Wednesday, 29 September 2021

श्रीज्ञानेश्वरी जयंती - भाद्रपद वद्य षष्ठी

 




अथर्ववेदामध्ये एक मंत्र आहे.


ॐ अन्ति॒ सन्तं॒ न ज॑हा॒त्यन्ति॒ सन्तं॒ न प॑श्यति । दे॒वस्य॑ पश्य॒ काव्यं॒ न म॑मार॒ न जी॑र्यति ॥


अथर्ववेद - १०.८.३२ 


(त्या)(देवस्य) देवाचे (काव्यं) काव्य (पश्य) पहा (यत् - जे) (न ममार) कधीच मरतही नाही, नाश पावत नाही, (न जीर्यति) कधी जीर्णही होत नाही.


कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्रीज्ञानोबारायांच्या श्रीभावार्थदीपिकेची अर्थात श्रीज्ञानेश्वरीची परवाची जयंती...


खरंतर श्रीज्ञानेश्वरीवर अत्यंत अधिकारवाणीने बोलावं, लिहावं, प्रकटावं, चिंतन करावं ते आमच्या गुरुवर्य श्रीसाखरे परंपरेने, गुरुवर्य श्रीदेगलुरकर परंपरेने, गुरुवर्य श्रीसिद्धरस परंपरेने, गुरुवर्य श्रीसोनोमामांच्या परंपरेने किंवा गुरुवर्य वै. वा ना उत्पात किंवा वारकरी संप्रदायांतले अधिकारी असे ज्ञात-अज्ञात (विस्तारभयास्तव) सत्पुरुष. मजसारख्या पढतमूर्खाने श्रीमाऊलींविषयी किंवा तिच्या श्रीज्ञानेश्वरीविषयी काही लिहायसाठी धजावणं हे जरी 'धृष्टता' ह्या प्रकारांत मोडत असलं तरी त्या श्रीमाऊलीच्याच शब्दांत सांगायचे तर


*राजहंसाचे चालणें। भूतलीं जाहलीया शहाणें। आणिक काय कोणें। चालवेचिं ना।*


ह्या सर्व अधिकारी श्रीगुरुचरणांच्या ठायीं विनम्र दंडवत करून श्रीमाऊलींच्या चरणी ही सेवा अर्पण करतो आहे.


भगवत्पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रशाङ्करभाष्यामध्ये वेदापौरुषेयत्व मांडलं आहे, त्यावर श्रीवाचस्पति मिश्रांच्या श्रीभामती प्रकाशच्या मराठी अनुवादामध्ये ममहापोपाध्याय श्री कस्तुरेगुरुजींनी भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा नि कर्णापाटव ह्या चार दोषांपासून मूक्त असा केवळ एकंच ग्रंथराज आहे, तो म्हणजे प्रत्यक्ष संहितारुपी चतुर्वेदभगवान असे म्हटलं आहे. अर्थात इथे आह्मांस अभिप्रेत वेद म्हणजे केवल संहिता अर्थात मंत्र बरंका. ब्राह्मणग्रंथ नव्हे ते तसं का ह्यावर आह्मीं आजपर्यंत अनेकवेळा मांडलं आहे. ह्या चार दोषांच्या विवेचनासाठी जिज्ञासूंनी गुगल करावे.


तो चतुर्वेदभगवान ज्याप्रमाणे 'न ममार न जीर्यति' अशा अजर नि अमर अशा स्वरुपाचा आहे, ज्या ईश्वराची ती वाणी आहे, त्याचेच ते शब्दब्रह्मस्वरुप आहे की जे त्यासारखंच अनादि अनंत नित्यसिद्ध आहे. उपरोक्त मंत्रामध्ये 'देवस्य पश्य काव्यं' म्हटलंय त्या देवाचे काव्य पहा. इथे देव हा शब्द ईश्वर ह्याच अर्थाने आहे हे वेगळं सांगायची आवश्यकता आहे???


आता इथे वेदांना काव्य का म्हटलं असावं हा एक स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे. विस्तारभयास्तव...


त्या चतुर्वेदभगवानापश्चात् 'निर्दोषवर्णवपु' असा ग्रंथ म्हणून श्रीमाऊलीने ज्या योगेश्वर भगवान श्रीकृष्ण मुखपद्मविनिःसृता अशा श्रीमद्भगवद्गीतेची थोरवी गायिलीं आहे, त्याच श्रीगीतेवर श्रीमाऊलींनी 'श्रीभावार्थदीपिका' नावाचं महाराष्ट्री साहित्यसरस्वतीच्या गळ्यांतील मंगळसूत्र रचावं नि ते आमच्या मराठीभाषेंतंच रचावं हे आमचं कवण भाग्य!


गीतेचं वर्णन करताना श्रीमाऊली म्हणते की


हें ज्ञानामृताची जाह्नवीं। हें आनंदचंद्रीची सतरावीं। विचारक्षीरार्णवाची नवीं। लक्ष्मीं जे हें।


इथे श्रीमाऊलीने सतरावीं असा शब्द का योजिला असावा? आमच्या अल्पमतीप्रमाणे चार वेद, षट्दर्शने नि षट्वेदाङ्गे ही सोळा धरून सतरावी ती श्रीगीता असे कदाचित माऊलींना अभिप्रेत असावं. आमची अल्पबुद्धी आहे, आह्मीं जर चुकत असु तर उपरोक्त विद्वानांनी ही चूक निदर्शनांस आणून द्यावी ही विनंती... श्रीमाऊली पुढे म्हणतें की


गीता हे सप्तशती। मंत्रप्रतिपाद्य भगवती। मोहमहिषा मुक्ती। आनंदलीं असें।


मोहमहिषासुराला ठार मारून अर्थात त्यांस मूक्ती देऊन संसारपथश्रांत जीवांना जिने श्लोकाक्षरद्राक्षलतेचा मांडव जणु घातलेला आहे, अशा त्या श्रीगीतेवरील ही भावार्थरुपी टीका ही जणु श्रीगीतेवरील 'वार्त्तिक' आहे असे आमचे परमादरणीय गुरुवर्य श्रीकिसन महाराज साखरे महाराज म्हणतात ते किती यथार्थ आहे. इथे वार्त्तिक म्हणजे काय ह्यावर मागे लिहिलंच आहे. विस्तार करत नाही.


उक्तानुक्तद्विरुक्तानां चिन्ता यत्र प्रसज्यते।

तं ग्रन्थं वार्त्तिकं प्राहुर्वार्तिकज्ञा मनीषिणः।

परशरोपपुराण


अशी वार्त्तिक शब्दाची व्याख्या आहे. विस्तारभयास्तव मागील लेख पहावेत.


चतुर्वेदभगवानांस श्रीमाऊलींनी निर्दोषवर्णवपु का म्हणावं? इथे वर्ण म्हणजे अक्षर, चार ब्राह्मणक्षत्रियादि वर्ण नव्हे. तर ती ईश्वराची वाङ्मयीन मूर्ती इतकंच त्याचे महत्व नसून तर उपरोक्त चारही दोषांपासून ती मूक्त ह्या अर्थाने श्रीमाऊलीं तींस 'निर्दोषवर्णवपु' असे म्हणते. आणि श्रीगीतेविषयीही श्रीमाऊलीचा तोच अभिप्राय आपल्याला श्रीज्ञानेश्वरींत दृष्टोत्पत्तींस येते. श्रीमाऊली त्याहीपुढे जाऊन म्हणतें की वेदभगवान केवळ तीनंच वर्णांच्या ठायी लागल्याने त्यांस जे उणेपण आलं, ते श्रीगीतेने दूर केलं. अर्थात ह्यांस वेदांची कुठेही निंदा नसून उलट थोरवीच आहे. आणि इथे हेही सांगणं आवश्यक आहे की वेदभगवान पूर्वीतरी सर्वांच्याच कर्णी होता पण मधील काळात तो केवळ त्रैवर्णिकांनाच प्राप्त झाल्याने श्रीगीता भगवंताला सांगावी लागली असा भाव आहे. वास्तविक  वेदांचा अधिकार सर्वांस होता हे आह्मीं मागे अनेकवेळा सिद्ध केलं हे जे सर्वास ज्ञातंच आहे. मूळ वेदांस ते उणेपण नव्हतंच पण ते कालांतराने आले, ते का आलं का विषय इथे नाही.


त्याच श्रीगीतेवर श्रीमाऊलीने वार्त्तिक स्वरुपामध्ये भावार्थदीपिका रचावी व तीहीं तितकीच निर्दोषवर्णवपु असावीं ह्यात ते नवल काय??? प्रत्यक्ष योगेश्वर भगवान श्रीकृष्णंच श्रीमाऊलींच्या रुपाने पुनर्प्रकट झाल्यावर काय वेगळं घडणार??? त्याच श्रीज्ञानेश्वरींस उपरोक्त वेदमंत्र तंतोतंत लागु करावयाचा अट्टाहास हा तरी धृष्टतेचा प्रकार ठरणार नाहीच.


जिथे प्रत्यक्ष वेदांनाच काव्य म्हटलंय तिथे श्रीगीता व श्रीज्ञानेश्वरींसही काव्य म्हणण्यांस कोणताच प्रत्यवाय नाही. म्हणून वर म्हटल्याप्रमाणे प्रत्यक्ष श्रीमाऊलींनीच संक्षेपाने कवित्वाची लक्षणे सांगताना


वाचे बरवें कवित्व ।कवित्वीं बरवें रसिकत्व ।रसिकत्वीं परतत्व ।स्पर्श जैसा ।


ज्ञानेश्वरी - १८-३४७


असे म्हटलंय.


अथ काव्यलक्षणम् ।


आमच्या प्राचीन शास्त्रकारांनी काव्य शब्दाची मीमांसा करताना फार विस्तार केला आहे. साहित्यशास्त्रकार श्री मम्मटाचार्यांनी


तद्दोषौ शब्दार्थौ सगुणावलंकृति।


अर्थ - अदोष म्हणजे निर्दोष, सगुण म्हणजे गुणयुक्त आणि क्वचित अलंकारयुक्त शब्दार्थ म्हणजे काव्य होय.


तर संतश्रेष्ठ श्रीज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या आरंभी मंगलाचरणामध्ये वेदस्वरुप सांगताना अर्थात वेदांचे अपौरुषेयत्व सूचित करताना काव्याचे लक्षण ही ध्वनित केलंय. ते म्हणतात 


हे शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष ।जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ।

 

ह्यात निर्दोष शब्दरचना व लावण्याने नटलेली अर्थ शोभा हे काव्याचे प्रधान अंग सांगितलंय.


यांतल्या शब्दब्रह्म, अशेष, सुवेष, वर्णवपुनिर्दोष ह्या चार शब्दांवर चार स्वतंत्र लेख लिहावे असा विषय आहे. हे लिहायचा मोह ह्यासाठीच की श्रीमाऊली ही शब्दसम्राट आहे, शब्द निवडावे तर तिनेच व ते योग्य ठिकाणी चपखल योजावें तर तिनेच! 


ह्याचेच पुढे चिंतन रसगंगाधरकार श्रीजगन्नाथ पंडितांनी करताना 


रमणीयार्थं प्रतिपादक: शब्द: काव्यम् ।


अर्थ - रमणीय अर्थ प्रतिपादन करणारी शब्द रचना म्हणजे काव्य होय.


 साहित्यदर्पणकार आचार्य श्रीविश्वनाथाच्या साहित्यसुधासिन्धु ह्या ग्रंथाचं इथे स्मरण होतं. तो लिहितो 


जायते परमानन्दो ब्रह्मानन्दो सहोदर: ।

यस्य श्रवणमात्रेण तद्वाक्यं काव्यं उच्चते ।


काव्य कशांस म्हणावं ? विश्वनाथ लिहितो की ज्याच्या श्रवणमात्रानेच ब्रह्मानंदासह त्याचा सहोदर परमानंदांसही आपण प्राप्त होतो, त्यांस काव्य म्हणावं.


श्रीमाऊलींच्या रचनेचे वैशिष्ट्य हेच आहे की उपरोक्त दोन्हीं आपणांस प्राप्त झाल्याचे समाधान लाभतं. म्हणूनंच श्रीज्ञानेश्वरीचे चिंतन, मनन, निधिध्यासन अर्थात प्रत्यक्ष अधिकारी गुरुमुखातून श्रवण महत्वाचे...


आता श्रीमाऊलींची श्रीज्ञानेश्वरीही निर्दोषवर्णवपु का???


ज्यांनी श्रीज्ञानेश्वरी एकदा का होईना आयुष्यांत वाचली आहे, तो तिच्या प्रेमात आकंठ बुडतोच हे निर्विवाद आहे. श्रीमाऊली ही शब्दसम्राट आहे ह्याचे कारण सर्व शब्दभांडार किंवा जणु ते शब्दब्रह्म तिच्यापुढे मान खाली तुकवून अक्षरशः उभे राहते कारण शब्दसाम्राज्याच्या सिंहासनावरंच ती प्रत्यक्ष आरुढ आहे. म्हणूनंच श्रीमाऊलीच्या शब्दवैभवाचे वर्णन करताना आह्मांस मोह होतो तो महर्षि श्रीपतंजलींच्या व्याकरण महाभाष्याचा. समस्त वैय्याकरण्यांचा जणु पिताच असे जे भगवान महर्षि श्रीपाणिनी त्यांच्या सूत्रांविषयी किंवा त्यांनी निर्माण केलेल्या एकुणच व्याकरणवाङ्मयाविषयी श्रीपतंजली त्यांच्या व्याकरण महाभाष्यांत प्रथम अध्यायांतल्या प्रथम पादांतल्या प्रथम सूत्रांवर भाष्य करताना जे लिहितात, ते असे


'प्रमाणभूत आचार्यो दर्भपवित्रपाणिः शुचाववकाशे प्राङ्मुख उपविश्य महता प्रत्नेन सूत्राणि प्रणयति स्म । तत्राशक्यं वर्णेनाप्यनर्थकेन भवितुं, किं पुनरियता सूत्रेण?'


अर्थ - प्रमाणभूत असे दर्भपवित्रपाणि म्हणजे हातीं दर्भ धारण केलेल्या आचार्य श्रीपाणिनींनी अवकाशसमयामध्ये प्राचीनमुख उपविष्ट होऊन महान प्रयत्नपूर्वक अशा ज्या सूत्रांचे प्रणयन केलं, की ज्यांमध्ये एका वर्णाचेही अनर्थक असणे संभव नाही, मग एका सूत्राची ती काय गोष्ट???


संक्षेपांत सांगायचे तर भगवान श्रीपाणिनींनी रचलेल्या सूत्रांमध्ये एका वर्णामध्ये म्हणजे एका अक्षरामध्येही किंचितसाही दोष नाही ना त्यांमध्ये काही अनर्थकता आहे, मग त्या संपूर्ण सूत्राविषयी काय लिहावं???


इथे महर्षि श्रीपतंजलि नि भगवान श्रीपाणिनींची क्षमा मागून लिहावंसं वाटतं की 


"स्वतः प्रमाणभूतवेदज्ञानपवित्रह्रदय आचार्यो श्रीज्ञानेश्वरः शुचो समाधौ प्रणिधाय भावार्थदीपिकायाः प्रणयनं कृतवान्, तत्राशक्यं वर्णेनाप्यनर्थकेन भवितुं, किं पुनरेकेनाsपि चरणेन?"


"स्वतः प्रमाणभूत अशा वेदज्ञानाने ज्यांचे अंतःकरण पवित्र झालं आहे अशा आचार्य श्रीज्ञानोबारायांनी शुद्ध समाधीमध्ये प्रणिधान करून भावार्थदीपिकेचे प्रणयन केलं, त्यामध्ये एका वर्णाचे म्हणजे अक्षराचेही अनर्थक असणं संभव नाही, तर पूर्ण चरणाचे निरर्थक होण्याची गोष्टंच कुठे येते???"


शब्दसम्राट श्रीमाऊलींंच्या चरणी उपरोक्त सर्व गुरुमाऊलींच्या चरणी विलंबाने का होईना ही आमच्या अल्पबुद्धींस सुचलेली एक शब्दसुमनांजली...


त्वदीय वस्तु तुभ्यमेव समर्पयामि।


भवदीय


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#श्रीज्ञानेश्वरी_जयंती_श्रीज्ञानेश्वर_वेदापौरुषेयत्व_पाणिनी_पतंजली_वेदाङ्गे_श्रीगीता_भगवान_श्रीकृष्ण

Friday, 30 July 2021

भगवान श्रीकृष्ण एक दर्शन - एक अनुभव



ग्रंथलेखक - श्री. अनंत दामोदर आठवले (संन्यासोत्तर स्वामी वरदानंद भारती)


तं कालं विपश्चितः कवयः आरोहन्ति।

अथर्ववेद - १९।५३।१


काय लिहावं नि लिहु नये असा विषय आज उपस्थित झाला आहे. गेली पाच सहा दिवस ह्याच मनःस्थितीत आहे. कारण ज्याच्याविषयी लिहायचंय, त्याच्याविषयी लिहिण्यांस कविकुलगुरुचीही प्रतिभा थिटी पडेल. 'यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह' हे वचन त्यालाच लागु पडतं. म्हणूनंच मूळ ग्रंथलेखकाने ज्या कैवल्यचक्रवर्ती संतश्रेष्ठ श्रीज्ञानोबारायांचा संदर्भ देत


राजहंसाचे चालणें। भूतली जाहलीया शहाणे। आणिक काय कोणें। चालवेचिं ना।


असे म्हटले आहे, तेच शिरोधार्य मानून हा अनुभवप्रपंच करत आहे. 


तीन वर्षांपूर्वी अगदी कालच्याच दिवशी म्हणजे २९ जुलै २०१८ ला हा ग्रंथ आमच्या पराग महाराज चातुर्मास्येंबरोबर पूज्यनीय अप्पांची ग्रंथसंपदा क्रय करताना हातीं आला होता. तरी त्यावेळी काही वाचणं झालं नव्हतं. पण मागच्या महिन्यांत आमचे गुरुबंधु वै. वाना महाराजांचे चिरंजीव श्री. ऋषिकेशजी उत्पात, श्री. श्रीकांत महाराज हरिदास ह्यांच्याशी संवाद करताना पूज्यनीय अप्पांच्या ह्या ग्रंथश्रेष्ठाचा विषय झाला नि ह्याचे चिंतन करायचं ठरलं. प्रत्यही सायंकाळी १० ते ११ या वेळेत एक तास ह्या सद्ग्रंथाचे पठण नि आवश्यक तिथे विवेचन आह्मीं आरंभ केलं. २९ जुनला हा वाग्यज्ञ आरंभ झाला नि २५ जुलैला सायंकाळी हा ग्रंथ संपला. त्याचाच हा वृत्तांत...


खरंतर ग्रंथपरिचय असा स्वतंत्र लिहावा लागेल किंवा त्यावर लाईव्ह यावं लागेल. पण तूर्तास अन्य कार्य असल्याने विस्तारभयास्तव केवळ या लेखामध्येच काही अनुभव कथनाचा हेतु आहे...


भगवान श्रीकृष्णाविषयी आजपर्यंत अनेकांनी अनेकप्रकारे लिहिलं आहे. त्याला पूर्ण पुरुषोत्तम जरी सर्व जाणत असले, तरी त्याची तशी व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने यथार्थ मांडणी मात्र कुणी केल्याचे फारसं दिसत नाही, कारण बव्हतांश लोकांनी त्याला ईश्वरी अवतार व त्यातही केवळ भक्तकामकल्पद्रुम असाच मानल्याने व दुर्दैवाने काही स्थानी केवळ रासक्रीडेपूरताच किंवा त्यांच्या बाललीलांपूरताच त्यांस मर्यादित केल्याने केवळ भक्तीपंथापूरताच तो चिंतनीय राहिला. परंतु श्रीमन्महाभारतामध्ये आलेली त्यांची पुरुषश्रेष्ठत्वाची वास्तववादी भूमिका मांडण्यांत मात्र कुणी प्रयत्न केल्याचा दिसत नाही. महामहोपाध्याय श्रीबाळशास्त्री हरदासांनी 'भगवान श्रीकृष्ण'च्या माध्यमांतून केलेला प्रयत्न काहीसा स्तुत्य अवश्य आहे व चिंतनीयही आहे. पण प्रस्तुत लेखकाने अर्थात पूज्यनीय स्वामी वरदानंद भारतींनी केलेला प्रयत्न मात्र एकमेवाद्वितीय असाच म्हणावा लागेल. आमच्या अल्पाध्ययनाप्रमाणे...


व्यक्तिनिर्माता नि राष्ट्रनिर्माता भगवान श्रीकृष्ण


व्यष्टी नि समष्टीचाच सतत विचार करणारा नि धर्मसंस्थापनेसाठी जीवनसर्वस्व पणांस लावणारा नि ह्या सर्वासाठी स्वतःचे व्यक्तिमत्व आधी घडविणारा नि त्यातून इतरांना घडविणारा व एकुणंच व्यावहारिक पातळीवर धर्मसंस्थापनेसाठी मनुष्यनिर्माण नि राष्ट्रपुनरुत्थानाचा संकल्पसिद्ध आचरणकर्ता असा हा भगवान श्रीकृष्ण जो योगेश्वर म्हणून गणला गेला, त्याचे हे अत्यंत अभिनव नि तत्वार्थद्रष्टं असे स्वरुप पूज्यनीय श्रीअप्पांनी ज्या प्रकारे मांडलं आहे, ते पाहून त्यांच्या अफाट नि अचाट अशा तर्कशुद्ध नि प्रत्युत्पन्न मतीच्या वैभवाची साक्ष तर पटतेच पण ह्या पुरुषश्रेष्ठाविषयीचा आपला आदर केवळ दुणावतोच असे नव्हे तर तो सर्वोच्च शिखरांवर जाऊन पोहोचतो.


ग्रंथनिर्मितीचा हेतु अर्थात उपक्रमाच्या दृष्टीने विचार करता प्रत्यक्ष लेखकानेच म्हटल्याप्रमाणे 


"महर्षी व्यासांच्या अलौकिक प्रज्ञेविषयी नितांत आदर बाळगूनही असे म्हणावे लागते की काही वेळा तरी श्रीकृष्णाचे वर्णन करताना व्यासमहर्षींची दिव्य प्रतिभाही स्तिमित झाली आहे. भगवान श्रीकृष्ण हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. हे रत्न इतके तेजस्वी आहे, त्याला इतक्या विविध प्रकारचे पैलू आहेत की त्या सगळ्यांचे यथार्थ आकलन करण्याकरिता व्यास-वाल्मिकिंच्याच तोडीची योग्यता असेल तरच काहीसे साधेल. नाहीतर काजव्याने सूर्याची तेजस्विता मोजण्यास जावे तसे होईल."


पण असे असूनही लेखकानेच म्हटल्याप्रमाणे


"भक्तांचा श्रीकृष्ण, तत्वज्ञानी श्रीकृष्ण, योगेश्वर श्रीकृष्ण, सर्वस्वाच्या त्यागाची प्रेरणा देणारा श्रीकृष्ण, कर्माकर्माची यथार्थ मीमांसा करणारा श्रीकृष्ण, कर्तव्याचे योग्य ते प्रबोधन करणारा श्रीकृष्ण हे जसे श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्त्वाचे तेजस्वी असे अनेक पैलू आहेत, त्याचप्रमाणे धर्मसंस्थापनेसाठी, सज्जनांच्या संरक्षणासाठी, प्रत्येक प्रसंगी अत्यंत सावध राहणारा, चातुर्याने, कौशल्याने निर्णय घेणारा आणि दुष्ट नराधमांच्या केवळ स्वार्थीपणाने प्रेरित झालेल्या आशाकांक्षावर, त्यादिशेने घडणाऱ्या प्रयत्नांवर पाणी ओतून त्यांच्या पदरी अपयश बांधणारा राजकारणी श्रीकृष्ण हेही श्रीकृष्णाच्या दिव्योदात्त व्यक्तिमत्वाचे एक दैदिप्यमान अंग आहे. श्रीकृष्णाचे हेच राष्ट्रसंरक्षक समाजोद्धारक वैशिष्ट्य आपणापुढे यथामती मांडावे अशी माझी इच्छा आहे."


या ग्रंथांची मांडणी भगवान श्रीकृष्णाच्या राजकीय नि व्यावहारिक श्रेष्ठत्वाची अत्यंत चिकीत्सक नि आचरणपर अशीच आहे. जी सर्वसामान्यांसही आकळणारीच आहे. दुर्दैवाने भक्तांनी, कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी नि सर्वच कृष्णभक्तांनी भगवान श्रीकृष्णाचे हे असे राष्ट्रोद्धारक नि व्यष्टी नि समष्टीच्या कल्याणाचे विशुद्ध रुप उलगडून दाखविण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. अगदी राज्यव्यवहार शास्त्राच्या अभ्यासकांनीही, राजनीतिधुरंधरांनीही हे केलं नाही. किंवा ज्यांना राष्ट्रनिष्ठ समाजधुरीण म्हणता येईल अशांनीही नाही. अशावेळी भगवान श्रीकृष्णांस पूर्णपुरुषोत्तम नि ईश्वरी अवतार म्हणून पूर्ण श्रद्धेने स्वीकारणाऱ्या, पूर्वायुष्यांत 'श्रीकृष्णकथामृतासारखे' भक्तिरसपर चरित्रचिंतन करणारे महाकाव्य रचणाऱ्या पूज्यनीय अप्पांनीच अशा एका आगळ्यावेगळ्या ग्रंथांचीच रचना करावी हे अत्यंत विशेष आहे. किंबहुना 'महाभारताचे वास्तव दर्शन' या त्यांच्या ग्रंथाबरोबरंच त्यांचा हा ग्रंथश्रेष्ठही त्यांच्या 'अनंत'प्रतिभेंस कळस पोहोचविणारा आहे.


पण तरीही एक गोष्ट मात्र विशेष सांगावीशी वाटते की लेखक योगेश्वरांना ईश्वरी अवतार मानत असूनही संपूर्ण ग्रंथामध्ये कुठेही चमत्कारिक वर्णन करून प्रसंग न रंगविण्याची लेखकाने काळजी घेतलेली आहे. हे ह्या ग्रंथांचे फार वेगळं वैशिष्ट्य आहे. कारण तो ईश्वरी अवतार आहे, तो काहीही करु शकतो म्हटलं की संपलं. मग आह्मांस तो आचरणीय राहतंच नाही. किंबहुना तो केवळ मूर्तीमध्ये पूजिण्यातंच आह्मीं धन्यता मानतो. आचरणांत मात्र कधीच आणत नाही. ही उणीव मात्र लेखकाने अत्यंत कसोशीने भरून काढल्याने त्यांच्याविषयी किती ऋण व्यक्त करावेत हे कळत नाही.


एक गोष्ट मात्र इथे आवर्जून नमुद करावीशी वाटते...


ह्या ग्रंथाचे प्रत्यही विवेचन करताना आह्मांस एक सतत जाणवत होते की ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या राज्यव्यवहारकुशलतेचे नि व्यष्टी नि समष्टीच्या हिताचे असे कुटनीतीचे वर्णन करताना लेखकाने प्राचीन अर्थशास्त्रकारांची वचने उद्धृत केली असती तर ग्रंथांस आणखी बहार आली असती. अर्थात ही काही ह्या ग्रंथांची न्यूनता नसली तरी जर अप्पा आज जीवित असते तर त्यांना ही विनम्र विनंती मी तरी अवश्य केली असती. नि पुढील आवृत्तीमध्ये ते संदर्भ भरीस घालण्याचा अट्टाहास केला असता. ह्यात कुठेही त्यांच्याविषयी अनादर व्यक्त करण्याचा हेतु नसून उलट त्यांच्याविषयीच्या अत्यादरानेच हे लिहितो आहे. वाचकांचा भ्रम नसावा ही विनंती...


ग्रंथांतले काही विशेष उल्लेखनीय संदर्भ


खरंतर सर्वच ग्रंथ विशेष उल्लेखनीय शब्दन्शब्द म्हणून असला तरी ह्या ग्रंथांतली काही वाक्ये तर अशी चिंतनीय आहेत की ती अक्षरशः सुवर्णाक्षरांनी नोंदवून ठेवावीत. अशी अनेक वाक्ये आहेत जी इथे विस्तारभयास्तव देणं संभव नाही त्याहेतु क्षमस्व. लेखकाने महाभारत मांडत असताना किंवा श्रीकृष्णाचे पुर्वचरित्र मांडत असताना वर्तमान राजकारणाशीही व महाभारत पश्चातच्या भारतवर्षाच्या इतिहासाशी घातलेली सांगडही अत्यंत महत्वाची आहे. एक दोन ठिकाणी प्रामाणिक मतभेद अवश्य आहेत. अस्तु।


ग्रंथांतले अंतिम प्रकरण वाचताना तर कुणांसही नेत्रकडा ओलावल्याशिवाय राहतंच नाही. कारण तिथेच त्या भगवानाच्या नि पूर्णपुरुषोत्तमाच्या ब्रह्मचर्याचे नि सत्यनिष्ठेचे जे दर्शन घडलंय ते वाचून कुणाचेही अंतःकरण द्रवेलंच...


उपसंहाराच्या दृष्टीने ग्रंथांच्या अंती लेखकाने जे व्यक्त केलं आहे ते पाहणं आवश्यक आहे. आपल्या ब्रह्मचर्याच्या प्रतिज्ञेवर भगवान श्रीकृष्णाने परीक्षितींस जीवित केल्यावरचा प्रसंग वर्णिताना लेखक लिहितो की


"हे ही एक प्रकारे विश्वरूप दर्शनच आहे. पण ते तेजानें सूर्यासारखे दैदिप्यमान असले तरी शारदीय पुर्ण चंद्राप्रमाणे आल्हाददायक आहे. कमलासारखे कोमल आहे. सर्व ज्ञानेंद्रियांना तृप्त करील असे सद्गुणी आहे. श्रद्धावंतांना इथे जीवाचा विसावा सापडेल. सत्पुरुषांना आपला भाव आकाराला आला याचा प्रत्यय येईल, साधकांना यामुळे आश्वासन मिळेल, निस्वार्थी निरलस कार्यकर्त्यांना येथे आदर्श गवसेल, प्रखर बुद्धिमत्ता येथे समाधान पावेल, प्रामाणिकांचे मन येथे स्थिरावेल. तर योग्यांना आपले हृदय येथे आत्मरूपामध्ये अवस्थेत झाल्याचे अनुभवास येईल.."


अंती लेखक लिहितो...


"नास्तिकांचे समाधान माझ्या या विवेचनाने होईल असे मला वाटत नाही. त्यासाठी मी हा प्रयत्न केलेलाही नाही. पण या माझ्या प्रयत्नामुळे श्रद्धावंतांना नास्तिकांच्या आघाताला उत्तरे देता येतील आणि निरागस अनभिज्ञांचा बुद्धिभेद टळेल, एवढा विश्वास मला आहे."


 *उपक्रमोपसंहारावभ्यासोऽपूर्वता फलम् ।*

*अर्थवादोपपत्ती च लिङ्गं तात्पर्यनिर्णये ।।*


आमच्या प्राचीन शास्त्रकारांनी ग्रंथांची तात्पर्य लक्षणे सांगताना सहा गोष्टींचा विचार केला आहे. ज्यामध्ये उपक्रम (आरंभ), उपसंहार(अंत), अभ्यास(पुनरावृत्ति), अपूर्वता(अविषयता), फल (प्रयोजन), अर्थवाद(प्रतिपाद्य वस्तुची स्तुति आणि विपरीताची निंदा) आणि उपपत्ति(दृष्टांत प्रतिपादन)...


ग्रंथाची मांडणी ह्या सहाही तात्पर्यार्थनिर्णयांस अत्यंत अनुकूल असल्याने लेखकाच्या चरणी नि त्या ग्रंथनायकाच्या चरणी कोटी अभिवादन करून हा अनुभवप्रपंच पूर्ण करतो...


शीघ्रातिशीघ्र पूज्यनीय अप्पांचाच उपरोल्लेखित 'महाभारताचे वास्तव दर्शन' हा ग्रंथराजही आह्मीं १२ ऑगस्टपश्चात विवेचनांस घेऊच.संभव झाल्यांस फेबुवर प्रत्यही लाईव्हही करु. त्याची सूचना योग्यवेळी देऊच...


लेखाच्या अंती श्रीधरस्वामींच्या ओळी आठवतात, त्या अशा...


मिथ्यातर्कसुकर्कशेरितमहावादान्धकारान्तरभ्राम्यन्मन्दमतेरमन्दमहिमंस्त्वज्ज्ञानवर्त्मास्फुटम् ।श्रीमन्माधव वामन त्रिनयन श्रीशङ्कर श्रीपते गोविन्देति मुदा वदन् मधुपते मुक्त: कदा स्यामहम्॥


भवदीय...


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#भगवान_श्रीकृष्ण_एक_दर्शन_अनंत_आठवले_वरदानंद_भारती_राज्यव्यहारकुशल_कुटनीतिज्ञ_राष्ट्रनिर्माता_महाभारत

Sunday, 18 July 2021

आज विद्वान श्री. गोविंदलाल हरगोविंद भट्ट (जी. एच भट्ट) यांची पुण्यतिथी...

 


कोण गोविंदलाल भट्ट??


५-६ वर्षांपूर्वी श्रीमद्वाल्मीकि रामायणाचे अध्ययन जेंव्हा आरंभ केलं, त्यावेळी हे नाव आह्मांस कळलं. १९६६ मध्ये पुण्याच्या विश्वविख्यात अशा भांडारकर प्राच्यविद्या संस्थेने महाभारताची एक अत्यंत चिकीत्सक प्रत प्रकाशित केली, सहस्त्रो हस्तलिखितांची नि प्रतींची चिकीत्सक मीमांसा करून जिचं नाव CRITICAL EDITION OF MAHABHARATA, जी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णनांच्या हस्ते प्रकाशित करण्यांत आली. जिचे प्रमुख संपादक हे सुखटणकर होते. अनेक उच्चकोटीचे विद्वान ह्यावर कैक दशकं अध्ययन करत होते. तिच्याच अगदी सहा वर्षे आधीच बडौद्याच्या श्रीमंत सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या प्राच्यविद्या संस्थेने १९६० मध्येच श्रीमद्वाल्मीकि रामायणाचीही अशीच एक चिकीत्सक प्रत प्रकाशित केली होती. जिला आङ्ग्लभाषेमध्ये Critical Edition of Valmiki Ramayana असे म्हटलं जातं. 


४० वर्षे संशोधनाअंती प्रकाशित 


बडौद्याच्या श्रीमंत सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या प्राच्यविद्या विभागाने हे कार्य चार दशके संशोधन करून पूर्ण केलं होते. अनेक विद्वान ह्यामध्ये होते ज्यामध्ये प्रामुख्याने श्री भारतरत्न महामहोपाध्याय श्री पांडुरंग वामन काणे, श्रीसुखटणकर आदि मंडळी होती, जी भांडारकर प्रतीतही काम करत होती.


एकुण २००० हस्तलिखितांचे अध्ययन करून ही प्रत संपादित करण्यात आली होती. आणि ह्या सर्व उपक्रमाचे मुख्यसंपादक होते श्री गोविंदलाल हरगोविंद भट्ट जे प्राच्यविद्या केंद्राच्या रामायण विभागाचे मुख्यसंपादक नि अध्यक्ष होते. भट्टांच्या अध्यक्षतेखाली हे कार्य करण्यांत आलं होते. यद्यपि त्यांचे देहावसान अगदी अकाली झालं तरीही. 


वाल्मीकि रामायणाची चिकीत्सक प्रत


ज्यांना श्रीमद्वाल्मीकि रामायणाचं अध्ययन करायचं आहे,

त्यांना ही प्रत अभ्यासणं आवश्यकच नव्हे तर अपरिहार्य आहे.


या प्रतीमध्ये एकुण सात खंड असून उत्तरकांडही त्यांनी रामायणाचा भाग मानलेलंच आहे. शेवटी रामायणाची पदसुचीचाही खंड आहे. अर्थात ते उत्तरकांड कितपत ग्राह्य मानावे हा स्वतंत्र विषय आहे, त्याविषयी अंतिम मत प्रकट करण्याचे हे स्थान नव्हे.


ही प्रत अगदी अंतिम प्रत आहे असे आमचं म्हणणं नसून अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाची आहे इतकंच मत आहे.


वास्तविक रामायणांवर बोलण्यापूर्वी किंवा त्याविषयी आपले अंतिम मत बनविण्यापूर्वी रामायणांवरील ३० संस्कृत टीका अभ्यासायला हव्यांत, ज्यांचा उल्लेख आह्मीं राम मंदिर निर्णयाच्या वेळीच्या लेखामध्ये केला आहे. पण इतका चिकीत्सक अभ्यास करण्याची मानसिकता सांप्रत आपल्याकडे आहे का हा प्रश्न निदान इतिहासाच्या प्रामाणिक विद्यार्थ्यांनी तरी स्वतःला विचारायला हवा. असो.


सुदैवाने ही समग्र प्रत अगदी टंकलिखित आंतरजालांवर उपलब्ध आहे...


CRITICAL EDITION OF VALMIKI RAMAYANA


नावाने गुगल केलं की समग्र प्रत टंकलिखित प्राप्तही होते. किंवा पीडीएफही प्राप्त होते.


ही प्रत तयार करण्यासाठी अगदी विविध लिपींतल्या रामायणाच्या प्रतींचे अध्ययन झालं होते, ज्यामध्ये प्रामुख्याने देवनागरीबरोबरंच  शारदा, मेवारी, मैथिली, बंगाली, तेलगु, कानडी, तामीळ,मल्याळम, नंदिनागरी, ग्रंथ वगैरे लिप्याही होत्या. म्हणूनंच या प्रतीचे एक विशेष महत्व आहे.


भट्टांची आणखी काही ग्रंथसंपदा


त्यांनी एकुण ६४ ग्रंथ लिहिले असून ११५च्या वर संपादित आहेत. एकुण पाच भाषांमध्ये त्यांचे लेखन आहे.


महाप्रभु श्रीवल्लभाचार्यांच्या जीवनावरील नि तत्वज्ञानावरील परिचयात्मक असा त्यांचा ग्रंथ अगदी चिंतनीय आहे. त्याचे पीडीएफ आहे. गुगल केलं तरी मिळेल.श्रीवल्लभाचार्यांच्या ब्रह्मसूत्रावरील श्रीमत् अणुभाष्याचेही संपादन त्यांच्याच शिष्याने केलं होते.


द्रौपदी वस्त्रहरण - महाभारतातील प्रक्षिप्त प्रकरण


The Draupadīvastraharaṇa Episode: An Interpolation in the Mahābhārata


मद्रासमधून महामहोपाध्याय प्रा. श्री. कुप्पुस्वामी शास्त्री ह्यांनी सुरु केलेले एक The Journal of Oriental Research हे एक नामांकित त्रैमासिक प्रकाशन होते. सुदैवाने त्याचे बरेचसे अंक आज पीडीएफ आंतरजालांवर उपलब्ध आहेत. ह्याचा १९५१चा जो त्रैमासिक अंक आहे, त्यामध्ये श्री गोविंदलाल भट्टांचा द्रौपदी वस्त्रहरणासंबंधी एक अत्यंत अभ्यसनीय लेख आहे. तो जिज्ञासुंनी वाचणं अत्यंत आवश्यक आहे.


https://archive.org/details/in.ernet.dli.2015.76405/page/n3/mode/2up



वास्तविक द्रौपदी वस्त्रहरण झालं की नाही ह्यासंबंधी विद्वानांमध्ये अत्यंत टोकाचे मतभेद आहेत नि दोन्ही बाजुचे विद्वान आपलंच मत कसं सत्य आहे हे मांडण्यांत अत्याग्रही असतात, ते स्वाभाविकही आहे. पण तरीही या विषयांवर भट्टांचा हा लेख व आणखी संशोधनासाठी श्री म अ मेहेंदळेंचे संशोधनही अत्यंत चिंतनीय आहे. त्याबरोबरंच श्री अर्जुन विनायक जातेगांवकर व वासंती अर्जुन जातेगांवकर या दोघांनी लिहिलेला भांडारकरच्या Annals of BORI - Volume 92 मध्ये प्रकाशित झालेला लेखही चिंतनीय आहे.


आमचे पूज्यनीय स्वामी वरदानंद भारती जे पूर्वाश्रमीचे श्री अनंत दामोदर आठवले ह्यांनी त्यांच्या 'महाभारताचे वास्तव दर्शन' ह्या अभूतपूर्व ग्रंथामध्ये वस्त्रहरण व वस्त्रावताराचे समर्थन केलं असून त्यांच्या पुत्राने मात्र 'याज्ञसेनी द्रौपदी' ह्या पुस्तिकेमध्ये पित्याची मते खोडली आहेत. या सर्व विद्वानांच्या चरणी आह्मीं नतमस्तक आहोत. असो...


आमचं ह्याविषयी अंतिम मत प्रकट करण्यांस सांप्रत आह्मीं अभ्यासाअभावी असमर्थ असलो तरी भगवान श्रीकृष्णांचा वस्त्रावतार झालेलाच नाही हे त्यांच्याच वनपर्वांतल्या वचनांवरून सिद्ध झालेले असल्यामुळे तेवढ्यापुरते तरी आह्मीं ह्याविषयी मात्र ठाम आहोत. नि अंतिम क्षणापर्यंत राहु. महाभारतावरील सर्व टीका अभ्यासल्याशिवाय अंतिम मत प्रकट करणे तसं घाईचे असल्याने थांबतो....


श्रीमद्वाल्मीकि रामायणाच्या अध्ययनाच्या दृष्टीने ह्या प्रतीचे अत्यंत महत्व असल्याने हिचे संपादकत्व श्री भट्टांकडे असल्याने त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चरणी अभिवादन करून लेखणींस विराम देतो...


भवदीय...


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#वाल्मीकि_रामायण_चिकीत्सक_प्रत_बडौदा_प्राच्यविद्या_गोविंदलाल_भट्ट_भांडारकर_उत्तरकांड

Friday, 28 May 2021

प्लेग, सावरकर आणि सद्यःस्थिती

 




*पावित्र्याच्या तेजाने तळपणारे, ईश्वरावरील श्रद्धेचे शुभकवच ल्यालेले, मृगेंद्राचे सामर्थ्य नसानसांत स्फुरत असलेले, दीनदलितांबद्दल ह्रदयांत अपार करुणा असणारे सहस्त्रो युवक नि युवती हिमाचलापासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र संचार करतील; मूक्ती, सेवा आणि सामाजिक पुनरुत्थानाचे आणि सर्व प्रकारच्या सामाजिक समानतेचे आवाहन करतील नि हा देश पुन्हा पौरुषाने मुसमुसून उठेल.*


स्वामी विवेकानंद


आज सर्वत्र कोरोना नामक वैश्विक आपत्तीने अक्षरशः सर्व मानवजातींस जणु धारेंवर धरले आहे. अर्थात हे सर्व षड्यंत्र आहे. पण तरीही अशा अत्यंत विपन्नावस्थेमध्ये समाजासाठी, राष्ट्रासाठी, मानवतेसाठी कार्य करणाऱ्या हातांची आवश्यकता आहे. इतिहासांत काही पुरुषश्रेष्ठांनी अशाच जीवघेण्या आपदेमध्ये समाजाला सहाय्यतेचा आधार देऊन स्वकर्तव्यनिष्ठेचे पालन केले आहे. वर ज्यांचे उद्धरण दिलं आहे, त्या विश्वमानव श्रीमत्स्वामी विवेकानंदांनीही एक संन्यासी असूनही बंगालमध्ये जेंव्हा अशीच रोगाची साथ आली होती, तेंव्हा आपल्या सर्व संन्यासी गुरुबंधुंसह पूर्ण सामर्थ्यानिशी सेवाभावनेने सहाय्यता केली होती. जीवाची कोणतीही पर्वा न करता. त्याच काळांत...


इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणतात, ते काही खोटे नाही. त्यांच्याच प्रमाणे आज ज्यांची जयंती आहे, अशा हिंदुराष्ट्रपति श्री स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचीही एक घटना इथे प्रसंगोचित आहे.


*प्लेगचा कहर...*


आजपासून अगदी जवळ एकशे सव्वाशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रांत प्लेगची साथ आली होती. चाफेकर बंधुंची कथा सर्वांस ज्ञात असेलंच. ज्या नाशकांत स्वातंत्र्यवीर अगदी लहानाचे मोठे होत होते, तिथेही प्लेगने अक्षरशः थैमान घातले होते. आज कोरोनाची जी अवस्था आहे तीपेक्षाही अधिक भयाण अवस्था तींकाळी होती. आणि सावरकरांनी ती प्रत्यक्ष अनुभवली होती. त्यांनी त्यांच्या 'माझ्या आठवणी' ह्या आत्मचरित्रपर ग्रंथामध्ये ह्यासंबंधींच्या आठवणी दिल्याहेत. ते लिहितात की 


*"घरात एक माणसू प्लेगने लागला की देखोदेखी बायका-मुले, माणसे, घरचे घर एखाद्याआगीत भस्म व्हावे त्याप्रमाणे पटापट मृत्युमुखीपडून नष्ट व्हावें. एकेका घरात पाच-पाच, सहा-सहा प्रेतएकामागून एक पडलेली. कोणाचे प्रेत कोण उचलणार! वाड्याचा वाडा, पेठांच्या पेठा, घरोघर कण्हणेकिंकाळ्या, प्रेते, पळापळ, रडारड चाललेली, जे दुसऱ्याचे प्रेत आज उचलीत, तेच उद्या त्या संसर्गारशीप्लेगने लागनू परवा त्यांची प्रेते त्याच मार्गाने तिसऱ्यांस न्यावी लागत.तिथे कोण कोणाचे प्रेतउचलणार, मुलेें आई-बापाची प्रेते टाकून पळत, आई-बाप मुलांची प्रेते सोडून पळत; कारण घरात प्रेत आहे असे कळताच सरकारी अधिकाऱ्यांच्या आडदाडं सोजिराशी गाठ पडे! घर शुद्ध करण्यासाठी म्हणून उध्वस्त करणार. सामानाची जाळपोळ, लुटालुट होणार आणि उरलेले कुटुंबचे कुटुंब वनवासात नेऊन“सेग्रिगेशन"च्या अटकेत पडणार. पण तिथेही प्लेग, घरी प्लेग, दारी प्लेग! दैवी प्लेग, राजकीय प्लेग, ती भयंकर वर्णने वाचताना अंगावर अगदी शहारे उठत."*


त्या काळचे सेग्रिगेशन म्हणजेच आजचं क्वारण्टाईन...


पुढे सावरकर लिहितात की 


*आमच्या कुटुंबावरंही प्लेगचे संकट शेवटी कोसळलेच*


एकेदिवशी आमच्या कुटुंबावरही ते प्लेगचे संकट कोसळलेच. थोरले बंधु श्रीबाबाराव नि जन्मदाते पिताश्री दोघेही प्लेगला बळी पडले. धाकटे भाऊही. पुढे ते सगळे दोन तीन महिन्यांत बरेही झाले. त्यापूर्वी नाशिकांतले त्यांचे एक सहकारी श्रीरामभाऊ दातार म्हणून होते, ज्यांना प्लेगची लागण होताच, स्वतः सावरकरांच्या वडिलांनी त्यांच्या कुटुंबांला जीव धोक्यांत घालून सहकार्य केले होते. म्हणजेच इतरांसाठी आपला जीव संकटांत घालण्याची सावरकर कुटुंबाची परंपरा ही अशी होती.


मधील काळांत दुर्दैवाने त्यांच्या वडिलांचे देहावसानही झाले. घरांवर आर्थिक संकटही कोसळले.


*नाशकांतले त्यांचे एक परिचित असे उपरोक्त श्रीरामभाऊ दातार हे ह्याची जाण ठेऊन पुढे सावरकर कुटुंबाच्या सहकार्यांस तर धाऊन आलेच पण सावरकरांनी स्वतः आता भीड मोडून नि योग्य ती काळजी घेऊन प्लेगने गांजलेल्या समाजासाठी काही कार्य करायचे ठरवले. या कामी त्यांनी त्यांच्या गुप्त संघटनेचे स्वयंसेवकांचे एक पथक बनविले. कारण या काळातंच सावरकरांनी एका गुप्त मंडळाची स्थापना त्यांचे मित्र श्री म्हसकर नि श्री पागे नि प्लेगमधून सुटून आलेले त्यांचे दोन बंधु यांच्या मदतीने केली होती.*


*मित्रमेळ्याची स्थापनाही यांच काळात.*


भविष्यांत जिने अभिनव भारत ह्या संघटनेचे स्वरुप धारण केले, ती मित्रमेळाही ह्याच काळांत स्थापिली गेली. आश्चर्य म्हणजे सावरकरांना मात्र प्लेगची लागण त्यांच्या सौभाग्याने झाली नाही. यद्यपि त्यांना देवी लागण येऊन गेली होती. अर्थात ते योग्य ती काळजी घेतंच होते. पुढे त्यांनी त्या स्वयंसेवकांच्या संघाच्या वतीने प्लेगनिवारणाचे कार्य आरंभ केले. ते लिहितात


*प्रेते जाळणारे स्वयंसेवक पथक*


*"पुढे कधीकधी असंभाव्य वाटणारी बाबांची (बाबाराव सावरकर) ही सहनक्षमता, परोपकारता, मनोधैर्य तेंव्हा देखील निरनिराळ्या स्वरुपांत का होईना पण मधूनमधून प्रकट होई. त्यात सन १९००व्या आणि १९०१व्यावर्षाच्या मध्यंतरी नाशकास प्लेगची वार्षिक फेरी पुन्हा एकदा आली. आह्मीं मंडळी आता प्लेगला अगदीनिढार्वलो होतो. प्लेग येताच पळापळ होणाच्या जागी आह्मीं गावातंच राहावे. इतकेच नव्हे, तरनिराश्रित अशा प्लेगच्या रोग्यांची शुश्रुषा स्वतः करून शेवटी त्यांची प्रेते स्वतः खांद्यावर वाहून न्यावी. या कामी पुढाकार म्हणजे बाबांचा (थोरल्या बंधुंचा) आणि रामभाऊ दातारांचा. स्मशानाच्या वाऱ्या रात्रीबेरात्री आह्मीं जीवाची चिंता सोडून इतक्यांदा केल्या, की स्मशानाचे भय असे न उरता ते एखाद्या गजबजलेल्याजगतातल्या चौकासारखे बैठकीचा अड्डा वाटावे."*


म्हणजे आज जसे काही जण कोरोना योद्धे म्हणून समाजासाठी सर्वस्वाचा त्याग करून जीव संकटांत घालून सेवावृत्तीने लोकशुश्रुषेचे नि प्रसंगी प्रेत वहायचे काम करताहेत, तद्वतंच त्याकाळीही सावरकरांसारखे युवकही जणु 'प्लेग योद्धे' म्हणून समाजासाठी शुश्रेषेचे, प्रेत उचलायचे व ते जाळायचेही काम करत. एक स्वयंसेवक म्हणून हे कार्य करणं वाटतं तितकं सोप्पं नव्हे. कारण प्लेगची साथ इतकी भयानक होती की प्रेत उचलून नेणाराच दुसऱ्या दिवशी त्याच साथीने जायचा. म्हणून आजच्या कोरोना नामक वैश्विक संकटामध्ये सावरकरांचे हो निष्काम लोकसेवेचे उदाहरण अगदी वंदनीय ठरते...


ह्या समाजक्रांतिकारकांस त्यांच्या आजच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन...!


भवदीय...


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#स्वातंत्र्यवीर_सावरकर_प्लेग_मृत्यु_शव_कोरोना_स्वयंसेवक_समाजसेवक

Saturday, 15 May 2021

उद्या भगवत्पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांची २५३०वी जयंती...

 


*शंकराचार्य...ही पाच अक्षरे ऐकली म्हणजे कर्णी आली की जणु पंचप्राण त्याठिकाणी एकवटल्यासारखे वाटते. अर्थात ही पाच अक्षरे म्हणजे जणु वैदिक हिंदुधर्माचा पंचप्राणंच आहेत.*


पूज्यपाद श्रीआचार्यांविषयी लिहायची माझी तरी योग्यता नाही. कारण आचार्यांच्या केवल चिंतनानेच अंतःकरणांत अश्रुंचा पूर येतो. खुंटला शब्द अशी अवस्था येते...तरीही गेल्या वर्षभरामध्ये आचार्यांची १९ संस्कृत नि इंग्रजी अनुवादित चरित्रे अभ्यासून माझ्या अल्पमतींस जे काही कळलं, ते संपूर्ण मांडण्याचा प्रयत्न यद्यपि ह्या लेखामध्ये संभव नसला तरी शीघ्रातिशीघ्र यावर येऊच. ती वेळ अर्थात आलीच आहे. 


ह्या सर्व चरित्रचिंतनातून भगवत्पाद पूज्यनीय श्रीमच्छंकराचार्यांच्या चरित्राचा कालपट निम्नलिखित पद्धतीने मांडता येणं संभव आहे. आह्मीं यापूर्वीही यावर लिहिलंच आहे पण ते फारंच संक्षेपाने. ही कालनिर्णयात्मक सूची पूज्यनीय श्रीभगवत्पादाचार्यांनीच स्थापिलेल्या श्रीशारदापीठाच्या अनुसारंच आहे. व उपरोल्लेखित १९ चरित्रांच्या अन्वये... अर्थात आमचा हा प्रयत्न 


*फोडिलें फांडार, धन्याचा हा माल।*

*मी तों हमाल, भार वाहें।*


इतकाच आहे.


*भगवत्पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांची उद्या २५३०वी जयंती... इसवी सन पूर्व ५०९ ते इसवी सन पूर्व ४७७ हा त्यांचा काल. ती ५०९ अधिक आजची २०२१ वर्षे. एकुण २५३०वी जयंती...*


*श्रीशारदापीठानुसार पूज्यपाद श्रीआचार्यांचा जीवनक्रम*


जन्म - वैशाख शुद्ध पंचमी - युधिष्ठिर शक २६३१ 


उपनयन संस्कार - चैत्र शुक्ल नवमी - युधिष्ठिर शक २६३६


संन्यास - कार्तिक शुक्ल एकादशी - युधिष्ठिर शक २६३९


गुरु श्रीगोविंदपादाचार्यांकडे शिक्षण पूर्ण - फाल्गुन शुक्ल द्वितीया - युधिष्ठिर शक २६४०


श्रीबद्रिकाश्रमामध्ये भाष्य पूर्ण - ज्येष्ठ वद्य अमावस्या - युधिष्ठिर शक २६४६


श्रीज्योतिर्मठाची संस्थापना - तत्रैव


ह्या ज्योतिर्मठाच्याच २५००व्या महोत्सवाची पत्रिका माझ्याकडे होती. मी त्यावर चार वर्षांपूर्वी लेख लिहिला होता. 


श्रीमंडनमिश्रांशी शास्त्रार्थ - मार्गशीर्ष वद्य तृतीया - युधिष्ठिर शक २६४७ 


श्रीशारदामठाची स्थापना - कार्तिक वद्य त्रयोदशी - युधिष्ठिर शक २६४८


श्रीशृंगेरी मठाची स्थापना - फाल्गुन शुक्ल नवमी - युधिष्ठिर शक - २६४८


श्रीमंडनमिश्रांस संन्यासदीक्षा देऊन त्यांचे नामकरण श्रीसुरेश्वराचार्य - चैत्र शुक्ल नवमी - युधिष्ठिर शक २६४९


सुधन्वा नावाच्या राजाशी संपर्क व त्याला वैदिक धर्मात पुनः आणणे - मार्गशीर्ष शुक्ल दशमी - युधिष्ठिर शक २६४९


श्रीसुरेश्वराचार्यांस श्रीशारदापीठांवर आरोहण - माघ शुक्ल सप्तमी -युधिष्ठिर शक २६४९


दिग्विजयाचा आरंभ - वैशाख शुक्ल तृतीया - युधिष्ठिर शक २६५०


श्रीतोटकाचार्यांचे आगमन - श्रावण शुक्ल सप्तमी - युधिष्ठिर शक २६५३


श्रीहस्तामलकांचे आगमन - आश्विन शुक्ल एकादशी - युधिष्ठिर शक २६५४


श्रीतोटकाचार्य आणि श्रीहस्तामलकांचे अनुक्रमे श्रीज्योतिर्मठ आणि श्रीशृंगेरी इथे आरोहण - पौष शुक्ल पौर्णिमा - युधिष्ठिर शक २६५४


श्रीगोवर्धन मठाची स्थापना - वैशाख शुक्ल दशमी - युधिष्ठिर शक २६५५


श्रीपद्मपादाचार्यांचे श्रीगोवर्धन मठांवर आरोहण - तत्रैव


दिग्विजय सुरुच - भाद्रपद पौर्णिमा - युधिष्ठिर शक २६५५ ते


श्रीशारदापीठांवरील अंतिम निवास - पौष अमावस्या - युधिष्ठिर शक २६६२


निजधामगमन - कार्तिक पौर्णिमा युधिष्ठिर शक २६६३


*कलियुगाचा आरंभ इसवी सन पूर्व ३१०२, १८ फेब्रुवारी. म्हणजे आजपासून ५१२३ वर्षे पूर्व. यापूर्वी ३८ वर्षे भर घातली की युधिष्ठिर शकाचा आरंभ. म्हणजेच इसवी सन पूर्व ३१४०.*


*आता आचार्यांचा जन्म युधिष्ठिर शक २६३१ म्हणजे ह्या ३१४० मधून २६३१ वजा केली...इसवी सन पूर्व ५०९ ठरतो..म्हणजेच आजपासून २५३० वर्षांपूर्वाचा...*


अस्तु।


उद्या आलोच तर युट्युबचैनलवर लाईव्ह येऊच...निश्चित नाही. विचार आहे पाहु....


भवदीय...


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#भगवत्पूज्यपाद_श्रीमच्छंकराचार्य_जयंती_शांकरदेशिक_शंकरविजय_युधिष्ठिरशक_कलियुग

Friday, 14 May 2021

*भगवान भृगुनंदन श्रीपरशुराम आणि वेद*



अथर्ववेदाच्या पंचम कांडाच्या अठराव्या सूक्तामध्ये वेदविद्येच्या रक्षणाचा उपदेश केला आहे. ह्या संपूर्ण सूक्तामध्ये ब्राह्मण आणि राजन्य अर्थात क्षत्रियांच्या कर्तव्याचा उपदेश केला आहे. ब्राह्मण अर्थात ब्रह्म अर्थात वेदाध्ययन करणारे व अध्यापन करणारे जे आहेत व क्षतात् त्रायते इति क्षत्रियः, जे संकटापासून रक्षण करतात असे क्षत्रिय यांचे चिंतन करताना वेदमंत्रांनी जे काही प्रकट झाले ते भगवान श्रीभार्गवरामांच्या जयंतीदिनी पाहणं आवश्यक आहे. इथे राजन्य हा शब्द क्षत्रियांसाठीत योजिला आहे. कारण काही भारत विखंडन शक्ती राजन्य नि क्षत्रिय दोन्हीं वेगळे आहेत असे मांडण्याचा दुष्ट प्रयत्न करताहेत, आह्मीं मागेच त्यांचं षड्यंत्र हाणून पाडलं होते ही गोष्ट वेगळी. सावध रहावे ही विनंती. अस्तु।


भगवान श्रीभार्गवरामाचे वर्णन हे अग्रतश्चतुरो वेदाः असे केलं जातं. चारही वेद वेदाङ्गांसहित ज्यांच्या अग्रभागी आहेत, असे श्रीभार्गवराम. त्याचबरोबर पृष्ठतः सशरं धनुः म्हणजे ज्यांच्या पाठी शरासहित भाता आहे. असे ब्राह्मतेज नि क्षात्रतेज धारण करणारा हा अवतारश्रेष्ठ वेदमंत्रांच्या आधारे चिंतन करण्यांस युक्त आहे. वेदभगवान अशा क्षत्रिय नि ब्राह्मणाची मांडणी करताना म्हणतो की ब्राह्मण हा वेदतत्वाच्या आधारे चालणारा असेल तरंच तो महाप्रबल असतो. अन्यथा नाही. म्हणजे वेदाध्ययनहीन ब्राह्मण हा वेदांस मान्य नाही. 


*ओ३म् जि॒ह्वा ज्या भव॑ति॒ कुल्म॑लं॒ वाङ्ना॑डी॒का दन्ता॒स्तप॑सा॒भिदि॑ग्धाः। तेभि॑र्ब्र॒ह्मा वि॑ध्यति देवपी॒यून् हृ॑द्ब॒लैर्धनु॑र्भिर्दे॒वजू॑तैः ॥*


५।१८।८


*[ब्राह्मणाची] (जिह्वा) जीभ (ज्या) धनुष्याची प्रत्यंचा (असते), (वाक्) वाणी (कुल्मलम्) बाणाचा दंड (भवति) असते आणि [त्याची] (नाडीकाः) गळ्याचा भाग (तपसा) अग्नीने (अभिदिग्धाः) तापलेल्या (दन्ताः) बाणाच्या दातांसमान म्हणजे अग्रासमान असतो. (ब्रह्मा) ब्राह्मण (हृद्बलैः) हृदय तोडणाऱ्या (देवजूतैः) विद्वानांनी पाठविलेल्या (तेभिः) त्या (धनुर्भिः) धनुष्यांनी (देवपीयून्) विद्वानांस सतावणाऱ्यांस (विध्यति) छेदतो. ॥८॥*


हे अलंकारिक वर्णन भार्गवरामांस किती यथार्थ लागु होते.




पुढील मंत्रामध्ये तर आणखी बहारीचे वर्णन आहे. वेदभगवान म्हणतो...


*ओ३म् ती॒क्ष्णेष॑वो ब्राह्म॒णा हे॑ति॒मन्तो॒ यामस्य॑न्ति शर॒व्या॑३ न सा मृषा॑ । अ॑नु॒हाय॒ तप॑सा म॒न्युना॑ चो॒त दु॒रादव॑ भिन्दन्त्येनम् ॥*


अथर्ववेद - ५।१८।९


*(तीक्ष्णेषवः) तीक्ष्ण बाण असणारे, (हेतिमन्तः) वज्रासमान शस्त्र धारण करणारे (ब्राह्मणाः) ब्राह्मण लोक (याम्) ज्या (शरव्याम्) बाणांच्या समुहांस (अस्यन्ति) सोडतात, (सा) ती (मृषा) मिथ्या (न) नसते. (तपसा) तपाने (च)आणि (मन्युना) क्रोधाने (अनुहाय) पाठलाग करत (दूरात्) दुरूनंच (उत) ही (एनम्) ह्या वैरींस (अव भिन्दन्ति) छेदतात॥९॥*


म्हणजे इथे केवल तपानेच ब्राह्मण शत्रुंस पराभूत करतो हे सांगितलं आहे.


ह्या मंत्रांच्या आधीच्या मंत्रांमध्ये क्षत्रियाचे वर्णन असून तेही क्षात्रतेज अंगी धारण केलेल्या श्रीभार्गवरामांस लागु पडणारे आहेच. भगवान श्रीभार्गवरामांचे वर्णन करणारे अनेक श्लोक पुराणांतरी, रामायण-महाभारतीं असतील, पण ह्या वेदमंत्रांचे चिंतन पाहता इतके सुंदर वर्णन त्यांस लांगु होईल ह्यात काही संदेहंच नाही. 


*भगवान श्रीभार्गवरामांचे चरित्रचिंतन महाभारतादि ग्रंथांमधून पाहता त्यांच्या आजोबांस म्हणजे ऋचिकांस धनुर्वेद प्रत्यक्ष प्रकट झाल्याचा उल्लेख आहे. तर यांच महाभारताच्या आरण्यकपर्वामध्ये प्रत्यक्ष धनुर्वेदंच श्रीजमदग्नींसमोर चार अस्त्रांच्या सह प्रकट झाल्याचा उल्लेख आहे. अन्य ठिकाणी आहे. श्रीभीष्माचार्यांशी अंबेसंबंधी युद्ध करतानाही वर्णन आहे. संक्षेपांत धनुर्वेदाची किंवा विद्येची परंपरा श्रीभार्गवरामांस कशी प्राप्त झाली ते महाभारत सांगताना आपल्याला दिसते.*


*पण आश्चर्य म्हणजे परशुच्या विनियोगासंबंधी फारंच त्रोटक माहिती आहे. त्यामुळे शंकेस वाव आहे. अर्थात हा स्वतंत्र चिंतनाचा विषय असल्यामुळे हा विषय इथेच सोडतो...*


*अर्थात इथे जाता जाता सांगणं आवश्यक आहे की हे वर्णन केवल अलंकारिक म्हणून सांगितलं आहे. म्हणजे काही लोक ह्या वेदमंत्रांमध्येच श्रीभार्गवरामांचे वर्णन आहे असा कुतर्क करतील व वेदांमध्ये अवतारवाद शोधण्याचा किंवा इतिहास शोधण्याचा बालिशपणा करतील. हा प्रयत्न अर्थातंच लैदिक सिद्धांताना छेद देणारा असल्यामुळे आह्मीं त्यांचा संबंध भार्गवरामांशी जोडण्याचे कारण केवळ नि केवळ त्यांचे क्षात्रतेज नि ब्राह्मतेज दर्शविण्यासाठी जोडलेला आहे. कर्णपर्वात वर्णन आहे.*


कुणीही यावरून ह्या वेदमंत्रांमध्ये अवतारवाद शोधतील तर ते वडाची साल पिंपळाला जोडण्यासारखेचं होईल.


अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु।


भगवान श्रीभार्गवरामांस त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!


भवदीय...


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#भगवान_श्रीभार्गवराम_श्रीपरशुराम_भृगुनंदन_ब्राह्मणक्षत्रियराजन्य_महाभारत_परशु_धनुर्वेद

Friday, 7 May 2021

भारतरत्न महामहोपाध्याय श्रीपांडुरंग वामन काणे जयंती विशेष

 



(७ मे, १८८० ते १८ एप्रिल, १९७२)


*अथातो धर्मशास्त्रेतिहासस्य जिज्ञासा।*


ईश्वरीय अशा आर्यसनातन वैदिक हिंदुधर्मशास्त्राचा सारगर्भित, सप्रमाण नि साधार इतिहास अध्ययन करणे हे येरागबाळ्याचे काम तर नोव्हेंच. पण त्यातही तो समग्र इतिहास शब्दबद्ध करणे हे तर त्याहूनही अत्यंत दुष्कर कार्य. हा सर्व इतिहास आपल्या विचक्षण विवेचनाने शब्दबद्ध करणाऱ्या एका विद्वद्वर्य्याची आज जयंती. 


*एक प्रखर धर्मसुधारक*


*अस्पृश्यता-केशवपनादि विकृत नि वेदविरुद्ध प्रथांवर कोरडे ओढणारा हा धर्मशास्त्रज्ञ महाराष्ट्रांत जन्माला आला हे आमचं भाग्य. विधवाविवाह नि विवाहविच्छेद(घटस्फोट) आदिंना धर्मशास्त्रीय प्रमाणांतून समर्थन करणारा हा धर्मसुधारक. इतकंच काय पण आमच्या भूवैकुंठ पंढरीत एका सकेशा विधवेच्या श्रीविठ्ठलपूजेच्या अधिकार प्राप्तीसाठी तिचे विधीज्ञपत्र घेणारा हा विधीज्ञ. आंतरज्ञातीय विवाहाचाही पुरस्कर्ता. लोणावळा येथे मीमांसातज्ञ श्री केवलानंद सरस्वती यांनी श्रीरघुनाथशास्त्री कोकजे, मम. श्रीधरशास्त्री पाठक आदि अनेक मान्यवरांच्या आधारे स्थापन केलेल्या धर्मनिर्णयमंडळाचाही सक्रिय पुरस्कर्ता...*


जरी ते धर्मसुधारक असले तरी आजच्या कथित धर्मसुधारकांसारखे धर्मविध्वंसक खचितंच नव्हते. त्यांचे एक महत्वाचे मत आह्मीं लेखाच्या अंती दिले आहे तें वाचावें.


*भारतरत्न श्रीकाणेंचे Magnum-Opus*


*History of Dharmashastra - Five Volumes - Seven Parts*


मुळ आंग्ल भाषेतले विचारधन - एकुण पृष्ठसंख्या ६४२७ - प्रथमावृत्ती



साडे-सहा सहस्त्र पृष्ठांचे हे मुळ आंग्ल साहित्य हे पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्राने सहा दशकांपूर्वीच प्रकाशित केलेलं आहे. सुदैवाने ते सर्व खंड आज पीडीएफ स्वरुपात www.archive.org ह्या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत. ह्याचा हिंदी अनुवाद उत्तर प्रदेश हिंदी संस्थानाने पाच खंडात प्रकाशित केला असून तो आमच्या संग्रही आहे. मराठीतही यशवंत आबाजी भटांनी तो अनुवादित केला असून अगदी संक्षेपांत दोन खंडांमध्ये राज्य सरकारने प्रकाशित केला आहे. तो अनुवाद खरंतर पूर्ण प्रकाशित होणार होता पण संक्षेपातंच झाला. तोही संग्रही आहे. पीडीएफ आहेतंच. जिज्ञासूंनी ते अवश्य संग्राह्य करावेत. 


हिंदुधर्मशास्त्राचा एवढा सखोल अभ्यास करून त्याची सविस्तर मांडणी करणारा पुरुष हा विरळाच ! काणेंचे हे कर्तृत्व अलौकिकंच म्हणून की काय भारत सरकारने त्यांना "महामहोपाध्याय व भारतरत्न" ह्या सर्वोच्च सन्मानाने संबोधित केलं होतं. 


अर्थात ह्या पंचखंडात्मक ग्रंथामध्ये काणेंनी केलेला धर्मग्रंथांचा कालनिर्णय मात्र त्यांनीच प्रामाणिकपणे तो अंतिम प्रमाण मानु नये असे लिहिल्याने तो स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे. 


*या खंडांविषयी काही विवेचन*


खरंतर हा स्वतंत्र लेखनाचा विषय असला तरी काही गोष्टींचा निर्देश अगदी संक्षेपाने करणं क्रमप्राप्त आहे.

 

*काणेंनी आपला परिचय पांचव्या खंडाच्या द्वितीय भागामध्ये दिलेला आहे, तो वाचण्यासारखा आहे. ह्याच पांचव्या खंडामध्ये बौद्धधम्माच्या किंवा पंथाच्या भारतातून नाहीसे होण्यामागच्या कारणांची जी मीमांसा त्यांनी केली आहे, ती फारंच चिंतनीय आहे. कारण ब्रिटीश नि वामपंथी म्हणजे डाव्या इतिहासकारांनी बौद्धविरुद्ध हिंदु संघर्ष पेटविण्यासाठी इतिहासाचे जे विकृत चित्र उभे केले आहे, त्याची साधार समीक्षा श्रीकाणेंनी केलेली आहे, जी वाचायलाच हवी. अधिक संदर्भ अर्थात हेमचंद्र रायचौधरींच्या पॉलिटिकल हिस्टरी ऑफ इंडिया मध्ये विस्ताराने आहेत, तिथे वाचावेत. तृतीय खंडात त्यांनी केलेल्या हिंदुंच्या प्राचीन आहारपद्धतीविषयीचे विवेचन काहीसं अमान्य आहे म्हणूनंच त्यांच्या मधुपर्काविषयीच्या लेखनाची समीक्षा आह्मीं आमच्या मधुपर्कावरील लेखांत स्वतंत्रपणे केली आहे, त्यांच्याविषयी पूर्ण आदर ठेऊनंच. पांचव्या खंडातंच त्यांनी हिंदुस्थानांतील धर्मस्थळांची जी माहिती दिली आहे, त्यांत आमच्या पंढरीविषयीचे विवेचन फार उत्तम आहे. विठ्ठलमूर्तीवरील आक्षेपांचे खंडनही चिंतनीय आहे. इतर खंडांमध्ये त्यांनी पुराणांचा केलेला समन्वयही अभ्यसनीय आहे.

 

विस्ताराने ह्या सर्व खंडांवरील परिचयात्मक लेखमाला वेळ मिळाल्यांस आह्मीं भविष्यांत कधीतरी लिहुच.


ह्याबरोबरंच काणेंनी इतरही विपुल ग्रंथसंपदा निर्माण केलीच केली, जिची विकीपीडियावर माहिती आहेच. विशेषतः संस्कृत काव्यशास्त्रांवरचा त्यांचा ग्रंथ फार चिंतनीय आहे. पाश्चात्यांनी घेतलेल्या आक्षेपांचे सप्रमाण खंडन काणेंच्या तर्कशुद्ध नि प्रत्युत्पन्न मतीचं प्रदर्शक आहे.


*जाता जाता...*


हिस्टरी ओफ धर्मशास्त्राच्या प्रस्तावनेत काणेंनी अतिशय सूचक व मार्मिक वक्तव्य केले आहे, जे चिंतनीय आहे. ते म्हणतात. 👇


आदरणीय काणेंची प्रस्तावना - मुळ आंग्ल खंड द्वितीय - दिनांक १५ मे, १९४१


*"धर्मशास्त्राच्या विशिष्ट विषयांचे प्रतिपादन करणारी उत्कृष्ट पुस्तके प्रख्यात विद्वानांनी जगाला सादर केली आहेत. तथापि, माझ्या माहितीप्रमाणे कोणत्याही एका लेखकाने समग्र धर्मशास्त्राची चिकीत्सा करण्याचा आत्तापर्यंत प्रयत्न केलेला नाही. त्या दृष्टीने हा ग्रंथ त्या विषयांवरील अग्रेसर ग्रंथाच्या स्वरुपाचा आहे. अनेक युरोपियन आणि भारतीय ग्रंथकारांची अशी रूढी पडून गेली आहे की भारताला सांप्रतकाळी पीडा देणाऱ्या बहुतेक अनिष्ट गोष्टी जातीव्यवस्था आणि धर्मशास्त्रात वर्णन केलेला जीवनक्रम ह्याच्यामुळे उत्पन्न झाल्या असल्याचे प्रदिपादन करावयाचे. बऱ्याच प्रमाणात मला हे मत मान्य नाही. मी असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे की मनुष्याचा स्वभाव महत्त्वाच्या बाबतीत सर्व जगभर एकसारखाच असल्याकारणाने भारतात उत्पन्न झालेल्या प्रकारच्याच अनिष्ट प्रवृती आणि अनिष्ट गोष्टी सर्वही देशात उत्पन्न होत असतात आणि त्या देशात जातिव्यवस्था अस्तित्वात असली अथवा नसली तरीही तेथील मूळच्या उपयुक्त संस्थांची कालांतराने भारतातल्याप्रमाणेच अनिष्ट अशी रुपांतरे होतात. जातिनिर्बंधामुळे काही विशिष्ट अनिष्ट परिणाम झाले आहेत ही गोष्ट मला मान्य केली पाहिजे; परंतु जातिव्यवस्था ही एकंच बाब अशा स्वरूपाची नाही. कोणतीही समाजव्यवस्था पूर्णत्वाला पोचलेली नसते आणि अशा अनिष्ट परिणामापासून सुरक्षितही नसते. मी स्वत: जरी ब्राह्मणप्रमुख अशा समाजात वाढलो असलो तरी विद्वान लोक एवढे मान्य करतील की मी सर्व प्रश्नांच्या साधक आणि बाधक अशा दोन्हीही बाजु मांडल्या असून नि:पक्षपातीपणाने प्रतिपादन करण्याचा प्रयत्न केला आहे."*


काणेंचे हे शब्द अत्यंत सूचक आहेत.


ते राज्यभेचे सदस्यही होते.


अशा विद्वत्तेच्या महासागरांस आज जयंतीनिमित्त साष्टाङ्ग प्रणाम...!


Pakhandkhandinee.blogspot.com


#भारतरत्न_महामहोपाध्याय_श्रीपांडुरंग_वामन_काणे_धर्मशास्त्राचा_इतिहास_अस्पृश्यता_केशवपन_विधवाविवाह