Wednesday, 18 March 2020

क्रांतिवीर श्री बाबाराव सावरकर अमृतमहोत्सवी पुण्यस्मरण - सांगली वृत्तांत



त्वत्स्थंडिली अतुल-धैर्य वरिष्ठ बंधु।
केला हवीं परमकारुण पुण्यसिन्धु।
हें आपुलें कुलहिं त्यामधि ईश्वरांश।

ज्यांचे समग्र जीवन क्रांतिप्रवण होते नि ज्यांचे विचार क्रांतिगर्भ होते, अशा स्वातंत्र्यवीरांच्या ज्येष्ठ बंधुंच्या, त्यांच्या पाठी पित्यासमान असलेल्या एका अतुल धैर्य वरिष्ठ बंधुंच्या, ज्यांचं समग्र जीवनंच उपेक्षित अंधार्या कारावासांत नि अप्रसिद्धीच्या गुहागुंफात संपून गेले, ज्यांचे जीवन म्हणजे अमूल्य रत्नांची खाणंच आहे नि ज्यांत उदात्त अन् उज्ज्वल प्रसंगांचे कोहिनूर ठासून भरलेले आहेत, ज्यांनी सोसलेल्या नरकयातना ह्या तात्यारावांइतक्याच, किंबहुना अधिक आहेत, ज्यांचे समग्र जीवन हिंदुराष्ट्राच्या नि हिंदुत्वाच्या नि हिंदुसमाजाच्या उत्कर्षासाठीच वाहिलेले होते, अनेक गुप्त क्रांतिकारी संघटनांचे जे उद्गाते नि अनेक तरुण क्रांतिकारकांचे जे मार्गदर्शक, रा स्व संघासारख्या आज हिमालयाएवढ्या उत्तुंग अशा राष्ट्रव्यापी नि विश्वव्यापी संघटनेचे जे उद्गाते, असे अंदमानदंडित क्रांतिवीर श्री गणेश दामोदर उपाख्य श्रीबाबाराव सावरकर ह्यांच्या अमृतमहोत्सवी पुण्यस्मरणानिमित्त सांगलींस जाण्याचा योग नुकताच १६ मार्चला प्राप्त झाला.

महाराष्ट्र प्रदेश हिंदुसभेचे भूतपूर्व अध्यक्ष, आमच्या पंढरपूर हिंदुसभेचे श्री अभयसिंह कुलकर्णींचा अट्टाहास होता की हे कार्य आपण तरी करायला हवंच. आधीच सावरकर कुटुंबाची घोर उपेक्षा नि त्यातून बाबाराव तर विस्मृतंच. त्यामुळे हे सतीचं वाण हिंदुसभाच पेलु शकते. म्हणून भुवैकुंठ पंढरीतल्या सर्व हिंदुसभायांसह आह्मीं सर्व सांगलीस श्रीबाबारावांना अभिवादन करण्यासाठी निघालो. ह्यावेळी हिंदुसभेचे श्री विवेक बेणारे, विद्यमान अध्यक्ष श्री बाळासाहेब डिंगरे, महाराष्ट्र प्रदेश हिंदुसभेचे विद्यमान अध्यक्ष श्री अनिल पवार, सोलापूरचे श्री कल्याणी, वारकरी संप्रदाय पाईक संघाची धडाडती )तोफ श्री रामकृष्ण महाराज वीर, पेशवे युवा मंचाची तोफ श्री गणेश लंके आणि श्री महेश भंडारकवठेकर, हिंदुसभेचेच आनंद कुलकर्णी, सुवर्णा पोवार इ. अशी मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सांगलीतलेच हिंदुसभाई श्री अरुण गडचे ह्यांनी भूषविले.


सांगलीत चारच्या दरम्यान पोहोचताच सांगलीतले आमचे पंढरपूरचेच मूळचे स्नेही संस्कृत भाषेंवर प्रभुत्व असलेले आचार्य श्रीरघुवीर रामदासींकडे चहा पाण्याची व्यवस्था झाली. सांगलीतल्या ज्या गावभागांत बंधार्यासमीप श्रीबाबारावांचे स्मारक आहे, तिथून जवळंच ह्यांचा निवास आहे. साडेचारच्या समीप कार्यक्रमस्थळी पोहोचलो. मधील काळांत सांगलीतल्या जलप्रलयाच्या थैमानाने स्मारकाची झालेली वाताहात पाहवंत नव्हती. सुदैवाने पूर्वसूचना दिल्याने काही स्वच्छता होतीच. प्रवेशद्वारांवरंच एका पाटीवर त्या वास्तुच्या तत्कालीन उद्घटनाची अक्षरे कोरलेली दिसली. भूतपूर्व पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी नि बाबारावांचे शिष्य हिंदुसभाई थोर चित्रपटकार श्रीभालजी पेंढारकरांच्या हस्तेच हे उद्घाटन झालं होते. त्यावेळी श्री अटलजींचे झालेलं व्याख्यानही उपलब्ध आहे. कथा क्रांतिवीरांच्या - विश्वास सावरकर

स्मारकांत श्रीबाबारावांची अत्यंत दिव्य अशी हातीं ग्रंथ घेतलेली बैठक असलेली तेजस्वी मूर्ती पाहून धन्यता वाटली. त्या नररत्नांस अभिवादन करण्यासाठी नकळंत हात जोडले गेले. इतक्या जलप्रलयाचा आघात सोसूनही मूर्तीवरचे तेज किंचितही ढळलं नव्हतं.

कार्यक्रमाचा आरंभ श्रीभंडारकवठेकरांच्या वेदमंत्रपठनाने नि श्री रामकृष्ण वीर महाराजांच्या हस्ते मूर्तीपूजनाने झाला. त्यानंतर महाराष्ट्र हिंदुसभेच्या वतीने चैत्र पाडवा पासूनच्या दिनदर्शिकेचे विमोचन झाले. पुढे नियोजित कार्यक्रमपत्रिकेनुसार श्रीतात्यारावांच्या अखिल हिंदु विजय ध्वज गीताने आरंभ होऊन  श्रीअभयसिंह कुलकर्णींचे प्रास्ताविक झालं. त्यानंतर मान्यवरांची व्याख्याने झाली तींत प्रामुख्याने हिंदुसभेचे श्री गांधी, श्री रामकृष्ण महाराज वीर, श्री तुकाराम चिंचणीकर (अस्मादिक) ह्यांचे चिंतन झाले. ह्यात उपरोल्लेखित श्री रघुवीर रामदासी ह्यांनीही संस्कृतमध्ये श्रीबाबारावांवर छानसं चिंतन प्रकट केलं. अंती अध्यक्ष श्री अरुण गडचेंचे ह्यांचे अध्यक्षीय चिंतन झालं.

कार्यक्रमाचे पूर्ण सूत्रसंचालन हे श्री विवेक बेणारे ह्यांनी केले. कार्यक्रमांस उपस्थितांची संख्या जरी न्यून म्हणजे वीस-पंचवीसच्या समीप असली तरी कार्यक्रम उत्साहांत पार पाडला. आटपाडीतले आमचे एक धारकरी मित्र नि बंधु श्री प्रथमेश देशपांडे आमच्या स्नेहाखातर उपस्थित राहिले. सांगलीतले स्थानिक मित्र श्री संदीपजी कुलकर्णीही उपस्थित होते. दुर्दैव इतकंच की अपेक्षेप्रमाणे सांगलीकरांची उपस्थिती फारंच न्यून होती. आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांची उपेक्षाही. अस्तु।

कार्यक्रमाची सांगता अध्यक्ष श्री बाळासाहेब डिंगरेंच्या आभारप्रदर्शनाने नि आमच्या वंदे मातरम गायनाने झाली...


ज्या सांगलीत श्रीबाबारावांच्या जीवनांतला अंतिम काळ गेला, त्याच वास्तुंत त्यांना अभिवादन करणे हे आमच्या दृष्टीने अत्यंत भाग्याचे लक्षण होते. क्रांतिवीरांना सर्व जग विस्मृतीच पाठवेल पण आह्मीं हिंदुसभाई मात्र हे सतीचे वाण कधीच त्यागणार नाही.

ह्या कार्यक्रमांत आह्मांस त्या भीषण जलप्रलयाने ओलसर झालेल्या काही ग्रंथांचीही प्राप्ती झाली. त्यावर सविस्तर पुढील लेखांत येऊच.

ह्या कार्यक्रमाच्या काही महत्वपूर्ण चित्रफीती

सौजन्य श्री रामकृष्ण महाराज वीर

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3037763949621784&id=100001646254878

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3037803272951185&id=100001646254878

आमचं वन्दे मातरम्

https://youtu.be/HAt-Ww5NiHw

सौजन्य श्री प्रथमेश देशपांडे

वि रा करंदीकरांच्या शब्दांतंच लेखणींस विराम देतो..

निज राष्ट्राच्या उदयासाठी
हिंदु जातीच्या विजयासाठी
तुमुल संगरी प्राणपणाने लढलें जे बेभान
मंगल ते बलिदान। त्यांचे। मंगल ते बलिदान।

भवदीय,

पंढरपूर हिंदुसभा

#क्रांतिवीर_बाबाराव_सावरकर_अमृतमहोत्सवी_पुण्यस्मरण_सांगली_अटलबिहारीवाजपायी_भालजीपेंढारकर

Wednesday, 11 March 2020

जगद्गुरु श्रीतुकोबारायांचे सदेह वैकुंठगमन - व्याकरणशास्त्रदृष्ट्या काही विचार




*वेदानिंदी चांडाळ, भ्रष्ट सुतकिया खळ।*
जगद्गुरु श्रीतुकोबाराय

वेदनिंदकांना चांडाळांची उपमा देणार्या जगद्गुरु श्रीतुकोबारायांची आज सदेह वैकुंठगमन तिथी...! जगद्गुरुंच्या वेदनिष्ठेंवर भविष्यांत कधीतरी लिहीनंच. आज तिथीने जन्मांस येणें हे आमच्या दृष्टीनेही परमभाग्यंच. प्रतिवर्षी श्रीतुकोबारायांच्या सदेह वैकुंठगमनासंबंधी काही चिंतन करतोच, सांप्रतही काहीसं. *ऐतिह्य प्रमाणांचा विचार करता रामायण-महाभारतकालापासून सदेह स्वर्गगमनाचे उल्लेख आहेत. श्रीतुकोबारायांचे चरित्रकार श्रीलक्ष्मण रामचंद्र पांगारकरांनी श्रीतुकोबारायांच्या चरित्रामध्ये हे उल्लेख सविस्तर दिलेले आहेत.* जिज्ञासूंनी तिथे अभ्यासावेंत ही विनंती.

हे स्वर्ग-नरक-वैकुण्ठादि लोक स्थानविशेष आहेत का ह्यासंबंधी एकवाक्यता आढळत नाही. हे स्थानविशेष नाहीत असे निरुक्तकार महर्षि श्रीयास्काचार्यांचे नि शबर स्वामी आदि पूर्वमीमांसकांचे मन्तव्य आहे. वेदमहर्षि श्रीपाद दामोदर सातवळेकर आदिंनी स्वर्गादि लोक हिमालयापलीकडील भाग आहे असे सांगितलं आहे. ह्या वादांत पडण्याचे हे स्थान नव्हे. प्रस्तुत लेखासंदर्भांत केवळ *वैकुण्ठ शब्दाच्या व्युत्पत्तीसंबंधी विचार करता हा शब्द प्रथम ऋग्वेदाच्या दशम मंडलांमध्ये प्राप्त होतो* हे आपणांस. त्याविषयी...

*इन्द्र नि वैकुण्ठ शब्दाचा अर्थ...*

*ऋग्वेदाच्या दशम मंडलामध्ये ४८-५० ही तीन सूक्ते आहेत, ज्यांचा ऋषि नि देवता हा इन्द्र-वैकुण्ठ आहे. ह्या सूक्तांमध्ये इन्द्र शब्दाने प्रत्यक्ष परमात्म्याचे अर्थात ईश्वराचे ग्रहण आहे.* सूक्ताच्या विस्तारांत जाण्याचे हे स्थल नसल्याने इन्द्र शब्दाच्या व्युत्पत्तीसंबंधी इतकंच सांगणं आवश्यक आहे की ह्या शब्दाच्या अनेक निरुक्ती किंवा व्युत्पत्त्या देता येतील. *इन्द्र शब्दाचे धात्वर्थाने पाहता ११ अर्थ होऊ शकतात. आमच्या आधीच्या अनेक लेखांत आह्मीं सिद्ध केल्याप्रमाणे वैदिक शब्द हे धातुज असल्याने एकापेक्षा अनेक धातुंनी त्यांची सिद्धी करणे संभव आहे.* विस्तारांत जाणे नाही.

*वैकुण्ठ ह्या शब्दाच्या व्युत्पत्तीच्या दृष्टीने विचार करता निरुक्तकारांनी "विगताः कुण्ठाः यस्य सः।" 'ज्यांच्या सर्व कुण्ठा अर्थात दुःखादि विकारांचा नाश झालेला आहे, असा तो.' किंवा "विकुण्ठमप्रतिहतं पदं मोक्षधाम तस्य स्वामी इन्द्र-वैकुण्ठः।"*

*'जिथे सर्व दुःखादि विकार समाप्त होतात, त्या मोक्षधामाचा स्वामी इन्द्र-वैकुण्ठ आहे. अर्थात परमात्म्याचे नाव इन्द्र-वैकुण्ठ आहे. कारण ईश्वराच्या ठिकाणी सर्वच दुःखादि विकारांची समाप्ती आहे.'*

श्रीतुकोबाराय वैकुंठास गेले ह्याचाच अर्थ त्यांच्या सर्व कुण्ठा समाप्त झाल्या. आत्मानंदाने परिपूर्ण असे ते आत्मस्वरुपांस प्राप्त झाले. हा विचार वैकुंठादि लोक स्थानविशेष न मानणार्यांसाठी आहे. क्षणभर हे मन्तव्य सत्य मानलं तरी श्रीतुकोबारायांचे वैकुंठगमन उपरोक्त निर्वचनांच्या आधारे सिद्ध होते. आणि जरी ते स्थानविशेष मानलं तरी ते सिद्ध होतंच. *वारकरी संप्रदायांतल्या अनेक अधिकारी सत्पुरुषांनी श्रीतुकोबारायांच्या वैकुंठगमनावर भाष्य केलंच आहे. त्यामध्ये प्रामुख्याने श्रीलक्ष्मण रामचंद्र पांगारकर, वारकरी संप्रदायाचे विद्यमान भीष्माचार्य श्रीनिवृत्ती महाराज वक्ते बाबा, हभप श्री रामकृष्णबुवा लहवीतकर, मंगेश रामचंद्र टाकी वगैरे वगैरे.*

*योगसामर्थ्यानेही श्रीतुकोबारायांचे वैकुंठगमन संभव आहे. पातंजल योगदर्शनामध्ये योग्यांस प्राप्त होणार्या अनेक सिद्धींचे वर्णन आहेच. जिज्ञासूंनी अधिक अध्ययनासाठी महर्षि श्रीपतंजलींच्या योगसूत्रांवरील श्रीव्यासकृतभाष्य नि त्यावरील भोजराजाची वृत्ति अभ्यासावी. पीडीएफ आहे. वामनकवींनी 'योगाची सिद्धि हे तुकारामीं' असे म्हटलंच आहे.*

*वैकुंठगमनासंबंधी शिवकालीन संदर्भ*

जगद्गुरु श्रीतुकोबारायांच्या सदेह वैकुंठगमनासंबंधी *प्रत्यक्ष श्रीशंभुछत्रपतींनी पुढे श्रीतुकोबारायांच्या चिरंजीवांस म्हणजे श्रीमहादोबांस वर्षासनाची सनद दिल्याचा उल्लेख श्रीसंभाजीकालीन पत्रसारसंग्रह मध्ये आहे. भाद्रपद शुद्ध पंचमी, शके १६०२चं आहे.* ते पत्र आह्मीं जोडलं आहेच.


जगद्गुरुंचे चरित्रकार श्रीलक्ष्मण रामचंद्र पांगारकरांनीही *श्रीशाहु छत्रपतींच्या संबंधीनेही सदेह वैकुंठगमन केल्याचे वर्णन केल्याचा एक उल्लेख केलाय. श्रीतुकोबारायांचे सुपुत्र श्रीनारायणबोवा ह्यांना श्रीशाहु छत्रपतींनी तीन गावं इनाम दिली आहेत. राज्याभिषेक शके ३० मध्ये.* तो संदर्भ निम्नलिखित

*"राजश्री तुकोबा गोसावी सत्पुरुष यांचे पुत्र नारोबा गोसावी याणी किले प्रसिद्धगडचे मुकामी आपले शिष्य सखोबा गोसावीं याबरोबर पत्र पाठवले तेथें लिहिलें की तुकोबा गोसावीं सत्पुरुष हे मौजे देहु उर्फ हवेली प्रांत पुणे भगवतकथा करिता अदृश्य झालें ही गोष्ट विख्यात आहे. त्याचे हाती पुज्या श्रींच्या देवाची मूर्तीची होत होती ती पूजा चालवींत आहे."*


आता प्रत्यक्ष दोन्ही छत्रपतींनीच वैकुंठगमन मान्य केल्यावर अन्यांचा प्रश्नंच येत नाही.

*तेंव्हा आजच्या पवित्रदिनी श्रीतुकोबारायांच्या चरणी कोटी कोटी अभिवादन नि शिरसाष्टाङ्ग दंडवत!*

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#जगद्गुरु_श्रीतुकोबाराय_सदेह_वैकुंठगमन_शंभुछत्रपती_शाहुछत्रपती_वारकरीसंप्रदाय

Thursday, 27 February 2020

मराठी किंवा महाराष्ट्री भाषेचा इतिहास - एक चिंतन


*इयें मराठीचियें नगरीं। ब्रह्मविद्येचा सुकाळुं करीं।*

कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती श्रीज्ञानोबाराय

भाषेच्या इतिहासाचा जेंव्हा आपण विचार करतो तेंव्हा वैदिक संस्कृत ही आदिभाषा आहे अशी सर्व प्राचीन अशा एतद्देशीय व्याकरणकारांची नि भाषाशास्त्रज्ञांची संमती आपणांस प्राप्त होते. वैदिक शब्दांवर आधारित नि वैदिक-पद-बहुला लोकभाषा जी ब्रह्मा आणि सप्तर्षींद्वारे सृष्ट्यारंभीच्या आदि मानवांमध्ये व्यवह्रत झाली, जिचा उल्लेख भरतमूनीने त्याच्या नाट्यशास्त्रामध्ये १७।२७ आणि २८ येथे अतिभाषा किंवा आदिभाषा असा केला आहे, अश्या ह्या मूल वैदिक संस्कृतपासून लौकिक संस्कृत नि प्राकृतभाषांचा विस्तार नि विकार पुढील काळांत झाला. वैदिक संस्कृतपासून उद्भवलेल्या किंवा विकार पावलेल्या प्राकृतभाषांमध्ये सर्वप्रथम जिचा आविष्कार झाला, ती म्हणजे शौरसेनी प्राकृत. ह्या शौरसेनी प्राकृतचे पुढे जे तीन प्रमुख भेद झाले, त्यामध्ये महाराष्ट्री ही प्रथम असून मागधी नि पैशाची ह्या दोन पश्चातच्या आहेत. प्राकृतभाषांच्या अध्ययनासाठी जो सर्वात प्रथम नि अधिकारी ग्रंथ असा जो उपरोक्त भरतमूनींचा नाट्यशास्त्र नावाने सुपरिचित आहे, ज्याचा कालावधी महाभारतकालाच्या पूर्वीचा आहे, त्या ग्रंथामध्ये १७।४८ येथे नाट्याचार्य श्रीभरतमूनींनी

*सर्वास्वेव हि शुद्धासु जातिषु द्विजसत्तमाः।*
*शौरसेनीं समाश्रित्य भाषां काव्येषु योजयेत्।*

असे म्हटलंय. विक्रम संवत पूर्व पांचव्या शतकांतले महान मीमांसक श्रीकुमारिल भट्टपाद हे त्यांच्या तंत्रवार्त्तिक ह्या अत्यंत प्रसिद्ध ग्रंथामध्ये

*मागध-दाक्षिणात्य-तदपभ्रंशप्रायासासाधुशब्दनिबन्धिना।*

असे म्हणतात. इथे मागधी व दाक्षिणात्यावरून महाराष्ट्री अथवा जैनीचा अभिप्राय श्रीकुमारिलभट्टांस आहे असे लक्ष्यीं येते. अपभ्रंशही आहे.

*महाकवी श्रीदंडीचा काव्यादर्श मधील संदर्भ*

ज्याचे पदलालित्य प्रसिद्ध आहे, असा श्रीदंडी त्याच्या काव्यादर्श ह्या ग्रंथामध्ये महाराष्ट्री अर्थात मराठीविषयी जे लिहितो  महत्वाचे आहे.

*महाराष्ट्राश्रयां भाषां प्रकृष्टं प्राकृतं विदुः।*
*सागरः सूक्तिरत्नानां सेतुबन्धादि यन्मयम्।*

महाराष्ट्रामध्ये बोलली जाणारी भाषा हींस लोक प्रकृष्ट प्राकृत समजतात. ह्यामध्ये सूक्तीरुपी रत्नांचा सागर आहे ज्यात सेतुबंध नावाचे काव्य रचलं गेलंय.

ह्या सेतुबंधग्रंथाच्या टीकेमध्ये रामदास नामक लेखकाने 'महाराष्ट्रभाषायां' असा शब्दप्रयोग केला आहे. कर्पुरमञ्जिरी ह्या ग्रंथामध्येही शौरसेनी व महाराष्ट्री दोन्हींचा उल्लेख आहे.

प्राकृतभाषेच्या बव्हतांश सर्व वैय्याकरणींनी एकमुखाने महाराष्ट्रींस सर्वोत्तम प्राकृत मानलं आहे आणि मुख्यतः तिचेच नियम दिले आहेत. विस्ताराने ह्यावर पुढे लिहुच.

पुरुषोत्तम नावाच्या व्याकरणकाराने त्याच्या 'प्राकृतानुशासन' नावाच्या ग्रंथामध्ये ११।१ येथे शौरसेनी व महाराष्ट्री अर्थात मराठी दोन्ही एकंच आहेत असे प्रतिपादन केलं आहे. आपल्याला अभिमान हवा की संस्कृतला सर्वांत जवळ भाषा कोणती असेल तर ती मराठी आहे. एक मराठीभाषिक म्हणून, महाराष्ट्रीय म्हणून आपल्या मातृभाषेच्या निर्मितीसंबंधी काहीसं चिंतन आवश्यक आहे म्हणून हा  लेखनप्रपंच.

*प्राकृत ही संस्कृतपासूनंच*

सर्व प्राचीन संस्कृत नि प्राकृत व्याकरणकार ज्यांत हेमचंद्र नावाचा जैन व्याकरणकार आहे, हा स्पष्ट लिहितो की प्राकृत ही संस्कृत पासून निर्माण आहे. त्याने वैदिक संस्कृत सर्व भाषांची जननी मानलीय. ईसवी सन पूर्व ५६ च्या विक्रमाच्या प्रासादांतला जो नवरत्नांपैकी एक असा कालिदास वगैरे, त्यांतलाच एक म्हणजे आचार्य वरऋचि हा प्रथितयश व्याकरणकार नि निरुक्तकार. हा संस्कृतबरोबर प्राकृत भाषांचाही व्याकरणकार होता. हा त्याच्या *प्राकृत प्रकाश* ह्या ग्रंथांतही लिहितोच की

*प्राकृत ही संस्कृत पासूनंच आहे. वैदिक संस्कृत सर्व एतद्देशीय भाषांची जननी आहे...*

सांप्रत काही ब्रेकिंग इंडिया फोर्सेस अर्थात भारत विखंडन शक्ती ह्या प्राकृत नि संस्कृत ह्यात भेद दाखवून,भेद आहेच, पण तो भेद आर्य विरुद्ध अनार्य वादासाठी दाखवून हिंदु समाजांत फुट पाडण्याचे काम करताहेत. सूज्ञांनी सावध रहावे ही विनंती. भविष्यांत ह्यावर विस्ताराने येऊच.

भवदीय,

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#संस्कृत_प्राकृत_मराठीभाषा_महाराष्ट्री_भरतमूनी_वरऋचि

Saturday, 22 February 2020

#मार्क्सवाद_आणि_भारतीय_इतिहासलेखन #लेखांक_प्रथम




The history of hitherto existing society is the history of class struggle.

Communist Manifesto - Karl Marx and Frederic Engels
London 30th January, 1888

ख्रिस्ती मिशनरी(हे आह्मीं मागेच सिद्ध केलंय) अशा मार्क्सने नि त्याचा साथीदार एंजल्सने त्यांच्या उपरोक्त ग्रंथामध्ये मध्ये अगदी आरंभीच म्हटलं आहे की सर्व मानवजातीचा किंवा समाजाचा इतिहास हा केवळ वर्ग-संघर्षाचा इतिहास आहे. मार्क्सचे हेच वाक्य अगदी प्रमाण मानून पुढे सर्व मार्क्सवाद्यांनी ह्यावरूनंच सर्व विश्वाचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही मार्क्सवादी इतिहासकाराची पुस्तके पाहिली तरी हीच मांडणी आपणांस दिसून येते. अगदी ह्या उपरोक्त एंजल्सचे The Origin of the Family, Private Property and the State हा ग्रंथ वाचला तरी हीच मांडणी लक्ष्यी येतें. यद्यपि हा ग्रंथ हेगेल्सच्या ग्रंथांस प्रतिवाद होता. मार्क्सवाद्यांनी हा विश्वेतिहास निम्नलिखित चार अवस्थांमध्ये कोंडून टाकलाय, त्या म्हणजे

१. Primitive Communism - प्रारंभिक साम्यवाद
२. Slavery - गुलामगिरी
३. Feudalism - सामंतशाही किंवा सरंजामशाही
४. Capitalism - भांडवलशाही

सर्व मार्क्सवाद्यांच्या मते सर्व जग किंवा कोणताही मानव-समुह ह्या चार अवस्थांमधून गेलेलाच असतो. आणि म्हणून ह्या चार अवस्थांमधून जगाला बाहेर काढणं व शेवटी साम्यवाद अर्थात Communism कडे वळविणे, हेच त्यांचे उद्दिष्ट असतं. त्यांच्या दृष्टीने साम्यवाद ही आदर्श व्यवस्था असते.

अगदीच एतद्देशीय उदाहरण द्यायचे तर भारतात मार्क्सवादी पक्षाची संस्थापना करणारे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे ह्यांचं India from Primitive Communism to Slavery हा ग्रंथ जिज्ञासूंनी अभ्यासावा. त्यातही डांग्यांनी हीच मांडणी केलेली आपणांस दिसून येते....

आता प्रश्न असा पडतो की भारतीय इतिहासाला ही मांडणी लागु पडते का???

तर उत्तर नाही असे येतं.

कारणमीमांसा निम्नलिखित

मार्क्सने नि एंजल्सने केलेली ही वर्गसंघर्षाच्या इतिहासाची मांडणी भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने कोणत्याही पुराव्याशिवाय व इतिहासाच्या प्रमाण व आधाराशिवाय होती.

अर्थात भारतातल्या नेहरुप्रणीत मार्क्सवाद्यांनीही भारताच्या समग्र इतिहासाची मांडणी करताना ह्याचपद्धतीने मांडणी केलीय. दुर्भाग्य म्हणजे भारतीय इतिहासात ही मांडणी कुठेही बसत नाही. तरीही गेली सत्तर वर्षे हीच इतिहासाची परंपरा आपण वाचतो आहोत व त्याविरुद्ध स्वर उठविण्याचे सामर्थ्यही आपल्यांत नाही. मार्क्सवादी इतिहासकारांनी केलेला इतिहासद्रोह हा विषय यद्यपि विस्ताराचा असला तरी ज्याची सद्सद्विवेकबुद्धी जागृत आहे असा मनुष्यही त्यांची लेखनशैली समजून घेऊ शकतो. ह्यावर विस्ताराने आह्मीं मागे एक लेख लिहिला होता Marxism and the writing of Indian History नावाने...

सविस्तर पुढील लेखांकात येऊच...

#साम्यवाद_सप्ताह_इतिहासाच्या_पाऊलखुणा

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

Wednesday, 12 February 2020

वेदोद्धारक ऋषिश्रेष्ठ महर्षि श्रीमद्दयानन्द सरस्वति जयंतीविशेष...



भगवान पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्य, मीमांसक श्रीकुमारिल भट्ट, मीमांसक श्रीउदयनाचार्य ह्यांच्या परंपरेमध्ये ज्या आदित्य बालब्रह्मचारी-उर्ध्वरेतस्-ब्रह्मवर्चसी अशा ऋषिश्रेष्ठाचे स्मरण व्हावं अशा योग्याची आज जयंती...भगवान श्रीपरशुरामवत् अन्यायसंहारी, श्रीबृहस्पतिवत् वेदवक्ता, श्रीवसिष्ठवत् वेदप्रचारक, सत्यवक्ता, निर्भीड, दीर्घदर्शी, समदर्शी, वाग्मी, जितेंद्रिय, सुवक्ता असा निर्म्मल, निर्विकार, समुद्रवतगंभीर, पृथ्वीवत् क्षमाशील, अग्निवत् दैदिप्यमान, पर्वतवत् कर्तव्यस्थिर, सदैव ब्रह्मपरायण असा हा ऋषिश्रेष्ठ...

काय लिहावं ह्या महापुरुषाविषयी? अनेक महापुरुषांची जीवनचरित्रे अद्यापपावेतो अभ्यासली पण ह्या योग्याचे चरित्र काही निराळंच आहे.

*सविकल्प समाधी अवस्था प्राप्त करूनंच मग वेदार्थ प्रकट करणारा हा ऋषिश्रेष्ठ वेदोद्धारक...

निरुक्तकारांनी भारतवर्षाच्या युद्धापश्चांतचं चित्र रेखाटताना तत्कालीन परिस्थितीचे वर्णन करताना *"को नः ऋषिर्भवति"* ह्या प्रश्नाचे उत्तर देताना जे म्हटलंय ते अगदी सार्थ आहे. *तर्क हाच ऋषि. ह्या तर्क नावाच्या ऋषीचा अर्थात उहेचा विनियोग ज्याने आपल्या बृहस्पतिसमान प्रगल्भ बुद्धीने केला,त्या ऋषिश्रेष्ठाची आज जयंती...*

प्रत्येक वेदमंत्रांचे किंवा तत्संबंधित सूक्ताचे भाष्य करण्यापूर्वी तासन्तास समाधी लाऊनंच मगंच वेदार्थ प्रकट करणारा हा वेदभाष्यकार...

*"मला चारीही वेदांचे समग्र भाष्य करायला चारशे वर्षे लागतील..."*

असे सांगणारा हा वेदानुशीलनकर्ता...

ह्या ऋषिश्रेष्ठाचे वेगळेपण ते काय की त्याची इतकी स्तुती करावी???

*स्त्रियांना व शुद्रांनाही वेदांचा अधिकार जो पूर्वी होताच, तो मागील काळांत नाकारला गेला, तो वेदांच्या अंतःसाक्षीच्या आधारेच सर्व मानवज्ञातींस प्रदान करणारा हा समदर्शी अखिलमानवहितकर्ता...*

*आर्ष ग्रंथांचा उद्धारकर्ता...*

अनार्ष ग्रंथांमुळे वैदिक धर्मांस आलेल्या ग्लानींस दूर करण्यासाठी नि विशुद्ध वैदिक मताच्या पुनर्संस्थापनेसाठी ज्याने आर्ष अर्थात ऋषिप्रणीत ग्रंथांचाच आयुष्यभर पुढाकार केला नि त्यांचाच निर्भयपणे प्रसार केला असा हा सत्यनिष्ठ ऋषि. *कौमुदी, चंद्रिका, सारस्वत, मुग्धबोध, आशुबोध, मनोरमा आदि अनार्ष व्याकरण ग्रंथांनी वैदिक व्याकरणाविषयी नि वेदार्थ प्रतिपादनाविषयी जो काही गोंधळ मधील काळांत निर्माण झाला, तो धातुपाठ, अष्टाध्यायी नि व्याकरण महाभाष्याच्या अध्ययनाने अर्थात आर्ष ग्रंथांच्या अध्ययनाने नि प्रसाराने ज्याने दूर केला नि वेदार्थाची वाट सूकर केली, अशा व्याकरणसूर्याची आज जयंती. ज्याचे वर्णन व्याकरणसूर्य नि महान वैय्याकरणी असंच करावं लागेल असा हा वैय्याकरणी. काशीच्या ज्या शास्त्रार्थांस यावर्षी १५० वर्षे पूर्ण झाली, त्या शास्त्रार्थांत ज्यांनी पातंजल महाभाष्यांतली कल्म संज्ञा सनातनी विद्वानांना विचारतांच जे निरुत्तर झाले, ज्याने संस्कृत व्याकरण अतिशय सुलभ केलं आणि ज्याच्या परंपरेतल्या "पदवाक्यप्रमाणज्ञ वारावारिणः" अशा ब्रह्मदत्त जिज्ञासु नि युधिष्ठिर मीमांसकजींसारख्या वैय्याकरणींनी ही पदवी सार्थ केली, असा तो वैय्याकरणसूर्य...*

हिंदुंना अर्थात आर्यांना विशुद्ध वैदिक मत प्रदान करताना ज्याने अन्य अवैदिक मतांचीही समीक्षा अत्यंत तर्ककठोर नि अभ्यसनीय पद्धतीने केली नि ज्यामुळे अनेक मूळच्या हिंदु असलेल्या परंतु परपंथांत गेलेल्या लक्षावधींनी वैदिक धर्माचा स्वीकार केला, अशा *सत्यार्थ प्रकाश* नामक एका अद्वितीय ग्रंथांचा जो रचयिता... *एकीकडे सर्वधर्म एकाच ईश्वराप्रती जातात असा भोंगळ सिद्धांत मांडणारे एतद्देशीय भलेभले विद्वान असावेंत, अशांच्या मांदियाळींत सर्व पैशाचपंथांची चिकित्सा तर्काच्या नि वैदिक मताच्या आधारे करणारा हा धर्माचा पुनर्संस्थापनकर्ता...*

*शास्त्रार्थ महारथी...*

वैदिक हिंदुंची अत्यंत प्राचीन अशी शास्त्रार्थ परंपरा ज्याने पुनरुज्जीवित केली नि अनेक शास्त्रार्थांमध्ये पैशाचपंथींसहच स्वकीय अशा काही भरकटलेल्या मतानुयायींनाही ज्याने शास्त्रार्थांत पराभूत करून वैदिक पथांवर आरुढ केलं, अशा लेखारंभी उल्लेखिलेल्या शास्त्रार्थ महारथींच्या रांगेत बसणारा हा प्रखर वेदनिष्ठ...

*स्वातंत्र्याचा उद्गाता...*

लोकमान्य टिळकांनी म्हटल्याप्रमाणे स्वराज्य ही संकल्पना सर्वप्रथम महर्षि दयानंदांनीच मांडली. इतकं पुरेसंय.

*हिंदुसमाजाचा सत्यनिष्ठ उद्धारकर्ता...*

तत्कालीन सर्व अनिष्ठ रुढी नि प्रथांना प्रखर विरोध करणारा नि सर्व हिंदुंचे संघटन करणारा उद्धारकर्ता...

*ह्या सर्व लोकोद्धाराच्या महान कार्यासाठी ४४ वेळा प्राणहरणाचे कष्ट सहन केलेला, ज्यातले सतरा प्रयोग हे विषपानाचे आणि इतकं होऊनही सर्वांस क्षमा करणारा क्षमाशील...*

काय नि किती लिहावं...

*लेखणी बोथट होते, वाणी हिंपुटी होते...*

ह्या ऋषिवर्यांस जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन....!

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#ऋषिश्रेष्ठ_महर्षिश्रीदयानंद_जयंतीविशेष_वेदोद्धारक_आर्यसमाज_सत्यार्थप्रकाश

Friday, 31 January 2020

#गांधींचे_खरे_मारेकरी_कोण??? #पटेल_नेहरु_की_काँग्रेस???



*गांधीवाद त्यादिवशीच संपला, ज्यादिवशी आह्मां ब्राह्मणांच्या सरसकट कत्तली झाल्या नि घरं जाळली गेली, जमिनी गेल्या. माझ्या आजोबांचे घर जाळलंय बरंका. नाही म्हणजे काही गांजेकस आज हे खोटंय म्हणतात म्हणून. पण तो इतिहास आह्मीं विसरलो नि पुढे आलो. विद्रोह करत बसलो नाही की कधी एल्गार पण केला नाही. आह्मीं चोवीस तास ते रेटतही बसलो नाही नि पुढे रेटणारही नाही. असो...*

पण त्या गांधींचा नि गांधीवादाचा खरा मारेकरी कोण हा शोध अद्यापही घेणं आवश्यक आहे.

*अनेक प्रश्न आहेत, जे अनुत्तरित आहेत.*

उदाहरणार्थ...

*अनेकवेळा काँग्रेस विसर्जित करा असं म्हणणारे गांधी काँग्रेसला नकोसे झाले होते का???*

*गांधीवध ही गांधींच्या ५५कोटींच्या हेकेखोरीचाच परिणाम आहे असे कथित सरदार पटेल राजाजींना म्हटल्याचे राजाजींनी गांधींजींवरच्या चरित्रांत स्पष्टपणे लिहिलंय. कपुर कमिटी रिपोर्टमध्येही हा संदर्भ आहेच. आह्मीं मागेही ह्यावर ससंदर्भ लिहिलं होतंच.*

गांधींनी बहुमत असताना पटेलांना डावलून नेहरुंना पंतप्रधानपदावर बसवलं हा घाव पटेलांच्या वर्मी लागला नसेल कशावरून???

पटेलांचा भला मोठा पुतळा गुजराती मानसिकतेतून उभारल्याने पटेलांच्या पडद्यामागच्या चरित्रांकडे पहायला आह्मीं तयारंच नाही आहोत.

*महाराष्ट्रांपूरता विचार करता पटेल हे अत्यंत गुजराती मानसिकतेचे महाराष्ट्रद्वेष्टे होते ह्याचे अनेक संदर्भ उपलब्ध आहेत. पटेलांनी संयुक्त महाराष्ट्राच्या संग्रामांस केलेला प्रखर विरोध तर सर्वांस ज्ञात आहे. पटेलांच्या अंतःकरणांत महाराष्ट्रीय ब्राह्मणांविषयी असलेला रागही अनेकांना ज्ञात नसला तरी तो कागदोपत्रांतून नि त्यांच्या व्याख्यानांतून नि कृतीतून दिसतोच. हिंदुराष्ट्रपती श्रीस्वातंत्र्यवीरांच्या पुढाकाराने आरंभ झालेला नौदल सत्याग्रह दडपून टाकण्यांत पटेलांचा वाटा सर्वांनी एकदा अभ्यासावाच. हे पटेलांचे कृत्य किती घातकी नि नीचपणाचे होते हे सूज्ञ जाणतीलंच.*

*इतकंच काय पण गांधीवधापश्चात श्रीसावरकरांना अकारण कारावासांत डांबणारे सावरकरद्वेष्टे पटेल हे सरदार त्यांच्यासाठीच अर्थात सावरकरद्वेष्ट्यांसाठीच असु शकतात, आमच्यासाठी ते सरदार नाहीतंच नि होऊही शकत नाहीत. अर्थात पटेलांची कुंडली मांडायची ही वेळ नव्हे.* पण पटेल गांधीवधाच्या मागे असतील ही शक्यता नाकारता येत नाही. भले काहींना हे सर्व सत्य जाणून घ्यायची इच्छा नाहीच. कारण आता पुतळा उभारलाय ना???

*गांधींना मारायचे सहा-सात प्रयत्न खरंच झाले होते का???*

काही जण बेंबीच्या देठापासून सतत बोंबलताना दिसतात की म्हणे गांधीवधाचे आधीही प्रयत्न झाले होते. *हे विधान कपुर कमिटी रिपोर्टने पूर्ण असत्य ठरविले आहे, जो स्वतः काँग्रेसने संस्थापिला होता. त्यामुळे ह्यात तथ्य तर काहीच नाही.* पण क्षणभर असे प्रयत्न सत्य मानले तरी प्रश्न निर्माण होतो की मग इतक्या वेळ ही काँग्रेस, नेहरु-पटेलादि गांधीभक्त झोपा काढत होते काय???

एकीकडे गांधींना राष्ट्रपिता म्हणून मिरवायचं नि दुसरीकडे गांधीजींच्या सुरक्षेमध्ये ढिलाई करायची...हा कुठला न्याय???

*गांधीजीको मरने दो, हमें हमारा हक दो अशा घोषणा अनेक गांधीवाद्यांनीच केल्याचा स्पष्टोल्लेख आहे. अगदी सरोजिनी नायडुही गांधींवर चिडल्याचा उल्लेख आहे.*

*बरं ह्या सर्वांत नेहरु काय झोपा काढत होते का ?*

*गृहखाते काय करत होते ? कारण गृहमंत्री तर पटेलंच होते.*

ह्या सर्व गोष्टी कशाचा निर्देश करतात???

आता ह्यातून त्यांचा लाभ नेमका काय होता असा प्रश्न पडतोच...

गांधी काँग्रेस संपवायला निघाले होते, जे पटेल-नेहरुदिंना नको होते. त्यामुळे त्यांचा काटा काढणं आवश्यक होते. त्यामुळे गांधीवधाचे संभाव्य लाभ ह्यांना निम्नलिखित होते.

१. *गांधी गेल्यामुळे काँग्रेस वाचली हा प्रथम लाभ...*

२. *गांधीवधातून हिंदुत्ववादी चळवळ पूर्ण बदनाम करता येईल नि विशेषतः हिंदुसभेला नि संघाला संपविता येईल ही पटेलांची योजना असावीच.* अर्थात पुढे संघानी गोळवलकरांच्या नेतृत्वाखाली सोडवणूक करून घेतली. त्यावर पुन्हा केंव्हातरी...

३. *पटेल ब्राह्मणद्वेष्टे होतेच. त्यामुळे पंडित नथुराम गोडसेंना हाताशी धरून महाराष्ट्रांतली ब्राह्मणद्वेषाची लाट आणखी मोठी करता येईल हा पटेलांचा सूप्त हेतु असु शकतोच. आम्ही वरंच लिहिलंय की पटेलांच्या मनांत महाराष्ट्रीय ब्राह्मण नि त्यातही चित्पावनांविषयी विशेष द्वेष होता.* ह्याचे संदर्भ उपलब्ध आहेतंच.

४. *महाराष्ट्राची प्रतिमा कायमची मलीन करता येईल.*

५. *गांधीवधाच्या सहानुभूतींवर काँग्रेसला सतत सत्तेत राखता येईल..*

आणखीही खूप प्रश्न आहेत. तूर्तांस इतकंच.

विस्ताराने पुढे येऊच.

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#गांधीवध_पटेलनेहरु_काँग्रेस_संगनमत

Monday, 13 January 2020

उदीच्यै दिशे सोमाय च नम: ।




आम्ही हिंदु आमच्या नित्याच्या संध्येमध्ये जे दशदिशांस दिग्वंदन करतो, त्यात उत्तरदिशेंस उपरोक्त शीर्षक मंत्रांने अभिवादन करतो. आमच्या प्राचीन ऋषिमूनींनी आम्हा हिंदुंना तो विश्वदिग्विजयाचा वारसा प्रदान करताना दशदिशांचे हे दिग्वंदन ऋग्वेदाच्या कृण्वन्तो विश्वमार्यम् ह्या मंत्राज्ञेने दिला. आणि म्हणून तो वारसा नित्याच्या संकल्पांत आम्ही सानंद गातो.

भगवान वेदप्रणीत विश्वदिग्विजयाची आकांक्षा उरी बाळगणारे नि तदनुसार सर्व विश्वभर संचार करणारे हिंदु मधील काळातल्या बौद्ध नि जैनांच्या आत्यंतिक अहिंसेच्या रेट्यामुळे ह्या सत्वस्वाभिमानांस विस्मृत झाले आणि षंढ नि आत्मघातकी अहिंसेची भोंगळ गप्पाष्टके गात बसले. क्षात्रतेजाने हीन झालेला हा हिंदु समाज म्हणूनच अडीच सहस्त्र वर्षे ग्रीक(यवन), शक, कुशाण, हुण, म्लेंच्छ, मुसलमान, इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच ह्या सर्वांस रणी धुळींस मिळवत आलाच हेही तितकंच सत्य.

ह्याच मधील काळात धर्मांध म्लैंच्छ अर्थात मूस्लिमांच्या परकीय आक्रमणांस पुण्यश्लोक श्रीशिवप्रभुंच्या, श्रीशंभुछत्रपतींच्या खड्गाच्या धारेने जे हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेने तेजस्वी प्रत्युत्तर दिलं, त्याच स्वराज्याचं साम्राज्यात रुपांतर करून थोरल्या श्रीमंत बाजीरावांनी हा वारसा पुढे मराठ्यांना हस्तांतरित केला.

तो वारसा म्हणजेच पानिपत...!

*पुण्यश्लोक श्रीशिवप्रभुंच्या दक्षिणदिग्विजयापश्चात उत्तर दिग्विजयाचे स्वप्न पूर्ण करण्यांस उदीच्येंस प्रस्थान करणारे तेजस्वी नि रणधुरंधर मराठे नि त्या विजीगीषु परमोज्ज्वल इतिहासाचा तो क्षण म्हणजेच पानिपत !*

त्या आधी एक वर्ष...

*बचेंगे तो और भी लढेंगे ।*

*दत्ताजी शिंदे रणामाजी विद्ध्य...*
रचना - परमादरणीय श्रीसंभाजीराव भिडे गुरुजी 

१० जानेवारी, १७६०

महाभारतातला एक प्रसंगय. धनुर्धर वीरश्रेष्ठ अर्जुनाच्या श्रीकृष्णभगिनी सुभद्रेपासून जन्मलेल्या अभिमन्यु नामक वीरांस कौरवांनी सर्वांनी मिळून युद्धनियमांच्या विरुद्ध जाऊन रणी धूळींस मिळवलं. तरीही त्या तेजस्वी युवकाच्या मुखातून त्यावेळी जे शब्द पडले असावेत पण जे इतिहासाला नि भारतकारांना ज्ञात असावेत; परंतु ते शब्दबद्ध झाले नसावेत, त्यापरीची ती प्रेरणा तरी तीच असावी, तसेच हे दत्ताजींचे उपरोक्त शब्द.

त्यादिवशी त्या रणधुरंदर दत्ताजी शिंदेंच्या त्या देहांस गिलच्यांनी धरतांच दत्तांजींस तो प्रश्न केला.

*क्यौं पटेल और लढोगे ?*

तेंव्हा वारस होऊ अभिमन्युचे असा तेजस्वी बाणा अंगी धारण केलेल्या त्या दुध आईचे तेजप्रवाही नसांतूनी सळसळणार्या त्या दत्ताजींनी तितक्याच बाणेदारपणे त्यांस उत्तर दिलें.

*हाँ बचैंगे तो और लढेंगे ।*

ज्या धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे कौरव पांडवांचे पंचेचाळीस लक्षांचे देह संगरी शोणितांस प्राप्त झाले, त्याच भूमींस तो उत्तरदिग्विजय पुढे एक वर्षांनी मराठ्यांनी त्याच पानपतांवर साकार केला.

*लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले, २७ मोहरा हरवल्या, आणि चिल्लरखुर्दा किती गेल्या ह्याची गणतीच नाही.*

काय आवश्यकता होती मराठ्यांनाच पानपतांवर जायची ? काय आवश्यकता होती लाख बांगडी फोडायची ? का ? कोण तो अब्दाली ? कुठली ती दिल्लीतली खिळखिळी झालेली पातशाही ? तिच्या संरक्षणासाठी नि अब्दालीचे संकट मोडण्यासाठी काय कारण म्हणून मराठ्यांनी स्वराज्य सोडून पानपतांवर जायचं ?

ह्याचे उत्तर आम्ही हिंदु मराठे म्हणून जेंव्हा स्वत:स विचारु, तेंव्हाच आमच्या ह्या परमोज्ज्वल इतिहासाचे दिग्दर्शन आम्हांस प्राप्त होईल.

*ते उत्तर आहे महाराष्ट्रधर्म ह्या शब्दांत.*

इथे मराठा ही वृत्ती आहे, जात नव्हे. देव, देश नि धर्माच्या रक्षणासाठी भगवा ध्वज हाती घेऊन उरी नि मुखांत तो हर हर महादेवाचा मंत्र घेऊन स्वराज्यरक्षण नि वृद्धीसाठी दिगदिगांतात भ्रमण करणारा तो तेजस्वी मराठा.

*बहोत लोक मेळवावें, एक विचारें भरावें ।*
*कष्टें करुन घसरावें, म्लेंच्छावरिं ।*

ह्या समर्थोक्तीप्रमाणे नि

*आमुचा स्वदेश ।*
*भुवनत्रयामध्ये वास ।*

ह्या जगद्गुरु तुकोक्तीप्रमाणे सर्व विश्वसाम्राज्य संपादन करण्याची अभिलाषा अंत:करणांत धारण करणारा तो हिंदु मराठा !

*इतिहासाचार्य वि का राजवाड्यांच्या भाषेत सहिष्णु हिंदुंस जयिष्णु करणारा तो मराठा नि त्याचा तो विजीगीषु असा महाराष्ट्रधर्म !*

पानपत समजून घ्यायचे असेल तर मागेच म्हटल्याप्रमाणे इतिहासाचार्य वि का राजवाड्यांचा *मराठ्यांच्या इतिहासाची साधने - खंड एक - १२७ पृष्ठांची द्वादश प्रकरणात्मक प्रस्तावना* नि त्यानंतर रियासतकार सरदेसाईंची *मराठी रियासत : मध्य विभाग ३: पानिपत प्रकरण (१७५०-१७६१)* आणि शंकर नारायण जोशींचे  *भाऊंच्या वीरकथा व पानिपत कुरुक्षेत्र वर्णन* हेही वाचनीय आहे. अभ्यासायला हवं. आणि शेवटी श्री उदय कुलकर्णींचे *सौल्स्टिस एट पानिपत* हे मूळ आंग्ल किंवा त्याचा मराठी अनुवाद तरी.

हे ग्रंथ पानपत आकळण्यासाठी अत्यावश्यकच आहेत.

इतिहासाचार्य लिहितात.

*गिलच्यांच्या धिप्पाड आणि अर्बुद शरीरांपुढे मराठ्यांच्या लहान व वामन मूर्तीचा टिकाव लागला नाही म्हणून एक आक्षेप आहे. गिलच्यांच्या लांबी रुंदी पेक्षा मराठ्यांच्या शरीराचें क्षेत्रफळ कदाचित लहान असेल परंतु लढाईत या क्षेत्रफळावर मोठी भिस्त असते असे नाही. कर्नाटकातील राठ आणि धिप्पाड शेतकरी, मथुरावृंदावनातील गलेलठ्ठ बैरागी, पंजाबातील उंच धिप्पाड व ठिसुळ शीख, रजपुतान्यातील रुंद छाताडाचे व भरगच्च मासाचे राठोड,  या सर्वांना लहान्या परंतु काटक मराठ्यांनी वेळोवेळी चीत केले होते. त्या मराठ्यांना अर्बुज गिलचांचे किंवा पृथ्वीच्या पाठीवरील कोणत्याही मनुष्याचे भय मागे कधीं वाटले नाही व पुढे कधीं वाटणारही नाही.*

पृष्ठ क्रमांक ९१ - मईसा खंड प्रथम - प्रस्तावना

*पानपत आपण खरंच हरलो का ?*

शं ना जोशींनी पानपताविषयी जे अंतिम मत उपरोक्त ग्रंथात व्यक्त केलंय ते पाहुयांत.

*पानिपतचा हा संग्राम मराठ्यांची कीर्ति यावच्चंद्रदिवाकरौ उज्ज्वल राखील; कितीही राज्यक्रांत्या किंवा घडामोडी झाल्या तरी या पानिपतच्या आठवणीनें मराठ्यांच्या बाहूंस स्फुरण चढेल, आणि कोणत्याही देशाचे राज्य करण्यांस मराठे सर्वथैव लायक आहेत याची खात्री हा प्रसंग निरंतर पटवीत राहील यात तिळमात्र शंका नाही.*

एवंच ह्या इतिहासांस वंदन करून नि त्या सर्व नररत्नांस त्यांच्या असीम त्यागासाठी नि अपरिमित शौर्यासाठी दंडवत करून लेखणींस विराम देतो !

जयोस्तु हिंदुराष्ट्रम् !
जयोस्तु महाराष्ट्रधर्म !
जयोस्तु राष्ट्ररक्षक मराठा !

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#पानिपत_राष्ट्ररक्षकमराठे_जयिष्णुहिंदु_महाराष्ट्रधर्म_राजवाडे_उत्तरदिग्विजय