Sunday, 7 March 2021

माघ वद्य नवमी अर्थात दास नवमी





 *असो ऐसें सकळहीं गेले | परंतु येकचिं राहिलें | जे स्वरुपाकार जालें | आत्मज्ञानी ||*

श्रीमद्दासबोध


ज्यांना आत्मज्ञान झालं तेच कीर्तीने जीवित राहतात, अन्येषां कृते जीवितं मूतकमेव मन्ये। असे म्हटल्यांस अत्युक्ती नाही.


*पैशाच पंथी इस्लामी पाशवी अत्याचाराच्या आक्रमणाने गांजलेल्या नि पंधराव्या शतकांत पाच पातशहांच्या परदास्यतेत बद्ध झालेल्या महाराष्ट्रांस तारलं ते संतांनींच. महाराष्ट्राक्षितिजांवर संतसम्राट कैवल्यचक्रवर्ती श्रीज्ञानोबांच्या रुपाने स्वधर्मसूर्याचा जो उदय झाला, भक्तशिरोमणी श्रीनामदेवांनी ज्या भागवतधर्माची पताका अगदी पंजाबांपर्यंत नेली, श्रीगोरोबाकाका, श्रीसेनामहाराज, श्रीचोखोबादि संतांनी ज्या भक्तिरसाचा डांगोरा कळिकाळाच्याही माथा सोटा हाणत पिटला, त्याच भागवतधर्मांस अर्थात वैदिक धर्माच्या अत्यंत विशुद्ध अशा स्वरुपांस इतिहासाचार्य वि का राजवाड्यांनी म्हटल्याप्रमाणे सहिष्णुपासून जयिष्णु बनविण्याचे कार्य महाराष्ट्रधर्म नावाच्या संजीवनीने प्राप्त झालं. संतचरित्रकार श्री पांगारकरांनी म्हटल्याप्रमाणे त्या महाराष्ट्रधर्माचा पाया ज्या श्रीनाथांच्या रुपाने रचला गेला, जगद्गुरु संतश्रेष्ठ श्रीतुकोबारायांच्या रुपाने ज्या महाराष्ट्रधर्माची ईमारत फळांस आली त्याच महाराष्ट्रधर्मांस राष्ट्रगुरु श्रीसमर्थांच्या तेजस्वी नि विजीगीषु वृत्ती निर्माण करणाऱ्या वाणीने, लेखणीने, कृतीने, आचाराने, व्यवहाराने सहिष्णु पासून जयिष्णु बनवलं नि त्यावर कळस चढविला, ज्यांस पुण्यश्लोक श्रीशिवप्रभुंच्या अरिशोणितप्राशी खड्गाच्या तीक्ष्ण धारेने हिंदवी स्वराज्याचा मुकुटमणीच धारण केला, त्या श्रीसमर्थांच्या समाधीचा आजचा दिवस...*


*मुख्य तें हरिकथा निरुपण।दुसरें तें राजकारण।तिसरें तें सावधपण। सर्वांविषयी।*


असे म्हणत मुख्य त्या हरिकथेला कुठेही न त्यागता राष्ट्रहिताचे राजकारण करणारा नि सर्वांविषयी सावधपणा बाळगायला सांगणारा हा राष्ट्रसंत


*भेटो कोणी एक नर। महार धेंड चांभार।त्याचे राखावे अंतर। या नाव भजन।*


सर्व हिंदुंसमाजाचं अंतर्बाह्य संघटन करणारा


*पतित करावे पावन।शहाणे करावे जन।सृष्टीमध्ये भगवद्भजन। वाढवीत जावे।*


पतितांना पावन करणारा नि सर्वांना शहाणं करणारा कृतिशील समाजोद्धारक


ईश्वरांस काय मागावं हे सांगताना


*कोमलवाणी दे रामा।विमल करणी दे रामा।सज्जनसंगती दे रामा।अभेदभक्ती दे रामा। बहुजन मैत्री दे रामा।*


प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांनी अगदी सार्थ म्हटल्याप्रमाणे 


*"म्हणजे सज्जनसंगती, अभेदभक्ती, बहुजनमैत्री ह्या तीन शब्दांसाठी भावनिक एकात्मकतेचे नोबेल पारितोषिक ह्या माणसाला द्यायला खरंतर काही हरकत नाही !"*


*विद्यावैभव अर्थारोहण दे रामा।जनसुखकारक, प्रसंगओळख, आंतरपारख दे रामा।*


असा ज्ञानी भक्त आणि इतका सर्व विश्वप्रपंच करत असतानाही


*विवेक आणि वैराग्य हेचि जाणावे महद्भाग्य।*


विवेक नि वैराग्याशी सतत संधान साधणारा हा वैराग्यसंपन्न महात्मा...



हिंदुधर्मरक्षक पुण्यश्लोक श्रीशिवप्रभुंच्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी, रक्षणासाठी नि संवर्धनासाठी त्या जगन्मातेकडे


*दुष्ट संहारिले मागे। ऐसे उदंड ऐकतो। परंतु रोकडे काही। मुळ सामर्थ्य दाखवी।*


*तुझा तो वाढवीं राजा। सीघ्र आह्मांसि देखिजा।*


अशी काकुळतेने प्रार्थना करणारा हा जगन्मातेचा भक्त...


पुण्यश्लोक श्रीशिवप्रभुंच्या स्वराज्यनिर्मितीपश्चात त्यांस आपल्या स्वप्नीं पाहिलेल्या रामराज्याची आनंदवनभूवनाची संज्ञा देत कृतकृत्यतेचा अनुभव करणारा कर्तृत्वसंपन्न पुरुषश्रेष्ठ...


*म्हणौनि आम्ही रामदास। रामचरणी आमुचा विश्वास।कोसळोनि पडो हे आकाश। परि आणिकांचि वास न पाहो।*


असे म्हणत ह्या नश्वर देहाचा त्याग करणारा हा आत्मज्ञानी ऋषि...


आज त्यांच्या चरणी कृतानेक साष्टाङ्ग दंडवत...!


आज नरवीर नरश्रेष्ठ श्री तानाजी मालुसरे ह्यांचेही पुण्यस्मरण...सावरकरांच्या शब्दांमध्ये


*धन्य शिवाजी तो रणगाजी, धन्य चि तानाजीं। प्रेमें आजि सिंहगडाचा, पोवाडा गाजी।*


माघ वद्य नवमी अर्थात दास नवमी...


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#दासनवमी_श्रीसमर्थ_रामदास_राष्ट्रगुरु_राष्ट्रसंत_श्रीशिवप्रभु_हिंदवीस्वराज्य_महाराष्ट्रधर्म

Saturday, 20 February 2021

#भीष्माष्टमी_माघशुद्धअष्टमी



आज श्रीभीष्माचार्यांचे पुण्यस्मरण ! माघ शुद्ध अष्टमींस इसवी सन पूर्व ३१३८ ह्या दिवशी परमवंदनीय श्रीभीष्माचार्यांनी देहत्याग केला.

व्यक्तिश: आमच्या दृष्टीने भगवान श्रीकृष्णापश्चांत महाभारतातले श्रीभीष्माचार्य हे सर्वोत्तम प्रिय नि आदर्श व्यक्तिमत्व ! आजीवन अखंड ब्रह्मचर्य पालन केलेला हा सिंहह्रदयी पुरुष !

पित्याच्या वचनांसाठी चतुर्दश वर्षे राज्यत्याग करणारे नि विजवनास स्वीकारणारे भगवान श्रीरामचंद्र आम्हांस आदर्श आहेतच. पण त्यांच्याही पुढे जाऊन पित्याच्या सुखासाठी केवळ राज्यत्यागच नव्हे नि तोही कायमचाच पण त्याबरोबरच वैवाहिक सुखाचाही त्याग करून आजीवन अखंड नैष्ठिक ब्रह्मचर्य पालन करून उर्ध्वरेतस होणार्या श्रीभीष्माचार्यांविषयी आम्हांला कधीच आदर का वाटत नाही?


भगवान श्रीकृष्णांनी स्वत: ब्रह्मचर्यं महद्घोरं चीर्त्वा द्वादशवार्षिकम् असे म्हणून स्वपत्नी रुख्मिणीसह विवाहापश्चात द्वादश वर्षे नैष्ठिक ब्रह्मचर्य पालन केलं. पण श्रीभीष्माचार्यांनी तर आजीवन अखंड उर्ध्वरेतस असे जीवन व्यतीत केलं. म्हणूनच प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनीच त्यांची स्तुती करताना त्यांस उर्ध्वरेतस् असंच अनेकवेळा म्हटलंयय. आणि युद्धापश्चांत युधिष्ठिरांस त्यांच्याकडून राजधर्माची शिक्षा प्राप्त करण्यांची आज्ञा दिलीय. 


श्रीभीष्माचार्यांचे षड्वेदाङ्गासहित वेदाध्ययन


श्रीभीष्माचार्यांस देवव्रत, गङ्गादत्त आणि गाङ्गेय अशी तीन नावे आदिपर्वांत दिलेली आहेत. त्यांचे वर्णन असे आहे.


वेदानधिजगे साङ्गान् वसिष्ठादेव वीर्यवान् ।

कृतास्त्र: परमेष्वासो देवराजसमो युधि ।


आदिपर्व - १००.३५ 


अर्थ - महर्षि वसिष्ठांकडून षड्वेदाङ्गांसहित वेदांचे अध्ययन केलेला हा बलवान पुत्र अस्त्रविद्येचा ज्ञाता, महान धनुर्धर आणि देवराज इंद्रासमान पराक्रमी आहे.


पुढे असं वर्णन आहे की ते शुक्राचार्यांप्रमाणेच सर्व नीतीशास्त्राचे ज्ञाते, बृहस्पतिसमानच ज्ञाते नि भगवान परशुरामांची अस्त्रविद्या प्रतिष्ठित असलेले, राजधर्म नि अर्थशास्त्राचे जाणकार असे आहेत.


श्रीभीष्माचार्य गंगेकडून शंतनुंस प्रथम भेटींस आले तेंव्हा त्यांचे वय ३६ होते असे महाभारत सांगते. पुढे त्यांस यौवराज्याभिषेक झाला व पुढील चार वर्षांतच त्यांच्या पित्याचा सत्यवतीशी विवाह झाला. म्हणजेच प्रतिज्ञाकरतेवेळी त्यांचे वय हे ४० होते. त्याचे प्रमाण स समा: षोडषाष्टौ च चतस्त्रोष्टौ तथापरा: असे आहे. म्हणजे १६+८+४+८=३६ वर्षे. साङ्गोपाङ्ग चतुर्वेदाध्ययनासाठी इतका वेळ लागणं क्रमप्राप्तच आहे.


देवव्रतांची भीष्म प्रतिज्ञा


सत्यवतीच्या पित्यांस दाशराजांस ते म्हणतात 


राज्यं तावत्पूर्वमेव मया त्यक्तं नराधिप |

अपत्यहेतोरपि च करोम्येष विनिश्चयम् ||८७||


राज्याचा त्याग तर मी पूर्वीच केलाय. आता अपत्यहेतुचा तो त्याग मी निश्यचाने करेनच.


अद्यप्रभृति मे दाश ब्रह्मचर्यं भविष्यति |

अपुत्रस्यापि मे लोका भविष्यन्त्यक्षया दिवि ||८८||


हे दाशराज, इथूनपुढे माझे नैष्ठिक ब्रह्मचर्य होईल. आणि निपुत्रिक असूनही स्वर्गाचे द्वारे माझ्यासाठी उघडी राहतील.


नहि जन्मप्रभृत्युक्तं मम किंचिदिहानृतम् ।

यावत् प्राणा ध्रियन्ते वै मम देहं समाश्रिता: ।

परित्यजाम्यहं राज्यं मैथुनां चापि सर्वश: ।

उर्ध्वरेता भविष्यामि दाश सत्यं ब्रवीमि ते ।


जन्मापासून एकही असत्य कथन न केलेला मी प्राण जाईपर्यंत राज्यत्याग करून मैथुनाचाही सर्वस्वी त्याग करेन. हे दाशराज, आता मी उर्ध्वरेतस् बनेन. सत्य तेच बोलतो.


देवव्रत आता भीष्म होतात. आणि त्यांची ही घनघोर प्रतिज्ञा पाहून पिता पिता शंतनु त्यांस 


तद्ष्ट्वा दुष्करं कर्म कृतं भीष्मेण शन्तनुः |

स्वच्छन्दमरणं तस्मै ददौ तुष्टः पिता स्वयम् ||९४||


स्वच्छन्दमरणाचे (स्वेच्छामृत्युचे) वरदान देतात.


काय तो त्याग ! केवळ अद्वितीय ! धन्य ते माता-पिता नि धन्य तो पुत्र !


श्रीभीष्माचार्य विवाहित होते काय ?


काही विद्वानांनी श्रीभीष्माचार्यांच्या चारित्र्यांवर संदेह घेतांना त्यांस विवाहित ब्रह्मचारी ठरवलं आहे.


येंविषयी खंडनात्मक नुकताच एक ग्रंथ वाचण्यांत आलाय. 


WAS BHĪSMĀCĀRYA MARRIED ? BY W R ANTARKAR(1978)


ह्या पुस्तिकेमध्ये लेखकाने उपरोक्त सर्व आक्षेपांचे खंडन केलं असून ग्रंथ अत्यंत चिंतनीय आहे. वस्तुत: महाभारतामध्ये २३ वेळा श्रीभीष्माचार्यांस उर्ध्वरेतस म्हटलेलं आहे. श्रीभीष्मांच्या जन्माच्यावेळीच त्यांना इथून पुढे आजीवन स्त्रीपासून विरहित नि आजीवन अखंड ब्रह्मचारी होईल असे वचन आहे. स्वत: महाभारतावरील टीकाकार श्रीनीळकंठाने श्रीभीष्माचार्यांच्या ब्रह्मचर्याचे वर्णन करताना त्यांस अविप्लुत ब्रह्मचर्यं आणि नित्य ब्रह्मचारी असेच म्हटलंय. अर्थात ह्याच नीळकंठांचा गोंधळ बर्याच ठिकाणी दिसतो. कारण हेच नीळकंठ दुसर्या ठिकाणी श्रीभीष्म विवाहित होते असेही म्हणताना दिसतात. अस्तु !


डॉ. दांडेकरांसारखे तथाकथित विद्वानही श्रीभीष्माचार्यांवर षंढ किंवा नपुंसक असल्याचा घाणेरडा आरोप करतात. किती ती लाजिरवाणी गोष्ट ? हे दुसरे शिशुपालच म्हणावे लागतील, नाही का? 


अग्निपुराणामध्ये श्रीभीष्माचार्यांस अविवाहित अर्थात नैष्ठिक ब्रह्मचारीच म्हटलंय. गर्गसंहितेत (१०।७।५४) तर भीष्माचार्यांचे वर्णन करताना 


भीष्मं विना ही मदनं को विजेतुं भवेन्नर:।


श्रीभीष्माचार्याशिवाय मदनांस जिंकण्यांस कोण सामर्थ्यसंपन्न आहे ?


असं म्हटलंय.


श्रीभीष्म-युधिष्ठिर संवाद


श्रीभीष्माचार्यांचे अलौकिक ज्ञान जाणून घ्यायचे असेल तर त्यांचे शांतिपर्वातील उपरोक्त संवाद अभ्यासायलाच हवा.


दहा दिवस घनघोर युद्ध करून स्वत:च्याच युद्धातून पतनाचे रहस्य पांडवांना सांगून अर्जुनाच्या बाणांच्या मारांनी श्रीभीष्माचार्य शरपंजरी पडले. त्यानंतर युधिष्ठिर आणि भगवान श्रीकृष्णांनी श्रीभीष्मांस येऊन त्यांच्या देहावसानाविषयी माहिती देताना म्हटलंय 


पञ्चाशतं षट्च कुरुप्रवीर शेष दिनानां तव जीवितस्य ।

तत: शुभै: कर्मफलोदयैस्त्वं समेष्यसे भीष्म विमुच्य देहम् ।

शांतिपर्व ५१।१४


अर्थ - हे कुरु श्रेष्ठ, आता आपल्या जीवनांतले ५६ दिवसच शेष असून तदनंतर हे श्रीभीष्म, आपण ह्या देहाचा त्याग करून आपल्या शुभकर्मांनी कल्याणकारी फल प्राप्त कराल.


स्वत: श्रीभीष्माचार्य युधिष्ठिरांस आज्ञा देताना म्हणतात की तु उत्तरायण आरंभ होईल तेंव्हा मला भेटींस ये. पुढे युधिष्ठिर त्यांस सूर्य उत्तरायण करण्यासाठी काहीच दिवस शेष असून तो करताच आपण देह त्याग कराल असे म्हणतो आणि पुन्हा त्यांच्या आज्ञेंस शिरसावंद्य मानून हस्तिनापुरांत पन्नास दिवस निवास करून युधिष्ठिर त्यांच्याकडे जावयांस निघतात. तेंव्हा श्रीभीष्माचार्य म्हणतात


परिवृत्तो हि भगवान्सहस्त्रांशुर्दिवाकर: ।

अष्टपञ्चाशतं रात्र्य: शयानस्याद्य मे गता: ।

माघोsयं समनुप्राप्तो मास: पुण्यो युधिष्ठिर: ।

त्रिभागशेष: पक्षोsयं शुक्लो भवितुमर्हति ।


भगवान सूर्य आता उत्तरेंस परिवृत्त झाला असून या शय्येवर पडून मला आता ५८ दिवस झाले आहेत. आता हा पुण्यप्रद असा माघ मासाचा शुक्ल भाग सुरु झाला असून त्या मासाचे तीन भाग शेष आहेत. हा शुक्ल पक्ष होईल.


त्यांच्या देहावसानाचा समय समीप येताच सर्व पांडव भगवान श्रीकृष्णासहित तिथे उपस्थित होतात. वैशंपायन श्रीभीष्माचार्यांच्या देहावसानाचे वर्णन करताना लिहितात. 


भीष्मस्य कुरुशार्दूल देहोत्सर्गं महात्मन: ।

निवृत्तमात्रे त्वयने उत्तरै वै दिवाकरे ।

समावेशयदात्मानमात्मन्येव समाहित: ।


अर्थ - हे युधिष्ठिर तु आता कुरुश्रेष्ठ श्रीभीष्माचार्यांचा देहोत्सर्ग श्रवण कर. सूर्याचे उत्तरायण सुरु झालेलं असून श्रीभीष्माचार्यांनी स्वत:स परमात्म्यांत समाविष्ट केलं.


शुक्लपक्षस्य चाष्टम्यां माघमासस्य पार्थिव ।

प्राजापत्ये च नक्षत्रे मध्यं प्राप्ते दिवाकरे ।


माघमासाच्या शुक्लपक्षाच्या अष्टमींस प्रजापती अर्थात रोहिणी नक्षत्रांस सूर्य मध्यान्ही आला असता श्रीभीष्मांनी देहोत्सर्ग केला.


म्हणजे आजच्याच दिवशी माध्यान्हसमयी श्रीभीष्म गेले. हा काळ आहे इसवी सन पूर्व ३१३८ माघ शुद्ध अष्टमी. म्हणजेच आजपासून ३१३८+२०१९ = ५१५७ वर्षे पूर्व.


श्रीभीष्माचार्य हे अहिताग्नी होते. अर्थात ते नित्य अग्निहोत्र करणारे होते. अगदी शरशय्येवर असतानाही त्यांच्या समीप अग्निहोत्राचा उल्लेख आहे. ऐतरेय ब्राह्मणामध्ये सप्तम पंचिकेत नवम कंडिकेमध्ये ब्रह्मचार्यांस अग्निहोत्राचा अधिकार दिलेलाच आहे. 


जर महाभारत खोटंच असतं तर इतके खगोलीय किंवा ज्योतिषशास्त्रीय संदर्भ कसे काय आले असते ? बरं हे संदर्भ आजही तसेच चालत आलेले आहेत. ह्याचाच अर्थ ही परंपरा गणितीय असून ती अगदी अचूक आहे.


श्रीभीष्माचार्य देहावसानसमयी २३६ वर्षांचे होते असे पंडित कोटा वेंकटाचलम त्यांच्या *The Age of Mahabharata War ह्या ग्रंथामध्ये म्हणतात. अर्थात युद्धसमयी त्यांचे वय एकतर दोनशेंच्या समीप असावं. श्रीव्यास त्यांच्यापेक्षा वीस वर्षे लहान असून युद्धसमयी भीम नि भगवान श्रीकृष्णादिकांचे वयही नव्वदीच्या समीपच होते.


ह्या कुरुश्रेष्ठांस त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कोटी कोटी वंदन नि अभिवादन !


पाखण्ड खण्डिणी 

Pakhandkhandinee.blogspot.com


#श्रीभीष्माचार्यमाघशुद्धअष्टमीदेहोत्सर्ग_उत्तरायण

Friday, 29 January 2021

*आर्षमतविमर्शिनी नामक श्रीशबरस्वामीं कृत पूर्वमीमांसा भाष्य यावरील सप्तखंडात्मक टीका*





*आर्षमतविमर्शिनी नामक श्रीशबरस्वामीं कृत पूर्वमीमांसा भाष्य यावरील सप्त खंडात्मकटीका* कर्ता - पदवाक्यप्रमाणज्ञ महामहोपाध्याय पंडित श्रीयुधिष्ठिर मीमांसक


गेली दोन वर्षे जिचा शोध घेत होतो, ती ग्रंथमालिका आज प्राप्त झाली ! काही गोष्ट ईश्वरकृपेनेच लाभतात ! दोन वर्षांपूर्वी आम्ही उपरोक्त वैदिक विद्वान पदवाक्यप्रमाणज्ञ महामहोपाध्याय पंडित श्रीयुधिष्ठिरजी मीमांसक जयंतीविशेष निमित्त एक लेख लिहिला होता. आमच्या ब्लॉगवर आणि इथे मुखपुस्तिकेवरही तो आहे. मागील वर्षी २२ सप्टेंबरला पुनर्प्रकाशित आहे. त्यामध्ये आम्ही वंदनीय पंडितजींनी पूर्वमीमांसेवरील जे श्रीशबरमुनीकृत आर्षभाष्य आहे, त्यावरील त्यांनीच रचलेल्या सप्तखंडात्मक आर्षमतविमर्शिनी नामक टीकेचा उल्लेख केला होता. षटदर्शनांचे प्रामाणिक अध्ययन करायचे असेल तर त्यावरील प्राचीन अशी आर्षभाष्ये अभ्यासायला हवीत, हा महर्षी श्रीमद्दयानंद यांनी मांडलेला सिद्धांत आम्हांस पटणारा असल्यामुळे आप्तवाक्य प्रमाण मानून पूर्वमीमांसेच्या दृष्टीने श्रीशबरस्वामींचे भाष्य हे महर्षींनी आर्ष मानले आहे. अर्थात त्यातही जो भाग वेदानुकूल तोच ग्राह्य ! आप्तांचे वाक्य हे वेदानुकूल असेल तरंच ग्राह्य ! सुदैवाने श्रीशबरमुनींचे हे भाष्य पूर्ण संस्कृतमध्ये आम्हांस द्विखंडात्मक प्राप्तही झाले होते. पण हा विषय आमच्या एकूणच बुद्धीच्या बाहेरचा असल्याने ते केवळ संग्राह्य करून ठेवले होते. ज्यांनी पूर्वमीमांसेचे काहीसे अध्ययन केलं असेल किंवा ज्यांना पूर्वमीमांसेचा काहीसा परिचय जरी असेल, तरी त्यांना हे ज्ञात असेल की महर्षी श्रीजैमिनींच्या पूर्वमीमांसेवर मूळ श्रीशबरमुनींचे भाष्य असून त्यावर पुढे वेदोध्दारक श्रीकुमारिल भट्टपादांनी आणखी विस्तृत भाष्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते भाष्यही ते पूर्ण करू शकले नाहीत. पुढे पूर्वमीमांसेत इतर संप्रदायांची मतेही निर्माण झाली काळाच्या ओघाने ! आणि त्यामुळे मूळ महर्षी श्रीजैमिनी प्रणित ह्या वैदिक दर्शनाचे संबंधी काही भ्रमही निर्माण झाले ! त्यावर विस्ताराने संवाद करण्याचे हे स्थळ नसल्याने केवळ इतकेच सांगून हा विषय मांडतो की उपरोक्त लेखक श्रीपंडितजींना ह्यासंबंधी विस्तृत विवेचन करण्याचे अंतःकरणामध्ये सतत वाटू लागले ! अर्थात हा सर्व विषय प्रत्यक्ष गुरुमुखातून अध्ययन करण्याचा अर्थात संप्रदायपूर्वक वेदाध्ययन ज्याला आम्ही म्हणतो, तसा प्रत्यक्ष अधिकारी गुरुमुखातून श्रवण करण्याचा असल्याने श्रीपंडितजींनी सनातनी परंपरेतले तत्कालीन पूर्वमीमांसेचे सूर्य गणले जाणारे असे काशीस्थ श्री चिन्नास्वामी शास्त्री ह्यांच्याकडून पूर्वमीमांसेचे विधिवत अध्ययन केले ! प्रथम खंडामध्ये पंडितजींनी येविषयीं विस्ताराने लिहिले आहे. अर्थात आम्ही मागे पंडितजींचा ह्यावरील एक लेख वाचला होता, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या आपल्या ह्या वंदनीय गुरूंच्या देहावसानासंबंधीच्या श्रद्धांजलीपर लेखामध्ये आपल्या गुरूंचा गौरवपूर्वक उल्लेख केला आहे. अधिक माहितीसाठी वेदवाणी नामक काशीहून प्रकाशित होणारे एक अत्यंत अभ्यासपूर्ण असे मासिक ज्यामध्ये हा लेख आपणांस वाचण्यांस प्राप्त होईल. वेदवाणी - काशी भाद्रपद संवत २०१३, सप्टेंबर १९५६ वर्ष ८, अंक ११
https://archive.org/details/finalbook5/page/n1296/mode/1up ह्यामध्ये पृष्ठक्रमांक २३ पासून पंडितजींचा आपले गुरु श्रीचिन्नास्वामी यांच्याविषयी सविस्तर लेख आहे. जिज्ञासूंनी तो वाचावा ही विनंती ! *काशीमध्ये राहूनच त्यांनी सनातनी विद्वानांकडून मीमांसाशास्त्राचे केलेलं अध्ययन* पूर्वमीमांसेतला तत्कालीन सूर्य अशी ज्यांची ख्याती होती असे महामहोपाध्याय पंडित अ. चिन्नास्वामी शास्त्री तथा पंडित पट्टाभिराम शास्त्री नामक सनातनी परंपरेतल्या व आर्य समाजाशी काही विधेयांत तात्विक विरोध असलेल्या विचारधारेतल्या मीमांंसकांकडून ह्या शास्त्राचे गहन अध्ययन केल्यामुळे त्यांचा ह्या शास्त्राविषयीचा अधिकार होता. आश्चर्य म्हणजे याच पंडित अ. चिन्ना स्वामींनी काशीच्या बनारस हिंदू विश्वविद्यापीठामध्ये स्त्रियांना वेदांच्या शिक्षणाचा अधिकार सनातनी असूनही प्रदान केला होता. काशीमध्ये त्यांच्या ह्या निर्णयाने त्यावेळी गोंधळही उडाला होता. असो तो स्वतंत्र विषय ! तर आता पदवाक्यप्रमाणज्ञ म्हणजे काय ??? पद म्हणजे व्याकरणाचे पद वाक्य म्हणजे पूर्वमीमांसेचे वाक्य प्रमाण म्हणजे न्यायशास्त्राचे प्रमाण व्याकरणन्यायमीमांसादिषु शास्त्रेषु परिणतः इति हेतोः "पदवाक्यप्रमाणज्ञ" इति! संक्षेपात सांगायचे तर ज्या मनुष्याने संप्रदायपूर्वक अर्थात अधिकारी गुरुमुखातून कैक वर्षे ह्या तीन विषयांवर अध्ययन केलेले असून ज्याला त्या विषयांमध्ये विशेष गती आहे, अशी व्यक्ती पदवाक्यप्रमाणज्ञ गणली जाते ! अशा उपाधीने गौरविली गेलेली अत्यंत थोडीच मंडळी सांप्रत समयी तर आहेतच, पण त्यावेळीही ती अत्यल्पच होती संख्येने ! असो ! तर पंडितजींचे ह्या शबरभाष्यावरील हे सप्तखंडात्मक हिंदी भाष्य प्राप्त होणे हे आम्हांस अत्यंत आनंददायक तर आहेच पण त्या ईश्वराचे अनंत उपकार आणि हे स्कॅन करणाऱ्या आमच्या आर्यसमाजी बांधवांचे महदुपकार अशा कृतज्ञ बुद्धीने आम्हांस उपकृत करणारे आहे ! याचा तृतीय खंड मात्र स्कॅन नाहीये. तो झाला की त्याचाही धागा जोडेनच ! मीमांसा दर्शन पर शबर स्वामी कृत भाष्य: खण्ड-१,२,४,५,६,७ कुल आकार- ३८५ MB
https://drive.google.com/folderview?id=1RchHldmKyM4mOktosD-EYOd0S6CeGLHt एका मर्यादेची जाणीव आम्हांस ह्याची जाणीव आहे की ही सर्व शास्त्रे ही प्रत्यक्ष गुरुमुखातून अर्थात संप्रदायपूर्वक श्रवण करून समजून घ्यायची आहेत. आणि ह्यासाठी लागणारा कालावधी आणि श्रमही हे केवळ सद्भाग्याने प्राप्त होणारे आहे. ते भाग्य आम्हांस कधी प्राप्त होईल तो ईश्वरंच जाणे ! पण निदान काही संकल्पना स्पष्ट होण्यासाठी ह्या ग्रंथांची आवश्यकता निश्चित आहे! इथे जाता जाता एक सांगावेसे वाटते ! पुण्यश्लोक छत्रपती श्रीशिवाजी महाराज, श्रीगागाभट्ट आणि पूर्वमीमांसा सांगण्यांस काहीसा आनंद आणि समाधनही वाटते की ह्या पूर्वमीमांसेशी उपरोक्त शब्दांचा घनिष्ट संबंध आहे. कारण छत्रपती घराणे हे मुळात वेदनिष्ठ तर होतेच आणि म्हणून संस्कृत भाषेविषयी छत्रपती घराण्याची निष्ठा हा स्वतंत्र चिंतनाचा विषय असला तरी इथे केवळ इतकेच सांगणे आहे की स्वतः श्रीकुमारिलभट्टपादांचे हे अपूर्ण राहिलेले कार्य करायची मनीषा श्रीगागाभट्टांच्या मनीही होती. इतकेच काय प्रत्यक्ष श्रीशिवप्रभुंनाही ही लालसा होती असे स्पष्ट प्रमाण उपलब्ध आहे. येविषयी विस्तृत विवेचन पुढील लेखामध्ये करूच ! तोपर्यंत अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु। भवदीय, पाखण्ड खण्डिणी #पूर्वमीमांसा_श्रीशबरमुनी_श्रीकुमारिल_भट्टपाद_पंडित_श्रीयुधिष्ठिर_मीमांसक_श्रीगागाभट्ट_छत्रपती_श्रीशिवाजीमहाराज

Sunday, 11 October 2020

*अ॒हमिंद्रो॒ न परा॑जिग्य॒ इद्धनं॒ न मृ॒त्यवेऽव॑तस्थे॒ कदा॑च॒न ।* ऋग्वेद - १०।४८।५


तेरा दिवसांपूर्वी हिंदुराष्ट्रपती श्रीसावरकरांचे चरित्रकार, ज्येष्ठ अभ्यासक, व्याख्याते, भागवताचार्य, हिंदुत्वनिष्ठ अर्थात राष्ट्रनिष्ठ विचारवंत असे श्री वासुदेव नारायण उत्पात उपाख्य वाना हे काळाचे बोट धरून अमरपंथी निर्गमन कर्ते झाले ! एका धगधगत्या यज्ञज्वालेची समिधा मृत्यू नामक वेदीवर अर्पिली गेली. पांडित्याचा महासागर जणु शुष्क झाला. ज्वलज्जहाल नि तितक्याच रसात्मक वाणीचा सूर हरपला आणि मृत्यूच्या स्कंधावर हा पुरुषोत्तम आरूढ झाला.
त्या जगन्नियंत्याने निर्माण केलेल्या ह्या जगन्नामक नाट्यरचनेचा कार्यभाग त्यागून तो त्या परमेश्वराच्या आदेशाने नेपथ्यांस जाता झाला. आपल्या इहलोकाच्या यात्रेचे संवरण करून कीर्तिशेष होऊन गेला..आपल्या दिव्य आभेंस विकीर्ण करीत त्या पुढे अस्तमानांस जाणाऱ्या प्रभाकरासमानच महाप्रस्थानासाठी अस्तांस निघता झाला...!
१९६६, २६ फेब्रुवारीस ज्याप्रमाणे मृत्युंजय वैनतेयाच्या प्रायोपवेशनाने सावरकर सदन ओस पडले, तद्वतच भूवैकुंठीचे ते नैऋत्येस असलेले 'राधानारायण सदन' हे आता जणू ओसंच पडले आहे. बुद्धिभेद नि तज्जन्य बुद्धीमांद्याच्या तमास दूर करणारा तो ज्ञानसूर्य आता अस्तास गेला आहे.
ज्याने आपली निष्ठा हिंदुराष्ट्र, पूर्णपुरुषोत्तम योगेश्वर भगवान श्रीकृष्ण, त्यांची पत्नी जगज्जननी श्रीरुक्मिणी माता आणि हिंदुह्रदयसम्राट सावरकर ह्या चार दैवतांसच वाहिली होती, त्या आमच्या गुरूश्रेष्ठ व्यक्तिमत्वाचे असणे हे आज नसण्यांत शब्दांकित व्हावे, ह्यापेक्षा यातनामय ते काय ???
सावरकर हा पंचाक्षरी मंत्र आमच्या अगदी बालपणी इयत्ता सातवींत ज्या मुखाग्रातून प्रथम आमच्या कर्णी लागला, त्या गुरुमंत्राची जी उपास्य देवता जिचे त्यांनी आजीवन अखंड अनुष्ठान केले, त्याच तेजोनिधीच्या वादळी जीवनाची सांगता ज्या कृतज्ञतेच्या नि कृतार्थतेच्या मार्गाने झाली, त्याच, अगदी त्याच भावनेने ह्या पुरुषश्रेष्ठाने आपली जीवनयात्रा संपविली असेल.
धन्योऽहम्! धन्योऽहम्! कर्तव्यं मे न विद्यते किंचित्।
धन्योऽहम्! धन्योऽहम्! प्राप्तव्यं। सर्वमद्य संपन्नम्।
ते जणु आप्तकाम झाले, पूर्णकाम झाले...!
पण ते असे रिक्तकाम नको व्हायला हवे होते..कारण ते हवे होते!
ते असायला हवेच होते...एक शिष्य म्हणून माझ्यासाठी तरी त्यांचे गुरु म्हणून अस्तित्व हवेच होते...!
कारण...ज्येष्ठ साहित्यिक भाषाप्रभु श्रीपुभांच्या शब्दांतच सांगायचे तर
*"त्यांचे ते असणेही अत्यंत उपकारक होते, फार प्रेरक होते...!कारण त्यांचे ते असणे नव्हतेच, सूर्याचे असणे हे नुसते 'असणे' असत नाही. सागराचे असणे हे नुसते 'असणे' असत नाही, अग्नीचे असणे हे नुसते 'असणे' असत नाही...!"*
आम्हीं पुभा ऐकले ते अप्पांच्या मुखातूनच. तेही पुभांची जन्मशताब्दी सावरकर क्रांतिमंदिरामध्ये त्यांनीच तीन दिवसीय व्याख्यानमालेत साजरी केली म्हणून.
वयाच्या ८१ मध्येही हा ज्ञानोपासक प्रत्यही १० पृष्ठे शब्दांकित करत होता. त्यांची लेखणी त्यांच्या उपास्यदेवतेप्रमाणे हिंदुत्वाची, हिंदुराष्ट्रीयत्वाची, हिंदुसंघटनाची, पाखण्ड खण्डणाची ज्योत अखंड तेवत ठेवत होती...दुष्टांवर प्रहार व सुष्टांवर स्तवनांजली अर्पण करत होती...!
प्रहार...
स्वधर्माचा, स्वराष्ट्राचा, राष्ट्रपुरुषांचा नि तज्जन्य गौरवशाली इतिहासाचा जाज्वल्य नि सगर्व अभिमान त्यांच्या चित्तांस चेतवीत होता. म्हणूनंच ह्या हिंदुधर्माचे, हिंदुत्वाचे नसलेले रिडल्स(कोडे) पाहणाऱ्यावर त्यांनी अवघ्या हिंदुस्थानात एकट्यानेच प्रतिघात केला होता...हे एकमेव कार्य ह्या विद्वत्श्रेष्ठाच्या संपूर्ण चरित्रांस ललामभूत ठरावं असं आहे...!
मऊं मेणाहुनिं आह्मीं विष्णुदास...
ह्या श्रीतुकोक्तींस त्यांचे जीवन अगदी सार्थ करणारे होते...
हिरण्यमयेन् पात्रेण सत्यस्याऽपिहितं मुखम्।
तत्त्वं पूषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्टये।
या श्रुतीच्या आदेशान्वये त्या आणीबाणीच्या कारावासापश्चात् पुढे जीवनभर त्यांनी ह्या राष्ट्रधर्माचे यथोचित् पालन आपल्या लेखणीतून केलं. ह्या लेखणीबरोबरंच त्वत्स्थंडिली त्यांची वाणीही त्यांनी सहर्ष अर्पिली. त्यांची वीरश्री, त्यांचा आवेग, त्यांची विजीगीषु वृत्ती, त्यांचे पौरुषत्व सर्वकाही हिंदुत्वाच्या, हिंदुराष्ट्राच्या, देव-देश-धर्माच्या रक्षणासाठीच होते. हिंदुंच्या स्वत्वस्वाभिमानाची मानखंडना करणाऱ्या, त्यांच्या बुद्धीवर पराभूततेचा नि आत्मविस्मृतीचा कलंक लावणाऱ्या त्या राष्ट्रद्रोही दुष्प्रचारांवर त्यांनी आपल्या प्रत्युत्पन्न मतीने केलेला तो प्रहार अचंबित करणारा होता...
कलंक मतीचा झडो...
न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम् असे म्हणणाऱ्या योगेश्वराच्या श्रीमद्भगवद्गीतेचे ते निःस्सीम भक्त होते. हिंदुधर्मांवर, इतिहासांवर घेतल्या जाणाऱ्या आक्षेपरुपी कलंकाच्या ग्रहणाचे सावट दूर करून आत्माभिमान जागृत करणारी त्यांची लेखणी होती...!
इतका सर्व विद्याव्यासंग करूनही हा मनुष्य एकीकडे लोकहिताचे राजकारण तर दुसरीकडे कलेचाही तितकाच भोक्ता होता. उत्पातांची लावणीची परंपराही समर्थपणे चालवीत होता. पण त्यांच्या ह्या रसिकतेमध्ये महाकवी कालिदासाचा आल्हाददायक शृंगार होता, बीभत्सता मात्र नव्हती...अश्लीलतेचा तर स्पर्शही नव्हती...!
सूर्यप्रभव वंशाची सत्कीर्तिगीते गाणाऱ्या त्या कविकुलगुरु महाकवि श्रीकालिदासाच्या मेघदुतांवरील त्यांची प्रवचनमालिका, त्यावरील मल्लिनाथीचे त्यांनी अत्यंत सुबोध नि आकलनीय भाषेमध्ये केलेलं चिंतन आमच्या चिरस्मरणांत राहील...!
दुर्बोध विषय अगदी सोप्प्या नि सहजगम्य भाषेत सांगायची त्यांची एक विशेष शैली होती...
मला तर ते नेहमी म्हणायचे कि तु फार जड लिहितोस नि बोलतोस. नको इतकं जड व्यक्त होऊस..आपल्याला किती येतं त्यापेक्षा आपण समोरच्यापर्यंत ते किती सुलभरीतीने पोहोचवितो हे महत्वाचे...
हा माझ्यासाठी मोलाचा उपदेश होता...
धन्यो गृहस्थाश्रमः।
इतकं वादळी जीवन जगूनही उपरोक्त उक्तीप्रमाणे ह्या सद्गृहस्थाने आपला संसार मात्र अगदी धन्य केला. दोन तपांहून अधिक काळ ज्या भागवतश्रेष्ठ शांतिब्रह्म जनार्दनशिष्योत्तम श्रीएकनाथाच्या रुक्मिणीस्वयंवरावर त्यांनी भाष्य केलं, त्याच श्रीनाथांप्रमाणे त्यांनी त्यांचा गृहस्थाश्रमही अगदी उत्तम केला. सर्व संतांमध्ये श्रीनाथांचाच संसार अगदी सर्वोत्तम झाला. अप्पांनीही तेच केलं...
प्रपंच करावा नेटका ह्या राष्ट्रगुरु श्रीसमर्थांच्या वचनांसी त्यांची निष्ठा होती...!
हिंदुत्व नि हिंदुसभा हे सतीचं वाण...
"मला लोक नेहमी विचारतात की तुमचा राजकीय पक्ष कोणता? मी अखिल भारत हिंदुमहासभा हेच छातीठोकपणे सांगतो." इतकं ठणकाऊन सांगणं हे त्यांनाच जमलं. कारण हिंदुसभा नि हिंदुत्व हे सतीचं वाण फार थोड्यांना अंगी बाणवावं वाटतं. किंबहुना ते असिधाराव्रत पेलण्याचे सामर्थ्य फार काहींच्याच अंगी आहे. हे येरागबाळ्याचे कामंच नोव्हें...म्हणून की काय ते मला अधिक प्रिय नि वंदनीय होतेच नि राहतील...!

गर्व से कहों हम ब्राह्मण है।
ब्रिटीशांनी पेरलेल्या जातीद्वेषाला नि विशेषतः ब्राह्मणद्वेषाला, ज्याला पुढे काही कथित महात्म्यांनी भरीस भर घातली, मानवद्रोही डाव्यांनी ज्या ब्राह्मणद्वेषावरंच आपल्या कथित समानतेची बिगुलं नि डफली वाजविल्या, राजकीय पक्षांनीही त्यावर आपली पोळी भाजली, त्या सततच्या गोबेल्स प्रचारामुळे जो ब्राह्मण समाज निष्पाप नि निरपराध असूनही स्वतःला अकारण दोषी मानून आत्मविस्मृतीने नि अपराधी भावनेने ग्रस्त झाला, त्याच ब्राह्मण समाजांस आपल्या आत्माभिमानाचं नि गौरवाचं तेजोमयी ब्रह्मरसपान ज्यांनी आपल्या लेखणीने घडवलं, त्या ब्राह्मणश्रेष्ठाचं ब्रह्मलीन होणं...! आणि हे करताना अन्य कोणत्याही ज्ञातीविषयी एक अवाक्षरही नाही.

तुका ह्मणें सत्य सांगे, येवोत रागें येतील तें।

ही त्यांची पंढरपूरी निर्भीड वृत्ती होती. अरेला कारे म्हणायची. आयुष्यभर सत्याचीच उपासना केला. म्हणूनंच मानियेलें नाहीं बहुमता...!

त्यांच्याच भाषेत ते कुणाच्या बापाला घाबरत नव्हते...!

नाहीतर आज हिंदुत्वाच्या अर्थात राष्ट्रीयत्वाच्या नावाने 'ते आमच्याकडे यावेत' म्हणून त्यांचे वाट्टेल ते लांगुलचालन करून एका ब्राह्मण समाजांस मात्र पूर्णतः आरोपीच्या स्थानी कल्पून आपलं उजवं समाजवादी राजकीय सत्तास्थापनेचे हिंदुत्व रेटण्याची स्पर्धा आहेच...कदाचित ह्या उजव्या समाजवाद्यांच्या मते हिंदुत्वामध्ये ब्राह्मणांना काही स्थान नसावंच...!

पण अप्पा मात्र ह्यांस कधीच बळी पडले नाहीत...!

अप्पा शेवटी पूज्यनीय अप्पांकडे गेले...!

ज्या पूज्यनीय योद्धा संन्यासी स्वामी श्रीवरदानंद भारतींचं त्यांनी शिष्यत्व पत्करलं, त्या पूज्यनीय अप्पांनी आपल्या ह्या शिष्यांसही 'आपणासारिखे करितीं तात्काळ' ह्या उक्तीप्रमाणे असे केलं...अर्थात पूज्यनीय स्वामींचे सर्वच शिष्य अगदी 'आपणांसारिखेंच' आहेत. त्या गुरुश्रेष्ठांसही आपल्या शिष्योत्तमाच्या ह्या चरित्राचं निःसंशय कौतुहलंच नि अभिमानंच असावा...!

असा हा वाना नावाचा तारा हिंदुत्वाची अर्थात राष्ट्रीयत्वाची रेघ मोठी करत, ८१ वर्षे अखंडपणे ती ज्योत तेवत ठेवत, ती आपली उपास्य देवता सावरकर नावाच्या ज्योतीप्रमाणेच आपली प्राणज्योत त्या अनंतात विलीन करता झाला...!

एका तेजाची परंपरा आज खंडित झाली...एक दिवा विझून गेला...!

ह्या नररत्नांस जवळून पाहता आलं, ऐकता आलं, अनुभवता आलं इतकीच ह्या शिष्याच्या नरदेहाची सार्थकता...त्यांनी मला शिष्योत्तम मानलं व वैचारिक वारसदार मानलं इतकंच काय ते त्यांचे माझ्यावरचे न फिटणारं ऋण...!
आयुष्यभर हे दायित्व स्कंधी वाहण्याचं नि त्या गुरुने केलेल्या प्रत्येक सदुपदेशाचे यथोचित अनुकरण नि त्यांस दिलेल्या प्रत्येक शब्दाचं पालन करणं इतकीच आदरांजली मी त्यांस वाहु शकतो...!
काय लिहु????

आज जणु माझ्या लेखणीतले शब्दंच संपलेत, वाणीही हिंपुटी झालीय नि लेखणी अवरुद्धतेने बोथट झालीय...!
आज माझं शब्दभांडार तुमच्या चरणी अक्षरशः रितं केलंय...
अप्पा...

तुमच्या चरणी ह्या तुमच्या शिष्योत्तमाचा हा विनम्र शब्दालंकार...!

*धन्यं यश: सुरभितं विमलं कुलन्ते,*
*धन्य: पिता गुणवती जननी च धन्या ।*
*धन्या च गौरववती खलु जन्म-भूमि:,*
*त्वद्-वर्त्मनोsनुगमने वयमत्र धन्या: ।*

Monday, 6 July 2020

लोकमान्यांचे ओरायन आणि आर्क्टिक होम - एक समीक्षात्मक अध्ययन

आज आषाढ कृष्ण प्रतिपदा अर्थात राष्ट्रसूत्रधार परमादरणीय श्रीलोकमान्यांचे पुण्यस्मरण! त्यानिमित्त मागील वर्षी एका विशेषांकासाठी नाकारला गेलेला हा अप्रकाशित लेख ! 

*यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः।*
*स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥*

गीता - ३।२१

भारतीय असंतोषाचे जनक, राष्ट्रसूत्रधार परमादरणीय श्रीलोकमान्य टिळकांच्या प्रति कृतानेक साष्टांग दंडवत घालून, त्यांच्याविषयी अपार आदर नि कृतज्ञता व्यक्त करून, लहानतोंडी मोठा घास घेण्याचा एक प्रयत्न ह्या लेखातून आम्ही करताहोत. जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा, अपरिमित त्याग, असामान्य बुद्धिमत्ता, तितकीच प्रखर ज्ञानसाधना, विद्वत्ता नि व्यासंग आणि त्याला इंद्रियसंयमाची नि तर्कशुद्धतेची नि प्रगल्भतेची जोड ह्या गुणवैभवांनी संपन्न असलेले व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य. त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून नि व्युत्पन्न मतीतून ज्या ग्रंथसंभाराची नि साहित्याची निर्मिती झाली त्यामध्ये वेदकाळासंदर्भातले आणि प्राचीन आर्यांच्या स्थाननिश्चितीसंबंधातले त्यांचे दोन महत्वपूर्ण ग्रंथ म्हणजे "ओरायन ऑर दि रिसर्चेस इंटू दि अँटिक्विटी ऑफ दि वेदाज" आणि "आर्क्टिक होम इन दि वेदाज" अर्थात मराठीमधून "मृगशिरस् किंवा वेदांच्या प्राचीनत्वाचा शोध" आणि "वैदिक आर्यांचे उत्तरध्रुवांवरील वसतिस्थान किंवा मूलस्थान" (श्री वि रा सहस्त्रबुद्धे यांनी केलेल्या अनुवादानुसार- टिळक बंधु प्रकाशन) उपरोक दोन्ही ग्रंथ मूळ इंग्रजीतून असून आम्ही मूळ आंग्ल ग्रंथ आणि मराठी अनुवाद ह्या दोन्हींचा विनियोग प्रस्तुत लेखासाठी केला आहे.

लोकमान्यांनी ऑक्टोबर १८९३ मध्ये 'ओरायन' हा ग्रंथ सिद्ध केला आणि मार्च १९०३ मध्ये 'आर्क्टिक होम इन दि वेदाज' हा ग्रंथ सिद्ध केला. प्रथम ग्रंथामध्ये त्यांनी वेदांच्या प्राचीनत्वाचा शोध घेतला तर द्वितीय मध्ये आर्यांच्या मूळ वसतिस्थानाचा. प्रथम ग्रंथामध्ये त्यांनी वेदांचा काळ इसवी सन पूर्व ४५०० वर्षे मागे नेण्याचा प्रयत्न केला. ह्यासाठी वेदांतील अर्थात वैदिक साहित्यातील म्हणजे मूळ वेदांच्या संहिता, त्यांचे ब्राह्मण ग्रंथ आणि सूत्र ग्रंथ ह्यांच्या अंतर्गत येणाऱ्या ज्योतिषविषयक घटनांचा त्यांना वाटणारा उल्लेख पाहून वेदांगज्योतिष ह्या ग्रंथाधारे कालनिर्णय त्यांनी केला. त्यांच्याच शब्दांमध्ये सांगायचे तर त्यांनीच विषय प्रवेशांत म्हटल्याप्रमाणे 

*"आमच्या विवेचनाची सारी भिस्त संहिता आणि ब्राह्मणे यांसारख्या प्राचीन ग्रंथांवर आणि त्यातल्या त्यात सर्वांमध्ये प्राचीन ग्रंथ जो 'ऋग्वेद' त्यावर आहे."*

विषय प्रवेश - पृष्ठ ११ - टिळक बंधु प्रकाशन प्रथमावृत्ती - १ ऑगस्ट, १९९९

लोकमान्यांनी ज्योतिर्गणिताच्या आधारे अर्थात खगोलीय घटनांच्या आधारे आणि त्यांचा संबंध वैदिक साहित्यातल्या संदर्भांशी जोडून वेदकाळ ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. *मासानां मार्गशीर्षोsहम्।* ह्या गीतेतल्या वचनावरून त्यांचे लक्ष वेदांकडे ओढले गेले आणि त्यामध्ये त्यांनी वेदांग ज्योतिष ह्या ग्रंथाचा आधार घेऊन चार वर्षांच्या प्रदीर्घ अध्ययनापश्चात हा ग्रंथ सिद्ध केला असे म्हटले आहे.  त्यांनी प्राचीन आर्यांच्या कालमापन पद्धतीच्या दृष्टीने यज्ञ म्हणजेच संवत्सर, वर्षारंभ, वसंत संपात, मकर-संक्रमण, उत्तरायण, दक्षिणायन, कृत्तिका नक्षत्र आणि इतर नक्षत्रांचे स्थान, त्यांचा वैदिक साहित्यातील उल्लेख, तारकापुंज, त्यांचे स्थान, आग्रहायण म्हणजेच मृगशीर्ष नक्षत्र, त्याचे स्थान, ग्रीक साहित्याशी त्याचा संदर्भ, त्याचे ग्रीक साहित्यात ओरायन हे नाव, ऋग्वेदातले ऋभु आणि वृषाकपि हे सूक्त हे सर्व विषय ग्रंथामध्ये विस्ताराने अभ्यासले असून त्यावरून त्यांनी निम्नलिखित कालनिर्णय केला आहे.

ओरायनपूर्व काल - ख्रिस्त पूर्व ६००० ते ४०००

कृत्तिका नक्षत्र काल - ख्रिस्त पूर्व २५०० ते १४००

बुद्धपूर्व काल - ख्रिस्त पूर्व १४०० ते ५००

हा त्यांच्या उपरोक ग्रंथाचा एकूण निष्कर्ष आहे. 

*आता आर्क्टिक होम अर्थात वैदिक आर्यांचे मूल वसतिस्थान अर्थात उत्तरध्रुवांवरील वसाहती ह्या ग्रंथाविषयी पाहुयांत*

पहिल्या ग्रंथापश्चात लोकमान्यांनी आर्यांच्या मूल वसतिस्थानाचा विचार करण्यासाठी हा ग्रंथ रचला. त्यामध्ये लोकमान्यांनी उत्तरध्रुवावरच पाहिल्याने वनस्पती आणि जीवसृष्टीला सुरुवात झाली आहे असे अनेक शास्त्रज्ञांचे मत आहे असे मांडून आर्यांचे मूलस्थान उत्तरध्रुवांवरच आहे ह्या निष्कर्षाप्रत येण्यासाठी ऋग्वेद आणि पारश्यांचा झेंद अवेस्ता ह्या दोन ग्रंथांचा आधार घेतला. त्यांनी पृथ्वीवर मागे आलेले हिमयुग, नवपाषाण युग, धातुयुग, उत्तरध्रुवांवरील परिस्थिती, ऋग्वेदातले दीर्घकालीन रात्र आणि दिवसाचे कथित मंत्रसंदर्भ, देवांची रात्र, वैदिक उषा म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त वेळी दिसणारी अवकाशांतली लालिमा, मास आणि ऋतु, इंद्र-वृत्रासूर आदि वैदिक कथा, प्रातःकालिक देवता, अवेस्तामधला संदर्भ, तुलनात्मक गाथाशास्त्र आदि गोष्टींचा विचार उपरोक्त ग्रंथामध्ये करून त्यांच्या आधीच्या ग्रंथामध्ये त्यांनी मांडलेला काळ इसवी सन पूर्व ४५०० वरून मागे नेऊन त्यांनी इसवी सन पूर्व ८००० इतका ठरविला. 

अगदी सारांश ह्या ग्रंथाचा सांगायचा झाला तर वेदांमध्ये दीर्घकालीन दिवस आणि रात्रींचा आणि उषेचा संबंध लोकमान्यांनी उत्तर ध्रुवाशी लावून आर्यांचे अस्तित्व तिथले असा निष्कर्ष काढला.

उपरोक्त दोन ग्रंथांचे लोकमान्य प्रणीत संक्षेपांत विवेचन हे असे आहे.

*आता ह्या दोन ग्रंथांविषयी नि तज्जन्य सिद्धांताविषयीची आमची समीक्षा पाहुयांत*

श्रीलोकमान्यांविषयी पूर्ण आदर ठेवून आम्हांस खेदाने म्हणावेसे वाटते की उपरोक दोन्ही ग्रंथातील संशोधन हे वैदिक सैद्धांतिक दृष्टया अत्यंत निराधार आहे. लोकमान्यांनी वेदांच्या संहितामध्ये अर्थात मंत्रांमध्ये इतिहास शोधण्याचा आणि त्याचा संबंध इतिहासकालीन घटनांशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे हे तर अगदी स्पष्ट आहे. त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्येही ही गोष्ट वारंवार सांगितली आहे. टिळकांच्या मते वेदांमध्ये आणि वैदिक साहित्यामध्ये प्राचीन आर्यांनी स्वतः पाहिलेल्या, प्रत्यक्ष अनुभवलेल्या घटना ग्रथित करून ठेवल्या आहेत. जसे की उत्तरध्रुवांवरील कथित दीर्घकालीन रात्री आणि दिवस...

आमचा टिळकांशी नेमका मतभेद आहे तो इथेच. 

वेदार्थ लावायचा कसा?

*ब्राह्मणेन निष्कारणो धर्म: षडङ्गो वेदाध्येयो ज्ञेयोश्च।*

पातंजल महाभाष्य

सहा वेदांगांसहित वेदांचे अध्ययन ब्रह्म जाणण्याची इच्छा करणाऱ्याने करावे असा शास्त्र सिद्धांत आहे. 

ही सहा वेदांगे कोणती? तर छंद, कल्प, शिक्षा, निरुक्त, ज्योतिष आणि व्याकरण. 

टिळकांच्या प्रतिपादनाविषयी मान्यता का नाही त्याची कारणमीमांसा करण्यापूर्वी इतिहास म्हणजे काय ह्याची व्याख्या पाहुयांत.

*सर्वप्रथम इतिहास शब्दाचा विचार करुयांत*

इतिहास हा शब्द वैदिक संस्कृतमधील असल्याने त्याच्या व्युत्पत्तीच्या दृष्टीने विचार करणं अत्यावश्यक आहे. आम्ही वर म्हटल्याप्रमाणे वेदांच्या अध्ययनासाठी ज्या षड्वेदाङ्गांचे अध्ययन संप्रदायपूर्वक अर्थात गुरुपरंपरेतुनच करावंच लागतं, त्यामध्ये निरुक्त हे एक वेदाङ्ग आहे. ह्यामध्ये वैदिक शब्दांची निरुक्ती अर्थात निर्वचन अर्थात विवेचन किंवा फोड देताना किंवा अर्थ विस्तार करताना निघण्टु ह्या वैदिक शब्दांच्या कोशावरील भाष्यकार महर्षी श्रीयास्काचार्य म्हणतात 

*निदानभूत: इतिह एवमासीत इति य उच्यते स इतिहास: ।*
२।३।१

म्हणजे प्राचीन काली घडून गेलेल्या गोष्टींचे नाव इतिहास ह्या अर्थाने आहे.

*आता इतिहास शब्दाची व्युत्पत्ती पाहुयांत*

*इ+क्तिन् म्हणजे इ अक्षरांस क्तिन् प्रत्यय लागून इति शब्द तयार होतो. आणि पुढे ह+आस् असा इतिहास पूर्ण शब्द बनतो.*

*धर्मार्थकामोक्षाणामुपदेशसमन्वितम् पूर्ववृत्तं कथायुक्तमितिहासं प्रचक्षते ।*

(स्वामी विद्यानंद सरस्वती - भूमिका भास्कर - पृष्ठ ३०७)

अशी एक इतिहास शब्दाची आणखी एक व्याख्या करता येईल की उपरोक्त चतुर्विध पुरुषार्थ प्राप्तीचे कथायुक्त असलेले पूर्ववृत्त म्हणजे इतिहास होय.

ह्या अर्थाने इतिहास हा शब्द पाहता येईल. अस्तु।

*वेदांमध्ये इतिहास आहे का?*

उत्तर - मुळीच नाही.

हे कशांवरून? हे आमच्या मनाचे मांडे नाहीयेत. ह्यासाठी आम्ही निम्नलिखित प्रमाण सादर करतो.

*प्रत्यक्ष वेदांची अंतःसाक्षी*

ज्या ग्रंथांचे अध्ययन आपण करत आहोत, लोकमान्यांच्या भाषेमध्ये ज्यांवर आपली सारी भिस्त आहे, त्याच वेदांमध्ये प्रत्यक्षपणे इतिहास नाही असे स्पष्ट सांगितले आहे. इतकंच काय, तर ह्याच वेदांवरील ऋषीमुनिकृत व्याख्यानरूपी असे ब्राह्मणग्रंथ, त्यांचाच भाग असलेली उपनिषदे, आरण्यके, स्वतंत्र असे सूत्र ग्रंथ ह्या सर्व साहित्यामध्ये कुठेही वेदांमध्ये ऐतिहासिक वर्णने आहेत असे म्हंटलेलं नाहीये. इतकेच काय आम्ही वर म्हंटल्याप्रमाणे पतंजलींच्या आदेशाप्रमाणे ज्या षडङ्गो म्हणजे सहा वेदांगांच्या साहाय्याने वेदार्थ प्रतिपादन करणे क्रमप्राप्त आहे, त्या सहा वेदांगमध्येही कुठेही वेदांमध्ये ऐतिहासिक वर्णने आहेत असे म्हंटलेलं नाहीये. आणखी महत्वाचे म्हणजे आपली जी षडदर्शने आहेत, त्यांमध्येही कुठेही वेदांत कुठल्याही ऐतिहासिक कथांचे, स्थळांचे, नद्यांचे, मनुष्याचे, त्यांच्या अनुभवांचे वर्णन आहे असे सांगितले नाही. कारण वेद हे नित्य आहेत. 

वेदांमध्येच वेदांना नित्य म्हटले आहे 

इतिहास हा अनित्य वस्तूंचा, व्यक्तींचा, घटनांचा, प्रदेशांचा, नद्यांचा, राजांचा, राण्यांचा, ऋषींचा, प्राण्यांचा आदिंचा असतो. पण वेदांमध्ये असा अनित्य इतिहास नाहीये.

*तस्मै॑ नू॒नम॒भिद्य॑वे वा॒चा वि॑रूप॒ नित्य॑या । वृष्णे॑ चोदस्व सुष्टु॒तिं ॥*
ऋग्वेद - ८।७५।६

ह्या मंत्रामध्ये वेदवाणींस नित्या म्हटलेले आहे. अगदी महाभारतामध्येही 

*अनाधिनिधना नित्या वागुत्सृष्टा स्वयंम्भुवा।*
*आदौ वेदमयी दिव्या यत: सर्वा: प्रवृत्तय:।*

शांतिपर्व - २३३.२४

अर्थ - सृष्टीच्या आरंभी त्या स्वयंभू परमात्म्याने आदि आणि अंत नसलेली अशी नित्य अशी वेदवाणी प्रदान केली ज्यामुळे विश्वातल्या सर्व प्रवृत्तीचा प्रकाश झाला आहे. श्वेताश्वेतर उपनिषदमध्येही

*यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै।*

असं म्हटलंय.

आम्ही वर ज्या षड्वेदांगांचा उल्लेख केला, त्यातले उत्तरमीमांसाकार बादरायणमुनी म्हणतात

*अतएव च नित्यत्वम्।*

१।३।२९ 

ह्या सूत्रातून वेदांचे अनादित्व सिद्ध करतात. वेदांना नित्य सांगतात. स्वतः लोकमान्यांनीच आंग्ल भाषेमध्ये ह्यावर भाष्य केले आहे. त्यांनी स्वतः ब्रह्मसूत्र वर भाष्य केलेलं असताना वेदांमध्ये ते इतिहास शोधतात ही गोष्ट न पटणारी आहे. त्यांच्याविषयी पूर्ण आदर ठेवून!

वेद कुणी मनुष्याने किंवा ऋषींनी रचले आहेत काय ह्याचे खंडन करताना म्हणतात

*ब्रह्माद्या ऋषिपर्य्यन्ता स्मारका न तु कारका:।*

ब्रह्मापासून ते सर्व ऋषींपर्यंत वेदांचा कुणीच कर्ता नाहीये, केवळ स्मर्ता आहे. 

वेदांमध्ये कुणा मानवाचा, ऋषींचा इतिहास किंवा भूगोल आहे का ह्याचे खंडण करताना पूर्वमीमांसाकार महर्षि जैमिनी म्हणतात 

*वेदांश्चैके सन्निकर्षं पुरुषाख्या:।*

१।१।२७

पुन्हा हेच पूर्वमीमांसाकार वेदांमध्ये कुणा अनित्य व्यक्तींचा, ऋषींचा रचनाकार म्हणून उल्लेख आलेला आहे का ह्याचे खंडण करताना

*उक्तन्तु शब्दपूर्वत्वम्।*

१।१।२९

सांख्यदर्शनकार महर्षि कपिल वेदांची रचना कोणत्याही मुक्त किंवा बद्ध पुरुषाने किंवा स्त्रीने केलीच नाही असे स्पष्ट नि ठासून सांगताना म्हणतात

*मुक्तामुक्तयोरयोग्यत्वात।*
५।४७

हे सूत्र सांगतात.

अनेकवेळा वेदांमध्ये ऋषींची म्हणजे व्यक्ती विशेषांची, नद्यांची, स्थानांची, पर्वतांची, भौगोलिक प्रदेशांची नावे आहेत असे दिसते, त्याचे काय? 

ह्याचे उत्तर नाही असेच आहे. ते केवळ नामसाधर्म्य आहे . ह्याचे समाधान आम्ही वर अनेक प्रमाण देऊन सिद्ध केलेलेच आहे. तरीही एक महत्वाचा सूत्राने हे सांगतो

*सर्वेषां तु स नामानि कर्माणि च पृथक् पृथक्।*
*वेदशब्देभ्य: एवादौ पृथक् संस्थाश्च निर्ममे।*

हे मनुस्मृतीचे २।२१ येथील वचन आहे. ह्याचा अर्थ असा आहे की वेदांतल्या शब्दांवरून नंतरच्या काळात सर्व वस्तूंची, संस्थांची अर्थात सर्व स्थावर जंगमाची नावे ठेवली गेली. म्हणजेच वेद सर्वांच्या आधी आहेत, त्यांना कुणीच रचले नाही. त्यांच्या आधी कुणीच नव्हते.

सर्व प्राचीन षड्दर्शनकारांनी व षड्वेदांगकारांनी स्पष्ट नि ठासून सांगितलंय की सर्व वैदिक शब्द हे योगिक अर्थात धातुज आहेत. ह्याचे प्रमाण प्रत्यक्ष *निरुक्ताचे टीकाकार दुर्गाचार्य १।१, २।१।३, ५।१।३* येथे देतातच. तिथे पहावे ही विनंती.

वेदांमध्ये लौकिक शब्द नाहीत त्यामुळे वेदार्थात लौकिक अर्थ प्रतिपादन होऊच शकत नाही. जे लोक ऐतिहासिक अर्थ वेदांचा घेतात, त्यांना ही गोष्ट मान्य होत नाही ही शोकांतिकाय. 

निरुक्तकारांनी 

*एकार्थमनेकशब्दमित्येतदुक्तम्; अथ यान्यनेकार्थान्येकशब्दानि तान्यतोsनुक्रमिष्याम: ।*

अर्थ - *अनेक शब्दांचा एक अर्थ व एकाच शब्दाचे अनेक अर्थ होतात असे स्पष्ट सांगितलंय.*

 अगदी पातंजल महाभाष्यकारही 

*बह्वर्था: धातवो भवन्ति - १।३।१*

असे म्हणतातच.

हे लक्ष्यात न घेता व वर मांडलेले सिद्धांत लक्षात न घेता केलेलं भाष्य जर कुणाचे असेल तर ते कसं प्रमाण मानायचे ? 

वेदांमध्ये ऐतिहासिक युध्द वर्णने आहेत काय? 

उत्तर - मुळीच नाही. 

*तत्रोपमार्थेन युद्धवर्णो भवन्ति ।*

असे निरुक्तकार स्पष्ट सांगतात. म्हणजे वेदांतली युद्ध वर्णने ही अलंकारिक उपमार्थाने आहेत, रुपक आहेत. ती ऐतिहासिक नाहीत.

आता कुणी शंका उपस्थित करेल की जर वेदांमध्ये इतिहासच नाही तर मग त्या मंत्रांची ऐतिहासिक वर्णनसदृश रचना का आढळते?

ही शंका अगदी योग्य आहे. त्याचे समाधान निम्नलिखित...

ह्याच वेदांमध्ये वर्तमानकालीन आणि भविष्यकालीन शब्दप्रयोगही येतात. त्यांवरून वेदांची रचना आता वर्तमानकाळात होतेय किंवा भविष्यांत होणार आहे असे कुणी म्हणणार आहे का? हे जसे हास्यास्पद आहे तसे इतिहास शोधणेही वैदिक सिद्धांतांस सोडून आहे.

तैत्तिरीयोपनिषदामध्ये वेदार्थाच्या पाच प्रक्रियांचा निर्देश आपणांस प्राप्त होतो. 

*अथात: संहिताया उपनिषदं व्याख्यास्याम: ।पञ्चस्वधिकरणेषु ― अधिलोकम्, अधिज्योतिषम्, अधिविद्यम्, अधिप्रजम्, अध्यात्मम् ।*

१।३।१

ह्यात पाच प्रक्रिया सांगितल्याच आहेत स्पष्ट. लोकमान्यांनी ह्याचा पुसटसा निर्देशही आपल्या दोन्ही ग्रंथामध्ये केलेला नाहीये. असे का ? ह्याचे उत्तर आपणास निम्नलिखित संवादात मिळेल.

*वेदकालनिर्णय ह्याविषयी लोकमान्य आणि परमपूज्य दक्षिणामुर्ती स्वामी संवाद*

इसवी सन १९०० मध्ये आदरणीय लोकमान्य जेंव्हा वाराणसीत गेले, तेंव्हा त्यांचा परमपूज्य दक्षिणामुर्ती स्वामींशी संवाद झाला. त्या संवादाचे लेखन समग्र लोकमान्य टिळक आख्यायिका व आठवणी खंड तृतीय पृष्ठ ९३ वर प्रकाशित आहे. किंवा हाच संवाद समग्र लोकमान्य टिळक वाङ्मय खंड ६ मध्ये पृष्ठ क्रमांक ११३ ते ११७ वर प्रकाशित आहे. ह्यात लोकमान्यांनी वेदांविषयी करून घेतलेल्या स्वमान्य सिद्धांताचे आणि शंका कुशंकांचे सप्रमाण समाधान स्वामींनी केल्याचे आपणांस प्राप्त होते. जिज्ञासूंनी तेथूनच ते वाचावे ही विनंती. आम्हांस विस्तारभयास्तव ते इथे देणे संभव नाही. अगदी संक्षेपांत हा संवाद देतो

*लोकमान्य - आपण म्हणतां त्याप्रमाणे वेदांचे अनादि अपौरुषेयत्व बुद्धीस पटत नाही.*

*स्वामी - संप्रदायपूर्वक शास्त्राध्ययन नाहीं, हेंच त्यांचें कारण.*

मुळात आर्य कुठूनही बाहेरून आलेलेच नाहीयेत.

आर्य्य: ईश्वरपुत्र:।

अशी निरुक्तकारांनी आर्य शब्दाची व्याख्या दिली आहे.

ज्या देशाला नष्ट करण्याचे आहे त्या देशाचा इतिहास नष्ट करायचा असतो ह्या हेतूने ब्रिटिशांनी आपल्यात कलह निर्माण करण्यासाठी आर्याक्रमण सिद्धांत मांडला. ज्या मॅक्सम्युलरने हा सिद्धांत मांडला त्यानेच पुढे जाऊन हा सिद्धांत खोडला. हा मूळचा ख्रिस्ती मिशनरी होता आणि वेदांच्या विकृत अनुवादाचे काम त्याला देण्यात आले होते. त्याने ह्या सर्व गोष्टींची मान्यता त्याच्या पत्रव्यवहारात दिलेली आहे. ज्यांना जिज्ञासा असेल, त्यांनी त्याचे पत्रव्यवहाराचे दोन खंड वाचावेत. पुढे तो बदलला हेही सत्य आहेच. अर्थात त्याचे श्रेय महर्षी दयानंद ह्यांना जाते.अस्तु. त्याने मध्य पूर्व आशियातून आर्य आक्रमक म्हणून आले असा सिद्धांत मांडला होता. लोकमान्यांनी त्यांच्या उपरोक्त 'आर्क्टिक होम' ह्या ग्रंथामध्ये त्याच्या नावाचा ९६ वेळा उल्लेख केला आहे. स्वतः लोकमान्यांना डोंगरीच्या कारावासातून सोडण्यांस त्यानेच सहकार्य केले होते हे टिळकांनीच एका अभिव्यक्तीमध्ये(मुलाखत) मान्य केले आहे जी समग्र लोकमान्य टिळक खंड तृतीय मध्ये पृष्ठ १०६ पासून प्रकाशित आहे. त्यात टिळकांनी आपण आपले मत भविष्यात मागे घेऊ शकतो असे स्पष्ट म्हटले आहे. टिळक म्हणतात

*मी बहुतेक ऋग्वेदाचाच अभ्यास केला, त्यास टीकांची मदत झाली. त्यावरून मी असा तर्क बांधला आहे की, आर्य लोकांचे पूर्वज ज्या ठिकाणी 'दोन महिन्याची रात्र' होती अशा ठिकाणी म्हणजेच उत्तर ध्रुवांजवळच्या मुलखात होते. परंतु हळूहळू ते दक्षिणेकडे येऊं लागले. माझ्या म्हणण्यांस भूशास्त्रवेत्त्यांच्या शोधांचे पाठबळ आहे. तथापि तुरुंगात मला फारशी पुस्तकें मिळाली नाहीत, तीं अद्यापि पहावयाची आहेत. पहिल्यानंतर कदाचित माझे मत फिरण्याचाही संभव आहे.*

आता इथे टिळकांनी ज्या भूशास्त्रवेत्त्यांचा संदर्भ दिला आहे त्या भूशास्त्रानुसारही टिळकांचे मत त्याकाळीच खोडले गेले होते. कसे ते पाहुयांत.

*भारतीय साम्राज्य नावाचे २२ खंड लिहिणारे विद्वान ज्येष्ठ इतिहासकार श्री. नारायणराव भवानराव पावगी ह्यांच्याकडून*

पुण्यातलेच एक विद्वान इतिहासकार श्री पावगींनी लोकमान्यांना भेटून त्यांचे सिद्धांत खोडले होते. त्यांनी "Aryavartic Home" ह्या ग्रंथामध्ये टिळकांच्या आर्य उत्तरध्रुव निवासाचे खंडण केले होते. ते करायच्या आधी त्यांच्या "भारतीय साम्राज्य" नामक ११ खंडांची हस्तलिखिते त्यांनी टिळकांनाच दाखविली होती. इतकंच काय ह्याच पावगींनी  त्यांच्या "Vaidik Fathers of Geology" ह्या ग्रंथामध्ये भूस्तरशास्त्राच्या सहाय्यानेच आर्यांची मूलभूमी भारत हेच सिद्ध केले होते आणि ते टिळकांना दाखविलेही होते. अर्थात टिळकांनी ते मान्य केलेच नाही ही गोष्ट वेगळी. ज्यांना हे सर्व संदर्भ पहायचे आहेत त्यांनी 'लोकमान्य टिळक आख्यायिका व आठवणी खंड द्वितीय' पहावा ही विनंती. पावगींनी ही आठवण त्यात सविस्तर दिली आहे. 

*आणखी एका बंगाली लेखकाचा महत्वाचा संदर्भ*

उमेशचंद्र विद्यारत्न ह्या बंगाली लेखकाने *"मानवेर आदि जन्मभूमि"* हा बंगाली ग्रंथ लिहिला असून त्या ग्रंथाच्या शेवटी स्वतः लोकमान्यांनी दिलेला अभिप्राय आहे, ज्यात ते टिळकांना घरी भेटायला आल्याचे आणि त्यांचा संवाद झाल्याचा संदर्भ आहे. १८ जानेवारी १९१६ चे हे पत्र आहे टिळकांचे. उपरोक्त ग्रंथाची pdf उपलब्ध आहे. लेखाच्या शेवटी धागा दिला आहे. 

*लोकमान्यांनी आपला सिद्धांत मागे घेतला???*

एक वैदिक विद्वान श्रीगणपतीशास्त्री हेब्बार ह्यांनी *"भारतीय लिपीचे मौलिक एकरूप"* हा एक अत्यंत मौलिक ग्रंथ लिहिला आहे. हा ग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाने प्रकाशित केला आहे. ह्या ग्रंथामध्ये लोकमान्यांच्या समकालीन अशा गीताप्रेस गोरखपूरचे संस्थापक श्री हनुमानप्रसाद पोद्दार ह्यांची आठवण दिली आहे. त्यांचे आत्मचरित्र *"जीवनयात्रा"* नावाने. टिळकांच्या आर्योत्तरध्रुव सिद्धांताच्या मांडणीपश्चात पोद्दार टिळकांना भेटले होते आणि त्यांनी त्यांच्याशी त्याविषयी संवाद केला होता. त्यावर टिळकांनी त्यांना आपला सिद्धांत मागे घेतल्याचे सांगितले होते आणि त्याचे हस्तलिखितही दाखविले होते. पण ते प्रकाशित करायच्या आत टिळक गेले. पुढे पोद्दारांनी त्यांच्या वंशजांशी संपर्क केला पण त्यांना पुढे काहीच माहिती मिळाली नाही असे त्यांनी लिहिले आहे. प्रथमावृत्ती पृष्ठ ४८८ - संपादक श्री गोपीनाथ कविराज

*ह्या सर्व लेखनाचा आमचा हेतु काय?*

दोनशे वर्षांपूर्वी ज्या आर्य सिद्धांताविषयी जगांत कुठेही चर्चा नव्हती, तो सिद्धांत अत्यंत विकृतपणे ब्रिटिशांकडून आम्हा भारतीयांचा बुद्धभेद करण्यासाठी मांडला जातो आणि आजही इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांतून तो सिद्धांत आम्हाला आहे तसाच शिकविला जातो. अनेक भारतीय विद्वानांनी आणि पाश्चात्य विद्वान त्यांनीही हा सिद्धांत गेल्या काही दशकांमध्ये सप्रमाण खोडून काढलेला आहे. तरीदेखील तो पुन्हा पुन्हा रेटला जातो ही आमची शोकांतिकाच नव्हे तर काय?

टिळकांविषयी आमच्या अंतःकरणामध्ये पूज्यभाव आहे हे वेगळं सांगायची आवश्यकताच नाही. स्वतः टिळकांनी आमचे उपरोक्त विवेचन अभ्यासले असते  तरीही त्यांनी काही विचार केला असताच. यद्यपि उपरोक्त विवेचन अत्यंत न्यून असले तरी मार्गदर्शक अवश्य आहे. विस्ताराने लिहायचे झाल्यांस स्वतंत्र ग्रंथनिर्मिती करावी लागेल ह्याची आम्हांस निश्चिती आहे. काहीजण शंका विचारतील की आम्ही जी वैदिक आणि तत्सम साहित्यातली प्रमाणे मांडली आहेत ती टिळकांस ज्ञात नव्हतीच की काय? असे आम्हांस मुळीच म्हणायचं नाहीये. कारण स्वतः टिळकांनीच षड्दर्शनापैकी एक असे वेदांतदर्शन अर्थात ब्रह्मसूत्र ह्यावर आंग्ल भाषेत भाष्य केलेच आहे. त्यातलीच प्रमाणे आम्ही वर उद्धृत केली आहेत. असे असताना टिळकांना ती मान्य न व्हावीत असे कसे व्हावे? कदाचित असे असेल की पाश्चात्यांच्या धोरणांस प्रत्यक्ष विरोध न करता द्राविडी प्राणायाम करून त्यांना मत मांडायचे असेल. ह्यावर श्रीगणपती शास्त्री हेब्बरांचे मत सांगतो आणि लेखणींस विराम देतो.

*"वेदातील खगोलशास्त्रीय व प्रदेश परिचायक उल्लेख लोकमान्य टिळक उद्धृत करून आपले प्रतिपादन मांडतात. वास्तविक एखाद्या प्रदेशाचे वर्णन करणारा त्या वर्णनावरून तेथील रहिवासी आहे असा निश्चित निर्णय करता येत नाही. कारण त्या प्रदेशाचा प्रवास करून आलेला मनुष्य ही त्या प्रदेशाचे व तेथील भौगोलिक स्थितीचे वर्णन करू शकतो. दुसरे असे की ग्रहांचे चार पुन्हापुन्हा आवृत्त होणारे असल्याने कोणत्या चक्रास घेऊन कालनिर्णय करावा याविषयी आधाराला कांहीच नाही. अर्वाचीन अभ्यासक जवळचे चक्रास घेतात तें त्यांचें मनानें वा त्यांचे सोयीनुसार आहे. फा हि यान, ह्यू एन स्तंग, अल्बेरुणी, मेगॅस्थेनीस, ट्रॅव्हर्नियर इत्यादिंनी त्यांचे ग्रंथात हिंदुस्थानचे सविस्तर वर्णन केले आहे, तेवढ्यावरून ते हिंदुस्थानचे रहिवासी होतात काय? मुळीच नाही. याच दृष्टिकोनातून वैदिक उल्लेखांचा मागोवा घेतल्यास तेवढ्यावरून आर्यांचे त्या ऋषींचे मूळ वसतिस्थानाचा निर्णय घेता येत नाही हे दिसते. आर्य बाहेरून आले कां येथूनच बाहेर गेले याचा निश्चित निर्णय करण्याजोगे प्रमाण पाश्चात्त्यां जवळ नाही."*

*"वेद हे परमेश्वराचे निःश्वास आहेत...हा सर्व भाग लोकमान्य जाणत नव्हते असे नाहीं, तर त्यांचे लेखन त्यांचे पूर्वीच्या पाश्चात्य लेखकांचे जे मत 'आर्य मध्य आशियातून आले–' यांविषयी संदिग्धता निर्माण करण्याचा उद्देश्य ठेऊन असावे असे आम्हांस वाटतें. अत्यंत परकीय प्रभावाचा निरास सर्वत: विरुद्ध प्रतिपादनाने होत नाही तर परकीय मतांत संदिग्धता निर्माण करून तद्वारा इष्ट मतात हळूंहळूं पर्यवसान करून होतो. याच धोरणी विचारानें लोकमान्यांचे लेखन आहे असें आम्हांस वाटतें."*

इत्यलम्।

भवदीय,

तुकाराम चिंचणीकर
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com


Thursday, 2 July 2020

पंढरीचा श्रीविठ्ठल बुद्ध किंवा बौद्ध, जैन किंवा वीरगळ आहे काय???




*लेखांक प्रथम*

*धर्माचे पालन, करणे पाषांड खंडण।*
*हेचिं आह्मांसि करणे काम, बीज वाढवावें नाम।*
जगद्गुरु श्रीतुकोबाराय  

आमच्या मागील लेखांत आम्ही म्हटल्याप्रमाणे ह्या लेखमालेत आमच्या भूवैकुंठाधिपती परमात्मा श्रीपंढरीशाच्या मूर्तींवर नि एकूणच इतिहासांवर गेल्या काही दशकांत जे काही निराधार आक्षेप घेतले गेले आहेत, त्यांचे निराकरण करण्याचे कार्य करणार आहोत. वास्तविक हे कार्य आमच्या पूर्वसूरींनी केंव्हाच करून ठेवलं आहेच. त्यात *वै. हभप. श्री सोनोमामा दांडेकर* असतील, आमच्या पंढरीतले *डॉ. श्री. गोपाळराव बेणारे* असतील, पंढरीतलेच संतसाहित्याचे अभ्यासक आणि भाष्यकार आणि *'वारकरी संप्रदायाचा उगम आणि इतिहास'* हा अभ्यासपूर्ण ग्रंथ निर्माण करणारे *श्री भा पं बहिरट* असतील, *ज्येष्ठ इतिहासकार, पुरातत्ववेत्ते आणि मूर्तीशास्त्रज्ञ श्री ग ह खरे उपाख्य तात्या खरे* असतील. ह्या सर्वांनीच भगवान श्रीविठ्ठल मूर्तीवरील निरर्गल नि निराधार वादांचे निराकरण आपल्या प्रगल्भ बुद्धीने, तर्कशुद्ध विवेचनाने, प्रत्युत्पन्न मतीने आणि सप्रमाण ससंदर्भ विवरणाने साडेतीन दशकांपूर्वीच करून ठेवले आहे. त्यामुळे आमची भूमिका केवळ 

*फोडिलें भांडार, धन्याचा हा माल।*
*मी तव हमाल, भारवाही।*

अशीच आहे. ह्या श्रीतुकोक्तीप्रमाणे हा लेखनप्रपंच करताहोत.

गेली अडीच वर्षे हा विषय अंतःकरणात असल्याने येविषयीं लिहिण्याची इच्छा वारंवार व्हायची. मागील वर्षीच ह्या दृष्टीने अध्ययन केल्याने तेंव्हाच लेखन करायचे होते पण ते तसेच कार्यबाहुल्यामुळे राहिले. म्हणूनच आषाढी एकादशीच्या निमित्ताने काही दिवस हा प्रपंच करताहोत.

*भारत विखंडन शक्तींचे षडयंत्र*

इतिहासाच्या नि वर्तमानाच्या विकृतीकरणातून समाजाचा किंवा मानवसमूहाचा बुद्धिभेद करणे हा देशविघातक शक्तींचा नेहमीचा प्रयत्न असतो. त्यातूनच मग हे असे प्रयत्न वारंवार केले जातात.

प्रतिवर्षी आषाढी किंवा कार्तिकी आली की समाज माध्यमांवर पंढरीश श्रीविठ्ठलाच्या विषयी वाट्टेल ते लेख प्रसृत व्हायला लागतात. हे एकवेळ ठीक होते. पण हे द्वेषाचे वावटळ इतके उठलं की अडीच वर्षांपूर्वी आमच्या काही नवबौध्द बांधवांनी कोरेगाव भीमाच्या उदात्तीकरणासाठी कोरेगाव ते पंढरी यात्राही सुरू केली. इतकंच काय पण पंढरीतच श्रीविठ्ठल मंदिराभोवती ह्यातल्या काही कथित भिक्षूंनी प्रदक्षिणा घालून विठ्ठल हा आमचाच बुद्ध आहे अशीही खोटीच आवई उठविण्याचा एक बालिश प्रयत्न केला. त्यावेळी श्रीमहाद्वारासमोर दुर्भाग्याने ते दृश्य आम्ही पाहिलं होते. 

*मुळात तत्कालीन भाजप सरकारने मतांच्या लाचारीसाठी जिथे ह्या कोरेगाव भीमासारख्या प्रसंगाचे उदात्तीकरण केलंय, तिथे ह्या आमच्या नवबौध्द बांधवांना आवेशात येऊ वाटणार त्याचे नवल ते काय? सरकारी पाठिंब्यानेच हे सर्व होत असेल तर काय लिहावे? आणि काही कथित उजव्या समाजवाद्यांनीही सामाजिक समरसतेच्या नावाने ह्यांस मूक संमतीही दिलीच होती. शेवटी एकदा पेशव्यांना जातीयवादी घोषित केलं की संपलंच ना. असो तो स्वतंत्र विषय.*

पण जगद्गुरु श्रीतुकोबारायांच्या भाषेंत

*बुडते हे जन देखवेना डोळा । म्हणोनि कळवळा येतो आम्हां ॥*

*इतर कुणी ह्याविषयी भीतीने किंवा लांगुलचालनाच्या दुष्प्रवृत्तीने मूग गिळून गप्प राहत असतील तर खुशाल राहोत, आम्ही शांत राहूच शकत नाही म्हणून हा अट्टाहास. कारण आपल्यासमोर हा सत्याचा प्रकट अपलाप होताना आपण तो षंढपणे पाहत बसणे ह्यासारखी आत्मवंचना नव्हेच. म्हणूनच...*

ह्याआधी ह्याच श्रीविठ्ठल मूर्तींवर ती जैन असल्याचा, ती वीरगळ असल्याचा तर काही रा चिं ढेरेंसारख्या अभ्यासकांनी तो मूळचा यादव जनजातींचा म्हणजे  आमच्या गवळी-धनगर बांधवांचा लोकदेव असल्याचा आणि पुढे त्याचे वैदिकीकरण केल्याचाही मिथ्या आरोप केला होता. वास्तविक हे आमचे बांधवंच आहेत. त्यामुळे त्यांनी त्यावर अधिकार सांगितला तर त्यात वाईट काहीच नाही. परंतु ह्या वादाला एक वेगळा रंग आहे जो सहजासहजी दिसणारा नाही. 

आणि त्यातही त्यांनी माढ्याची मूर्ती मूळ असाही तर्क केला होता.

*पण सुदैवाने त्याचवेळी उपरोल्लेखित ज्येष्ठ इतिहासकार श्री तात्या उपाख्य ग ह खरेंनी त्यांच्या 'श्रीविठ्ठल आणि पंढरपूर' आणि 'महाराष्ट्रातील चार दैवते' ह्या दोन ग्रंथांमध्ये ह्या आक्षेपांचे साधार नि सप्रमाण खंडण साडेतीन दशकांपूर्वीच केलं आहे. त्याआधी केसरीत त्यांनी लेखमालाही सविस्तर लिहिली होतीच आणि ढेरेंचं सारंच कथित संशोधन खोडून काढले होतेच. दुर्दैवाने ढेरेंचा ग्रंथ प्रकाशितही आहे. त्याचे खंडण झाल्याचेही लोकांस ज्ञात नाही ही शोकांतिका आहे.*

*हभप डॉ. बेणारेंचा विशेष उल्लेखनीय ग्रंथ किंवा पुस्तिका*

पंढरीतल्या श्रीविठ्ठलांस पहाटे वेदमंत्रांनी जागृत करण्याचे कार्य जे बेणारे परंपरेने करत आले होते, त्याच बेणारे वंशातले *ज्ञानेश्वरी वरील मराठी आणि हिंदी भाष्यकार डॉ. श्रीगोपाळराव बेणारे ह्यांनीही "श्रीविठ्ठलमूर्ती वाद नि खंडण" नावाने एक पुस्तिका लिहून उपरोक्त आक्षेपांचे सप्रमाण खंडण केले होते. आश्चर्य म्हणजे पुण्यातल्या प्रथितयश भारत इतिहास संशोधक मंडळ इथे ह्याविषयी एक अभ्यास परिषद किंवा परिसंवाद झाला असताना त्यांस ग ह खरे, प्र. न. जोशी आदि इतिहासक्षेत्रातील दिग्गज मंडळी आणि डॉ. बेणारे स्वतः उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रणही करण्यात आले होते.*

*आश्चर्य म्हणा किंवा काहीही म्हणा पण रा चिं ढेरे पुण्यात असूनही नि त्यांना निमंत्रण असूनही ह्या कार्यक्रमात हेतुपुरस्सर ते उपस्थित राहिलेच नाहीत. ह्यावरूनच त्यांच्या कथित संशोधनाची सत्यता आकळते.* ह्यावर ह्या लेखमालेतच सविस्तर आम्ही येणारंच आहोत.

*२१ मार्च १९८१ ह्या दिवशी हा परिसंवाद भारत इतिहास संशोधक मंडळात झाला होता.* म्हणूनच जे कार्य पूर्वसुरीच्या विद्वानांनी करून ठेवलं आहे, तेच पुढं आणायचा हेतु आहे. भूमिका मांडण्यासाठीच हा प्रथम लेख आहे. इथून पुढे प्रथम् बुद्ध किंवा बौद्ध ह्या आक्षेपांचे खंडण करूयांत.

*आमच्या हिंदु नवबौध्द बांधवांना नम्रतेची विनंती !*

*आंबेडकरांच्या नावाखाली काही देशविघातक शक्ती, ज्या भारत विखंडन शक्ती नावाने कार्यरत आहेत, त्या आमच्या हिंदु नवबौध्द बांधवांना अकारण त्यांच्याच बांधव असलेल्या आम्हा शेष हिंदू समाजाच्या विरोधात पेटविण्याचा प्रयत्न करताहेत. नवबौध्द बांधवांनी कृपा करून ह्या राष्ट्रविघातक शक्तींपासून दूर राहावे ही नम्रतेची विनंती !*

एका महत्त्वाच्या शंकेचे निरसन 

*जर श्रीविठ्ठल सर्वांचाच आहे तर त्यावर नवबौद्धांनी केवळ आपला अधिकार सांगितला तर त्यात आक्षेप काय?*

*ह्याचे समाधान मुळात असे आहे की मुळात जे नाहीच ते ठसवायचा प्रयत्न का? श्रीविठ्ठलाच्या भक्तीचा सर्वांना अधिकार आहेच. तुम्हांस भक्ती करायची असेल तर श्रीविठ्ठल म्हणुनच करायला काय अडचण आहे तुम्हांस? त्याला अकारण विठ्ठल नसून बुद्ध किंवा बौद्ध सिद्ध करायचा अट्टाहास का? कारण एकीकडे बुद्धाने देवाचं अस्तित्वच नाकारलं, मूर्तीपूजाच नाकारली, ईश्वराचे अस्तित्वंच नाकारलं असं म्हणायचे आणि दुसरीकडे श्रीविठ्ठल हाच बुद्ध आहे असे म्हणायचे हा कुठला भंपकपणा आहे? ही कसली आंबेडकरी पद्धत आहे संशोधनाची???*

*एकीकडे २२ प्रतिज्ञा उच्चारून सर्व हिंदू देवी देवतांचा द्वेष करायचा आणि दुसरीकडे सर्व देवतांवर आता त्या आमच्याच मूळ बुद्ध आहेत असा वाद निर्माण करायचा? हे कुठले संशोधन?*

*आम्ही तुम्हांस आमचे बंधुच समजतो. पण एकीकडे आपल्याच बांधवांच्या देवतांचा द्वेष करायचा आणि दुसरीकडे सगळे देव आमचेच आहेत अशी टिमकी वाजवायची? हा कुठला न्याय???*

अस्तु।

पुढील लेखांत श्रीविठ्ठल मूर्तीचे बुद्ध किंवा बौद्ध आक्षेप पाहुयांत आणि निराकरण करूयांत.

भवदीय,

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com 

#पंढरपूरचा_श्रीविठ्ठल_बुद्धबौद्धजैननाहीच_आंबेडकर_आषाढीवारी_इतिहासाचे_विकृतीकरण

Monday, 22 June 2020

स्त्रियांचा वेदाधिकार, यज्ञोपवीताधिकार नि गायत्री मंत्राधिकार - आक्षेप नि खंडन


वैदिक स्त्री-दर्शन लेखांक पंचम

आमच्या स्त्रियांचा वेदाधिकार, यज्ञोपवीताधिकार नि गायत्री मंत्राधिकार ह्या लेखांवर आह्मीं दिलेल्या आह्वानाला आमच्या काही सनातनी विद्वान मंडळीकडून प्रतिवाद प्राप्त झालेला आहे, त्याविषयी आह्मीं त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. आमच्यासारख्या एका यःकश्चित मनुष्याचे लेख त्यांनी एवढे मनावर घ्यावेत हा त्यांचा आमच्यावरचा स्नेह नि अनुरागंच मानतो आह्मीं. आणि म्हणूनंच त्यांनी केलेल्या प्रतिवादाची नि आक्षेपांची समीक्षा करण्यासाठी नि त्यांना वेदसंमत उत्तर देण्यासाठी आमचा हा लेखनप्रपंच...!ह्यात कुठेही त्यांचा अनादर करण्याचा हेतु नाही किंवा आह्मांला खूप कळतं असे दर्शविण्याचाही हेतु नाही. हा सरळ संवाद आहे.

*धर्म जिज्ञासमानानां प्रमाणं परमं श्रुतिः।*

हे वचन मनुस्मृतीचं असलं तरी हे सर्व परंपरांमध्ये सर्वमान्य आहे. *ज्याला वैदिक हिंदु धर्मशास्त्राचे प्रामाणिक अध्ययन करायचं आहे, त्याला श्रुती अर्थात वेदांशिवाय अन्य कोणताच मार्ग नाही. नान्यः पन्था विद्यतेऽयनाय ॥ ( यजुर्वेदः ३१-१८)।* ज्यांना अधिक प्रमाण आवश्यक आहे, त्यांनी मनुस्मृतीवरील दहा संस्कृत टीकाकारांच्या टीका तरी अभ्यासाव्यांत. त्यातल्या ९ तरी भारतीय विद्या भवनने प्रकाशित केल्याहेत, ज्या पीडीएफ आंतरजालांवर उपलब्ध आहेत. केवल एका श्रीकुल्लुकभट्टांची टीका पाहुयांत...

 *धर्मं च ज्ञातुमिच्छन्तां प्रकृष्टं प्रमाणं श्रुतिः। प्रकर्षबोधननेच स्मृतिस्मृतिविरोधे स्मृत्यर्थो नादरणीयः इति भावः।* 

*म्हणजे धर्म जाणण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी श्रुति अर्थात वेदंच सर्वोत्तम आहे. जर श्रुति नि स्मृतींमध्ये कुठे विरोध जाणवला तर स्मृतींचा अर्थ आदरणीय नाही अर्थात तो त्याज्य आहे. म्हणजेच अशावेळी श्रुतीच प्रमाण आहे. म्हणजेच स्मृतींपेक्षा श्रुतीच सर्वोच्च प्रमाण आहे.*

पुढे ह्याच श्रीकुल्लुकभट्टांनी प्रमाण सादर केलेलं आहे, ते श्रीजाबालोपनिषदांतलं. ते म्हणतात 

*अतएव जाबालः*-----
*श्रुतिस्मृतिविरोधे तु श्रुतिरेव गरीयसी।*

*जाबाल ऋषि म्हणतात की श्रुति नि स्मृतींच्या परस्परविरोधामध्ये श्रुतीच श्रेष्ठ नि प्रमाण आहे.*

आमच्या एका उपरोक्त श्रीमनुमहाराजांच्या वचनाच्या शीर्षकाधारित लेखामध्ये आमच्या ह्या श्रुतीमान्यतेची व्याख्या आह्मीं स्पष्ट केलेली आहे. जिज्ञासूंनी ती

http://pakhandkhandinee.blogspot.com/2019/10/blog-post_9.html?m=1

इथे अभ्यासावी ही नम्रतेची विनंती! 

वास्तविक आमच्या *पुराकल्पेषु तु नारीणां* ह्या श्लोकातंच आह्मीं कल्प शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. हे जे लोक त्याचा इतिहासपरक असा मागील कल्पातला अर्थ घेतात, त्यांचा तो अर्थ चुकीचा आहे हे आह्मीं सप्रमाण सिद्ध केलंय तेही अनेक प्रमाणांनी. आता त्यांचा हा इतिहासपरक अर्थ क्षणभर प्रमाण जरी मानला तरी त्यातून पूर्वी तो वेदाधिकार स्त्रियांना होता हेच स्पष्ट होते. आता तो अधिकार होता ह्याचाच अर्थ असा श्लोक रचणाऱ्यांना धर्मशास्त्राचे यथोचित ज्ञान होते हे अभिप्रेत आहेच. पुराकल्पेषु ह्याचा अर्थ मागील कल्पांत तो होता असा क्षणभर अर्थ घेतला तरी ह्याचा अर्थ हाच आहे की मागील कल्पांत तसा वेदमंत्र असायलाच हवा...!कारण वेदमंत्राच्या अर्थात श्रुतीच्या आधाराशिवाय असा अधिकार कसा असेल???

आणि हा जगन्मान्य सिद्धांत आहे की आज आपल्याला उपलब्ध असलेले वेद हे मागील कल्पांतलेच वेद आहेत. कारण आमच्या नित्याच्या संध्येमध्ये आह्मीं जो ऋग्वेदांतला मंत्र आसेतुहिमाचल म्हणतो तो असा

*सू॒र्या॒चं॒द्र॒मसौ॑ धा॒ता य॑थापू॒र्वम॑कल्पयत् । दिवं॑ च पृथि॒वीं चां॒तरि॑क्ष॒मथो॒ स्वः॑ ॥*
ऋग्वेद - १०।१९०।३

ह्या ऋग्वेदवचनानुसार ईश्वर अर्थात तो धाता गतकल्पात जशी सूर्यचंद्रपृथिव्यादि सृष्टी निर्माण करतो, तशी ती ह्या कल्पातही आहे तशीच करतो. आणि त्या कल्पातले वेदही त्याच अनुपूर्वीसहित ह्याच कल्पात आहे तसे प्रकट होतात. म्हणजेच आजचे वेद तर मागील कल्पांत जे होते, ते आहे तसेच ह्या कल्पांतही प्राप्त आहेत. म्हणजेच ह्या आज आपणां सर्वांस उपलब्ध असलेल्या वेदांनाच प्रमाण मानणं आपल्या सर्वांना क्रमप्राप्त आहे. ह्याविषयी संदेह असण्याचे काहीच कारण नाही.

जर त्याच कल्पातले वेद ह्या कल्पांतही आहे तसेच प्रकट झाले आहेत, तर ह्या वेदांमध्येच स्त्रियांचा वेदाधिकार सिद्ध करणारे मंत्र असलेच पाहिजेत. 

इथे जाता जाता एक स्मरण 

*आमच्या उपरोक्त *पुराकल्पेषु तु नारीणां श्लोकावरील लेखांवर संवाद करताना एकाने तो श्लोकंच प्रक्षिप्त आहे असे अतिसाहसी विधान केलं. म्हणजे एरवी प्रक्षेप शब्द उच्चारला की ईंगळी डसल्याचा अनुभव करणारे हे लोक सोयीस्कर कशी प्रक्षेप संकल्पना स्वीकारतात ते पहा.*

*आणि हो काही ठिकाणी हा श्लोक पुराकल्पेषुच्या ऐवजी पुरायुगेषु असाही आला आहे. वाटल्यास यावर सविस्तर पुन्हा येईन.*

अस्तु। 

आता स्त्रियांना वेदाधिकार नाकारणाऱ्या ह्या स्वतःस सनातनी म्हणविणाऱ्या आक्षेपकांचा वैचारिक गोंधळ पहा...प्रस्तुत लेखक अर्थात आह्मींही सनातनीच आहोत परंतु काही प्रामाणिक मतभेद आहेत इतकंच. आता ह्यांच्याह्यांच्यातंच ह्या विषयांत किती मतभेद आहेत ते पहावे ही विनंती...!

*एक जण म्हणतो स्त्रियांना मूळीच वेदाधिकार नाही. दुसरा म्हणतो वेदकालीन ऋषिकांनाच तो केवल अधिकार होता की ज्या अत्यंत अधिकारी होत्या. तिसरा म्हणतो की हारित धर्मसूत्रानुसार (२१।२०।२४) ब्रह्मवादिनी नि सद्योवधु असे स्त्रियांचे दोन प्रकार असून केवळ ब्रह्मवादिनी स्त्रियांनाच तो अधिकार आहे. सद्योवधुंना तो नाही. इथे ब्रह्मवादिनी म्हणजे आजीवन अखंड ब्रह्मचर्य पालन करणाऱ्या नि वेदाध्ययन करणाऱ्या स्त्रिया. आणि सद्योवधु म्हणजे विवाहसंस्कार करणाऱ्या गृहस्थाश्रमी स्त्रिया. असे ह्यांचे मत आहे. वास्तव काय ते आपण पुढे पाहुच. चौथा असे म्हणतो की उर्वशी आदि अधिकारी स्त्रियांनाच केवळ एकदेशी अधिकार आहे. आता एकदेशी काय हे त्यांचे त्यांनाच ज्ञात. पांचवा म्हणतो की मैत्रेयी आदि स्त्रिया केवल ब्रह्मचिंतनापूरताच अधिकारी होत्या, त्यांनाही वेदाधिकार नव्हता. सहावा म्हणतो विवाहापश्चात स्त्रियांना केवळ काही विशिष्ट मंत्र म्हणण्याचाच अधिकार प्राप्त होतो. पूर्ण वेदांचा अधिकार त्यांना नाही ह्मणें. सातवा म्हणतो आमच्या गुरुचरित्रांत वेदाधिकार नाकारलाय म्हणें. आठवा म्हणतो विवाह हेच स्त्रीचं उपनयन आहे म्हणे. नववा म्हणतो विवाहवेळी यज्ञोपवीताचा अधिकार प्राप्त होतो तो केवळ पतींबरोबर दैनिक नित्य यज्ञ करण्यासाठी. दहावा म्हणतो नाही ते यज्ञोपवीत नसून ते यज्ञोपवीतासारखे वस्त्र नेसतात.*

आता जर ह्यांच्याच मतानुसार स्त्रीला उपनयनाचाच अधिकार नाही, तर तिचा विवाहतरी तिचं उपनयनंच कसं काय सिद्ध होऊ शकतं??? किती गोंधळंय पहा.

आता असे पहा की हे लोक उपनिषदांनाही अपौरुषेय वेद मानतात. मन्त्रब्राह्मणयोर्वेदनामधेयं म्हणे. ह्याची तर्ककठोर समीक्षा आह्मीं आमच्या वेदपरिचय चिंतनमालेमध्ये केलीच आहे. लेखमालाही आधी लिहिली आहे. पुढेही करुच पण तो स्वतंत्र विषय आहे. अस्तु। 

*ब्राह्मणग्रंथ-उपनिषदं-आरण्यकांमध्ये वेदमंत्रांचेच भाष्य आहे. आणि स्त्रियांना जर वेदाधिकार नाहीच, तर मग उपनिषदांमध्ये काही स्त्रिया वेदमंत्रोच्चारण करताना कशा काय दिसतात???*

तर ह्यावर ह्या लोकांचे उत्तर वर पांचव्यात दिलंय. हे त्यांचे उत्तर आहे, आमचं नाही.

*ह्यावरूनंच ह्या स्वतःला सनातनी म्हणविणाऱ्यांमध्येच स्त्रियांच्या वेदाधिकारांविषयी कशी एकवाक्यता नाही हे लक्ष्यीं येते...!*

ह्यात कुठेही ह्या लोकांचा अवमान करण्याचा हेतु नाही...!

आता हे ह्यांचे असे वर्तन का होते???

ह्याचे कारण एकंच आहे की हे लोक स्वतःला नुसतंच वेदप्रामाण्यवादी म्हणून मिरवितात परंतु प्रमाण मानताना हे मधील काळांत निर्माण झालेल्या प्रक्षेपांना प्रमाण मानतात जिथे हा निषेध सांगितलेला असतो. आता हे प्रक्षेप कशावरून ते आह्मीं पुढे येणारंच आहोत. पण जेंव्हा आह्मी ह्यांस विचारतो की स्त्रियांचा वेदाधिकार नाकारणारा एक तरी मंत्र वेदांच्या संहितांमध्ये दाखवा. तर ह्यातल्या एकालाही वेदमंत्रांचे सादरीकरण अद्याप एकदाही करता आलेलं नाही नि येणारही नाही.

गेली तीन वर्षे आह्मीं एकंच प्रश्न ह्या सर्वांना विचारत आलो आहोत की 

*स्त्रियांना वेदाधिकार नाकारणारा असा निषेधात्मक एकतरी वेदमंत्र आह्मांस चारवेदांच्या संहितांमध्ये दाखवा...*

*गेल्या तीन वर्षांत एकालाही हा मंत्र अद्याप सादर करता आलेला नाही.*

*तीनंच नव्हे तर गेली दीडशे वर्षे आर्यसमाजाच्या वतीने ह्या कथित सनातनी विद्वानांना हा प्रश्न विचारण्यांत आलेला असूनही ह्या दीडशे वर्षांत एकालाही असा मंत्र सादर करता आलेला नाही.*

*कारण कारण कारण...*

*असा एकही निषेधात्मक मंत्र वेदांच्या संहितांमध्ये नाहीच नाही. अहो असला तर सादर करणार ना???*

*जे नाहीच ते दाखवणार तरी कुठून?*

*आणि म्हणून हे लोक आधार घेतात ते परवर्ती प्रक्षेपयुक्त स्मृतींचा. की ज्या वेदबाह्य असल्याने त्याज्य आहेत. ज्या मनुस्मृतीला हे अगदी प्रमाण मानतात, अगदी प्रक्षेपरहित मानतात, त्याच मनुस्मृतीमध्ये*

*या वेदबाह्याः स्मृतयः याश्च काश्च कुदृष्टयः।*

असे वचन आहे. म्हणजेच ज्या स्मृत्या वेदविरुद्ध आहेत, त्या त्याज्य आहेत असे स्पष्ट मांडलं आहे. ह्या स्मृतीसंदर्भांवर आह्मीं ह्या लेखमालेत स्वतंत्र येणारंच आहोत. पण तत्पूर्वी...

आता ह्यावर हे लोक आह्मांस आवाहन करतात की मग वेदमंत्रांमध्येच स्त्रियांना वेदाधिकार आहे हे दाखविणारा एकतरी मंत्र सादर करा. तर ह्या लोकांच्या ह्या आज्ञेंस ह्मणा की आह्वानांस ह्मणां मान्य करून आता आह्मीं वेदमंत्रांतलेच स्त्रियांचा वेदाधिकार, यज्ञोपवीताधिकार नि गायत्र्यादि मंत्राधिकार सिद्ध करणारे प्रमाण सादर करणाराहोत. आज सायंकाळपासून लेख येतीलंच.

ह्या आगामी लेखमालेत आह्मीं निम्नलिखित संदर्भ सादर करणाराहोत 

लेखांक क्रमांक ६ - वेदमंत्रांच्या आधारे वेदाधिकार, यज्ञोपवीताधिकार, गायत्रीमंत्राधिकार 

लेखांक क्रमांक ७ - ब्राह्मणग्रंथ-उपनिषदं-आरण्यकांच्या आधारे...

लेखांक क्रमांक ८ - वेदाङ्गे, षट्दर्शने ह्यांच्या आधारे

लेखांक क्रमांक ९ - श्रौतसुत्रं, गृह्यसूत्रांच्या आधारे 

लेखांक क्रमांक १० - स्मृतिविमर्श 

लेखांक क्रमांक ११ - रामायण-महाभारत-पुराणादि नि अन्य ऐतिह्य संदर्भांच्या आधारे 

लेखांक क्रमांक १२ - उपरोक्त सर्व लेखांवरील शंका समाधान नि समारोप 

अशा प्रकारे ही लेखमाला येणार आहे.

हे सर्व लिहिण्याचा उद्देश्य किंवा अट्टाहास हा कुणाची निंदा करण्याचा मूळीच नाही. सत्यशोधन व्हावं हा हेतु आहे.

भवदीय...

पाखण्ड खण्डिणी 
Pakhandkhandinee.blogspot.com

#स्त्रियांचा_वेदाधिकार_यज्ञोपवीताधिकार_गायत्री_मंत्राधिकार_उपनयन_वेदश्रुतिस्मृतिविमर्श