आजच्या साप्ताहिक हिंदुस्थान पोस्ट यामध्ये प्रकाशित झालेला हा वारीच्या निमित्ताने विशेष लेख ! मूळ लेख हा इथे पाठवला आहे कारण शब्द मर्यादेअभावी प्रकाशकांनी आमच्या अनुज्ञेने अगदी महत्त्वपूर्ण तितकाच छापला आहे, म्हणून आह्मीं मूळ लेख येथे देताहोत. धन्यवाद साप्ताहिक हिंदुस्थान पोस्ट!
The most effective way to destroy people is to deny and obliterate their own sense of understanding their history.
George Orewell
कुठलाही समाज, कुठलंही राष्ट्र, कुठलाही धर्म नष्ट करायचा असेल, तर त्याचा इतिहास सर्वप्रथम नष्ट करावा लागतो किंवा ते संभव नसल्यांस तो विकृत तरी करावा लागतो. गेली दोनशेहून अधिक वर्षे भारतवर्षाचा इतिहास विकृत करून आपली धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक इत्यादि सर्व प्रकारची एकात्मता व अखंडता नष्ट करण्याचा प्रयत्न सातत्याने भारत विखंडन शक्तींकडून सुरु आहे. हे करत असताना आपली श्रद्धास्थाने नष्ट करणं किंवा त्यांचा इतिहास किंवा सैद्धांतिक भूमिका नष्ट किंवा विकृत करणं हेही त्यातलंच एक षड्यंत्र आहे. अशाच एका महत्वपूर्ण पण घातुक अशा षड्यंत्राचा परामर्श घेण्यासाठी हा लेखनप्रपंच!
सांप्रत सर्वत्र आषाढी वारी सुरू असल्याने गेल्या आठशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायातल्या ह्या अमुल्य वारश्याचं विकृतीकरण करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न गेली काही दशके सुरु आहे, तो म्हणजे जगद्गुरु श्रीतुकोबारायांच्या अभंगांचे अत्यंत विपर्यस्त अर्थ काढून त्यांना विधर्मी किंवा निधर्मी किंवा इस्लामप्रेमी दाखवण्याचा क्षुद्र प्रयत्न!
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्रीपंढरीशाच्या दर्शनार्थ निघालेल्या वारीमध्ये व एरवीही जगद्गुरु श्रीतुकोबारायांचा गाथ्यातले काही अभंग सोयीस्करपणे अर्धवट पद्धतीने मांडून त्यांना इस्लामप्रेमी किंवा निधर्मी दाखवण्याचा अत्यंत निंदनीय प्रयत्न गेली काही वर्षे होतो आहे. वारकरी संप्रदायात प्रमाण असलेल्या देवडीकर गाथेप्रमाणे ४०९२ अभंगांचा श्रीतुकोबारायांचा गाथा हा समस्त वारकरी संप्रदायाच्या प्रस्थानत्रयींपैकी एक असून त्याला अगदी पंचमवेद हे ही गौरवास्पद नाव आहे. याच गाथ्यातली काही निवडक हिंदी पदे निवडून ती सोयीस्कर अर्धवट मांडून बुद्धिभेद केला जातो, तो असा
देवडीकर गाथा अभंग क्रमांक ३९२५
अल्ला देवे अल्ला दिलावे। अल्ला दारु अल्ला खिलावे। अल्ला बिगर नहीं कोय। अल्ला करें सोहि होय।१।। सब रसोंका किया मार। भजनगोली एकहि सार। इमान तो सबहि सखा। थोडी तोभी लेकर ज्या। जिन्हो पास नीत सोय। वो हि बसकर ते रोवे। सांतो पांचो मार लगावें। उतार सो पीछे खावें। मेरी दारु जिन्हें खाया। दिदार दरगां सो हि पाया।
मूळ अभंग थोडा मोठ्ठा असून त्यातली काहीच पदे दिली आहेत.
मूळात या अभंगात अल्ला हा शब्द आहे, अल्लाह नव्हे. इस्लाममध्ये जो अल्लाह शब्द आहे, त्यापेक्षा हा अल्ला शब्द वेगळाच आहे. त्याहीपुढे सांगायचं तर गाथेमध्ये हा अभंग ज्या प्रकरणाखाली दिलेला आहे, ते प्रकरण हिंदी पदे व वैद्यगोळीचे अभंग या नावाने प्रसिद्ध आहे. वैद्यगोळी म्हणजे औषध या अर्थाने.जर तसं नसतं तर तुकोबाराय देवाने दारु दिल्याचं समर्थन करतील का? उपरोक्त अभंगात आलेला दारु शब्द हा औषध अर्थानेच घेणं क्रमप्राप्त आहे.
अल्ला शब्द आई अर्थाने
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक महामंडळाने प्रकाशित केलेल्या ‘मराठी व्युत्पत्तिकोश' यामध्ये अल्ला शब्दाचा अर्थ आई असा दिला आहे, व तो शब्द संस्कृत व देशी दोन्हींमध्ये त्याच अर्थाने आहे असे सांगितलं आहे.
संपादक - प्रा. कै. रामदास डांगे
कार्यकारी संपादक - डॉ. सुप्रिया महाजन
प्रथमावृत्ती २०२२
अर्थ - यामध्ये श्रीतुकोबाराय 'अल्ला' नामक औषधाचा विचार मांडतात, इस्लामच्या अल्लाहचा नव्हे. ते म्हणतात की अल्लाच म्हणजे देवंच आपल्याला सर्व काही देतो, दारु म्हणजे औषध देतो, तोच खाऊ घालतो…तेंव्हा शृंगारादि सर्व रसांचा व अमृतादि रसांचा अर्क(सार) काढून आह्मीं ही ‘हरिभजन’ नामक गोळी तयार केली आहे. तुम्हाला विश्वास असेल तर ही हरिभजनाची गोळी घ्या. ही गोळी सात धातु व पंचभूतात्मक शरीरावर हल्ला चढवून भवरोगाचा उतार करते. माझी भजनगोळी ज्यांनी खाल्ली, ते देवाच्या परमधामाला प्राप्त होतात.’
उपरोक्त अभंगात स्पष्टपणे 'भजनगोळी' असे शब्द आहेत. भजन हा प्रकार केवळ आर्य सनातन वैदिक हिंदु धर्मात आहे व त्याचाच एक संप्रदाय असलेल्या वारकरी संप्रदायातही. संतांनी प्रमाण मानलेल्या नवविधा भक्तीमध्ये भजनाला अनन्यसाधारण स्थान आहे. तुकोबाराय स्वत: दुसऱ्या एका ठिकाणी
तुका ह्मणें येथें भजन प्रमाण।
अभंग १५७३
असेही म्हणतात. म्हणजेच भजनाचं महत्व काय आहे ते कळतं.
उपरोक्त अभंगात 'अल्ला' हा शब्द दिसला म्हणून त्याचा संबंध मुस्लिमांना एकमेव 'ईबादत' म्हणून प्रिय असलेल्या अल्लाहशी जोडून जणु काही श्रीतुकोबाराय इस्लामच्या अल्लाहचीच उपासना करायला सांगताहेत असा कांगावा केला जात आहे. अशांना आमचा साधा प्रश्न आहे की इस्लाममध्ये हरिभजन हा प्रकार आहे का? किंवा भजन करणे हा प्रकार तरी आहे का?
श्रीतुकोबाराय ज्या हरिभजनाची गोळी घ्यायला सांगतात, ती इस्लाममध्ये चालते का? मुसलमान त्यांच्या कुराणातला सांगितलेला 'अल्लाह' सोडून अन्य कुठल्याही देवी-देवतांना प्रिय किंवा उपास्य मानत नाहीत हे त्यांच्याच कुराणानुसार स्पष्ट असताना श्रीतुकोबारायांच्या आदेशानुसार ते हरिभजन करणार आहेत का?
माझ्या हरिभजनाच्या गोळीने तु परमधामाला प्राप्त होशील असे म्हणणारे श्रीतुकोबाराय "केवळ अल्लाहला 'ईबादतसाठी' एकमेव प्रिय मानणाऱ्या मुस्लिमांना" मान्य होतील का???
याचे उत्तर मुस्लिमांनी देणं आवश्यक आहे. कारण त्यांचे कुराण त्यांना तशी अनुमती देईल का हे त्यांनी पटवून द्यायचे आहे, आह्मीं नव्हे.
उपरोक्त अभंगात सात धातु व पंचभूतात्मक शरीराचा उल्लेख आहे. इस्लामला, अल्लाह मानणाऱ्या मुस्लिमांना हे मान्य आहे? इस्लाममध्ये ह्या सात व पाच या संकल्पना तरी आहेत का? असतील तर दाखवाव्यांत.
आणखी एक महत्वाचा अभंग ज्याचा बुद्धिभेद केला जातो...
आवल्ललनाम अल्ला बडा लेते भूल न जाये। इलाम त्या कालजमुपरताही तुंब वजाये ।।१।। अल्ला एक तुं नबी एक तुं। काटतें सिर पावों हात नहीं जीव डराये ।।२।। आगले देखे पिछले बुझे। आप हजुर आए तो।।३।।
अभंग क्रमांक - ३९२६
अर्थ - देवाचं नाव सर्वात श्रेष्ठ आहे तरी ते घेण्यास विसरू नकोस. देवाचे नाव मनापासून प्रेमपूर्वक वीणा वाजवीत मुखाने घे. देवा, तूच आमचा एक स्वामी आहेस, तूच एक संरक्षक आहेस. तुझे नाम घेताना कोणी एखाद्या दुष्टाने आमची मान, हात, पाय जरी कापले, तरी पण तो देव आमचा रक्षक असल्यामुळे आमचा जीव मुळीच भिणार नाही. पुराणातल्या काही घटना पहा आणि त्यावर समजून जा की नामावर आपली श्रद्धा असले की देव आपल्यासाठी धावून येतो.
यामध्ये 'अल्ला' व 'नबी' हे दोन शब्द पाहून त्याचा संबंध इस्लाममधल्या अल्लाह व नबीशी जोडणाऱ्या मुर्खांसाठी हा अर्थ झेपणार आहे का? इस्लाममध्ये देव आपल्यासाठी धाऊन येतो ही कल्पना तरी आहे का? त्याचे नाव घेताना कुणी आमचे हात पाय कापले तरी आह्मीं भिणार नाही ही जगद्गुरुंची निष्ठा नेमकी कशावर आहे???
थोडक्यात काय तर यातल्या एकाही अभंगात इस्लामच्या अल्लाहशी किंवा नबीशी श्रीतुकोबारायांना संबंध जोडायचा नसून श्रीतुकोबारायांची हिंदु धर्मात अभिप्रेत असलेल्या देव या संकल्पनेवरंच सारी भिस्त आहे.
पण असे असून सुद्धा या अभंगांचा मोडून तोडून अर्थ सांगून बुद्धीभेद का केला जात आहे तर त्याचे उत्तर सरळ आहे की सगळ्या जगाला मुसलमान करण्याची इस्लामची जी मूळ प्रेरणा आहे, जी त्यांची मूळ महत्वाकांक्षा आहे, ती प्रत्येक मुसलमानाला प्रमाण आहे. दिवसातून पाच वेळा नमाज पढणाऱ्या मुसलमानांना आता ससोयीस्करपणे श्रीतुकोबारायांचे अभंग रेटावेसे वाटतात, यात त्यांचे श्रीतुकोबारायांवरचे प्रेम नसून त्यांचा इस्लामीकरणाचा छुपा अजेंडा आहे, यातच त्यांचा स्वार्थ दिसून येतो, हे स्पष्ट आहे.
आता इस्लाम नाकारणारा श्रीतुकोबारायांचा एक महत्वाचा अभंग पाहु
संता नाही मान। देव मानी मुसलमान।
ऐसे पोटाचे मारिले। देवा आशा विटंबिले।
घाली लोटांगण। नंदी नीचाचे चरण।
तुका ह्मणें धर्म। न कळे माजल्याचा भ्रम।
अभंग १६००
अर्थ - संतांना मान देत नाही आणि मुसलमानांना मात्र देवासारखे मानून त्यांची चाकरी करतो. असे लोक पोटाने मारलेले असल्यामुळे पोटाकरिता वाटेल ते करण्यात प्रवृत्त होतात. हे देवा, आशेमुळे हे लोक फजित पावतात. नीच्याच्या पुढे लोटांगण घालतो आणि त्याच्या पाया पडतो. श्रीतुकाराम महाराज म्हणतात अशा लोकांना धर्म-अधर्म काही कळत नाही कारण त्या उन्मत्तांना ‘मी फार शहाणा आहे’ असा भ्रम झालेला असतो.
आता वाचकांना माझा प्रश्न आहे की जर अल्ला शब्द असलेले अभंग खरे मानायचे तर मग वरच्या अभंगाचं काय करायचं? वरच्या अभंगात तर श्रीतुकोबारायांनी इस्लाम स्पष्टपणे नाकारला आहे, मुसलमानांना नाकारलं आहे, तेही स्पष्ट नाव घेऊन.
मग आता ठरविणार का त्यांना इस्लामप्रेमी?
बर हेच तुकाराम महाराज इतर अनेक अभंगांमध्ये की जे सहस्रोंच्या संख्येने गाथेत उपलब्ध आहेत, त्यात म्हणतात की
आणिकांची स्तुति आम्हां ब्रम्हहत्या ।
एका वांचूनि त्या पांडुरंगा ॥१॥
आम्हां विष्णुदासां एकविध भाव ।
न म्हणों या देव आणिकांसि ॥ध्रु.॥
शतखंड माझी होईल रसना ।
जरी या वचना पालटेन ॥२॥
तुका म्हणे मज आणिका संकल्पें ।
अवघींच पापें घडतील ॥३॥
अभंग - १६००
अर्थ - एका पांडुरंगावाचून इतरांची स्तुती करणे म्हणजे आम्हास ब्रह्महत्या केल्यासारखे वाटते कारण आह्मां हरिभक्तांची एकनिष्ठ भक्ती असते. त्यामुळे आह्मीं पांडुरंगावाचून इतरांस देव म्हणणार नाही. जर मी या वचनाला बदलेन तर माझ्या जिभेचे शतशः तुकडे होतील. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात की एका पांडुरंगावाचून माझ्या मनात इतरांचा संकल्प असेल तर माझ्या हातून सर्वच्या सर्व पापे घडल्यासारखे होतील.
आता बोला - श्रीतुकोबाराय हे इस्लामच्या अल्लाहला मानणारे मानायचे का?
आणखी एक अभंग पहा
पतिव्रता नेणें आणिकांची स्तुति। सर्वभावें पति ध्यातीं मनी। तैसें माझे मन एकविध झालें। नावडे विठ्ठलाविणें दुजें। सूर्यविकासिनी नेगे चंद्रकळा। गाय ते कोकिळा वसंतेसी। तुका म्हणे बाळ मातेपुढे नाचें। बोल आणिकाचे नावडती।
अभंग १६२७
अर्थ - पतीव्रता स्त्री तिच्या पती वाचून इतरांची स्तुती करण्याचे जाणत नाही कारण ती काया-वाचा-मनाने तिच्या पतीशीच अतिशय अनुरक्त झालेली असते; आणि तिच्या ध्यानात व मनात तिचा पतीच असतो. त्याचप्रमाणे माझे मन एकनिष्ठ झाले असून त्याला विठ्ठलावाचून दुसरे काही आवडत नाही. सूर्यकिरणांच्या स्पर्शाने विकसित होणारी कमले चंद्रकिरणांचा स्पर्श झाला तरी ते विकसित होत नाहीत अथवा कोकिळा वसंत ऋतू मध्येच गायन करतात, येह्रवी नाही. म्हणून शेवटी तुकाराम महाराज म्हणतात की लहान मूल आई पुढेच कौतुकाने नाचते, आई वाचून इतरांचे बोलणे सुद्धा त्याला आवडत नाही, तसेच माझे आहे.
बोला आता - असे श्रीतुकोबाराय 'अल्ला देवे' अभंगात मुस्लिमांच्या अल्लाहची स्तुती करतील का???
आता एखादा माणूस प्रश्न करेल की मग असं असेल तर श्रीतुकोबारायांनी तो ‘अल्ला देवेचा’ अभंग रचलाच का? या प्रश्नाचे उत्तर असे आहे की
अधिकार तैसा दावियेला मार्ग।
संत हे ज्याच्या त्याच्या अधिकारानुसार त्याला उपदेश करत असतात. समोरचा एखादा हिंदी भाषिक असेल तर त्याला त्याच भाषेत उपदेश करतील. किंवा समोर एखादा मुसलमान बसला असेल तरी त्याला तसाच उपदेश करतील.
यावरही दुसरा एखादा प्रश्न विचारेल की मग अशी परस्पर विरोधी वचने संत साहित्यात कशी काय येतात? त्याचे उत्तर असं आहे की मुळात यामध्ये परस्पर विरोध नसून यातला समन्वय आपल्याला कळत नाही. तेवढा आपला अधिकार नाही. तो कळण्यासाठी थोडंसं न्यायशास्त्राचं किंवा पूर्वमीमांसादि दर्शनशास्त्रांचे अध्ययन करावं लागतं. वरवरपाहता परस्परविरोधी वाटणाऱ्या वचनांचा तात्पर्यार्थ कसा लावायचा हे सांगताना महर्षि श्रीजैमिनी म्हणतात, सिद्धांत असा आहे की
विरोधेत्वनपेक्ष्यंस्यात्, असति ह्यनुमानं।
पूर्वमीमांसा १।३।३
जिथे विरोध आहे असे वाटतं, तिथे अनुमानाने काम घ्यावं लागतं.
म्हणजेच विठ्ठल सोडून अन्य दैवत भजणारंच नाही म्हणणारे श्रीतुकोबाराय, संता नाही मान, देव मानी मुसलमान म्हणणारे श्रीतुकोबाराय हे अल्लाहला भजणं असंभवंच आहे हेच अनुमान काढावे लागते.
शेवटी जाता जाता. . .
जगद्गुरु तुकोबारायांच्या सर्व अभंगांमध्ये श्रीविठ्ठलालाच एकमेव प्रमाण म्हणून त्याची पूजा, त्याचे भजन, कीर्तन, त्याचे नामस्मरण, मूर्तीपूजा, अवतारवाद, पुनर्जन्म या सर्व हिंदू धर्मातल्या संकल्पनाच सांगितल्या आहेत. श्रीतुकोबाराय वेदप्रामाण्यही ठळकपणे मान्य करतात. इस्लामला किंवा मुस्लिमांना यातली एकही संकल्पना मान्य नाही. मग श्रीतुकोबाराय त्यांच्या अल्लाहचे भजन करतील का हो? त्यामुळे इथून पुढे तरी वाचकांनी आपला बुद्धिभेद न करून घेता बुद्धीभेद करणाऱ्यांना प्रतिवाद करावा आणि त्यांचे षडयंत्र हाणून पाडावे हीच विनंती!
बोला पुंडलीक वरदा हरी विठ्ठल।
श्रीज्ञानदेव तुकाराम।
पंढरीनाथ महाराज की जय।
माऊली ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय।
सब संतन की जय।
भवदीय,
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com
#जगद्गुरुश्रीतुकोबारायांचे_इस्लामीकरणाचे_षड्यंत्र_अल्लादिलावेअभंग_इस्लाम_बुद्धिभेद_वारकरीसंप्रदाय










