच्याकडे असतानाही आह्मांस‌ ते अभ्यासु वाटत‌ नाही. आमच्या संस्कृत दिनाच्या तीन व्याख्यानांत संक्षेपाने हा विषय आह्मीं मांडला होता मागील वर्षी. भारतीय इतिहासाकडे विशुद्ध भारतीय दृष्टिकोनातून पाहणं आह्मांला जोपर्यंत जमणार नाही, तोपर्यंत आमच्या इतिहासाचे विकृतीकरण थांबणार नाहीच.

आता संस्कृत भाषेचं नामकरण...

महत्वाचा प्रश्न पडतो की संस्कृत भाषेला संस्कृत हेच नाव का दिलं गेलं? अनेकांचा असा भ्रम आहे की संस्कृत ही संस्कार होऊन झालेली भाषा आहे म्हणून तिला संस्कृत म्हणतात. म्हणजे वर विकासवादाचे‌ जे मत मांडलं त्यानुसार आधीच्या अनेक बोलीभाषा किंवा अशुद्ध भाषांवर संस्कार होऊन परिशुद्ध झालेली भाषा म्हणजे संस्कृत होय असा अत्यंत हास्यास्पद नि भ्रममूलक‌‌ सिद्धांत बव्हतांश भाषाविद् मांडताना दिसतात. अगदी आरंभीच‌ सांगायचं तर संस्कृत ही‌ संस्कार होऊन निर्माण झालेली भाषा मूळीच नाही. मग तिला संस्कृत‌ हे नाव का दिलं गेलं? त्याचे उत्तर आहे

संस्कृतं नाव दैवी वागन्वाख्याता महर्षिभि:|
आचार्य दंडी - काव्यादर्श

महाकवी दंडी म्हणतात‌ की संस्कृत‌नामक दैवी वाणी जींवर महर्षींनी अनुव्याख्यान केलं. म्हणजे काय? तर इथे दैवी वाणी म्हणजे प्रत्यक्ष‌ वेद जिच्यापासून आपल्या ऋषि-महर्षींनी मानुषी वाणी निर्माण केली. म्हणूनंच तिला संस्कृत‌ हे नाव दिलं गेलं. वेद स्वत: सांगतो की

दे॒वीं वाच॑मजनयन्त दे॒वास्तां वि॒श्वरू॑पाः प॒शवो॑ वदन्ति|
ऋग्वेद ८|१००|११

अर्थ - देव ज्या‌ दिव्य वाणींस प्रकट करतात, तीच साधारण मनुष्य‌ लोक बोलतात...

इथे पशवो वदन्ति असा शब्द आला आहे.‌ पशवो म्हणजे पशु असा अर्थ नसून मनुष्य प्रजा असा आहे. कारण वैदिक साहित्यामध्ये अनेकठिकाणी पशु शब्द हा मनुष्यासाठी वापरला आहे.

अगदी महर्षि वेदव्यासांनीही श्रीमन्महाभारतामध्ये

*अनादिनिधना नित्या वागुत्सृष्टा स्वयम्भुवा|*
*आदौ वेदमयी दिव्या‌ यत: सर्वा: प्रवृत्तय:|*
शान्तिपर्व २३२|२४ - चित्रशाळा प्रेस संस्करण, पुणे

अनादि अशी जी नित्य अशी वाणी जी स्वयंभु म्हणजे ईश्वराने प्रवृत्त केली, ती आद्य अशी वेदवाणी जिच्यापासून सर्व काही प्रकट झाले आहे. मनुस्मृतीमध्ये हेच सांगताना

सर्वेषां तु स नामानि कर्माणि च पृथक् पृथक्|
वेदशब्देभ्य: एवादौ पृथक् संस्थाश्च निर्ममे|

वेदांतल्या शब्दांवरूनंच नंतरच्या काळात सर्व वस्तुंची व्यक्तींची ठिकाणांची संस्थांची नावे दिली गेली कारण वेद हेच सर्वात आरंभीचे ज्ञान आहे. पृथ्वीला पृथ्वी हे नाव वेदांतल्या शब्दांवरूनंच दिलं गेलं. मानवाला मनुर्वभ ह्या वेदमंत्रावरूनंच मानव हे नाव दिलं गेलं इत्यादि. ज्यांना वेदांचा दु:स्वास आहें असात्म्य(एलर्जी) आहे, स्वत:ला मानव म्हणणं बंद करावं.

सर्व प्राचीन ऋषि-महर्षि, शास्त्रकार भाष्यकार सर्वांची एकमुखाने संमती आहे की वेद हे अनादि अपौरुषेय‌ तथा नित्य आहेत.‌ मानवसृष्ट्यारंभी ईश्वराने चार ऋषींच्या अंत:करणांत दिलेलं ज्ञान म्हणजे वेद...! जर वेद सर्वात पहिलं ज्ञान असेल तर स्वाभाविक आहे वेद ज्या भाषेत‌ असतील तीच मानवाची आद्यभाषा असणार. पण विकासवादी हे मानत नाहीत कारण त्यांना हे सत्य स्वीकारायचं साहस‌ नाही. आणि त्यांना बुद्धी गहाण टाकलेले एतद्देशीयही हे मान्य करत नाहीत. कारण बव्हतांशांना असं वाटतं की हे मान्य केलं तर आपलं हसु होईल. म्हणजे 

तुज आहे तुजपाशी, परि तु जागा भूललासीं|

हीच आपली अवस्था आहे. विकासवाद का खोटा आहे हे हळुहळु आह्मीं दाखवुच. अस्तु प्रथम लेखांकात इतकंच...!

पुढील लेखासाठी क्रमश:

#संस्कृतभाषा_इतिहास_निर्मिती_वेद_भाषाविज्ञान_विकासवाद_डार्विन_व्याकरणशास्त्र


Sunday, 7 August 2022

सचि॒विदं॒ सखा॑यं॒...! ऋग्वेद

 




आधी जे मित्र कमावलेत ते‌ टिकवायला शिका...


एकेकाळी अत्यंत प्रगाढ मैत्रीत असलेले लोक पुढे जाऊन एकमेकांना अंतरतात. मला खरंतर काहीवेळा हसु येतं ह्या लोकांचं आणि काहीवेळा कीवही येते व काहीवेळा आश्चर्यही वाटतं. अर्थात ह्याला तशी कारणं असुही शकतात, नाही असं नाही. पण बव्हतांश वेळाच अगदी क्षुल्लक कारणांवरून लोकांची मैत्री तुटते. केवळ संवादाचा अभाव, अहंकार नि तज्जन्य परस्परांविषयीची अंतराची भावना हीच मैत्री तुटायला कारणीभूत असते. यात‌ संवादाचा अभाव हे मुख्य कारण असतं...


एकमेकांच्या एखाद्या किंवा अनेक गोष्टी न पटायला सुरुवात झाली की संवाद‌ तुटतो व तिथून मैत्री‌ संपत जाते. मूळात एखाद्या‌च्या सर्वच गोष्टी आपल्याला पटायलाच हव्यात हा अट्टाहास‌ तरी का? स्वभाववैचित्र्य असतंच तसं आचारवैचित्र्यही मान्य करावंच लागेल. पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना:...! अगदी एकमेकांवर अत्यंत प्रेम असलेले नवरा-बायकोही एकमेकांच्या सर्वच गोष्टी पटणाऱ्या स्वभावाच्या असतात असेही नव्हे पण तरीही त्यांचा‌ संसार होतोच ना? समजून घेणे हा प्रकार असतोच ना?


मग मैत्रीत हे का होत नाही? एखाद्याची एखादी गोष्ट आपल्याला नाही पटली तर त्याला तसं सांगावं पण ते‌ सांगतानाही कळकळ असावी, अहंकार नसावा. भाषा सौम्य असावी व त्यातून त्याला आपली चुक उमजेल हा हेतु असावा. यात भाषा फार महत्वाचं काम करते. पण तरीही काहीवेळा समोरचा खरंच चुकत असेल व त्याच्या भल्याकरिता आपण त्याला तो किंवा ती चुकतोय‌ किंवा चुकतेय हे त्याला प्रामाणिकपणे सांगितलं तरी तो ऐकत नाही. मग ह्यातून दुरावा वाढतो व मैत्रीत अंतर येते.


मग हे थांबवायचं तरी कसं? 


काहीवेळा खरंच‌ पर्याय‌ नसतोच कारण समोरचा ऐकूनंच घेत नसेल तर विषय‌ संपतोच. अशावेळी स्वत: जमत नसेल तरी दुसऱ्याकडून सांगून पहावं पण तरीही जमत नसेल तर मग विषय‌ सोडून द्यावा. पण जर काही उपाय असेल, आशा असेल तर प्रयत्न करून पहावा. आणि ते संवादाच्या अभावाने जमणार नाही. अहंकाराने तर नाहीच. मी का बोलु हा अहंकार मैत्रीत चालत नसतो. तो आला की मैत्री तुटते. बोलायला हवं, स्पष्ट बोलायला हवं पण भाषा मृदु हवी. भले आपली चूक नसली तरी काहीवेळा माघार घ्यायला हवी. तरंच मैत्री टिकु शकते...!


तुट वाद संवाद तो हितकारीं|

समर्थ उगाचंच म्हणत नाहीत.. 


अहंकार हा सर्व गोष्टींचा मारक आहे. शहाणा माणुस त्याला दूरंच ठेवतो. 


ह्यात आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे नि:स्वार्थता...! मैत्रीत‌ स्वार्थ आला की ती फार काळ टिकत नाही. स्वार्थ संपला की ती‌ संपते. मूळात अशा मैत्रीस मैत्री म्हणावं का असा प्रश्न येतो. भले काहीवेळा स्वार्थाने केलेली मैत्रीही टिकत असेलही. पण ते फार अपवादात्मक...! पण भले स्वार्थाने एकत्र आलाही असाल तरीही स्वार्थ‌ संपल्यावर पुढे नि:स्वार्थी मैत्री टिकायला हवी.‌ तरंच त्याला अर्थ आहे...


हेतु कोणताही असो, मैत्री टिकवता आली पाहिजे. त्यासाठी मैत्रीची भावना शुद्ध हवी....!




महाभारतांत वनपर्वामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनांस म्हणतात


ममैव त्वं तवैवाहं ये मदीयास्तवैव ते|


तु माझा आहेस नि मी तुझा आहे.. जे माझं आहे ते तुझं आहे व तुझं ते माझं आहे...


भवदीय...


#मैत्रीदिन_मित्र_सखा_संवाद_भगवान_श्रीकृष्ण_सुदामा_अर्जुन_महाभारत

Tuesday, 26 July 2022

नाम बरवें, नामदेव बरवा| एकत्व बरवा परमात्मा| श्रीपरिसा भागवत

 




भक्तशिरोमणी, भक्ताग्रणी, नामयोगाचा मेरु, नामचिंतामणी, प्रल्हाद-अंगद-उद्धवाचा पुनर्जन्म, श्रीविठ्ठलाचे प्रेमभांडारी संतश्रेष्ठ श्रीनामदेवराय ६७२ वा संजीवन समाधी‌ सोहळा...! 


आषाढ वद्य त्रयोदशींस आजच्यांच‌ तिथींस ६७२ वर्षांपूर्वी श्रीनामदेवरायांसंहित त्यांच्या घरातल्या १५ जणांनी जिवंत समाधी घ्यावी...! संत श्रीजनाबाईही त्यांत होत्या. म्हणजे इतिहासांत श्रीभीष्माचार्यांस त्यांच्या आजीवन अखंड ब्रह्मचर्याच्या प्रतिज्ञेने नि पित्याविषयीच्या निष्ठेने पित्याने त्यांस इच्छामृत्युचं वरदान दिलं होते. त्यापश्चात् प्रत्यक्ष कैवल्यचक्रवर्ती‌ संतसम्राट श्रीज्ञानोबारायांनीही संजीवन समाधी घेऊन जगाचें डोळे दिपविले...! त्याच श्रीज्ञानोबारायांना संजीवन समाधींस घेऊन जाणारे आमचे भक्तशिरोमणी श्रीनामदेवराय त्यांच्याच‌ कुटुंबासहित आमच्या‌ पंढरीत त्या परमात्मा पंढरीशाच्या समोरंच समाधी घेतात...!


शारीरिक व्याधींनी गांजलेले लोक अगदी मरणासन्न असताना मृत्युच्या‌ त्या असह्य वेदना सहन न होऊन अंतिमत: मृत्यु यावा व ह्यातून सुटका तरी व्हावी म्हणून काहीवेळा तळमळताना दिसतात पण‌ तरीही भोग भोगायचे म्हणून त्यांना मृत्यु येत‌ नाही नि त्यांची वेदना तशीच राहते. चांगल्या स्थितींत मृत्यु येणं तर भाग्यवंताचंच‌ लक्षण...!


पण या‌ एकाच‌ कुटुंबातल्या १६ जणांनी एकाचवेळी देहत्याग करावा. श्रीनामदेवरायांचा अधिकार जगाला माहिती आहेच पण कुटुंबांतलेही..? ते इतर १४ जण कोण ह्याची‌ सूची जोडली आहे ती पहावी...!



ते‌ 'संतांचे ते आप्त नव्हे ते‌ संत' हे संतवचन इथेच खोटं ठरावं ह्यापेक्षा आश्चर्य काय? खरंतर संतवचनं कधी खोटी ठरत नाहीत पण अपवाद असे...!


इच्छामृत्युचं वरदान यापेक्षा काय भिन्न असावं?मृत्युवर विजय‌ ह्यापेक्षा वेगळा काय असावा? संतांचा अधिकार ह्यापेक्षा वेगळा काय प्रत्ययांस‌ यावा???


आणि त्यांनी हे सर्व साध्य केलं ते केवळ अनन्यशरण भक्तीच्या सामर्थ्यावर, नामचिंतनाच्या बलावर...!


म्हणूनंच‌ श्रीपरिसा भागवत म्हणतात


कलियुगीं नामा संत‌ साकार, न कळें तो पार ब्रह्मादिक|


श्रीनामदेवराय नि त्यांच्या कुटुबीयांच्या चरणी कोटी प्रणाम...! आमचं भाग्य इतकंच की आमचं घर श्रीनामदेवरायांच्या मंदिरांस चिकटून...! 


पुनरपि जननं पुनरपि मरणं श्रीमन्नामदेवरायमन्दिरसमीपे निवासं| 🙏😇


श्रीनामदेव पायरीचे आजचे छायाचित्र साभार - आमचे बंधु श्री Mahesh Kale 


भवदीय...


#श्रीनामदेव_संजीवनसमाधी_सोहळा_नामदेवपायरी_पंढरपूर

Thursday, 14 July 2022

श्रीगुरुपौर्णिमा चिंतन

जो स्वत: मुक्त नाही तो आपल्याला काय मुक्त करणार???


नानक देवांची एक कथा आहे. ते एका राजाकडे गेले. तो‌ राजा साधुसंतांचे आदरातिथ्य करणारा सत्शील राजा होता. त्यावेळचे राजे तसेच होते. तर त्याने नानकदेवांना विचारलं की आपल्यासारखा सत्पुरुष‌ माझ्या राजप्रासादी आला. माझं भाग्य! काय हवं ते मागा. नानकदेव म्हणाले मी मागेल ते तु देऊ शकणार नाहीस. तरीही आग्रह केल्यावर ते म्हणाले मला तुझं राज्य दोन तासांसाठी दे. राजाने नानकांना राज्य देऊन टाकलं.‌ राज्य घेतल्या घेतल्या त्यांनी राजाला बंदी बनवलं व त्या राजाच्या गुरुलाही, पुरोहितालाही सर्वांना बंदी बनवलं. राजाला आश्चर्य वाटलं हे काय घडतंय. नानक देव म्हणाले आता तुझ्या गुरुला तुला सोडवायला‌ सांग. राजा गुरुकडे गेला पण पण तो गुरुच मूळात बद्ध होता, अडकला होता. तो काय मुक्त करणार राजाला?


राजाला बोध प्राप्त झाला. त्याने नानकांचे पाय धरले. 


तात्पर्य काय???


गुरु स्वत: जीवनमूक्त असेल, अधिकारी असेल, तर तो आपल्याला मुक्त करेल. तोच बद्ध असेल तर आपला काय उद्धार व्हायचा???


गुरु कशासाठी करायचा??? 


उत्तर - मोक्षासाठी अर्थात ईश्वरप्राप्तीसाठी. अर्थात जन्म-मृत्युच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी, आत्मज्ञानासाठी...!


आयुष्यांत गुरु अनेक असतातही लौकिकार्थाने. पण परमार्थामध्ये मोक्षगुरु हा मात्र आयुष्यांत एकंच असतो, ज्याला आपण सद्गुरु म्हणतो. आणि हा सद्गुरु कोण तर ईश्वर प्राप्त करून देतो तो. श्रीएकनाथांनी एका ठिकाणी म्हटलंय


मंत्रतंत्र उपदेशितें घरोघरी गुरु आईटें|

जो शिष्यांस मिळवितों सद्वस्तुतें,

सद्गुरु तयातें श्रीकृष्ण मानीं|


गुरु तसे पुष्कळ असतात मंत्र तंत्र देणारे. पण शिष्याला सद्वस्तु प्राप्त करून देतो तोच खरा गुरु, सद्गुरु...! 


आता‌ सद्वस्तु म्हणजे ईश्वर...!


आता असा गुरु जो स्वत: ईश्वरप्राप्ती केलेला असेल तरंच तो आपल्याला प्राप्त करून देईल ना? तोच अडकलेला असेल तर तो आपल्याला काय मूक्त करणार??? म्हणूनंच उपनिषदं म्हणतात


तद्विज्ञार्थं स गुरुमेवाभिगच्छेत् समित्पाणिं श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठम्|


श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु करावा..!


म्हणूनंच ईश्वरप्राप्तीसाठी गुरु निवडताना मात्र तो अत्यंत चाणाक्षपणे निवडला पाहिजे. विवेकानंदांनी श्रीरामकृष्णांना साडेतीनवर्षे तपासलं नि मगच गुरु म्हणून स्वीकारलं. कारण त्यांना मोक्ष‌ हवा होता, ईश्वर हवा होता आणि तेच योग्य आहे. इथे भोळेपणा चालत नाही. नाहीतर हानीच होते. नाहीतर आपण काय करतो? आपल्याला हा विवेकंच राहिलाच नाहीये. 


कारण आपणंच मूळात मोक्षहेतुने गुरु करतंच नाही. भौतिक लाभासाठी करतो. मला हे हवं, ते हवं. ते लोक लुच्चेगिरीने नवससायास करतात तसंच आपलं झालंय. आणि नेमकं इथेच चुकतो आपण...! 


दुर्दैवाने आजकालही सर्वत्र गुरुत्वाचे स्तोम माजलंय. अक्षरश: ह्याची माळ घाल, त्याची माळ घाल...आणि ती सुद्धा प्रतिष्ठेसाठी. अरे टिंगल वाटते का गुरु-शिष्य परंपरा म्हणजे???


म्हणूनंच गुरुचं नाव घेऊ नये असे‌ सांगताना शास्त्रकार सांगतात की


*आत्मनामगुरोर्नाम नामातिकृपणस्य च|*

*श्रेयस्कार्यो न गृह्णय्यात् ज्येष्ठापत्य कलत्रयो:|*


आत्मनाम म्हणजे मीमी म्हणु नये, गुरुचं नाव घेऊ नये. का? तर मी त्या गुरुचा‌ शिष्य म्हणून माझी लायकी नसतानाही उगाचंच मला प्रतिष्ठा नको व माझ्याहातून काही वाईट घडलं तर माझ्या गुरुंस माझ्या अपकृत्यामुळे अप्रतिष्ठा नको. अतिकंजुस माणसाचं नाव घेऊ नये, थोरल्या मुलाचं नाव घेऊ नये नि बायकोने नवऱ्याचे व नवऱ्याने बायकोचं नाव घेऊ नये...! असं शास्त्र सांगतं. आता असं का इतर‌ स्पष्टीकरण देत बसत‌ नाही. पुन्हा केंव्हातरी...


मग आता प्रश्न असा पडेल की मग हा अधिकारी मोक्षगुरु भेटायचा कसा? असा जीवनमूक्त पुरुष किंवा स्त्री भेटणार कशी? बरं त्याला ओळखायचा कसा??? कारण त्याला ओळखायची आपलीही योग्यता हवी ना...! 


कारण ह्यात फसवणुकही होतेच...!


माझ्यासारख्या सर्वसामान्य मनुष्याला हा प्रश्न पडणं स्वाभाविकंच आहे.  कारण असा जीवनमुक्त पुरुष‌ समजा सभोवताली असला तरी आपण त्यांस ओळखायचं कसं???


कारण आपण काही विवेकानंद नाही आहोत..


मग ह्याचं उत्तर काय??


तर आपल्या इष्टदेवतेचं नामस्मरण अखंड करत राहणे...


अशाने काय होते???


योग्यवेळ आली की वास्तविक असा जीवनमुक्त गुरुच आपल्याला शोधत येतो...हो...!


अर्थात हा प्रत्येकाच्या अनुभूतीचा विषय आहे. 


आता प्रश्न असा पडेल की आपण एखादा गुरु केलाच असेल नि तो असा जीवनमुक्त नसेल तर? आपली निवड चुकली म्हणून निराश व्हायचं कारणंच नाही. ह्या आधीच्या गुरुने सांगितलेली उपासना निष्ठेने केली तरी योग्य मार्ग मिळु शकतो...


काहीजण म्हणतील की भले आपला तो आधीचा गुरु मुक्त नसेल पण तरीही आपण त्याने दिलेल्या नामावर दृढ श्रद्धा ठेऊन साधना केली तर...?


तरीही वर म्हटल्याप्रमाणे पुढे आपोआप मार्गदर्शन भेटत जाते...!


इथे जाता जाता एक सांगणं...


कैवल्यचक्रवर्ती श्रीमाऊली तर गुरुशिष्याचे हे नाते‌ सांगताना म्हणते 


माझा गुरु माझाच, इतर कुणाचा नाही..


म्हणजे पातिव्रत्यभाव असावा. म्हणजे एकावेळी एकंच गुरु नि एकंच शिष्य. म्हणजे माझ्या गुरुला मी एकंच शिष्य असायला हवा. व मलाही तो एकंच गुरु...! अर्थात हे तोपर्यंतंच जोपर्यंत शिष्य आत्मस्थिती प्राप्त करत नाही तोपर्यंतंच...! हा स्वतंत्र विषय...! अस्तु|


कालच्या गुरुपौर्णिमेनिमित्त काल सहज केलेलं हे चिंतन...! जे सुचलं ते लिहिलं...


#श्रीगुरुपौर्णिमा


भवदीय...

Tuesday, 21 June 2022

हिरण्यगर्भो योगस्य वक्ता नान्य: पुरातन:। महाभारत १२|३४९|६५


 



*आज आंतरराष्ट्रीय योग दिवस...!*


श्रीमन्महाभारतामध्ये योगदर्शनाचा प्रवक्ता हा साक्षात् हिरण्यगर्भ आहे असे म्हटलंय. इथे हिरण्यगर्भ म्हणजे कोण???


ऋग्वेदाच्या दशम मण्डलाच्या १२१व्या सूक्ताचा आरंभंच


*हि॒र॒ण्य॒ग॒र्भः सम॑वर्त॒ताग्रे॑ भू॒तस्य॑ जा॒तः पति॒रेक॑ आसीत्। स दा॑धार पृथि॒वीं द्यामु॒तेमां कस्मै॑ दे॒वाय॑ ह॒विषा॑ विधेम।*


*हिरण्यो हिरण्यमयो [निरु० १०।२३]*


इथे हिरण्यगर्भ शब्दाने नेमकं काय अभिप्रेत असावं???


प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा अर्थात तो ईश्वर...! कशावरून???


*हिरण्यमय म्हणजे सुवर्णासमान चमचमणारा गर्भ-मध्यवर्त्ती गर्भसदृश भूवन ज्याचा आहे अथवा हे हिरण्य-प्रकाशमान सूर्यादि पिंड ज्याच्या मध्यभागी आहेत, तोच हिरण्यगर्भ-परमात्मा...*


(भाष्यकार - ब्रह्ममूनि परिव्राजक)


*ज्या ईश्वरानेच ही चराचर सृष्टी निर्माण केली, तोच हिरण्यगर्भ ह्या योगदर्शनाचा आद्य प्रवक्ता असून अन्य कोणताही पुरातन वक्ता नाहीच असे महाभारतकारांचे वचन आहे.*


ह्याचे नेमकं तात्पर्य काय???


*योगदर्शन यद्यपि भगवान महर्षि श्रीपतंजलीप्रोक्त सूत्रांमध्ये आपणांस प्राप्त होणारं असलं तरी त्याचा मूळ प्रवक्ता हा साक्षात् ईश्वर आहे. पण ईश्वर तर निर्गुण निराकार आहे, मग तो कसा प्रवक्ता? इथे तो प्रवक्ता आहे म्हणजेच त्यावरून त्याची वाणी म्हणजेच चतुर्वेदभगवान हेच त्याचे प्रवक्तेपण अभिप्रेत आहे...*


*म्हणजेच योगदर्शनाचे मूल हे वेदंच असल्यामुळे वेदांमध्ये असलेली योगविद्या हीच योगदर्शनाची सैद्धांतिक भूमिका आहे. पुढेच भगवान महर्षि श्रीपतंजलींनी त्याच योगविद्येंस सूत्ररुपांत‌ रचून आज आपणांस ते‌ योगदर्शन म्हणून षट्दर्शनापैंकी एक असे प्राप्त करून दिलं. पुढे त्यावर त्यांनी स्वत:च विस्तृत असे भाष्य (व्यासभाष्य) केलं असावं किंवा महर्षि वेदव्यासांनी ते‌ केलं असावं, म्हणून त्यांस वेदभाष्य म्हटलं गेलं असावं. त्यांस आर्ष अर्थात ऋषिप्रणीत भाष्य म्हणतात.‌ सुदैवाने आज हे उपलब्धही आहे. इतकंच काय तर ह्याच व्यासभाष्यांवर राजा भोजासहित अन्य पाच (एकुण ६) वृत्तीही उपलब्ध आहेत. यावर सविस्तर कधीतरी. यद्यपि इतिहासांत अनेक पतंजली होऊन गेलेले असले तरी विद्यमान योगदर्शनाचे प्रवक्ते भगवान महर्षि श्रीपतंजली हेच आहेत नि त्यांचा‌ काळ श्रीमन्महाभारताच्या‌ समीपचाच आहे.*


म्हणजेच‌ योगदर्शन हे प्रत्यक्ष‌ वेदप्रणीतंच असल्याने ते आस्तिक दर्शन अर्थात वेदांना व ईश्वरांस‌ मानणारंच आहे.‌ *सांप्रत‌ दुर्दैवाने काही लोक आस्तिक म्हणजे वेद मानणारा पण ईश्वर मानणारा असेलंच असे नव्हे असा अत्यंत‌ हास्यास्पद तर्क मांडतात. म्हणजे ह्यांच्या‌ मते आस्तिक म्हणजे वेद मानणारा असला तरी ईश्वरांस मानणारा असेलंच असे नव्हे. म्हणजे आस्तिक परंतु निरीश्वरवादी म्हणे. म्हणून ते योगदर्शनांस आस्तिक परंतु निरीश्वरवादी असे म्हणताना दिसतात.‌ सांख्यदर्शनाच्या बाबतीतही हेच विधान अनावधानाने केलं जातं. हे अत्यंत दुर्दैवी आहे....!*


*या‌ भ्रमांस सर्वांस कारणीभूत मधील काळांतली अनार्ष भाष्ये जरी असली तरी आपण निरीश्वरवाद ह्या शब्दाचा अर्थ‌ प्रथम जाणून घेऊयांत. जगत्सृष्ट्यत्वामध्ये ईश्वर हा निमित्त कारण की उपादान कारण हा प्रश्न असल्याने ह्याचा नीटसा अर्थ‌ न आकळल्यानेही हा गोंधळ झालेला आहे. इथे निरीश्वरवादी म्हणजे ईश्वर नाकारणारा असे कदापिही नसून तो जगताच्या‌ निर्मितीमध्ये निमित्त की उपादान कारण इतकाच चिंतनाचा विषय आहे. आणि म्हणून सांख्य किंवा योगदर्शनांस अगदी आस्तिक पण निरीश्वरवादी म्हणजे ईश्वर नाकारणारा असे म्हणण्यापर्यंत‌ काही लोकांची‌ लेखणी धजावते हे पाहून अत्यंत खेद होतो. मूळात‌ षट्दर्शनापैकी एकही दर्शन हे निरीश्वरवादी म्हणजे ईश्वर नाकारणारे तर नाहीच. त्यामुळे सांप्रत समाजमाध्यमांवर अनेक जण कुणाचं तरी वाचून‌‌ मूळ सैद्धांतिक भूमिका न जाणून घेता किंवा पारिभाषिक शब्दावली न आकळून घेता षट्दर्शनांना निरीश्वरवादी म्हणजे ईश्वर नाकारणारे असे रेटत बसतात, अशांपासून सावध रहावे ही विनंती...! सविस्तर कधीतरी पुन्हा ह्यावर येऊच...*


योगदर्शनाचा मूळ हेतु काय???


अष्टांग योगदर्शन हे क्रियात्मक नि अनुभवसिद्ध शास्त्र आहे. त्याचा मूल हेतु मनुष्यांस आत्मज्ञान प्राप्त करून मोक्ष देणं हाच आहे. त्यापासून विभूतिपादातून प्राप्त होणारे लाभ यद्यपि भौतिक स्वरुपाचे असल्या तरी ते काही अंतिम नसून अंतिम ध्येय आत्मसाक्षात्कार हेच आहे. 


*सांप्रत काही भारत विखंडन शक्ती भगवान महर्षि श्रीपतंलजी हे बौद्ध होते असा मिथ्या तर्क मांडताना दिसतात. या मागे जितके डावे सक्रिय आहेत, तितकेच‌ काही हिंदुद्वेष्टे नवबौद्धही(सर्व नवबौद्ध असे नाहीत). इतकंच काय तर काही लोक योगदर्शन हे शैव किंवा रुद्रापासून प्रणीत असून तो अवैदिक देव असून वैष्णव अर्थात विष्णु आदि देव वैदिक आहेत असाही भ्रममूलक प्रचार सुरु आहे. म्हणजेच योगदर्शन हे अवैदिक आहे असा अपप्रचार नेटाने सुरु आहे. जिज्ञासूंनी ह्यांपासून सावध रहावे ही विनंती...! आणि हो काही‌ लोक योग हा सेक्युलर आहे असाही भ्रममूलक प्रचार करताना दिसतात, सबका साथ, सबका विकासचा‌ विपरीत अर्थ काढत...! त्यापासूनही सावधान...!*


आज आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त हा संक्षिप्तसा लेखनप्रपंच...!


भवदीय


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#आंतरराष्ट्रीय_योग_दिवस_योगदर्शन_पतंजली_योगविद्या_आस्तिक_नास्तिक_निरीश्वरवादी

Thursday, 2 June 2022

प्रात:स्मरणीय हिंदुपति वीरशिरोमणी महाराणा श्रीप्रतापसिंह...

 




भाद्रपद शुक्लपक्ष‌ विक्रम संवत् १९३९ समयी सत्यार्थ प्रकाश हा आपला अजरामर ग्रंथ 


*'महाराणाजीका उदयपूर'*


या‌ स्थानी रचला असे महर्षि श्रीमद्दयानंद सरस्वतींनी भूमिकेत लिहिलं होते. मूळचे गुजरातचे असलेल्या महर्षींना संन्यासोत्तर 'यद्यपि आमुचा स्वदेश भूवनत्रयामध्ये वास|' असला तरी 'महाराणाजीका उदयपूर' असे शब्द का लिहावेसे वाटले असतील???


वडिलांच्या इच्छेने ७व्या वर्षापासून २१ पर्यंत लंडनमध्ये राहून इंग्रजांपेक्षाही अधिक इंग्रज झालेला अरविंद नावाचा युवक तत्कालीन आयसीएसची परीक्षा उत्तीर्ण होऊन इकडे भारतात येऊन मातृभूमीच्या विमोचनार्थ जन्मभूमीत येऊन स्वत:ला क्रांतिकार्यात झोकून देतो नि एका खटल्यामध्ये पोलिस पकडायला आले असताना हा सनदी अधिकारी अत्यंत साध्या अशा सतरंजीवर झोपलेला दिसतो, तेंव्हा आश्चर्यचकित झालेल्या त्या आरक्षींना(पोलिसांना) तो अभिमानाने म्हणतो की


*'स्वातंत्र्याच्या‌ काजासाठी पृथ्वीपती असलेला माझा राणा प्रताप हा एकेकाळी राजसुखाचा, सत्तासुंदरीचा त्याग करून गवताच्या शय्येवर निजता झाला, त्याच्या त्यागापुढे माझी ही साधी शय्या काय मोठी?'*


हे ऐकून त्या अधिकाऱ्यांची तळपायाची आग मस्तकांत गेली नसेल कशावरून???


आयुष्यांत कुणाचा अभिमान बाळगावा? आमच्यासमोर आदर्श कोण असावेत?


आज देशामध्ये महापुरुष निर्माण व्हायचे का बंद झाले? स्वातंत्र्यानंतर हे सगळं बंद का झालं???


आमचं बीज इतकं अशुद्ध का झालं???


*कारण महाराणा प्रतापांस नि शिवप्रभुंस वाट चुकलेला देशभक्त म्हणणाऱ्या दुरात्मा गांधींस आह्मीं राष्ट्रपिता म्हणून गौरविलं...! त्याला नोटेवर घेतलं...!*


*ज्याची वीरता, रणकुशलता, कष्टसहिष्णुता नि नीतिमत्ता अत्यंत‌ वंदनीय नि अनुकरणीय होती, अशा क्षत्रियोत्तम सत्पुरुषांस आह्मीं केवळ पुण्यतिथी नि जयंतीपुरतं मर्यादित ठेवलं...!आणि आता तर केवळ मेवाडपुरतं...*


प्रत्यक्ष महाराणांचा नि समस्त राजपुतान्याचा साद्यंत नि साधार इतिहास लिहिणाऱ्या ज्येष्ठ इतिहासकार महामहोपाध्याय श्रीगौरीशंकर ओझांनी म्हटल्याप्रमाणे जो स्वदेशाभिमानी, स्वतंत्रतेचा पुजारी, रणकुशल, स्वार्थत्यागी, नीतिज्ञ, दृढप्रतिज्ञ, सत्यनिष्ठ वीर, उदार क्षत्रिय तथा कवी होता...होय कवी होता...!


*पूर्वजांचा सगर्व अभिमानी...*


अकबरनाम्याचा लेखक अबुलफज़ल लिहितो की महाराणा प्रतापांस आपल्या पूर्वजांचा सगर्व अभिमान होता...


आह्मांला तो आहे का????


*हल्दीघाटीच्या‌ युद्धांत प्रताप विजयीच होता. अकबर त्याला कधीही हारवु शकलाच नाही. ९ वर्षे अकबर त्याच्याशी झटत राहिला पण त्याला कधीच विजय‌ प्राप्त झाला नाही...!*


*त्याचा आदर्श होता की बापा रावळांचा‌ वंशज कधी कुणापुढे मान तुकवणार नाही. स्वदेशप्रेम, स्वतंत्रता नि स्वदेशाभिमान हे ज्याचे मूलमंत्र होते, असो तो महाराणा...*


*उंची मोठी असलेला, विशाल नेत्र असलेला, भारदस्त नि प्रभावशाली मुखमंडल असलेला, पीळदार मिश्या असलेला, रुंद छाती असलेला, विशाल बाहुबल असलेला नि गव्हाळी रंगाचा तो‌ प्रताप तत्कालीन रीतिप्रमाणे दाढी ठेवत नव्हता असे त्याचे‌ व्यक्तिमत्वाचे दर्शनी वर्णन आहे...!*


अशा पुरुषश्रेष्ठाच्या चरणी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!


*जन्म - विक्रम संवत १५९७, ज्येष्ठ शुद्ध तृतीया...*


भवदीय,


#महाराणाप्रताप_जयंती_हिंदुपती_मेवाड_राजस्थान_हल्दीघाटी_उदयपूर