Tuesday, 31 October 2023

मी महर्षि श्रीमद्दयानंदांना का मानतो???

 


कालच्या ३० ऑक्टोंबरच्या आंग्ल दिनांकाने पुण्यस्मरणानिमित्त (तिथीने दीपावली अमावस्या)

भगवान श्रीरामकृष्णादि अवतार परंपरा, भगवत्पाद श्रीमच्छंकराचार्यादि आचार्यश्रेष्ठ, श्रीज्ञानोबा-तुकोबादि संतपरंपरा इतक्या उज्ज्वल परंपरा असताना श्रीदयानंद नामक कुणीतरी नवीन आर्यसमाजी मत प्रस्थापित करणाऱ्याच्या भजनी लागायचं काय कारण असावं? तारुण्यात मनुष्याला बऱ्याच वेळा काहीतरी नवीन किंवा वेगळं अशाचं आकर्षण असतं, अशा तारुण्यसुलभ भावनेने आह्मीं महर्षि श्रीदयानंदांचे अनुयायी आहोत काय ??

ज्या श्रीदयानंदांनी वेदांकडे चला म्हणत निम्नलिखित सर्व मते ही वेदविरुद्ध आहेत असे म्हणत हिंदुंची विग्रहपूजा अर्थात मूर्तीपुजा नाकारली, अवतारवाद नाकारला, वैदिक यज्ञांमध्ये पशुहिंसा किंवा बळीप्रथा नाकारली, कपाळावर गंध, माळा आदि कर्मकांड नाकारलं, अस्पृश्यता नाकारली, जन्मजात वर्णव्यवस्था नाकारत ती गुणकर्माधिष्ठित मांडली, फलज्योतिष नाकारलं, संतपरंपरा काहीअंशी नाकारल्या, श्रीमद्भागवतादि पुराणे नाकारली, गंगादि नद्यांचे तीर्थत्व नाकारलं, मध्ययुगीन स्मृत्या नाकारल्या, वेदविरुद्ध प्रक्षेपांच्या नावाने त्यांच्या सैद्धांतिक बैठकीनुसार ते नाकारलं, धर्मसिंधु-निर्णयसिंधु-तर्कसंग्रह-सिद्धांतकौमुदि आदि ग्रंथ अनार्ष म्हणून जितके वेदविरुद्ध तितके नाकारले, एवढा सर्व प्रचलित 'सनातन धर्म' नाकारत एक वेगळीच चूल मांडायचा घाट घातला ते श्रीदयानंद आह्मांला इतके प्रिय कसे???

सायण-महीधरादि आधीचे सर्व वेदभाष्यकार काहीअंशी चुकीचे व मीच तेवढा खरा वेदार्थ जाणणारा ही भावना बाळगणारे किंवा तसे मांडणारे श्रीदयानंद आह्मांस इतके प्रिय कसे???

जे काही प्रचलित आहे ते सर्व वेदविरुद्ध आहे व मी सांगतोय तेच खरं वेदसंमत ही श्रीदयानंदांची साहित्यातून दिसणारी वृत्ती कितपत स्वीकारार्ह्य आहे???

हे सर्व काम त्यांनी ब्रिटीशांच्या प्रभावाने केलं आहे काय?खरंच श्रीदयानंद काहीतरी वेगळीच चुल मांडणारे आहेत काय? आधीच्या बव्हतांश परंपरा व प्रचलित सनातन धर्म नाकारण्यांत श्रीदयानंदांचा खरंच काही दुष्ट हेतु होता का???

कालच्या श्रीदयानंदांच्या आंग्लदिनांकाने पुण्यतिथीनिमित्त या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न हा पूर्वीही खरंतर आमच्या दीडदोन तासाच्या फेबुलाईव्हमध्ये आह्मीं मागेच केला आहे, तरीही पुनः संक्षेपांत विवरण करणं आवश्यक असल्याने हा लेखनप्रपंच...!

मूळात श्रीदयानंद स्वीकारणे म्हणजे आधीच्या सर्व परंपरा नाकारणे असा अर्थ होतंच नाही, त्यामुळे हा भ्रम आधी दूर करणे आवश्यक आहे.

श्रीदयानंदांचा सत्यार्थ प्रकाश हा अजरामर ग्रंथ वाचताना आरंभी आरंभी हे जाणवतं की हा माणुस खरंच आपल्या सर्वच परंपरा नाकारतोय आणि तेही वेदांच्या नावाखाली??? म्हणजे आधीचे सर्व वेडे व हाच एकटा शहाणा? हे कितपत स्वीकारार्ह्य आहे याच प्रश्नांची उकल करण्याचा हा प्रयत्न...

श्रीदयानंदांचं म्हणणं इतकंच होते की धर्माधर्माचा निर्णय करताना वेदांच्या चार संहिता याच सर्वोच्च प्रमाण आहेत ही प्रत्यक्ष मनुमहाराजांची आज्ञा आहे, त्यामुळे त्याच्या जे अनुकूल तेच ग्राह्य व जे प्रतिकुल ते अग्राह्य ही त्यांची भूमिका होती. ही भूमिका वरवरपाहता अनाठायी वाटत असली तरी श्रीदयानंदांनी तिच्या पुष्ट्यर्थ प्रत्येक ठिकाणी तर्कशुद्ध प्रमाण सादर करूनच आपल्या भूमिकेचे समर्थन केलं आहे. आज उपलब्ध असलेला प्रचलित सनातन धर्म हा मूळ वैदिक सिद्धांतापासून बराच दूर गेला आहे हे त्यांचे निरीक्षण, जे आह्मांसही मान्य आहेच, ते त्यांनी अनेक प्रमाण प्रस्तुत करून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यांची मते मांडताना व आधीची नाकारताना त्यांनी स्वतः एक कटाक्ष ठेवलेला आहे तो असा की

युक्तियुक्तं वचो ग्राह्यं न तु पुरुषगौरवात्।

कुठल्याही महापुरुषाचे वचन हे युक्तीने ग्रहण करावं, केवळ त्याच्या मोठेपणाकडे पाहून नव्हे.

तापाच्छेदाच्च निकषात् सुवर्णमिव पण्डितैः।
परीक्ष्य मद्वचो ग्राह्यं न तु पुरुषगौरवात्।
भास्कराचार्य

सोनं ज्याप्रमाणे तावून सुलाखून तपासून स्वीकारलं जातं तद्वतंच माझी वचनेही चिकीत्सेने तपासूनंच स्वीकारावीत, केवळ माझ्या मोठेपणाकडे, पांडित्याकडे पाहून नव्हे..





हा विवेक हिंदुंना पूर्वी जो होता तो मधील काळात लुप्त झाला, जो महर्षि श्रीदयानंदांनी पुनः प्राप्त करून दिला. महर्षि स्वतः म्हणतात की

"बन्धु, हमारा कोई स्वतंत्र मत नही हैं| मैं तो वेद के अधीन हूं और हमारे भारत में पच्चीस कोटी आर्य हैं| कई कई बात में किसी किसी में कुछ कुछ भेद हैं, सो विचार करने से आप ही छूट जायेगा| मैं एक संन्यासी हूँ और मेरा कर्तव्य यही है कि जो आप लोगों का अन्न खाता हूँ इसके पर्यायमें जो सत्य समझता हूँ उसका निर्भयता से उपदेश करता हूँ| मैं कुछ कीर्तिका रागी नहीं हूँ| चाहे कोई मेरे स्तुति करें व निन्दा करें, मैं अपना कर्तव्य समझके धर्म बोध करता हूँ| कोई चाहे माने वा न माने, इसमे मेरी कोई हानि लाभ नहीं हैं|"

आज हिंदुस्थानात आपण अनेक मतमतांतरे, संप्रदाय, पंथ पाहतो. अशा परिस्थितीत वेदांनाच सर्वोच्च प्रमाण माना म्हणणारं आपलं हे मत पुढे जाऊन आपली ही आर्यसमाजाची विचारधाराच एक स्वतंत्र पंथ किंवा मत किंवा संप्रदाय बनेल ह्याची भीती‌ प्रकट करताना सर्वांना सावध करताना युगद्रष्टे महर्षि श्रीमद्दयानंद स्पष्टपणे म्हणतात...

"..और मै सर्वज्ञ भी नही हूँ| इससे यदि कोई मेरी गलती आगे पाई जाय, युक्तिपूर्वक परीक्षा करके इसी को भी सुधार लेना| यदि ऐसा न करोगे तो आगे यह भी(आर्य्य समाज विचारधारा) एक मत हो जायेगा और इसी प्रकार से 'बाबा वाक्यं प्रमाणं' करके इस भारत में नाना प्रकार के मत मतान्तर प्रचलित होके, भीतर भीतर दुराग्रह के रख के लढके नाना प्रकार की सद्विद्या का नाश करके यह भारत वर्ष दुर्दशा को प्राप्त हुआ हैं| इसमे यह भी एक मत (आर्य समाजका) का बढ़ेगा| मेरा अभिप्राय तो हैं कि इस भारत वर्ष मे नाना प्रकार के मतमतान्तर प्रचलित हैं वो भी, ये सब वेदों को मानते हैं इससे वेदशास्त्र रुपी समुद्र में यह सब नदी नाव पुन: मिला देने से धर्म ऐक्यता होगी| और धर्म ऐक्यता से सांसारिक और व्यावहारिक सुधारणा होगी और इससे कला कौशल आदि सब अभीष्ट सुधार होके मनुष्य मात्र का जीवन सफल होके अन्त में अपना धर्म बल से अर्थ, काम और मोक्ष मिल सकता है|"

महर्षी स्वत: म्हणताहेत की त्यांच्या प्रत्येक मताची चिकित्सा करावी व मगच ते स्वीकारावे. केवळ ते म्हणताहेत म्हणून नव्हे. जर त्यांचे मत कुठे चुकीचं आहे असे दिसत असेल, प्रमाणांनी, अनुभवाने चुकीचं सिद्ध होत असेल, तर ते सुधरावे...

याउलट आमचंच मत सर्वोच्च आहे, मी सर्वज्ञ आहे, याचा अमुक अवतार आहे, त्याचा तमुक अवतार आहे, इतर सर्व मते तुच्छ आहेत, केवळ आमच्याच मार्गाने या तरंच तुमचं कल्याण होईल ही भावना बाळगणारी व पेरणारी संप्रदायाभिनिवेशी, पंथाभिमानी, मिथ्या दुराग्रह बाळगणारी मतमतांतरे कुठे नि महर्षि श्रीमद्दयानंद कोठे???

इतकी स्वच्छ, तर्कशुद्ध, विवेकी नि समन्वयात्मक भुमिका ठेवणारे श्रीमद्दयानंद आह्मांस नकोसे वाटतात, ह्यापेक्षा आमची शोकांतिका कोणती आहे?? याचा अर्थ असा नव्हे की आपण आधीपासुन पाळत असलेल्या परंपरा सोडून द्याव्यांत. मूळीच नाही. पण विचार करून जे योग्य ते ठेवावं व वाईट ते‌ सोडावं इतकंच...

जाता जाता हे सांगणं आवश्यक आहे की श्रीदयानंदांच्या सत्यार्थ प्रकाश व ऋग्वेदादिभाष्यभूमिका या दोन ग्रंथांची म्हणजेच त्यांच्या मन्तव्याची जितकी खंडणं आजपावेतो उपलब्ध आहेत, तितकी खचितंच अन्य कुठल्या ग्रंथाची कुणी करायचा प्रयत्न केला असावा आणि त्या खंडनांना पुन्हा आर्यविद्वानांकडून दिली गेलेली मंडनात्मक उत्तरेही आहेत, तीही सर्व पठनीय आहेत. सांगायचं तात्पर्य इतकंच की आंधळेपणाने कुणाचंही मत स्वीकारु नयेच हाच आदर्श वस्तुपाठ आहे...



३० ऑक्टोबर, १८८३ या दिवशी विषप्रयोगाने देह त्यागाची वेळ आली त्याच्या काही दिवस आधीच आपली भूमिका या वीतरागी संन्याशाने मांडताना लिहिलं होते की

''मी मेल्यानंतर माझ्या अस्थी कुणालाही न सांगता नदीमध्ये किंवा अज्ञात स्थळी पुराव्यात, अन्यथा काही लोक माझ्याविषयीच्या भोळ्या भक्तीतून त्याची समाधी बनवतील व वेद व ईश्वर सोडून मलाच पूजत बसतील.''

वेदांनुसार संन्याशाचा देहही जाळायलाच हवा, त्याला पुरणं किंवा नदीत विसर्जित करणे हे वेदविरुद्ध आहे, म्हणून श्रीदयानंदांचा देह जाळण्यात आला होता. यावर सविस्तर येईन कधीतरी.

एकीकडे मी गेल्यानंतर माझी समाधी इथेच अमुकतमुक ठिकाणी मांडा असे म्हणणारे आहेत तर दुसरीकडे इतकी निर्गर्वी, निःस्पृह, निरलस, निःस्वार्थ, निर्मम, निर्लेप, शुद्ध भूमिका मांडणाऱ्या विद्वानाला आपण एकदा तरी अभ्यासणं योग्य नव्हे काय??? याला काही अपवाद मीही मानतो, तो वेगळा विषय. 

सर्वांना एक नम्रतेची विनंती की आयुष्यांत एकदा तरी महर्षींचे निम्नलिखित दोन ग्रंथ तरी अवश्य अभ्यासावेत...

१. सत्यार्थ प्रकाश - सत्यनिष्ठ वैदिक मत कोणते हे मांडणारी अमर ग्रंथसंपदा
२. ऋग्वेदादिभाष्यभूमिका -‌ वेदांकडे कसं पहावं, वेदांचे सत्यनिष्ठ स्वरुप नेमकं काय याविषयीची विस्तृत भूमिका

हे दोन्ही ग्रंथ‌ मराठीतून उपलब्ध आहेत...

पीडीएफ धागे

१.https://archive.org/download/in.ernet.dli.2015.484671/2015.484671.Satyarthprakash.pdf

२. https://archive.org/details/foqe_vaidik-dharm-swarup-of-dayanand-saraswati-translation-by-shridas-vidyarthi-1933-

वाचकांनी स्वत: निर्णय घ्यावा...

वेदांकडे वळावे हीच नम्रतेची विनंती...

भवदीय...

#महर्षिदयानंदसरस्वती_पुण्यतिथी_आर्य्यसमाज_वैदिकसिद्धांत_हिंदुधर्म_मतमतांतरे_संप्रदाय_पंथ



Sunday, 29 October 2023

कविर्जयति श्रीमद्वाल्मीकिः।

 



पठ रामायणं व्यास काव्यबीजं सनातनम्।

यत्र रामचरितं स्यात् तदहं तत्र शक्तिमान्।

बृहद्धर्मपुराण १।३०।४७


पौलस्त्यवध नावाचं एक सनातन काव्यबीजरुपी वाङ्मय, एक आर्षमहाकाव्य ज्या आद्यकवीच्या वाणीतून स्फुरलं, त्या महर्षींची काल कोजागरीची जयंती ! मानवीजीवनाच्या सर्वोच्च आदर्शांचे प्रस्फुटीकरण ज्या आर्ष म्हणजे ऋषिप्रणीत वाङ्मयात आपणांस प्रथमंच दृष्टिगोचर होते, त्या अखंडप्रजाजनरंजनमूर्ती रघुकुलटिळक भगवान श्रीरामचंद्रांचं परमपावन चरित्र ज्या संस्कृतसाहित्याचा अरुणोदय ठरला, त्या श्रीमद्वाल्मीकिय रामायणाच्या रचनाकाराची कालची जयंती! आर्यावर्त्ताच्या, भारतवर्षाच्या, हिंदुराष्ट्राच्या समग्र इतिहासाचा प्रतिनिधीरुप, सर्वांचा अजस्र असा प्रेरणास्त्रोत ज्या श्रीसीतापतीच्या रुपाने आह्मांस प्राप्त झाला, त्या चरित्रकाराची कालची जयंती ! केवळ भारतवर्षातच नव्हे तर इंडोनेशिया, थाईलेंड, मलाया आदि देशांचं राष्ट्रीय काव्य ठरलेल्या या ऐतिह्य महाकाव्याचा निर्माता असलेल्या कविर्मनीषीची कालची कोजागरीची जयंती !



खरंतर काव्य हा शब्द अथर्ववेदामध्येही आला आहे व तिथे प्रत्यक्ष वेदांनाही काव्यंच म्हटलं आहे, इतकंच काय त्या परमात्म्यालाही कविर्मनीषी म्हटलंय वेदांमध्ये, त्यामुळे या अनुष्टुप छंदांमध्ये असलेल्या महर्षींच्या कृतींस आदिकाव्य का म्हणावं असा प्रश्न पडत असेल तर त्याचे साधं उत्तर हेच आहे की हे वेद हे प्रत्यक्ष ईश्वरनिर्मित असल्याने ते अनादि अपौरुषेय आहेत, वेदांमध्ये अनेक मंत्र अनुष्टुप छंदांमध्ये आहेत, इतकंच काय तर वेदांपश्चातचा प्रथम ग्रंथ म्हणजे प्रक्षेप नसलेली विशुद्ध मनुस्मृति ही सुद्धा अनुष्टुप छंदातच आहे, मग श्रीरामायणाला आदिकाव्य का म्हणायचं? तर त्याचे उत्तर हे आहे की याच्यापूर्वीचे उपरोक्त सर्वग्रंथ हे धर्मग्रंथ असल्याने ते अनुष्टुपादि अन्य छंदांमध्येही असले तरीही ते इतिहासग्रंथ नव्हते, पण श्रीरामायण हे ऋषिनिर्मित प्रथम ऐतिह्य काव्य म्हणून ते आदिकाव्य म्हटलं जाते इतकंच याचे तात्पर्य आहे, यावर आणखी विस्तार भविष्यात कधीतरी करेन.


काय आणि किती लिहावं???


ऐतिह्यदृष्ट्या जर या चतुर्युगातलं धरलं तर न्यूनतम ११,८३,००० वर्षांचा इतिहास असलेल्या व वायुपुराणातल्या ७०व्या अध्यायतल्या या ४८व्या श्लोकानुसार २४व्या चतुर्युगातलं धरलं तर न्यूनतम १,८१,४९,०७० अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या या सर्वादर्श चरित्राची गाथा ज्या आद्यकवींनी आपणांस दिली, त्या वाल्मीकि रामायणाचे जनक भगवान महर्षि वाल्मीकिंची काल जयंती झाली. ज्याने आयुष्यात एकदा तरी श्रीरामायण नि श्रीमहाभारत ही दोन आर्ष महाकाव्ये प्रत्यक्ष वाचली आहेत, त्याला या ग्रंथश्रेष्ठांचे महत्व वेगळं पटवून घेण्याची आवश्यकता नाही.


श्रीवाल्मीकिय रामायणावरच्या ३० संस्कृत टीका 

मागेच लिहिलंय की ज्या चरित्रचंद्राच्या उपरोक्त महाकाव्यांवर संस्कृत भाषेत ३० संस्कृत टीका झाल्यात, ज्यावर अन्य भारतीय व विदेशी भाषांमध्येही ३००च्या समीप साहित्यकृती निर्माण झाल्याहेत, इतकं ज्याला जगाने डोक्यावर घेतलं, तो मर्यादापुरुषोत्तम साक्षात् धर्माचा विग्रह असा श्रीराम ज्या महर्षींनी आपल्या दिव्य वाणी नि छंदोबद्ध सिद्धहस्त लेखणीने सिद्ध केला, त्या श्रीवाल्मीकिंविषयी लिहिताना वाणी हिंपुटी व लेखणी बोथट होणार नाही तर काय ???

अर्थात त्या लोकोत्तर महनीय ऋषिश्रेष्ठाला अभिवादन करताना एक खंत मात्र व्यक्त करावीशी वाटते ती अशी की ही मूळ आर्ष कलाकृती मधील काळात किती विकृत झाली हे त्यांचे त्यांनाच माहिती !

ज्या भगवान श्रीरघुनंदनांस आह्मीं आमच्या जीवनाचा सर्वोच्च आदर्श पुरुष व आप्तोत्तम मानतो, त्याचे चरित्र मधील काळात पुटंच पुटं चढत जितकं विस्फारलं नि विस्तारलं गेलं, तितकंच ते काहीअंशी विकृतीसही पोहोचलं. अगदी काहीअंशी का होईना!

एकीकडे आपल्याला जे पटत नाही ते सरसकट प्रक्षेप म्हणून धिक्कारणारे आधुनिक पाश्चात्यमतानुयायी मैकॉलेपुत्र आहेत तर दुसरीकडे वेदाभिमान बाळगून वैदिक साहित्याचे सत्शास्त्रांचे सांगोपांग अध्ययन करून आपली सैद्धांतिक बैठक पक्की करून प्रामाणिक हेतुने चरित्रचिकीत्सा करणारे आहेत, तर तिसरीकडे आह्मीं सर्वकाही म्हणजे वाट्टेल ते प्रमाणंच मानतो असा अट्टाहास असणारेही आहेत, वास्तविक पाहता उपरोक्त ३० संस्क‌ृत टीकाकारांनीही जागोजागी प्रक्षेपानुसंधान केलंच आहे, त्यामुळे ही काहीतरी नवीनंच प्रेरणा आहे अशातलाही भाग नाही, पण तरीही या परमश्रद्धेय चरित्रचंद्रांच्या चिंतनाचा मोह सुटत नाही.

आज उपलब्ध असलेलं वाल्मीकि रामायण प्रत्यक्ष महर्षींचे कितपत आहे हे मान्य करण्यांस आमचं भक्तह्रदय तरी तयार होत नाही. श्रीरामनामाचा प्रत्यही सहस्रावधी जप करूनही अंतरात्मा कुठेतरी सांगतो व अट्टाहासाने त्या परमात्म्याला विनंती करायला लावतो की

पुनः त्या महर्षींनी जन्म घ्यावा व खरं श्रीरामचरित्र पुनः जगासमोर मांडावं !

ते परमपुण्य श्रीरामनाम आह्मींही नित्य जपतोच, तो भगवान श्रीराम आमचाही उपास्यंच आहे, होता नि राहील म्हणूनंच ही भावना !

अर्थात तो श्रीरामंच आता त्याचे विशुद्ध चरित्र सांगेल इतकीच त्या ब्रह्मचैतन्याच्या चरणी प्रार्थना ! ते या जन्मातंच घडेल इतकीच त्याला प्रार्थना ! 

आह्मांस आमचा उपास्यदेव प्रदान करण्यासाठी त्या महर्षींच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत!

जाता जाता सांगतो की श्रीरामायण आधी घडलंय व महर्षींनी ते समकालीन असल्याने पश्चात् शब्दबद्ध केलंय बरंका ! काहीजण ते महर्षींनी आधीच रचलं व श्रीरामचंद्र त्यानुसार वागले असा मिथ्या प्रलाप करतात की जो अत्यंत अप्रमाण आहे. अर्थात तो अर्थवाद आहे इतकंच.

अलम्। 


भवदीय,


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#श्रीमद्वाल्मीकिय_रामायण_महर्षि_वाल्मीकि_भगवानश्रीरामचंद्र_आर्षमहाकाव्य_इतिहास_भारतवर्ष_कोजागरीपौर्णिमा_शरदपौर्णिमा

Tuesday, 15 August 2023

अखंड हिंदुराष्ट्र लेखमाला - लेखांक प्रथम

 


ते - अखंड हिंदुराष्ट्र ही संकल्पना अव्यवहार्य आहे, आत्मघातुकी आहे, व्यवहारशून्यतेचा कळस आहे.


आह्मीं - काय नपुंसका पद्मिनीचें सोहळें। वांझेसी डोहाळें कैचें होतीं। श्रीनाथ


तुमच्यासारख्या गांधीवादी क्लीबांना, ती कल्पना, तो विजिगीषु राष्ट्रवाद हा अव्यवहार्य नि आत्मघातुकाच वाटणार रे! गांधींनी अखंड हिंदुस्थान नाकारून उपकार केलेत ह्मणें! अरे शेतजमिनीचा बांधावरचा एक कोपरा घेतला तर सख्ख्या भावालाही न्यायालयात खेचता आणि इथे तुमची एकतृतीयांश मातृभु त्या पैशाचपंथी इस्लामांधांनी हिसकावून घेतली, ती तुम्हाला परत घ्यावीशी वाटत नाही? किती तो नेभळट गांधीवाद?


ते - अहो हे सगळं भावनिक आहे, आह्मांलाही नकोय का अखंड हिंदुराष्ट्र पण इथले तीस कोटीच आधी झेपेनात, ते आणखी कुठे उरावर घ्यायचे? काय हाल होतील आपले कळतंय का तुम्हाला ? किती दिवस वेडगळ आशेवर जगणार? Be Practical!


आह्मीं - ह्या सर्वाची जाणीव आह्मांस नाहीये का ? आह्मीं बोळ्याने दुध पितो का???


ते - मग आधी इथल्या समस्येचे काय ते तरी सांगा. त्या तीस कोटींचे काय करणार आहात? तुम्ही त्यांना अकारण शत्रु का समजता ? तेही या राष्ट्राचा एक घटक आहेत, त्यांचाही डीएनए एकंच आहे, उपासना पद्धती भिन्न असली तरी त्यांचेही मूळ इथलंच आहे की, मग अकारण शत्रुत्वाची भावना का? 


आह्मीं - कोण त्यांना स्वतःहून शत्रु मानतंय पण? की ते आह्मांस मानतात? सत्य काय ते तुम्हालाही माहितीय की...


ते करतात का कधी विचार १००कोटी हिंदुंचं काय करणार? त्यांना असते का ही भीती??? पण षंढासारखं सारखं सारखं 'त्या तीस कोटींचं करायचं काय' हा विचार तुम्ही आह्मींच करतो ना? अरे त्यांना राष्ट्रीय प्रवाहात यायला कुणी रोखलंय का? दिवसातून पाच वेळा ढुंगण वर करून काफीर हिंदुंच्या 'गझवा ए हिंद'चे विनाशाचं स्वप्न पाहणारे ते कुठे आणि त्यांच्या भीतीने हात पाय गाळलेले तुमच्यासारखे हिंदुत्ववादी म्हणविणारेही कुठे?


ते - अहो पण त्यांच्यातले तरी सगळेच कुठे तसे आहेत ?  


आह्मीं - आह्मीं कुठे सर्वांना तसं म्हणतोय पण मग हे जे 'तसे' नाहीयेत ते का त्यांच्यातल्या 'तसे' असलेल्यांचा धिक्कार करत नाहीत? दाखवा बरं एक तरी उदाहरण ! उलट ते याबाबीतही अल तकिया करतात आणि जो तुमच्यासारख्या बालबुद्धीच्या समान डीएनए वाल्यांना तर समजतंच नाही नि समजून घ्यायची तुमची मानसिकताही नाही


ते - ठीकंय मग ह्यावर उपाय काय काही ठोस कार्यक्रम, काही योजना, काही नियोजन???


आह्मीं - ते सांगण्यासाठी तर हा लेखनप्रपंच आहे कारण आह्मीं कुणी भोळेभाबडे, भावनाविवश झालेले अभिनिवेशी हिंदु नाही आहोत, उलटपक्षी अत्यंत व्यवहारदक्ष नि वास्तवाचे भान असलेले युवक आहोत. आह्मीं संविधानाला प्रमाण मानणारे आहोत....


भारतवर्षासमोर अनेक समस्या आहेत ज्यावर नुकतीच दोन व्याख्याने दिली आहेत, ती सविस्तर मांडणार आहोतंच, त्यापैकी प्रामुख्याने तीन समस्या आहेत, ज्या अगदी वैश्विकही आहेत


१ इस्लाम 

२ ख्रिश्चनिटी 

३ साम्यवाद/समाजवाद/मार्क्सवाद अर्थात समस्त डावे


यातल्या पहिल्या दोन समस्या तर अत्यंत गंभीर आहेत व उघडउघड राष्ट्रघातकी, संविधानद्रोही, हिंदुद्रोही आहेत, तिसरी समस्याही तितकीच समान गंभीर असली तरी पहिल्या दोन्हींचा विचार सांप्रतसमयी अत्यंत निकडीचा आहे. कालच्या अखंड हिंदुस्थान संकल्प दिनानिमित्त नि आजच्या ७७व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ही लेखमाला आरंभ करतो आहे


Stay tuned 


सर्वेभ्यो नमो नमः। स्वतन्त्रता दिवसस्य सर्वेषां कृते हार्दिकं अभिनन्दनम्। 


भवदीय,


पाखण्ड खण्डिणी 

Pakhandkhandinee.blogspot.com


#अखंडहिंदुस्थान_हिंदुराष्ट्र_स्वातंत्र्यदिन_भारतमाता_संविधान_संकल्प

Sunday, 6 August 2023

महाराष्ट्र पतंजलींची आज जयंती - महामहोपाध्याय श्रीवासुदेव शास्त्री अभ्यंकर




गेली कैक वर्षे जो लेख लिहायचा म्हणत होतो, ती वेळ आज आली, मागे फार अल्पसं लिहिलं होते. महाराष्ट्रात वैदिक व्याकरण हा शब्द ऐकला की जे पहिलं नाव डोळ्यासमोर येते, त्या वैय्याकरणी सत्पुरुषाची आज जयंती ! 


काय योगायोग आहे आज ! तिथी आहे अधिक श्रावण वद्य षष्ठी. नेमकं याच तिथीला आंग्लदिनी ४ ऑगस्ट, १८६३ या वर्षी म्हणजे आज पावेतो १६० वर्षांपूर्वी महामहोपाध्याय श्रीमद् वासुदेव शास्त्री अभ्यंकरांचा जन्म महादेवभट्ट व दुर्गाकाकु या दांपत्याच्या पोटी साताऱ्यात झाला. पुरुषोत्तम मासी हा पुरुषोत्तम जन्मांस आला. ज्येष्ठ चिरंजीव दामोदरपंत, द्वितीय रघुनाथशास्त्री नि तृतीय वासुदेवशास्त्री! बालपणापासून मेधाशक्ती अतितीव्र असल्याने वयाच्या पांचव्या वर्षी 'श्री' हे धुळाक्षर गिरविण्यापूर्वीच या मेधावी बालकाचा पाणिनीय धातुपाठ व समासविग्रह अक्षरशः मुखोद्गत होता. पुढे सातव्या वर्षापर्यंत संपूर्ण अमरकोष व भगवान श्रीपाणिनींची अष्टाध्यायी या मेधावी बालकाने कंठस्थ केली. काय बुद्धी असेल !


आणि हे सर्व कसं तर घरातंच पाठशाळा असल्याने आजोबांकडे जे विद्यार्थी शिकायला यायचे, त्यांचे नित्यपठण श्रवण करूनंच !


वडील अचानक निवर्तल्याने आजोबांनी सांभाळलं. आजोबांचे नाव भास्करशास्त्री. परिस्थिती अत्यंत बिकट असली तरी तिन्ही भावंडांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. शास्त्रीजींचे शिक्षण पूर्ण झालं ते महर्षि रामशास्त्री गोडबोलेंकडे साताऱ्यातंच. त्यांना महर्षि ही पदवी प्रत्यक्ष न्यायमूर्ती रानडे यांनी दिली होती.


*आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत कोणताही व्यत्यय न येता आपल्या हातून विद्येची उपासना घडावी, या प्रतिज्ञेने जीवनबद्ध झालेल्या शास्त्रीबोवांनी आपल्या गुरुकडे न्याय व व्याकरणशास्त्राचे सखोल अध्ययन केलं. एकुण वीस वर्षांच्या प्रदीर्घ अध्ययनकालात त्यांनी मुख्यतः व्याकरणावरचे कौमुदी-मनोरमा-परिभाषेंदुशेखर आदि अनार्ष ग्रंथ, वेदांताच्या दृष्टीने अद्वैतसिद्धी व ब्रह्मसूत्रशांकरभाष्य, न्यायदृष्टीने तर्कसंग्रहादि ग्रंथ व स्वशाखेचे म्हणजे तैत्तिरीय संहिता व त्याचा ब्राह्मणग्रंथ हे सर्व मुखोद्गत केले.*


वास्तविक पाहता व्याकरणशास्त्राची मूळ परंपरा ही सुत्रक्रमानुसारी होती पण अनार्ष ग्रंथांमुळे ती प्रक्रियानुसारी होऊन प्रचंड कठीण व वेळखाऊ झाली. ही परंपरा मूळ आर्षग्रंथांची म्हणजे पाणिनीय शिक्षा, धातुपाठ, अष्टाध्यायी, काशिका नि महाभाष्य अशी तीन किंवा फारतर पाच वर्षातंच पूर्ण होणारी असली तरी आह्मीं वर ज्या अनार्ष शब्दाने उल्लेख केला, त्या ग्रंथांनी ती बिघडून टाकली म्हणूनंच की काय प्रत्यक्ष शास्त्रीबोवांनाच 'द्वादश वर्षं व्याकरणं श्रुयते' या रुढीप्रिय वचनामुळे एकुण बारा वर्षांचा कालावधी लागला. हा अनार्ष आणि आर्ष प्रकार नेमका काय आहे ह्यावर कधीतरी सविस्तर लिहू.


*आमच्या पंढरीत एक मास वास्तव्य*


शास्त्रीबोवांच्या आजोबांचे एक शिष्य म्हणजे आमच्या भुवैकुंठीचे श्रीविठ्ठलशास्त्री धारुरकर ह्यांची एक संस्कृत पाठशाळा पंढरीत त्यावेळी होती, तींत एक मास शास्त्रीजी अध्यापनासाठी राहिले. परंतु इथे आपला निर्वाह होईल असे न दिसताच ते साताऱ्यांस परत गेले. ह्या धारूरकर कुटुंबाविषयी अनेकांना माहिती असेलच. या विठ्ठलशास्त्रींचा प्रायश्चित्त व्यवहार प्रकाश नावाचा एक उत्तम ग्रंथ उपलब्ध आहे, पीडीएफ आहे.


*पुढे पुण्यातंच कायमचं वास्तव्य*


'अधिष्ठान तथा कर्ता' या गीतोक्तीप्रमाणे शास्त्रीबोवांनी आपल्या आयुष्याचा पुढचा जवळजवळ पन्नास वर्षांचा काळ हा पुण्यात घालविला, तेच त्यांचे कार्यक्षेत्र झालं.  त्यांच्या गुरुने दिलेले पत्र घेऊन ते न्यायमूर्ति रानड्यांकडे येताच त्यांची व्यवस्था तिथे लागली ती कायमचीच. फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये १८९२ साली अध्यापनाचे कार्य आरंभ करून पुढे ३६ वर्षे त्यांनी ते सुुरु ठेवले. त्याचबरोबर आपल्या पाठशाळेत ५२ वर्षे संस्कृत अध्यापनाचे कार्य केले. पुण्यामध्ये अभ्यंकर पाठशाळा कुमठेकर रस्त्यावर प्रसिद्ध आहे, तिथे त्यांची ग्रंथसंपदा प्राप्त होते.


*ब्रह्मसूत्रशांकरभाष्याचा मराठी अनुवाद*


शास्त्रीबोवांच्या हातून जी काही ग्रंथसंपदा निर्माण झाली, तींत भगवत्पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांच्या ब्रह्मसूत्रभाष्याचा मराठी अनुवाद हे होय. खरंतर त्यांच्यापूर्वी आचार्यभक्त श्रीविष्णु वामन बापटशास्त्रींनी हे कार्य करून ठेवलंच होते. बापटशास्त्रींविषयी काय लिहावं? सविस्तर कधीतरी येईन. त्यानंतर वाईच्या श्रीलेलेशास्त्रींनीही ब्रह्मसूत्रशांकरभाष्याचा अनुवाद केलाच होता, हे दोन्ही अनुवाद पीडीएफ आहेतच. पण या सर्वांमध्ये शास्त्रीबोवांच्या हातून झालेला हा अनुवाद अत्यंत रसाळ व सर्वसामान्यांस समजेल इतका सोप्पा आहे. यद्यपि हा विषय कठीण असला तरी. कारण भगवान शास्त्री धारूरकरांनी म्हटल्याप्रमाणे दुर्बोध विषय सुबोध करून सांगणे, हीच त्यांची कुशलता होती.


*एकुण चार खंडात हे काम केवळ सव्वा दोन वर्षात पूर्ण केले*


बडोद्याच्या गायकवाड सरकारने श्री. चांदोरकर आणि शास्त्रीबोवा या दोघांना हे काम सोपवलं होतं. आरंभी चांदोरकरांबरोबर एक वर्षात निम्मं काम पूर्ण करून त्यांच्या अकाली देहावसानाने शास्त्रीबोवांनी पुढील एक वर्षात शेष सर्व भाष्य अनुवादित तर केलंच पण त्याचबरोबर बडौद्याच्या गायकवाड सरकारच्या सांगण्यावरून अन्य तीन आचार्यांचे म्हणजे श्रीरामानुजाचार्य, श्रीवल्लभाचार्य व श्रीमध्वाचार्य अशा तीनही आचार्यांच्या भाष्यासोबतचे तुलनात्मक कोष्टक तयार करून चोथा खंडही मुद्रणांस दिला. सुदैवाने हे चारही खंड आंतरजालांवर पीडीएफ स्कैन आहेत. गायकवाड सरकारने हा ग्रंथ इसवी सन १९११साली प्रकाशित केला. भगवान पूज्यपाद श्रीशंकराचार्यांचे केवलाद्वैत अथवा मायाद्वैत, श्रीरामानुजाचार्यांचे विशिष्टाद्वैत, श्रीवल्लभाचार्यांचे शुद्धाद्वैत व श्रीमध्वाचार्यांचे शुद्धद्वैत ही चार मते भारतवर्षामध्ये प्रकाशित आहेत, ज्या सर्वांवर तुलनात्मक भाष्य शास्त्रीबुवांनी चौथ्या खंडामध्ये केलं आहे. शास्त्रीबुवांचा आणखी मोठेपणा म्हणजे या कार्यासाठी मिळालेले पाच सहस्त्र रुपये त्यापैकी निम्मे म्हणजे अडीच सहस्त्र त्यांनी तात्काळ चांदोरकरांच्या पत्नीला देऊन टाकले. याला म्हणतात नि:स्पृहता!



सर्वदर्शनसंग्रहाच्या स्वोपज्ञ 'दर्शनाङ्कुर' नामक टीकेने त्यांचा गौरव संपूर्ण भारतामध्ये महापंडित म्हणून झाला. एकुण १६ दर्शनांचा विचार इथे केला गेला आहे. त्यांच्या अन्य विपुल ग्रंथसंपदेमध्ये श्रीमधुसूदन सरस्वतींच्या सिद्धांतबिंदुवरची त्यांची टीका, तत्कालीन धर्मसंघर्षावर 'धर्मतत्वनिर्णय' नावाचा त्यांचा ग्रंथ, मीमांसान्यायप्रकाश, श्रीगीतेवरील पहिल्या दोन अध्यायांवर 'अद्वैताङ्कुर' नावाची टीका ही त्यांच्या विपुल ग्रंथसंपदेपैकी काही उल्लेखनीय आहेत. आश्चर्य म्हणजे गीतेवर भाष्य करताना त्यांनी भावार्थदीपिकेचा म्हणजे श्रीज्ञानेश्वरीचाच आधार घेतला आहे, हे त्यांनी हेतुपुरस्सर नमुद केलं आहे. ज्ञानेश्वर दर्शन नावाच्या नगर इथून प्रकाशित झालेल्या दोन खंडांमध्ये आरंभी त्यांचा प्रस्तावनारुपी लेख आहेच. नुकताच त्याचे पुनर्प्रकाशन झाले आहे.


*व्याकरणमहाभाष्याचा मराठी अनुवाद - अलौकिक आणि दिव्य कार्य*


आम्हांस व्यक्तिशः वासुदेवशास्त्री हे नाव कऴलं, ते त्यांच्या याच दिव्य कार्यामुळे. होय दिव्यंच! कारण भगवान महर्षि श्रीपतंजलींच्या व्याकरणमहाभाष्याचे मराठीत अनुवाद हे अचाट कार्य आहे. संस्कृत व्याकरणशास्त्राची मूळ पुस्तके ही दोनंच


*अष्टाध्यायी-महाभाष्ये द्वे व्याकरणपुस्तके| अतोऽन्यत् पुस्तकं यत्तुं तत्सर्वं धूर्तचेष्टितम्|*


व्याकरणशास्त्राच्या‌ परंपरेमध्ये आह्मीं वर उल्लेखिल्याप्रमाणे ज्या प्रक्रिया ग्रंथांनी म्हणजे अनार्ष ग्रंथांनी धुमाकूळ घालून आधीचं सुलभ असलेलं आर्ष व्याकरण हे अत्यंत‌ बोजड‌, किचकट व वेळखाऊ करून ठेवलं, ते पुन्हा पूर्वस्वरुपांस प्राप्त करून देण्याचे श्रेय महर्षि श्रीदयानंदांचे गुरु वैय्याकरणसूर्य श्रीविरजानंद दंडी सरस्वती यांस जातं. आता आह्मीं प्रक्रिया ग्रंथांना नावे ठेवतो कारण आह्मीं आर्यसमाजी आहोत, म्हणून आमच्यावर शंका घेणाऱ्यांना आह्मीं सांगु इच्छितो की आर्यसमाजाचा किंवा श्रीदयानंद-विरजानंदांचा जन्मही नव्हता, त्याच्या कैक शतके आधीच पंडितराज जगन्नाथ व अन्यांनी ह्या अनार्ष व्याकरण ग्रंथांचा धिक्कार करणारी ग्रंथसंपदा रचलीय, जी सुदैवाने प्रकाशितही आहे. अप्पय्य दीक्षितांना तर त्यांनी गुरुद्रोही म्हटलंय, यावर कधीतरी सविस्तर येऊ.  त्यामुळे वैदिक व्याकरण मूळचं सुलभ करणाऱ्या दोन ग्रंथांपैकी भगवान महर्षि श्रीपतंजलींचा हा महाभाष्य नावाचा ग्रंथ जो भगवान श्रीपाणिनींच्या अष्टाध्यायीवरील भाष्य ग्रंथ आहे, त्याचा मराठीत सप्तखंडात्मक अनुवाद करणं हे कार्य शास्त्रीबोवांच्या जीवनदर्शनावर कळस चढविणारा अध्याय आहे. हे काम करून शास्त्रीजींनी आमच्यासारख्या वेदादिवाङ्मयाच्या व संस्कृतभाषेच्या विद्यार्थ्यांवर जे काही उपकार करून ठेवले आहेत, ते ऋण कधीही फिटणारे नाही. खरंतर या एकाच कार्यासाठी शास्त्रीबोवांचे आह्मीं सदैेव ऋणी आहोत.



हा अनुवाद शास्त्रीबोवांनी फर्ग्युसनमधील निवृत्तीपश्चात् म्हणजे वयाच्या ६५व्या वर्षी करायला घेतला होता व तो त्यांनी सहा खंडात पूर्ण केला, सातवा खंड हा प्रस्तावना खंड आहे, जो त्यांच्या चिरंजीवांनी म्हणजे महामहोपाध्याय श्रीकाशीनाथ शास्त्री अभ्यंकरांनी लिहिला आहे.


अशाप्रकारे एकुणंच व्याकरण, वेदांत, योग, न्याय, मीमांसा, धर्मशास्त्र या विषयांवर जवळजवळ ६००० हून अधिक पृष्ठांचं लिखाण शास्त्रीबोवांनी केलंय. हे कार्य फर्ग्युसनचे अध्यापन व संस्कृत पाठशाळेतलं अध्यापन ही दोन्ही कार्य सांभाळत करणं हे शास्त्रीबोवाच करु शकत. या दीर्घोद्योगी सत्पुरुषाच्या या यशस्वी जीवन कार्यकलापाचे रहस्य कशात आहे, असे विचारल्यावर एकंच उत्तर येईल


*'शुद्ध नैतिक आचरण, ऐहिक सुखाविषयी अगदी मर्यादित अपेक्षा व नित्य कार्यमग्नता ही त्रिसुत्री होय.'*


ज्या गुरू साखरे परंपरेचे आह्मीं शिष्य आहोत, त्या परंपरेतले आमचे आजेआजेगुरु श्रीविनायकबोवा साखरे महाराज हेदेखील शास्त्रीबोवांचेच शिष्य! साखरेवंशविख्यातं ज्ञानदानपरायणं। 


हे कार्य प्रत्यक्ष परमेश्वरानेच त्यांच्याकडून करून घेतले आहे, हे त्यांचे व्याकरण महाभाभाष्याच्या प्रस्तावनेतले उद्गार अक्षरशः सत्य आहेत. अश्विन शुक्ल चतुर्थी, शके १८६४, दिनांक १४ ऑक्टोबर, १९४२ला शास्त्रीजींचे देहावसान झालं. शास्त्रीबोवांचे विस्तृत चरित्र आंतरजालांवर पीडीएफ आहेच. 


https://www.rasik.com/books/MarathiiBooksFromOUDLbyTitle.html


महाराष्ट्राच्या या पतंजलींस जयंतीनिमित्त शिरसाष्टांग दंडवत व कोटी प्रणाम!


#महाराष्ट्रपतंजली_वासुदेवशास्त्री_अभ्यंकर_व्याकरणमहाभाष्य_पुणे_संस्कृतभाषा_ब्रह्मसूत्रशांकरभाष्य

Tuesday, 25 April 2023

पवित्रयति....






वर्षभर ज्या एकाच तिथीची आतुरतेने वाट पहायची अशी आजची तिथी...


*वैशाख शुद्ध पंचमी अर्थात बौद्धादिबुद्धितमसां खलु चण्डभानु: अशा श्रीमच्छंकरभगवत्पादाचार्यांचा जन्मोत्सव...!*


अद्यापपावेतो युधिष्ठिर शक २६३१ अर्थात इसवी सन पूर्व ५०९ ही जन्मतिथी मानत होतो पण मित्रसूतीतले एक विद्वान Vedveer Arya(वेदवीर आर्य) जे स्वत: एक विद्वान इतिहाससंशोधक आहेत, त्यांच्या संशोधनानुसार ती इसवी सन पूर्व ६ एप्रिल ५७६ निघाली. कारण सूर्य मेष राशीत, शुक्र मीन राशीत, शनी तुळ राशीत, मंगळ सिंह राशीत, बुध मेष राशीत. आणि याला जोडून सूर्य-शुक्राची युती वृषभेत ! हे सर्व तपशील ना इसवी सन पूर्व ५०९ ला जुळतात, ना इसवी सन पूर्व ४४ ना मेकॉलेपुत्रांनी मांडलेल्या व मानलेल्या इसवी सन ७८८ ला...


*पण कालनिर्णय काहीही असला तरी इतकं निश्चित की आचार्यांचा काळही इसवी सन पूर्व ५वं शतकंच आहे, यात कधीच तडजोड नाही. मेकॉलेपुत्रांनी दूर रहावे. या सर्व गोंधळाचे कारण कांची, शृंगेरी, कुंभकोणम् मठांचे अंतर्गत वादविवाद तर आहेतंच. पण बोलायचं कोण?*


या आर्षज्ञानप्रचंड भानुचे जीवनातलं स्थान अचल नि अढळ आहे, होतं नि राहील. महर्षि दयानंदांइतकंच. दोघे मला धर्मजिज्ञासेत पूज्य होते नि राहतील.


यद्यपि माझ्यावर महर्षि दयानंद प्रणीत त्रैतवादाचा प्रभाव असल्याने अद्वैतवाद पूर्ण मान्य करण्यांस अद्यापही माझं मन तयार होत नाही तरीही ह्या दोन वादांमध्ये फारसा काही तात्विक भेद आहे असेही नाहीये. दोघांतली साम्यस्थळं कधीतरी विस्ताराने मांडेन. अनुयायांनी अकारण गोंधळ घातलेला असला तरी मला त्यात‌ रस नाही....


आचार्यांची गुणवैशिष्ट्ये...


ही व्यक्ती सद्गुणांची अशी खाण होती. तिची गुणशालिनता मोजु पाहिली तरी लेखमालेचा विषय होईल. अलोकसामान्य व्यक्तित्व, दिव्योदात्त चरित्र, नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा, अपार नि उत्कट भक्ती, ब्रह्मज्ञानाने तप:पूत देह नि जोडीला तर्कशुद्ध प्रत्युत्पन्न मतीचा धनी असलेला हा योद्धा संन्यासी! बालपणीच पितृछत्र हरपलं तरी संन्यास घेऊनही जन्मदात्री मातेवर निरतिशय प्रेम नि श्रद्धा ठेवणारा हा अद्वितीय मातृभक्त, संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तित्वाला आपलंसं करणारी गुणग्राहकता, आपल्या शिष्यांवर केलेलं अलौकिक प्रेम, भक्तांप्रती असीम दया नि शत्रुंप्रतीही अहैतुकी क्षमा!


आईला दिलेल्या शब्दासाठी संन्यासधर्मही प्रसंगी गुंडाळून ठेवणारा हा थोर मातृभक्त...! आणि त्यावेळी मातृपंचकम् सारखी नेत्रांच्या कडा ओलावणारी रचना करणारा हा कोमल ह्रदयाचा कवी..! माझी आई काहीकाळ आयसीयुत होती त्यावेळी मी ह्या रचनेची पारायणे केली होती. ती बाहेर आली त्यावेळी ह्याची एक पोस्टही केली होती.


*भारतीय दार्शनिकांचा, तत्वचिंतकांचा मुकटमणी...*


अद्वैतवेदांताशी कुणाची सहमती असेल नसेल, हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे, पण त्याकाळी उपलब्ध असलेल्या ६४ मतमतांतरांचा गलबला पाहून कुठेही विचलित न होता, हतोत्साहित न होता, मी एकटा काय करणार‌ असा आपल्यासारखा नकारात्मक विचार कदापिही मनात न आणता हा माणुस आपल्या खड्गाच्या धारेसारखा सुतीक्ष्ण बुद्धीने परमतखंडन नि शुद्ध वैदिक मत पुनर्संस्थापन हेतुने तितक्याच प्रगल्भतेने मीमांसा करत तत्कालीन अवघा आर्य्यावर्त पादाक्रांत करत त्याला सुत्रै मणिगणा: इव या गीतोक्तीप्रमाणे चार पीठाधीश्वरांच्या संन्यासपरंपरेत गुंफत राष्ट्रीय एकात्मता‌ साधत भामतीकार वाचस्पति मिश्रांनी म्हटल्याप्रमाणे


*आचार्यकृतिनिवेशनमप्यवधूतं वचोऽस्मदादीनाम्‌ ।*

*रथ्योदकमिव गङ्गाप्रवाहपातः पवित्रयति: ॥*

भामतीकार वाचस्पति मिश्र...


*म्हणजे ज्याप्रमाणे गंगेचे निर्म्मल जल हे गल्लीतल्या पाण्यालाही निर्म्मल करतं, तद्वतंच आचार्यांची वाणी व लेखणी आमच्यासारख्यांच्या वाणींस व लेखणींस पवित्र करते...*


राष्ट्रीय, सामाजिक, राजकीय, वैश्विक, तात्विक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, वांशिक, दार्शनिक एकात्मता साधणाऱ्या ह्या प्रज्ञासूर्याच्या चरणी २५३२/२५९९ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!


भवदीय...


#श्रीभगवत्पाद_शंकराचार्यजयंती_शांकरमठपरंपरा_वैदिकधर्म_राष्ट्रनिर्णाण_भामती

Saturday, 22 April 2023

श्रीपरशुराम होणं तरी कुठं सोप्पंय ???

 


आरंभी घोर तपश्चर्या करत पिनाकपाणीपासून ४६ अस्त्रे प्राप्त करत, पुढे पितृआज्ञेसाठी मातृहत्येचं पातक(टीका) माथी घेताना त्याला काहीच‌ वाटलं नसेल का हो? उद्या इतिहास माझी अवज्ञा मातृहत्यारा म्हणून करेल हा विचार क्षणभरही त्याच्या मनी आलाच नसेल‌ काय? भले पित्याकडून मातेला त्याचे स्मरण न राहण्याचे वरदान घेतलं तरी इतिहासाचं जाऊदे पण जन्मदातीवरंच शस्त्र उचलण्याचे साहस कोण करेल हो? कल्पना तरी? पण पितृआज्ञेसाठी ते पातक त्याने माथी धरलंच ना?


प्रत्येक गोष्टीला अवतारवाद, दैवी लीला वगैरे वेडेपणा करायची मला तरी सवय नाही. कारण मी एक अल्बबुद्धीधारक आहे. श्रीजमदग्नींच्या क्रोधाचं‌ समर्थन होऊ शकतं? ब्राह्मणाला एवढा क्रोध शोभतो? अन्यथा स्कंदपुराणकारांनीच 


पुत्रेणापि पिता शास्या: शिष्येणापि गुरु: स्वयं क्षत्रियै: ब्राह्मणा: शास्या: श्रुतिराह सनातनी|

उन्मार्गगामिनं श्रेष्ठं अपि वेदान्तपारगं नीचै: अपि प्रशास्यिता श्रुतिराह सनातनी|


असे का म्हटलं असते? उपनिषदांनीही 'यान्यस्माकं सुचरितानि' का म्हटलं असतं? 


इतिहासाकडे वस्तुनिष्ठ डोळ्यांनी पहायचं की भगवंतांची लीला म्हणत आंधळ्यासारखं स्वत:ची गोड समजुत घालायची? तो ईश्वरी अवतार असेलही पण आपण मनुष्यंच आहोत की...


अर्थात ह्या प्रसंगानंतर त्यांचा‌ क्रोध कायमचाच शांत झाला असा इतिहास‌ सांगतो...


सहस्त्रार्जुनाने कामधेनु पळवल्यावर त्याच्या पत्नीने मनोरमेने त्याला ती परत करा, हे अपहरण योग्य नाही हे सांगूनही व पुढे चारही भावंडांबरोबर स्वत: श्रीभार्गवरामांनी त्यांस‌ वारंवार कामधेनु परत कर असे विनवूनही त्याने ती न केल्याने उलट युद्धाचे आवाहन दिल्याने अंती निरुपायाने त्याबरोबर युद्ध करत त्याला त्याच्या अधर्माचरणासाठी ठार करत पुन: त्याच्या पुत्रांनी पितृवधाचा सुड घेण्यासाठी आपल्या‌ वडिलांचा सारा आश्रम उध्वस्त करत पित्यावर २१ वार करत‌ त्यांची हत्या केल्यानें आईवरही वार झाल्याने अंती त्याच मातृआज्ञेसाठीच २१ युद्धं करत उन्मत्त क्षात्रसंहाराचे पाप (टीकाही) माथी घेत, शरण आलेल्या क्षत्रियांना अभय देत, जे सदाचरणी आहेत त्यांनाही कुठेच हात न लावता, संपूर्म पृथ्वी कुठेही नि:क्षत्रिय न करता, त्या युद्धांचेही पृथ्वीवर कधीही रात्री न विश्राम करण्याचं यथोचित प्रायश्चित्त घेत, पुनश्च भृगु ऋषींच्या‌ सहाय्याने अकृतव्रणाबरोबर शिल्पवेदाची निर्मिती करत, धनुर्वेदाची संहिताही प्रोक्त करत, सप्तकोंकणाची अर्थात अपरान्हाची निर्मिती करत ती भूमी सुजलाम सुफलाम करणारा हा सृजनकर्ता महर्षि श्रीजमदग्निनंदन...!


ज्याची आई म्हणजे श्रीरेणुकामाताच ही प्रत्यक्ष ईक्ष्वाकुवंशातली होती, त्याच ईक्ष्वाकुवंशातल्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्रासमोर पुढे आपलं तेज विसर्जित करत, त्याचा जयजयकार करत, पुढे द्वापरांती श्रीयोगेश्वरांस सुदर्शन प्रदान करत आणि आपल्याच शिष्यासमोर म्हणजे श्रीभीष्माचार्यांसमोर पराभव पत्करत शिष्याचाही गौरव वाढविणारा असा हा क्षत्रियप्रिय पुरुषश्रेष्ठ श्रीरेणुकानंदन..!


इतकंच काय पण कोळी समाजाला ब्राह्मण करत जातीअंताचा‌ पहिला लढा देणाराही हाच...!


म्हणूनंच म्हणतोय सोप्पं नाही परशुराम होणं...


२१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय हे मूळातंच अतिरेकी विधान आहे. मागेही ह्यावर विस्ताराने लिहिलंय पुनरुक्ती करत नाही. पण केवळ तेवढंच उचलत ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर वाद पेटवायचा आपला नेहमीचा मार्क्सप्रणीत क्लास स्ट्रगलचा अर्थात वर्ग-संघर्षाचा अजेंडा राबवत रहायचा फोडा आणि राज्य कराच्या भेदनीतीचा प्रयत्न कुणी डावे किंवा भारत विखंडन शक्ती किंवा काही राजकारणी खुशाल करोत...


जर हा ब्राह्मण-क्षत्रिय वाद असता तर मध्ययुगीन कालखंडातल्या अनेक राजांनी आपली तुलना श्रीभार्गवरामाशी का केली असती, तसे संदर्भही उपलब्ध आहेत. जो सहस बाह पर राम द्विजराज हैं हे पुण्यश्लोक छत्रपति श्रीशिवरायांनी तरी का मान्य केलं असतं? ते तरी चिपळुणला का गेले असते???


आमच्या दृष्टीने श्रीभार्गवराम होणं सोप्पं तर नाहीच...


कारण केवळ तपाने चिरंजीवी होणं तर दूरंच पण काहीवेळा अप्रिय गोष्टी करूनही तो कटुपणा माथी घेत जगणं हे सोप्पं नाही...!


अंती एकंच...


उपासना, उपासना, उपासना, उपासना|


कशाची? 


तर ब्राह्मतेजाची म्हणजे वेदाध्ययनाची, क्षात्रतेजाची म्हणजे बलसंपन्नतेची, समाजधारणेची म्हणजेच धर्मरक्षणाची, राष्ट्रीयत्वाची म्हणजेच हिंदुत्वाची...!


आजच्या व्याख्यानाचा संक्षेपात सारांश...!


भवदीय...


#अक्षय्यतृतीया_श्रीभगवानपरशुरामजयंती_अपरान्ह_कोंकणनिर्मिती_धनुर्वेद_शिल्पविद्या_सृजनकर्ता

Tuesday, 11 April 2023

हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासाचा श्रीराम...


 

कन्दर्प अगणित अमित छवि नवनीलनीरद सुन्दरम्...|


तो कसा आहे, कसा दिसतो, कसा हसतो, कसा चालतो हे कुणाला माहितीय? ज्यांना त्याचं दर्शन झालं, त्या श्रीतुलसीदास, श्रीरामदास, श्रीज्ञानोबा-श्रीतुकोबारायांनाच, श्रीनामदेवरायांस, श्रीचोखोबारायांस, श्रीब्रह्मचैतन्यालाच तो कळला, ओळखता आला, पाहता आला, अनुभवता आला, चित्तात साठवता आला...


राम समजून घ्यायचाच असेल तर श्रीतुलसीदास नि श्रीरामदास वाचलेच पाहिजेच...आणि आत्ताच्या काळात तुलसीपीठाधीश्वर श्रीरामभद्राचार्यजी...! 


अनुभव चित्ता चित्त जाणें...!


तो कन्दर्प कोटी कमनीय आहे. अरे पण कन्दर्पाला कुणी पाहिलंय का? ज्याची उपमा द्यायची ते उपमानंच मूळात जिथे माहिती नाही, पाहिलं नाही, अनुभवलं नाही, तिथे त्यावरून उपमेयाची कल्पना कशी येईल? पण मग म्हणून तो नाहीयेच का? 


तो आहे इतकंच निश्चित! ज्याने श्रद्धेने त्याचं नाम घेतलं, त्याला सतत आळवलं, त्याला तो भले लगेचंच दिसणार नाही, पण त्याची जाणीव तरी खचितंच होईल. आपल्या अंतरात्म्यात एकदा शांतपणे डोकावून पाहिलं तर त्याच्या नामात तो प्रचित होईलंच. कारण नाम आणि नामी अभिन्न आहेत. नाम हे सार, ह्रदयी जपा निरंतर| म्हणूनंच तो अनिर्वचनीय आहे. कारण तो त्याच्या नामातंच आहे...


कुठल्याही संतांचं चरित्र पाहिलं तर झाडून सर्व संत एकंच सांगतात 


नाम घ्या...


श्रीमाऊलीं म्हणतें


तें नाम सोपें रें रामकृष्णगोविंद|

वाचेंसीं सद्गद जपें आधीं|

नामापरतें तत्व नाहीं रे अन्यथा|

वाया आणिका पंथा जाशीं झणें|


नामंच सर्वश्रेष्ठ आहे म्हणजे अन्य मार्ग तुच्छ आहेत असं थोडीचंय? मग असं असूनही संत नामंच का सांगत असतील? संतांना महर्षि पतंजलींचा मूळ वेदप्रणीत योगमार्ग माहिती नव्हता? माऊली तर स्वत: नाथपंथी. मग संतांनी नामंच घ्यायला का सांगावं???


अर्थात पुढे जाऊन योगसाधनेनेच अंतिम ईश्वरप्राप्ती होते हे संतसाहित्य बारकाईनं पाहिलं तर खरं कळेलही. पण तो फार पुढचा विषय. त्याच्या आधीचा पाया नाम आहे. कारण त्याने चित्तशुद्धी होते म्हणून. 


जन्माला आल्यावर पुढे कळायला लागलं की आई म्हणते हाच तुझा बाप. तिथे पितृनिर्णयात मातृवाक्य जसे शब्दप्रामाण्य म्हणून अटल प्रबल प्रमाण असतं तद्वतंच धर्मजिज्ञासेंत संतवाक्य, ऋषिवाक्य प्रबल असतंच असतं. तिथे जास्ती शहाणपणा चालत नाही. चालवला तर माती होते.


पण नाम किती घ्यावं?


जन्मभरीच्या श्वासाइतुकें मोजियेलें हरिनाम|


दिवसभराचे २१,६०० श्वास, वर्षभराचे गुणिले ३६५ किती होतील, संपूर्ण आयुष्याचे किती? प्रत्येकाने गणित करावं आणि आपआपला मेळ घालावा. म्हणूनंच जपमाळेची संख्याही १०८च का? दिवस किंवा रात्रभरात २०० माळा झाल्या की २१,६०० आपोआप होतात. म्हणून १०८. अन्यही प्रमाण आहेत पण इतकं सोप्पंय समजायला. आता संतांनी सगळं इतकं सोप्पं गणित मांडून ठेवूनही आपल्याला संदेह असेल तर आपल्यासारखं करंटे कोण असावं? 


बाकी श्रीरामनामाचा किंवा आपल्या कोणत्याही ईष्टदेवतेचा जप ३ कोटी काय अन् १३ कोटी काय ! कोण मोजत बसतंय? एवढा वेळ कोणालाय? मोजणारा तो आहे, तो मोजेल की. ह्रदयस्थ श्रीराम किंवा अंतरात्मा आहे. संख्येत कशाला अडकायचं?


माझा इतका जप झाला, तितका जप झाला, इतका राहिला, तितका राहिला? कशाला हा फुकटचा दंभ? 


त्याच्या नावात जे सुख आहे ते अनुभवणं महत्वाचं नाही का? 


प्रियकर प्रेयसीला किंवा प्रेयसी प्रियकराला किंवा नवरा-बायको एकमेकांना सांगतात का की मी तुला इतक्या वेळा आय लव्ह‌ यु म्हणलो किंवा म्हणाले?


नाम जपतें रहें, काम करतें रहें|


श्रीसमर्थ म्हणतात


अखंड नाम स्मरावें, परीं दुसरीयासी कळों नेदावें|

निदिध्यास लागलिया राघवें, पाविजें तात्काळ|

काही साक्षात्कार झाला, तो सांगु नयें दुसरियाला|

जरीं आळकेपणें सांगितला, तरीं पुन्हा होणार नाही|

पुन्हा साक्षात्कार कैंचा, जाला तरी वरपंगाचा|

हां मी आपुलें जीवाचा, अनुभव सांगतो|


ह्यातली पहिलीच ओळ महत्वाची आहे. अन्य फारशी नाही. कारण काही झालं की सांगायची फार हौस असते.‌ लगेचंच मी कसा साक्षात्कारी, मला किती अनुभव, ह्याचा दृष्टांत त्याचा दृष्टांत वगैरे वगैरे ...


लेखणींस विराम श्रीमाऊलींच्याच शब्दात करतो. म्हणूनंच ती म्हणते,


ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरीं|

धरोनि श्रीहरीं जपें सदा|


एक तत्व नाम दृढ धरी मना...


तो दिसावा कळावा हाच तर अट्टाहास आहे. कारण तो कसा आहे हे तोच आता सांगेल. 


आमचे आबा श्री. नितिन भानुशाली म्हणतात, तसंच


#भगवंत_ह्रदयस्थ_आहे..


हे सगळं आज‌ लिहायचं कारण कुणीतरी तो कृत्रिम बुद्धिमत्तेने प्रकाशित केलेला (एआयचा-Artificial Intelligence) फोटो श्रीरामाचा म्हणून फिरवलाय सर्वत्र. आह्मांस तो मान्य नाहीच इतकंच कारण तो कुठेही श्रीरामचंद्रांच्या वर्णनाशी जुळत नाही. पण ठीकंय, ज्याची त्याची श्रद्धा...!


भवदीय...


#श्रीराम_नामस्मरण_रामोपासना_साक्षात्कार_अध्यात्म_संतवचन