Saturday 25 November 2017

मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामचंद्र हे शुद्ध शाकाहारीच होते - आक्षेपांचं साधार नि सप्रमाण खंडण


यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जना: !
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते !
गीता ३:२१

श्रेष्ठ लोक जे आचरण करतात, त्याचंच अनुकरण इतर लोक करतात. ते ज्याला प्रमाण मानून आचरतात, सर्वसामान्य देखील त्यानुसारच वर्तन करतात. आमचे ज्ञानोबाराय ह्यावर भाष्य करताना म्हणतात

येथ वडिल जे आचरितीं
तया नाम धर्म ठेवितीं !
येर तेचिं अनुष्ठितीं,
सामान्य सकळ !
हा अटळ सिद्धांत आहे. रामायण महाभारत ही हिंदुतनमनाची जीवनादर्शे आहेत. त्यातूनही श्रीरामचंद्र नि पूर्णपुरुषोत्तम श्रीकृष्ण हीतर आमची परमदैवते आहेत. त्यामुळे ह्यांचं आचरण हे आम्हांस नित्यनुतन प्रेरणादायी तर आहेत पण अनुकरणीय नि अनुसरणीयही आहे. म्हणूनच ह्या राष्ट्रपुरुषांवर केल्या गेलेल्या खोट्या नि भ्रममुलक आरोपांचं खंडण करण्याचा हा एक साधार नि सप्रमाण प्रयत्न !

धर्माचे पालन, करणे पाषांड खंडण !
हेंचि आम्हां करणे काम ! बीज वाढवावें नाम !
जगद्गुरु तुकोबाराय

परकीयांचं राहुद्यात पण जेंव्हा आमच्यातलेच विद्वान लोक रामचंद्र हे मासांहारी होते असा दुष्प्रचार करतात तेंव्हा अंत:करण विदीर्ण होतं. त्यासाठी रामायणातल्याच काही श्लोकांचाच आधार देऊन हे प्रतिपादन केलं जातं. प्रस्तुत लेखाचा उद्देश्य त्या श्लोकांचा सत्यनिष्ठ नि तर्कशुद्ध नि व्याकरणशास्त्राला धरून असलेला अर्थ सांगण्याचा आहे. तो खालीलप्रमाणे पाहु. त्याआधी श्रारीमचंद्रांच्या शाकाहाराच्या प्रतिज्ञा पाहुयांत

प्रसंग एक - रामचंद्रांनी वनवासाचे वर्णन सीतेला सांगणे - अयोध्याकांड २८ वा सर्ग
वनवासाला निघायच्या आधी रामचंद्रांनी सीतेला वनवासाचं कष्टमय असं खरं स्वरुप समजून दिलं आहे. ते म्हणतात की

अहोरात्रं च संतोष: कर्तव्यो नियतात्मना: !
फलैर्वृक्षावपतितै: सीते दु:खमतो वनम् ! १२ !
अर्थ - सीते ! तिथे मनाला वशीभूत करून झाडावरून पडलेल्याच फळांच्या आहारावरच दिवसरात्र संतोष मानावा लागतो. म्हणून वन हे दु:खप्रद आहे.

उपवासश्च कर्तव्यो यथा प्राणेन मैथिलि 'स
जटाभारश्च कर्तव्यो वल्कलाम्बधारणम् !१३।
अर्थ - हे मिथिलेशकुमारी ! आपल्या शक्तीनुसार उपवास करणे, डोक्यावर जटाभार धारण करण आणि वल्कल वस्त्र धारण करणे - हीच तिथली जीवनशैली आहे.

यथालब्धेन कर्तव्ये: संतोषस्तेन मैथिलि !
यताहारैर्वनचरै: सीते दु:खमतो वनम् ! १७ !
अर्थ - हे मैथिली, वनवासींना जिथे जसा आहार मिळेल तसं त्यावर संतुष्ठ राहावं लागतं. म्हणून ते दु:खप्रद आहे.


निरामिष आहाराची प्रथम प्रतिज्ञा - अयोध्याकाण्ड २०वा सर्ग २९ वा श्लोक 

चतुर्दश हि वर्षाणि वत्स्यामि विजने वने !
कंदमूल फलैर्जीवनम हित्वा मुनिवदामिषम !
अर्थ - मी राज्यभोग्य वस्तूंचा त्याग करून एखाद्या मुनीप्रमाणे कंदमुळे आणि फळे भक्षण करून जीवन निर्वाह करेन आणि १४ वर्षे निर्जन वनामध्ये वास करेन.

आता एवढी स्वच्छ प्रतिज्ञा करणारे रामचंद्र मांसाहारी असतील काय ???

निरामिष आहाराची श्रीरामचंद्रांची वनवासाच्या सुरुवातीचीच दुसरी प्रतिज्ञा - अयोध्याकांड ३४ वा सर्ग !

आपल्या पित्याची दुःखी आणि विषण्ण अवस्था पाहून मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र पित्यास म्हणाले.  

फलानि मूलानि च भक्षयन वने गिरीन्श्च पश्यन सरितः सरांसि च !
वनं प्रविश्यामि विचित्र पादपं सुखी भविष्यामि तथास्तु निर्वृत्तिः ! ५९ !
अर्थ - मी विचित्र वृक्षांनी युक्त अशा वनांमध्ये प्रवेश करून फळ-मुल म्हणजे कंद फळांचा आणि कंद मुळांचा आहार करून तिथल्या पर्वतांना, नदींना आणि सरोवरांना पाहून सुखी होईन. म्हणून आपण आपल्या मनाला शांत करा ! 


निरामिष आहाराची श्रीरामचंद्रांची प्रयाग तीर्थावरच्या भरद्वाज मुनींच्या आश्रमातील तिसरी प्रतिज्ञा - अयोध्याकांड ५४ वा सर्ग !


भरद्वाज मुनींना आपला परिचय करून देताना श्री रामचंद्र म्हणतात. 
पित्रा नियुक्ता भगवन प्रवेक्ष्यामस्तपोवनम !
धर्ममेवाचरिष्यामस्तत्र मुलफलाशना: ! १६ !
अर्थ - हे भगवान ! ह्या प्रकारे पित्याच्या आज्ञेने आम्ही तिघेही तपोवनांत जाऊ आणि तिथे फळ आणि कंदमुळे हा आहार घेऊन धर्माचेच आचरण करू.

आता आत्तापर्यंत तीन वेळा शाकाहाराची अशी प्रतिज्ञा करणारे रामचंद्र हे मांसाहारी कसे असतील??? आणि त्यातूनही रामचंद्र हे एकवचनी आहेत हे सर्वश्रुत आहेच. म्हणजेच जो शब्द दिला तोच पाळणार. त्यामुळे पुढे जाऊन त्यांनी मांसाहार केला असेल तर त्यांच्या प्रतिज्ञेलाच बाधा येईल. 


रामो द्विर्नाभिभाषते !
म्हणजेच श्रीरामचंद्र हे दोन तोंडी वक्तव्य कधीच करत नाही. एकदा जे बोलले ते अटल असते. त्यात पुन्हा परिवर्तन नाही अशी त्यांची खाती आहे आणि मर्यादाही आहे. म्हणूनच ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. तरीदेखील काही जणांना त्यांच्यावर संशय घ्यायचा असेल तर मग धन्य आहे त्यांची ! शेवटी मुर्खाला किती उपदेश केला तरी फरक पडताच नाही.
संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे.

नोsलुकोsप्यवलोकते दिवा किं सूर्यस्य दूषणम् !

आता तरीही आपण ते आक्षेपार्ह श्लोक पाहूयात ज्यावरून मांसाहाराचा आरोप केला जातो. 


प्रसंग प्रथम - सीतेने गंगा पार करताना गंगामातेला काही पदार्थ अर्पण करेन अशी केलेली प्रार्थना - अयोध्याकांड ५२ वा सर्ग 

रामचंद्रांवर मांसाहाराचा आरोप करणारे सर्व जण ह्याच प्रसंगाचा जाणीवपूर्वक संदर्भ देतात. कारण ह्यातले काही श्लोक हे वरवरून तरी त्याच अर्थाचे वाटतात. पण त्याचा नक्की अर्थ काय ते पाहू. सीता म्हणते. 

सुराघटसहस्त्रेण मांसभूतौदनेन च !
यक्ष्ये त्वां प्रीयतां देवि पुरीं पुनरुपागता ! ८९ !

ह्याचा सर्वजण अर्थ शब्दशः "सुराघटसहस्त्रेण" म्हणजे दारूचे सहस्त्र घट असा घेतात. "मांसभूतौदनेन" ह्या शब्दाचा अर्थसुद्धा शब्दशः घेतला तर मांसाहाराचीच व्यंजने असा होतो पण तो इथे युक्त नाही. आक्षेपकार असा आरोप करतात की मनुष्य जो पदार्थ खातो तोच देवतेला अर्पण करतो. त्यामुळे सीतेने मांसाहार अर्पण केला. प वि वर्तकांनी पण त्यांच्या “वास्तव रामायण” मध्ये हाच आरोप केला आहे. पण इथेच तर मुख्य चूक आहे.
ह्या श्लोकाचा वास्तविक अर्थ खालीलप्रमाणे आहे.

सुराघटसहस्त्रेण ह्या शब्दाची व्युत्पत्ती अशी आहे - " सुरेषु देवेषु न घटन्ते न संतीत्यर्थः, तेषां सहस्त्रं तेन सहस्त्र संख्याक सूरदुर्लभ पदार्थेनेत्यर्थः !"
मांसभूतौदनेन ह्या शब्दाची व्युत्पत्ती अशी आहे - "मांसभूतौदनेन मा नास्ति अंसो राजभागो यस्यां सा एव भूः पृथ्वी च व्रतं वस्त्रं च ओदनं च एतेषां समाहारः, तेन च त्वां यक्ष्ये !"

ही व्युत्पत्ती आम्ही जिथून दिली आहे तो संदर्भ !

वाल्मीकि रामायणावर ज्या तीन संस्कृत टीका आजपर्यंत झाल्या आहेत त्यात. 
१. राम ह्या भाष्यकाराने केलेली तिलक टीका
२. शिवसहाय ह्याने केलेली रामायण शिरोमणी
३. गोविंदराज ह्याची भूषण हि टीका 
ह्या तिन्ही टीकांचे प्रकाशन १९८३ वर्षांत परिमल प्रकाशन दिल्लीने केले असून आंतरजालावर ती आज स्कॅन्ड स्वरुपात पूर्ण उपलब्ध आहे. त्यातल्या अयोध्याकांड येथे पृष्ठ क्रमांक ७१९ वर हा संदर्भ आहे. यावरून ह्या पूर्ण श्लोकाचा सत्यनिष्ठ आणि तर्कशुद्ध अर्थ खालीलप्रमाणे होईल.

अर्थ - हे देवी ! अयोध्येला परत आल्यानंतर मी तुला सहस्त्र देवदुर्लभ पदार्थ तसेच राजकीय भाग रहित पृथ्वी, वस्त्र आणि अन्नाद्वारे तुझी पूजा करेन. ! तू माझ्यावर प्रसन्न हो ! 

इथे जाताजाता एक सांगणे आवश्यक आहे की वाल्मीकि रामायणाची जी १९६० ला बडौदा येथून प्राच्यविद्या संशोधन केंद्राने केलेली चिकित्सक प्रत जी आहे, की जी रामायणाच्या २०० हून अधिक प्रतींचा चिकीत्सक अभ्यास करून संपादित केलेली आहे, त्यात हा उपरोक्त श्लोक नाहीये. बंगशाखीय गौरेशियाचे जे रामायण आहे त्यात तर उत्तरकांड हे देखील नाहीये. पंडित भगवद्दत्त रिसर्च स्कौलर ह्या विद्वानांनी संपादित केलेय पश्चिमोत्तररामायणात तर हा प्रसंग ५६ व्या सर्गात असून तिथे उपरोक्त श्लोकच नाही.  त्यामुळे हा श्लोक प्रक्षिप्त सिद्ध होतो हे सिद्ध आहे. आणि जरी नाही मानला तरी आम्ही वर दिलेली रामायण शिरोमणी आदि टीकाकारांची व्युत्पत्तीही त्याचे खंडन करतेच करते.


दुसरा आक्षेप 


ह्याच सर्गातल्या शेवटच्या श्लोकात लिहिले आहे की
तौ तत्र हत्वा चतुरो महामृगान वराहमृश्यं पृषतं महारुरूम !
आदाय मेध्यं त्वरितं बुभुक्षितौ वासय काले खयतुर्वनस्पतिम ! १०२ !
अर्थ - तिथे त्या दोन्ही भावांनी मृगयेसाठी वराह, ऋष्य, पृषत आणि महारुरू या प्रकारच्या वनस्पतींवर प्रहार केला. त्यानंतर जेंव्हा त्यांना भूक लागली, तेंव्हा पवित्र कंद-मुल इत्यादी वनस्पती घेऊन सायंकाळी निवासासाठी ते एका झाडाखाली गेले. 

आता क्षणभर आपण ते प्राणी मृगया म्हणजे शिकार केली असे जरी अर्थ घेतला तरी याचा अर्थ तेच अन्न खाल्ले असे थोडीच आहे??? कारण वनवासात कंद मुळे खायची ही प्रतिज्ञाच केलेली आहे. मग मांसाहार करण्याचा प्रश्नच येत नाही. दुसरे असे की आम्ही वर ज्या तीन टीकांचा उल्लेख केला आहे त्यातही कुठेही मांसाशन सांगितलेले नाहीये. उलट गोविंदराज त्यांस “वनस्पतिमूल” असेच स्पष्ट भाष्य करतो. त्यामुळे ह्या प्रसंगातही रामचंद्राने मांसाहार केला हे मान्यच करता येत नाही. आश्चर्य म्हणजे उपरोक्त आम्ही उल्लेखिलेल्या तीनही संस्करणात तो श्लोकच नाहीये. म्हणूनच हा श्लोकही प्रक्षिप्त सिद्ध होतो. तरीपण ज्यांना हे पटत नाही त्यांनी आयुर्वेदिक भावप्रकाश, मदनपाल निघंटु आदि कोशांमध्ये हे वराह आदि शब्द कोणतेही प्राणी नसून वनस्पती आहेत असे स्पष्ट संदर्भ आहेत ते पाहावेत.


प्रसंग तिसरा - चित्रकूटावर पर्ण शाळेची निर्मिती आणि वास्तुपुरुषाला शांतीसाठी पदार्थाचे अर्पण - अयोध्याकांड ५६ वा सर्ग !

चित्रकूटावर आल्यानंतर निवासासाठी पर्णकुटी बांधण्यासाठी दोघा बंधूंनी तयारी केली. रामचंद्राने आज्ञा देताच लक्ष्मणाने अनेक प्रकारच्या वृक्षांच्या फांद्या कापून आणल्या आणि त्यातून एक पर्णकुटी बांधली. ती सुंदर झालेली पाहून रामचंद्रांनी लक्ष्मणाला म्हटले .

ऐणेयं मांसमाहृत्य शालां यक्ष्यामहे वयम !
कर्तव्यं वास्तुशमनं सौमित्रे चिरजीविभिः ! २२ !
ह्यातला " ऐणेयं मांसम" ह्या शब्दाचा पुन्हा तोच प्रकार आहे. शब्दशः अर्थ मांस असा होतो. पण मदनपालाच्या "निघण्टु" ह्या संस्कृत शब्द्कोशानुसार ह्या शब्दाचा अर्थ "गजकंद" असा आहे. हा एक कंदाचा प्रकार आहे. हा  गजकंद नावाचा कंद रोगनाशक आहे आणि आयुर्वेदात तो प्रसिद्ध आहे.  मदनपालाच्या निघण्टुनुसार ह्याला "षटदोषादिकुष्ठहन्ता" असे म्हटले आहे. हा कंद चामड्याचे दोष आणि कुष्ठादि रक्त विकारांचा नाश करतो. 


भगवान श्रीरामचंद्र म्हणतात की 
मृगं हत्वाssनय क्षिप्रं लक्ष्मणेह शुभेक्षण !
कर्तव्यः शास्त्रदृष्टो हि विधिधर्ममनुस्मर !

इथे "मृगं हत्वा" ह्या शब्दाचा अर्थही अनेक जण "मृग" म्हणजे हरीण असा घेतात. पण इथे तो अर्थ आयुर्वेदिक वनस्पती आहे. त्याची कारणे मी निम्नलिखित संदर्भात सविस्तर दिलं आहे. त्यामुळे आता अर्थ होईल..

अर्थ - हे लक्ष्मणा, तू गजकंद नावाच्या कंदाचा शोध घेऊन तो जमिनीतून उखडून लवकर आणून इथे दे. कारण शास्त्रोक्त नियमांनुसार अनुष्ठान आपल्यासाठी परमकर्तव्य आहे. तू धर्माचेच सदैव चिंतन कर. 

तत् तु पक्वं समाज्ञाय निष्टप्तं छिन्नशोणितं !`
लक्ष्मणः पुरुष व्याघ्रमथ राघवमब्रवीत !२७! 

इथे "छिन्नशोणितं" या शब्दाची व्युत्पत्ती अशी आहे - छिन्नं शोणितं रक्तविकाररूपं रोगजातं येन सः तम !   

अर्थ - रक्तविकाराचा नाश करणारा तो गजकंद एक झालेला पाहून त्या लक्ष्मणाने पुरुषसिंह श्री रामाला असे म्हंटले.

अयं सर्वः समस्तान्गः श्रुतः कृष्णामृगो मया !
देवता देवसंकाश यजस्व कुशलो ह्यसि ! २८ !.

इथे "समस्तान्गः" शब्दाची व्युत्पत्ती अशी आहे - सम्यग भवन्ति अस्तानि अङ्गानि येन सः !
अर्थ - हे देवोपम श्रीरामचंद्र ! हा काळ्या रंगाचा गजकंद, जो बिघडलेल्या सर्व अंगांना ठीक करतो, मी त्याला पूर्ण शिजविले आहे. आता आपण वास्तुदेवतांना त्याचे यजन करा कारण आपण ह्या कर्मामध्ये कुशल आहात.


ह्याचे उपरोक्त आयुर्वेदिक वनस्पतींचे प्रमाण 

आम्ही वर प्रत्येक ठिकाणी प्राण्यांचे मांस असा अर्थ न घेता तो वनस्पती का घेतला आहे ते पाहावे. मांस ह्या शब्दाचा अर्थही वनस्पतीच्या किंवा फळाच्या आतील गाभा असाही होतो. फळाच्या आतील गर असाही होतो. म्हणूनच इथे तोच अर्थ सयुक्तिक आहे. निम्नलिखित प्रमाण द्रष्टव्य आहेत.
  
भावप्रकाश निघंटु -
कर्पूरादिवर्गः मृग - कस्तुरी - तीक्ष्ण, कड़वी, तिक्त, खारी, गर्म, वीर्यवर्द्धक, भारी कफ वात विष वमन शीत दुर्गन्धता तथा शोष को हरने वाली है।
कर्पूरादिवर्गः मृग – तगर - तगर, गर्म, मधुर, स्निग्ध, हल्का और विषरोग मृगी शूल नेत्ररोग तथा वात पित्त कफ तीनों को हरने वाली हैं।
(http://sanskrit.jnu.ac.in/bpnighantu/search.jsp?itext=%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%97&itrans=&lastChar=#results) ह्या घाग्यावर हे प्रमाण उपलब्ध आहे.

प्रसंग चौथा - भरताचे रामाकडे येण्यापूवी गुहकाने त्याला वस्तू भेट देणे आणि त्यावरून त्यांची परीक्षा करणे - अयोध्याकांड - ८४ वा सर्ग 


निषादराज गुहकाने आपल्या बंधूंना नदीची रक्षा करण्यास सांगितले आणि युद्धासाठी तयार राहण्यास सांगितले आणि भेटीची सामुग्री घेऊन तो भारताजवळ गेला. आतिथ्याचा स्वीकार करण्याची विनंती केल्यावर तो भेटवस्तु देता झाला. त्या वेळीच श्लोक 
इत्युक्त्वोपायनं गृह्य मत्स्यमांसमधुनि च !
अभिचक्राम भरतं निषादाधिपतिर्गुह: ! १० !
इथे "मत्स्यमांस" या शब्दाचा अर्थ "मत्स्यंडी" अर्थात मिश्री असा आहे. म्हणजे माशाची अंडी नव्हेतच ! कारण मत्स्यंडी या नावाचा एक अंश "मत्स्य" असा जरी असला तरीही नावाच्या एका अंशावरून संपूर्ण शब्दाचा अर्थ ग्रहण केला आहे.

अर्थ - असे म्हटल्यावर निषादराज गुह मिश्री, फळांचे भार आणि मध आदि पदार्थांची भेट घेऊन भारताजवळ गेला.
ह्याचे प्रमाण
भावप्रकाश निघणटू - हरीतक्यादिवर्गः
मत्स्य - हाऊबेर-अग्निप्रदीपक, कड़वा, कोमल, गरम, कसैला, भारी और पित्त, उदर, वायु, बवासीर, संग्रहणी, गुल्म तथा शूलरोगनाशक है। दूसरी भी यही गुण करती है केवल रूप भेद है।
मत्स्य - कुटकी - रस में कड़वी, पाक में तीखी, रूखी, शीतल, हल्की, मलभेदक, अग्निदीपक, हृदय को हितकर और कफपित्त, ज्वर, प्रमेह, श्वास, खांसी, रुधिरविकार, दाह, कोढ़ तथा कृमिनाशक है।
(http://sanskrit.jnu.ac.in/bpnighantu/search.jsp?itext=%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF&itrans=&lastChar=#results)

मांस शब्द वारंवार आला तरी तसा जनावरांचे मांस असा अर्थ घेताच येत नाही कारण त्याने श्रीरामचंद्रांच्या तीन प्रतिज्ञांना बाधा येते. आणि ते श्लोक परस्परविरोध, अंतर्विरोध, वेदविरोध व्याकरणविरोध ह्या कसोटींनीही प्रक्षिप्त सिद्ध होतात. दुसरे असे की मांस शब्दाचा आणखी एक अर्थ फळाच्या आतला गाभा किंवा गर असाही होतोच. म्हणूनच वनस्पती कारक अर्थच योग्य आहेत.

थोडक्यात उपरोक्त संदर्भावरून हे सिद्ध होते की रामचंद्रांवर मांसाहाराचे जे आरोप केले जातात ते तथ्यहीन व निराधार असून त्यांस उपरोक्त प्रक्षेपादि, प्रतिज्ञाविरोधी, अंतर्विरोधी, वेदविरोधी, परस्परविरोधी, व्याकरणविरोधी प्रमाणांनी आम्ही सप्रमाण खंडन केले असून रामचंद्रांच्या शाकाहाराचे प्रमाणत्व सिद्ध केलंय..


आता महत्वाचा सिद्धांत - वैदिकांना मांसाहाराचा अधिकारच नाही.

मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामचंद्रांचे वर्णन वाल्मीकिंनी बालकांडात चतुर्वेदांचा जाणकार, षड्वेदाङगांचा जाणकार असे स्पष्टपणे केलंय. पुढे  हनुमंत सीतेंस भेटायला गेले असताना तिथेही ते त्यांचे वर्णन करताना त्यांचे वेदानुयायित्व स्पष्टपणे सांगतात. त्यातही रामचंद्र हे त्रिकाल संध्या करणारे असे स्पष्ट रामायणांत ठिकठिकाणी लिहिलंय. स्वत: सीतामाता देखील संध्या करत होत्या असाही हनुमंताच्या मुखाचे "सा सन्ध्याकालमना श्यामा ध्रुवमेष्यति" असे चिंतन आहे. वैदिक सिद्धांतानुसार कोणत्याही प्रकारच्या प्राण्याची हत्या व त्याच्या मांसभक्षणाचे अधिकार कुणांसच नाही, त्रैवर्णिकांस तर तो नाहीच नाही. वैदिक यज्ञ हा "अध्वर" असे असतो. निरुक्तकार यास्क त्यावर भाष्य करताना म्हणतात

ध्वरिति हिंसाकर्म तत्प्रतिषेध: !
ध्वर म्हणजे हिंसा व त्याचा जिथे निषेध तो यज्ञ हा अध्वर असतो. त्यामुळे वेदांमध्येही कोणत्याही प्राण्याच्या हत्येचे समर्थन तर नाहीत, मांसभक्षणाचे पण नाहीच. मां हिंस्यात् सर्वभूतानि असे अथर्ववेद म्हणतो स्पष्टपणे. जिज्ञासूंनी आमच्या पाखण्ड खण्डिणी नामक ह्याच ब्लौगवर सविस्तर लेखमाला अभ्यासावी.

काही लोक क्षत्रियांना मांसाहाराचा अधिकार आहे असा भ्रम करून घेतात की जो पूर्णत: चूक आहे कारण क्षत्रियही वैदिकच आहेत. ते द्विज आहेत अर्थात "द्वाभ्यां जन्म जायते इति द्विज:" ज्याचा द्वितीय जन्म होतो तो उपनयन संस्कार झालेला प्रत्येकजण !

वाल्मीकि रामायणांत मांसाहाराचा व मद्यपानाचा पूर्ण निषेध !

एक भरताचे प्रमाण घेऊ नि लेखणींस विराम देऊ - अयोध्याकांड ७६ वा सर्ग, ३८ वा श्लोक

भरताने श्रीरामचंद्रांस वनवास देणार्याचा निषेध करताना व निंदा करताना म्हटलंय की त्यांस मद्य व मांस भक्षणाचा दोष लागेल. तो म्हणतो.
लाक्षया मधुमांसेन लोहेन च विषेण च।
सदैव विभृयादभृत्यान् यस्यार्योsनुमते गतः।।
अर्थ - लाख, मांस, मद्य, मांसे पकडायचा काटा आणि विषाची विक्री करून आपल्या आश्रितांचे पालन जो करतो, त्यांस जे पाप लागतं तेच पाप त्यांस लागो ज्यांनी रामचंद्रांस वनवासाची अनुमती दिली.

आता ह्यावरून तर स्पष्ट होतं की रामायणकालांत मांसभक्षण व मद्यपांन पूर्ण पापी समजलं जायचं. असे असताना मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामचंद्र मांसाहार करतील???  त्यामुळे उपरोक्त वरवर मांस समर्थक वाटणारे श्लोक एकतर प्रक्षिप्त सिद्ध होतात व तसे न मानले तरी मांसनिषेधाच्या प्रतिज्ञेमुळे त्यांची आम्ही वर दिलेली व्युत्पत्तीही यथार्थ ठरते. 
असो अशा सर्वश्रेष्ठ पुरुषांस विनम्र अभिवादन !

मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामचंद्र की जय !
पवनसुत हनुमान की जय !!
जयतु वैदिक धर्म !!!

©तुकाराम चिंचणीकर
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#रामचंद्र_शुद्ध_शाकाहारी_रामायणातील_तथाकथित_मांसाहार

9 comments:

  1. Great, today we badly need youths like who will counter attack such nonsense prejudiced arguments.

    ReplyDelete
  2. देवा.. मानल तुम्हास
    जय श्रीराम..!!

    ReplyDelete
  3. खुप छान माहिती,,

    ReplyDelete
  4. ह्या असल्या लोकांचे पाखंड खंडन करणारे आपण खरोखरच धन्य आहात प्रभू आपणास अशाच प्रकरच्या पाखंडांचे खंडन करण्याचे सामर्थ्य देत राहो.
    ||जय श्री राम ||

    ReplyDelete
  5. छान माहिती, आणि जबरदस्त कार्य, तुमच्या कार्याला प्रणाम

    ReplyDelete
  6. मुद्देसूद आरोपांचे खंडन करणारी अप्रतिम अभ्यासपूर्ण लेख आवडला।

    ReplyDelete